Skip to main content

सार्वजनिक स्वच्छता. ट्रेनमधला प्रयोग.

लेखक वडापाव
Published on शनीवार, 05/03/2016
दोन आठवडे एक प्रयोग करून पाहिला. जो अजूनही चालू राहणार आहे. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या जो कोणी कचरा बाहेर टाकताना दिसेल, त्याला तो टाकायच्या आधीच अडवतो. 'बाहर मत डालो. बॅग में रखो' म्हटलं की लोक शिस्तीत ऐकतात. एखादं कोणी क्यों न डालो विचारलं तरी शांत आवाजात समजावल्यावर ऐकतात. तरीही कोणी माज केला तर सरळ रेल्वे अधिनियम कलम 198 नुसार हा गुन्हा असल्याचं सांगण्याची तयारी ठेवलेली आहे. पण ती वेळच येत नाही. लोक शरमून जाऊन किंवा कटकट नको म्हणून तरी ऐकतात. कचरा टाकणा-या लोकांना न संकोचता अडवा. थुंकणा-याच्या वाटेला अजून मी गेलो नाहीये. तो संकोच आहे अजूनही. कारण त्यांच्यात कितीसा विवेक शिल्लक असेल जागवायला असा प्रश्न पडतो. असो. जमेल तेही एकदा.

वाचन संख्या 8462
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

In reply to by एस

+१

In reply to by एस

+१

In reply to by नाव आडनाव

+११

अतिशय चांगला उपक्रम करत आहत. 'बाहर मत डालो. बॅग में रखो' असे हिंदीत बोलण्या ऐवजी मराठीतून सांगितले तर 'सार्वजनिक ठिकाणी मराठी चा वापर' ह्या विषयावर सुद्धा एक अभ्यास अनायासे होऊन जाईल.

मुद्दा पटवून देणं हे जास्त महत्त्वाचं. सगळ्या भाषा चांगल्या आहेत. समोरचा मराठी वाटला तर मराठीत बोलतो. नाहीतर हिंदीही तशी गोड भाषा आहे. मराठीतून बोलायला हरकत काहीच नाही. पण समोरच्याला मी काय म्हणतोय ते समजायच्या आतच त्याने कचरा टाकून दिला तर सगळा व्यापच निरर्थक होतो ना. इथे मूळ मुद्दा मराठीचा नाही. कृपया विषयांतर नको.

सहज शक्य (आणि सुरक्षित!) असेल तेंव्हा तुमच्या बरोबरचे कुणीतरी अशा प्रसंगांचं व्हिडिओ चित्रीकरण करू शकत असतील तर पहा आणि या धाग्याबरोबरच इतरत्रही ते पसरवा. अशा सामाजिक प्रयोगांची अत्यंत गरज आहे. अशाच एका social experiment चं हे चित्रीकरणः

एकदा पुणे-मुंबई प्रवासात , एका माणसाचे असेच प्रबोधन केल्यावर त्याच्या बायकोनेच त्याला चांगलेच सुनावले होते , कचरा गाडीत न टाकण्याबद्दल.

चांगला उपक्रम. शुभेच्छा. रच्याकने सरकार काय करते ? मनपा काय करते ? असे बोलत बसन्यापेक्षा अशी सुरुवात कधीपण चांगलीच ना. ( याचा अर्थ असा नाही की सरकारने त्यांचे कामं करु नयेत.)

जवळ जवळ ५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तिची आठवण आपला धागा वाचून झाली. मी आगगाडीतून प्रवास करत होतो (कुठे ते नक्की आठवत नाही). समोरच्या बाकावर दोन हिंदी भाषिक तरुण भुईमुगाच्या शेंगा सोलून दाणे खाऊन टरफलं खालीच टाकत होते. मला अगदी राहवेना. संभाव्य धोका पत्करून मी त्यांना टरफलं गोळा करून कचऱ्याच्या डब्यात टाकायला सांगितले. आश्चर्य म्हणजे त्यांचं खाणं झाल्यावर 'अच्छी बात है' म्हणत त्यांच्यातील एकाने सालं भरून कचऱ्याच्या डब्यात टाकली.

In reply to by श्रीनिवास टिळक

माफ़ करा, थट्टा करत नाहीये..पण भुईमुगाच्या शेंगा, टरफले आणि टिळक हा योगायोग वाचून फार भारी वाटलं.. ;) बाकी वडापाव, भारी उपक्रम..

In reply to by श्रीनिवास टिळक

कचरा करणे अजून बदलले नाही पण पन्नास वर्षांपूर्वी माणसे आजच्यासारखी उलटून अरेरावी करणारी तरी नव्हती (असे वाटते).

In reply to by भाऊंचे भाऊ

खरे तर कन्हैयाचे फुटेज आपल्यासारख्या उपक्रमाना दिले पाहिजे
शिवाय प्रांजळपणा, वास्तवीकता, एकसंघ चित्तदशा वगैरे भानगडी मधे न आणता स्वच्छ, साध्या शब्दात या उपक्रमाचं कौतुक केलं पाहिजे. वडापाव भौ, जिंकलस मित्रा.

अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रयोग नक्कीच स्पृहणीय आणि अनुसरण करण्यासारखा आहे. पैजारबुवा,

+1

वैयक्तिक असे काही लिहायचे नाही असे ठरवूनसुद्धा आज काही अनुभव मांडावेसे वाटतात. आमच्या कुटुंबाने गेली २०-२५ वर्षे काही वैयक्तिक प्रयत्न चालू ठेवले आहेत. सुरुवात स्वतःपासून केली. स्वतःकडून सार्वजनिक जागेत कागदाचा कपटासुद्धा फेकला जाणार नाही हे पाहिले. नंतर सहनिवासात (हातांनी उचलण्याजोगा)कचरा दिसला तर तो कचर्‍यासाठी राखलेल्या कोपर्‍यात सर्वांसमक्ष नेऊन टाकायचा. नंतर बाहेर भेळ/आइस्क्रीम वगैरे खाण्यासाठी मित्रमैत्रिणींसोबत गेल्यावर भेळेचे कागद, आइस्क्रीमचे कप, चमचे कचरापिंपात टाकण्यासाठी स्वतःच धावायचे, आपण पोचण्याआधी जर ते खाली फेकले गेले तर उचलून पिंपात टाकायचे असे सुरू केले. सुरुवातीला किंचित टिंगल झाली पण नंतर लोक 'सॉरी' म्हणू लागले. आता आमच्या कंपूतील कोणीही काही बाहेर फेकत नाही. रेल-फलाटावर उभे असताना काहीजण चॉकोलेट-रॅपर, वेफर्स्/कुरकुर्‍यांच्या पिशव्या, कागद फेकून देत. (अजूनही देतातच.) ते तसे फेकायच्या बेतात असताना त्यांच्यापाशी जाऊन स्वतःच्या हातातली कागदी पिशवी पुढे करून 'यात टाका' असे आर्जवाने सांगायचे, आणि त्यांच्यादेखतच आपली पिशवी शेजारीच असलेल्या पिंपात रिकामी करायची. काहींनी विचारले, 'या कागदांचा तुमचा बिझिनेस आहे का? की पुन्हा पुड्या वगैरे बांधण्यासाठी (या घाणेरड्या कागदांचा) पुनर्वापर करणार आहात?'(हे थोडेसे दरडावून.) मग शांतपणे सांगायचे की नाही, जिथे कचरापिंप दिसेल तिथे त्यात हे टाकणार. अलीकडे लोकांकडे गेल्यावर ते ओशाळून हा कचरा स्वतःच्या बॅगेत टाकतात. थुंकणार्‍यांकडे चार पावले चालत जाऊन थुंकू नका म्हणून सांगायचे, रिक्शा/गाडीतून जात असता शेजारच्या वाहनातून कोणी काही फेकताना दिसले की गाडीची काच उघडून त्यांचे लक्ष वेधायचे, रिक्शावाल्याला थुंकू नकोस म्हणून सांगायचे, रिक्षासाठी हात केल्यावर पान खाणारा रिक्शावाला येऊन थांबला तर नम्रपणे त्याची रिक्शा नाकारायची आणि त्याचे कारणही सांगायचे असे काहीबाही चालू असते. अनेक मजेशीर अनुभव आहेत. एका रिक्शावाल्याने 'ये हम हिंदुओंकी बनारस की पुरानी संकृती है' असे सांगून मला निरुत्तर केले होते. एकाने 'नरसिंहरावजी एक कोटी का घोंटाला कर सकते हैं तो इस थोडीसी गंदगी से क्या होता है' असे सुनावले होते. वर असेही म्हणाला होता, की ये दख्खन के लोग प्रधानमंत्रीपद के लिये लायक ही नहीं हैं. वह पद तो हम ही सम्हालें.' सगळी मजा. हे स्वप्रशंसा म्हणून लिहिले नाही. करण्यासारखे खूप असते, 'आधी केलेच पाहिजे' हे सांगण्यासाठी लिहिले. इतरही काही सार्वजनिक नियम कसोशीने पाळतों. सिग्नलवर थांबा-रेघेच्या अलीकडेच गाडी उभी करणे (मागच्याच्या पेंपें पींपींकडे लक्ष्य न देणे), मार्गिकेचे नियम पाळणे, मागचा पिवळा दिवा आवर्जून वापरणे वगैरे. रेल लोकलमध्ये शेवटच्या स्थानकावर उतरायचे झाल्यास डब्यातले पंखे बंद करणे, रात्री उशीरा उलट दिशेने प्रवास करायचा झाल्यास गर्दी कमी असते अश्या वेळी दरवाजातले पंखे बंद करणे वगैरे 'राष्ट्रीय कार्ये' (!) चालूच असतात. लोकहिताचे काही दिसले की त्याला पाठिंबा देणे, प्रसंगी पुढाकार घेणे, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे, वृत्तपत्रांकडे दाद मागणे या 'एक्सट्रा-करीक्युलर अ‍ॅक्टिविटीज़' सुद्धा थोड्याफार घडत असतात. जाता जाता : वडील गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक होते, उपदेशापेक्षा आचरणावर त्यांचा भर होता. त्यामुळे अगदी लहानपणापासून या सवयी आमच्यामध्ये बिंबल्या.

In reply to by राही

#आदर ! जब्बरदस्त काम ! तुम्हाला माझा सलाम. तुमच्यासारखी लोकं ख-या अर्थाने 'करून दाखवतात'

In reply to by वेल्लाभट

वरील तिघांचेही-प्राडॉ, अगम्य, वेल्लाभट- आभार.

In reply to by राही

मस्तच . लोकांना हे सगळं सांगायची वेळ यावी लागू नये तुम्हाला असा दिवस लवकरच येऊ दे :)

In reply to by वडापाव

आपणही आपला चांगला उपक्रम निष्ठेने सुरू ठेवावा. लोकांच्या उण्यादुण्यांकडे अथवा टोमण्यांकडे लक्ष्य देऊ नये. आपला आनंद आपण राखावा. आपल्या सख्ख्या नातलगांनासुद्धा आपल्या या लष्करच्या भाकर्‍यांमुळे आपली लाज वाटू शकते. ते अंग चोरतात, नजर चुकवतात. आपल्या मुलांनासुद्धा आईवडिलांनी रस्त्यावर असा कचरा गोळा केलेला आवडत नाही. पण हळूहळू सगळे बदलतात. शुभेच्छा.

अतिशय चांगला उपक्रम आहे. समाजात जर काही बदल घडवायचा असेल तर सुरूवात स्वतःपासून केली पाहिजे असं म्हटलं जातं, त्याची सत्यता पटवणारा उपक्रम आहे.

उत्तम उपक्रम. सरकार करेल पेक्षा नागरिक म्हणुन आपण काय करतो हे तितकंच महत्वाचं. स्वच्छता दिसायला लागेल असं प्रत्येकानेच ठरवलं तर, चला आपण सर्वांनी जमेल तसं सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करुया. -दिलीप बिरुटे

मी कधीपासून हे करतोय कल्पना नाही. पण ट्रेन मधे, बस मधे, कुठेही असेन, तरी ही समाजसेवा चालू ठेवतो. लोकलमधे अनेकदा जेंव्हा जेंव्हा समोर कुणी कचरा टाकताना दिसलं तेंव्हा अडवलेलं आहे. टपूनच बसतो मी. एकदा एका बाईने टाकलंच बाहेर मी म्हणेपर्यंत. मग सॉरी म्हणाली. मी म्हटलं अहो आता उपयोग नाही. असो. बसमधे एका माणसाला सांगितलं तर 'तुझे क्या प्रॉब्लेम है?' असा अंगावर आला. मग राडा घातला. फोटो काढला. म्हटलं कर जे करायचं ते. तुझ्यासारखी लोकं आहेत म्हणूनच भारत मागे आहे इत्यादी इत्यादी. अर्थात हे सगळं हिंदीत होतं हे सांगायला नको. तो असंख्य बाहेरच्यांपैकी एक होता. परवाच मॉलमधे दोन मुलं पार्किंगमधे माझ्या पुढे चालत होती. एकाने असं स्टाईलमधे काडेपेटीचं पाकिट भिरकावलं. पुढे एस्कलेटर वर गेल्यावर मी त्याला म्हटलं. की मगाशी जे पाकिट फेकलंस ते टाकायला कच-याचे डबे ठेवलेत इथे. सॉरी म्हणाला (अपेक्षा उलट उत्तराची होती) पण मॉलमधे अलाउड नाही ना आणायला. मी म्हटलं हे कळतं ना, मग इतस्ततः टाकायला अलाउड नाही हे नाही कळत का?.... सॉरी सॉरी म्हणाली दोघं. एकदा एक टॅक्सी बाजूला उभी होती. त्यातल्या प्रवाशाने कसलेसे कागद फाडून खिडकीतून खाली टाकले. आम्ही गाडीत तिघे होतो. काचा खाली करून मोठमोठ्याने त्याच्याकडे बघून टाळ्या वाजवल्या. येडाच झाला बिचारा. मेल्याहून मेल्यासारखं झालं त्याला सगळे बघायला लागल्यावर. सो... हे चालूच ठेवा. सगळ्यांनी करा. घाबरायचं नाही. उलट बोलतात काही जण. शक्य असेल तिथे आपणही नडावं. नाही तिथे तिरकस शेरा मारून विसरून जावं. पण थांबवायचा प्रयत्न करावाच.

In reply to by वेल्लाभट

सालं मलाही वाटू लागलं आहे. असं काही करावं ! -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

नाही या दोनही घटनांमधे ते घडलं नाही. गोष्ट उचलली जावी हा प्रथम उद्देश असतो, पण इथे ते झालं नाही. काडेपेटी गाडीच्या खाली कुठेतरी भिरकावली गेली होती आणि मी तेंव्हा दुसरीकडे गाडी पार्क करत होतो. कागदांच्या बाबतीतही उचलायची कृती झाली नाही.

In reply to by वेल्लाभट

टाळ्या वाजवून खजील करायची मनीषा खूप आहे. पण कधी प्रयोग केला नाही आजवर. कारण उपहासातून राग व्यक्त होतो माझा आणि मग राडा झाल्याशिवाय राहायचा नाही. तरी कधीतरी करून पाहायचं आहेच.

मी ही करतो हे ! विशेषतः मुंबई पुणे प्रवासात इंद्रायणी, डेक्कन चा प्रवास बरेचदा घडतो तेव्हा. फक्त बोलायला जमत नाही. काये की बोलायला गेला की माझा टोन लगेच उपरोधीक होतो त्यामुळे शक्यतो बोलायचे टाळतो. मात्र एक पिशवी घेऊन बसतो व त्यात आजूबाजुच्यांना कचरा टाकायला सांगतो.

जितके जास्त लोक असा पुढाकार घेतील, तितकी सार्वजनिक स्वच्छता वाढेल.

In reply to by आतिवास

मला स्वतःलाच असे इकडे तिकडे कागद टाकायची सवय होती. जास्त काही नाही पण व्हायचे ते. आमच्या हिरॉइनने प्रयत्नपूर्वक ही सवय बदलायला लावली. टाकायचा प्रत्येक कागद ती स्कूटरेटच्या डीकीत ठेवे. सध्या मात्र आठवणीने डस्टबीन हुडकून त्यात ते कागद्/कचरा टाकतो.

सवय बदलल्याबद्दल अभिनंदन. सवय बदलणा-यांचे आभार!

उपक्रम!

वडापाव व राही यांचे उपक्रम स्पृहणीय आहेत. कळायला लागल्यापासून कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी अनावधानानेही कचरा टाकला जाणार नाही याची काळजी घेतो. एखादेवेळेस इतरांनी टाकलेला कचराही उचलून कचराकुंडीत टाकतो पण ते नेहमी शक्य होत नाही. सिग्नलवर थांबलो असताना मागून न थांबता हॉर्न वाजवणार्‍यांना हात जोडून विनंती केली काहींनी ऐकले काही अक्षरशः अंगावर यायचे त्यामुळे तसे करणे थांबवले. हेल्मेट घालून दुचाकी चालवत असल्याने हॉर्नच्या कर्कश आवाजांची तीव्रता अंशतः का होईना कमी होते.

वडापाव, राही, वेल्लाभट, मुटके आणि इतर सर्वजणांचे अभिनंदन! आमच्या घरचे कोणी दुसर्‍याच्या सवयी बदलायला जात नाही पण स्वतः कुठे कचरा करणार नाही याबाबत जागरूक असतो.

नुकताच ट्रेन ने मोठा प्रवास झाला. दोन वेळी धाग्याच्या विषयाबद्दलची समाजसेवा केली. एकदा मीच समोरच्याने टाकलेली चॉकलेटची चांदी उचलून टाकू लागलो. तर लगेच तो द्या द्या मीच टाकतो सॉरी म्हणाला (हा आमच्याच सोबत प्रवास करत होता. थेट ओळख नसली तरी ग्रूपमधे असल्याने नावापुरता परिचय होता. त्यामुळे अख्ख्या ग्रूपलाच संदेश पोचला) दुस-या वेळी सीटखाली पडलेला (कुणी टाकला हे कळायला मार्ग नसलेला) कचरा उचलून टाकायला लागलो आणि जाणून बुजून मोठ्या आवाजात 'काय करणार लोकांना अक्कल नसते, मग आपणच करावं त्यांचं काम' असा काहीसा डॉयलॉग मारला. मुद्दाम यासाठी मारला कारण बाजूला बसलेली दोन जणं 'नमकीन' चा आस्वाद घेत होती आणि एकंदरित गप्पा ऐकून, आविर्भाव बघून ते कचरा कच-याच्या डब्यात टाकतील असं वाटलं नाही. माझ्या डॉयलॉगमुळे असेल किंवा नसेलही, पण पुढे त्यांनी कचरा खाली टाकला नाही.

सार्वजनिक ठिकाणी आपण सांगायची वेळ न येताच गेल्या काही दिवसांत कागदाची किंवा प्लॅस्टिक रॅपरची घडी घालून ती बॅगेत ठेवणारी मंडळी जास्त दिसायला लागली आहेत. ती तशी घडी घालेपर्यंत त्यांना कचरा टाकण्यापासून अडवायची मानसिक तयारी चालू ठेवलेली असते. पण त्यांनी तो कचरा आपल्याकडेच ठेवून घेतला की एकदम हायसं वाटतं.

आपल्याइतका नाही पण खारीचा वाटा उचलतो!