Skip to main content

महीन्याभरात

लेखक विकास यांनी शनिवार, 27/12/2008 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
हे मी २६ डिसेंबरच्या (बॉस्टनच्या) रात्री लिहीत आहे. महीन्याभरापूर्वीची अशीच रात्र आठवत आहे. अस्वस्थता काय असू शकते हे नको इतके समजले. पुढचे ३-४ दिवस बाकी सर्वकाही सुरळीत चालू असले तरी मुंबई एके मुंबई अशी अवस्था डोक्यात घर करून राहीली होती आणि आतल्या आत त्रागा होत होता. हे अतिरेकी असे का वागतात म्हणून हा त्रागा नव्हता, तर एकीकडे चंद्रावर यान पाठवणारे, दुसरीकडे सागरी चाचांची नाकेबंदी करणारे आपण इतके कमी कसे पडतो या विचाराने हा त्रागा होता. दहशतवादी दहशतवादच करणार पण त्याला आपल्याकडे तात्काळ उत्तर नव्हते ह्याने आपल्या राज्यकर्त्यांची आणि नोकरशाहीची वास्तवीक मान लाजेने खाली जायला हवी... अर्थात तसे काहीच झाले नाही. पोलीसांची शस्त्रे आणि इतर मागण्यांच्या फायली दाबून ठेवणारे हे बाबू कोण यांची नावेपण आजतागायत माध्यमात प्रसिद्धीस आली नाहीत...आबा पाटलांनी राजीनामा दिला, विलासरावांना आणि शिवराज पाटलांना लोकदबावाखाली जावे लागले, प्रत्येक राजकीय पक्ष आपल्याला हवे तसे या गोष्टीचा वापर करू लागला आणि जन पळभर म्हणतील हाय हाय अशीच अवस्था वाटावी अशी परीस्थिती परत आली. कधी नव्हे ते भारतीयांनी ही गोष्ट खूपच मनाला लावून घेतली. शाळेत असतानाची गोष्ट आहे. मला वाटते पंजाबमधील दहशतवादी कारवायांमधे एकदा काही तरी खूपच मोठी हिंसा झाली होती, डिटेल्स आठवत नाहीत, पण तेंव्हा अशी राजकीय आणि सामान्य जनता मनापासून एकत्र येऊन किमान एक दिवसाचा कुणाच्याही जबरदस्तीने नाही तर उस्फुर्तपणे निषेध पाळला. पण परत पहीले पाढे पंच्चावन... यावेळेस जनता अजून विसरली आहे असे वाटत नाही. तरी देखील लोकदबाव साहजीक कमी होत आहे... तर मला आता प्रश्न विचारावासा वाटतो की गेल्या महीन्याभरात जाऊंदेत पण नवीन मुख्यमंत्री आल्यापासून, केंद्रीय गृहमंत्री आल्यापासून सरकारने काही खरेच पावले उचलली आहेत असे वाटते का? काय तात्काळ होणे महत्वाचे आपल्याला व्यक्तिगत वाटत होते आणि वास्तवात काय होत आहे? मिपाकरांचे विचार या संदर्भात ऐकायला आवडतील.

वाचने 1661
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

काय तात्काळ होणे महत्वाचे आपल्याला व्यक्तिगत वाटत होते आणि वास्तवात काय होत आहे? विस्तृत प्रतिसाद नंतर देईन पण आता चटकन जे आठवले ते लिहीत आहे. चार दिवसांपूर्वीच भारतात परतलो. अपेक्षा ही होती की तपासणी अत्यंत कडक असेल आणि बाहेर येण्यासाठी थोडा अधिक वेळ लागला तरी चालेल. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. कस्टम ऑफीसरचे लक्ष कोणी किती बाटल्या आणल्यात ह्याकडेच होते! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

महिना झाल्यानंतर अजुन ही काही ठिकाणी निषेध सभा आयोजित केल्या जात आहेत.( उदा. - कालच पुणे इथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.) नवीन मुख्यमंत्री , केंद्रीय गृहमंत्री आल्यापासून सामान्य मुंबईकरांच्या जिवनात काहीही फरक पडलेला नाही. अजुन ही जीव मुठीत धरुन आम्ही सकाळी बाहेर पडतो. जन पळभर म्हणतील हाय हाय अशीच अवस्था वाटावी अशी परीस्थिती परत आली. दुर्दैवाने असेच घडत आहे. सामान्य मुंबईकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा