Skip to main content

मुरुड चौपाटीवर नक्की काय घडले??

मुरुड चौपाटीवर नक्की काय घडले??

Published on मंगळवार, 02/02/2016 प्रकाशित
मुरुड येथे आलेल्या महाविद्यालयीन सहलीतील अकरा विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक बातमी सर्वांना धक्का देऊन गेली असेल. मी महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असल्यामुळे जे इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आले व आंतरजालावर प्रसिद्ध झाले, तेवढे कळले (मराठी वृत्तवाहिन्या दिसत नाहीत). ही शोकांतिका कशी घडली, हे समजले नाही. मुले मोठ्या संख्येने होती. तशी जाणत्या वयाची होती. शिक्षक सोबत होते. दिवसाची वेळ होती. किनाराही आडवाटेचा नसून प्रसिद्ध पर्यटनस्थळाचा होता. पावसाळा नव्हता आणि समुद्र खवळलेला नव्हता (नसावा). असे असूनही हे का झाले? कुणाची हलगर्जी याला कारणीभूत होती का?

याद्या 13373
प्रतिक्रिया 69

यावर एक धागा नोंद म्हणून असावा आणि चर्चाही असं मलाही वाटलं.खफ आणि काथ्याकुट प्रश्नात लिहिलं.मागच्या माळीण दुर्घटनेवेळी मिपा बंद पडल्याने दुर्लक्ष झालेलं.

फारच दुर्दैवी घटना. भरती, ओहोटीच्या वेळा बघून समुद्रावर जायला हवं होतं. खरंतर किनार्यावर भरतीच्या वेळी तो भाग पर्यटकांसाठी प्रतिबंधीत करायला हवा आणि लाइफ गार्ड्स असायला हवे होते बीच वर. हकनाक मुलं गेली बिचारी :(

In reply to by पद्मावति

नेमकं उलट आहे. ओहोटी धोकादायक. भरतीला पाण्याची जास्त ओढ किनार्याकडे असते. शिवाय मुरुडसारख्या बीचेसवर भरतीमुळे किनार्यालगतचा बराच मोठा सपाट भाग भरतो आणि लांबवरपर्यंत एक उथळ पाणीसाठा बनतो. ओहोटीत पाण्याची ओढ अंतर्गत भागाच्या दिशेने असते आणि उथळ भागातून पाणी हटून मोठा जमिनीचा भाग उघडा पडतो. मग लोक चालत दूर पाण्यापर्यंत जातात तिथून पाण्याचा खोल भाग तुलनेत लगेच सुरु होतो आणि खोलीतल्या फरकामुळे प्रवाहही तयार होतात. त्यातून पोहता येत नसणार्यांना भरीला पाडून समुद्रात नेणे हे प्रकार कोकणपट्टीवर आलेल्या देशावरच्या टुरिस्टांकडून होताना लहानपणापासून ऐकण्यात आले आहेत.

In reply to by गवि

नेमकं उलट आहे. ओहोटी धोकादायक
समुद्रात पोहोण्यासाठी उतरायचे असेल तर ओहोटीच जास्त धोकादायक. अर्थात, अलिबागच्या किल्ल्यापर्यंत चालत जायचे असेल तर मात्र ओहोटीच हवी. सहल सोमवारी गेली होती असे बातम्यांतून समजते (शाळा-कॉलेजच्या सहली वीकांतालासोडून अशा शालेय दिवशी का?). सोमवारी अष्टमी होती. म्हणजे ६ वाजण्याची वेळ ही पूर्ण भरतीची वेळ. त्यानंतर लगेचच ओहोटी सुरू होते. म्हणजे मुले पाण्यात उतरली (बहुधा ४ च्या सुमारास) तेव्हा भरती होती (हे ठीकच) पण दोनच तासांनी जेव्हा ओहोटी सुरू झाली तेव्हा ती पाण्यात ओढली गेली असावीत. मला वाटते, भरती-ओहोटीच्या वेळा केवळ समुद्र किनार्‍यावरच नव्हे तर आसपासच्या हॉटेल-रिसोर्टातही सहज दिसतील अशा ठिकाणी लावण्याची सक्ती करावी. काही ठिकाणी समुद्र फार लांबवर उथळ न राहता लगेचच खोल होतो. अशा जागांच्या ठिकाणी सुचनांच्या पाट्या लावणे सक्तीचे असावे. रायगड जिल्यातील बर्‍याच ग्रामपंचायती पर्यटक वाहनांकडून टोल घेतात. त्यांना २४x७ जीवरक्षक ठेवण्याची सक्ती असावी. सर्वात महत्त्वाचे, समुद्रातील पोहोणे हे तलाव किंवा नदीतील पोहोण्यापेक्षा वेगळे आहे, याचे लोकशिक्षण होणे गरजेचे आहे.

In reply to by गवि

सहमत, मूळ बातमीत ही ओहोटीचीच वेळ होती असे सांगण्यात आल्याचे स्मरते. धनंजय फेंगडु ह्या स्वतः एका पायाने अपंग असलेल्या स्थानिक व्यक्तिने पोहून जाऊन एका मुलीचे प्राण वाचवण्यात यश मिळवले. त्यातल्या त्यात ही एक प्रेरणादायी सुखद घटना आहे.

In reply to by गवि

या बाबतीत अगदी सहमत. देशावरच्या सामान्य माणसांना समुद्राचा अनुभव आणि त्यामुळे अंदाज नसतो. कोंकणपट्टीत सहसा असे घडत नाही. मात्र मुंबईत घडते याचे कारण अतिउत्साह. मढ-आकशें इथे सरळसरळ शेजारचा डोंगर पाण्यात उतरला आहे हे स्पष्ट दिसते. याचा अर्थ किनार्‍याला लागूनच पाण्यामध्ये जमिनीला तीव्र उतार आहे. आणि त्यामुळे पायतळीची वाळूसुद्धा घसरून पुन्हा दुसर्‍या लाटेसरशी वर येत असते. मध्ये मध्ये खड्डेही तयार होत असतात. वाळू वर येते पण एकदा घसरलेल्या शरीरातला जीव येत नाही. एरवीही, पट्टीच्या पोहोणार्‍यानेसुद्धा अनोळखी पाण्याशी खेळू नये म्हणतात पण ऐकणार कोण?

In reply to by गवि

मुरूडला त्या दिवशी (सोमवारी १ फेब्रुवारीला) संध्या. ५.२३ला पूर्ण भरती होती, रात्री १०.३८ला पूर्ण ओहोटी होती.

In reply to by सुधांशुनूलकर

संध्या. ५.२३ला पूर्ण भरती होती
बरोबर. मी जो सहाचा अंदाज दिला होता तो तिथी गुणीले ३/४ ह्या 'गावठी' समीकरणानुसारे! अर्थात, नंतर आलेल्या बातम्यावरूनही हेच समजते की, मुले पाण्यात असतानाच अचानक वाळू सरकू लागली (ओहोटी सुरू झाली) आणि दुर्दैवाने मुले त्यात ओढली गेली. भरती-ओहोटीच्या वेळा सर्वत्रच जाहीररीत्या लावणे सक्तीचे असले पाहिजे.

In reply to by सुनील

भरती ओहोटी सोडा हो... माझा कयास पक्का आहे. त्यांची मस्ती त्यांच्या अंगाशी आली. बाकी काहीही नाही. शहाण्या माणसाला कळतं कुठे धोका आहे ते.

In reply to by सुनील

मुले कीती फुट पाण्यात होती ?? एकच फुट पाण्यात उभे राहल्यावर ओहोटीमुळे पाण्यात ओढले जाण्याची शक्यता असते का?? ही मुले साधारण पोट कीन्वा छातीपर्यन्तच्या लेवल ईतक्या पाण्यात पोहत असण्याची शक्यता आहे आणि समुद्रात ही लेवलही रीस्कीच असते.

In reply to by सुनील

भरती ओहोटी सोडा हो... माझा कयास पक्का आहे. त्यांची मस्ती त्यांच्या अंगाशी आली. बाकी काहीही नाही. शहाण्या माणसाला कळतं कुठे धोका आहे ते.

In reply to by वेल्लाभट

मस्ती.. दुसरं काही नाही. (हे थोडं असंवेदनशील वाटेल, पण...) १९-२१ वर्षाची २० मुलं जेव्हा असं करायचं ठरवतात, तेव्हा शिक्षक, स्थानिक नागरिक, पोलिस कुणाचंही ऐकत नाहीत. कदाचित त्यांच्या इतर मित्रांनीही अडवलं असेल, नसेल ऐकलं. फोटो काढण्याच्या नादात दरीत कोसळण्याच्या घटनादेखील महाराष्ट्राला नवीन नाहीत. हडपसर मध्ये दर आठवड्याला एखाद्या टीनेजरला श्रद्धांजलीचा 'फ्लेक्स' पाहतो. मागच्या आठवड्यात वाघोलीजवळ एका टँकरने एका मोटारसायकलला धडक दिल्याने 'मोटारसायकलस्वार' मृत्यूमुखी पडला. निमित्त हवं असणार्‍या जमावाने पेटवला टँकर. मग मोटारसायकलस्वार १४ (हो, अक्षरी चौदा) वर्षाचा होता, हे कशाला बघायचं? बरेच अपघात हे केवळ दुर्दैवी अपघात असतीलही, पण असे तारुण्याच्या अनियंत्रित उत्साहाच्या भरात होणार्‍या घटनांना 'अपघात' तरी म्हणावे का? माझ्या असंवेदनशील प्रतिसादाने जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफी मागतो. फार थोडे अपघात

In reply to by तुषार काळभोर

१०० टक्के सहमत

In reply to by गवि

समुद्रात जाणारी व्यक्ती किती आत जाते त्यावर भरती जास्त धोकादायक की ओहोटी हे ठरते. छाती पर्यन्त पाण्यात गेले असता भरती असेल तर एका लाटेत पाणी गळ्यापर्यन्त येते आणि पाय जमिनीवरुन उचलले जातात (पुढे त्या व्यक्तीचा कितपत टिकाव लागतो हे त्याला पोहता येते की नाही यावर अवलम्बुन आहे). अशा वेळी भरतीच धोकादायक. पण जेव्हा आपण समुद्रात already पोहत असतो तेव्हा ओहोटीच्या वेळी आपण आत-आत ओढले जाउ लागतो कारण पाण्याचा ओढा आत जस्त असतो. या वेळी ओहोटी धोकादायक.

समुद्रातील प्रवाह होते काय हे पाहणे आवश्यक ठरेल? उदा. https://en.wikipedia.org/wiki/Rip_current घटना अतिशय दुर्दैवी आहे. तरुण माणसांची फुलासारखी आयुष्ये अकाली खुडली गेली हे अतिशय वाईट आहे. परमेश्वर त्यांच्या आईवडिलांना हा भयानक धक्का सहन करण्यसाठी बल देवो एवढीच इच्छा.

अत्यंत दुर्दैवी घटना. या मुलांच्या कुटुंबियांवर वाईट प्रसंग आला आहे. अनेकदा अशा बातम्या वाचायला मिळतात.अती साहस, समुद्र म्हणजे काय, लाटांचा जोर, पाण्यातले प्रवाह/ भोवरे यांची कल्पना नसताना पर्यटक समुद्रात उतरतात आणि असे काही भयंकर घडते. तरण तलावात वा नदीत पोहणे आणि समुद्रात उतरणे यातला फरक उतरणार्‍यांना लक्षात येत नसावा का? मुरुड, गणपतीपुळे, आक्सा येथील किनारे धोकादायक आहेत. आक्सा - मढ येते धोक्याचे फलक असतानाही अनेकदा पर्यटक उतरतात आणि लाटांनी ओढले जातात अश्या घटना नेहेमी घडतात. समुद्रात उतरताना जरा भान ठेवलं तर असे अपघात निश्चित टाळता येतील. फाजील उत्साह/ आत्मविश्वास वा अनेकदा आग्रहाला बळी पडुन किंवा आपल्याला मुले भित्रे म्हणतील या दबावाखाली सुद्धा पाण्यात उतरले गेले असण्याची शक्यता आहे.

ही घटना नि:संशय अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे ! अश्या घटनांमध्ये बर्‍याचदा (अ) पर्यटक स्थळांवर सुरक्षाव्यवस्था करण्यासंबंधीची शासनाची अनास्था व (आ) सुरक्षेच्या बाबतीतल्या नियमांकडे पर्यटक करत असलेले अक्षम्य दुर्लक्ष... किंबहुना अश्या नियमांचे धडधडीत उलंघन; हे मुख्य दोन घटक दुर्घटनेला आमंत्रण देतात. यापेक्षा अजून दु:खद स्थिती अशी आहे की अशी दुर्घटना झाली की लोक दु:ख व्यक्त करतात, तिची कमीजास्त चर्चा करतात आणि काही दिवसांतच हे सर्व विसरले जाऊन वरची परिस्थिती परत मूळपदावरून सुरू होते. :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टरांशी सहमत, मुख्य म्हणजे दुर्घटना फक्त दुसर्‍यांसोबत घडतात हा दृष्टिकोन असणे हे सर्वात घातक. आय अ‍ॅम नॉट दॅट पर्सन अ‍ॅटीट्युड.

In reply to by संदीप डांगे

डॉ शी सहमत
यापेक्षा अजून दु:खद स्थिती अशी आहे की अशी दुर्घटना झाली की लोक दु:ख व्यक्त करतात, तिची कमीजास्त चर्चा करतात आणि काही दिवसांतच हे सर्व विसरले जाऊन वरची परिस्थिती परत मूळपदावरून सुरू होते. :(
तेच सध्या लोकलच्या दुर्दैवी बळींबाबत चालले आहे.

घटना नक्कीच दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाची कल्पनाही करणं अशक्य आहे. पण या घटनेची दुसरी बाजू सुद्धा बघायला हवी. कुठल्याही पर्यटन स्थळी लोक उत्साहाच्या भरात, जोशात, कोणाला तरी इम्प्रेस करण्याच्या नादात उगाच आचरट, अचाटपणा करतांना दिसतात. शाळा-कॉलेजच्या सहलींत तर हे हमखास असते. त्यावेळी सोबत असलेल्या शिक्षकवर्गाला कोणी हिंग लावूनही विचारत नसतो. त्यांच्या सर्व सूचना, नियम धुडकावून लावले जातात आणि अतिआत्मविश्वासाच्या भरात असे अपघात होतात. ही परिस्थिती बघता त्याचे जबाबदार कोणाला धरावे ते काही कळत नाही. टिव्हीवर बातमी बघत असतांना एका मृताच्या मावशीची मुलाखत चालू होती आणि ती सहलीच्या आयोजकांना दोष देत होती. तिची मनस्थितीही समजण्यासारखी आहे. शोकाकुल अवस्थेत माणूस सारासार विचार करू शकत नाही. पण केवळ फाजील धाडसापायी होणारे अपघात टाळण्यासाठी मुलांना लहानपणापासून योग्य शिस्त शिक्षणातून आणि कृतीतून लावली पाहिजे असं वाटतं.

In reply to by स्मिता.

अगदि सहमत, प्रत्येकाने काळजी घ्यायलाच हवी. पर्यटकाच्या निष्काळजीपणाचा दोष दुसर्‍यावर का द्यावा. आजकाल बुडण्याच्या बातम्या सतत येत असतात त्यामुळे घरातले, शाळेतले सर्वच सतत सावधानतेचा ईशारा देतच असतात पण आपण तरीही जास्त पाण्यात गेलो तर ती चुक दुसर्‍याची कशी??

पटेश. वर्तमानपत्रातील बातमीनुसार सुचना फलका कडे तसेच स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करुन ही मुल पाण्यात गेली.

In reply to by मंदार कात्रे

साला या सेल्फीनेही वाट लावली आहे. रेल्वे ट्रॅक, डोंगर कडा कुठे ना कुठे सेल्फी काढायला जातात जोशमध्ये आणि प्राण गमावुन बसतात. आजकाल अशा घटना खूप घडत आहेत.

In reply to by मोहनराव

कालच सिंहगडावर एकास बोललो … एका ठिकाणी अगदी कड्यावर उभा राहून फोटो काढत होता. दुसरीकडे एकजण पडता पडता वाचला.

मला तरी वाटते प्रत्येक कॉलेज / शाळा यांनी खालील प्रकारची सुरक्षा योजना करावी जेणेकरून मनुष्य हानी टळेल . १. पाण्यात उतरण्या अगोदर life jacket घालून उतरणे. life jacket साठी फार पैसे पडत नाही. अथवा तिथल्या ग्राम पानाचायात ने हि सुविधा द्यावी. chargeable basis वर. २. nylon Rope बरोबर न्यावा . ज्याला पाण्यात उतरायचे आहे त्याने हा rope कमरेला बधायचा व त्याचे एक टोक किनार्याला असलेलें मित्राकडे किवा teacher कडे द्यावे. असे बाहेरच्या country किवा reputed resort मध्ये करतात.

In reply to by कविता१९७८

कुठे कुठे सहली नेणार नाही सांगा? समुद्र नको म्हटला तर बाकीची ठिकाणं आहेतच की धोक्याची!!...मग जाण्यासाठी राह्यलं काय? त्यापेक्षा आपापल्या मुलांनाच थोडं समजुतीनं वागायला शिकवलं तर?

In reply to by सूड

आपापल्या मुलांनाच थोडं समजुतीनं वागायला शिकवलं तर? सहमत आहे. अपघात कसाही आणि कुठेही होऊ शकतो. ट्रिप वा अन्य आयुष्यात आगाऊपणा करू नकोस इतकं शिक्षण पुरेसं आहे. -दिलीप बिरुटे

ही दुर्घटना जिथे घडली ती जागा मुख्य किनार्यावर नाही. मुरुड खाडी जिथे समुद्राला मिळते तिथे हा अपघात झाला. ओहोटी आली की खाडी चे पाणी जोरदार वेगाने समुद्रात घुसते. पाण्याच्या वेगाने मोठ्मोठाले भवरे तयार होतात. ही मुले अशाच भवर्यांमधे सापडली. तसेही खाडीची जागा अजिबात स्वच्छ नाही. मुख्य किनारा सोडुन ही सगळी मुले खाडी कडे का गेली हा प्रश्नंचं आहे.

किनार्यावर येणारे लोक लावलेल्या बोर्डांकडे दुर्लक्ष करतात, म्हणून ज्या स्पॉट ला असे लोक बुडतात, तिथे एक मोठ्ठा बोर्ड लावायचा - xyz या या तारखेला अमुक वेळेला इथे बुडाला, तो xx वर्षांचा होता, त्याला भेटायचे असल्यास जरूर इथे या वगरे वगरे......ट्रिप ची मजा थोडी खराब होईल पण लोक तर जिवंत राहतील.

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

काय उपयोग नाही हो. असे बरेच बोर्ड असतात कुठे कुठे. वर सांगितल्याप्रमाणे 'आय अ‍ॅम नॉट लाईक दॅट पर्सन' असाच अ‍ॅटिट्युड असतो जोवर अडकत नाही तोवर...

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

आमच्याकडे एका टूर कम्पनी रस्त्यावर फलक लावले होते त्यात कोरी फोटोफ्रेम होती त्याला हार लावला होता आणि खाली लिहीले होते "ज्याना घाई होती ते गेले, तुम्ही वाहने सावकाश चालवा" असे फलक वाचुन दचकायला व्हायचे तरीही लोक जैसे थे आहेत, गाड्या चालवताना , ओवरटेक करताना बर्‍याच जणान्चे जीव जातायतच. थोडक्यात पर्यटक जोपर्यन्त स्वत: सावधानता बाळगणार नाहीत तोपर्यन्त अपघात होतच राहणार.

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

असेच बोर्ड ऑलरेडी आहेत. अब तक छप्पन किंवा इतरही. पण "इन्व्हल्नरेबिलिटी" ही मनोवस्था सर्वांच्यातच असते. "अॅक्सिडेंट्स अॉकर टु अदर्स" ही ती भावना.

पुष्कळदा सहलीला येणारी लोक आपल्याबद्दल एक गैरसमज बाळगुण असतात. मला थोड़े थोड़े पोहता येत. वास्तविक हे लोक कुठेतरी उन्हाळी शिबिरात दोन महीने पोहुन हरबर्यावर चढ़लेले असतात. त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाला देखिल बराच काळ गेलेला असतो. फाजिल आत्मविश्वास व् चमकेशगिरी या जोरावर हे पाण्यात उतरतात, परिणाम दिसतो आहेच. पुष्कळदा वाचवायला गेलेला पण यांच्याबरोबर जलसमाधि घेतो कारण बुडनारा जवळ येणाऱ्याला सरळ गळामीठी मारतो. त्यामुळे होते काय की पट्टीचा पोहोणारा देखिल बचाव करण्याचे तंत्र माहीत नसल्यामुळे वाचवताना बुड़तो. काही उपाय सांगत आहे ते वापरले तर कदाचित असे अपघात कमी होतील. पाण्यात उतरण्यास पूर्ण मनाई, जे महाभाग थोड़े पोहोता येते असे सांगतिल त्यांना काहीच येत नाही असे समझावे, मोठा ग्रुप घेऊन सहलीला जात असाल तर एक १० ते १२ मीटरचा मजबूत दोर जवळ ठेवावा, कारण कितीही मना केले तरी काही अतिउत्साहि मंडळी पाण्यात उतरतातच, भावनेच्या भरात वाचवायला थेट उडी मारने टाळावे, दोराचा उपयोग करुन गेल्यास वाचण्याची शक्यता वाढते.

याशिवाय कोकणातील बर्याच समुद्र किनार्यावर वाटरस्पोर्ट्सची मजा पर्यटक घेत असतात. ते किती सुरक्षित आहेत किंवा कसे हे पाहण्यासाठी पर्यटन महामंडळाचे कुणीही तिथे नसते. आपल्याकडील एकही समुद्र किनार्यावर जीवसुरक्षक नेमलेला किंवा उपलब्ध आढळला नाही. याउलट केरळमधील समुद्रकिनार्यावर पर्यटकाना सूचित करण्यासाठी जीवासुराक्षक उपस्थित आढळले व ते पर्यटकाना समुद्रात आतमध्ये जाण्यास प्रतिबंध करतांना दिसून आले. देशावरच्या हौशी पर्यटकांना समुद्राचे आकर्षण असते परंतु समुद्राच्या पाण्यात उतरतांना काय काळजी घ्यायची याचे भान मात्र नसते.

दुर्दैवी घटना, अपघात टाळता येऊ शकतात पण त्यासाठी जनता आणि सरकार दोघांनीही बांधिलकी दाखवायला हवी.

लोक मूर्ख असतात किंवा फाजिल आत्मविश्वास हे असल्या अपघातांचे मुख्य कारण आहे. नुकतेच ठोसेघर धबधब्याला याचे सप्रमाण उदाहरण पाहिले.तिथे सरकारी काळजी घेतलेली आहे.बॅरीकेड्स आहेत.बोर्ड लावलेला आहे.तरीही लोक बॅरीकेडखालुन पलिकडे जातात.हातात लहान मूल घेऊन जाणारेही महाभाग होते.त्या गुळगुळीत दगडांवरुन तोल सावरत जाऊन पाण्यात सेल्फी काढणारे होतेच.हा धबधबा सरळ खोल खाली डोहात उतरतो.जीव वाचवायला स्कोपच नाही.कारण वाचवायला पण खाली उडी मारून पोहावे लागेल.अशा मूर्ख लोकांसाठी कोणीतरी मग बांद्रा दुर्घटनेसारखा स्वतःचा जीव हकनाक गमावून बसतो.:(

सज्जड पुरावा. दैनीक सामना मधून

आवाज नीचे करो; नही तो फेक दूंगा

पी. ए. इनामदारांच्या जिभेचा लगाम सुटला पुणे, दि. ३ (प्रतिनिधी) – ‘मुरुड’ दुर्घटनेत मरण पावलेल्या मुलांच्या पालकांशी बोलताना संस्थेचे प्रमुख पी. ए. इनामदार यांच्या जिभेचा लगाम सुटला. पालकांबरोबर सुरू असलेल्या बैठकीत इनामदार यांनी ‘आवाज नीची करके बात करो, नीचे फेक दूंगा’ अशा शब्दांत चक्क धमक्या दिल्या. एकाला तर त्यांनी बैठकीतून हाकलूनही दिले. मुलांच्या मुत्यूच्या दु:खातून अद्याप कोणी सावरलेही नाही. तोवर संस्थेकडूनही अशी अपमानास्पद वागणूक मिळाली. परिणामी बैठकीतून बाहेर येत काहीजणांनी शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे त्यांना पोलिसांकरवी संस्थेच्या आवारातून हाकलून देण्यात आले. मुरुडमधील दुर्घटनेत मरण पावलेल्या १४ मुलांसाठी आझम कॅम्पस येथे आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर ााही पालकांनी काल त्यांना आलेल्या अनुभवाविषयी तक्रारी केल्या. मुलांचे मृतदेह आणताना महाविद्यालय प्रशासनाने हलगर्जी केली. माहिती व्यवस्थीत दिली जात नव्हती. अशा तक्रारी करत संतप्त पालकांनी निषेध व्यक्त करून घोषणाबाजी केली. वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी पालकांना चर्चेसाठी बोलावले. मात्र, या चर्चेत पालकांची व्यथा ऐकून घेण्याऐवजी त्यांना इमारतीवरून फेकून देण्याची भाषा खुद्द संस्थाप्रमुखांनीच वापरली. इतकेच नाही, तर त्यांना बैठकीतून पालकांनाच हाकलून देण्यात आले. मृतदेह आणताना मुरुड येथे महाविद्यालयाचा प्रतिनिधी का नव्हता? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. त्यावर पी. ए. इनामदार यांनी संस्थेच्या प्राध्यापकांची एक टीम तेथे होती, असे स्पष्ट केले. रुग्णवाहिका धुण्यासाठी आम्हालाच पाचशे रुपये द्यावे लागले, अशी तक्रार एका पालकाने केली. यावर बोलताना इनामदार यांनी ‘त्यांना चप्पलने मारायचे होते, पैसे कशासाठी दिले’? असा सवाल केला. इनामदार यांचा वाढलेला आवाज पाहून एक मुलाचे पालक म्हणाले, आपण चर्चा करीत आहोत, वाद नाही, त्यामुळे शांतपणे बोलू. मात्र, इनामदार आणि संस्थेच्या इतर पदाधिकार्‍यांनी ‘आवाज खाली करून बोलायचे कोणाला सांगता?’, ‘बाहेर फेकून देईन’ अशी धमकी देत त्यांना बैठकीतूनच हाकलून दिले. सामने आया तो चप्पलसे मारूंगी…! बैठकीतून हाकलल्यानंतर संतप्त पालकांनी पी. ए. इनामदार आणि महाविद्यालय प्रशासनाविरोधात शिवीगाळ केली. ‘मेरे सामने आया तो चप्पल से मारूंगी’, अशा शब्दांत एका महिलेने संस्थेच्या पदाधिकार्‍यांना शिव्यांची लाखोली वाहिली. पैसा कमविण्यासाठी संस्था चालवितो. मुस्लिम असून याचा उपयोग नाही, असला कसला मुस्लिम? असे एकेरीवर येत आरोप करून काहीजणांनी इनामदार यांच्या धर्माचाही उल्लेख केला. श्रद्धांजली आटोपताच जेवणावर ताव आझम कॅम्पस येथे झालेल्या श्रद्धांजली सभेनंतर महाविद्यालय परिसरातून पालक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी गेल्यावर संस्थेच्या आवारातच पदाधिकार्‍यांनी जेवणावर ताव मारला. मुरूड येथील दुर्घटनेवर संपुर्ण राज्य हळहळ व्यक्त करीत आहे. त्या मुलांचे कुटूंबिय अजुनही शोकसागरातून बाहेर आले नाहीत. असे असताना दुसरीकडे संस्थेचे पदाधिकारी संस्थेच्या आवारातच जेवायला बसले

अतिशय वाईट वाटणारी घटना. समुद्र पाहिला की लोकांचा कंट्रोल जातो. किती आत जाऊ आणि किती नाही. पाण्यासमोर मस्ती आवरलीच पाहिजे. ट्रिपचा अनुभव असा असतो की मुलं मुली कॉलेजची काही अगदी शिस्तीत असतात आणि एक्स्ट्रा डेअरींग करणारे आणि शान मारणारे पोरं ही ट्रिपची सर्वात मोठी अडचण असते, स्वत:तर शिस्त पाळत नाही आणि दुस-याला तसंच करायला प्रवृत्त करतात. 'कुछ नहीं होता रे' हा आगाऊपणा नडतो. एका ट्रिप मधे एक विद्यार्थिनी दिवस रात्र फोन वर सर्वांसोबत राह्यचीच नाही. परेशान केलं. सर आम्ही ट्रिपला आलोय इंजॉय करू द्या. नसेल पटत तर मी इथे उतरुन जाते. नस्ता ताप नको म्हणून आम्ही नरमाईची भूमिका घेतली ट्रिप संपली त्याच दिवशी ती मुलगी एका मुलाबरोबर पळुन गेली. मग पोलिसांची चौकशी आणि नसत्या भानगडी. :( मुरुडच्या किना-यावर स्थानिक रहीवाशी अशा लोकांना समुद्रात आत जाऊ नका अशा सुचना देतच असतात हे मी तिन चार वेळी अनुभवले आहे. गणपतीपुळेचा काठावर बोर्ड लावलेला आत्ता पर्यन्त बुडालेल्या मुलांची नावं लिहिलेली इतकं असून सुद्धा तुम्ही स्वत:हुन मरणाच्या दारात जात असाल तर काय करणार ? मला कॉलेजची ट्रिप घेऊन जाण्याची भीती यामुळेच वाटते. अनेकदा इतर पर्यटन स्थळी ट्रिप घेऊन गेलो आहे पण कितीही मुलं म्हणाली तरी मी आज पर्यन्त ट्रिप साठी समुद्र जिथे आहे तो पर्याय टाळलाच आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हृद्यापासून आलेला प्रतिसाद. तुमची कळकळ पोचली. तरूणांची फाजील मस्ती करण्याचे कारण लहानपणापासून जबरदस्तीच्या 'गप बैस' संस्कारात असावे. मोठे झाल्यावर ते महत्त्वाच्या सूचनाही ऐकत नाहीत. त्यांना तशा सूचना ही 'नियंत्रणाचा प्रयत्न' वाटतात. आपल्या मुलांनी मोठे झाल्यावर असे वागू नये याकरता काय करता येईल याचा विचार करतोय. 'त्या' वेळेस उपदेश करुन उपयोग नसतो म्हणून.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"मला कॉलेजची ट्रिप घेऊन जाण्याची भीती यामुळेच वाटते. अनेकदा इतर पर्यटन स्थळी ट्रिप घेऊन गेलो आहे पण कितीही मुलं म्हणाली तरी मी आज पर्यन्त ट्रिप साठी समुद्र जिथे आहे तो पर्याय टाळलाच आहे." एका प्रत्यक्ष अनुभव असणार्या प्राध्यापकाचे हे मत आहे. मग हीच सूचना शिक्षण उपसंचालकांनी दिली तर सर्वत्र ओरड. मुले निसर्गाच्या जवळ कशी जाणार इ.

In reply to by एक सामान्य मानव

ओ दादा. त्यांची ती जाऊ देत स्वतःच्या जिम्मेदारीवर. अशी उंडारणारी कार्टी घेऊन जीवाला घोर लावून कोण कशाला जाईल? मुलांनी निसर्गाजवळ जाणेच हवंय तर शिक्षकांचा बळी का द्यावा. उंडारू दिले नाही तर शिक्षकच 'व्हिलन' म्हटले जातात.. बरंवाईट झालं तर शिक्षकच 'बेजबाबदार' म्हटले जातात. शि.उ.सं. यांच्या सूचनेस व बिरुटेसरांच्या निर्णयास बिनशर्त अनुमोदन.

ऐकलेली माहिती: गणपतीपुळे इथला समुद्र धोकादायक आहे हे अनेकांना माहिती असेल. तसे फलकही आहेत तिथे. तरीही लोकं जातात आत; बुडतात आणि मग तिथल्या बाजूच्या गावातली मुलं माणुसकीपोटी वाचवायला वगैरे जातात आणि स्वतःचा जीव गमवतात. अशा घटना झाल्यामुळे गावकर्‍यांनी ठरवलंय की आता कुणीही वाचवायला जायचं नाही. पुरेशा सूचना दिलेल्या असूनही कुणी जात असेल तर त्यासाठी आपल्या गावातल्या कुणी जीव धोक्यात घालायचा नाही. तरी कुणीतरी वाचवायला गेलं तर त्या कुटुंबाला म्हणे वाळीत टाकलं. मग पुढे निस्तरलं ते; पण म्हणजे आता गावकर्‍यांनाही कळून चुकलंय की अशा मस्त्या करणा-यांची वाचायची लायकी नाही आणि त्यासाठी आपण जीव गमवावा हे तर मुळीच योग्य नाही. अर्थात सगळे असे नसतात पण सुक्याबरोबर ओलं; तसं झालंय ते. ख.खो.दे.जा.

In reply to by वेल्लाभट

थोडे विषयांतर.. पण हे आहे असेच लागू होते ते मोबाईलवर बोलणार्‍या लोकांबाबत (महिला व पुरूष) आणि ओढणी फडफडवत गाडी चालवणार्‍या महिलावर्गाबाबत. ओढणी पार गळ्याच्या भोवती गुंडाळून घेतलेली असते आणि ओढणीचे एक टोक आत्ता चाकात जाईल की मग चाकात जाईल असे लोंबकळत असते. बर्र.. ते धडपडून आपल्या गाडीखाली आले तर काय अशा विचाराने आपला पण जीव टांगणीवर. कितीजणांना सांगायचे आणि कितीवेळा सांगायचे.

In reply to by मोदक

अगदी अगदी. स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याबाबत प्रचंड उदासीनता आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये हेल्मेट सक्ती आहे, त्याशिवाय गाडी गेट च्या आत येऊ देत नाहीत. परिणाम - डाव्या हातात हेल्मेट अडकवून गाडी कंपनीपर्यंत आणायची, हेल्मेट घालायचं आणि मग जायचं गेट मध्ये. शो जातो म्हणून गाडीचे साईड मिरर काढून ठेवायचे, राँग साईड ने गाडी चालवायची (तीही हेडलाईट बंद करून) इ. आहेच.

मस्ती- एक जण जातो म्हणुन दुसरा .दुसरा जातो म्हणुन तिसरा.... बकि काहि नहि वाळू- अक्सा बिच वर पण हाच प्रकार आहे...तिथली वाळू फर्म नाही ...रोज वेगळॅ खड्डे होतात....त्यचा अन्दाज नहि आल तर असे होते

एकदम डझनभरापेक्षा जास्त मुले बुडून मेली हे आश्चर्यकारक वाटते. एखादी प्रचंड लाट येऊन त्यामुळे घडले की काय? चौकशीनंतर काय ते कळेलच. पण अकाली आपल्या मुलांना मूठमाती देण्याची वेळ आलेल्या पालकांवर मात्र आभाळ कोसळले असणार. असे पुन्हा न घडो. भारतात नियम पाळणे हे बहुतांशी बुळेपणाचे, बावळटपणाचे लक्षण मानले जाते. ते धुडकावून वागणे हे शौर्याचे, पराक्रमाचे लक्षण समजले जाते. विशेषतः तरूण मुलांचा असा समज असतो की आपण नियम मोडून काही बहादूरी करुन दाखवली की मुलींना आपले फार कौतुक वाटेल! नियम हे पुढच्यास ठेस मागचे शहाणे ह्या तत्त्वावर बनवलेले असतात. पण काही लोकांना ठेच लागली तरच शहाणपण शिकण्याचा ध्यास असतो आणि काही वेळा ही ठेच जीवघेणी ठरते.

In reply to by हुप्प्या

मुळात नियम हे तोडण्यासाठीच असतात आणि आजूबाजूला विशेषतः आपलेच आई वडील बिनदिक्कत नियम तोडताना दिसतात. मग मुले काय वेगळे करणार? ज्या पद्धतीने पुण्यात काय आणि बाकीच्या ठिकाणी गाड्या लोक चालवितात ते पाहिल्यावर सतत कोण मरणार का हाच विचार येतो. कोणालाच नियम पाळायचे नाहीये फक्त असे काही झाले कि म्हणायचे आणि खरे साहेब म्हणतात तसे and they happily lived ever after

आचरा बीच वर सहकुटूंब गेलो असता आणि गुडघ्याएवढ्या पाण्यात उभे होतो वय १०-५० असा २०-२२ लोकांचा ग्रुप होता . आणी अचानक खालचा वाळूचा मोठा थर परतीच्या लाटेसोबत वाहून गेला आणि आम्ही गुडध्याभर पाण्यातून छातीभर पाण्यात क्षणार्धात आलो. सुदैवाने सगळेजण जवळ जवळ उभे होते . लहान मुलांना मधे घेउन एकमेकांचे हात धरून गोल रिंगण करून बाहेर आलो. सर्वांना पोहता येत होते आणी गुडघ्याभर पाण्यात होतो हेच नशीब , अशा वेळेस अगोदरच छाती/ गळ्यापर्यंतचा माणूस नक्की बुडेल. समुद्राचा तळ फसवा आणि सतत बदलणारा असतो याचे भान ठेवावे.

अतिशय दुर्देवी घटना शाळेत पोहणे सक्तीचे करायला हवे असे वाटते.म्हणजे जरी असा प्रसंग ओढवलाच तर काही प्रयत्न तरी करता येइल

माझे माहेर मुरुड आहे. अनेक वर्ष आम्ही समुद्रात पोहण्यासाठी जातो, पण आम्हाला कधीही कुठला धोका वाटला नाही. तवसाळकर लॉजच्या मागे समुद्रात घळ आहे आणि राजवाड्याच्या खालील भागात खडक आहेत. ह्या दोन जागा वगळून संपूर्ण समुद्र किनारा सुरक्षित आहे. त्यापैकी तवसाळकर लॉजच्या मागे अतिशय घाण आहे व राजवाडा खूप लांब आहे. त्यामुळे स्थानिक लोक तिथे अजिबात जात नाहीत. ८०% बाहेरील पर्यटक दारू पिवून समुद्रावर येतात. ते कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. उलट त्यांचाच लोकांना त्रास होतो. अनेक जण छातीपर्यंत किंवा पोटापर्यंत आत जातात. स्थानिक लोक सावधान करतात पण कुणी ऐकत नाही. बोर्ड लावले जातात पण ते पावसाने, खाऱ्या हवेने सतत खराब होतात. लोक गाड्या ठोकून ते मोडतात. त्यावर कपडे वाळत घालतात. आणि खर सांगा हो असे बोर्ड वाचले जातात का ? खाली लिंक देत आहे. त्यातील या दुर्घटनेची सर्व कारणे बरोबर आहेत. http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=11378226

In reply to by पूर्वाविवेक

दुपारी २.३० वाजता जेवल्यावर लगेच हि मुले तवसाळकर लॉजच्या मागे पोहत गेली होती असे कळले. बहुधा काही मुले व शिक्षक अजून जेवत असावेत.

In reply to by पूर्वाविवेक

मुद्दे पटले.. पण एका दमात १४ पोर वाहून गेली यामागे फक्त मस्ती कारण असेल वाटत नाही.. नक्कीच घळ प्रकारात सापडली असावी बिचारी. त्यातही पोरी जास्त आहेत, त्यामुळे त्या एवढा पोरांवर "फ्ल्याश" मारायला डेअरिंग करत असतील असे वाटत नाही.. असो.. सरकारने अहवाल मागवला आहेच. बघूया...

सुशिक्षित लोक इ एल सी बी वारंवार ट्रीप होतो म्हणुन इलेक्ट्रिशियनला तो बायपास करायला सांगतात, फ्युज उडु नये म्हणुन त्यात तांब्याची जाड तार घालायला सांगतात.

झाला प्रकार खूपच वाईट झाला. मला काळजी वाटते कि उर्वरीत विद्यार्थी जे पाण्यात न उतरल्याने वाचले जर त्यांच्या मनस्थितीविषयी विचार करूया कवळ्या वयात आपल्या मित्र मैत्रिणींचा असा दुर्दैवी मृत्यू पाहून पार भेदरून गेली असतील. ह्या प्रसंगाचा ओरखडा त्यांचा मनावर संपूर्ण आयुष्य राहणार ,ह्या मुलांना मानसोपचार मिळाले पाहिजे. बाकी शाळेच्या पदाधिकाऱ्यांचे वर्तन अयोग्य होते. भले पालकांनी त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली तरी त्यांची तत्कालीन मनस्थिती पाहता त्या कडे दुर्लक्ष करत संस्थेच्या पदाधिकार्यांनी संयम बाळगायला पाहिजे होता.

मुरूडला हेच झाले नसावे. पण समुद्राची विशिष्ठ ठिकाणची परिस्थीती अशी असू शकते हे दाखवतो. https://www.facebook.com/realkraze/videos/726345530835440/?fref=nf