Skip to main content

केजरूके गुलाम

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 31/03/2015 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

वाचने 207733
प्रतिक्रिया 893

प्रतिक्रिया

केजरीवाल स्टाईल बघण्यासारखी आहे! LOL चा अर्थ समजेल!

आपल्या पक्षाच्या २१ आमदारांचे दिल्ली विधानसभेचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यावर आपले युगपुरूष बिथरले आहेत. त्यांनी आता एक नवा आरोप केला आहे. दिल्ली महापालिकेच्या एका इंजिनिअरचा मागच्या महिन्यात खून झाला. त्यात भाजपचे खासदार महेश गिरी यांचा हात आहे असा नवाच आरोप त्यांनी केला आहे. त्यावर महेश गिरी यांनी रविवारी १९ जूनला दुपारी ४ वाजता दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमात येऊन आपल्याविरूध्दचे पुरावे सादर करावेत आणि पुरावे सादर केल्यास आपण राजीनामा देऊ आणि पुरावे सादर करता न आल्यास त्यांनी राजीनामा द्यावा असे खुले आव्हान युगपुरूषांना दिले आहे. A आपले युगपुरूष त्या कार्यक्रमाला जातात का ते बघायचे. अर्थातच आपण डायरेक्ट भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून पृथ्वीतलावर येऊन पडले आहोत असा एक मोठ्ठा गैरसमज आपल्या युगपुरूषांचा आहेच. त्यामुळे आपण कोणावरही कसलेही आरोप पुरावे नसताना करावेत आणि इतर कोणीही आपल्याला प्रश्न विचारले तर तो माणूस भ्रष्ट, अंबानी-अडाणींचा एजंट, बीजेपीच्या पेरोलवरचा वगैरे गोष्टी या युगपुरूषांना वाटत असतातच. त्यामुळे हे त्या कार्यक्रमाला जातील याची शक्यता फारच कमी. २०१४ च्या निवडणुकांपूर्वी गुजरातमध्ये जाऊन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींच्या ऑफिसवर आधी भेटीची वेळ न घेता थडकून "मोदींनी माझ्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत आणि उत्तरे दिली नाहीत तर मोदी मला घाबरतात" असला तमाशा याच गृहस्थाने केला होता. आता दुसर्‍या कोणी तसे आव्हान आपल्याला दिल्यावर यांची प्रतिक्रिया काय होते हे बघायचे.

In reply to by गॅरी ट्रुमन

अर्थातच आपण डायरेक्ट भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून पृथ्वीतलावर येऊन पडले आहोत असा एक मोठ्ठा गैरसमज आपल्या युगपुरूषांचा आहेच. केजरीवाल हे "समय" आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे केजरीवालांच्या दरबारातले आहेत, उलट नाही...
---------- \center> (क्षमस्व, पण केजरीवालांच्या बद्दल लिहीताना एकतर कडक टिका अथवा उपरोध या व्यतिरीक्त लिहीणे अवघड जाते.)

In reply to by विकास

केजरीवाल हे "समय" आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे केजरीवालांच्या दरबारातले आहेत, उलट नाही...
हहपुवा

In reply to by विकास

(क्षमस्व, पण केजरीवालांच्या बद्दल लिहीताना एकतर कडक टिका अथवा उपरोध या व्यतिरीक्त लिहीणे अवघड जाते.)
+ १ हा माणूस संपूर्ण दिवस ट्विटरवर असतो किंवा चित्रपटगृहात असतो. निवृत्त लोकांकडे पण एवढा वेळ नसतो. याची ट्विटरवरील भाषा बघा.
Modi ji ne bhi chun chun ke chamchon ki fauj jama ki h- Gajendra Chauhan, chetan chauhan, pahlaj nihalani, arnab goswami, smriti irani

त्यामुळे आपण कोणावरही कसलेही आरोप पुरावे नसताना करावेत आणि इतर कोणीही आपल्याला प्रश्न विचारले तर तो माणूस भ्रष्ट, अंबानी-अडाणींचा एजंट, बीजेपीच्या पेरोलवरचा वगैरे गोष्टी या युगपुरूषांना वाटत असतातच.
केजरीवाल सध्या अत्यंत पिसाळले आहेत. आता तर त्यांनी राष्ट्रपतींवरही शरसंधान केले आहे. त्यांची मुक्ताफळे पहा. राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतलेला असताना मोदी यांना दूषणे का दिली जात आहेत, असे विचारले असताना केजरीवाल म्हणाले की, राष्ट्रपती कोणताही निर्णय घेत नाहीत, फाइल त्यांच्याकडे जात नाही, सरकार आणि गृहमंत्रालय निर्णय घेते, असेही ते म्हणाले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/aap-mla-under-disqualification… यांचे अजून एक भांडे फुटले. http://www.maharashtratimes.indiatimes.com/nation/aap-suspends-alka-lam…

मला कुणीही विचारलेले नसतानाही मी एक सांगू का? केजरीवाल लै चुका करत असेल आणि विदुषकी चाळे करत असेल पण या धाग्यावर ज्या थाटात ते मांडले जात आहे ते सुद्धा फारसे पटत नाहीये.

केजरीवालांनी गुदस्ता साली आआपच्या २१ आमदारांची आआपच्या ६ मंत्र्यांचे संसदीय सचिव पदावर बेकायदेशीररित्या नेमणूक केली. त्याबद्दल जेव्हा आरडाओरडा झाला तेव्हा त्यांची नेमणूक कायदेशीर करण्याकरीता व त्यांना लाभाचे पद या नियमापासून मुक्ती देण्याकरीता त्यांची नेमणूक लाभाचे पद या कायदेशीर कचाट्यातून सोडविण्यासाठी त्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने एक विधेयक आणून ते विधानसभेत मंजूर करून घेतले. जेव्हा राष्ट्रपतींनी ते विधायक फेटाळले तेव्हा त्यांनी राष्ट्रपतींच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करून नेहमीप्रमाणे मोदी व राजनाथ सिंगांच्या नावाने खडे फोडले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले होते,
“They are highly qualified people in different fields, starting from MBA to engineering and not illiterates like in other parties. Mohalla Clinics are product of their hard work so is the mapping of schools,” Kejriwal Said.
त्यातील काही highly qualified जणांची (शिव चरण गोयल, राजेश गुप्ता, जर्नेल सिंग, अवतार सिंग, मनोज कुमार) व आआपच्या इतर काही जणांची शैक्षणिक पात्रता बघा.

In reply to by कपिलमुनी

इतर पक्षांच्या नेत्यांच्या डिग्रीची उठाठेव महाराष्ट्रातील कुठल्याही पक्षाने केली आहे काय? ज्या पक्षाने ती गेले काही दिवस अखिल भारतीय पातळीवरून करून धुरळा उडवला आहे, त्याच्या स्वतःच्या नेत्यांच्या डिग्रींची स्थिती काय आहे, हे पहाणे म्हणूनच अगत्याचे ठरते, इतर पक्षांचे नाही.

In reply to by कपिलमुनी

पब्लिकमध्ये फरक आहे, तो राहू दे की. मुळात जोपर्यंत आपल्या राज्यघटनेत दुरूस्ती करुन किमान शैक्षणिक पात्रता असलेले लोकच निवडणूक लढवू शकतात असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे असंच होत राहणार आहे. असे लोक प्रत्येकच राजकीय पक्षात आहेत. कुणीही समोरच्याकडे बोट दाखवू नये, तीन बोटं स्वतःकडेच रोखली जातात - हेच यातून सिद्ध होतंय.

In reply to by बोका-ए-आझम

सगळे शेंबडे आहेत :) पण सुपारी घेउन घाउक टीका का? असा अजेंडामुळे मराठी संस्थळांना साहित्यीक जाउन राजकीय स्वरुप येते

In reply to by कपिलमुनी

मराठी संस्थळांवर राजकीय चर्चा व्हायलाच पाहिजेत. शिवाय आता तर साहित्यातही राजकारण शिरलेलं आहेच. आणि समोरचा शिव्या घालण्यासारखं किंवा टीका करण्यासारखं वागत असेल तर शिव्या या घालायलाच पाहिजेत आणि टीका ही करायलाच पाहिजे - जे केजरीवाल आणि त्यांची आआप करताहेत. बरं, अजेंडा काय फक्त भाजपवाल्यांनाच आहे? बाकीचे काय कोरी पाटी घेऊन हिंडतात?

In reply to by कपिलमुनी

दुसऱ्या कुठल्याही पक्षाने प्रामाणिकपणाचा साधनशुचितेचा मक्ता आमच्याच कडे आहे असा टेम्भा मिरवला नाही किंवा जगात सत्य प्रामाणिकपणा शिक्षण आणि ज्ञान हे फक्त आमच्याकडेच आहे असा दावा केला नाही. "आप" त्यांच्याच न्यायाने वागवले आणि त्यांचेच माप त्यांच्या पदरात टाकले की त्यांचे अकांड तांडव सुरू होते. इतके दांभिक पण कम्युनिस्टांनी सुद्धा दाखवले नसेल.

In reply to by कपिलमुनी

६वी पास(?) उमा भारतीय मंत्रीपद भूषवत असताना दुसऱ्याचा शेबूंड कशाला दाखवायचा
स्वतःच्या दोन्ही नाकपुड्या शेंबडाने गच्च भरलेल्या असताना आणि दोन्ही नाकपुड्यातून ऐवज गळत असताना हे चरट दमी क्षवालेच दुसर्‍यांच्या नाकाची उठाठेव करीत आहेत.

In reply to by प्रदीप

केजरीवाल उवाच: “Our MLAs are diligent, qualified and educated. We have MBAs, doctors and engineers. They are not like the illiterates in other parties. So, when we have such a talent pool, we have to use it to serve the people. That is why they voted for us” आपल्या २१ आमदारांचे लाभाच्या पदावरून विधानसभेचे सदस्यत्व रद्द व्हायची शक्यता निर्माण झाल्यानंतर आपल्या आमदारांच्या समर्थनार्थ श्री.रा.रा केजरीवालांनी ही मुक्ताफळे उधळली होती. असे देवेन्द फडणवीसांनी म्हटलेले नसल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांची शैक्षणिक पात्रता किती हे बघायचा संबंध आला नाही. अर्थातच आपटर्डपुढे लॉजिक चालत नाही त्यामुळे ते ही गोष्ट समजूच शकणार नाहीत. हे इतरांसाठी लिहित आहे.

In reply to by प्रदीप

इतर पक्षांच्या नेत्यांच्या डिग्रीची उठाठेव महाराष्ट्रातील कुठल्याही पक्षाने केली आहे काय? ज्या पक्षाने ती गेले काही दिवस अखिल भारतीय पातळीवरून करून धुरळा उडवला आहे, त्याच्या स्वतःच्या नेत्यांच्या डिग्रींची स्थिती काय आहे, हे पहाणे म्हणूनच अगत्याचे ठरते, इतर पक्षांचे नाही.
वेल सेड प्रदीप! +१

काहीच प्रतिसाद नाही सगळे एकाच बाजूने लढत आहेत 15 20 नवे प्रतिसाद झाले कि धागा उघडून वाचायचा छान करमणूक होते एवडे होऊनही अजून काही लोक आप समर्थक असतील तर देव त्यांचे भले करो किंवा कदाचित त्यांना आपले श्रद्धा स्थान चुकीचे आहे हे कबूल करण्याची लाज वाटत असावी

In reply to by सामान्य वाचक

एवडे होऊनही अजून काही लोक आप समर्थक असतील तर देव त्यांचे भले करो
बापरे म्हणजे देवाला बरेच काम दिलेत की हो. इतके सगळे होऊनही (किंवा यापेक्षाही जास्त झाले तरी) आआपचे समर्थन काही लोक करतच राहतील. इकडच्याच काही माजी सदस्यांच्या फेसबुकच्या भिंती बघितल्यास मी नक्की काय म्हणत आहे हे लक्षात येईलच.

In reply to by सामान्य वाचक

काहीच प्रतिसाद नाही सगळे एकाच बाजूने लढत आहेत
तुम्ही ज्यांची आतुरतेने वाट पहात होता ते आआप समर्थक लढण्यासाठी आलेले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही ज्यांची आतुरतेने वाट पहात होता ते आआप समर्थक लढण्यासाठी आलेले आहेत.
आणि चार महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेली अशाच एका आआप समर्थकाची ड्यु.आयडी पण आता लढाईत उतरली आहे असे दिसते. असो.

गेल्या तीन दिवसात नव्या घडामोडी घडल्या आहेत. दिल्ली महापालिकेचे वकिल एम.एम.खान यांच्या खुनात भाजपचे खासदार महेश गिरी सहभागी असल्याचा आरोप केजरीवालांनी नायब राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. आणि तो आरोप करतानाही आपल्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल होऊ शकणार नाही याची पुरेपूर काळजी केजरीवालांनी घेतली आहे. म्हणजे ’या हत्येत महेश गिरी यांचा हात आहे असे बोलले जात आहे’ अशा स्वरूपाचे वाक्य त्यांनी त्या पत्रात लिहिले आहे. आणि मग ’मोदींचे’ दिल्ली पोलिस (केजरीवालांच्या भाषेत ठुल्ले--म्हणजे नक्की काय हे दिल्लीकरच जाणोत) महेश गिरी यांना पाठिशी घालत आहेत अशा स्वरूपाचे विधानही केजरीवालांनी केले म्हणजे एकीकडे आरोप पण केला आणि दुसरीकडे अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याइतकी स्पष्ट भाषाही वापरली नाही. असो. तर याविरोधात १९ जूनला दुपारी चार वाजता दिल्लीत Constitution Club मध्ये महेश गिरींनी पुराव्यानिशी खुल्या चर्चेसाठी यायचे खुले आव्हान महेश गिरींनी केजरीवालांना दिले. अर्थातच केजरीवाल त्या ठिकाणी गेले नाहीत. फेब्रुवारी २०१५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी ’दिल्ली डायलॉग’ म्हणून एक प्रकार आआपने आयोजित केला होता. त्यावेळी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींना त्याचे आमंत्रण दिले गेले होते. आणि त्या तिथे गेल्या नाहीत तेव्हा त्यांच्या नावाने रिकामी खुर्ची ठेवण्यात आली होती. महेश गिरींनी नेमका हाच प्रकार केजरीवालांवर उलटवला. Kejru1 म्हणजे मजा बघा. हे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयावर आधी वेळ न घेता जाऊन थडकणार आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर मोदी मला घाबरतात असे म्हणणार. सगळ्या जगाला ’खुली बहस’ साठी आमंत्रण देणार आणि समोरची व्यक्ती आली नाही तर ’जितं मया’ म्हणून भाव खाणार. मग आता अशाच ’खुल्या बहस’ साठी इतर कोणी आमंत्रण दिले तर त्यापासून हे दूर का पळतात? Kejru 2 हिट ऍन्ड रन हा तर केजरीवालांचा स्थायीभावच आहे. काहीतरी सनसनाटी आरोप करायचे, खळबळ माजवायची आणि आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ कसलेही पुरावे द्यायचे नाहीत आणि इतरांनी मागितले तर पळून जायचे. आता दोन दिवसांपासून महेश गिरींनी केजरीवालांच्या घरासमोरच धरणे देऊन उपोषण सुरू केले आहे. मी शक्यतो अशा नाटकांना समर्थन देत नाही. पण जो प्रकार केजरीवालांनी केला होता तीच दवा त्यांनाच कोणीतरी खिलवायला हवीच होती. ते काम महेश गिरी करत आहेत. हा प्रकार किती दिवस चालेल हे माहित नाही.पण त्या निमित्ताने केजरीवालांनी जो सौजन्याचा आणि सोवळेपणाचा बुरखा पांघरलेला आहे तो टराटरा फाटायला मदतच होईल. निदान मिपावर ते काम मी अगदी इमाने इतबारे करणार आहे--- इतर कोणालाही काहीही वाटले तरी.

In reply to by गॅरी ट्रुमन

मला मनमोहन देसाई ( तेच ना नक्की?) यांचे 1 वाक्य आठवते भारतीय प्रेक्षकांचे सरासरी वय 15 आहे त्यामुळे तसेच चित्रपट बनवले जातात दिल्लीवाल्यानी हे पूरेपूर पटवून दिले जगात कुंभार थोडे ,,,,, हे तर आहेच केजु ना कुंभार होणे जमले आहे

या संदर्भात एक रोचक बातमी सापडली. याचा स्पष्टीकरण पण तयार असेलच ते वाचायला आवडेल

In reply to by कपिलमुनी

मोदींनी नेमलेल्या संसदीय सचिवांचा काय बरे कारण असेल??

In reply to by कपिलमुनी

अहो तिथे कायदा आधीपासूनच होता. (मोदींनी केला का त्याही आधीपासून ते माहीत नाही!) तेच मला वाटते राजस्थानात देखील कायदा आहे. त्यामुळे कायद्यानुसार आमदारांना या संदर्भात exempt केलेले होते. तुमच्या केजरीवालांनी कायदा नसताना आमदारांच्या नियुक्त्या केल्या. कदाचित त्यांना वाटले असावे की आपण दिल्लीचे शेहनशहा असल्याने काहीही करू शकतो... जेंव्हा लक्षात आले की ते प्रकरण शेकणार तेंव्हा कायदा करून जे बेकायदा आहे ते कायद्यात बसवण्याचा प्रयत्न केला. आता जर त्यांनी तशा नियुक्त्या केल्या तर त्या चालू शकतात पण जेंव्हा ती कायद्यानुसार लाभाची पदे होती त्यांना मात्र तत्कालीन कायद्यानेच बरोबर का चूक ठरवता येऊ शकेल. नंतर केलेल्या कायद्याने नाही!

In reply to by कपिलमुनी

तुमच्या केजरीवालांना साधा कायदा माहित नाही? ते तर सर्वज्ञ आहेत ना? इतर मुलं ' अडगुलं मडगुलं ' वर पाय आपटायची त्यावेळी केजरीवाल राज्यघटनेचा अभ्यास करायचे ना? मग आता का त्याच मुलांप्रमाणे हातपाय आपटताहेत?

Delxit होणार तर अशक्य आहे हा माणूस

जगातील एकमेवाद्वितीय प्रामाणिक पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांनी एका वृध्द गृहस्थावर हात उचलला असा आरोप आहे. त्याचे झाले असे की हे त्यांच्या समर्थकांसह गेले असताना त्या वृध्द गृहस्थाला त्यांना ओळखता आले नाही. काय हा उपमर्द. इतक्या प्रामाणिक माणसाला हे ओळखत कसे नाही? विशेषत: दिनेश मोहनियांकडे KCHP (Kejriwal Certified Honest Politician) ह अत्यंत coveted सर्टिफिकेट असताना त्यांना न ओळखता येणे हा गुन्हा माफ करता येण्याजोगा नाहीच. त्यामुळे दिनेश मोहनियांनी त्या वृध्द गृहस्थावर हात उचलला असा आरोप आहे. तसेच एका वृध्द महिला यांच्या कार्यालयात त्यांच्या भागातील पाणीटंचाईची तक्रार करायला गेल्या असताना या दिनेश मोहनियांनी त्यांच्याशीही गैरवर्तन केले असा आरोप आहे. महिलेशी असे गैरवर्तन करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. तरीही ’आपले कोण काय वाकडे करेल’ अशा गुर्मीमध्ये दिनेश मोहनिया पत्रकार परिषद घेत असताना पोलिसांनी त्यांना तिथूनच अटक करून उचलून नेले. झाले. सगळे आभाळ कोसळले. मग केजरीवालांना दिल्लीमध्ये आणीबाणी लागू झाली आहे हे स्वप्न पडले. मिडिया सुध्दा या मोहनियांनी थोबाडित मारलेल्या त्या वृध्द गृहस्थाला आणि त्या महिलेला फारसे कव्हरेज देताना दिसत नाहीत. उत्तराखंडमध्ये घोड्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यावर याच मिडियावाल्यांनी दिवसभर त्याविषयी चर्वितचर्वण चालवले होते. मी एक प्राणीप्रेमी असल्यामुळे मला त्या घोड्याचा पाय फ्रॅक्चर झाला (आणि नंतर निधन झाले) याचे वाईट वाटलेच होते. पण मिडियावाल्यांच्या मते आमदाराने वृध्द माणसाच्या थोबाडित मारणे किंवा त्या महिलेबरोबर वाईट वर्तणूक करणे ही अजिबात महत्वाची गोष्ट वाटत नाही. बरोबर आहे. मिडियावाले आआपविरूध्द कसे काही बोलतील? दिल्ली सरकारच्या अधिपत्याखालील कॉलेजांमध्ये ३१ मोठ्या मिडियावाल्यांची नियुक्ती करून केजरीवालांनी त्यांना वश करून ठेवले आहे ना? असो. मग त्या भाजप आमदाराला घोड्याला इजा पोहोचवल्याप्रकरणी उत्तराखंडमध्ये अटक झाली होती त्यावेळी उत्तराखंडमध्ये आणीबाणी असल्याचे या केजरीवालांना वाटले नव्हते. हा आम आदमी पक्ष, त्याचे समर्थक आणि त्याला पाठिशी घालणारे मिडियावाले म्हणजे भारताला लागलेले सगळ्यात मोठे ग्रहण आहे. हे असले हलकट असताना बाहेरच्या शत्रूची गरजच काय?

In reply to by गॅरी ट्रुमन

1] अहो अशी देशात कितीतरी उदाहरणं आहेत कि आमदार/खासदारांनी लोकांशी गैरवर्तणुक केली. मुद्दा असा आहे कि मोहनियांनी थोबाड मारली कि नेमकं काय झालं? त्या ठिकाणी तुम्ही होतात का? 2]मिडियावाले आप ला पाठिशी घालतायत??? अहो त्यात्या,एक 'आज तक' चॅनेल व्हुतं 'आप'ची हुजरेगिरी करणारं पण ते देखील आता तसं करताना दिसत नाही.किती चॅनेल्स मोदीभाट आहेत,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.तरी तुम्ही मिडियावर आक्षेप घेताय? एनडीटीवी वगळता सगळीकडे 'आप चा सरेंडर ड्रामा' अशाच बातम्या सुरू आहेत,त्यामुळे तुमच्या 'मिडिया आपला पाठिशी घालते'या विधानात काही तथ्य नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

महिलेशी असे गैरवर्तन करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. तरीही ’आपले कोण काय वाकडे करेल’ अशा गुर्मीमध्ये दिनेश मोहनिया पत्रकार परिषद घेत असताना पोलिसांनी त्यांना तिथूनच अटक करून उचलून नेले.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/two-molestation… Three cases have been registered against AAP MLA Dinesh Mohaniya in the last four months, including one on charges of assault and two on charges of molestation, police sources told The Indian Express Saturday. “The first case was registered at Govindpuri police station in March, after he allegedly misbehaved with some women in Tughlakabad during a protest. Later, he filed a cross-case against the complainants. He was granted anticipatory bail in that case. Another case of molestation was registered at Neb Sarai police station and a third case was registered after he allegedly slapped a 60-year-old man Friday,” said sources. They added that Mohaniya had been repeatedly asked to join the investigation, but he had not responded to four notices issued by Delhi Police. “When the investigating officer called him up, the MLA assured him he will join the probe. But he did not turn up,” said a source. He added that on Thursday, three complainants had recorded their statement before a magistrate and claimed they were molested by Mohaniya and his supporters the day before. During questioning, Mohaniya told police that some residents, including the complainants, had created a ruckus in his office, said sources. The MLA reportedly told police about three persons who were present in his office during an argument between him and the woman. However, police sources said these witnesses, in their statement to police, had corroborated the allegations made by the complainant, not the MLA. A day before Mohaniya was arrested, the investigation officer in the molestation case had gone to the MLA’s house to issue a notice to join the probe, for the fourth time. But Mohaniya was not home and his father refused to accept the letter, said sources. Senior officials then decided to arrest the MLA, added sources.
झाले. सगळे आभाळ कोसळले. मग केजरीवालांना दिल्लीमध्ये आणीबाणी लागू झाली आहे हे स्वप्न पडले.
महिलांशी गैरवर्तन करणे, ६० वर्षाच्या व्यक्तीला आपल्याला न ओळखल्याबद्दल कानफाटीत मारणे, पोलिसांनी ४ नोटिसा पाठवून सुद्धा चौकशीसाठी हजर न राहणे या गोष्टींंमध्ये २१ व्या शतकातील अवतारी महापुरूष श्री श्री केजरीवाल महाराज यांना काहीच वावगे वाटत नाही. पण या गोष्टींविरूद्ध गुन्हे नोंदविल्यानंतर पोलिसांनी अनेकवेळा बोलावून सुद्धा हजर न राहण्याबद्दल अटक केली तर लगेच यांना दिल्लीमध्ये आणीबाणी लागू झाल्याची खात्री झाली. अंगात पराकोटीचा ढोंगीपणा व पराकोटीचा निगरगट्टपणा असल्याशिवाय असे वाटत नसते

ऑ

च

/

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

मोदी के गुलाम असा धागा काढा आणि हे सगळे तिकडे पोस्ट करा बघू धाग्याच्या विषयाला धरून लिहा कि जरा . आणि आप समर्थक असाल तर लोका नि केलेल्या आरोपांवर काही उत्तर द्या उगीच। 'मग तू पण माझा डबा खाल्ला' मोड मध्ये जाऊ नका

पाताळ शोधता शोधता कधी पाताळात जाईल हा महामुर्ख मनुष्य कळणार ही नाही,मागे एका त्याच्या माजी समर्थकाने त्याच्या बद्दल लिहिले होते की यह केजरीवाल सिस्टम से लढते लढते कब कानून से उलझ बैठा पता ही नहीं चला।

ज्याप्रमाणे राष्ट्रपतींकडे कोणतेही विधेयक जात नाही व राष्ट्रपती विधेयकावर निर्णय घेत नाहीत (विधेयक मंजूर करायचे की नामंजूर हा निर्णय मोदीच घेतात), त्याचप्रमाणे एखाद्याला जामीन द्यायचा का नाही हा निर्णय न्यायाधीश न घेता मोदीच घेतात. विश्वास बसत नसेल तर हे वाचा. http://indianexpress.com/article/india/india-news-india/delhi-court-rej…

२१ व्या शतकातील अवतारी महापुरूष श्री श्री संत केजरीवाल महाराज यांचे नवीन विनोदी प्रहसन - http://indiatoday.intoday.in/story/kejriwal-strikes-again-claims-money-… Delhi Chief Minister Arvind Kejriwal today claimed that AAP's advertising budget is less than the money that has been spent on Prime Minister Narendra Modi's clothes over the last two year. "It is being said we have given advertising of Rs 526 crore. Completely false. We have released advertising worth Rs 76 crore. That's it. Advertising expenditure of all departments of the Delhi government is less than the total expenditure on Modi's clothes," Kejriwal said at a meeting with editors in Panaji, Goa. Kejriwal claimed that Modi spends Rs 10 lakh a day on his clothes. He went on to give the detail break-up of money spent on Modi's dressing. "I can give you the calculation. One dress that Modi wears is worth Rs 2 lakh. He changes clothes five times a day, (which comes to) 10 lakh rupees (per day). He never repeats his clothes, doesn't wash them and reuse them," Kejriwal said, giving a detailed costing of Modi's wardrobe. "Here's the biggest proof. Go to Google, type 'Modi' and in the images column you will never see the same clothes in two separate images. The expense comes to Rs 10 lakh per day. He has been in power for 700 days, that means he has spent Rs 70 crore on clothes alone. Five crore more on his other clothes," said Kejriwal. भारतीय राजकारणात विदूषकांची कमतरता कधीच नव्हती. राजनारायण, लालू, दिग्विजय, पप्पू आणि आता केजरीवाल!

केजरीवालना दिल्ली सरकार चालवताना किती कमि काम आहे हे त्यान्च्या या व अशा शोधावरुन समजते. काही दिवसापूर्वी वाचले होते की त्यानी इलेक्शन कमिशन्कडे अर्ज टाकून पन्जाब सरकारने नेमलेल्या चोविस पार्लमेन्टरी सेक्रेटरीन्च्या नेमणुकीची चौकशी करावी.

In reply to by दिगोचि

केजरीवालांनी मुख्यमंत्री झाल्यापासून मागील १६-१७ महिन्यात खालील महत्त्वाची कामे केली आहेत. १) मोदी रोज कोणते कपडे घालतात यावर लक्ष ठेवून त्याची नोंद ठेवणे. गुगलच्या माध्यमातून ते यावर लक्ष ठेवतात. २) मोदी दिवसातून किती वेळा कपडे बदलतात याची नोंद ठेवणे. ३) मोदींच्या प्रत्येक ड्रेसची किंमत शोधणे. ४) मागील २ वर्षात मोदींनी एकूण किती किंमतीचे कपडे वापरले याची नोंद ठेवणे. ५) मोदी एकदा वापरलेला ड्रेस परत वापरतात का, तो ड्रेस धुतात का याची नोंद ठेवणे. ६) प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे. ७) देशातील कोणत्याही राज्यात खुट्ट झाले तरी लगेच तिथे धाव घेऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी ओरपणे. ८) सकाळी उठल्यावर "मोदी, मोदी, मोदी, ...", दुपारी "मोदी, मोदी, मोदी, ...", संध्याकाळी "मोदी, मोदी, मोदी, ..." आणि झोपताना "मोदी, मोदी, मोदी, ..." अशी जपमाळ ओढणे. ९) दिवसभर ट्विटरवर वेळ घालविणे. केजरीवाल हे बिनखात्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही खात्याची जबाबदारी नसल्याने भरपूर वेळ हातात आहे. त्याचा ते वरीलप्रमाणे सदुपयोग करतात.

केजरीवाल हे अत्यंत नाटकी आणि कमालीचे ढोंगी आहेत आणि त्याबद्दल मी आणि इतर अनेक मिपाकर नेहमीच टिका करत असतो. पण जर त्यांनी एखादी सेन्सिबल गोष्ट केली तर त्याबद्दल त्यांना श्रेय देणेही गरजेचे आहे. आज ती सेन्सिबल गोष्ट केजरीवालांनी केलेली आहे. दिल्लीत राज्य सरकारला नक्की किती अधिकार आहेत आणि केंद्र सरकारला किती अधिकार आहेत हे स्पष्ट करून घ्यायला दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. http://www.ndtv.com/india-news/arvind-kejriwal-government-moves-supreme… राज्यघटनेतील काही बाबींबद्दल पुरेशी स्पष्टता नाही असे कोणाला वाटत असेल तर ती स्पष्टता केवळ सर्वोच्च न्यायालयच देऊ शकेल.हे पाऊल बरेच पूर्वी उचलायला हवे होते.ठिक आहे. बेटर लेट दॅन नेव्हर. फक्त गरज एवढीच की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघायची तयारी असली पाहिजे आणि तो निर्णय विरोधात गेला (याची शक्यता बरीच जास्त) तर मात्र निमूटपणे तो निर्णय मान्य करायची तयारी असली पाहिजे. मग उगीच अमुक काम करू देत नाही, तमुक काम करू देत नाही ही भूणभूण काहीच उपयोगाची नाही.केजरीवालांची आतापर्यंतची वाटचाल बघता असे काही होईल याची शक्यता फारच थोडी.

In reply to by गॅरी ट्रुमन

म्हणजे नंतर झालेले अनेक अप्रिय संघर्ष (शकुंतला गॅमलिन यांची नेमणूक, नायब राज्यपालांशी सतत चालू असलेल्या चकमकी) घडले नसते. ही गोष्ट करणे हे जरी सेन्सिबल असले तरी सेन्सिबल गोष्टींमध्ये त्या योग्य वेळी करणे हेही अंतर्भूत असतेच. आता त्या संसदीय सचिवांचा मुद्दा अंगाशी येतो आहे त्यामुळे ही पश्चातबुद्धी सुचते आहे. शिवाय त्यांनी आत्ता एक अजून भारी विधान केलं - गोवा विधानसभेत आआपला ४० पैकी ३५ जागा मिळतील. आणि का - तर काँग्रेस आणि भाजप हे दोघेही भ्रष्ट पक्ष आहेत आणि आआप हा एकमेव भ्रष्टाचारमुक्त पर्याय आहे. काँग्रेस आणि भाजप भ्रष्ट आहेत हे मान्य आहे. दोन्हींच्या सरकारांमध्ये भ्रष्ट लोक आहेत. पण आआपने दिल्लीतला भ्रष्टाचार कमी केलाय म्हणजे नक्की काय केलंय? त्यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना घालवताना जो तमाशा केला, तो भ्रष्टाचार नव्हता का? शीला दीक्षित यांच्यावर अजूनही खटला भरलेला नाही, निवडणूक आयोगाला खर्चाचं विवरण दिलंय का ते माहित नाही (बहुधा नसावं, कारण त्याची आआपने मोठी बातमी केली असती) - म्हणजे इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळं असं काहीच केलेलं नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

आज ती सेन्सिबल गोष्ट केजरीवालांनी केलेली आहे. दिल्लीत राज्य सरकारला नक्की किती अधिकार आहेत आणि केंद्र सरकारला किती अधिकार आहेत हे स्पष्ट करून घ्यायला दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ही याचिका वेगळ्या संदर्भात आहे.
The HC had on May 24 reserved its verdict on the plea of the AAP government seeking a stay on the proceedings on the petitions arising out of its standoff with the LG over powers to appoint bureaucrats in the national capital and other issues.
The Supreme Court on Friday agreed to hear on Monday the plea of the Aam Aadmi Party government in Delhi seeking a direction that the high court be restrained from delivering its judgement on issues including the scope of powers of the city government to exercise its authority in performing public functions.
दिल्लीमध्ये वेगवेगळ्या नेमणुका करण्याचा अधि़कार नायब राज्यपालांचा आहे का लोकनियुक्त सरकारचा याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आआप सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २४ मे ला या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. हा निर्णय जाहीर करण्यापासून उच्च न्यायालयाला रोखावे अशी मागणी आआपने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्या मागणीवरील सुनावणी उच्च न्यायालयात सोमवारी होणार आहे.
फक्त गरज एवढीच की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघायची तयारी असली पाहिजे आणि तो निर्णय विरोधात गेला (याची शक्यता बरीच जास्त) तर मात्र निमूटपणे तो निर्णय मान्य करायची तयारी असली पाहिजे. मग उगीच अमुक काम करू देत नाही, तमुक काम करू देत नाही ही भूणभूण काहीच उपयोगाची नाही.केजरीवालांची आतापर्यंतची वाटचाल बघता असे काही होईल याची शक्यता फारच थोडी.
+१

In reply to by गॅरी ट्रुमन

ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. याचं स्पष्टीकरण अजून बातमीत आलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाला हा मुद्दा स्पष्टीकरण देण्याजोगा वाटत नसावा - दुस-या शब्दांत सांगायचं तर त्यांना नायब राज्यपाल नजीब जंग यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर घटनात्मक आक्षेप घेण्याची गरज वाटली नसावी - असा याचा अर्थ होऊ शकतो का?

In reply to by बोका-ए-आझम

ही बातमी मी जेवढी केवढी फॉलो केली आहे त्यावरून समजते की दिल्ली सरकारने सुरवातीला दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी धाव घेतली होती. २४ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवला. त्यानंतर हे प्रकरण राज्य आणि केंद्र यामधील आहे त्यामुळे उच्च न्यायालयाला या बाबतीत अधिकारक्षेत्र (जुरिसडिक्शन) नाही असा साक्षात्कार दिल्ली सरकारला झाला आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन दिल्ली उच्च न्यायालयाला या प्रकरणी निकाल देण्यापासून रोखावे अशी मागणी केली. अधिक माहिती http://www.thehindu.com/news/cities/Delhi/delhi-govtcentre-row-supreme-… वर प्रत्यक्ष दिल्ली उच्च न्यायालयही या प्रकरणी केजरीवालांच्या बाजूने निर्णय देईल याची शक्यता फार वाटत नाही. कारण न्यायालय सद्यकालीन कायदे आणि राज्यघटना यांनाच बांधील असते. जर सध्याच्या कायद्यांमध्ये आणि राज्यघटनेत दिल्ली हे पूर्ण राज्य नाही हे म्हटलेले असेल तर त्याविषयी दिल्ली उच्च न्यायालय काय करणार? आपण स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून थेट पृथ्वीतलावर पडलो आहोत असे केजरीवालांना वाटत असेलही आणि त्यामुळे 'हम करेसो कायदा' आणि तसा कायदा न केल्यास उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला वेठीस धरायचा यांचा खाक्या आहेही. पण देशाचा कारभार तसा चालत नसतो.कायदे करणे हा संसदेचा विशेषाधिकार आहे इतरांचा नाही. एक गोष्ट मात्र पक्की आहे. समजा निकाल आपल्या बाजूचा आला तर केजरीवाल 'जितं मया' म्हणून जल्लोष करणार आणि विरोधात आला तर मात्र ते थयथयाट करणार. १४ जुलै रोजी निवडणुक आयोगाने आआपच्या २१ आमदारांना लाभाचे पद प्रकरणी सुनावणीसाठी बोलावले आहे. त्यानंतर निवडणुक आयोग निकाल जाहिर करेल. तो समजा केजरीवालांच्या विरोधात गेला तर मात्र मोठ्या आपटर्डचा (केजरीवाल, आशिष खेतान, आशुतोष इत्यादींचा) आणि छोट्या आपटर्डचा (फेसबुक आणि इतर ठिकाणच्या केजरूच्या गुलामांचा) थयथयाट किती होईल हे बघाच.

२०१३ मध्ये निवडणुक प्रचारादरम्यान केजरीवालांनी असे वातावरण निर्माण केले होते की त्यांच्याकडे शीला दिक्षितांविरूध्द सज्जड पुरावे (३७० पानी आरोपपत्र) आहेत आणि त्या लवकरच तुरूंगात जातील. अर्थातच तसे काही झाले नाही आणि केजरीवालांनी डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे 'तुम्ही शीला दिक्षित यांच्याविरूद्धचे पुरावे सादर करा मग आम्ही कारवाई करू' हे बोलायचे ढोंगही झाले. मग एसीबी (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) दिल्ली सरकारच्या अंतर्गत नाही, सीबीआय नाही, दिल्ली सरकारला अमुक अधिकार नाहीत, तमुक मला काम करू देत नाहीत वगैरे बकवासही झाली. यावरून एक गोष्ट आठवली. १९८० च्या दशकाच्या सुरवातीला भाजपचे नेते रामदास नायक यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांच्याविरूध्द भ्रष्टाचाराचे आरोप करून कोर्टात धाव घेतली.अंतुले त्यातून पुराव्याअभावी सुटले पण १०-१२ वर्षे त्यांच्याविरूध्द हा कोर्टाच्या केसचा ससेमिरा लागला होता.त्यांचे मुख्यमंत्रीपदही गेले त्यामागे हे पण एक कारण होतेच. रामदास नायक या एका माणसाला या सगळ्या प्रकाराचा पाठपुरावा करणे नक्कीच सोपे गेले नव्हते. पण तरीही एसीबी, सीबीआय इत्यादी काहीही दिमतीला नसताना (किंबहुना विरोधातच असतानाही) रामदास नायक यांनी अंतुलेंना चांगलेच सतावले होते. जर का ३७० पानी आरोपपत्र भरण्याइतके पुरावे केजरीवालांकडे होते तर मग ते स्वतंत्रपणे कोर्टात जाऊ शकतच होते की. कोणी अडवले होते त्यांना? पण अर्थातच नुसता धुराळा उडविण्यातच या गृहस्थाला इंटरेस्ट असल्यामुळे याच्या हातून फारसे काही होईल याची शक्यता फारच थोडी.

In reply to by गॅरी ट्रुमन

डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण ७० जागांपैकी भाजप ३२, आआप २८, काँग्रेस ८, संजद १ व अपक्ष १ अशी स्थिती होती. कोणालाच बहुमत नव्हते. त्यावेळी शीला दिक्षितांना वाचविण्याच्या बदल्यात काँग्रेसने आआपला पाठिंबा दिल्याने केजरीवालांनी सरकार बनविले. नंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला धडा शिकविण्यासाठी काँगेसने आपली दिल्लीतील मते आआपकडे वळविली. शीला दिक्षितांवर कारवाई न करणे ही काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याची किंमत होती.

इथे हे अवांतर होईल,यासाठी वेगळा धागा हवा,पण माझे धागे लगेच उडतात त्यामुळे श्रीगुरूजींनी महाराष्ट्रात भाजपाने दीड वर्षात काय केले हे तपशीलवार लिहावे. 1) सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटळा झाला म्हणणारे, अजित पवार आणि तटकरेंना अटक का करत नाहीत? 2) शरद पवारांना शिव्या देणारे इथले सन्मानणीय सदस्य मोदी-पवार किंवा शहा-पवार यांच्या अंतर्गत राजकारणाबद्दल काय मत आहे? 3) शरद पवारांच्या कामाचा अभ्यास आहे का? http://www.misalpav.com/node/19871 हा मागचाच धागा आहे,इथे पवारांबद्दल कशी गरळ ओकली आहे ते बघा, आणि हा एक↓ http://www.misalpav.com/node/6674 आता या धाग्यावर केजरीवालांबद्दल गरळ ओकत आहेत,काय गरज नाही आणि फायदाही नाही,, कारण इथे 99.99% भाजपेयी लोक्सच आहेत,त्यामुळे आपण स्वतःचेच मनोरंजन करून घेत आहात.

In reply to by भोळा भाबडा

कारण इथे 99.99% भाजपेयी लोक्सच आहेत,त्यामुळे आपण स्वतःचेच मनोरंजन करून घेत आहात.
'विकृत मनोरंजन' असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.

In reply to by संदीप डांगे

कुणा एकाची मक्तेदारी नाहीये डांगेसाहेब. पूर्वग्रह हीसुद्धा विकृतीच. बाकी तुमचा मानसशास्त्राचा व्यासंग चांगला दिसतोय.

In reply to by बोका-ए-आझम

पूर्वग्रह हीसुद्धा विकृतीच, स्पष्ट कराल काय? बाकी तुमचा मानसशास्त्राचा व्यासंग चांगला दिसतोय कसला व्यासंग. साधं 'पिंडी ते ब्रह्मांडी' सूत्र आहे. मै काला जग काला, मै भला जग भला.

सिंचन घोटाळ्याबद्दल अजित पवारांवर कारवाई न करणे ही पण कशाची तरी किंमतच म्हणायची... :) पटेश. कारवाई आता होण्याचि चिन्हेहि नाहित. सगळा करसडा काढला भुजबळांवर.

भोळा भाबडा तुम्हिच गरीब चिमणा असावेत मागच्या अवतारात :) मागच्या अवतारात होबासक्या केलेला सच्या