✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कातरवेळ

प
प्रचेतस यांनी
गुरुवार, 05/26/2016 - 22:20  ·  लेख
लेख
कातरवेळ,सूर्यास्तानंतर मिट्ट काळोख होईपर्यंतची ही वेळ, तशी जेमतेम पाऊण एक तासाची. पण ही वेळ कशी जीवघेणी असू शकते ह्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो. एकदा सुधागडला गेलो होतो. गडावर जायचा आजचा जो प्रचलित मार्ग आहे तो आहे पाच्छापुराहून. औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर शहेनशहाशी बगावत करून आला होता ते संभाजीराजांचे साह्य घेण्यासाठी तेव्हा राजांनी त्याच्या सोय गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एका लहानशा वाडीत केली होती. तेव्हापासून अकबराच्या छावणीमुळे ते ओळखलं जाऊ लागलं पाच्छापूर ह्या नावाने. आज ह्या मार्गावर एक भक्कमशी शिडी लावलीय. तेव्हा ती नव्हती. नाडसूरच्या एसटीने उतरलो ते धोडसे गावात. साधारण पाच साडेपाचच्या सुमारास. गडाचा पूर्वीचा राजमार्ग हा धोडसे गावातूनच जातो. गाव कसलं , लहानशी वाडी आहे. वाडीबाहेरचं एक लहानसं मंदिर आहे. रात्रीतून गड सर करायचा टाळून मंदिरातच पथार्‍या टाकायचा विचार केला. जेवायला बराच अवकाश असल्याने मंदिराच्याच ओसरीवर येऊन बसलो. मंदिरासमोरच काही अवशेष आहेत, फार वर्ष झाली असल्याने आता ते नेमके आठवत नाहीत. सूर्यास्त नुकताच होऊन गेला होता. मंदिराच्या डाव्या बाजूने किल्ला तर समोरच घनदाट झाडी. धुकट अंधार पडायला लागला. एक दोघे जण चुलाणासाठी काटक्या गोळा करायला गेले होते. ओसरीवर मी एकटाच. निरव शांतता पसरलेली, अचानक एक रितेपण मनी दाटून आलं. त्या कातरवेळी एकटक समोरच्या काळोख्या दाटीत दिठी लावून बसलो. जसाजसा अंधार गडद होत जावा तसतसा विचारही शुन्यवत होत गेले. पलीकडच्या झाडीतून भेकरांची भूंकणं वर चढायला लागलं. ह्यातच किती वेळ गेला कुणास ठाऊक? इतक्यात सोबतीही परत आले, उत्साहही परत येउ लागला पण कातरवेळेची शांतता काही मनातनं जाईना. दुसरा दिवस होता २६ जानेवारी. चांगलाच आठवतोय. त्या दिवसाची एक कहाणीच आहे. गडावर जायचा रस्ता चुकलो, इतका चुकलो की जवळपास ८ तास त्या बंबाळ्या रानात आम्ही फिरत होतो. एकदा एक डोंगर ओलाडून गेलो तर थेट समोर तैलबैला धडकी भरवत उभा ठाकला, एकदा एक्या मार्गे गेलो तर डोक्यावर थेट सुधागडाचा बोलका कडा, वाट इतकी चुकलो की एकदा गडाच्या राजमार्गाला लागलो अगदी मार्गावर थडी वैगरे होती तरिही वाट सापडेना. पाण्यावाचून अगदी हालहाल झाले. जाऊ दे, नंतर कधीतरी ते. भर उन्हाळ्यात एकदा जीवधनला निघालो. जुन्नरचा हा प्रदेश माझ्या खूप आवडीचा. जवळपास दोनेकशी लेणी, असंख्य किल्ले, प्राचीन घाटवाटा ह्या परिसरात आहेत. जीवधन किल्ला हा त्यातलाच. नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग. घाटवाटेच्या संरक्षणासाठी गडाचा हा पुराण पहारेकरी तटाचं पागोटे लेवून, बुरुजांचे बाजूबंद बांधून, छातीपर्यंत उघडा, काळाकभिन्न असा पदरातल्या हिरवीगार झाडीची तुमान नेसून आणि वानरलिंगीरुपी धारदार भाला हाती घेऊन जवळपास २२०० वर्षांपासून उभाच आहे. आजही तुम्ही जीवधन ह्या बाजूने पाहा. तो तुम्हाला अगदी असाच भासेल. तर तेव्हा मुक्काम केला होता ते घाटघरला. कारण असं संध्याकाळीच तिथे पोचलो होतो. जीवधन रात्रीतून सर करण तसं थोडं फसवं आहे कारण घाटघरची वाट जाते ते ओढ्यातून ती शोधणं रात्रीतून तसं अवघड कारण पायवाट अशी नाही तर दुसरा मार्ग आहे नाणेघाटाच्या बाजूने. पदराच्या दाट झाडीने तो मार्ग जणू गिळलेला आहे. दिवसाही इथनं अचूक वाट सापडणं तसं मुश्किल पण एकदा झाडीतनं ती वाट मिळाली तर पुढे चुकण्याची शक्यता शून्य. गडावरुन उतरताना मात्र ह्या वाटेने अगदी सहजी येता येतं. वाहवत जातो ते म्हणतात ते असं. तर घाटघरला मुक्काम होता. गावाच्या अगदी सुरुवातीलाच ग्रामपंचायतीची एक शाळा आहे. तिथेच मुक्काम करायचं ठरवलं. घाटघर गावात तशी झाडी कमी. शाळेच्या मागेही तसं बरंच मोकळं रान. पथार्‍या टाकून पाय मोकळे करायला जरा बाहेर पडलो. सूर्यास्त होऊन अंधार पडतंच होता. अजनावळे फाट्यावर आलो. घाटघर/अंजनावळे येथे येणारी एसटी इथेच थांबत असते. समोरच्या वर्‍हाड्या डोंगरावर आत्ताआत्तापर्यंत असलेला लालिमा काळोखीत रुपांतरीत होऊ पाहात होता. एक दोन चुकार चांदण्या हळूच उगवू पाहात होत्या. अंजनावळेला जात असलेला रस्ता काळ्याशार सर्पाप्रमाणे वळसे घेत जाताना दिसत होता. हे ही वातावरण विलक्षण शांत. किती वेळ असाच नजर रोखून होतो कुणास ठाऊक. मनात एक खिन्नपण दाटलं होतं. अशा वातावरणात उगाचच एक औदासिन्याची पुसटशी छटा मनावर का चढू लागते समजत नाही. जणू एका स्थिर जलाशयात अवचित काही तरंग पसरावेत तसेच मनात विविध विचारांचे काहूर उठत होते. हे असं का होतं समजत नाही, कधी शून्य विचार असतात तर कधी विचारांच्या लाटांनी मन व्यापून गेलेलं असतं. हा वातावरणाचा परिणाम असेल का? सगळ्याच कातरवेळा अशाच जीवघेण्या असतात असंही नाही. रायगडावर बाजारपेठेच्या पुढे डावीकडे दरी आहे. टकमकीचा खळगा म्हणतात त्याला. म्हणजे गडांतर्गत खोल खळगा, त्याच्याही पुढे तटबंदी व त्याच्या पुढे गडाचे सरळसोट तुटलेले कडे. रायगडाच्या पठाराची सर्व बाजू निवडुंगाचा खळगा, सातविणीचा खळगा, माडाचा खळगा, बारा टाकीचा खळगा, काळखाईच्या खळगा, महादरवाजाचा खळगा आणि हा टकमक व बाजारपेठेच्या दरम्यान खोलवर असलेला टकमकीचा खळगा अशा विविध खळग्यांनी परिपूर्ण आणि निसर्गत:च संरक्षित केलेली आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे बाजारपेठेच्या पुढेच ह्या खळग्याच्या भोवती हलकसं रेलिग लावलंय. बर्‍याच वेळा भवानी टोकावरुन इथे येइस्तोवर आसमंत मावळलेलं असतं. इथे क्षणभर टेकून समोरचे दृश्य बघणं विलक्षण आनंददायक झालेलं असतं. मी इथेच टेकून उभा राहतो. जसंजसं अंधारुन यायला लागतं तसंतसं खाली रायगडवाडीत मिणमिणते दिवे लागायला सुरुवात होत असते. मधूनच घुळघुळते टाळ आणि घणघणत्या घंटा आइकू यायला लागतात. कधी भजनी मंडळाचा सप्ता सुरु झालेला असतो, मधूनच त्यांच्या वाद्यांचे सुर वार्‍यावर हलकेच तरंगत इकडे तिकडे पसरु लागलेले असतात. समोरच्या पहाडांवर चंदेरी प्रकाश हळूहळू झरु लागलेला असतो. आभाळी बघावं तर पश्चिम क्षितिजावर शुक्राची तेजस्वी चांदणी उमलू लागलेली असते. निव्वळ सुख असतं असा अनुभव घेणं म्हणजे. मनातले सर्वच विचार दूर झालेले असतात. हे रितेपण विलक्षण आनंददायी असतं. गडाचं अस्तित्व महाराजांनी भारलेलं आहे. त्या भारीत वातावरणाचा हा परिणाम असेल का? a जीवघेण्या कातरवेळी म्हणता मला सर्वाधिक आठवतात त्या माथेरानच्या कातरवेळा. माथेरानला असंख्य वेळा जाणं झालंय. तिथली गर्द झाडी, लालभडक मातीचे रस्ते, तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून होणारं सह्याद्रीचं आगळंवेगळं दर्शन. प्रेमात आहे मी माथेरानच्या. माथेरानचं एक बरं आहे. वर गाड्यांना मज्जाव आहे. त्यामुळे प्रदुषणमुक्त वातावरण. माथेरानचे विविध पॉइन्ट्स खूप लांब लांब आहेत. त्यामुळे बरीच तंगडतोड करावी लागते. सूर्यास्त पाहून येताना तर अ़क्षरश्: धावतपळत यावे लागते नाहीतर इथल्या काळोखात कुठे हरवून जाऊ अशी भिती असते. इथे अंधार फारच लवकर पडतो. जणू बर्फ उन्हात आणल्यावर वेगाने वितळावा तसा इकडचा प्रकाश वेगाने वितळत जाऊन अंधःकारात विलिन व्हायला आतुर झालेला असतो. ही वेळ मला विलक्षण अस्वस्थ करणारी वाटते. इथे रातकिड्यांचा आवाज भयंकर. अंधार पडला की त्यांची किर्रकिर्र सुरु झालेली असते. मनात पुन्हा पुन्हा ते खिन्नपण दाटून येत असतं. एकदा तर माथेरानच्या भर बाजारपेठेत असताना अशीच एक कातरवेळ झालेली. एकंदर वातावरणातच तसं औदासिन्य दाटून आलेलं. हिंडून फिरुन थकलेले लोक दिसत होते. दुकानदारांचीही लगबग तशी थंडावलेली होती. माझंही मन असंच उदासवाणं होत होतं. एकदा तिथे आमच्या रूमबाहेरच्या सज्जांतल्या खुर्च्यांवर बसून गप्पा मारत बसलेलो. हे असंच मळभ दाटून आलेलं. पावसाचे सुरुवातीचे दिवस होते तेव्हा. उजेड तसाही दिवसभर नव्हताच. अंधारी कुंद वातावरण. हाडं गोठवत जाणारा वारा. मधूनच हलकासा शिडकावा. फारं जीवघेणं वाटतं अशावेळी. अर्थात हा ब्लॉक तात्पुरता असतो. रात्र जसजशी वर चढत जाते तसातसा गेलेला उत्साहही परत यायला लागलेला असतो. मनावर पसरलेलं निराशेचं मळभ हळूहळू दूर होत जाऊन आनंदाची पुटं मनावर परत चढू लागलेली असतात. मग आळसावलेला मी चालू पडतो त्या गर्द अंधारात बुडून जायला. अंधाराची अनुभूती घ्यायला. a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
32393 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

सुंदर.

अप्पा जोगळेकर
Fri, 05/27/2016 - 17:49 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

येस, कातरवेळी खिन्न करून

जव्हेरगंज
Fri, 05/27/2016 - 18:35 नवीन
येस, कातरवेळी खिन्न करून सोडतात. सहमत आहे. मस्त लेख!
  • Log in or register to post comments

येस, कातरवेळी खिन्न करून

जव्हेरगंज
Fri, 05/27/2016 - 18:35 नवीन
येस, कातरवेळी खिन्न करून सोडतात. सहमत आहे. मस्त लेख!
  • Log in or register to post comments

येस, कातरवेळी खिन्न करून

जव्हेरगंज
Fri, 05/27/2016 - 18:35 नवीन
येस, कातरवेळी खिन्न करून सोडतात. सहमत आहे. मस्त लेख!
  • Log in or register to post comments

छान गुढ फोटो

सिरुसेरि
Sat, 05/28/2016 - 08:07 नवीन
छान गुढ फोटो
  • Log in or register to post comments

सर्वांचे धन्यवाद.

प्रचेतस
Sat, 05/28/2016 - 08:33 नवीन
सर्वांचे धन्यवाद. बर्‍याच जणांनी बदललेल्या शैलीबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय पण मला तसं वाटत नाही. पहिल्यासारखंच लिहित होतो तसंच अजूनही लिहित आहे. बदलल्या असतीत तर त्या फक्त घटना. आधीचं लेखन हे बरचसं मूर्तीशास्त्रावर, स्थापत्यशैलीवर आधारित होतं. आता मात्र आठवणींचा प्रवास सुरु झालाय. काही काही घटनांचा मनावर बरेचदा कुठेतरी खोल प्रभाव पडत असतो. बरंच काही साचलेलं असतं. ते बाहेर पडते अशा निमित्ताने. नानवीन ठिकाणांवर लिहित राहीनच पण अधूनमधून असा प्रवासही सुरुच राहिल.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर

चित्रगुप्त
Sat, 05/28/2016 - 09:40 नवीन
अतिशय सुंदर लिखाण. असेच आणखी अनुभव लिहीत रहावे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अगदी चित्रदर्शी वर्णन.कातरवेळ

शिव कन्या
Sat, 05/28/2016 - 11:30 नवीन
अगदी चित्रदर्शी वर्णन.कातरवेळ शब्दांत पकडणे त्या वेळेइतकेच कठिण! पण ते तुम्ही फार समर्थ पणे पेललंय !
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/28/2016 - 12:53 नवीन
कातरवेळी शेवटच्या छायाचित्रातील गर्द झाडीत बसून लिहिलेला लेख वाटावा इतकं सुंदर लेखन. आपण अनेकगदा गड किल्ले पायी तुडविले आहेत त्यातला हा अनुभव केवळ अप्रतिम वाटला. काही काही वाक्य तर खूपच सुंदर. कातरवेळीचा अनुभव खरा तर जीवघेणा असतो, उगाच त्रास होतो, कधी ही वेळ निघून जाईल असं होतं, बाकी, जीवनधनचा अनुभव आणि शेवटचं छायाचित्र केवळ भारीच. वर कोणीतरी प्रतिसादात म्हटलं की अशा वेळी सखी सोबत हवी. बघा काही जमत असेल तर. कोणाचं तरी एक गाणं आठवलं. वल्लीसेठ, लेख खरच खूप आवडला. दोन दिवसापासून विचार करतोय वल्लीच्या धाग्यावर काय प्रतिसाद लिहू आणि तेही कातरवेळी. ''या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी एकटि मी दे अधार छेड हळू हृदय-तार ऐक आर्त ही पुकार सांजवात ये उजळी रजनीची चाहुल ये उचलुनिया अलगद घे पैलतिरी मजला ने पुसट वाट पायदळी शिणले रे, मी अधीर भवती पसरे तिमीर व्याकुळ नयनांत नीर मीलनाची आस खुळी'' (कविता- आठवणीतील गाणी मधून) -दिलीप बिरुटॆ
  • Log in or register to post comments

धन्स सर _/\_

प्रचेतस
Sat, 05/28/2016 - 13:22 नवीन
धन्स सर _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहाहाहा. सर जियो.

अभ्या..
Sat, 05/28/2016 - 14:25 नवीन
अहाहाहाहा. सर जियो. जिंदादिल माणूस ह्यो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख!

पद्मावति
Sat, 05/28/2016 - 14:34 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

सही पकडे है

महासंग्राम
Sat, 05/28/2016 - 15:27 नवीन
एकदम मस्त लिहिलं आहेत वल्ली भौ. गडावर जर गर्दी नसेल तर हा अनुभव हमखास येतो, त्यावेळेस अनुभवता येणारी, ती निशब्द शांतता प्रचंड बेक्कार असते. कोकण कडा, अलंग चा माथा हि काही मोजकी ठिकाण, इथून पाहिलेलं सूर्यास्त कायमच स्मरणात राहिलेत.
  • Log in or register to post comments

तिकोनावर एक दिवस राहिलो होतो

कंजूस
Sat, 05/28/2016 - 16:12 नवीन
तिकोनावर एक दिवस राहिलो होतो ते आठवतंय ( २००४ )गडावरच एकटाच होतो.संध्याकाळी झेंडा लावतात तिथे बसल्यावर पश्चिमेला समोर तुंगचा डोंगर पवना धरणात पाय सोडून बसलेला दिसत होता.हळूहळू सूर्य तुंगच्या मागे जाताना पाण्यात रंग दिसत नाहिसे झाले.तासाभराने प्रचेतसने लिहिल्याप्रमाणे चुकार चांदणी चमकू लागली.चांदण्यांची जत्रा पाहण्यासाठीच इकडे आलेलो पण उंफ. जत्रा भरलीच नाही. इक्स्प्रेस वे चा उजेड सगळ्या आकाशात पसरला तो कमी झालाच नाही. बाकी ते कातरवेळ कधी येऊन गेली ते कळलंच नाही.नेहमीच असं होतं.
  • Log in or register to post comments

वल्ल्या तुज्या आयुक्षात लोव

सूड
Mon, 05/30/2016 - 15:20 नवीन
वल्ल्या तुज्या आयुक्षात लोव नावाचा टाईमपास येयाला पायजेल, ह्योच करेट टाईंब हाये. =))
  • Log in or register to post comments

मस्तच लेख!

बोका-ए-आझम
Mon, 05/30/2016 - 16:21 नवीन
फोटोही सुंदर!
  • Log in or register to post comments

प्रतिसाद थोडा उशिरा देत आहे.

दुर्गविहारी
Mon, 05/30/2016 - 18:19 नवीन
प्रतिसाद थोडा उशिरा देत आहे. वल्लीदा थेट गोनीदाच्या शैलीत लिहीलेला लेख थेट काळजाला भिडला. सह्याद्री हे पहिले प्रेम असल्याने अनेक भटकन्तीमधे पाहिलेले सुर्यास्त तरळून गेले. अनेक गड एकट्याने फिरलोय तेव्हा पाहिलेले एकाकी सुर्यास्त अजुनही चटका लावतात. विशेषतः हरिश्चन्द्रगडावरच्या कोकणकड्यावरून पाहिलेला सुर्यास्त हा खिन्न करून सोडतो ( अनेक जण सहमत होतील ), पारगड, अलन्ग, मदन व आठ तास घाम गाळुन पाहिलेला प्रचितगडावरचा सुर्यास्त हे विशेष लक्शात राहिले. माझ्या भटकन्तीवर मी लिहयला सुरवात करणार आहेच. त्या वेळि अधिक लिहीण. बाकी तुमची रास धनु आहे कि काय? कारण धनु राशीच्या व्यक्तीना सन्ध्याकाळी उदास वाट्ते असे वाचले आणि माझ्याबाबतीत ते खरेही आहे ;)) बाकी लेख प्रचन्ड आवडला हे पुन्हा एकदा सान्गु इच्छीतो.
  • Log in or register to post comments

तुमच्या विविध अनुभवांवर लिखाण

प्रचेतस
Mon, 05/30/2016 - 21:23 नवीन
तुमच्या विविध अनुभवांवर लिखाण अवश्य सुरु करा. बाकी मी सिंहेतला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

सकस लेखन. गोनिदांची आठवण आली.

एस
Mon, 05/30/2016 - 18:56 नवीन
एकदम सविस्तर प्रतिसाद द्यावा म्हणून हा धागा मागे ठेवला होता. पण आता काय लिहिणार होतो ते सर्व विसरून गेलोय. :-( जाऊ द्या. बर्‍याच अशा 'शुभ्र काही जीवघेणे' वाल्या वेळा आठवल्या. नंतर कधीतरी.
  • Log in or register to post comments

:(

वपाडाव
Tue, 05/31/2016 - 10:14 नवीन
पुन्हा एकवार बगल दिलेली आहे... किस्सेही असेच पुन्हा कधीतरी... प्रतिसादही पुन्हा कधीतरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

काय करणार! शब्दांना थिजायला

एस
Wed, 06/01/2016 - 16:00 नवीन
काय करणार! शब्दांना थिजायला वेळ लागत नाही. कधी जिभेवर थिजतात तर कधी कळफलकावर. :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

अगदी खरंय. काहीही सांगता येत

वपाडाव
Wed, 06/01/2016 - 17:56 नवीन
अगदी खरंय. काहीही सांगता येत नाही. जोपर्यंत 'प्रकाशित' होत नाही.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

खूप छान

स्मिता.
Mon, 05/30/2016 - 19:05 नवीन
खूप छान लिहिलंय. अश्या कातरवेळा आपण सगळ्यांनीच केव्हा ना केव्हा अनुभवलेल्या असतात त्यामुळे लेख मनाला भिडला. काय होत असावं या कातरवेळी की तेव्हा एकटे असले की अगदी एकाकी, खिन्न वाटते? काही पार्श्वभूमी नसतांना ती वेळ झाली की मनावर मळभ दाटून येते आणि रात्र झाली की ते मळभ निघून जाते. पण ती अनुभूती मात्र अविस्मरणीय असते. 'कातरवेळ' हे नावही अगदी 'पर्फेक्ट'!
  • Log in or register to post comments

कातरवेळ कधीचं एकटी येत नाही,

गणामास्तर
Tue, 05/31/2016 - 10:19 नवीन
कातरवेळ कधीचं एकटी येत नाही, कसले तरी अनामिक ओझे किंवा भारलेपण घेऊन आल्यासारखी वाटते. कातरवेळेची जाणीव एकांतात जास्त प्रकर्षाने बोचते. अत्यंत नेमक्या शब्दांत ती जाणीव उत्कृष्टरीत्या मांडलीयेस.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहिलंय. गोनीदांची तर

आदूबाळ
Tue, 05/31/2016 - 10:44 नवीन
अप्रतिम लिहिलंय. गोनीदांची तर आठवण झालीच (बंबाळ्या रानात वगैरे) पण थोडी सतीश काळसेकरांच्या शैलीचीही आठवण झाली.
  • Log in or register to post comments

मस्त लेख वल्लीशेठ. ललित उत्तम

मृत्युन्जय
Tue, 05/31/2016 - 11:07 नवीन
मस्त लेख वल्लीशेठ. ललित उत्तम लिहिता तुम्ही :)
  • Log in or register to post comments

तरल, संवेदनशील लेखन...

नीलमोहर
Tue, 05/31/2016 - 11:50 नवीन
'कातरवेळ' या शब्दातच एक हुरहुर आहे, दिवस संपून तिन्हीसांजेची वेळ जवळ येऊ लागली की उगाच एक बेचैनी वाटू लागते, मनाला अस्वस्थ करू लागते. अशा दिवेलागणीच्या वेळेस देवाजवळ दिवा, धूप लावून २ मिनिटे शांत बसलं तरी शांत, प्रसन्न वाटतं. सूर्यास्ताच्या वेळेस हळूहळू धुरकट होत पूर्णपणे दिसेनासे होणारे सूर्यबिंब पाहणेही एक सुंदर सुखावह अनुभव असतो. दिवसभरातील उग्र प्रखरता मागे सोडून, सौम्य केशरी रंगाच्या छटा आकाशात पसरवत नाहीसे होणारे सूर्याचे रूप पाहतांना मनालाही एक स्थिर शांतता लाभत जाते. ही कातरवेळ एकटे असतांनाच छळते असे काही नाही, अगदी माणसांच्या गोळ्यामेळ्यात असतांनाही एकाकी असल्याची भावना सांजवेळेस येऊ शकते. मध्ये गोव्याला जाणे झाले होते, संध्याकाळी बोट क्रूझमध्ये बसलो होतो. समोर ऑर्केस्ट्रा सुरू होता. पारंपारिक गोवन गाणी, त्यावरील नृत्य पहायला छान मजा येत होती. नंतर इतर फिल्मी गाणी सुरू झाली. आजूबाजूला मिट्ट काळोख, मांडवी नदीतून चाललेली बोट, लांब चमकणारे सिटी लाईट्स, त्यातून एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. का कुणास ठाऊक तिथे एवढ्या लोकांत, आवाजातही अचानक ब्लँक झाल्यासारखे वाटायला लागले, आजूबाजूला काय चाललंय, काहीच डोक्यात शिरेनासे झाले, तो गोंधळ अगदीच नकोसा वाटू लागला. एकदाचं हे सगळं संपावं लौकर असे झाले. अर्थात क्रूझ संपेपर्यंत मूड व्यवस्थित जागेवर आला. नंतर भरपूर फिरलो, एन्जॉय केले. तो मधला तेवढाच काळ मात्र उगाच बेचैन करून, हुरहुर लावून गेला. होतं असं बर्‍याचदा. ती वेळच तशी असते.
  • Log in or register to post comments

>>> संध्याकाळी बोट क्रूझमध्ये

रमेश भिडे
Tue, 05/31/2016 - 18:05 नवीन
>>> संध्याकाळी बोट क्रूझमध्ये बसलो होतो. >>> नंतर भरपूर फिरलो असा प्रकार झाला तर... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

>>> संध्याकाळी बोट क्रूझमध्ये

वपाडाव
Wed, 06/01/2016 - 17:58 नवीन
>>> संध्याकाळी बोट क्रूझमध्ये बसलो होतो. >>> नंतर भरपूर फिरलो
हेच्च टंकायला आलेलो, पण इथे शेरलॉकची कमतरता थोडीच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

त्यांना 'आम्ही बसलो होतो,

एस
Wed, 06/01/2016 - 18:11 नवीन
त्यांना 'आम्ही बसलो होतो, फिरलो होतो' असं म्हणायचं असेल. अशा ठिकाणी कुणी एकटं जातं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

वह खरच छान अहो वल्ली साहेब

माझीही शॅम्पेन
Tue, 05/31/2016 - 13:29 नवीन
वह खरच छान अहो वल्ली साहेब काय भन्नाट लिहिता तुम्ही राव तुम्ही , राचाकणे तुम्हाला प्रचतेस म्हणन फारच कठीण वाटताय !!
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रशांत
Wed, 06/01/2016 - 15:50 नवीन
मस्त लिहित रहा
  • Log in or register to post comments

धन्यवाद मालक

अभ्या..
Wed, 06/01/2016 - 18:04 नवीन
धन्यवाद मालक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

तू कशाला धन्यवाद म्हणायलास :)

प्रचेतस
Wed, 06/01/2016 - 18:12 नवीन
तू कशाला धन्यवाद म्हणायलास :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अजि म्या ब्रह्म पाहिले.

अभ्या..
Wed, 06/01/2016 - 18:48 नवीन
अजि म्या ब्रह्म पाहिले. म्हणून ब्रह्माला धन्यवाद दिले. तुझे प्रतिसाद वाढले मग तुझे काय गेले? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हे अशे वाढून काय उपेग

प्रचेतस
Wed, 06/01/2016 - 18:50 नवीन
हे अशे वाढून काय उपेग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आयडी बदलायला विसरलास काय रे

प्रसाद गोडबोले
Wed, 06/01/2016 - 18:32 नवीन
आयडी बदलायला विसरलास काय रे अभ्या ? =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हायला प्यारे. हा आयडी कसकाय

अभ्या..
Wed, 06/01/2016 - 19:05 नवीन
हायला प्यारे. हा आयडी कसकाय मिळाला तुला? हा लई व्हीआयपी आयडी हाये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

लावलो बग वशिला

चांदणे संदीप
Wed, 06/01/2016 - 19:18 नवीन
मालक लै चांगले हायती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सगळ्यांना

नाखु
गुरुवार, 06/02/2016 - 09:18 नवीन
+१ कुणी राहिल्म असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

ही कसली कातरवेळ? ही तर आता

रमेश भिडे
गुरुवार, 06/02/2016 - 16:33 नवीन
ही कसली कातरवेळ? ही तर आता कातरी वेळ? -रमेश कातररे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा