Skip to main content

आम्ही मुळ्ळी रागावत नाही!

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 24/05/2016 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
(अत्रन्गि पाउस यांच्या बाल संगोपनातील एक वास्तव या लेखावरून हे पूर्वी लिहिलेलं काही आठवलं. ) काय सांगू तुम्हाला! अशी एकेक विचित्र माणसं असतात ना. परवाचीच गोष्ट. आमच्या ह्यांच्या एका स्नेह्यांकडं गेलो होतो, आमच्या बंटीला घेऊन. बंटी? अहो आमचा सुपुत्र! वय वर्षे साडेतीन. पण इतका हुश्शार म्हणून सांगू, भाssरी चौकस! हं, तर त्यांच्या शोकेसमध्ये इतक्या वस्तू होत्या ना! स्वित्झर्लंडची घंटा, हॉलंडची पवनचक्की, युरोपातल्या काचेचा पेला, काय अन काय! आता लहान मूल म्हटल्यावर जिज्ञासा की काय म्हणतात ते असणारच नाही का? आणि आमच्या बंटीला तर भारीच बाई उत्सुकता! आणि आपणच मुलांच्या या गुणाला प्रोत्साहन द्यायला नको का? कारण अशा जिज्ञासू मुलांमधूनच मोठे मोठे शास्त्रज्ञ जन्माला येतात. कुठच्याही वस्तूला हात लावल्याशिवाय, उचलल्याशिवाय का त्याचा रंग, पोत, वजन ई. ई. चं ज्ञान मिळणाराय? आणि वाजवल्याशिवाय का त्या घंटेचा आवाज कळणारेय? बंटीनं साहजिकच कपाट उघडलं. त्या लेलीण बाईंच थोबाड बघायला हवं होतं. इतकं टेन्शन तिच्या तोंडावर की आम्ही काय बोलतोय तिथं तिचं लक्षच नव्हतं. मी म्हटलं सुद्धा, "साडेतीन वर्षाचं पोर ते, आत्ताच तर शिकायचं वय आहे. आणि नेहमीच तो तोडफोड करतो असं नाही काही." पण तिच्या कपाळावरची आठी हटायचं नाव नाही. मला असा राग आला म्हणून सांगू, मुलांचं एवढं पण कौतुक नाही तर बोलावतात कशाला घरी? आणि समजा, चुकून काही मोडलं, फुटलं तर आभाळ थोडंच कोसळतं? वस्तू पुन्हा आणता येते पण दुखावलेल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद? हे लोक आजकालचे पेपर वगैरे वाचतच नसावेत बहुतेक. वाचन संस्कृतीचा अगदी लोप होत चाललाय तो अस्सा. पण मी मात्र सतत वाचत असते, बाल संगोपनाबाबत तर सारंच. शनिवार रविवारच्या पुरवण्यामध्ये पालकांसाठी कित्ती म्हणून लेख, सदरे( articles हो!) येत असतात. "मुलांशी प्रेमाने वागावे, त्यांना रागावू नये. मुले प्रेमामुळे किंवा लाडामुळे नाही तर शिस्तीमुळे बिघडतात." अहो किती मोलाचे आणि उपयोगी सल्ले असतात एकेक. मी सगळे वाचून एका फाईल मध्ये नीट व्यवस्थित लावून ठेवते. सहा फायल्या भरल्यात आत्तापर्यंत. तर सांगायचं असं की आम्ही मुलांना अज्जिबात म्हणजे अज्जिबात रागवत नाही. गोडच बोलतो. परवाचीच गोष्ट. मी पालकाची भाजी केली होती. बंटीच्या नावडीची. पण काय करणार डॉक्टरांनी सांगितलंय तो स्ट्राँग व्हावा असं वाटत असेल तर हिरव्या भाज्या करत जा म्हणून. बंटी पण लब्बाड असा की त्यानं ताट भिरकावून दिलं. पण मी मुळ्ळी चिडले नाही. मी त्याला दुसरं ताट दिलं, पुन्हा भाजी वाढून. त्यानं पुन्हा फेकलं. पण मीही काही हटले नाही. असं इतक्या वेळा झालं. शेवटी भाजी संपली. पण मी मुळीच चिडले नाही, मी पुन्हा मॉलमध्ये जाऊन पालकाची जुडी घेऊन आले. त्याला पराठे करून दिले आणि शेवटी त्याला पालक खायला घातलाच. नाहीतर आम्ही लहान असताना! बापरे! जे पानात वाढलं जाईल ते खायचंच असा दंडक असायचा. आई म्हणायची, "उद्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी कुठं बाहेर जायची वेळ आली तर प्रत्येकवेळी आवडीचं मिळेलच असं नाही. म्हणून सगळ्याची सवय पाहिजे." हे वाक्य कायमचं ऐकत आलो. मला आठवतं एकदा मी कारल्याची भाजी अशीच रागानं फेकून दिली. (माझ्यावरच गेलाय ना बंटी ?) आणि बाबा जे जाम रागावले म्हणून सांगू, होती त्याच्या दुप्पट भाजी वाढली आणि ती खाल्ल्याशिवाय जेवण मिळणार नाही म्हणून सांगितलं. मी रडले रडले. शेवटी इतकी भूक लागली की चुपचाप भाजी खावी लागली. काय करणार? आता वाटतं, केव्हढा हा दुष्टपणा? मुलांच्या कोवळ्या मनावर किती ओरखडे उठत असतील याचा कधी त्या पिढीनं विचारच केला नाही. त्यावेळी अशी बाल संगोपन, बालमानसशास्त्र यावरची पुस्तकं, लेख वगैरे नव्हते ना. अहो लहान मुलं ती, त्यांना असली अमानुष शिस्त लावायची? आणि आजकाल देश विदेशात सगळीकडं मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट वगैरे असतात. त्यामुळं शिक्षणासाठी वा इतर कशाहीसाठी कुठही जायची वेळ आली तरी काहीही अडणार नाही या पिढीचं. आणि आजकाल या सार्‍या ठिकाणी हेल्थ फूड सुद्धा मिळतं. ह्या शिस्तवाल्या पिढीचं आणखी एक पालुपद म्हणजे वस्तू जपून वापराव्यात. तोडफोड करू नये. पण खेळताना तोडफोड होणारच नाही का? अहो खेळणं आपटल्याशिवाय का त्याचा आवाज, फील कळणाराय? पुस्तकाचं पान चुरगळल्यावर असा काही सुंदर चुरचुर असा आवाज येतो म्हणून सांगू? चुरगळल्याचा वेगळा, फाडल्याचा वेगळा, फुटण्याचा वेगळा (यातही काच, मेटल, प्लास्टिक ई. चे वेगळे वेगळे आवाज असतात.) पेचण्याचा वेगळा, भिंतीवर गिरगटण्याचा वेगळा, फर्निचर जोरजोरात सरकवण्याचा वेगळा. अहो द्रव पदार्थांचे पण वेगवेगळे आवाज असतात, चहा उशीवर सांडण्याचा , पुस्तकावर सांडण्याचा, जमिनीवर सांडण्याचा! अशा या आवाजाच्या विश्वाची दारे त्यांना खुली व्हायला नको का? परवा माझ्या मैत्रिणीकडं गेले तर तिथं तिच्या आजीचं जपून ठेवलेलं पहिलीचं पुस्तक होतं, आता आमच्या नकळत बंटीनं ते टर्र्कन फाडलं. तर माझी मैत्रीण चक्क रागावली त्याच्यावर. बंटी रडायलाच लागला. लहान आहे म्हणून काय झालं? त्याचा असा अपमान मी नाही सहन करणार कधी. मी तिथून सरळ निघूनच आले. मुलांचा आत्मसन्मान आपणच नाही का जपायचा? त्या फाटक आजी म्हणे बंटी येणार म्हणून कळलं की सगळ्या कपाटाना कुलूपं लावून ठेवतात. सगळी चांगली चांगली खेळणी कपाटात आणि वेल्वेटचा बॉल, मोडकी पेनं अशा वस्तू बाहेर ठेवतात. आणि त्या कपाटांच्या किल्ल्या त्यांना कधीच वेळेवर सापडत नाहीत. फोन वगैरे सुद्धा अगदी उंचावर ठेवलेला असतो. मी काय मूर्ख आहे कारण न समजायला? मीही आजकाल त्यांच्याकडे जात नाही. त्या दिवशी ह्यांना बरं नव्हतं तर आम्ही डॉक्टरांकडं गेलो होतो. डॉक्टर ह्यांना तपासत होते आणि बंटीनं त्यांचा लॅपटॉप उचलला. आहे तीन वर्षाचा, पण मोबाइल, लॅपटॉप यात भारी बाई गती त्याला. पण आमचे डॉक्टर इतके चांगले ना, म्हणाले "फार हुशार दिसतो तुमचा बंटी." एवढंच नाही तर बंटीच्या हातून लॅपटॉप पडला तरी काही बोलले नाहीत त्याला. "असू द्या असू द्या" म्हणाले. बस! मी म्हटलं ह्यांना, आता आपण नेहमी याच डॉक्टरांकडं जायचं. पण का कोण जाणं आजकाल त्या डॉक्टरांची appointment मिळेनाशी झालीय. खूप बिझी झालेत ते. असो. काहीतरी पडल्याचा आवाज आला वाटतं. बघते, बंटी काय नवीन शिकलाय ते. पण तुम्हाला पटतात ना माझे विचार?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17379
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

हाहाहा खूप मस्त ! जुनं ते सगळं आणि नवीन ते चूक असं वाटतं का तुम्हाला ? मग मुलांचं मानसशास्त्र, त्यात लक्षात आलेल्या नवीन गोष्टी? मुलांना स्वातंत्र्य हवं पण स्वातंत्र्याचा स्वैराचार मात्र होवू नये.

"चिमखडे बोल" या बाबतचा लेख आठवला.. मुलांचे मानसशास्त्र या बाबत एक पुस्तक आणले आणि नेमके ते लेकानेच आधी वाचला त्यामुळे सिलॅबस मलाच मिळालाय. पुस्तकाबाहेर(च) मुलांना वाचणारा अडाणी नाखु

माझ्या माहितीतल्या अनेsssssssक जणी आठवल्या. आपली पोरं धुडगुस घालत असताना "असं करु नकोस" इतकंही न म्हणणार्‍या आया जाम डोक्यात जातात. वस्तुंची नासधुस करणे एकवेळ ठिक आहे.. पण मारामारी करणार्‍यांचे काय करावे? आजकाल मोठी पोरं एक तर आपल्या पोरांना वाट्टेल तशी उचलुन घ्यायला पहातात (तो ही एक खेळच..) किंवा लहान पोरं जर्रा मनाविरुद्ध झालं तर आपल्या पोराला फाटकन मारतात, मारामारी करायची नाही असं बिंबवलेलं माझं पोरं भोकाड पसरण्या पलीकडे काहीही करत नाही. "तू पण त्याला दोन दणके दे" हे शिकवणार आहे मी आता.. आणि "मुलींना मारायचं नाही" हा नियमही मोडायची वेळ समीप येत आहे..

In reply to by पिलीयन रायडर

काही लहान मुले इतर मुलांना का मारतात आणि काही लहान मुले का मार खाउन घेतात ही न कळण्यापलीकडची गोष्त आहे. अशी मारहाण करणारी जी मुले असतात ती देखील निरागसच असतात आणि बहुतांश केसेस मध्ये त्यांचे आईवडील सुद्धा "कुणाला मारायचे नाही / बोचकारायचे नाही" असेच शिकवत असतात. काही मुले ऐकतात बाकीची ऐकत नाहित. हा मुला मुलांमधला फरक असतो. त्याला कुणीच काही करु शकत नाही. शक्यता आहे की जर तुमचा मुलगा मार खाउन घेत असेल तर तो सहजी दुसर्‍याला दोन दणके देणार नाही. मूलभुत मानसिकता बदलता येत नाही. मारणारी मुलेसुद्धा हळुहळु बदलत जातात. त्यांना २ दणके देणारा एकादा शेरास सव्वाशेर जेव्हा भेटतो तेव्हा ते सुद्धा कुणाला मारणापुर्वी चारदा विचार करतात

In reply to by मृत्युन्जय

स्वतःहुन माझा मुलगा कुणाला मारत नाही. शक्यतो उलटही मारत नाहीच. त्याला कुणी मारलं तर तो मला किंवा जवळपासच्या व्यक्तिला सांगेल. पण ह्याचं वाईटही वाटतं. कुणी ह्याला मारलं आणि जवळ कुणी नसेल तर हा काय करेल? मारणारी मुलंही दुष्टच असतात असं नाही. शेवटी ती सुद्धा मुलंच.. पण अनेकदा आई वडील अजिबातच बोलताना दिसत नाहीत. उलट "आमचा बाळू ना.. फारच खोडकर बाई..!" म्हणुन दात काढतात. अशा वेळी आधी २ फटके ह्यांनाच दिले पाहिजेत असं फार्फार वाटतं! एकदा एका अत्यंत डोक्याला शॉट मुलाने अबीरला जेवताना कचकन मागुन उचललं.. एकदम प्रेशर आल्याने की काय अबीरला तिथेच उलटी झाली. पुढे मला भर समारंभात आधी जेवण बाजुला ठेवून हॉल साफ करावा लागला. पण त्या मुलाची आई शब्दानेही मुलाला बोलली नाही की मला सॉरी अथवा मदत केली नाही. हे असं वागणंच नाही तर कुणाच्याही घरात घुसुन पार बेडरुम पर्यंत जाणे, वस्तुंना हात लावणे, उचकापाचक करणे, लहानांना त्रास देणे असे अनेक उद्योग करत असताना एक अवाक्षरही मुलाला न बोलणार्‍या आया आहेत. ह्याच आया जेव्हा कुणी त्यांना मुलावरुन सुनावतं तेव्हा पुन्हा त्याम्च तोंडही पहात नाहीत, तेव्हा अगदी जवळच्या लोकांची मुले असतील तेव्हा कसे सांगावे हा प्रश्नच असतो. अगदी आजी-आजोबा ओरडले तरी घरात घमासान भांडण होते..तिथे बाहेरच्यांची काय कथा. अशा मुलांपासुन आपले मुल एक तर १०० फुट लांब ठेवणे हा एक पर्याय आहे. पण आपण २४ तास मुलासोबत राहु शकत नसल्याने, मुलालाच २ उलटे फटके मारण्यास शिकवावे की काय असे वाटायला लागले आहे. मुलींबाबत स्पेसिफिकली म्हणले कारण "मुलींना मारु नये" असे मुलाला शिकवले आहे. खरं तर असं मी त्याला मुद्दाम का सांगितलं माहित नाही. पण एकंदरित मुलींशी थोडे वेगळे वागायचे हे त्याला घरातुन सांगितलं गेलं खरं. आता असं झालंय की तो मुलींना मारणार नाही, पण पोरी पोरांसारख्याच फुल्ल मारामार्‍या करत आहेत. अशावेळी आपण मुलाला असं का शिकवायला गेलो हेच मला समजत नाहीये. पुर्वी मुली असायच्या शांत.. मारलं तर रडायच्या वगैरे. तेव्हा लागु पडत असेल हे. ते तसंच आजही सांगितल्या गेलं. पण तसं आता एकंदरित काही फरक राहिलेला नाही. तेव्हा कुणीही तुला मारलं तर तू ही उलट मार हे सांगण्याची वेळ आली आहे.

In reply to by पिलीयन रायडर

आई-बापांना आपण्च चुकीचं/गैर वागतोय हेच माहीत नसत्म किंवा समजून घ्यायचं नसतं त्यांच्या मुलांना ते कुठल्या तोंडाने व्य्वस्थीत वागायला शिकवतील?
  • खायला दिल्यावर अगदी दोन बोटे लावून उष्टावलयासारखे करून बाकी पदार्थ तसेच ठेवणे (पथ्य्/आवडत नसेल तर तशी कल्प्ना कल्पना देऊन अगोदरच पदार्थ काढून ठेवायला न सांगता नंतर आवडत नाही/पथ्य आहे म्हणून तसाच सोडला असे सांगणे)
  • छोट्या मुलाला शेजारी बसवून खायला घालण्याऐवजी, स्वतः घरभर ताटली घेऊन कसरत करणे (आणि हमखास पाणी/पदार्थ सांडणे)
  • पादत्राणांसहीत घरात येणे (आजकाल हे बर्याच ठिकाणी उच्चभ्रूंचे लक्ष्ण झाले आहे)
  • शोकेसमधील नाजुक्/महागडी वस्तू बिनादिक्कत काढून लहान मुलाला देणे (आणि वर काका-काकू काही म्हणणार नाहीत असेही म्हणणे) अश्या वेळेला आपली मुले आपल्याकडे बघतात आणि आप्ण विनाकारण कानकोंडले होतो.
  • मासिके/पुस्तके अस्तावस्त्य करणे
बे"जबाबदार" पालक नाखु बे=२ ताई+दादा

In reply to by नाखु

शाळेत सोडताना आणी घेताना ते दप्तर आइबापानी उचलायची स्टैल कधीपासून सुरु झाली ब्वा? सध्या जड असते कबूल आहे पण साधारण तेवढेच असायचे आमच्या वेळी. मला तर कधी आठवत नाही आम्ही किंवा बरोबरच्या कुणाचे दप्तर आइबापानी उचललेले.

In reply to by अभ्या..

अभ्या २५ वर्षांपुर्वी मी पहिलीत असतानापण काही मित्रांच्या पालकांना असं त्यांच्या बॅग्स आणि वॉटर बॉट्ल्स घेउन शाळेत येणे, मुलाला वर्गात बसवणे , त्याचा होमवर्क नोट करणे वगैरे करताना पाहिलय. असो.

In reply to by प्रीत-मोहर

जिप शाळेत इअतर्वेळी वाण सामानची पिशवी शाळेत नेल्याने तीची नाव शाळा दप्तर म्हणावे असे होते. त्यातल्या त्यात बर्या घरातील पोरा-पोरींकडे विणकाम केल्लेया (स्वास्तीक्+वृंदावन इ) कापडी थैल्या असत आणि त्या घेऊन भाव खाल्ला जात असे. पालक सभा बातच नस्शे (आजोबा घराबाहेरील गप्पा कट्ट्यावर बसल्यावर शाळामास्तरांशी थेट भेट असे). त्यामुळे रोजची वार्ता रओअजच आणि हिषेबही रोजच. ता.क. अता मात्र मुलांची दप्तरे पाहिली की गधेमेहनत म्हणजे काय त्याचा साक्षात्कार होतो हे नक्की. ओझेवाला नाखु

In reply to by प्रीत-मोहर

असेल बाबा, तुम्ही स्वतः उचलतच होता ना दप्तरे. आम्ही पण तशेच. फक्त तुमच्यात तेंव्हा काही पालक्स हुच्च्भ्रु असतील तसे आमचे इथे नव्हते. . बादवे असे महिला सांगत नाहीत म्हणे ना खरे वय? ;) असो.

In reply to by अभ्या..

बादवे असे महिला सांगत नाहीत म्हणे ना खरे वय? ;)
लोल अस अस्तय काय?. मला नाय बा लाज वाटत माझं वय सांगायला. :)

In reply to by नाखु

पादत्राणांसहीत घरात येणे (आजकाल हे बर्याच ठिकाणी उच्चभ्रूंचे लक्ष्ण झाले आहे)
मी फिरंग्यांना घराच्या बाहेर चपला/बूट काढायची सवय लावलेली...ती त्यांनी इतकी पाळली कि कोणत्याही भारतीयाच्या घरात जाताना पादत्राणे घराच्या बाहेर काढू लाग्ले =))

In reply to by नाखु

आमच्या फादरनी लावलेली सवय. घरी पोचल्याबरोबर पादत्राणे काढुन शेल्फात ठेवणे, तद्नंतर थेट बाथरुमात जाउन पायांवर पाणी घेणे (आज्काल चेहरा अन हातसुद्धा), कपडे बदलुन घेणे अन मग घरभर फिरणे.

In reply to by वपाडाव

उत्तम सवय...माझ्या आईने सुद्धा हीच सवय आयुष्यभर जपली आणि आम्हालापण ती लागली...

In reply to by नाखु

शोकेसमधील नाजुक्/महागडी वस्तू बिनादिक्कत काढून लहान मुलाला देणे...
या बाबतीत मी फार काटेकोर आहे. टि.व्ही., लॅपटॉप, म्युझीक सिस्टम वगैरे बाबतीत मी फार काळजी घेतो. कुणाचंही पोर असो, अगदी स्पष्ट सांगतो कि अमुक ठिकाणी हात लाऊ नका, खेळु नका. मग त्यांच्या आई-वडिलांना काहिही वाटु दे. पण सोफा, गादी वगैरे ठिकाणी मीच जास्त धुडगुस घालतो मुलांसोबत. त्यामुळे मुलं ऐकतात माझं :)

In reply to by पिलीयन रायडर

मी प्राथमिक शाळेत असताना मला वर्गातला एक मुलगा कधी कधी मारायचा. एक दिवस मी माझ्या बाबांना सांगितलं. त्यांनी आधी खात्री करून घेतली कि खोड्या मी करत नाही, मग म्हणाले आज मला सांगितलेस परत सांगायचे नाही परस्पर त्याला दणके द्यायचे. माझी शंका शिक्षिका मला रागवतील कदाचित मारतील. बाबा म्हणाले चूक तुझी नाही ना मग शाळेत काय असेल तर मी बघेन. बस मला तेवढंच हवं होत. दुसऱ्या दिवशी मी त्या मुलांनी काही करायची वाट सुद्धा बघितली नाही सरळ त्याला धुवून काढला. परत मला अश्या प्रकारचा त्रास कुणीही दिला नाही आणि महत्त्वाचे म्हणजे स्वत:ची लढाई स्वताः करायची हा धडा मिळाला. मला वाटते कि मुलांना एवढेच सांगावे कि 'जो पर्यंत तू काड्या करत नाहीस, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे )' आणि काड्या तू केल्यास तर माझ्यासारखा वाईट कोण नाही.

मस्त! असलं एक कार्ट चिखलाचे पाय घेऊन आमच्या गाडीच्या सीटवर नाचलं होतं आणि ते साफ करताना नाकी नऊ आले होते त्याची आठवण झाली. काही मुले जन्मजात गरीब असतात तर काही दांडगी. त्यांना आपण काही करू शकत नाही. माझ्या ओळखीच्या एका मुलाने ५/६ वर्षांचा असताना दुसऱ्याचा कान कात्रीने कापला होता. आता मोठा झाल्यावर तो इतका शांत आणि समंजस झाला आहे की कोणाला सांगून खरे वाटणार नाही. माझा मुलगा पहिल्यापासून आतापर्यंत शांतच. शाळेत एक मुलगी त्याला जाम त्रास द्यायची. पेन्सिल मोडणे, पुस्तक फाडणे वगैरे करून आपणच रडायला सुरुवात करायची आणि मग याला नेहमी मार बसायचा. पण तिने खोडी काढली तर तक्रार कर किंवा तिला एक फटका दे हे त्याने कधीही ऐकले नाही. याला आपला काहीच इलाज नाही असं माझं आता मत आहे.

भारी लिहिलंय =)) माझ्याकडे अशा पोतंभर केसेस आहेत सांगायला. नमुना म्हणून या दोन चार - १. बारावीतला पोरगा लेटेस्ट गेम खेळण्यासाठी महागडा मोबाईल मागतो नाहीतर जेवणार नाही सांगतो. 'जागरुकता' अचानक जागी झालेले पालक काऊन्सेलर कडे येतात. तिथे मुलगा कानात गाणी ऐकत मख्खं चेहर्‍याने बसतो. आणि बाबा 'हा कालपासून जेवला नाही हो..' म्हणत आवंढे गिळत रडतात !!!! २. एका कार्यक्रमात एक ७ वर्षाचा हीरो चालू असलेला टेबलफॅन (मोठा स्टँड वाला) घेऊन नाचत होता. एक काकू त्याला रागावली तर हीरोमाता त्या काकूला खूप अपमानास्पद बोलली. वर 'तो आणि त्याचं नशीब ! तुम्ही लक्ष घालू नका' हा सल्ला ! ३.एका शेतकर्‍याच्या घरगुती खानावळीत ट्रेक कम पिक्निक साठी आलेला ग्रुप थांबतो. शेतकर्‍याने गोळा करून ठेवलेली ओली हळद मुलं खेळायला घेतात. एक काका रागवायला जातो तर एक आई ऐकवते - जाऊ दे रे..आपण एंजॉय करतोय तर मुलांनाही करू दे. आपण त्या शेतकर्‍याला २५ रु जास्त देऊ. हे ऐकून मुलं हळद अंगणभर उधळत सुटतात आणि त्यांचे आईबाप भरली वांगी किती चविष्ट त शिरतात. ४.३ वर्षाची मुलगी काही खातच नाही म्हणे. म्हणून मग कुरकुरे दिले जातात. मग मुलगी ४ वर्षाची होइस्तोवर दुसरं काहीही खात नाही. अनेक आजार आणि भयंकर चिडचिड घेऊन पोरगी मोठी होत राहते. अजून सांगते नंतर..

In reply to by प्राची अश्विनी

कुरकुरे सिन्ड्रोम नेशनवाईड दिसतोय. पोरे आईबापाचे मोबाईल घेऊन गेम्स खेळत तर असतात नाहीतर कुरकुरेच्या पाकीटात हात खुपसून असतात. अगदी जंबो पॅकेट घेतलेले पण असतात. त्यात काही अ‍ॅडिक्टीव्ह हाय का हुडका राव. ;)

In reply to by मितान

अनेक आजार आणि भयंकर चिडचिड घेऊन पोरगी मोठी होत राहते हे माझ्या मुलाला वाचायला देते. ज्या आया कुरकुरे देतात त्या ग्रेट आहेत म्हणतो. आणि त्याच्या म्हणण्याला मी भाव देत नाही म्हणून कुरकुर करतो. आणि बारावीतलं पोरगं आहे त्याला आईबापांनी सांगायचं की जेवू नकोस. बघू किती दिवस उपाशी राहतोय! मी एकदा असलं काहीतरी म्हटल्यावर आईने असं सांगितलं होतं. निमूट जेवायला आले दोन तासांनी!

In reply to by मितान

माझ्या मित्राचे चष्मे बनवून देण्याचे दुकान आहे..मी बऱ्याच वेळा तिथे जात असतो..तिथे बाहेर गप्पा मारत असताना समोरच्या सँडविच वाल्याच्या गाडीवर एक मुलगी वारंवार नजरेला पडे...7 वि किंवा 8 वित असावी... मी जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा तेव्हा ती बरोबर तिथे यायचीच...मी साधारणतः 8.30 नंतर जात असे..म्हणजे मित्राचेे काम आवरून झालेले असे..गप्पा मारायला त्याला वेळ मिळे असो...तर त्या मुलीची चौकशी केली असता समजले कि त्या मुलीच्या वडिलांचा कसला तरी व्यवसाय आहे 8 ते 9 हजार मिळतात महिन्याला तर ती मूलगी रोज एक सँडविच खाल्ल्याशिवाय जेवत नसे...रोज एक सँडविच??? एकदा तिच्या बापाने नाही म्हटले तर तिने बराच गोंधळ घातला होता म्हणे..तेव्हा पासून तिचा बाप गेली 2 वर्षे तिला रोज 1 सँडविच खायला देतोच तरच ती जेवते... मी जर असे काही म्हणालो असतो ना माझ्या बापाला तर त्या सँडविच च्या गाडीखालीच तुडवून मारला असता आमच्या बापाने मला..चार दिवस जेवण दिले नसते ती गोष्ट वेगळीच...

मनाला भिडला लेख ;) माझ्या क्लिनिकला पण असले बंटी येत असतात.ट्रीटमेंट आईबापाची.मूलाला बागेत आणल्यासारखे सोबत आणतात.मुलाचे बुट न काढता कार्टं आत आणतात.त्याच्या हातात कुरकुरे किंवा तत्सम पदार्थ.ते सांडत रुमभर हिंडतं.ट्रीटमेंट सुरु असताना आईचा पाय जोरात हलवतं.बाप ध्यानस्थ योग्यासारखा मोबाईलवर गेम खेळत असतो.मूल अधिक धीट होऊन थेट आमच्या खुर्चीपाशी.आमच्या मशिन्सच्या कंट्रोल ला हात लावायला पाय उंच करतंय. माझं सर्व लक्ष आता हे काय करतंय.दुसर्याचं मूल आपण ओरडणार किती.आई अगदी मेंगळट आवाजात बंटी जा बाबांकडे, मॅडम इंजेक्शन देतील.बंटी ढुंकुन बघत नाही ना बाप.एखादा बंटी माझ्या टेबलकडे मोर्चा वळवतो.त्यावरच्या माॅडेलला हात लाव वगैरे सुरु.स्थितप्रज्ञ बाप ढिम्म हलत नाही.शेवटी माझी मदतनीस वसकन ओरडते.मग बाप चपापून पोरगं बाहेर नेतो.हा एपिसोड रोज कोणीतरी करतंच इतका सवयीचा झालाय :(

In reply to by अजया

एक आयडियाची कल्पना आहे. बघ जमतय का. त्या आईला उग्गीच कळवळून किंचाळायला लावायचं. मग मूल दुखण्याला घाबरून लांब राहील. आई आधीच बेजार असेल तर मात्र हे नाटक अवघड आहे.

मी कधीही मुलांवर हात उगारला नाही. पण लहान पणा पासूनच ताटात वाढलेलं खायची सवय लावली. सुरवातीला तास लागला तरी चिंता नाही. ४-५ वर्षाचा होत पर्यंत मुलांना कळून गेले ताटात वाढलेले पदार्थ पूर्ण संपवायचे असतात. माझी मुले आता मोठी झाली पण दुधी, लाल भोपळा, भोपळा इत्यादी मुलांना नावडत्या भाज्याही आनंदाने खात होते. स्वाभिमान आणि जिद यातला फरक समजला पाहिजे. ३-५ वर्ष असे वय असताना मुलांना दुसर्यांच्या घरी गेल्यावर कशाला हात लावायचा आणि कशाला नाही हे त्यांच्या मनावर बिम्न्विणे घरातच मुलाना मोठ्यांच्या वस्तूना हात न लावायची सवय लावावी लागते. मग ते बाहेर हात लावणार नाही. त्या करता थोडा वेळ द्यावा लागतो. असेच सुरु राहिले तर काही दिवसांनी बंटी तुमचे सुद्धा ऐकणार नाही.

In reply to by विवेकपटाईत

मुलाना मोठ्यांच्या वस्तूना हात न लावायची सवय लावावी लागते
आणि लहानांच्या वस्तूला हात लावताना मोठयांनाही तोच नियम लागू करावा लागतो. हीच गोष्ट ताटात वाढलेलं सगळं संपवण्याच्या बाबतीतही खरी आहे. मला असं वाटतं की लहानांना "तुम्ही लहान आहात म्हणून अमुक एक गोष्ट करा/करू नका" हे कारण फारसं पटत नसावं. ती गोष्ट सगळ्यांसाठीच योग्य आहे म्हणून करावी/करू नये हे पटतं बहुतेक वेळा

मस्तै, बंटीचे किस्से वाचून भाच्याची आठवण आली, तोही काही ना काही करामती करत असतो, अलिकडेच त्याने दोन खेकड्याची पिल्ले आणली होती व झाडाच्या मोकळ्या कुंडीत चिखल करुन त्यात ठेवली होती! का तर म्हणे खेकडे चिखलावरच जगतात! :(

या बाबतीत माझी अत्यंत द्विधा मनस्थिती होते. बाकीच्या मुलांच्या तुलनेत माझा मुलगा खूप ऐकतो.. पण दरवेळी कुठेही मिसळायला गेला की घरी आल्यावर अतिशय पश्चात्ताप होतो की आपल्या मुलाला शिस्त आहे. प्रत्येक भिशीला एक तरी खेळणं बाकीच्या मुलांनी मोडलेलं असतंच.. वाढदिवसाला बोलवलं यालाच खोड्या काढून चिडवायचं.. हा कुठे गेला की आमचं ऐकतो म्हणून कोणाला त्रास देत नाही.. पण आई तू त्यांना काहीच बोलत नाहीस हा आरोप दिवसेंदिवस वाढतोय. म्हणून असं वाटतं की खरंच आपलं चुकतंय का.. कारण ज्या शिस्तीत आणि नियमांत आपण वाढलो त्याप्रमाणे मुलं वाढवायची तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहतोय असं कायम वाटत राहतं.

या बाबतीत माझी अत्यंत द्विधा मनस्थिती होते. बाकीच्या मुलांच्या तुलनेत माझा मुलगा खूप ऐकतो.. पण दरवेळी कुठेही मिसळायला गेला की घरी आल्यावर अतिशय पश्चात्ताप होतो की आपल्या मुलाला शिस्त आहे. प्रत्येक भिशीला एक तरी खेळणं बाकीच्या मुलांनी मोडलेलं असतंच.. वाढदिवसाला बोलवलं यालाच खोड्या काढून चिडवायचं.. हा कुठे गेला की आमचं ऐकतो म्हणून कोणाला त्रास देत नाही.. पण आई तू त्यांना काहीच बोलत नाहीस हा आरोप दिवसेंदिवस वाढतोय. म्हणून असं वाटतं की खरंच आपलं चुकतंय का.. कारण ज्या शिस्तीत आणि नियमांत आपण वाढलो त्याप्रमाणे मुलं वाढवायची तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहतोय असं कायम वाटत राहतं.

:-)

मला माझ्या मुलाला (वय ६)स्वार्थी बनवायचंय. तो ल ई च परोपकारी आहे. बाहेर एकदम शहाण्यासारखा वागतो आणि घरात मस्ती करतो. मित्रांच्या खेळण्यांना हात लावत नाही पण स्वतःची खेळणी त्यांना देतो. काय करावे?

मुलांना असे मोकाट सोडणारे आणि त्यांच्या उद्धट वर्तनाचे समर्थन करणारे पालक हे काहीशी अपराधी भावना बाळगून असावेत असा माझा अंदाज आहे. द्व्युत्पन्न गटातील (परिणामी मुलांना वेळ व लक्ष न देऊ शकणारे), आण्विक कुटुंब वाढवणारे किंवा अत्युच्चभ्रू-स्वप्नरंजक (Wannabe highbrow) वर्गातील पालक यात मोडतात. मुलांचे वाट्टेल ते भलते दुराग्रह आपण चुटकीसरशी (मग ते दुसऱ्याच्या पदराला खार लावूनही का असेना!) पुरवले की आपण पालकत्व-गुणवत्ता(!) यादीत वर चढू असा त्यांचा समज असतो. घरात विवेकी आजी आजोबा असले तर मात्र अशा परिस्थितीतही मुलांवर योग्य संस्कार होतात असे दिसून येते.

In reply to by चलत मुसाफिर

सुलभ मराठी मध्ये या प्रतिसादाचे भाषांतर करुन मिळावे ही नम्र विनंती. बाकी काही नवश्रीमंत पालक आपल्या पालकांना पाल्या सारखं वागवत असल्याने त्या नवपालकांच्या पाल्यांना आपल्या पालकांनी आपल्याच पाल्यावर केलेले संस्कार खचित च आवडत नाहीत.

In reply to by रमेश भिडे

मराठी वाचन आणि वचन दोन्ही कमी झालेले असल्यामुळे सुलभ मराठी शब्द शोधणे हल्ली तितकेसे सुलभ राहिलेले नाही. पण भावनाताई सुखरूप पोचल्या! :-)

In reply to by चलत मुसाफिर

आजी आजोबा विवेकी नसतील तर ? मुलाची आई (आजी आजोबांची सुन ) जे सांगेल, त्याच्या उलट वागायला/ बोलायला प्रोत्साहन्/उत्तेजन देणारे आजी आजोबा पण असतात. त्यामुळे परिस्थिती अजून बिघडते.

असल्या पालकांचे आणि कार्ट्यांचे "बंट्य" रीतसर मोडूनच काढायला लागते. सामोपचार, दुर्लक्ष वगैरे उपायांना दाद देणारी ही प्रजाती नव्हे!! :) (बंट्यनिर्दालक)रंगा

घरी करु दे की मस्ती..ती त्याची हक्काची जागा आहे. माझा पण 6 च वर्षाचा आहे. फक्त माझ्यापुढे हट्ट करतो. परोपकारी आहे,खेळकर आहे, माझा प्रश्न आहे की आपण आपल्या मुलांना योग्य रितीने वाढवतोय (शिस्तीत आणि नियमात). मला त्याचा चांगला परिणामही दिसतोय. पण बाकीच्या मुलांच्या आक्रमकतेचा सामना करायला कसं शिकवायचं. मला त्याला वाईट काही शिकवायचं नाहीये.. पण इतकं अति झालंय की उलट मारल्याशिवाय घरी यायचं नाही असं सांगायची वेळ आलीय. बर हे त्यांचं वयही नाही की त्यांना चांगलं वाईट यातला फरक कळावा. आपण मार म्हणून सांगायचं आणि मारत सुटला तर काय करायचं. बर अनुकरण करण्याबद्दल तर काय बोलायचं. त्यामुळं मार असं सांगायची पण भिती वाटते.

बंटीच्या आधी बंटीच्या आईलाच "सुधरोमायसिन" गोळीची गरज आहे! ;) Sandy

मी माझ्या मुलांच्या बाबतीत साम दाम दंड भेद आचरणात आणतो... पण आमच्या लहानपणी भेद सर्वात आधी यायचा... बर्‍याच वेळेला पाठीत धपाट्याने जाग यायची :(

मला आजकाल माझ्या आई बाबांच लईच कौतुक वाटायला लागलय.. अति मारहाण वगैरे केली नाही.. गरज पडली तेव्हा धपाटे घातले पण वडीलांना पाहुन चळाचळा कापु असली भीती वगैरे घातली नाही. पण आम्ही फायनल प्रॉडक्ट म्हणुन बरे निघालोय. अगदी सद्वर्तनी आणि सुशीलच असं नाही पण अ‍ॅव्हरेज चांगुलपणा आणि शिस्त असलेले आहोत..