सुधागड - एक 'नाईट ट्रेक'
टीप : खालील लेख हे एक स्वानुभव कथन आहे. यात कुठलीही कल्पनारम्यता नाही.
सर्वसाधारणपणे रात्रीच्या चांदण्यात गड चढून पार करणे ही night ट्रेक ची व्याख्या. आजवरच्या मी केलेल्या इतक्या ट्रेक्स पैकी फक्त २ च वेळा हा असा योग माझ्या वाट्याला आला. पहिला म्हणजे २००४ साली केलेला माहुली आणि त्यानंतर दहा-साडेदहा वर्षांनी केलेला हा सुधागड. पण या ट्रेक ला नाईट ट्रेक म्हणण्यासाठी हे एकच कारण पुरेसं नव्हतं. जितक्या ठळक घटना या ट्रेक मध्ये घडल्या होत्या त्या सर्वांची साक्षीदार होती ती म्हणजे 'रात्र'! आणि म्हणून त्याही अर्थाने घडलेला हा एक नाईट ट्रेक.
आता सगळे ट्रेक्स हे whats app वरच ठरायला लागलेत. त्यातलाच हा ही एक. 'हो….येस" अशी हजेरी देत देत दिनांक ७ नोव्हेंबर २०१४ ला १६ जण सुधागड ला यायला तयार झाले. पुण्याहून विलास जोशी सर, तनुश्री आणि संकेत पटले हे तिघे येणार होते. तर कल्याण हून माझ्याबरोबर अमित वझे, विनीत, कार्तिक, हृषीकेश (बिट्टू), कुणाल ही मुलं, तर किरण, खुशबू, नेहा, मयुरा आणि विभावरी अश्या मुली येत होत्या. निघायच्या काही तास आधी गुफीने (योगेश) "हो… येस" म्हंटलं होतं आणि गाडी च्या वेळेच्या काही मिनिट आधी कार्तिक चा मित्र 'सोहेल काझी' यायला तयार झाला होता. सर्व जण ऑफिस करून येत होते ७ ची कर्जत लोकल कल्याण हून पकडली. कर्जत वरून पुढची खोपोली लोकल पकडली आणि साडे नऊ च्या सुमारास सर आणि तनूला खोपोली स्टेशन वर आम्ही येउन भेटलो. आम्हाला पाच्छापूर ला घेऊन जाणारी school van आमची वाट बघत उभी होती. पण संकेत अजून यायचा होता. म्हणून खोपोली platform वरच mats टाकल्या आणि जेवायला बसलो. पोटभर जेवण केलं आणि बडीशोप खाऊन पुन्हा गाडीकडे आलो. त्या school van चा आकार बघता आम्हा सोळा जणांसाठी आणि आमच्या सामानासाठी तेवढ्याच एका दुसऱ्या गाडीची गरज वाटत होती. पण इतक्या रात्री दुसरी गाडी उपलब्ध होणं शक्य नव्हतं. ९ प्रवासी क्षमता असलेल्या त्या गाडीत तो ड्रायव्हर १२ विद्यार्थी बसवतो. पण आम्हा १६ जणांना सामानासकट त्या गाडीत कसं adjust करायचं याचं उत्तर त्याच्याकडेही नव्हतं. पण दुसरा पर्याय नव्हता. शेवटी प्रत्येकाच्या मांडीवर एकेक जण बसवायचं असं ठरवून आम्ही 'कसेबसे' त्या गाडीत बसलो. सर आणि कुणाल ड्रायव्हर च्या शेजारी बसले होते. तिथेच पुढच्या फाट्यावर संकेत येउन बसला. बिट्टू मागे सगळ्या सामानासाकट एकटा बसला होता आणि मधल्या ६ जणांच्या जागेत आम्ही तब्बल १२ जण बसलो होतो. प्रत्येकाच्या मांडीवर कोणी न कोणी तरी बसलं होतं. फक्त सोहेल रिकामा बसला होता. मी तर त्या सर्वांच्या मांड्यांवर शेषशायी विष्णूसारखा आडवा झोपलो होतो. अश्या 'दिव्य' परिस्थितीत आमचा सर्वांचा 'खोपोली ते पाच्छापूर' हा ऐतिहासिक प्रवास सुरु झाला. कोणाचे पाय कुठे आणि कोण कोणाच्या पायावर याचा कही अंदाज लागत नव्हता. माझे पाय सोहेल च्या छातीपासून गाडीच्या खिडकी पर्यंत जात होते. मी मध्येच आडवा होतो तो बसण्याचा प्रयत्न केला. बसण्याच्या बऱ्याचशा पोझिशन्स ट्राय करून बघितल्या. सर्वांचा यथेच्छ आक्रोश चालला होता. मध्येच हशा, आरडा-ओरडा, काही मोठ्याने तर काही दबक्या आवाजात शिव्या, काही जोक्स, काही मध्येच फोटोज असा प्रचंड धुडगूस चालू होता. त्याही परिस्थितीत आम्ही तो प्रवास एन्जॉय करत होतो. बऱ्याच वेळाने पाली आलं आणि आम्हाला ज्या घरातून रॉकेल मिळणार होतं या घरासमोर येउन आमची गाडी थांबली. पाच मिनिटांसाठी आम्ही सर्वजण गाडीतून उतरलो आणि कल्याण हून रॉकेल न आणणाऱ्या नेहाचे सर्वांनी आभार मानले. आता बसायची व्यवस्था जरा बदलली. बिट्टू च्या जागी मागे मी आणि विनीत जाऊन बसलो व बिट्टू ला कार्तिक च्या मांडीवर बसवलं. त्या दोघांवर जोक्स करता करता पाच्छापूर ला येउन पोहोचलो आणि गाडीतून खाली उतरलो. रात्रीच्या वेळेत केलेल्या या अविस्मरणीय व मजेशीर प्रवासाची सांगता झाली होती.
आयुष्यात प्रथमच रात्री १ वाजता घराबाहेर इतका फ्री राहता येतंय या जाणीवेने आमच्या सगळ्या मुली खूष होत्या. तो आनंद त्यांनी तिथल्या रस्त्यावर आडवं पडून साजरा केला. पाच-दहा मिनिटं आराम झाला आणि वाटाड्या आल्यावर साधारण दीड च्या सुमारास आम्ही सुधागड चढायला सुरुवात केली. कालच त्रिपुरी पौर्णिमा होऊन गेल्याने अतिशय सुंदर असं चांदणं पडलं होतं. torch शिवाय सुद्धा रस्ता साफ दिसत होता. वर किल्ला आम्हाला खुणावत होता आणि रात्री किल्ला चढण्याची अनेक दिवसांपासून राहिलेली माझी इच्छा पूर्ण होत होती. वर चढणं चालू केलं तसं गरम व्हायला लागलं होतं. उन नव्हतं तरीही दम लागायला लागला होता. खुशबू ची तब्येत बरी नव्हती. नेहाचेही हृदयाचे ठोके अधूनमधून वाढत होते. किरण पहिल्यांदाच एवढी मोठी sack घेऊन चढत होती. तरीही सर्व जण बसत-उठत, थांबत चालत जिद्दीने किल्ला चढत होत्या. शिडी पार झाली. पुढे मध्ये मध्ये मी खुशबू कडून sack घेऊन चालत होतो. थोड्या उंचीवर पोहोचल्यावर थंडी पुन्हा जाणवायला लागली. त्या थंड वाऱ्यामुळे चालता चालता डोळे मिटत होते. सर्वच जण दिवसभर काम करून थकून भागून, एवढा प्रवास करून आले होते. पण रात्रीच्या शांततेत आणि टिपूर चांदण्यात किल्ला चढण्याचा आनंद वेगळाच. तो सर्व जण उपभोगत चढत होते. रस्ता चुकलो तरी वाटाड्या असल्यामुळे योग्य मार्गाला लागत होतो. शेवटी ३ वाजेच्या सुमारास आम्ही गडावरच्या पंत सचिवांच्या वाड्यात जाऊन पोहोचलो. रात्रीच चंद्र - चांदण्यांच्या सहवासात आमचा सुधागड सर झाला होता. गडावरची पहिली आणि उरलीसुरली रात्र तरी शांततेत पार पडत होती!
वाडा रिकामाच होता. त्यातल्या त्यात बरी आणि सेफ जागा बघून आम्ही तळ ठोकला होता. सुखाची झोप झाली होती. बाहेर जाऊन फ्रेश होऊन आणि पाणी घेऊन आलो. सरांनी बरचसं पाणी आधीच आणून ठेवलं होतं. वाड्यापासून पान मिनिटांच्या अंतरावर खाली उतरून गेल्यावर पिण्याच्या पाण्याची ३ कुंडं आहेत. आम्ही उतरायला जरा सोप्या अश्या उजवीकडच्या सर्वात पहिल्या कुंडातलं पाणी पिण्यासाठी वापरलं. जिथे आपण पिण्याच्या पाण्याच्या या कुंडाकडे जाण्यासाठी खाली उतरतो, त्याच्या समोरच कमळाचं तऴ आहे. त्याच्यातलं पाणी आम्ही पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरलं. परत वाड्यात आलो. तोपर्यंत तिथल्या म्हाताऱ्या आजीबाई कडे चहाची व्यवस्था झाली होती. त्यांच्या झोपडीत चहा बिस्कीट झाल्यावर आम्ही पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी आलो. सकाळच्या नाष्ट्यासाठी पोहे बनवून झाले. तनूच्या सल्ल्याने संकेतने आणलेल्या फक्त २०० ग्राम साखरेचा १६ जणांसाठी चहा बनवून झाला. त्या दोघांची खेचता खेचता पिउन सुद्धा झाला. चहा नाश्ता झाल्यावर किल्ला फिरायला निघालो. सुरुवातीला वाड्याच्या मागच्या बाजूने खाली उतरल्यावर उजव्या हाताला लागणारी तटबंदी आणि चोर दरवाजा बघितला. मनसोक्त फोटो काढले. मोबाईल लावून लांबून सेल्फि काढण्यासाठी बिट्टू ने एक दांडी आणली होती. तिचा भरपूर वापर चालू होता. संकेत आणि अमित कडचे कॅमेरे आणि मयुरा, बिट्टू, विभा, खुशबू, किरण यांचे मोबाईल यांचे मिळून हजाराच्या आसपास तरी फोटो त्या दिवशी निघाले. चोर दरवाजा बघून झाल्यावर वर चढून भोराई देवी मंदिरात गेलो. तिथून पुढे गेल्यावर तैलबैला आणि त्याच्या मागचा घनगड दिसतो. आकाश निरभ्र असल्यामुळे समोरच्या डोंगर रांगा स्पष्ट दिसत होत्या. इथे सर्वांचा ग्रुप फोटो काढल्यावर मागे वळलो. दारू कोठार पाहून सर टकमक टोकाकडे वळले. परत येताना तिथल्या ‘आंब्याच्या पारावर’ २ मिनिट थांबून पुन्हा वाड्याकडे आलो. मग जेवायला बसलो. पुन्हा संकेतने तनूच्या सल्ल्याने १६ लोकांसाठी फक्त अर्धा किलो आणलेलं श्रीखंड सर्वांनी वाटून पुरवून खाल्लं. जेवण झाल्यावर काढलेले फोटोज बघत आणि बिट्टू ची खेचत सगळेजण timepass करत होते. एव्हाना सर तलावावर जाऊन अंघोळ करून आले होते. आम्ही पाच वाजता आंघोळीसाठी वाड्याबाहेर पडलो. सर्व मुलंच होतो. तलावाबाहेर अगदी आनंदाने अंघोळ केली. तोपर्यंत सूर्यास्त होत होता, त्यामुळे पुढे ठरवलेल्या सगळ्या गोष्टी रद्द करून वाड्यावर परत आलो. दिवस निघून गेला होता आणि पुन्हा रात्र झाली होती. आमची या सुधागडावरची दुसरी रात्र!!
आल्या आल्या खिचडीच्या तयारीला लागलो. सर्व जण कामाला लागले होते. गुफीने पुन्हा चुलीचा ताबा घेतला होता. अमितने चुलीवर पापड भाजले आणि साडे आठ च्या सुमारास आम्ही जेवायला बसलो. खिचडी भरपूर झाली होती आणि ती आम्हाला पुरून उरली होती. काही खिचडी तिथल्या म्हातारीला आणि पुजाऱ्याला नेउन दिली. जेवण झाल्यावर सर्व जण पुन्हा बाहेर पडलो. भोराई देवी मंदिराच्या रस्त्यावर आलो. तिथून दारूकोठारावरून पुढे टकमक टोकाच्या दिशेने जायला लागलो. मध्ये आम्ही मुलामुलांनी सर्व मुलींना भुताच्या गोष्टी सांगून घाबरवायचं ठरवलं. आणि आमच्या थापा सुरु झाल्या. तिथलं भोराई मंदिर , त्याच्यासमोरचे जोते, दारू कोठाराच्या समोरचा आंब्याचा पार, टकमक टोकाचा इतिहास याच्या बद्दल काहीही काहण्या बनवून आम्ही मुलींना सांगायला लागलो, आणि त्यांची मजा घेऊ लागलो. टकमक टोकावर बसून बऱ्याच जुन्या नव्या, खऱ्या खोट्या भुताच्या गोष्टींची उजळणी झाली. त्यात 'कही दीप जले कही दिल' , 'गुमनाम है कोई' अशी गाणी म्हणून विभाने वातावरणातल्या गूढतेत अजून भर टाकली. विभा खूप सुंदर आवाजात गाणं म्हणत होती. मधून मधुन सरांचाही आवाज लागत होता. थंड हवा वाहत होती. या अश्या वातावरणात भुताचे विषय ऐकून खुशबू मनातून चागलीच घाबरली होती. आणि त्यामुळे आम्ही मनातल्या मनात हसत होतो. परत येताना नेहाचे हृदयाचे ठोके पुन्हा कमी जास्त व्हायला लागले. ती नॉर्मल होईपर्यंत चा वेळ सोडला तर आमची overacting ने भरलेली नाटकं चालूच होती आणि बिचारी खुशबू अजून घाबरत होती. कोणालाही लवकर झोपायचं नव्हतं आणि वाड्यामध्ये आमच्या व्यतिरिक्त अजून एक गृप मुक्कामाला आला होता. त्यामुळे आम्ही वाड्यापासून बरंच वरती, पायऱ्यांवर बसून गप्पा मारत बसलो. पुन्हा भुताच्या गोष्टींना ऊत आला. बाहेर काहीजण तंबू टाकून राहिले आहेत, त्यांना जाऊन घाबरवू असाही गमती जमतीचा विषय निघाला. तनू, कुणाल, संकेत आणि सर हे आधीच वाड्यात आले होते. बाकी आम्ही सर्व जण बाहेरच होतो. साधारण १२ च्या सुमारास आम्ही तिथून उठलो आणि वाड्यात आलो. पुन्हा सर्वांना झोपायची इच्छा नव्हतीच. त्यामुळे कानगोष्टी, पत्ते असे खेळ खेळत सगळे जागेच होते. मला स्वतः ला खूप झोप येत होती. त्यामुळे हे खेळ खेळण्यात मी काही फार उत्साही नव्हतो. शेवटी सर्वांचाच उत्साह गळून पडायला लागला आणि सर्व जण झोपायच्या तयारीला लागले. अजूनही काही जण असे होते की त्यांना झोपायचं नव्हतं पण माझे डोळे मात्र १ वाजता मिटून गेले होते.
अचानक हृदयात धडकी भरवणारा जोराचा आरडाओरडा माझ्या कानावर पडला आणि मी दचकून जागा झालो. अमित, विनीत, कार्तिक, बिट्टू, संकेत आणि सोहेल हे जागे झालेले मला दिसले. ओरडण्याचा आवाज ह्यांच्याच दिशेने आला होता. 'अजून ह्यांची नाटकं आणि मस्करी संपली नाही' असा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी वैतागलो. घड्याळात बघितलं. अडिच वाजले होते. 'ही काय ओरडण्याची आणि मस्करी करण्याची वेळ आहे?' असं मनातल्या मनात म्हणून मी चिडून जागेवरच पडून राहिलो. माझी झोपमोड झाल्याचा मला राग येत होता. पण प्रत्यक्षात परिस्थिती काही तरी वेगळीच होती. तिकडे सोहेल, "मला काही तरी दिसलं, मला काही तरी झालं ..." असं काही तरी बरळत होता. "दोन जणांना एकच स्वप्न कसं पडलं...?" असं काही तरी विनीत बोलत होता. अमित अंगातल्या टी-शर्ट कडे बोट दाखवत "एकदंत", असं काहीतरी म्हणत होता. त्या क्षणी मला एकंदरीत ती सगळी overacting वाटत होती. माझ्या डाव्या बाजूला विभा झोपली होती. आवाज ऐकून ती आणि तिच्या पलिकडे झोपलेली तनू सुद्धा उठली होती. विभाला मी झोपायला सांगितलं.
"काहीही झालेलं नाहीये." असंही म्हंटलं.
विभा झोपली. तनूही झोपली. पण विभा पुन्हा उठली. मी पुन्हा तिला तेच सांगितलं. ती पुन्हा झोपली. त्यानंतर शेजारच्या गृपमधली एक ताई आणि अजून एक जण चौकशी करायला आले.
"आम्हाला स्वप्न पडलं." असं विनीत ने त्यांना सांगितलं.
त्यावर ती ताई म्हणाली, "या ठिकाणी कधी कधी अश्या गोष्टी होतात! तेव्हा कधीही ट्रेक ला बाहेर गेल्यावर उश्याजवळ चामड्याची चप्पल ठेवावी."
आम्ही तिला "हो." म्हंटलं आणि ती गेली. त्याचवेळी, पलीकडे झोपलेल्या मयुरालासुद्धा काही तरी स्वप्न पडलं होतं आणि ती सुद्धा ओरडली होती हे माझ्या कानावर आलं. किरण तिच्या जागेवरून उठून कार्तिक कडे आली, पण तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. ती खूप घाबरली होती आणि रडायला लागली होती. त्यानंतर विनीत इथुन उठून मयुराजवळ तिची विचारपूस करायला गेला. त्याचवेळी नेहा तिथून मुलांच्या इथे आली. हे सर्व जण काय बोलत आहेत आणि काय करत आहेत हे मला काहीही कळत नव्हतं.
"कोणीतरी मुलींच्या बाजूला झोपायला या." असं नेहा म्हणाली.
पटकन कोणीच तयार झालं नाही. तेव्हा शेवटी मी उठलो आणि माझी मॅट उचलून मी मयुराच्या पलीकडे नेऊन टाकली.
मी तिला विचारलं, "काय झालं? काल रात्री आम्ही जे बोलत होतो ती सगळी मस्करी होती."
मयुरा म्हणाली, "रात्रीची गोष्ट मी केव्हाच विसरून गेले आहे. आत्ता मला एक विचित्र स्वप्न पडलं!"
आत्ता पर्यंत चा सगळा प्रकार बघून मला ती मस्करी नाही हे स्पष्ट झालं होतं. पण नक्की काय झालं ते काही कळत नव्हतं. काही जणांना काही स्वप्न पडलं, काही भास झाले म्हणून काही जण ओरडले एवढंच आकलन मला होत होतं. आता तो राग मला माझा यायला लागला होता. झालेला प्रकार मी सुरुवातीला मस्करी म्हणून घेला होता. हे घातक होतं. त्यावर मी चिडून वझे ला जाऊन बोललो. "हे लांडगा आला रे आला असं होईल. असं पुन्हा व्हायला नको." माझ्या बोलण्याचा अर्थ पटकन कोणालाच लागला नाही. जर खरंच कोणी चोर किंवा जनावर आलं असतं व असा आरडाओरडा मी ऐकला असता आणि मस्करी म्हणून सोडून दिला असता तर? त्यानंतर मी संकेत शी बोलायला गेलो. तो ही थरथरत होता. सर, कुणाल आणि तनू हे सोडून बाकी सर्व जण जागे होते आणि घाबरलेले होते. नक्कीच काहीतरी घडून गेलेलं होतं पण नक्की काय? ते कळत नव्हतं. आणि प्रत्येकाकडे जाऊन हे विचारावं हे त्यावेळी मला योग्य वाटत नव्हतं. सर्वांनी झालेल्या गोष्टी सोडून द्याव्यात आणि गपचूप झोपून जावं असं मला वाटत होतं. मी मयुराच्या बाजूला जिथे mat टाकली होती तिथे आलो. मयूरला खूप थंडी वाजत होती. तिला अजून एक चादर पांघरायला हवी होती. मी माझी चादर तिला दिली आणि mat वर पडलो.
आत्तापर्यंत जे सांगितलं ते माझ्या डोळ्यांना दिसलेलं. पण या सगळ्या कालावधीत नेमकं काय घडलं होतं? १००% खरं असं जरी नाही म्हंटलं तरी ज्यांनी तो प्रकार प्रत्यक्ष अनुभवला त्यांच्या तोंडून मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनाक्रम लागतो तो असा –
सर्व जण झोपले होते. माझ्या उजव्या बाजूला क्रमाने कार्तिक, विनीत, वझे, सोहेल, गुफी, बिट्टू, संकेत, थोड्या अंतरावर सर आणि कुणाल असे झोपले होते. खरं तर सोहेल कार्तिक चा मित्र. म्हणून तो त्याच्या बाजूला झोपायला हवा होता, पण तो वझे आणि गुफी यांच्या मध्ये झोपला होता. माझ्या डावीकडे क्रमाने विभा, तनू, किरण, खुशबू, नेहा आणि सर्वात शेवटी मयुरा अश्या सर्व जणी झोपल्या होत्या. अडीच च्या सुमारास सर्व जण झोपले होते पण गुफी ला काही गाढ झोप लागली नव्हती. तो काहीतरी घेण्यासाठी sack कडे वळला आणि त्याच वेळी त्याचा हात सोहेल ला लागला. सोहेल खडबडून उठला. त्याला अचानक काय झालं ते कळेना. तो विजेच्या गतीने उठला आणि बेडूक उडी मारतात तश्या स्थितीत येउन बसला. आणि क्षणार्धात त्याने गुफी वर लाथेने हल्ला केला. त्याचे हात बांधल्यासारखे घट्ट झाले होते. चेहरा विचित्र झाला होता. डोळे अक्राळविक्राळ झाले होते. अचानक अंगात आल्यासारख्या बेडूक उड्या मारण्याच्या स्थितीत असून सुद्धा साधारण १०० किलो वजनाचा सोहेल तसाच चक्क ३-३ फूट उंच उड्या मारत होता! तो प्रचंड ताकदीने गुफी ला लाथा घालत होता. गुफी च्या जागी त्याला दुसरंच कोणीतरी दिसत होतं. गुफी च्या कंबरेत एक, छातीत दोन, मानेवर एक, तोंडावर एक अश्या पाच-सहा चांगल्या दणदणीत लाथा बसल्या. सोहेल मारत होता आणि ओरडत होता. गुफी ला त्याही अंधारात त्याचा चेहरा दिसला आणि तो जसा होता ते पाहून गुफी ची भीतीने गाळण उडाली. त्याही परिस्थितीत त्याने हाताने लाथा थोपवण्याचा प्रयत्न केला. पाच सहा लाथ घालून झाल्यावर सोहेल चा सूर अचानक बदलला. "मी मेला…. मी मरला…. " असं काहीतरी तो अस्फुट किंचाळायला लागला. तो सूर ऐकून तर गुफी प्रचंड घाबरला आणि भितीने तो ही ओरडायला लागला. ओरडता ओरडता आणि मार थोपवता थोपवता तो शेजारच्या बिट्टू च्या अंगावर गेला. बिट्टू सुद्धा खडबडून जागा झाला आणि तो ही मोठमोठ्याने ओरडायला लागला. तसाच बिट्टू सुद्धा त्याच्या शेजारच्या संकेत च्या अंगावर गेला आणि संकेत ची ही बिट्टू सारखीच गत झाली. एव्हाना सोहेल, गुफी, बिट्टू आणि संकेत असे सगळेच घाबरून मोठ्यामोठ्याने ओरडत होते. त्या मारामारीचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून अचानक वझे उठला आणि एक शिवी देऊन जोरात ओरडला, "************* काय फालतुगिरी चालू आहे… !" त्याच वेळी विनीतलाही काहीतरी स्वप्न पडलं आणि तोही दचकून उठला. तेवढ्यात पलीकडून जीवाच्या आकांताने किंचाळण्याचा एका मुलीचा आवाज आला. ती मयुरा होती. तेवढ्यात अजून एक मुलगी किंचाळली. तो कोण होती हे समजलंच नाही. बहुतेक खुशबू असावी. मयुरा मात्र कुठल्यातरी भलत्याच विश्वात होती. तिचाही चेहरा अगदीच वेगळा दिसत होता. डोळे भलतेच विचित्र दिसत होते. केस पुढे आले होते. त्यामुळे ती आणखी भयावह दिसत होती. नेहा आणि खुशबू ने तिला या स्थितीत स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं. तिला त्या दोघींनी घट्ट धरलं आणि खुशबू मोठ्याने ओरडली, "माऊ, काहीही झालेलं नाहीये. ओरडू नकोस."
या तिच्या आवाजाने मयुरा भानावर आली. पण ती काही क्षणांपूर्वी ती इतक्या मोठ्याने ओरडली यावर तिचा विश्वासच बसेना.
"मी ओरडले? मी का ओरडले?" असं जेव्हा तिने बाकीच्यांना विचारलं तेव्ह सगळ्या जणी चाट पडल्या. इथे सोहेल ला अमित आणि गुफी ने ओरडून शांत केलं होतं. त्यालाही काही सेकान्दान्पुर्वी त्याने काय केलं होतं हे आठवत नव्हतं. ज्यावेळी तो झोपेतून जागा झाला त्यावेळी त्याला असं स्वप्न पडत होतं की त्याला कोणीतरी मारायला आलंय आणि त्या लोकांनी त्याचे हात घट्ट धरून ठेवले आहेत. आता हे लोक मला मारणार या जाणीवेने त्याने स्वसंरक्षणार्थ पाय झाडायला सुरुवात केली होती. या लाथा कोणाला बसत आहेत हे त्याच्या गावीही नव्हते. बरोबर त्याच वेळी कोणीतरी मागून धावत गेल्याचा पावलांचा आवाज अनेकांनी ऐकला. ते जे काही होते ते संकेत पासून मयुराच्या दिशेने धावत गेले आणि पुढे जाऊन चुलीच्या मागच्या भिंतीवर एक मोठा दगड होता तो खाली पडला. तो पावलांचा आणि दगड पडल्याचा आवाज दुसऱ्या ट्रेक गृप पैकीही काहींनी ऐकला. जसं स्वप्न सोहेल ला पडलं तशाच आशयाचं स्वप्न अजूनही काहींना पडलं. बैलासारखं कोणीतरी मागून धावत येतंय आणि ते आता आपल्या अंगावर येणार असं विनीत ला दिसलं. संकेत आणि बिट्टू लाही कोणीतरी मागून पळत जातंय असा भास झाला. विभालाही त्याच वेळी स्वप्न पडलं कि वाड्याबाहेर काहीतरी आवाज आणि मारामारी चालू आहे आणि ते सर्व जण आता आतमध्ये येउन आमच्यापैकी कोणाला तरी मारणार! मयुरालाही सोहेल सारखंच स्वप्न पडलं की कोणीतरी तिच्या अंगावर येतंय आणि आता ते तिला मारणार. त्यामुळे ती जीवाच्या आकांताने किंचाळली. त्याचवेळी नेहालाही स्पष्ट जाणवलं की कोणीतरी 'ही:ही:ही:ही:' असा हसण्याचा आवाज करत मागून धावत जातंय. आमच्यापैकीच कोणीतरी असेल असा अंदाज लावून तिने दुर्लक्ष केलं पण पुढच्याच क्षणाला मयुरा जोरात किंचाळली आणि नेहा सुद्धा दचकून उठली. जर सर्वांच्या मागून कोणीतरी धावत जातंय असा भास काहींना झाला तर तो खरा होता? एकाच वेळी अनेक जणांना असाच भास का व्हावा? जर खरंच कोणी पळत गेलं होतं तर तो प्राणी अथवा मनुष्य कोणालाच का दिसले नाही? सर्वात शेवटी तो कोपऱ्यावरचा दगड आपोआप खाली का पडावा? आपल्याला कोणीतरी मारतंय अश्या आशयाचं स्वप्न एकाच वेळी अनेकांना का पडावं? त्यातल्या त्या ही मयुरा आणि सोहेल ला इतक्या तीव्रतेने का पडावं? झालेला प्रकार नक्की काय होता? हे आणि असे अनेक प्रश्न आज ही अनुत्तरीत आहेत.
मी मयुराच्या पलीकडे mat टाकून पडलो होतो. आत्तापर्यंत झालेला प्रकार मला स्पष्ट झालेला नव्हता. त्यामुळे सर्व जण जितके घाबरलेले होते तितका मी घाबरलेलो नव्हतो. मला घाबरून चालणार ही नव्हतं. सर उठलेले नव्हते आणि जे जागे होते ते सर्व च्या सर्व जण चांगलेच घाबरलेले होते. जे घडायचं होतं ते घडून गेलं होतं. पुढे जे काही होईल त्याला सावधपणे आणि शांतपणे तोंड द्यायचं होतं. त्यामुळे नॉर्मल वागायचं असं मी मनातून ठरवलं होतं. मी आडवा पडलो होतो, पण माझं पांघरूण मयुराकडे होतं. माझी नुकतीच झोपमोड झाली होती आणि मला आता भूक लागली होती. अश्या परिस्थितीत झोप लागणं शक्य नव्हतं. मी उठलो. आमच्या मागून पळत जाणारी ती अन्नाच्या आशेने आलेली माकडं तर नव्हती ना? या विचाराने मी खिचडीचं पातेलं शोधत फिरु लागलो. ते लवकर सापडलं नाही; पण शेवटी चुलीवर ठेवलेलं ते मला दिसलं. त्याला कोणीही हात लावला नव्हता. त्याच्या झाकणावरती ठेवलेलं आडवं लाकूड सुद्धा जसंच्या तसं होतं. म्हणजे माकडं नक्कीच येउन गेली नव्हती. मला आता खिचडी खायची इच्छा झाली. पण जवळचं सगळं पाणी संपलं होतं. खाल्लं तर पाणी प्यायला लागणार आणि त्यासाठी पाणी आणायला जावं लागणार हे नक्की होतं. थोडा विचार केला आणि तरीसुद्धा खिचडीचं पातेलं घेऊन मी सर्वांच्या मधोमध येउन बसलो. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. 'हा नक्की काय करतोय?' असे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दाटून आले.
"मला भूक लागली आहे. मी खिचडी खातोय. कोणाला खायची असेल तर या." असं मी जाहीर करुन टाकलं. काहींच्या मनात आलं, 'भूताचा परिणाम याच्या वर तर नाही ना झाला?' विनीत आणि अमित यांना तर त्याही परिस्थितीत माझ्यावर हसू आलं. पण नॉर्मली मी काय केलं असतं, असा साधा सरळ विचार मी केला आणि त्याप्रमाणे खिचडी खायला लागलो. काही वेळापूर्वी जी काही गोष्ट घडून गेली किंवा ज्या कुठल्या कारणामुळे घडून गेली ते कारण माझ्या इच्छेच्या आड येऊ शकलेलं नाही आणि मला घाबरवू शकलेलं नाही हे मला यातून दाखवायचं होतं. घाबरलेल्या सर्वांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा माझा प्रयत्न होता. मी मयुराच्या बाजूच्या जागेवरून उठून आलोय हे बघून त्या सर्व मुलींनी आपआपसात काही तरी ठरवलं आणि त्या आमच्या जवळ येऊन बसल्या. अमित, विनीत, गुफी, सोहेल, विभा, नेहा, मयुरा, खुशबू, किरण असे सगळे माझ्या भोवती वर्तुळाकार बसले होते आणि मी एकटा खिचडी खात होतो. मी गुफीला खिचडी खाण्याबद्दल विचारलं. त्यालाही भूक लागली होती, पण त्याची खायची हिंमत होत नव्हती. मी हवी तेवढी खिचडी खाल्ली आणि तिथून उठलो. मला प्यायला पाणी हवं होतं. मी थोडंसं शोधलं पण मला काही पाणी सापडलं नाही. सगळ्या बाटल्या रिकाम्या होत्या. मी किरणची बॅग घेतली आणि सगळ्या रिकाम्या बाटल्या त्यात भरायला लागलो. हे बघून मला बाकीच्यांनी विचारलं,
"काय करतोयेस?"
मी उत्तर दिलं, "पाणी भरायला चाललोय."
अचानक सर्वांची कुजबूज वाढली.
"आता कुठे जातो पाणी आणायला ?"
"वेडा आहेस का?"
"नको जाऊस!"
असे शब्द ऐकू यायला लागले. पाणी ही त्या वेळेची गरज होती. मला स्वतःला प्यायला पाणी हवं होतं. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे मध्येच कोणालाही पाण्याची गरज लागू शकली असती. नेहा, खुशबू आधीच आजारी पडल्या होत्या. त्यात मयुराची भर पडली होती. बाकी सर्व जण घाबरलेले होते. अश्या परिस्थितीत आमच्या जवळ पाणी असणं अत्यावश्यक होतं. पण मला सर्व जण जाऊ नकोस असंच सांगत होते. मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हतो. मी बॅगेत बाटल्या भरत होतो.
तेवढ्यात नेहा माझ्या जवळ आली आणि म्हणाली, "सगळे आधीच घाबरलेले आहेत आणि त्यात तू जर बाहेर गेलास तर सर्वांना अजून टेंशन येईल. म्हणून तू जाऊ नकोस. आपण समोरच्या गृपकडून पाणी मागू तात्पुरतं."
तिचं म्हणणं मला थोडंसं पटलं आणि मी, "बरं.." म्हणालो.
मी बाकीच्यांच्या बॅगांमध्ये पाणी शोधायला लागलो. शोधत शोधत शेवटी कुणाल च्या बॅगेत हात घातला आणि तिथे मला पाण्याने भरलेली बाटली सापडली. जेव्हा मी ती बाटली घेउन पुन्हा जागेवर येउन बसलो तेव्हा सर्वांच्या जिवात जीव आला. मग अनेकांनी घोट घोट पाणी प्यायलं. मयुराने कुठली तरी गोळी घेतली. विभाने तोपर्यंत रामरक्षा चालू केली होती. एव्हाना पांघरुणातच बिट्टू ची तीन वेळा म्हणून झाली होती. त्यानंतर सर्वांचं मारुतीस्तोत्र आणि अथर्वशीर्ष म्हणून झालं. हे म्हणत असताना माझा बालमित्र चक्क अमितला मी चक्क हात जोडून बसलेलं बघितलं आणि घडून गेलेलं प्रकरण हे नक्कीच गंभीर होतं हे मी कळून चुकलो. मी ही हात जोडून बसलो. स्तोत्रं म्हणून झाल्यावर विभा आणि सोहेल ने काही जुनी गाणी म्हंटली आणि वातावरण थोडंसं हलकं केलं. हळूहळू काही जण पुन्हा आडवे झाले होते. आता पत्ते खेळूया असाही विषय निघाला, पण पत्ते सापडले नाहीत. मयुरा, नेहा आणि खुशबू या अमित, विनीत आणि कार्तिक यांच्या अधेमधे जागा करुन झोपल्या. मयुराची भिती अजूनही गेलेली नव्हती. तिला आधाराची गरज होती. नेहा भिंतीला टेकून बसली होती. किरण या सर्वांच्या पायाशी बसली होती. मी पलीकडची मॅट आणि चादर या सर्वांच्या पायाशी आणली आणि आंथरली. हळूहळू मी, किरण आणि नेहा सोडून सर्व जण झोपले. पण गाढ झोप अशी कोणालाच लागत नव्हती. मी समोरून चालत फेऱ्या मारत होतो आणि पहाट व्हायची वाट बघत होतो. मध्येच तनू उठली. तिची तब्येत बिघडली होती. अजून एका पेशंटची भर पडली होती. नेहाचे हृदयाचे ठोके अजूनही नियंत्रणात येत नव्हते. तिच्याबरोबर मी अंगणात थोडा वेळ फेऱ्या मारल्या. किरण झोपायचं नाव घेत नव्हती. शेवटी साडेचारला नेहाला थोडं बरं वाटायला लागलं होतं आणि मग आम्ही तिघे ही झोपलो. मी दिवसाचा पहिला प्रहर म्हणजे साडेतीन-चार वाजायचीच वाट बघत होतो. शेवटी साडेचारला 'आता काही टेंशन घ्यायचं कारण नाही.' असं म्हणून पाठ टेकली. सुधागडावरची दुसरी आणि अतिशय थरारक रात्र हळूहळू सरत होती.
पहाटे ५ वाजल्यापासूनच काहींच्या मोबाईल चे गजर वाजायला लागले होते. त्यामुळे जेमतेम ४.३० ते ५.१५ अशीच झोप झाली. त्यातही जेवढा प्रकार मी अनुभवला तेवढा सगळा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर दिसत होता. ५.१५ ला उठलो. सर ही उठले. पहिलं काम केलं ते म्हणजे पिण्याचं पाणी आणायला बाहेर पडलो. विनीत आणि नेहा उठले. मयुरा सुद्धा उठली. ती आता हळूहळू सावरत होती. माझ्याबरोबर विनीत आला. जाताना आणि येताना आमचा झाल्या गोष्टीवरूनच बोलणं चालू होतं. परत आल्यानंतर विनीत झोपला आणि गुफी माझ्याबरोबर वापरण्यासाठीचं पाणी आणण्यासाठी आला. आमचीही तीच चर्चा. गुफी ने सविस्तर अनुभव कथन केलं. येतायेताच आजी बाईंच्या झोपडीत चहा सांगून आलो. येईपर्यंत ६.३० वाजले होते. बरोबर ९ वाजता सुधागडावरून उतरायला सुरुवात करायची होती. आलो तेव्हा सर्व जण शांत झोपले होते. आज सर्वांना आंजारून गोंजारून उठवायचं होतं. नाहीतर एरवी पांघरूण खेचून किंवा लाथ मारून उठवायची (फक्त मुलांना ) माझी पद्धत असते. आज प्रत्येकाला अगदी गोड आवाजात डोक्यावरुन हात फिरवत उठवलं. सगळे एका दिव्य रात्रीतून पार पडून नुकतेच झोपले होते. विनीत सोडून सगळे उठले. सर्वांना चहा दिला. भांडी घासणं, आवरणं, इ. गोष्टी करायला सुरुवात केली. सकाळ झाली तसे सर्व जण निश्चिंत झाले होते. कालच्या झालेल्या प्रकारावर गप्पा, विनोद चालू होते. हेराफेरी मुव्ही मध्ये एक डायलॉग आहे, "मेरा छाती फोडा रे!" हा डायलॉग आम्ही ट्रेक चालू झाला तेव्हापासून म्हणत होतो, आता मात्र तो खरा ठरला होता. गुफी वर खरच हा डायलॉग म्हणण्याची वेळ आली होती. सगळ्यांनी समान आवरलं. काही गृप फोटो काढले. नंतर शिववंदना म्हंटली आणि वाडा सोडला. तेव्हा १० वाजले होते. आता आम्ही महादरवाज्यामार्गे धोंड्शे गावात उतरणार होतो. त्याप्रमाणे निघालो. पूर्ण वेळ थट्टा, विनोद चालू होते. खाली उतरून वैतागवाडी गावाच्या दिशेने निघालो. तिथे सोहेल कडून कोल्ड्रिंक्स ची पार्टी घेतली आणि पालीच्या बस मध्ये चढलो. पाली ला पुण्याचा व कल्याण चा असे पुन्हा दोन गट पडले. सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि आपापल्या दिशेने निघालो.
ट्रेक अविस्मरणीय असाच झाला. विशेषत: दुसऱ्या रात्रीचं ते थरारनाट्य कधीच विसरता न येणारं. घरी आल्यानंतरही पुढच्या दोन रात्रीपर्यंत काहीजण झोपेत दचकून जागे होत होते आणि जवळ जवळ आठवडा भर या ट्रेक ची उलटसुलट चर्चा गृप वर चालू होती. आमचे विलास जोशी सर तसे बरेच अनुभवी. आमच्याही आधी अनेक वर्षांपूर्वी लहान मुलांना सोबत घेऊन क्याम्पिंग करताना ते त्यांच्या काही सहकाऱ्यांसह असे काहीतरी प्रयोग करत असत. मुलांना घाबरवण्यासाठी काही तरी गम्मत करत आणि मुलं घाबरली की मग नंतर त्यांनी 'तो घाबरवण्याचा प्रयोग कसा केला' हे समजावून सांगत असत. जेणेकरून मुलांच्या मनातली भीती कमी व्हावी. पण या वेळी मात्र ते स्वतः गाढ झोपले होते. खरं तर आधी आम्हीच आमच्या मैत्रिणींना भूताच्या गोष्टी सांगून घाबरवण्याचा प्रयोग करत होतो पण नंतर मात्र कोणीतरी तोच प्रयोग आमच्यावरच केला होता. आणि 'हा प्रयोग मी केला' असं कोणीही आम्हाला सांगत आलेलं नाहीये आणि पुढे भविष्यात कोणी येईल याची शाश्वतीही नाही, शक्यताही नाही. काही गोष्टींचं गूढ उकललं जात नाही आणि उकललं जाउही नये. रहस्यमयता हा या कथेचा गाभा आहे आणि ते गूढ हाच या कथेचा आत्मा आहे असा मला वाटतं. कधी तरी ही आठवण निघाली की तासनतास हसतखेळत गप्पा रंगतात, मात्र अगदी खरं सांगायचं झालं तर 'नाईट ट्रेक' हा विषय निघाल्यावर आमच्या सर्वांच्याच कानात 'त्या' किंचाळ्यांचा आवाज घुमल्याशिवाय कधीही राहत नाही!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
:)
(:-) (:-) (:-) (:-)--=//
एवढे सगळे किन्चाळुन तमाशा
ट्रेकचा लीडर मी होतो.
अर्रर्र टू मचय हे. उगीच वाचलं
सुधागडाचा हा आणखी एक अनुभव
तुम्ही दिलेल्या लिन्कमधे
आणि हकुनी ईथे दुसर्या
दोन्ही प्रतिसादांशी सहमत.
ले़खाचा उगिचच विस्तार नको
हो. माझाच ग्रुप तो.
मी म्हणुन तुम्हाला असे अनुभव
बरं! तसं म्हणा.
अच्छा
दुसरी बाजू
अस्सल ट्रेकर, नकली ट्रेकर
कथा "माल-मसाला" वापरून लिहिली
अश्या व्यक्तीवर किती विश्वास* ठेवावा हे ज्याचे त्याने ठरवावे.
सहमत मेहेंदळे साहेब...
जाब तर विचारलाच.
धन्यवाद हा धागा दिल्याबद्दल.
इतर गडान्वर
वाचायला आवडेल
काही नाही फालतुपणा आहे सगळा.
सुधागडावरचा वाडा हा भोरच्या
रोचक. विस्तार वाचायला आवडेल.
तोरणा
मग
प्रत्येकावर एक एक लेख लिहा की
तोरण्याला काय वाईट अनुभव येतो
सुधागड ला इतके वेळा रात्री
स्पा,
ओके हकुलि
पदभ्रमणात असे डोक्यात जाणारे ग्रुप बरेच भेटतात
गैरसमज करून घेणे टाळावे
हा कदाचीत विचारातील फरक आहे..
अगदी थरारक अनुभव आहे...
http://indianhorrortales
हाच प्रसंग दिवसा घडला असता तर ?
भारी
आणखी दोन अनुभव
हुकुराव एवढं तुम्ही स्वत:च
हा अजुन एक अनुभव
डबल एक्पोजर. सॉरी फॉर
दुग॑विहारी