Skip to main content

कोणता इन्शुरन्स घ्यावा?

Published on शनीवार, 04/06/2016
निवांत दुपारच्या वेळेला आमच्या ऑफिसच्या क्षेत्रात एक एल आय सी प्रतिनिधी येऊन बसला होता. एल आय सी घ्यावी म्हणतात, आणि माझ्याकडे ती नसल्याने मी त्याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला तो टर्म इन्शुरन्स बद्दल काहीच सांगत न्हवता. पण मी सारखं हट्ट केल्याने त्याने माहिती दिली परंतु तो तितका उत्साही दिसत न्हवता. असो, टर्म इन्शुरन्स बद्दल थोडेसे माहिती असल्याने मी ती घेण्याची ठरवली, पण त्याच सोबत गुंतवणूक म्हणून सुद्धा काही रक्कम गुंतवण्याची तयारी आहे. जास्त काही यामध्ये माहित नसल्याने कृपया जाणकार लोकांनी मार्गदर्शन करावे अशी अशा. जेणेकरून माझ्यासारख्याच इतर लोकांनाही ज्ञान मिळेल. दुसरा काही पर्याय असेल गुंतवणुकीचा तर तोही सांगावा अशी विनंती. त्याने दिलेली माहिती थोडक्यात अशी माझ साध्याच वय -३१ वर्ष टर्म इन्शुरन्स- अमूल्य जीवन पोलीसी अवधी -२९ वर्ष वार्षिक प्रीमियम - १३८५८ खपल्यावर मिळणारे पैसे- ५०००००० ( पन्नास लाख ) दुसरी पोलीसी जीवन आनंद ८१५ पोलीसी अवधी -२९ वर्ष वार्षिक प्रीमियम -३८५४४ एकूण भरणा-१०९८२८८ २९ वर्षानंतर मिळणारा परतावा- ३३६०००० ( तेहतीस लाख साठ हजार ) लायीफ टायीम रिस्क कवर -१०००००० ( जो पोलीसी संपल्यावर देखील चालू राहतो ) नैसर्गिकरीत्या खप्ल्यास १० लाख आणि अपघाती खप्ल्यास २० लाख ३ वर्षानंतर कर्ज मिळण्याची सुविधा ३ वर्षानंतर ६० टक्के रक्कम परत काढून घ्येण्याची सुविधा

वाचन संख्या 19202
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

मी काही वर्षापूर्वी एक मेटलाईफ पॉलिसी घेतली होती.चांगली फायदेशीर वाटली. प्रीमियम पहिली तीन वर्षे वार्षिक एक लाख. तीन वर्षांनतर नो प्रीमियम. पॉलिसी अवधी पंधरा वर्षे. या अवधीत खपल्यास २० लाख. चार वर्षानंतर ५० टक्के रक्कम काढता येते. रिस्क कव्हर न बदलता. पंधरा वर्षात न खपल्यास मार्केट एनेव्ही रेटप्रमाणे ठेवलेल्या रकमेचा परतावा. सध्या ही ऑफर आहे की नाही माहिती नाही.

अशा वेळेला 'नेट प्रेझेंट व्हॅल्यू' (NPV) पाहिली पाहिजे. त्यात कितव्या वर्षी खपणार (किंवा खपणार नाही) याचे सिनारियो बनवता येतील. व्याजाचा दर हा डिस्काउंटिंग रेट म्हणून वापरता येईल. आत्ता एक्सेल जवळ नाही, पण अंदाजे मला असं वाटतंय की पहिल्या पॉलिसीची NPV जास्त येईल.

जास्त तपशिलात न जाता सोप्या शब्दात सांगतो , इन्शुरन्स आणि गुंतवणूक ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि त्या तश्याच ठेवाव्यात. पन्नास लाखाचा टर्म इन्शुरन्स तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला काही वर्षे आधार द्यायला पुरेसा आहे. तेव्हढ्या वर्षात घरात दुसरं कोणीतरी कमवायला लागेलच. चिंता नसावी. वाटल्यास थोडा जास्त प्रिमिअम भरून इन्शुरन्स रक्कम वाढवून घ्यावी. राहिला प्रश्न इन्शुरन्स आणि सोबतच गुंतवणूक (जीवन आनंद) ह्या पर्यायाचा. जर वार्षिक ३८५४४ रु. (मासिक अंदाजे ३१०० रु.) तुमची तयारी असेल तर जीवन आनंद वगैरे च्या फंदात न पडता नियमित SIP चालू करावी. एल आय सी च्या कुठल्याही योजनेत ६-८ टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळत नाही. याउलट सिप चे परतावे उत्तम असतात. जाणकार यावर प्रकाश टाकतील. माझ्यापुरता निष्कर्ष : इन्शुरन्स आणि गुंतवणूक ह्यांची सरमिसळ करू नये !!

In reply to by चिनार

पूर्ण सहमत, विमा आणि गुंतवणूक वेगळ्या गोष्टी असतात. त्या वेगळ्याच ठेवाव्यात. दोन्ही डगरींवर पाय ठेवल्यास ना पुरेसा विमा ना पुरेसा परतावा होतं.

In reply to by चिनार

अहो साहेब तुम्ही सल्लागाराची भूमिका जरा चांगली केली पाहिजे। तुम्ही sip विषयी सांगत आहात। प्रथम तुम्ही स्वतः कोणत्या फंडात पैसे गुंतवावे हे नाही सांगत। शिवाय याची पुढे हमी काय। पैसे भरताना काही वाटत नाही पण पुढे काय हा प्रश्न आहेच। आज सरकारी बँकांत सुद्धा 1 लाख रकमेच्या पुढे शास्वती नाही पैसे मिळण्याची ।तसेच sip मध्ये गुंतवणूक करा हे सांगणे सोपे असले तरी यातून पुढे फायदा काय होणार याची निश्चिती नाहीं। एल आय सी मध्ये जरी 6 ते 7 टक्के मिळाले तरी ते पुरेसे आहेत कारण ते करमुक्त आहेत आणि एल आय सी मधील गुंतवणूक ही भारत सरकारच्या विविध योजना चालवण्या साठी वापरली जाते। अनि ती आजीवन संरक्षण देते

हो माझ्याकडे मेदिक्लीम देखील आहे. आपण सगळ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. एकूण असे ठरवले कि एक टर्म इन्शुरन्स काढावा आणि गुंतवणुकीसाठी एस आय पी काढावी. हे जास्त फायदेशीर ठरेल.

केलेय ते सांगतो (ह्या चिनार्याला तेंव्हा भेटलो असतो तर आणखी पर्याय सापडले असते) घरातील एकुलता एक कमावता घटक असल्याने. एस्बीय ई पॉलीसी घेतली (दर पाच वर्षांनी विमा संरक्षण रकमेत १०% वाढ होणार अपघाती संरक्षण मूळ रकमेठ्वलीठेवले आहे, मूळ पॉलीसी ५० लक्ष रुपये हप्ता ३२५०० वार्षीक. बर्षाकाठी ५० हजार विम्यासाठी ठरवले होते उरलेले १८००० सध्या एस्बीआयच्या दोन एसाअयपीमध्ये (एक इमर्जींग बिझीनेस रू १००० प्रती माह, आणि दुसरा एस्बीअय फार्मा फंड रू ५०० प्रति माह) याव्यतीरीक्त याच वर्षी एन्पीस मध्ये खाते उघडले आहे, त्यात प्रतिवर्षी किती गुंतवणून्क करावी अणि त्याचा नक्की काय फायदा आहे.याबाब्त मिपा गुंतवणूक तध्न आणि सनदी लेखापालांनी टंकावे. गुंतवणुकीला विम्यातून सोडवलेला नाखु

In reply to by नाखु

नाखू काका, एकदा जरूर भेटू. पण मला गुंतवणूक या विषयातलं ओ का ठो कळत नाही. गुंतवणूक करावी एवढं मात्र कळते. मी वरच्या प्रतिसादात पाजाळलेला शहाणपणा स्वत: केलेल्या चुकीतून उमगलेला आहे. -- चुका करून करून शिकणारा चिनार

काही आडाखे: १. आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान २० ते २५ पटीइतके टर्म प्लॅनचे कव्हरेज असावे. म्हणजे आपण खपल्यास कुटुंबियांना सध्याचीच लाईफस्टाईल चालू ठेवता येईल. जशी वर्षे जातील त्याप्रमाणे नवा टर्म प्लॅन घ्यावा लागू शकेल. समजा आता १ कोटीचा ३० वर्षांचा टर्म प्लॅन आपल्याकडे असेल तर ३० वर्षांनंतर १ कोटीला आता इतकी किंमत असणार नाही हे लक्षात घेऊन आपला पगार वाढेल त्याप्रमाणे कव्हरेज वाढविलेले बरे. वयाच्या ३५ व्या वर्षापर्यंत टर्म प्लॅनची पात्रता आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २५ पट आणि त्यानंतर (मला वाटते) ४५ वर्षांपर्यंत २० पट असते. तितक्या रकमेचा टर्म प्लॅन कंपनी आपल्याला देऊ शकते. २. थोडेसे काही झाले तरी सध्या हॉस्पिटलची बिले सहज लाखांमध्ये जातात. त्यामुळे मेडिकल विमा असणे खूपच गरजेचे आहे. जर आई-वडिल, आजी-आजोबा इत्यादींना हृदयविकार, मधुमेह, किडनी इत्यादीचे आजार असतील तर आपल्यालाही कधीनाकधी त्या प्रकाराला सामोरे जावे लागणार हे गृहित धरून त्या रकमेचा विमा काढावा. ३. सर्वात महत्वाचे म्हणजे विविध इन्व्हेस्टमेन्ट प्रॉडक्ट विकायला आलेल्या 'रिलेशनशीप मॅनेजर' मंडळींना फाट्यावर मारावे. आपले टारगेट पूर्ण करायला वाटेल तितके गोड बोलायची अमर्याद क्षमता त्यांच्यात असते. दिर्घकालीन वेल्थ जनरेशनसाठी शेअर हा सर्वोत्तम मार्ग. पण शेअरमधली गुंतागुंत अवघड वाटत असेल आणि त्यात असलेली जोखीम पत्करायची तयारी नसेल तर सरळ म्युच्युअल फंडात एस.आय.पी करावे. ४. होमलोन वगैरे असल्यास किमान ७-८ हप्ते भरता येतील इतके पैसे आपल्या जवळ तरल फॉर्ममध्ये लवकरात लवकर जमा करायचा प्रयत्न करावा. सुरवातीला आपल्या पगाराचा साधारण ४०-४५% भाग हप्त्यात जातो त्यावेळी हे करणे कठिण जाईल. पण ३-४ वर्षात पगार वाढतात त्याप्रमाणे लवकरात लवकर हे 'कुशन' आपल्याजवळ हवे यासाठी पावले उचलावीत. ५. क्रेडिट कार्ड हा अत्यंत सोयीस्कर आणि नियंत्रण राहिले नाही तर तितकाच घातक प्रकार असतो.शक्यतो त्या त्या महिन्याची बिले त्या महिन्यातच चुकती करावीत. क्रेडिट कार्डावर ई.एम.आय बराच महाग पडू शकतो.शक्यतो क्रेडिट कार्ड हे केवळ कॅश सर्वत्र वागवायला लागू नये म्हणून सोयीचे साधन म्हणूनच वापरावे.पण त्याच्या 'क्रेडिट' सुविधेचा वापर करू नये. ते खूप महागात पडू शकते.

In reply to by गॅरी ट्रुमन

क्लिंटन साहेब, क्र. १ सोडून बाकी सगळे मुद्दे पटले. आपण खपल्यास आपले कुटुंबिय त्याच लाईफ स्ताईल ने जगावेत यासाठी विमा काढायचचा की त्यांना नवी सुरुवात करायला आधार मिळावा म्हणून ? म्हणजे जर आपण पूर्ण जगलो तर सगळे मुसळ केरात. माणूस गेला की नुकसान होतेच. ते कमीत कमी व्हावे हा विम्याचा उद्देश असतो किंवा असावा असे वाटते. शिवाय जशी वर्षे जातील तसा टर्म प्लॅन रिवाईज करण्याचा मुद्दाही कळला नाही. उदा माझी मुलगी १० महिन्यांची आहे. मी ५० लाखांचा टर्म प्लॅन काढला २० वर्षे मुदतीसाठी. जर मी १० वर्षांनी गेलो आणि मी प्लान रिवाईज केला नसेल तर नुकसान होणार नाही कारण संगोपनाची १० वर्षे आधीच कव्हर झाली आहेत. जर मी २० वर्षांनी गेलो तर ० रुपये मिळतील पण तोवर रिस्क कव्हर ची गरज संपलेली असेल. उत्पन्नाच्या २० पट म्हणजे जरा अतीच वाटते. शिवाय इतकी रक्कम विम्यात गुंतवली तर अन्य कुठे गुंतवणूक करणे अवघड किंव अशक्य होऊन बसेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

शिवाय काही कारणाने क्लेम रिजेक्ट झाला तर काय हा मुद्दा आहेच. तरी एलआयसी सोडून अन्य विमा घेउच नये असे वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

आपण खपल्यास आपले कुटुंबिय त्याच लाईफ स्ताईल ने जगावेत यासाठी विमा काढायचचा की त्यांना नवी सुरुवात करायला आधार मिळावा म्हणून ?
कारण काहीही असो पण खरा उद्देश म्हणजे आपण जर मुख्य कमावते असू तर आपली अनुपस्थिती निदान लाईफस्टाईलमध्ये तरी आपल्या जवळच्यांना जाणवायला नको. म्हणजे घरात मुख्य कमावता नाही म्हणून अमुक एक गोष्ट करता आली नाही असे व्हायला नको.
उदा माझी मुलगी १० महिन्यांची आहे. मी ५० लाखांचा टर्म प्लॅन काढला २० वर्षे मुदतीसाठी. जर मी १० वर्षांनी गेलो आणि मी प्लान रिवाईज केला नसेल तर नुकसान होणार नाही कारण संगोपनाची १० वर्षे आधीच कव्हर झाली आहेत. जर मी २० वर्षांनी गेलो तर ० रुपये मिळतील पण तोवर रिस्क कव्हर ची गरज संपलेली असेल.
५० लाखांचा प्लॅन आज घेतला यामागे काय गृहितक आहे? माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्ही ज्या कुठच्या उद्देशाने विमा काढला आहे त्या उद्देशाला ५० लाख रूपये पुरेसे आहेत असे तुम्हाला वाटत आहे. पण जसा काळ पुढे जातो त्याप्रमाणे महागाई वाढते. त्यामुळे आज ५० लाख ही रक्कम त्या कामासाठी पुरेशी वाटत असेल तर ती १० वर्षांनी पुरेशी पडणार नाही आणि २० वर्षांनी तर अजिबात नाही.म्हणून टर्म कव्हर वाढवावे असे म्हटले. आणि २० वर्षांनी तुमची मुलगी जवळपास २१ वर्षांची असेल.म्हणजे ग्रॅज्युएशन जवळपास पूर्ण होऊन नोकरी/पीजी करायच्या वयाची.जर का तिची पीजी करायची इच्छा असेल (विशेषतः परदेशात) तर आणखी २० वर्षांनी ५० लाख रूपये पुरे पडतील असे तुम्हाला वाटत असेल तर तसे वाटणे थोडेसे धाडसाचेच आहे असे म्हणेन. आजही मॅनेजमेन्टच्या सिम्बायोसिससारख्या संस्थेतही १५-१६ लाख फी आहे.दरवर्षी अगदी ५% ने हा आकडा वाढला तरी आणखी २० वर्षांनी हा आकडा ४० लाखाच्या घरात जाईल. आणि अशा संस्थांच्या फी दर वर्षी ५% पेक्षा जास्तने नक्कीच वाढतात. त्यामुळे रिस्क कव्हरची गरज २० वर्षांनी संपेल कशी हे समजले नाही.
उत्पन्नाच्या २० पट म्हणजे जरा अतीच वाटते. शिवाय इतकी रक्कम विम्यात गुंतवली तर अन्य कुठे गुंतवणूक करणे अवघड किंव अशक्य होऊन बसेल.
उत्पन्नाच्या २० पट इतके विम्याचे कव्हर हवे. त्यावर प्रिमिअम अर्थातच उत्पन्नाच्या २० पट नसणार.

In reply to by गॅरी ट्रुमन

आज रोजी मी गेलो तर रुपये ५० लाखच काय पण रुपये ३ कोटीदेखील पुरेसे नाहीत. प्रश्न हा आहे की मला जास्तीत जास्त किती रक्कम परवडू शकेल आणि माणूस गेल्यावर ताबडतोब जो आधार हवा असतो त्यासाठी किती रक्कम लागेल हा तो प्रश्न. बाकी २० वर्षांनी जर मी गेलो तर जवळ पास सगळे शिक्षण संपलेले असेल. परदेशी शिक्षण किंवा उच्च संस्थेतील शिक्षण कदाचित कर्ज काढून घ्यावे लागेल. शिवाय वाढीव रिस्क कव्हर साठी मी जितके पैसे कमी भरले ते पैसे समभाग, मुचुअल फ़ेंड किंवा सुकन्या समृद्धी सारख्या योजनांमधून कितीतरी पट होऊ शकतील. जर मी तेवढ्या जास्त पैशांचा विमा काढला आणि जिवंत राहिलो तर मुलीच्या शिक्षणासाठी मला पुरेशी तजवीज करता येणार नाही कारण टर्म प्लेनचे परतावे शून्य आणि अन्य प्लेनाचे परतावे (६-७% सरळव्याज) या हिशोबाने नगण्य असतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

+१ २० पट इंशुरन्स कव्हर जरा जास्त वाटतेय. एवढ्याची आवश्यकता वाटत नाही. आपल्या एकून लायाबिलीटीज, कुठल्याही काळात कर्ती व्यक्ती गेल्यानंतर पुढील काही वर्षात लागू शकणारी रक्कम वगैरे यावर कव्हर ठरवावे असे वाटते.

पाटिल साहेब.
२९ वर्षानंतर मिळणारा परतावा- ३३६०००० ( तेहतीस लाख साठ हजार )
हा परतावा गॅरेंटेड आहे का ते बघा. कारण परताव्याचा दर ९.५ ते १०% इतका जास्त येतो आहे. त्यांनी कॅलक्युलेशन साठी १०% परताव्याचा दर वापरला असण्याची शक्यता आहे. खुद्द एलाअयसी असे लिहुन द्यायला तयार आहे का ते बघा. मला वाटत नाही एलायसी असे काही कमिट करेल.

In reply to by गंम्बा

गम्बा साहेब यामुळेच आता एल आय सी मध्ये फक्त टर्म इन्शुरन्स काढायचं ठरवलंय. गुंतवणुकीसाठी एस आय पी विचार करतोय.

In reply to by सतिश पाटील

एल आय सी मध्ये फक्त टर्म इन्शुरन्स काढायचं ठरवलंय...?? मला वाटते आपन पुनर्विचार करावा

In reply to by प्रसाद भागवत

बाडीस एल आय सी ची चापलुसी अशी आहे कि ते क्लेम सेटलमेंट रेशो सर्वात जास्त दाखवतात आणि त्यासाठी ते प्रत्येक क्लेम चे १०० % पैसे देत नाहीत काहीतरी खुसपट काढून ८०-९० % पैसे देतात. घेणारी व्यक्ती दुःखात असते तेंव्हा वेळेत पैसे मिळाल्याच्या आनंदात या गोष्टी कडे कोणी लक्ष देत नाही. आपण किती क्लेमला १०० % पैसे दिले या आयुर्विमा महामंडळाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी अजून तरी दिलेले नाही. वर त्यांचे हप्ते सर्वात जास्त आहेत. आणि सेवा निः कृष्ट आहे. एकदा टर्म (मुदतीचा) विमा काढा परत त्यांचा एजंट आपल्याकडे फिरकत नाही. आणि त्याबद्दल तक्रार करा काहीही होत नाही किंवा आपला एजंट बदलण्याची सोय त्यांच्या कडे नाही. शहाण्या माणसाने एल आय सी कडे विमा उतरवू नये. एम टी एन एल / बी एस एन एल सारखी यांची मक्तेदारी होती तोवर तुम्हाला काहीही पर्याय नव्हता आज पर्याय उपलब्ध असताना एल आय सी कडे आयुर्विमा काढणे शहाणपणाचे नाही असे माझे अनुभवांती बनलेले मत आहे. आणि याचे खंडन अजूनतरी एकही विमा एजंट करू शकलेला नाही.

In reply to by सुबोध खरे

क्लेम सेटलमेंट रेशोचा संबंध कोणत्याही कंपनीच्या प्रामाणिकपणाशी नसून त्यांच्याकडे किती रक्कम जमा होते यावर अवलंबून आहे. आज परिस्थिती ही आहे की १० जण एलाय्सी चा विमा घेतात तेंव्हा २ जण अन्य सगळ्या कंपन्यांपैकी कोणाचातरी विमा घेतात. प्रत्येक विमा कंपनीच्या व्यवस्थापनाचे किती टक्के क्लेम रिजेक्ट करावयाचे याचे अलिखित निर्देश असतात. ज्यांचे कलेक्शन कमी त्यांचे रिजेक्शन अधिक असा हिशोब आहे. एलायसी चापलुस कंपनी आहे हे खरे पण १५ लाख कोटी रुपये कॉर्पस असलेली दुसरी कोणतीही विमा कंपनी भारतात अस्तित्वात नाही. म्हणूनच नॅचरल कलामिटीजच्या वेळी देखील जास्तीत जास्त क्लेम सेटल करणारी दुसरी कोणतीही विमा कंपनी भारतात नाही. शिवाय ९० % खात्रीने मिळणार हे बरे की फालतू कारणाने क्लेम रिजेक्ट होऊन ० % मिळणे बरे हा मुद्दाही आहेच. माझ्या माहितीनुसार आत्महत्येच्या केसमध्ये देखील काही प्रमाणात क्लेम सेटल करणारी एलआयसी ही एकमेव विमा कंपनी आहे. त्यामुळे अत्यंत आवश्यक इतक्याच रकमेचा विमा काढावा तोदेखील एलआयसीचा अन्यथा काढूच नये असे मत बनले आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

म्हणूनच नॅचरल कलामिटीजच्या वेळी देखील जास्तीत जास्त क्लेम सेटल करणारी दुसरी कोणतीही विमा कंपनी भारतात नाही.... असहमत. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याबाबत अन्य कंपन्यांबद्दल अशीच चुकीची माहिती FB व अन्य साईटसवरुन LIC चे काही अतिउत्साही एजंटस देत असत..मी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करुन पार वरपर्यंत पत्रव्यवहार केला..परिणाम म्हणुन HDFC Life कडुन LIC ला कायदेशीत नोटीस बजावण्यात आली होती... माझ्या माहितीनुसार आत्महत्येच्या केसमध्ये देखील काही प्रमाणात क्लेम सेटल करणारी एलआयसी ही एकमेव विमा कंपनी आहे... पुन्हा एकदा असहमत.. हल्ली सर्व प्रमुख विमा कंपन्या आत्महत्येस कारणीभुत असणारे डिप्रेशन हे आजार मानतात आणि फक्त सुरवातीचा काही काळ वगळता आत्महत्येमधेही भरपाई देतांत.. LIC चे धोरण माहित नाही कदाचित आजही ते 'उपकार' म्हणुन अशा काही पॉलिसीज सेटल करीत असावेत. हैदराबाद येथील अतिरेकी हल्ल्यांत आलेले क्लेम एका सुप्रसिद्ध कंपनीने 'अतिरेकी कारवायांत मृत्यु आल्यास' क्लेम मिळणार नाही अशा आधीच लिहिलेल्या कलमाचा वापर करुन नाकारले..नंतर मग बहुसंख्य प्रमुख कंपन्यांनी 'अतिरेकी कारवायांत सहभागी असताना मृत्यु आल्यास' असा बदल केला.. LIC चे ठावुक नाही. विमा काढावा तोदेखील एलआयसीचा अन्यथा काढूच नये असे मत बनले आहे.- असहमत पुन्हा एकदा - माझ्याकडे LIC विकण्याकरिता आवश्यक लायसन्स आहे. गैरसमज नसावा..

In reply to by अप्पा जोगळेकर

१५ लाख कोटी रुपये कॉर्पस असलेली दुसरी कोणतीही विमा कंपनी भारतात अस्तित्वात नाही. स्वातंत्र्यानंतर जवळ जवळ ६० वर्षे एकाधीकारशाहीने काम करून जनतेकडूनच पैसे मिळवून गब्बर झालेल्या कंपनीचे एवढे भाग भांडवल असणे यात विशेष ते काय?

In reply to by सुबोध खरे

स्वातंत्र्यानंतर जवळ जवळ ६० वर्षे एकाधीकारशाहीने काम करून जनतेकडूनच पैसे मिळवून गब्बर झालेल्या कंपनीचे एवढे भाग भांडवल असणे यात विशेष ते काय?
अशी एकाधिकारशाही निर्माण करणे म्हणजे मला तरी शुध्द पांढरपेशा दहशतवादाचा प्रकार वाटतो. एल.आय.सी ची स्थापना १९५६ मध्ये विमा उद्योगाच्या राष्ट्रीयीकरणाने झाली. त्यापूर्वी खाजगी कंपन्या होत्या. त्यातील एका खाजगी कंपनीत-- रामकृष्ण दालमियांच्या भारत इन्शुरन्स कंपनीत आर्थिक गैरव्यवहार झाला आणि तो गैरव्यवहार पंडित नेहरूंचे जावई फिरोझ गांधी यांनी लोकसभेत उघड केला. त्यानंतर सरकारने विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले. गैरव्यवहार झाला मग त्या गैरव्यवहारात गुंतलेल्यांवर जरूर कारवाई करावी.पण म्हणून त्या उद्योगात असलेल्या कंपन्या आजपासून सरकारच्या मालकीच्या असे करणे कसे काय समर्थनीय आहे? सरकारने हाच प्रकार १९६९ मध्ये बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या वेळी बँकांच्या बाबतीत सामाजिक न्याय या गोंडस नावाखाली केला. धोंडूमामा साठे आणि इतरांनी कष्टाने मोठी केलेली महाराष्ट्र बँक एका फटक्यात 'समाजाच्या' मालकीची झाली!! हे कसे काय समर्थनीय आहे? हा धाकदपटशा किंवा दहशतवादच झाला. आज हा प्रकार होणे असंभवनीय वाटते. त्याकाळच्या समाजवादी वातावरणात ते चालून गेले.

In reply to by असंका

+१ आणि ते पुर्ण गाइड करतात कोणत्याही कमिशन शिवाय (आपल्याकडून). कंपनीकडून मिळत असेल पण त्याची तोशीस आपल्याला लागत नाही. साधारण ३४ वर्षे वय, ३० वर्षे टर्म, १ करोड साठी रू. १०००० प्रिमियम येतो.

शिवाय काही कारणाने क्लेम रिजेक्ट झाला तर काय हा मुद्दा आहेच. तरी एलआयसी सोडून अन्य विमा घेउच नये असे वाटते.
ह्या वरच्या मुद्द्यावर मला समजलेली माहिती. साधारणत: क्लेम रिजेक्ट होतो चुकीची माहिती दिल्याने. IRDA नी असा नियम काढला आहे की जर पॉलीसी ला ३ वर्षे झाली असतील तर चुकीची माहिती दिली असेल तरीसुद्धा कोणतीही कंपनी क्लेम रिजेक्ट करू शकत नाही. कंपनीकडे ३ वर्षे होती माहिती वेरिफाय करायला आणि चुकीची असेल तर पॉलीसी रद्द करायला.

In reply to by शलभ

टर्म प्लान घेताना ड्रिंक्स घेत नसू पण काही काळाने ड्रिंक्स घेणे सुरु झाले तर त्याबाबतीत काय?

In reply to by टवाळ कार्टा

आपण वर्तमान कालीन माहिती खरी व संपुर्ण स्वरुपात देणे अपेक्षित आहे. भविष्यकाळांत कोणास काय होईल आणि कोण कसा वागेल यावर कोणाचेच नियंत्रण नाही..सबब ते आपल्या विरुद्ध जात नाही

(१)...तरी एलआयसी सोडून अन्य विमा घेउच नये असे वाटते.- या गैरमजाबद्दल मी मागे लिहिलेही होते. बहुतेकदा अपुरी, चुकीची वा खोटी माहिती हे दावा नाकारण्याचे प्रमुखतम कारण असते. विमा कंपनी कोणती हे नव्हे . याचे कारण असे की की विम्याची रक्कम मोठी असेल तर तिचा पुर्नविमा केला जातो आणि बहुतेकदा LIC व अन्य खासगी विमा कंपन्यांचे Re-insurars तेच, एकच असतात. त्यामुळे क्लेम रिजेक्शन विषयक धोरणांत बदल कशाला होईल?? हल्लीच्या नव्या बदलांनुसार क्लेम सेटलमेंट रेशो हा काहीसा कालबाह्य होईल पण या निकषाचा खोलवर अभ्यास केला तर LIC बद्दलची आपली समजुत तितकीशी खरी ठरत नाही. व्यक्तीशः नोकरीचा पर्याय निवडायचा असो, वैद्यकीय उपचारांचा किंवा अशाच अन्य महत्वाच्या गोष्टींचा ..तेंव्हा आपण आवर्जुन खासगी क्षेत्रास प्राधान्य देतो..मात्र पैसे गुंतवायची वेळ आली वा विमा घ्यायची की नेमके 'इकडे' का वळतो याचे तर्कसंगती लागत नाही. (२)..ते पुर्ण गाइड करतात कोणत्याही कमिशन शिवाय (आपल्याकडून). कंपनीकडून मिळत असेल पण त्याची तोशीस आपल्याला लागत नाही. मग बाकीचे विमा सल्लागार तरी कोठे आपल्याकडुन थेट पैसे घेतात?? ऑनलाईन पॉलिसी घेतल्यावरही पैसे आपल्याच खिशांतुन जात असतात, तोशीस आपल्यालाच लागते, हे पक्के लक्षात असो द्यावे. या क्षेत्रांत कोणत्या तरी दुर्घटनेपश्चात दावा दाखल करणे व मिळवुन देणे हा सर्वाधिक जिकिरीचा व महत्वाचा भाग असतो..आपला विमा सल्लागार यावेळी उपयोगी पडतो (म्हणजे पडावा) ऑनलाईन विमा देणारे याबाबत उपयोगी पडतील याची खात्री आहे का? (३) विमा हा ऑनलाईन टर्म -इन्शुरन्सच असावा, सर्वांत मोठ्या ४/५ कंपन्यापैकी कोणाचाही चालेल. सोबत क्रिटीकेअर सारखे रायडर घ्यावे..मात्र त्याचा अतिरेक करु नये. घेतानाच व्यवस्थित अंदाज बांधुन घ्यावा, एखादेवेळी ठीक आहे, मात्र यापेक्षा रिव्हिजन्स असावी असे मला वाटत नाही. (४) मी स्वतः कोणतीही युलिप न विकता MDRT झालो आहे..महत्वाचे म्हणजे मी LIC ही विकतो..तेंव्हा मुद्दा क्र. ०१ बद्दल गैरसमज नसावा.

In reply to by प्रसाद भागवत

याचे कारण असे की की विम्याची रक्कम मोठी असेल तर तिचा पुर्नविमा केला जातो आणि बहुतेकदा LIC व अन्य खासगी विमा कंपन्यांचे Re-insurars तेच, एकच असतात. त्यामुळे क्लेम रिजेक्शन विषयक धोरणांत बदल कशाला होईल??
माझा रीइन्शुरन्सबद्दल असा समज होता की (सेडिंग) इन्शुरन्स कंपनी रिस्क क्लासचा रीइन्शुरन्स करते. वैयक्तिक पॉलिसीचा नाही. त्यायोगे रीइन्शुरन्स कंपनीची रिस्कही विभागली जाते.

In reply to by आदूबाळ

बरोबर आहे..री इन्शुरन्स दोन्ही प्रकारे होतो. मोठ्या क्लेम्स बाबत रि इन्शुरर हस्तक्षेप करुन दाव्याच्या सत्यतेची, तथ्थांची खातजमा करतात. मी या उद्देशाने ते म्हटले आहे

In reply to by प्रसाद भागवत

मग बाकीचे विमा सल्लागार तरी कोठे आपल्याकडुन थेट पैसे घेतात?? ऑनलाईन पॉलिसी घेतल्यावरही पैसे आपल्याच खिशांतुन जात असतात, तोशीस आपल्यालाच लागते, हे पक्के लक्षात असो द्यावे. या क्षेत्रांत कोणत्या तरी दुर्घटनेपश्चात दावा दाखल करणे व मिळवुन देणे हा सर्वाधिक जिकिरीचा व महत्वाचा भाग असतो..आपला विमा सल्लागार यावेळी उपयोगी पडतो (म्हणजे पडावा) ऑनलाईन विमा देणारे याबाबत उपयोगी पडतील याची खात्री आहे का?
सेम कवर साठी विमा सल्लागार आणि ऑनलाईन काढलेल्या पॉलिसी प्रिमियम मधे किती फरक असतो? असतो का? जर जास्त फरक नसेल तर ठिक आहे.

श्री. शलभ ,
साधारण ३४ वर्षे वय, ३० वर्षे टर्म, १ करोड साठी रू. १०००० प्रिमियम येतो.
हे गणित कोणत्या कंपनीच्या इन्शुरन्स साठी आहे ? सविस्तर सांगाल का ? माझा मुलगा २३ वर्षाचा आहे त्यासाठी किती प्रिमियम बसेल ? धन्यवाद

In reply to by नितीन पाठक

हे मी माझं उदाहरण दिलेय. तुमच्या मुलासाठी अजून कमी येईल. तुम्ही पॉलिसीबाझार किंवा तत्सम वेबसाईटवर जाऊन चेक करा.

मला दुसरा पर्याय जास्त आकर्षक वाटतोय. वार्षिक जवळपास १०% चा परतावा आहे. शिवाय एक मोठी घसघशीत रक्कम मुदत पूर्ततेनंतर आहे. आणि विमा आहेच. ३० वर्षांनी आपल्या जोखमी बहुतांश संपलेल्या असतील. पण मुदतीच्या आत मृत्यू झाल्यास फक्त विम्याची रक्कम (दहा लाख) मिळेल का? की काही बोनस वगैरे पण मिळेल? हे तपासून बघायला पाहिजे. * मी जाणकार नाही. चुकीचे असल्यास कृपया दुर्लक्ष करावे.

In reply to by समीरसूर

वार्षिक जवळपास १०% चा परतावा आहे. शिवाय एक मोठी घसघशीत रक्कम मुदत पूर्ततेनंतर आहे
अहो हा १०% परतावा गॅरेंटेड नाहीये. एजंट वापरतो कॅल्क्युलेशन करुन दाखवण्यासाठी, एलाअयसी कुठेही असे म्हणत नाही.

विमा संलग्न कोणतेही गुंतवणुकीचे उत्पादन/साधन १० टक्के परतावा देणार असे लिहून देत असेल तर त्या एजंट ला मी ५० लाख ते १ कोटी रुपयाचा धंदा मिळवून द्यायला तयार आहे माझे कोणतेही कमिशन न घेता. सगळे आयुर्विमा एजंट १० % परतावा मिळाला तर किती पैसे मिळतील हे सांगतात पण लिहून द्या सांगून पहा. आज पर्यंत आयुर्विम्याने साडे सात टक्क्यापेक्षा जास्त परतावा दिलेला नाही जेंव्हा मुदत ठेवीचे दर १६ % होते तेंव्हा सुद्धा. आता हे दर कमी झाले तर त्यांचा परतावा ४.५ -५ % एवढाच आहे. साधा सरळ हिशेब करा. एक मुदतीचा विमा (टर्म insurance) घ्या आणि उरलेले पैसे बँकेच्या मुदत ठेवीत ठेवा. आयकर भरूनही ते स्वस्त पडेल. निदान विमा एजंटची धन करण्यापेक्षा तुमचे पैसे तुमच्या हातात तरल स्वरुपात राहतील.

In reply to by सुबोध खरे

मुदत ठेव किंवा पीपीएफ चक्रवाढीने पैसे देतात. एलायसी सरळ व्याजाने हाही लक्षात घेण्याचा मुद्दा आहे.

एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया वाचून आणखीन कंफुजन झालंय. पोलिसी बाजार वरून फोन आल्यावर त्याने दिलेली माहिती अशी खाली. टर्म इन्शुरन्स घेताय तर एल आय सी कशाला घेता.? ते क्लेम देताना ८०-९० टक्केच देतात. ते टर्म विमा ६५ वर्षांची देतात. धुम्रपान करणार्यांसाठी ५० लाखांच्या विम्याला वार्षिक १५००० रुपये प्रीमियम आहे. धुम्रपान न करणार्यांसाठी 5० लाखाच्या विम्याला वार्षिक १०६०० रुपये प्रीमियम आहे. हेच मला तो अजेंट धुम्रपान न करणार्यांसाठी १३६०० चा प्रीमियम सांगत होता. ( म्हणजे ३००० रुपये जास्त ) आधी पर्याय कमी होते म्हणून एल आय सी ठीक होती. आता पर्याय आहेत तर आय सी आय सी आय किंवा यचडीएफसी घ्या म्हणत होता. हे ७० वर्षांची देतात. आय सी आय सी चा टर्म इन्शुरन्स वार्षिक हप्ता १०९६५ रुपये धुम्रपान करणार्यांसाठी त्यात २ फायदे त्याने सांगितले ते असे. १) पोलीसी घेत्य्लानंतर २ऱ्या वर्षी तुम्ही स्वखुशीने खपलात म्हणजे आत्महत्या केली तरी पैसे मिळतात म्हणे?????? २) तुम्हाला एखादा असा गंभीर आजार झाला ज्यात तुम्ही १००% खपणार हे जर आधीच माहित झाले तर तुम्ही खपायच्या आधीच तुम्हाला ते पैसे मिळणार ???? यच डी एफ सी मध्ये असे काही नाही आणि त्याचा वार्षिक हप्ता ९३३० रुपये धुम्रपान करणार्यांसाठी आहे. आणि दोन्ही कंपन्या १०० रक्कम देतात आणि क्लेम करण्याचा रेषु ९५ % आहे असे तो सांगत होता. जेवढी जास्त माहिती मिळतिये तेवढ जास्त मेंदू झांजाळतोय. थोडक्यात म्हणजे एल आय सी सोडून त्याने सांगितल्या प्रमाणे दुसर्या कंपनीचा टर्म इन्शुरन्स घ्यावा का?

In reply to by सतिश पाटील

एल आय सी सोडून त्याने सांगितल्या प्रमाणे दुसर्या कंपनीचा टर्म इन्शुरन्स घ्यावा का?
होय - अगदी माझ तर्कट वेगळ आहे समजा तुम्हाला 20 लाखाचा टर्म विमा काढायचाय तर दोन 10 लाखाचे काढा जेणे करून एकाने क्लेम सेटल करण्यात गद्दरी केली तर दुसरा तरी देईल... ज्या कारणासाठी विमा काढतो त्याचेच क्लेम ह्या कंपनी फक्त 80% देणार असतील खरच प्रचंड चिंताजनक आणि संतापदायक गोष्ट आहे ... खरच कोर्पोरट जगाची लाज वाटली

In reply to by सतिश पाटील

ऑन लाइन यासाठीच स्वस्त असते की एजंट कमिशनला फाटा मिळतो. एजंट कडून केल्यावर एजंट कमिशन जाणारच. त्यामुळे ती पॉलिसी महागच असणार. असं ऐकलंय.

टर्म इन्शुरन्स चा क्लेम सेटल करताना ८०% देतात याला काही विदा आहे का ? एकतर पूर्ण रीजेक्ट होइल किंवा पूर्ण मिळेल . ८०% देतात ई. याचा रेफरन्स मिळाला तर बरे होइल

In reply to by कपिलमुनी

डेथ क्लेम सेटलमेंट एकतर मिळते किंवा मिळत नाही. त्यात ८०-९० टक्के असला प्रकार नसतो. एलाआअयसी चा सेटलमेंट रेशो उत्तमच आहे आणि एलाआयसी मुळ धोरण कुठलाही डेथ क्लेम अडवायचा नाही असे आहे ( त्याचे कारण ती सरकारी असण्यामधे असेल ). नविन कंपन्य आत्ताशिक १० वर्ष पण काम करत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या कडे डेथ क्लेम येण्याचे प्रमाण पण कमीच असणार. त्यांचे खरे रंग पुढे अजुन काही वर्षानी दिसायला लागतील. एकतरी सरकारी विमा कंपनी मार्केट मधे असणे गरजेचे आहे.

In reply to by गंम्बा

मला आठवत असलेल्या आकडेवारीनुसार भारतातील बहुसंख्य पोलिसीज ह्या 15/20 वर्षे कालावधीच्या असतात. भारतातील प्रमुख खासगी कंपन्याना व्यवसाय सुरु करुन आता जवळपास 15 वर्षे झाली आहेत.. सबब .. नविन कंपन्य आत्ताशिक १० वर्ष पण काम करत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या कडे डेथ क्लेम येण्याचे प्रमाण पण कमीच असणार. त्यांचे खरे रंग पुढे अजुन काही वर्षानी दिसायला लागतील....ह्या वाक्याला तितकीशी धार नाही. एलाआअयसी चा सेटलमेंट रेशो उत्तमच आहे ..या वाक्याकरिता खाली प्रतिसाद दिला आहे.

टर्म इन्शुरन्स चा क्लेम सेटल करताना ८०% देतात याला काही विदा आहे का ? असं कोणी आणि कुठे म्हटलं आहे? हा आपण काढलेला अर्थ आहे. (जर असेल तर ते चुकीचे आहे.) एनडोवमेंट पासून मनी बैक लहान मुलांच्या आणि/ किंवा मेडिक्लेम, कार पासून घराच्या चोरीच्या, आग लागणे इ सर्व तर्हेच्या विम्यात मिळून हा आकडा येतो कोणतीच कंपनी क्लेम सेटलमेंट रेशो कोणत्या विम्याचा आहे आणि किती टक्के पैसे देते हे लिहित नाही. आमचा क्लेम सेटलमेंट रेशो सर्वात जास्त आहे हा दावा "एल आय सी" चा चावटपणा आहे. त्यांचा विमा सर्वात महाग आहे आणि त्यांची सेवा सर्वात भिकार आहे (त्यांची वेबसाईटहि टीनपाट आहे) म्हणून लोकांना भीती घालण्यासाठी अशी दिशाभूल केली जाते. रेषांच्या मधील वाचून घेणे हि ग्राहकाची जबाबदारी आहे.

In reply to by सुबोध खरे

टर्म इन्शुरन्स घेताय तर एल आय सी कशाला घेता.? ते क्लेम देताना ८०-९० टक्केच देतात.
या मुद्द्यावरून विचारले होते.

विमा या विषयावर खरे तर विस्ताराने लिहिता येईल..मी काही काळ Actuarial science चाही अभ्यास केला आहे हे सांगणे येथे अप्रस्तुत होणार नाही. मात्र व्यवसायाची सर्वच गुपिते येथे उघड करायला मी ईच्छुक नाही. सांगावयाचे हे की केवळ क्लेम सेटलमेंट रेशो पहाणे ही आत्मवंचना होईल..पुढील गोष्टीकडे जरुर लक्ष द्यायला हवे. (१)महागड्या प्रिमियम्सच्या युलिपचे क्लेम सेट्ल करणे आणि टर्म पोलिसीचा क्लेम सेटल करणे यांत फरक आहे. हे प्रमाण काय आहे ?? (२)प्रति क्लेम द्यावयाची सरासरी रक्कम किती?? हा ही या अनुषंगाने महत्वाचा प्रश्न ठरतो. LIC कडील बहुतेक पॉलिसीज ह्या खुप जुन्या व तुलनेने कमी विमा रक्कम असणार्या आहेत. सबब अशा पॉलिसीजमध्ये क्लेम देणे सोपे असते. (३)मिळालेला प्रिमियम व सेटल केलेले क्लेम्स यांचे प्रमाण ही तपासावयास हवे. उदा दीडपट अधिक विमा हप्ता घेणारी कंपनी जर १०% अधिक क्लेम सेटल करीत असेल तर आपण काय म्ह्णाल?? (४) याशिवाय क्लेम्स देण्याकरिता सरासरी लागलेला अवधी पहाणे ही महत्वाचे आहे.. बरीच वर्षे सातत्याने ह्या आकडेवार्या तपासल्यानंतर हल्ली या बाबत मी तितकासा अपडेट नाही याबद्दल क्षमस्व. मात्र यातील कोणत्याही बाबतीत LIC भारतातील प्रमुख ४/५ खाजगी विमा कंपन्यांच्या तुलनेने निर्णायकपणे फायदेशीर ठरत नाही हा सातत्याने आढळ्लेला निष्कर्ष अजुनही खराच असावा.. टीपः - कोणीतरी शंका उपस्थित केली असल्याने खुलासा करतो की HDFCLife आत्महत्येचे दुर्दैवी क्लेम्स ०१ वर्षाच्या कलावधीनंतर मान्य करते.

अतिशय उपयुक्त धागा ! छान चर्चा ! बरीच माहिती मिळाली. कन्सलटन्टच्या शिफारसी वरुन बीएसएलआय (बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स) चा टर्म इन्सुरन्स घ्यायचा विचार आहे. या कंपनीचा कुणी टर्म प्लान घेतला आहे का ? या कंपनीचा कुणाला काही अनुभव आहे का?