Skip to main content

गीतबाधा

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 02/06/2016 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला होतं का कधी असं? भूतबाधा व्हावी तशी गीतबाधा होते मला. एखादं गाणं कचकचून चावतं आणि त्याची बाधा होते. मग ते गाणं मला बरेच दिवस सोडत नाही. कित्येक दिवस मी फक्त तेच गाणं ऐकतो, म्हणतो, ओरडतो, कोकलतो, पुटपुटतो. शेवटी बायको वैतागून ते गाणं बंद करायला सांगते. तरी ते गाणं मला सोडत नाही. संपूर्ण गाणं त्यातल्या संगीताच्या एक-एक तुकड्यासकट तोंडपाठ झाल्याशिवाय मीदेखील त्या गाण्याला सोडत नाही. आधी गाणं मला बाधतं, मग मी गाण्याला बाधतो. एका वेळेस १५-२० वेळा आणि असं किमान ८ ते १० वेळा मी ते गाणं ऐकतो. फारसं चांगलं गाणं येत नसलं तरी मनाचं समाधान होईल इतपत सुरात ते गाणं नरड्यातून येईपर्यंत ते गाणं मी ऐकतो आणि म्हणतो. मग अचानक दुसरं गाणं उगवतं. म्हणून मी आधीच्या गाण्याला वाऱ्यावर सोडत नाही. ते माझ्या मनाच्या एका सुरक्षित कुपीत अलगद ठेवून देतो. अशा प्रत्येक गाण्यासाठी मी एक-एक खास कुपी मनात तयार करून घेत असतो. या कुपीला कुलुप-किल्ल्या नसतात. उघड्याच असतात या कुप्या. एखाद्या कुपीनुरूप माहौल बाहेरच्या जगात तयार झाला की मग त्या विशिष्ट कुपीतून आराम करत असलेलं गाणं सुगंध पसरावा तसं बाहेर पडतं. क्वचित ओठांवरही येतं आणि आसमंत आणि पुन्हा एकदा माझं मन भिजवून जातं. या मनातल्या कुपीची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. गाण्याच्या चालीच्या भिंती असतात. गायक-गायिकांच्या आवाजांचे छप्पर असते. आशयाचे सुंदर रंग असतात. आणि गाण्याच्या मला भिडलेल्या भावाचे, भूतकाळातील आठवणींशी नातं सांगू पाहणाऱ्या किंवा सांगणाऱ्या रेशीमधाग्यांचे सुगंधी पडदे असतात. कधी गाणं बाहेर पडलं तर हा सगळा लवाजमा बाहेर घेऊनच पडतं. आणि हो, या गीतबाधेला गाण्यांचं कुठलंच बंधन नसतं. फक्त रफीची किंवा सज्जाद हुसेनची किंवा वसंतरावांची किंवा सुधीर फडक्यांची किंवा फक्त अशी क्लासिक वगैरे गाणीच मला बाधतात असे अजिबात नाही. किंबहुना जास्त संख्या साध्या गाण्यांचीच आहे कारण खूप जास्त क्लासिकल मला फारसं झेपत नाही. त्यामुळे बेगम अख्तरचं "वो जो हममे तुममे करार था..." एका कुपीत असेल तर त्याच्या लगतच्या कुपीत "तेरे बदन में तुंफा उठा तो साडी हवा हो गयी" हे 'मवाली'चं तडका गाणंदेखील असू शकतं. कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही. हा सिलसिला कधी सुरु झाला आठवत नाही पण खूप वर्षे झाली हे नक्की. "सलाम-ए-इश्क मेरी जां जरा कबूल कर लो..." हे बहुधा माझ्या आठवणीतलं पहिलं चावलेलं गाणं. अमिताभ किशोरच्या आवाजात "हां.......इसके आगे की अब दासता मुझसे सुन, सुनके तेरी नजर डबडबा जायेगी..." असं गायला सुरुवात करतो आणि अजूनही रोमांच उभे राहते. अमिताभ, किशोर, आणि लाजवाब चाल! दिल में छेद कर दिया इस गाने ने! अजूनही "हां..." करून भ्रष्ट नक्कल करायचा प्रयत्न करतो पण साला अपनी औकात धोखा दे जाती हैं. तर इतक्या लहानपणापासून हे गाण्यांचं गारुड चकित करत आलंय. त्यानंतर असा गानदंश कित्येकवेळा झाला पण लहानपणीचे असे बरेच दंश कालौघात बरे झाले. लहानपणी 'पाताल भैरवी'मधले "चुम्मा चुम्मा चुम्मा चुम्मा, मुझको बना ले प्रियतम्मा..." हे डिंपलवर चित्रीत झालेलं गाणंदेखील थोडं चावण्याच्या मूडमध्ये आलं होतं. त्यात डिंपलच्या मादक नृत्याचा जास्त भाग होता हे वेगळं सांगायची गरज नाही. हे गाणं लगेच उतरलं. 'सल्तनत'मधलं "नजर ने नजर से क्या कहा, मेरी जां मेरी जां ये बाता..." हे गाणं त्याकाळी आवडलं आणि नंतर कित्येक वर्षे गायब झालं. हे गाणं मी मागच्या वर्षी खणून काढलं आणि खूप वेळा ऐकलं. बरं वाटलं. पण बाधलं नाही. 'शक्ति'मधलं "जाने कैसे कब कहां इकरार हो गया...." हे मात्र लहानपणापासूनच बाधलं. त्याकाळी इतकं ऐकता आलं नाही; त्याची कसर नंतर भरून काढली. अप्रतिम चाल! स्लो मोशनमध्ये अमिताभ स्मिताला उचलतो त्यावेळेस जो अफलातून तुकडा वाजतो, तो अट्टल रोमांटिक! नंतर केव्हातरी 'मंजिल मंजिल'मधलं "हे बाबा हे बाबा मिलते है एक दिन हे बाबा, रे बाबा रे बाबा मर गये तुम बिन रे बाबा...." हे गाणं ऐकलं. वेगळीच चाल बांधली होती आरडीने. आणि आशाबाईंनी काय नखरेल आवाजात गायलं होतं, वा! आणि मधले मधले झिंगालाला तुकडे...मजा आ गया. पाठ करून टाकलं. अजूनही पाठ आहे बहुतेक. अशी बरीच गाणी पाठ झाली. बरीच जुनी गाणी मी गेल्या १०-१२ वर्षात उकरून काढली. जवळपास १३-१४ वर्षांपूर्वी 'बसेरा'मधलं "जहां पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं..." हे गाणं अवचित ऐकायला मिळालं. नंतर शक्य झालं तेव्हा अनेकदा ऐकलं. दिदींचा अशक्य वर जाणारा आवाज, मखमली काव्य, आणि आरडीची कुरतडणारी, मनाला हुरहूर लावणारी चाल. गाणं ऐकतंच रहवासं वाटतं. त्याच्या काही वर्षे आधी 'उंबरठा'मधल्या "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या..." ने भुरळ घातली. साधारण २०००-२००१-२००२ मध्ये मित्रांसोबत "सुन्या सुन्या"चा आग्रह व्हायचा आणि २-३ वेळा गाऊन झालं की पोरं खुश व्ह्यायची. आता दोन-तीन महिन्यांपूर्वी मुळशीच्या एका रिसोर्टवर गेलो होतो. सगळे जुने दोस्त! जीवाभावाचे! परत 'सुन्या सुन्या' झालं. मन एकदम १४-१५ वर्षे मागे गेलं. अगदी तेव्हा जेव्हा सगळं सुनं सुनंच होतं. नकळत मन हळवं झालं. त्याच सुमारास गुलाम अलीचं "चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला..." ऐकलं. त्याकाळातल्या माझ्या परिस्थितीशी इतकं सुसंगत गाणं तोपर्यंत मी ऐकलं नव्हतं. नोकरी नाही. आणि नोकरी नाही म्हणून सगळीकडून झेलावा लागणारा तिरस्कार, ती अगतिकता, काय करायचं हे काळंकुट्ट प्रश्नचिन्ह..."चमकते" हृदयात रुतून बसलं. अगदी तोंडपाठ झालं. मग "मी कात टाकली" ने झपाटलं. हृदयनाथांची अप्रतिम चाल आणि दिदींचा किंचित आक्रमक तरी हताश स्वर! जादू आहे हे गाणं. नंतर गुलाम अलीने झपाटलं. "आवारगी", "चुपके चुपके", "वो कोई और न था...", "कैसी चली है अब के हवा…", "हंगामा है क्यू बरपा…"...खूप गजला. अक्षरश: शंभर-शंभर वेळा ऐकून तोंडपाठ झाल्या. अगदी सगळ्या संगीतासहित! गुलाम अलीच्या गजलांमधला मधाळपणा खूप आवडला. नंतर मित्रांसोबत कित्येक वेळा या गजला गायल्या. मित्रदेखील खुशफ़हम आणि खुशमिजाज! त्यांनी ऐकल्या, पुन्हा पुन्हा ऐकल्या, अजूनदेखील ऐकतात आणि मग गातांना आणखी मजा येते. मागे रिसोर्टला गेलो होतो. पहाटे ३ पर्यंत गाणी चालली होती. खडकवासल्याचे गडद पाणी आणि त्याशेजारी आम्ही बसलो होतो. एकामागून एक गजल बाहेर येत होती. माहौल रंगीन होत होता. "वो तेरा कोठे पे नंगे पाव आना याद हैं". कुणी कधीच असं आलं नाही पण आलं असतं तर जिंदगी ने और क्या क्या हसीन गुल खिलाये होते या विचारात आम्ही पहाट जागवली. नंतर "बिखरती झुल्फ की, परछाईयां मुझे दे दो, तुम अपनी शाम की तनहाईयां मुझे दे दो..." झालं. अशा वेड लावून जाणाऱ्या झुल्फांची आठवण जागवून झाली. प्रत्येकाच्या आठवणीत अशी झुल्फे मुबलक होती. काही महिन्यांपूर्वी "कोई नही हैं कही, सपनों में क्यू खो गयी" ऐकलं. खूप वर्षांनंतर ऐकलं. नंतर सलग ८-१० दिवस मग हेच गाणं ऐकलं. भूपेंद्र सिंगचा आवाज काय लागलाय म्हणून सांगू! हेमा अंध असते आणि स्टेजवर नाचते. जितेंद्र बाजूला उभं राहून तिला या गाण्यातून सांगतो "कुणीच नाहीये सोबतीला, सगळ्यांचा असे मार्ग एकला". अडचणीत असतांना मार्ग बंद होतात. काय करावं कळत नाही. मार्ग सापडत नाही. कुणीच काही मदत करू शकत नाही. तरीही धीर ठेवावा लागतो; मार्ग आपला आपणच शोधावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये हे गाणं चपखल बसतं. हे गाणं ऐकतांना अशी काही आठवण आली तर डोळ्यात टचकन पाणी आल्यावाचून राहत नाही. त्यानंतर 'गुंडे' मधलं "तुने मारी एंट्री" जाम आवडलं. काय बीट्स! सुरेख चाल आणि नीती मोहनचा खटकेबाज आवाज. सकाळी चालतांना हे गाणं भारी वाटतं. तालात आणि वेगात पाऊले पडतात. शब्द मात्र आजकाल वळसेदार, गेय नसतात त्यामुळे ह्या गाण्याचे शब्द सहजासहजी ओठांवर येत नाहीत. अशाच पठडीतलं प्रियांकावरच चित्रीत झालेलं 'शूटआऊट एट वडाळा' मधलं "बबली बदमाश हैं" आहे. एकदम झकास गाणं. सुनिधीचा झोकदार आवाज आहे. हे पण चालतांना ऐकण्याचं गाणं. "युं तो प्रेमी पचत्तर हमारे" (एजंट विनोद), "तम्मा तम्मा लोगे" (थानेदार), "आज रपट जाये तो" (नमक हलाल) ही गाणी अशीच धमाल! मला विशेष आवडतं 'तेजाब'मधलं अलकाच्या आवाजातलं "एक दो तीन". काय ओर्केस्ट्रा आहे! मधले काही काही तुकडे तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेउन जातात. एकदा अगदी फोकस करून ऐका हे गाणं. बडी गंमत हैं उस गाने में. मागे थायलंड्च्या सहलीला गेलो होतो. अर्थातच, बायको होती सोबत. ('त्या' प्रकारचा मसाज घेतला नाही हे आधीच सांगून ठेवतो.) आमच्या गटात एक सुरेख मुलगी होती. सहलीमध्ये असं कुणी असलं की सहलीची मजा चौपट होते हा माझा अनुभव! हर पल हवा में एक अलग सी खुशहाली रहती हैं. काय सुंदर गाणं गायची. तिने 'फेशन' सिनेमातलं "कुछ खास हैं, कुछ बात हैं..." म्हटलं. निव्वळ अप्रतिम! मग ते गाणं शोधून काढणं आलंच. खूप वेळा ऐकलं पण प्रोब्लेम तोच, शब्दांच्या नावाने बोंब! पण गाणं ऐकलं मात्र खूप वेळा. नंतर अहमद हुसेन - मोहमद हुसेन या बंधूंचं "मैं हवा हूं कहां वतन मेरा, दश्त मेरा ना ये चमन मेरा" असंच १०-१२ दिवस ऐकलं. अजूनही मन सैरभैर झालं की हे गाणं ऐकतो. छान वाटतं. मग बेगम अख्तर यांचं "वो जो हममे तुममे करार था, तुम्हे याद हो के ना याद हो"वर काही दिवस जगलो. मदहोश करणारे सूर! कधी काळी "सो गया ये जहां, सो गया रासता.." (तेजाब), "सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं" (कुली), "जब हम जवां होंगे, जाने कहां होंगे" (बेताब) अशा गाण्यांनीदेखील वेड लावलं होतं. अशी बरीच गाणी अजूनही बऱ्यापैकी पाठ आहेत. मित्रांच्या आग्रहास्तव शब्बीर कुमार आणि मोहम्मद अझीझ या महान गायकांच्या रेचक गायनवैशिष्ट्यांची आठवण जागवण्यासाठी या गाण्यांचीदेखील फर्माईश होते आणि ही गाणी गायलादेखील तितकीच मजा येते. नुकतंच मेहदी हसन यांचं "रंजीशही सही, दिल ही दुखाने के लिये आ..." संपवलंय. हे ही रात्रीचं गाणं. रात्र अधिक तरुण करणारं गाणं. काय शायरी आहे! दिल ना दुखा दे तो जाने! सध्या 'सनम रे' चित्रपटातलं अरिजित सिंगच्या आवाजातलं "भीगी भीगी सडकों पे मैं तेरा इंतजार करू, धीरे धीरे दिल की जमीं को तेरे ही नाम करूं, खुद को यूं खो दू के फिर ना कभी पाऊं, होले होले जिंदगी को मैं तेरे हवाले करूं...सनम रे...सनम रे...तू मेरा सनम हुआ रे, करम रे करम रे, तेरा मुझ पे करम हुआ रे...सनम रे..." हे गाणं ऐकतोय. सुंदर चाल आहे. गाणं म्हणजे जरा ट ला फ जोडल्यासारखंच आहे पण चाल धुंद करणारी आहे. गेले ३-४ दिवस रोज सकाळी ८-१० वेळा हे गाणं ऐकतो. अशी अजून बरीच गाणी आहेत. आता पुढचं गाणं कुठलं मला माहिती नाही पण एखादं असणार हे नक्की. एखाद्या मैफिलीत मनाच्या असंख्य कुप्यांमधून एकामागोमाग ही गाणी बाहेर पडतात. माहौल चिंब होऊन जातो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20638
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

फारच सुंदर लेख. एकदम माझ्या मनातले बोललात. मैं रहूँ या ना रहूँ तुम मुझ में कहीं बाकी रहना मुझे नींद आये जो आखिरी तुम ख्वाबों में आते हि रहना|| सध्या या गाण्याने वेड लावलय.....

In reply to by वेदांत

अप्रतिम आहेत याचे बोल... अत्यंत सुंदर चाल सुद्धा... माझंही आवडतं गाणं... विडिओ पाहिलाय का गाण्याचा??? सुरेख आहे...पहा जरूर...

मी सुद्ध याच प्रकारात मोडतो बर का.......साला एखाद्या गाण्यानं पिच्छा पकडला कि झालं....आम्ही अडकलो ...तिथेच...!!!

नोकरी नाही. आणि नोकरी नाही म्हणून सगळीकडून झेलावा लागणारा तिरस्कार, ती अगतिकता, काय करायचं हे काळंकुट्ट प्रश्नचिन्ह..."चमकते" हृदयात रुतून बसलं

. माझंही आव्डत गाणं पण नरड (अश्या) गाण्यालायक नसल्याने आम्ही फक्त जहां चार यार, आणि मुकासि गाण्यांपर्यंतच धावू शकतो. मला आवडणारी (काळजात रुतलेली) चार-पाच गाण्यात "नैनोमें बदरा छाये + तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया आणि त्रिशूलमधईल हर तरफ हुस्न है जवानी है त्यातला अमिताभचा भाग ही अग्रभागी आहेतच. मराठीत पिंजरा मधील हे गाव लई न्यार आणि झुंजमधील एक दोन गाणे तोंडपाठ झाली होती अता (रियाज(?) की सराव) नसल्याने म्हणन्याचा चानस कमीच असतो. मस्त लेख, अगदी तब्येतीत लिहिलेला. स्मरणशील नाखु

In reply to by नाखु

हे अशक्य आणि अफाट गाणं आहे. मदनमोहन आणि लता हे त्यात पूर्ण सुटलेले आहेत असं माझं मत आहे. असंच अजून एक म्हणजे - जहांआरा मधलं वो चुप रहे तो मेरे दिल के धागा जलते है आणि अनुपमा मधलं कुछ दिल ने कहा. त्यात ऐसी भी बाते होती है हे फक्त लताच्याच आवाजात ऐकू शकतो. तसंच बहारों के सपने मधलं - क्या जानूं सजन. ही बाप, आई वगैरे काय म्हणाल ती गाणी आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

बोकेशा, तुमच्यामुळे क्या जानू सजन पहिल्यांदा शोधून पाह्यलं, मला तेच गाणे दिलविल प्यारव्यार मुळे माहीत. राजेश खन्ना काय हँडसम होता राव. लता अर्थात निर्विवाद दैवी आवाज. थोडा कोरस ने रसभंग वाटला पण मला आवडले प्रचंड. नवीन गाणे चित्रा कि कविताच्या आवाजातले पण आवडते.

मी सध्या 'प्रेमऋतू' (मि अँड मिसेस सदाचारी) आणि सावर रे (मितवा) मध्ये अडकलोय. प्रेमऋतू मधली 'स्पर्शाचा वणवा का शब्दांशी अडला' ही ओळ फारच दिलखेचक वाटते.

फक्त याड लागलंय!

In reply to by तुषार काळभोर

ही माझ्या लहानपणापासूनची मला याड लावणारी गाणी: (नुसतं रिपीट..रिपीट..रिपीट.......) सगळ्यात आधीचं आठवतंय ते ८०च्या दशकाच्या शेवटची गाणी रामलखनचं एजी ओजी (त्यातलं रमपमपम रमपमपम रमपपपम रमपम :) ) तेजाबचं १-२-३ (अगदी सुरुवातीच्या मोहिनी..मोहिनीच्या गजर पासून) थानेदारचं तम्मा तम्मा (यातला जो वेगवान म्युजिक पीस आहे, तो एका आफ्रिकी गाण्यावरून "प्रेरित" आहे :) बाप्पीदा आहेत ना!) आंखेमधलं (गोविंदा अन् चंकी पांडे) - बडे काम का बंदर जान तेरे नाम मधलं ये आख्खा इंडिया जानता है, हम तुमपे मरता है. शाहीर साबळेंच्या महाराष्ट्राची लोकधारा च्या २-३ कॅसेट्स होत्या. त्यातलं मल्हारी मल्हारी (देवाचं ठाणं जेजूरीला अन दख्खन मुलखाला.. अशी एक ओळ होती त्यात), जेजुरीच्या खंडेराया जागराला या या आलिशा चिनॉयचं मेड इन इंडिया काही काळ दलेर मेहेंदीचं पण वेड होतं (नव्वदीच्या अखेरीच्या वर्षांमध्ये) त्याआधी २-३ वर्षे सोनू निगमचीगाणी (तू... ए बी सी.. दिवाना..) नव्वदीच्या सुरुवातीचं बेवफा सनम (सोनू निगमची पदार्पणाची गाणी) इश्क में हम तुम्हे क्या बताये आणि अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का नव्या शतकात येता येता दिल चाहता है चं तनहाई धडकनचं ना ना करते प्यार मैं तुझसे कर गयी..

In reply to by तुषार काळभोर

संत ज्ञानेश्वर-लता मंगेशकर-हृदयनाथ मंगेशकर > >> मोगरा फुलला >> अवचिता परिमळु >> रंगा येई वो शारद सुंदर चंदेरी राती येऊ कशी प्रिया प्रितीचं झुळझुळ पाणी निसर्गराजा ऐक सांगतो (त्यातला मधला एक प्रश्नोत्तराचा तुकडा अजूनपन लई आवडतो) (निसर्गराजा मालिकेच्या ४-५ कॅसेट्स होत्या. त्यातली बहुतेक सगळी गाणी परत परत ऐकून तोंडपाठ होती) जानकी मधली: झुलतो बाई रास झुला आणि विसरू नको श्रीरामा मला एक शिवजन्माच्या पोवाड्याची कॅसेट होती. त्यात सुरुवातीला शाहीर जे काही म्हणत, त्यात आवेश असा असे की ते तल्लीन होऊन ऐकत राहावसं वाटे. अष्टविनायका तुझा महिमा कसा.

सावर रे उंच उंच झुला हे एक असंच गाणं आहे. त्यात ' मिटले मी माझे डोळे हात हाती दिला ' हे ऐकताना अजूनही अंगावरून शहारा जातोच जातो. आशाबाईंनी ' शारद सुंदर चंदेरी राती' मध्ये आवाजाच्या अशक्य करामती केल्या आहेत. मुकेशच्या आवाजातलं दोस्त दोस्त ना रहा ऐकताना शेवटी ' जिंदगी हमे तेरा ऐतबार ना रहा ' हे ऐकताना अजूनही जीव कातर होतोच. शराबी मधलं मुझे नौलखा मंगा दे रे हे आशा-किशोरचं द्वंद्वगीत पण लय भारी आहे. त्यात किशोर सुरु होतो - किसीपे हुस्न का गुरुर जवानी का नशा आणि मग त्याचा आवाज टिपेला जातो - नशेमे कौन नही है मुझे बताओ जरा किसे है होश मेरे सामने तो लाओ जरा लिहितानाही शहारा येतोय अंगावर!

In reply to by बोका-ए-आझम

शराबीची गाणी खासच होती. "नशे में कौन नही हैं मुझे बताओ जरा..." जबरदस्त आवाज, धून, आणि भाव!

समीर भौ एकदम होतं...२००% होतं....एखादं गीत कचकचून दंश करतं आणि त्याचे अक्षरशः विष भिनते/कैफ चढतो (ह्या 'विषाचे' तीन घटक- गायक,गीताचे शब्दं आणि संगीत) आणि बहुतेक वेळेस पूरक अशी स्वत:च्या मनाची अवस्था, पण कधी कधी एकदम खुश असतांना सुद्धा तलतचं "जिंदगी देनेवाले सून, तेरी दुनिया से दिल भर गया...." नांगी मारतं, कधी निराशेत रफीचं "हमको तुमपे प्यार आया..(जब जब फुल खीले) डंख मारतं...आणि मग त्याच्या धुंदीतच एक दोन दिवस कधी आठवडा जातो....२००५ च्या आसपास मधुशाला ने जहाल चावा घेतला होता, तीन- चार महिने सकाळ-संध्याकाळ 'मदिरालय जाने को चलता है पीनेवाला...' काय तो मन्ना डे चा आवाज, ते हरिवंशरायांचे लिखाण अनं जयदेवचे संगीत सगळं अगदीच जहाल...अशी भरपूर गीतं आहेत त्यापैकी गेल्या काही दिवसांत या गीतांनी मला कैफ चढवला: #.आपकी याद आती राही रातभर-(गमन), #.अजीब सनेहा मुझपर-(गमन) {हरिहरनचे चित्रपटासाठी गायलेलं पहिलेच गीत म्हणे.}, #.मला वेडं लागले प्रेमाचे (टाईमपास), #.पैलतोगे काऊ कोकताहे, #.दिवाना मै चला (प्या.की.तो.ड.क्या) #.कसम पैदा करनेवाले की (ग्यांग्स ऑफ वास्सेपूरमुळे आठवले..विजय बेनेडिक्टचा आवाज...;)) #.हैराण गल्ली सारी (आनंद शिंदे..याच्या शोधातच मला मिपाचा शोध लागला...थोडं डोकं खर्ची करून mp३ मोब्ल्या मध्ये उतरवीलीच पाहिजे असल्यास व्यनी करा)....लिस्ट संपवितो. हा प्रतिसाद लिहित असतांना तलतच्या रेशमी स्वरातील 'जलते है जिसके लिये -(सुजाता)' चा कैफ चढलाय...

In reply to by सुंड्या

'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी' याने माज्या आजोबांना डंख मारला होता...'विष' माझ्या पर्यन्त पोहोचले...आणि चिरंजीव (वय वर्ष २) सुद्धा हे ऐकतांच मान डोलावतात.

वाखू साठवलीय. बेगम अख्तरांबद्दल लिहिल कोणी? आणि फरीदा खानुम? आबिदा?

In reply to by यशोधरा

बेगम अख्तार्बद्दल लिहिलंय ना लेखात..."वो जो हममे तुममे करार था...". पाठ आहे गाणं. :-) फरीदा खानुम माहिती नाही. कोणती गाणी आहेत यांची? आबेदा परवीन का? यांची पण गाणी माहित नाहीत. :-(

In reply to by समीरसूर

त्यामुळे बेगम अख्तरचं "वो जो हममे तुममे करार था..." एका कुपीत असेल तर >> हे? इत्तासाच? :( फरीदा खानुम माहिती नाही. >> लाहौलविलाकुवत वगैरे! कृपया गूगल करावेच आणि गजलाही ऐकाव्यातच. प्लीजच. हे झाले की आबेदा.

In reply to by यशोधरा

हो, बेगम अख्तर फिलहाल इत्तासाच. :-) एक-दोन अजून ऐकल्या होत्या पण तितक्या आवडल्या नाहीत म्हणून विस्मृतीत गेल्या. नंतर जास्त शोध घ्यायला सवड मिळाली नाही. फरीदा खानुम खरंच माहित नाही. लाहौलबिलाकुवत वगैरे झेलायला अगदी तयार आहे. प्रायश्चित्त म्हणून लेखदेखील मागे घ्यायला तयार आहे. :-) व्यासंग तितका दांडगा नाही. शोधतो बरं जरा त्यांच्या गजला. शोधायचं म्हटलं की जीवावर येतं. एकदम अंगावर पावसाची सर पडावी तसं गाणं हृदयावर आदळलं पाहिजे. मग मजा जास्त येते. :-)

In reply to by यशोधरा

गमतीनं म्हणालो हो; टेंशन नका घेऊ. :D उलट नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by समीरसूर

टेंशन काय घ्यायचं, गाने गाने पे लिख्खा हैं सुननेवाले का नाम आपका नामच लिख्या नै होगा तो कोई कुछ नहीं कर सकता.

In reply to by यशोधरा

सही बात! पर हम हमारा नाम लिखवायेंगे जरूर... :-) फिलहाल तो मोहम्मद अझीझ के "कितने मौसम, कितने सावन, कितने सावन बीत गये, तुम हो वही या और कोई तुम लगने लगे नये...." पे नाम लिखा हैं. ;-)

In reply to by समीरसूर

बेगम अख्तरचं उल्टी हो गईं सब तदबीरें, कुछ न दवा ने काम किया। देखा इस बीमारिए दिल ने आखिर काम तमाम किया।। अाणि खुशी ने मुझको ठुकराया तो रंजो गम ने पाला है गुलों ने बेरूखी की है, तो कांटों ने संभाला है...। ऐका, मग सांगा।

In reply to by समीरसूर

आबेदा परवीन सुफी गाण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचं कोक स्टुडीओ सिझन ३ मधले रोहिल हयात सोबतची गाणी नक्की ऐका.
छाप तिलक सब छीनी
सुद्धा अप्रतिम आहे.

In reply to by मराठी कथालेखक

पण तीच अदा। लाजवाब, अशीच। पृथ्वीराज राजकुमारी ने दिलेला रूपया बोटांनी वाकवून फेकून देतो। तो रूपया राजकुमारी साहेबा बोटांत आंगठी सारखा घालतात। मग पृथ्वीराज साठी हे गाणं म्हणते। खूप सुंदर पिक्चराइजेशन। लिहितांना या गीत गातांना सुरैयाचं ते खट्याळ हसूं आठवलं।

काय प्रत्ययदर्शी लिहिता हो समीरसूर ! खरोखर अशा अनेक गाण्यांनी आजवर अगणित दंश केलेत. बोका-ए-आझम नि दिलेल्या सर्व गीतांबरोबरच लता-आशा यांची अगणित गीते, तलत किशोर रफी यादी फार मोठी आहे. तरी काही नमुने देतेच. जयोस्तुते श्री महन्मंगले तुझे गीत गाण्यासाठी असा बेभान हा वारा कशी येऊ शारद सुंदर चंदेरी राती येऊ कशी प्रिया बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती घन तमी शुक्र बघ राज्य करी शोधू मी कुठे कशी प्रिया तुला इष्काची इंगळी डसली श्रावणात घन निळा जिथे सागरा धरणी मिळते आला आला वारा संगे पावसाच्या धारा माझे माहेर पंढरी गोमू संगतीनं माझ्या तू आणि हिंदी....... कांची रे कांची रे गुम है किसीके प्यारमे फिर तेरी कहानी याद आई फिर तेरा चढ गयो पापी बिछुआ लग जा गले अजीब दास्ता है ये दो हंसोंका जोडा बाहोमे चले आओ चूप चूप खडे हो गोरे गोरे ओ बांके छोरे ओ तुमको पिया डील दिया इतना ना मुझसे तू प्यार बढा ... बस्स, टंकाळा आला...!

In reply to by सस्नेह

वा, मस्त यादी! तुमसे बढकर दुनिया में - कामचोर अगर तुम ना होते - अगर तुम ना होते मैं बेनाम हो गया - बेनाम दूर रहकर न करो बात, करीब आ जाओ - अमानत (जुना) मेरी मोहब्बत पाक मोहब्बत - एप्रिल फूल रात के हमसफ़र थक के घर को चले - एन एविनिंग इन पेरिस वो भुली दासता लो फिर याद आ गयी - संजोग यार इलाही मेरे यार इलाही - कट्यार काळजात घुसली घेई छंद - कट्यार काळजात घुसली बगळ्यांची माळफ़ुले - वसंतराव खुदा गवाह - खुदा गवाह बहुत प्यार करते है तुमसे सनम - साजन मी वार्याच्या वेगाने आले - शुक्रतारा अपनी धून मी राहता हू - गुलाम अली एक तरफ उसका घर एक तरफ मयकदा - पंकज उधास चुमकर मदभरी आंखो से - पंकज उधास जखम-ए-तनहाई में, खुशबू-ए-हीना - गुलाम अली रेतपार लिखकर मेरा नाम ना मिटाया करो - गुलाम अली वोह कभी मिल जाये तो - गुलाम अली कल चौदहवी की रात थी - गुलाम अली एकटे जगू - संदीप खरे आयुष्यावर बोलू काही - सलील, संदीप रुक जा ओ दिल दिवाने - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

In reply to by समीरसूर

लागा चुनरी मे दाग गुमनाम है कोई या दिल की सुनो दुनियावालो अगर मुझसे मुहोबत है सारी सारी रात तेरी याद सताऐ चैन से हमको कभी है कहीपर शादमानी न मिलता गम तो ये जिंदगी उसीकी है (यातली सुरुवातीची लकेर या जगाबाहेरची आहे) नुक्ताची ऐ गमे दिल बाबुल मोरा (हे सैगलने अफाट गायलंय.) नवीन गाण्यांमध्ये मै तैनु समझावां की जहेनसीब किसी बंजारे को घर बेकदर बेखबर बेवफा बालमा (अनुराधा पौडवाल यांचं प्री-गुलशनकुमार दिवसांमधलं गाणं) आणि सर्वात अफाट - प्यार किया तो डरना क्या सुरूवातीचा कोरसच्या बुलंद आवाजातला तराणा. मग लताचा चिरत जाणारा आवाज - इन्सान किसीसे दुनिया मे इक बार मुहोबत करता है! इस दर्द को लेकर जीता है इस दर्द को लेकर मरता है आणि मग शेवटचं कडवं - पर्दा नही जब कोई खुदा से, बंदोंसे पर्दा करना क्या! शकील, नौशाद, लता, मधुबाला, दिलीपकुमार आणि पृथ्वीराज कपूर यांनी हे गाणं सोडून दुसरं काही केलं नसतं तरी ते अजरामर झाले असते असं माझं प्रामाणिक मत आहे.

गुलामीतल्या गाण्याचा दंश अनुभवलाय, दोन दिवस झाले. पुर्ण गाणे इथे जिहाले मिस्कीन विविध भारती पंखा नाखु

In reply to by दा विन्ची

आशा भोसलेंच्या आवाजात पण ऐकलंय पण फरिदा खानुम च्या ' आज जाने की..' ला तोड नाही.

लेख आवडला. बर्‍याच गाण्यांबद्दल लिहिलेत. यातली अगदी नवीन गाणी माहीत नाहीत. मी इतके दिवस एकाच गाण्याने झपाटली जात नाही. मात्र सकाळी उठून जे गाणं डोक्यात येतं ते दिवसभर आठवत रहातं.

In reply to by पैसा

मी इतके दिवस एकाच गाण्याने झपाटली जात नाही. मात्र सकाळी उठून जे गाणं डोक्यात येतं ते दिवसभर आठवत रहातं.
सेम हियर. माझ्या बाबतीत कधी कधी तर अगदी न आवडणारं गाणं सुद्धा तोंडात येत राहतं.

लेखातील बरीच गाणी आवडीची आहेत, जहां पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं, सुन्या सुन्या.. सलाम-ए-इश्क.. अमिताभ किशोरच्या आवाजात "हां.... बाबत सेम भावना आहेत, ते हां.. अगदीच जीवघेणे. सध्या ह्या गाण्याचे वेड आहे... लता मंगेशकरांच्या आवाजातील गाणे अप्रतिम आहेच, पण मदनमोहन यांनी गायलेले व्हर्जनही सुरेख आहे. माई री मैं कासे कहूं पीर अपने जिया की माई री.. आँखों में चलते फिरते रोज मिले पिया बावरे बैयाँ की छैयाँ आके मिलते नहीं कभी सावरे दु:ख ये मिलनका लेके काह करूं, कहाँ जाऊ री आँखों में चलते फिरते रोज मिले पिया बावरे पाकर भी नहीं उनको मैं पाती, माई री..

In reply to by नीलमोहर

अहो, गीत नाही हे......विरहणीच्या हृदयाची आर्त आहे....आजपर्यंत पूर्ण गीत गाऊ शकलो नाही, चारचौघांत हे गीत ऐकत नाही....खास 'पी की डगर मे बैठे मैला हुआजी मोरा आंचरा....लट मी पडी कैसी बिरहा की माटी' ह्या ओळी जितक्यावेळ ऐकल्या तितक्याचवेळा डोळे ओलावले....

* आपकी आंखो मे कुछ *मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ( गुलजार अप्रतिम आहे *हाय रामा- रंगीला *सायबा- गुजारीश ( हे ऐकताना अगदी गोव्यात गेल्याचा फील येतो ). * घर - पियुष मिश्रा ( एका वेगळ्या टाईप चा गाण आणि गाणारा पण तसाच) नक्की ऐकाव असं * mtv अन्प्ल्गड मधलं पापो चे 'कौन मेरा , आणि रंजिश च वर्जन पण नक्की मोहवणार

In reply to by महासंग्राम

पिय्श मिश्रा एकदा नक्की एकाच त्याच GOW मधलं इक बगल मी चांद होगा गुलाल मधल : आरंभ, शहर हमारा सोता है, ओ री दुनिया भन्नाट कॅटेगरी मध्ये येतात

In reply to by महासंग्राम

ह्या चित्रपटानेच दंश केलाय (लेख लिहावा का?)...आणि सगळच अप्रतिम..स्नेहा खानवलकरचे संगीत एका वेगळ्याच धाटणीचं..अन पियुष मिश्राचे 'हे' गाणे गझब 'हम मौत को सपना बताकर फिर उठ खडे होंगे यही' काय म्हणावे...

// अशा प्रत्येक गाण्यासाठी मी एक-एक खास कुपी मनात तयार करून घेत असतो. या कुपीला कुलुप-किल्ल्या नसतात. उघड्याच असतात या कुप्या. // आणि प्रत्येक कूपीवर "टाईम स्टँप" असतो. कितीही दिवसांनी ते गाणं ऐकलं तरी लगेच त्या काळात मन गेलच पाहिजे. नो फेल्युर्स. श

In reply to by संदीप चित्रे

+१ सगळ्यांच्या काळजातल्या चोराकप्प्यांमधून जपून ठेवलेली गाणी जणू या धाग्याने हळूच बाहेर काढून गरिबांत (माझ्यासारख्या) खुली वाटली आहेत! :) Sandy

धानी चुनरिया हे ही सतत ऐकत रहावेसे वाटणारे.

माणसाचे बाप गाणे.... तेही स्वतःच्या आवाजात बंदीनी एक एक कडवे अगदी आतपर्यंत घुसते. हा मास्टरपीस

हो मन की किताब से तू, मेरा नाम ही मिटा देना गुन तो न था कोई भी, अवगुन मेरे भुला देना मुझको तेरी बिदा का... मुझको तेरी बिदा का मर के भी रहता इंतज़ार

आज दिवसभर पारायण होणार काल विविध्भारतीवर आज के फनकार मध्ये नूतनची गाणी ऐकवली आणि ही खपली निघाली. आज दिवसभर पारायण होणार हे नक्की. विविध भारती भक्त नाखु

रसिक बलमा,वक्त ने किया, आज फिर जीने की तमन्ना है, राही मनवा, फूलो के रंग से, तू कहाँ, लागा चुनरी में दाग(गाणं राव, ते पिक्चर एकदम टुकार होतं)च्यामारि लिस्ट लांबत जाईल. तू कहाँ सुरात गायचा प्रयत्न करतो पण सुरवातीलाच गळ्यात खाज येते

बेवजह - कोक स्टूडियो दीवाना - सोनू निगम अभी मुझमें कही - सोनू धूम पिचक धूम - गायक आठवत नाही एक लड़की को देखा तो - 1942 लव स्टोरी रिमझिम रूणझुण - 1942 लव स्टोरी कैसी है ये रुत - दिल चाहता है कधी तू - मुंबई पुणे मुंबई ( एकमेव बेस्ट ऑफ ह्रुशिकेश रानडे) याड लागलं - सैराट बावरा मन - हजारो ख्वाहिशे ऐसी तू हि रे, रुक्मिणी, एक हो गये हम और तुम - बॉम्बे एक दिन आप यूँ हमको मिल जायेंगे - येस बॉस तू मूनशुदी - राँझना तू तलम अग्नीची पात - मुक्ता

In reply to by भरत्_पलुसकर

तू हि रे, रुक्मिणी, एक हो गये हम और तुम - बॉम्बे
रुक्मिणी रोजामधलं आहे. बाकी बॉम्बे मधलं मला फक्त 'कहना ही क्या' आवडतं.. अप्रतिम.

सध्या माधुरीची दोन गाणी वारंवार युट्युबवर पाहतोय. १०० डेज मधले "सुन बेलिया शुक्रिया मेहरबानी" व खलनायक मधले "पालकी मे होके सवार" माझ्यामते केवळ गाण्यातील नृत्याभिनयाचाच विचार करायचा झाल्यास माधुरी इतका जबराट परफोर्मन्स कुणाचाच नसावा.

In reply to by कानडाऊ योगेशु

माधुरीचं 'परिंदा'मधलं "प्यार के मोड पे, छोडोगे जो बाहे मेरी" हे पण सुरेख गाणं आहे. 'राम लखन'मधलं "बडा दु:ख दिना तेरे लखन ने" हे पण छान आहे. 'त्रिदेव'मधलं "मैं तेरी मोहब्बत में पागल हो जाऊंगा" हे पण ऐकायला फ्रेश वाटतं. कह दो के तुम हो मेरी वरना - तेजाब आज फिर तुम पे प्यार आया हैं - दयावान तेरे प्यार में हम डूब गये इतने सनम - जमाई राजा धक धक करने लगा - बेटा कोयल सी तेरी बोली - बेटा साजन - बहुतेक सगळी गाणी

98 कि 99 ला ग्रहण आलेला. जॅकी श्रॉफ, मनिषा कोरयाला आणि अनुपमा वर्मा. म्युझिक इल्लैया राजा चा मुलगा कार्तिक राजा. मस्त गाणी आहेत. चार पाच दिवस झाले माझया डोसक्यात मंगारु मळळे वाजतंय. जब्बरदस्त सोनू निगम न श्रेया घोषाल.

अशी बाधा होण्याच्या अलिकडच्या यादीत खूप वर नंबर लागतो.. एम टी व्ही अनप्लग्ड मध्ये रहमान ने स्वतः गायलेलं ही मला भयंकर आवडतं आणि वाजत राहतं.. https://www.youtube.com/watch?v=knyJjbGYbSE मोह मोह के धागे अजून एक वेगळं - तू बुद्धी दे, तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे - डॉ प्रकाश बाबा आमटे https://www.youtube.com/watch?v=sMRTNVMad98 मुंगार मळये -- अतिशय अप्रतिम कन्नड गाणं आहे. सोनू ने गायलेलं.. जरूर ऐका.. रिपीट वर ऐकत राहतो.. https://www.youtube.com/watch?v=kVX0EQw9x5U कंदिसा - इंडियन ओशन https://www.youtube.com/watch?v=bKWKDOiHVDw&index=3&list=LL5q0hyG_Ar8xQ… इकतारा फिमेल व्हर्जन - वेक अप सिड जिंदगी ना मिलेगी दोबारा - उडें खुले आसमान में ख्वाबों के परिंदे फूलों के रंग से दिल की कलम से अलिकडे माझ्या मित्राच्या सुंदर सिनेमा मधली ही कव्वाली खूप आवड्ली होती ऐ सनम आँखो को मेरी खूबसुरत साज दे - रंगा पतंगा https://www.youtube.com/watch?v=mgXS8c9ZuYY&list=LL5q0hyG_Ar8xQGF6r8yYl… गुलाम अली साहेबांचं झपाटणं अगदी नेमकं लिहिलं आहे. चुपके चुपके, आवारगी, हंगामा है क्यों बरपा, दिल में एक लहर सी उठ्ठी है अभी .. कॉलेज च्या दिवसात अजून एक वेड होतं - दिवस असे की अक्षरशः कॅसेट घासली होती.. काही वेळा रात्र भर ए साईड, बी साईड दिवस असे की कोणी माझा नाही सरीवर सर कसे सरतील सये एवढंच ना क्षिति़जाच्या पार वेड्या संध्येचे घरटे स्वर टीपेचा आज वेचा मन तळ्यात मळ्यात केवळ वेड लावलं होतं.. अजून एक वेड अल्बम म्हणजे - गारवा गारवा गार वारा हा भरारा पुन्हा पावसाला सांगायचे पाऊस दाटलेला फार अपील व्हायचं.. मुक्ता ची गाणी अशीच : वळण वाटातल्या जाईजुईचा गंध मातीला लक्ष्य सिनेमाची गाणी खूपदा बाधा कॅटेगरी मध्ये यायची कंधो से मिलते है कंधे लक्ष्य तो हर हाल में पाना है.. जसराज जोशी हा माझ्या मित्राचा भाऊ.. त्याने सारेगामा च्या स्पर्धेत गायलेलं पिया हाजी अली असंख्य वेळा ऐकतो.. https://youtu.be/hk-iEuyZrzM?t=105 किती यादी करणार किशोरी ताईंचं उमड घुमड, करीम नाम तेरो, सहेला रे, बोलावा विठ्ठल, अवघा तो शकुन, पंडितजींचा वृंदावनी सारंग - तुम रब तुम साहिब, सूर मल्हार - बादरवां बरसन लागे पं. जसराज - मेरो अल्लाह, अहिर भैरव आणि भैरव, जा जारे अपने मंदिरवा.. अजून काही लिहितो नंतर..