Skip to main content

कातरवेळ

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 26/05/2016 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळ,सूर्यास्तानंतर मिट्ट काळोख होईपर्यंतची ही वेळ, तशी जेमतेम पाऊण एक तासाची. पण ही वेळ कशी जीवघेणी असू शकते ह्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो. एकदा सुधागडला गेलो होतो. गडावर जायचा आजचा जो प्रचलित मार्ग आहे तो आहे पाच्छापुराहून. औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर शहेनशहाशी बगावत करून आला होता ते संभाजीराजांचे साह्य घेण्यासाठी तेव्हा राजांनी त्याच्या सोय गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एका लहानशा वाडीत केली होती. तेव्हापासून अकबराच्या छावणीमुळे ते ओळखलं जाऊ लागलं पाच्छापूर ह्या नावाने. आज ह्या मार्गावर एक भक्कमशी शिडी लावलीय. तेव्हा ती नव्हती. नाडसूरच्या एसटीने उतरलो ते धोडसे गावात. साधारण पाच साडेपाचच्या सुमारास. गडाचा पूर्वीचा राजमार्ग हा धोडसे गावातूनच जातो. गाव कसलं , लहानशी वाडी आहे. वाडीबाहेरचं एक लहानसं मंदिर आहे. रात्रीतून गड सर करायचा टाळून मंदिरातच पथार्‍या टाकायचा विचार केला. जेवायला बराच अवकाश असल्याने मंदिराच्याच ओसरीवर येऊन बसलो. मंदिरासमोरच काही अवशेष आहेत, फार वर्ष झाली असल्याने आता ते नेमके आठवत नाहीत. सूर्यास्त नुकताच होऊन गेला होता. मंदिराच्या डाव्या बाजूने किल्ला तर समोरच घनदाट झाडी. धुकट अंधार पडायला लागला. एक दोघे जण चुलाणासाठी काटक्या गोळा करायला गेले होते. ओसरीवर मी एकटाच. निरव शांतता पसरलेली, अचानक एक रितेपण मनी दाटून आलं. त्या कातरवेळी एकटक समोरच्या काळोख्या दाटीत दिठी लावून बसलो. जसाजसा अंधार गडद होत जावा तसतसा विचारही शुन्यवत होत गेले. पलीकडच्या झाडीतून भेकरांची भूंकणं वर चढायला लागलं. ह्यातच किती वेळ गेला कुणास ठाऊक? इतक्यात सोबतीही परत आले, उत्साहही परत येउ लागला पण कातरवेळेची शांतता काही मनातनं जाईना. दुसरा दिवस होता २६ जानेवारी. चांगलाच आठवतोय. त्या दिवसाची एक कहाणीच आहे. गडावर जायचा रस्ता चुकलो, इतका चुकलो की जवळपास ८ तास त्या बंबाळ्या रानात आम्ही फिरत होतो. एकदा एक डोंगर ओलाडून गेलो तर थेट समोर तैलबैला धडकी भरवत उभा ठाकला, एकदा एक्या मार्गे गेलो तर डोक्यावर थेट सुधागडाचा बोलका कडा, वाट इतकी चुकलो की एकदा गडाच्या राजमार्गाला लागलो अगदी मार्गावर थडी वैगरे होती तरिही वाट सापडेना. पाण्यावाचून अगदी हालहाल झाले. जाऊ दे, नंतर कधीतरी ते. भर उन्हाळ्यात एकदा जीवधनला निघालो. जुन्नरचा हा प्रदेश माझ्या खूप आवडीचा. जवळपास दोनेकशी लेणी, असंख्य किल्ले, प्राचीन घाटवाटा ह्या परिसरात आहेत. जीवधन किल्ला हा त्यातलाच. नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग. घाटवाटेच्या संरक्षणासाठी गडाचा हा पुराण पहारेकरी तटाचं पागोटे लेवून, बुरुजांचे बाजूबंद बांधून, छातीपर्यंत उघडा, काळाकभिन्न असा पदरातल्या हिरवीगार झाडीची तुमान नेसून आणि वानरलिंगीरुपी धारदार भाला हाती घेऊन जवळपास २२०० वर्षांपासून उभाच आहे. आजही तुम्ही जीवधन ह्या बाजूने पाहा. तो तुम्हाला अगदी असाच भासेल. तर तेव्हा मुक्काम केला होता ते घाटघरला. कारण असं संध्याकाळीच तिथे पोचलो होतो. जीवधन रात्रीतून सर करण तसं थोडं फसवं आहे कारण घाटघरची वाट जाते ते ओढ्यातून ती शोधणं रात्रीतून तसं अवघड कारण पायवाट अशी नाही तर दुसरा मार्ग आहे नाणेघाटाच्या बाजूने. पदराच्या दाट झाडीने तो मार्ग जणू गिळलेला आहे. दिवसाही इथनं अचूक वाट सापडणं तसं मुश्किल पण एकदा झाडीतनं ती वाट मिळाली तर पुढे चुकण्याची शक्यता शून्य. गडावरुन उतरताना मात्र ह्या वाटेने अगदी सहजी येता येतं. वाहवत जातो ते म्हणतात ते असं. तर घाटघरला मुक्काम होता. गावाच्या अगदी सुरुवातीलाच ग्रामपंचायतीची एक शाळा आहे. तिथेच मुक्काम करायचं ठरवलं. घाटघर गावात तशी झाडी कमी. शाळेच्या मागेही तसं बरंच मोकळं रान. पथार्‍या टाकून पाय मोकळे करायला जरा बाहेर पडलो. सूर्यास्त होऊन अंधार पडतंच होता. अजनावळे फाट्यावर आलो. घाटघर/अंजनावळे येथे येणारी एसटी इथेच थांबत असते. समोरच्या वर्‍हाड्या डोंगरावर आत्ताआत्तापर्यंत असलेला लालिमा काळोखीत रुपांतरीत होऊ पाहात होता. एक दोन चुकार चांदण्या हळूच उगवू पाहात होत्या. अंजनावळेला जात असलेला रस्ता काळ्याशार सर्पाप्रमाणे वळसे घेत जाताना दिसत होता. हे ही वातावरण विलक्षण शांत. किती वेळ असाच नजर रोखून होतो कुणास ठाऊक. मनात एक खिन्नपण दाटलं होतं. अशा वातावरणात उगाचच एक औदासिन्याची पुसटशी छटा मनावर का चढू लागते समजत नाही. जणू एका स्थिर जलाशयात अवचित काही तरंग पसरावेत तसेच मनात विविध विचारांचे काहूर उठत होते. हे असं का होतं समजत नाही, कधी शून्य विचार असतात तर कधी विचारांच्या लाटांनी मन व्यापून गेलेलं असतं. हा वातावरणाचा परिणाम असेल का? सगळ्याच कातरवेळा अशाच जीवघेण्या असतात असंही नाही. रायगडावर बाजारपेठेच्या पुढे डावीकडे दरी आहे. टकमकीचा खळगा म्हणतात त्याला. म्हणजे गडांतर्गत खोल खळगा, त्याच्याही पुढे तटबंदी व त्याच्या पुढे गडाचे सरळसोट तुटलेले कडे. रायगडाच्या पठाराची सर्व बाजू निवडुंगाचा खळगा, सातविणीचा खळगा, माडाचा खळगा, बारा टाकीचा खळगा, काळखाईच्या खळगा, महादरवाजाचा खळगा आणि हा टकमक व बाजारपेठेच्या दरम्यान खोलवर असलेला टकमकीचा खळगा अशा विविध खळग्यांनी परिपूर्ण आणि निसर्गत:च संरक्षित केलेली आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे बाजारपेठेच्या पुढेच ह्या खळग्याच्या भोवती हलकसं रेलिग लावलंय. बर्‍याच वेळा भवानी टोकावरुन इथे येइस्तोवर आसमंत मावळलेलं असतं. इथे क्षणभर टेकून समोरचे दृश्य बघणं विलक्षण आनंददायक झालेलं असतं. मी इथेच टेकून उभा राहतो. जसंजसं अंधारुन यायला लागतं तसंतसं खाली रायगडवाडीत मिणमिणते दिवे लागायला सुरुवात होत असते. मधूनच घुळघुळते टाळ आणि घणघणत्या घंटा आइकू यायला लागतात. कधी भजनी मंडळाचा सप्ता सुरु झालेला असतो, मधूनच त्यांच्या वाद्यांचे सुर वार्‍यावर हलकेच तरंगत इकडे तिकडे पसरु लागलेले असतात. समोरच्या पहाडांवर चंदेरी प्रकाश हळूहळू झरु लागलेला असतो. आभाळी बघावं तर पश्चिम क्षितिजावर शुक्राची तेजस्वी चांदणी उमलू लागलेली असते. निव्वळ सुख असतं असा अनुभव घेणं म्हणजे. मनातले सर्वच विचार दूर झालेले असतात. हे रितेपण विलक्षण आनंददायी असतं. गडाचं अस्तित्व महाराजांनी भारलेलं आहे. त्या भारीत वातावरणाचा हा परिणाम असेल का? a जीवघेण्या कातरवेळी म्हणता मला सर्वाधिक आठवतात त्या माथेरानच्या कातरवेळा. माथेरानला असंख्य वेळा जाणं झालंय. तिथली गर्द झाडी, लालभडक मातीचे रस्ते, तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून होणारं सह्याद्रीचं आगळंवेगळं दर्शन. प्रेमात आहे मी माथेरानच्या. माथेरानचं एक बरं आहे. वर गाड्यांना मज्जाव आहे. त्यामुळे प्रदुषणमुक्त वातावरण. माथेरानचे विविध पॉइन्ट्स खूप लांब लांब आहेत. त्यामुळे बरीच तंगडतोड करावी लागते. सूर्यास्त पाहून येताना तर अ़क्षरश्: धावतपळत यावे लागते नाहीतर इथल्या काळोखात कुठे हरवून जाऊ अशी भिती असते. इथे अंधार फारच लवकर पडतो. जणू बर्फ उन्हात आणल्यावर वेगाने वितळावा तसा इकडचा प्रकाश वेगाने वितळत जाऊन अंधःकारात विलिन व्हायला आतुर झालेला असतो. ही वेळ मला विलक्षण अस्वस्थ करणारी वाटते. इथे रातकिड्यांचा आवाज भयंकर. अंधार पडला की त्यांची किर्रकिर्र सुरु झालेली असते. मनात पुन्हा पुन्हा ते खिन्नपण दाटून येत असतं. एकदा तर माथेरानच्या भर बाजारपेठेत असताना अशीच एक कातरवेळ झालेली. एकंदर वातावरणातच तसं औदासिन्य दाटून आलेलं. हिंडून फिरुन थकलेले लोक दिसत होते. दुकानदारांचीही लगबग तशी थंडावलेली होती. माझंही मन असंच उदासवाणं होत होतं. एकदा तिथे आमच्या रूमबाहेरच्या सज्जांतल्या खुर्च्यांवर बसून गप्पा मारत बसलेलो. हे असंच मळभ दाटून आलेलं. पावसाचे सुरुवातीचे दिवस होते तेव्हा. उजेड तसाही दिवसभर नव्हताच. अंधारी कुंद वातावरण. हाडं गोठवत जाणारा वारा. मधूनच हलकासा शिडकावा. फारं जीवघेणं वाटतं अशावेळी. अर्थात हा ब्लॉक तात्पुरता असतो. रात्र जसजशी वर चढत जाते तसातसा गेलेला उत्साहही परत यायला लागलेला असतो. मनावर पसरलेलं निराशेचं मळभ हळूहळू दूर होत जाऊन आनंदाची पुटं मनावर परत चढू लागलेली असतात. मग आळसावलेला मी चालू पडतो त्या गर्द अंधारात बुडून जायला. अंधाराची अनुभूती घ्यायला. a
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32552
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

नेमके कसे गिअर बदललेले आहेत कायच कळेना झालंय..

In reply to by स्पा

+1

:(

आह, अप्रतिम लिहिलेय अगदी, बाकी गडी दगडाकडून हिरवाई कडे वळला हेही नसे थोडके. आम्हाला कातरवेळ म्हणजे क्वाटरवेळ.

In reply to by मुक्त विहारि

मङा होउन जाउ द्या गाणे या क्वार्टरवेळी .... पाहिजेस तू जवळी फसफसत ये ग बाई रसरसत घशात जाई असो विदेशी की ग गुळी ....... पाहिजेस तू जवळी मत्त तू गे मस्त मी ही भिनत जा गे शरीरगेही मीच शहाणा दुनिया ही खुळी...... पाहिजेस तू जवळी

मस्त लिहीलंयस. गडांवरच्या कातरवेळा खरच बेचैन करतात. मला दरवेळी विचार येतात मनात की त्यावेळी कशी वर्दळ असेल, मशाली वगैरे लागल्या असतील, दरवाजे बंद करून पहारेकरी जरा निवांतपणे बोलत असतील एकमेकांशी थोडा वेळ...वगैरे वगैरे.

:-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्वतः ला चिमटे काढून काढून बेजार व्हाल.. एल निनो चा प्रभाव संपत असून आता बारीशच बारीश होणार आहे.. !!! बुवा तुम्हाला छाळायचा हा नवा प्रकार आहे ..... दुसरं काय ? परचु काका लेख मस्त .... ती पायवाट लय भारी.....

In reply to by अत्रुप्त आत्मा

लेख पुन्हा वाचला , आणी अजून एक चिमटा काढुन पाहिला. सदर लेखन लिहीणारी व्यक्ति तीच असली , तरी तिच्यात बराच आत्मबदल झालेला आहे.. असे न्रिक्षान् णोंदवतो! (ल्लूल्लूल्लूल्लूल्लू ! http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-002.gif )

In reply to by अत्रुप्त आत्मा

लेख पुन्हा वाचला , आणी अजून एक चिमटा काढुन पाहिला. सदर लेखन लिहीणारी व्यक्ति तीच असली , तरी तिच्यात बराच आत्मबदल झालेला आहे.. असे न्रिक्षान् णोंदवतो! (ल्लूल्लूल्लूल्लूल्लू ! http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-002.gif )

इतक रोमेंटिक लिहिलय... जीव धानी धानी झाला वाचुन...

आवडला लेख. मधेच वाटलं स्पा कडून दीक्षा घेतली का कै... :)

शिका शिका फोटोग्राफरांनो अंधाराचा फोटो घ्यायला."मनावर पसरलेलं निराशेचं मळभ हळूहळू दूर होत जाऊन आनंदाची पुटं मनावर परत चढू लागलेली असतात. मळाची पुटं अंगावर ऐकली आहेत पण आनंदाची पुटं मनावर? शिका शिका मनोविकारतज्ञांनो.

लेख आवडला. संगीता जोशी यांची कविता आठवली. "अशा काजळवेळेला जो तो फक्त ज्याचा त्याचा काठ राहिलेला दूर खोल पाय बुडत्याचा..."

सुरेख लिहिलयं!! अगदी या सकाळी मी कातरवेळ असल्याचा अनुभव घेतला मग बायकोच्या, "अहो, अंघोळ करून घ्या लवकर" ने माझी रोज सकाळची ऑफिसघाई सुरू झाली! ;) कातरवेळ + प्रचेतस = सुरेख ललित! चला, यानिमीत्ताने कुठलीतरी "स्कीम" जाहीर करून टाका! Sandy

लेख आवडला. दोन्ही प्रकाशचित्रे उत्तमच. कातरवेळ ह्या दृष्टीकोनातुन पाहीले कि एक हुरहुर वाटली पण नंतर सूर्योदयापूर्वी काढलेली चित्रे हा विचार करुन पाहीली तर एकदम प्रसन्न वाटले. बाकी वल्लींच्या मनाचा बुलंद दरवाजा हळुहळु उघडायला लागला आहे असे वाटू लागले आहे आता. :) और आने दो!

"वल्लींच्या मनाचा बुलंद दरवाजा हळुहळु उघडायला लागला आहे असे वाटू लागले आहे आता. :)" किल्ल्याला सात दरवाजे आणि खंदक असतात आणि पासवर्ड परवलीचा शब्द " कातरवेळ"?

सकाळी सकाळी मिपा वर आलो आणि इतकं सुंदर वाचायला मिळाल, वाह काय मस्त सुरुवात आहे दिवसाची. प्रचेतस ग्रेट आहात, काय भारी लिहिलंय आणि त्यावर तो पायवाटेचा फोटो आहाहाहाहा……

विश्वास बसेना वल्ल्या हे तू लिहिलेयंस यावर. महाराजांचा राजगड समोरून दिसतो बुलंद, बेलाग, अतिशय बळकट, पण त्यावर भटकताना त्याच्या अंतरंगात खोलवर आत काहीतरी दडलेलं दरवेळेला भासतं. तुझ्या बाबतीत ते मला पहिल्यांदाच भासतंय मित्रा.

फोटो म्हणजे नुसत्या काळ्या खिडक्या दिसताहेत. मॅटर वरून फोटो सुंदर असावेत असे वाटते.

सुंदर लिहिलय.

प्रिय मित्र प्रचेतस, स.न.वि.वि , निव्वळ अप्रतिम लेखन केले आहेस मित्रा ! फक्त कातरवेळाच नव्हे तर ट्रेकर्स चे भटक्यांचे सारेच अनुभव विलक्षण असतात तेही प्रत्येकाच्या मनःस्थितीनुसार बदलणारे. खरं तर प्रत्येक भटक्याने लिहित रहावं असं वाटतं पण सगळ्यांनाच तुमच्या सारखे हे असले शब्द सापडत नाहीत.
धुकट अंधार काळोख्या दाटीत दिठी लावून बसलो. बंबाळ्या रानात हिरवीगार झाडीची तुमान नेसून दोन चुकार चांदण्या प्रकाश वेगाने वितळत जाऊन अंधःकारात विलिन व्हायला आतुर झालेला अंधारी कुंद वातावरण. आनंदाची पुटं मनावर परत चढू लागलेली असतात.
मग असे भटके कुठे तरी मनातच असे अनुभव साठवुन ठेवत रहातात अन कधी कधी गिनिदांची दुर्गभ्रमण गाथा किंवा कोणा एकाची भ्रमणगाथा सारखे काही वाचताना असे सारे अनुभव मनातुन बाहेर पडतात. आज तुझा लेख वाचताना तसेच काहीसे झाले ! कित्येक कातरवेळा , किर्र्र्र्र्र संध्याकाळी अजिंक्यतार्‍याच्या पायर्‍यांवरुन उतरताना अनुभवल्या आहेत , त्या आठवणींनी डोके बाहेर काढले! लिहित रहा मित्रा ! शुभेच्छा! कळावे लोभ असावा आपला विनम्र प्रगो

still not able to type in Marathi, just went through the writeup, a very different from the older writing of the author, a really blessed person mr.prachetas is, having such a love for the forts and the era that has gone by. now about the writeup, had been gone through condition for many times before I got married, and now the emptiness is filled in with many other things like joy and excitement, possessive ness and so... keep writing prachetas..

मस्तच.. बाकी फसलेल्या प्रेमप्रसंगात कातरवेळ खुपदा अंगावर येते.. तुमचे असे काही झालेय का लहानपणी ? किशोरअवस्थेत ?

In reply to by ब़जरबट्टू

किशोरअवस्थेत (फसलेल्या) प्रेमप्रसंगात.
बुवा-बॅट्यानी यावर प्रकाश झोत टाकावा ही विणंती.

In reply to by ब़जरबट्टू

तुमचे असे काही झालेय का लहानपणी ?
जंबोलोल, हत्तीलोल, एरावतलोल. . . इतकी उत्तरे सुचायलीत ना बबट्टू साहेब. उगी वल्ल्याचा हात जोरदार लागतय म्हणून गप्प बसतो.

In reply to by ब़जरबट्टू

आम्हाला अकरावीला मराठीला कातरवेळ नावाची कथा होती. लेखक बहुधा अरविंद गोखले. त्यातल्या नायकाला (किंवा नायिकेला) कातरवेळी आपल्या प्रेमपात्राची आठवण येते.

लेख मस्तच ... सुंदर लिहिले आहे.. कातरवेळ आमच्या खुप आवडीची पण.. खिन्न पणा फक्त तेंव्हाच यायचा जेंव्हा प्रेयसी निघुन जाण्या च्या गोष्टी करायची

सुंदर.

सर्वांचे धन्यवाद. बर्‍याच जणांनी बदललेल्या शैलीबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय पण मला तसं वाटत नाही. पहिल्यासारखंच लिहित होतो तसंच अजूनही लिहित आहे. बदलल्या असतीत तर त्या फक्त घटना. आधीचं लेखन हे बरचसं मूर्तीशास्त्रावर, स्थापत्यशैलीवर आधारित होतं. आता मात्र आठवणींचा प्रवास सुरु झालाय. काही काही घटनांचा मनावर बरेचदा कुठेतरी खोल प्रभाव पडत असतो. बरंच काही साचलेलं असतं. ते बाहेर पडते अशा निमित्ताने. नानवीन ठिकाणांवर लिहित राहीनच पण अधूनमधून असा प्रवासही सुरुच राहिल.

अतिशय सुंदर लिखाण. असेच आणखी अनुभव लिहीत रहावे. शुभेच्छा.

कातरवेळी शेवटच्या छायाचित्रातील गर्द झाडीत बसून लिहिलेला लेख वाटावा इतकं सुंदर लेखन. आपण अनेकगदा गड किल्ले पायी तुडविले आहेत त्यातला हा अनुभव केवळ अप्रतिम वाटला. काही काही वाक्य तर खूपच सुंदर. कातरवेळीचा अनुभव खरा तर जीवघेणा असतो, उगाच त्रास होतो, कधी ही वेळ निघून जाईल असं होतं, बाकी, जीवनधनचा अनुभव आणि शेवटचं छायाचित्र केवळ भारीच. वर कोणीतरी प्रतिसादात म्हटलं की अशा वेळी सखी सोबत हवी. बघा काही जमत असेल तर. कोणाचं तरी एक गाणं आठवलं. वल्लीसेठ, लेख खरच खूप आवडला. दोन दिवसापासून विचार करतोय वल्लीच्या धाग्यावर काय प्रतिसाद लिहू आणि तेही कातरवेळी. ''या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी एकटि मी दे अधार छेड हळू हृदय-तार ऐक आर्त ही पुकार सांजवात ये उजळी रजनीची चाहुल ये उचलुनिया अलगद घे पैलतिरी मजला ने पुसट वाट पायदळी शिणले रे, मी अधीर भवती पसरे तिमीर व्याकुळ नयनांत नीर मीलनाची आस खुळी'' (कविता- आठवणीतील गाणी मधून) -दिलीप बिरुटॆ

एकदम मस्त लिहिलं आहेत वल्ली भौ. गडावर जर गर्दी नसेल तर हा अनुभव हमखास येतो, त्यावेळेस अनुभवता येणारी, ती निशब्द शांतता प्रचंड बेक्कार असते. कोकण कडा, अलंग चा माथा हि काही मोजकी ठिकाण, इथून पाहिलेलं सूर्यास्त कायमच स्मरणात राहिलेत.

तिकोनावर एक दिवस राहिलो होतो ते आठवतंय ( २००४ )गडावरच एकटाच होतो.संध्याकाळी झेंडा लावतात तिथे बसल्यावर पश्चिमेला समोर तुंगचा डोंगर पवना धरणात पाय सोडून बसलेला दिसत होता.हळूहळू सूर्य तुंगच्या मागे जाताना पाण्यात रंग दिसत नाहिसे झाले.तासाभराने प्रचेतसने लिहिल्याप्रमाणे चुकार चांदणी चमकू लागली.चांदण्यांची जत्रा पाहण्यासाठीच इकडे आलेलो पण उंफ. जत्रा भरलीच नाही. इक्स्प्रेस वे चा उजेड सगळ्या आकाशात पसरला तो कमी झालाच नाही. बाकी ते कातरवेळ कधी येऊन गेली ते कळलंच नाही.नेहमीच असं होतं.

प्रतिसाद थोडा उशिरा देत आहे. वल्लीदा थेट गोनीदाच्या शैलीत लिहीलेला लेख थेट काळजाला भिडला. सह्याद्री हे पहिले प्रेम असल्याने अनेक भटकन्तीमधे पाहिलेले सुर्यास्त तरळून गेले. अनेक गड एकट्याने फिरलोय तेव्हा पाहिलेले एकाकी सुर्यास्त अजुनही चटका लावतात. विशेषतः हरिश्चन्द्रगडावरच्या कोकणकड्यावरून पाहिलेला सुर्यास्त हा खिन्न करून सोडतो ( अनेक जण सहमत होतील ), पारगड, अलन्ग, मदन व आठ तास घाम गाळुन पाहिलेला प्रचितगडावरचा सुर्यास्त हे विशेष लक्शात राहिले. माझ्या भटकन्तीवर मी लिहयला सुरवात करणार आहेच. त्या वेळि अधिक लिहीण. बाकी तुमची रास धनु आहे कि काय? कारण धनु राशीच्या व्यक्तीना सन्ध्याकाळी उदास वाट्ते असे वाचले आणि माझ्याबाबतीत ते खरेही आहे ;)) बाकी लेख प्रचन्ड आवडला हे पुन्हा एकदा सान्गु इच्छीतो.

एकदम सविस्तर प्रतिसाद द्यावा म्हणून हा धागा मागे ठेवला होता. पण आता काय लिहिणार होतो ते सर्व विसरून गेलोय. :-( जाऊ द्या. बर्‍याच अशा 'शुभ्र काही जीवघेणे' वाल्या वेळा आठवल्या. नंतर कधीतरी.