आंबा पुराण - एक जिलबी
तुम्ही आंबा कसा खाता?
आंबा घातलेल्या इतक्या पाक्रु बोर्डावर आल्यात की आता पब्लिक नुसता आंबा कसा खातात असे प्रश्न विचारायला लागली.मन एकदम गावच्या आठवणीत रमले आणि जिलबी पाडायचे ठरवले :)
आंबा हे इतके प्रिय फळ आहे की ते वर्षभर का मिळत नाही, ह्याची नेहमी हुरहुर लागून राहते.त्यात आंब्याच्या इतक्या जाती की बघायला नको. कोकणात आंब्याची नावे पण विचित्र असतात. ती जाती वरून पडलेली नसून त्याच्या चविशी,रंगाशी, आकाराशी निगडीत असतात.
आमच्या गावाला एक धबधब्या आंबा आहे. याचा आकार म्हणजे लहान कलिंगडे वाटावित इतका प्रचंड, कैरी सुद्धा हिरवी नाही तर काळीच, चकचकीत एकदम.हा आंबा पिकला तर काय मजा येईल, चार जणांना एक आंबा पुरेल असे वाटेल, पण तसे नाही, पिकलेले फळ चवीला एकदम बेकार, बेचव काडीची चव नाही. पण लोणचे फक्कड होते ,कैरी अगदी करकरीत. गेल्या दोनशे वर्षांपासून हा धबधब्या आमच्या घरावर सावली धरुन आहे.
दुसरा प्रकार म्हणजे गोटी आंबा,अहमदाबादी बोरे असतात तसे, ढिगाने लगडतात. गावातले लोक हापूस असताना तर ढंकुनही बघत नाहीत. आम्हाला मात्र याचे जाम आकर्षण , चव म्हणजे कहर.एकदम गोड,हलका आंबटपणा आणि वेगळाच स्वाद. डायरेक सालासकट तोंडात टाकायचा, चुपायचा ( खास कोकणी शब्द) आणि रस संपला की टाकून द्यायचा. सहज म्हणुन वीस पंचवीस आंबे सहज पोटात जातात.
अजुन एक प्रकार आमच्या गावाला दिसतो, लांबडा आंबा
थोडासा लांब, टोकावर लालसर खाली हिरवा, हा पिकला तरी हिरवाच किंवा फार फार तर पोपटी होतो. माधुर्य मात्र एक नंबर, पण ही फळे फार दुर्मिळ हे झाड वर्षाआड धरते. त्यामुळे ह्याचे महत्व जास्त. ह्यात रस नसतो, एकदम सुका.साल सोलायची आणि एखादी बर्फी खातो तसा खायचा
अजुन एक विचित्र प्रकार म्हणजे खरचट्या आंबा, याचा तडाखा मला मिळलेला होता. असाच दुपारचा टवाळक्या करत वाडीत फिरत होतो.या झाडापाशी आलो. मस्त लगडलेले झाड दिसले. खाली पण बरेच आंबे पडलेले होते. मस्त खायला सुरुवात केली. नंतर घरी आलो, तोंड धुतले तर गालांची, ओठांची आग आग व्हायला लागली. सहनच होईना, मिरच्या चोळल्यात की काय असे वाटायला लागले.मग घाबरलो, घरातली मंडळी बाजूच्या गावाला काही कार्याला गेलेली होती. आरशात तोंड पाहीले तर बोचकारल्या सारखा जखमा, ओठ फाटुन रक्त यायला लागलेले.कैलास जीवन चोपडुन बसुन राहीलो. घरातले आल्यावर उलगडा झाला, त्या आंब्याचा चिक भयंकर .थोडा वेळ जरी त्वचेवर राहीला तर जखम झालीच म्हणून समजा, त्यावर उपाय म्हणजे खोबरेल तेल. पुढे आठवडाभर तो त्रास सहन करावा लागला.
आता राहीला राजा, हापूस! !!!
तो खायचा म्हणजे परमानंदच,दुपारची वेळ असते,बाहेर टळटळीत उन्ह,एखादा चुकार ढग मध्येच येऊन काळोखी धरुन जातोय.पावसाळा तोंडावर आलेला.दमटपणाचा कहर झालेला असतो.माडीवर किंवा घरातलिच एखादी खोली खास आंब्यांसाठी ठेवलेली असते.गवतात लपलेल्या त्या आंब्याच्या आढिचा अख्ख्या खोलीभर घमघमाट सुटलेला असतो. अंगातले नेहमीचे कपडे काढून ठेवायचे, एखादी फाटकी चड्डी आणि कळकट्ट बनियान घालुन यायचे. हातात पेपरांची रद्दी असणे आवश्यक . खोलीभर पेपर पसरवून ठेवायचे. त्यातल्या त्यात पिकलेल्या आंब्यांचे साॅर्टींग केलेले असतेच त्यातले गरम गरम ,मऊसर फळ हातात घ्यायचे,छानपॆकी उरभरुन त्याचा सुवास घ्यायचा, वरची साल थोडीशी काढून चिक काढून टाकायचा आणि येथेच्छ ताव मारायला सुरुवात करायची. कितीही माणसे असली तरी अशा वेळी शांतता तीच असते, कधीतरी पोटाला तडस लागल्याचे जाणवते, मग डुलडलत बाहेर यायचे , डोणीवर खसाखसा गार पाण्याने अंग धुवायचे आणि छान पॆकी वामकुक्षी घ्यायची.
यावर्षी काही कारणाने गावाला जाणे झाले नाही त्यामुळे या सगळ्या आनंदाला मुकलो, इकडचेच साधे आंबे लायकी नसलेल्या पैशांना विकत घेउन खाताना मन मात्र गावच्या रानमेव्यात अडकलेले असते.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
काही लोकांना बारसं झाल्यावं
बाकी लेख छानच पण त्रोटक.
जिलबी म्हणा :)
बाकी पब्लिक घालेलच भर :)
छान पाकृ. विकांताला करून
छान पाकृ. विकांताला करून
असा सगळा प्रकार
माझी भर
मस्त!
आता बकी बार्न मठ्याच भांड
नेहमीचे
मस्त!
मेक्सिकोत कुठे?