आज ओपींचा वाढदिवस. लता मंगेशकरसारख्या स्वरसाम्राज्ञीच्या उपेक्षेवर बेदिक्कत मात करत स्वतःची संपूर्ण कारकिर्द घडवणारा हा एकमेव संगीतकार. `आय एम म्युझिक इल्लीटरेट' असं मनमोकळेपणानं कबूल करून, शास्त्रीय संगीताचं कोणतंही शिक्षण नसतांना केवळ स्वतःच्या स्वरसौंदर्याच्या आकलनावर, एकसोएक बंदिशी बांधणारा हा अवलीया रसिकांना कायम मोहवत आला आहे.
कोणत्याही चांगल्या स्वर रचनेचे केवळ तीन घटक असतात, क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी. क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी हे सारखेच वाटणारे घटक दोन प्रकारे व्यक्त होतात, एक म्हणजे, दोन स्वरांमधलं अंतर आणि दुसरं, त्या अंतरामुळे ऐकू येण्यातली सुस्पष्टता. जर दोन स्वरातलं अंतर वाढलं तर ऑडिबिलीटी आणि क्लॅरिटी वाढते पण मेलडी बिघडते. दोन स्वरातलं अंतर कमी झालं तर मेलडी वाढू शकते पण क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी कमी होते. त्यामुळे स्वरसंयोजनात पहिल्या स्वरानंतर नेमका दुसरा स्वर कोणता घ्यावा आणि मग त्यापुढचा कोणता घ्यावा...अशा सांगितिक चिंतनातून संपूर्ण गाणं तयार होतं.
सगळं गाणं म्हणजे क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी या तीन पैलूंवर काम करत निर्माण झालेली एक धून असते. या धूनेवर मग शब्द आणि वाद्य यांची गुंफण होऊन आपण ऐकतो ते गाणं तयार होतं.
ओपींची खासियत म्हणजे त्यांची शब्दांवरची हुकूमत. एखादी सुरेख धून बांधल्यावर ओपी लिरीस्टला घेऊन एकेक शब्द तोलायचे, त्यामुळे ओपींची गाणी हृदयाला स्पर्शून जातात. ओपीचं गाणं लागलं की नकळतपणे आपलं लक्ष गाण्याकडे वेधलं जातंच.
आप यूं ही अगर हमसे मिलते रहे... असं नुसतं रफीनी म्हणायचा आवकाश की आपण गाण्याकडे ओढले जातो. आशानी, बलमा खुली हवामें...म्हटलं की आपल्याला मोकळ्या आकाशाखाली आल्यासारखं वाटतं. ओपींच्या गाण्यांची कडवी म्हणजे एकेसोएक शेर असल्यासारखी आहेत. त्यामुळे ओपीचं संगीत म्हणजे साध्या सोप्या शायरीलाच जणू स्वरसाज चढवलेला आहे.
इंटरल्यूड (म्हणजे गाण्यामधल्या म्युझिकसाठी) वाद्य निवडण्याचं ओपींचं कौशल्य हा तर क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी या तीन्ही पैलूंचा अप्रतिम आविष्कार आहे. मग ती बहुत शुक्रीया बडी मेहेरबानी मधली हार्मोनीयम असो, दिवाना हुवा बादल मधली सतार असो की एक परदेसी मेरा दिल ले गया मधली बीन असो; ओपींचं वाद्य निवडण्याचं कौशल्य अद्वितीय होतं.
ओपींचा रिदमसेन्स हा तितकाच कौतुकाचा विषय आहे. माझ्या मते ओपींनी अत्यंत साधे, पण एकदम उठावदार रिदमस वापरले. साध्या रिदमची खासियत अशीये की तो ऐकणार्याच्या हृदय-लयीशी समरुप होतो त्यामुळे ऐकणार्याला ते गाणं आपल्यालाही सहज गाता येईल असं वाटतं.
उस्ताद आमीर खां हे ओपींचे खास दोस्त, एकदा त्यांच्यावर नाराज झाले. ओपींना त्यांच्या नाराजगीचं कारण कळेना तेंव्हा ते आमीर खांना भेटायला गेले. उस्तादजी म्हणाले की तू शास्त्रीय संगीत शिकलायंस हे इतके दिवस माझ्यापासून लपवून का ठेवलंस? त्यावर ओपी म्हणाले, मला माझ्या गाण्यांची शपथ, मी खरंच शास्त्रीय संगीत शिकलेलो नाही. पण तुम्हाला असं का वाटतंय? त्यावर खांसाहेब म्हणाले की शात्रीय संगीत शिकल्याशिवाय असं गाणं करता येणंच शक्य नाही. ओपींंनी विचारलं कोणत्या गाण्याबद्दल म्हणतायं तुम्ही? तर खांसाहेब म्हणाले तुझं हे गाणं, देखो बिजली डोले बीन बादल की!
मधे मी आनंदजींची मुलाखत पाहात होतो तेंव्हा ते म्हणाले इस तालमें तो हमेभी गाना बांधना मुश्कील है, इसे आडा चौताल कहेते है.
आशा पारेखनी ओपींच्या घेतलेल्या मुलाखतीत विचारलं होतं की `आखिर आपकी दिलकश मौसिकी का राज क्या है?' त्यावर ओपी हसून म्हणाले "बस एक ही चिज है, रोमान्स! मेरे गाने जबभी आप सुनेंगे तो आपका दिलभी उसी मोहोब्बतके रंगमे रंग जाएगा".
वाचने
14220
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज कोई प्यारसे दिलकी बाते कहे गया!
फार आवडते गीत
In reply to आज कोई प्यारसे दिलकी बाते कहे गया! by विवेक ठाकूर
अगदी सुंदर गाणे.
In reply to फार आवडते गीत by चौकटराजा
खरंच मनात रुंजी घालतंय हे
In reply to फार आवडते गीत by चौकटराजा
मस्ती चॅनेल
बलमा खुली हवा में, महकी हुई फिजा में