Skip to main content

गोष्टः अकबर बिरबलाची!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 24/11/2015 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती.... कुणी म्हणालं की, "तरवार वा पट्टा. जोवर हातात दम आहे तोवर चिंता नाही." कुणी म्हणालं की, "धनुष्य-बाण. दूरवरूनच गनीम गारद करता येतो." अजून कुणी म्हणालं की, "तोफ. एका गोळ्यात अनेक गनीम मारता येतात." वगैरे, वगैरे... बिरबल काहीच बोलत नाहिये हे पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं, "क्यों बिरबल, तुम्हारा क्या खयाल है?" बिरबलाने दोन क्षण विचार केला आणि उत्तर दिलं, "जी हुजुर, ये सब लोक सही फर्मा रहे है. इनमेंसे हरएक हातियार खुद अपनेमें बुलंद है. लेकिन मेरी मानो तो हुजुर, आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है." बादशहाला बिरबलाचं हे अनपेक्षित उत्तर आवडलं नाही. "नही बिरबल, हम नही मानते ये बात. आखिर कौनसा तो हातियार सबसे बुलंद तो होना ही चाहिये!" "आप नही मानते तो छोड दीजिये जहांपन्हां", बिरबलाने उत्तर दिलं, "मैं तो यही बात मानता हूं." बादशहाला आणि त्याच्या इतर दरबार्‍यांना हे उत्तर जरा उद्धटपणाचं वाटलं... ........ एके दिवशी बिरबल त्याच्या नेहमीच्या रस्त्याने देवळात चालला होता. गेली कित्येक वर्षे तो याच रस्त्याने, एका छोट्या गल्लीतून त्याच्या त्या विविक्षित देवळाकडे जात असे. आजही नेहमीप्रमाणे तो ती चिंचोळी गल्ली अर्धी चालून आला आणि बघतो तर काय, समोरून एक महाकाय हत्ती आक्रंदत, जो समोर येईल त्याला पायाखाली तुडवत, सोंडेनं फेकून देत धावत येत होता... बिरबलाला स्वतःवरच्या संकटाची जाणीव झाली. पण देवळातच जायचे असल्याने तो नि:शस्त्र होता.... काय करावे ते त्याला सुचेना. हत्ती तर दर क्षणी जवळ जवळ येत चालला होता.... बिरबलाने इकडेतिकडे पाहिलं.... आणि त्याला जवळच एक मरतुकडं कुत्रं दिसलं... बिरबलाने क्षणभर मनाशी विचार केला आणि मग पुढे होऊन झट्ट्कन ते कुत्रं उचललं. त्या कुत्र्याचे मागचे दोन पाय हातात धरून ते दोनदा गरागरा हवेत फिरवलं. ते कुत्रं बिचारं घाबरून किंचाळायला लागलं.... हत्ती फेकीच्या टप्प्यात येताच बिरबलाने ते किंचाळणारं कुत्रं त्या आक्रमक हत्तीच्या रोखाने फेकलं... ते बरोबर जाऊन नेमकं त्या हत्तीच्या गंडस्थळावर आपटलं!!!! हत्तीला हे नेमकं आपल्यावर काय येऊन आदळलं ते कळेना! तो बिचकला आणि अबाऊट टर्न करून विरूद्ध दिशेला पळत सुटला... बिरबलाने सुटकेचा निश्वास टाकला... गर्दीत असलेल्या बादशहाच्या हेरांनीही ही सगळी हकीकत बादशाहाच्या कानावर घातली... "आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है!" ..... ..... ..... हे सगळं आताच आठवायचं काय कारण? काल चांदणी रात्र होती... चांदणी रात्र असली की रात्री जेवण झाल्यावर झोप येईपर्यंत माझ्या घरामागल्या आवारात खाट टाकून पडायचं आणि त्या पिठूर चांदण्याचा आनंद घ्यायचा ही माझी नेहमीची सवय. त्याप्रमाणे काल रात्रीही तसाच पडलो होतो... झोप अनावर झाली की नेहमी मी उठून घरात जाऊन झोपतो... पण काल खूप बागकाम केल्यामुळे थकवा जरा जास्त आला होता म्हणा किंवा काही अन्य कारणामुळे म्हणा, तिथेच बाहेर खाटेवर कधी डोळा लागला ते कळलंच नाही... सुमारे अडीच-तीनच्या सुमारास एका प्रकारच्या कूऽऽच-कूऽऽच अशा आवाजाने आणि कसल्याश्या अनामिक प्रेझेन्सने मला दचकून जाग आली.... झटक्यात उठून सभोवार पाहिलं तर काहीच दिसेना. तोवर चंद्र ढळला होता आणि त्यामुळे सर्वत्र मिट्ट काळोख होता... इकडे तिकडे बघतांना सहज नजर बॅकयार्डाच्या कुंपणाबाहेर गेली आणि बघतो तर, चकाकणार्‍या गोलांच्या दहा-बारा जोड्या! जमिनीपासून सुमारे दोन-तीन फूट उंचावर!!! ओ माय गॉड, हे तर कायोडीज्!! (लांडगे) माझ्या बॅकयार्डाच्या टोकाला कुंपण आहे आणि मग तिथून पुढे काही मैल संरक्षित जंगल आहे. तिथे नवीन डेव्हलपमेंट करायला परवानगी नाही, तो संरक्षित वन्य एरिया आहे. त्या भागात अनेक लांडगे, कोल्हे, ससे वगैरे प्राणी रहातात, वेळप्रसंगी एखाददुसरे दृष्टीलाही पडतात. पण इथे तर दहा-बारा लांडगे एकदम आले होते.... मला उठून बसलेला पाहून आणि मी एकटाच आहे हे पाहून आता त्यातले दोघे-तिघे कुंपणावर चढून आत यायचा प्रयत्न करत होते!!! हे असं का करताहेत तेच मला क्षणभर कळेना. आणि मग डोक्यात लख्ख प्रकाश पडला!! त्या दिवशी दुपारी बागेत काम करतांना काही काटेरी झुडुपं साफ केली होती. त्यांच्या काट्यांनी हातापायावर विलक्षण ओरखाडे उठले होते. त्या जखमा अजून ओल्या होत्या. आणि त्या रक्ताचा वास त्या लांडग्यांना लागला असावा!!! लांडगे आणि अस्वलं यांना रक्ताचा वास फार दूरवरून येतो.... त्या माझ्या रक्ताच्या वासाने बहुदा ते इथे गोळा झाले होते... आणि आता मला एकटाच पाहून, व्हल्नरेबल समजून, आक्रमण करण्यासाठी कुंपण चढून आत यायचा प्रय्रत्न करत होते!!! काय करावं ते मला समजेना! आमच्यामध्ये अंतर पंधरा-वीस फुटांचं आणि मध्ये फक्त ते कुंपण! माझं हत्यार घरात आतमध्ये राहिलं होतं... तसा मला ताबडतोब धोका नसला तरी ह्यांना आता हाकून कसं लावावं ते समजेना... मग अचानक एक आयडिया सुचली! बॅकयार्डमध्ये बागेला पाणी द्यायचा होज पाईप होता. तो मोकळा केला, होज 'फायर स्ट्रीम' वर अ‍ॅडजेस्ट केला आणि नळ सुरू केला... प्रेशर बिल्ड झाल्यावर पहिला नेम एका कुंपणावर अर्धवट चढलेल्या लांडग्याच्या चेहर्‍यावर धरला आणि होज ऑन केला... माझ्या नशिबाने पाण्याचा झोत सरळ त्याच्या दोन्ही डोळ्यांवर आणि कपाळावर बरोबर मध्ये जाऊन आदळला!!! त्या अनपेक्षित धक्क्याने तो कुंपणावरून खाली फेकला गेला आणि क्यँऽऽक क्यँऽऽक आवाज काढत जमिनीवर जाऊन पडला!!! हे बघताक्षणी बाकीचा सगळा लांडग्यांचा कळप सैन्याची एखादी प्रशिक्षित तुकडी एकदम एकसाथ मागे सरावी तसा एक पाच दहा फूट मागे सरला. सगळे एकाच वेळी, एका दमात, सारखं अंतर!! तशा प्रसंगातही मला त्यांचं कौतुक वाटलं. आणि आता माझ्या हातात हत्यार आलेलं असल्यामुळे आत्मविश्वासही वाढला... मग काय, नेम धरून पाच सहा लांडग्यांवर तसेच पाण्याचे झोत टाकले... शेवटी हार मानून क्यँऽऽक क्यँऽऽक आवाज काढत (ह्या बहुदा माझ्या निषेधाच्या घोषणा असाव्यात!!) सगळा कळप रानाच्या दिशेने धावत सुटला.... मला मात्र नंतर सकाळपर्यंत झोप आली नाही. तिथेच खाटल्यावर पडून मला राहून राहून ती अकबर-बिरबलाची गोष्ट आठवत राहिली!! "आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है!" :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19762
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

आणी एवढ्या थंडीचे बाहेर झोपताय म्हणजे भारीच. आणी ईथे आम्हाला व्हॅलीत पण संध्याकाळी ७ नंतर बाहेर पडावेसे वाटत नाही :)

कौतुक आहे पिडांकाका तुमच्या प्रसंगावधानाचं !

बापरे!
"आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है!"
..खरंय.

आयला. डेंजर किस्सा. यापुढे एकटे बाहेर झोपलात तर हाताशी २ -३ किलो मटन ठेवा. लांडगे आलेच तर ठीकच आहे नाहितर दुसर्‍या दिवशी खीमा. हाकानाका.

प्रसंगावधान! जीवावर बेतलं की हत्यार सापडतं :). जपून राहा.

आईशपथ ! डांगर किस्सा! (डी ए एन जी ई आर - डांगर) पण प्रसंगावधान जबर ! मान्या.

पिडाकाकांचं अवघड झालं ब्व्वा,एकटे बाहेर झोपत जाउ नका परत , आणि रक्ताचाच वास कशाला पाहीजे ,काही नरभक्षक टोळकी माणसांच्या वासाने पिसळुण देखील हल्ला करतात.

केवळ एका डँबिस' माणसालाच हे सुचू शकतं. पिडां लिहिते झाले तर मिपावर बहार येईल.

सांभाळून रे डांबिस्या.भिती वाटली तर रामऱक्षाही म्हणत जा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत आहे. गायत्री मंत्रपण चालेल. त्यात विलक्षण शक्ती आहे असं कोणीसं म्हटलं आहेच.

In reply to by टवाळ कार्टा

ते लांडगे तेव्हा वदनी कवळ घेता म्हणत अस्तील =)) थोडी सुधारणा! ते लांडगे तेंव्हा वदनी पिवळा घेता म्हणत असतील!

ब्राव्हो! जबरदस्त किस्सा! सहज गंमतीत : आता वेळ हाताशी आहेच तर 'रोडरनर'सारख नवीन नवीन क्लृप्त्या लढवून त्या 'कायोडीज'ना दमवून दमवून मारा! ;-) "बीप-बीप!" Sandy

बापरे ! लैच भारी किस्सा, काका.. तुमच्या प्रसंगावधानाचं खरंच कौतूक आहे, आणि तुमच्याकडच्या सुरळीत पाणी-पुरवठ्याचंपण.. ;-) आमच्या सरकारी आवासाच्या मागे केळीची झाडं खायला आलेला महाकाय जंगली हत्ती आठवला.. आमचे गार्ड येड्यासारखे त्याच्या डोळ्यांवर टोर्चने प्रकाशझोत टाकत होते.. तो डखरलापण एक-दोनदा.. मग मात्र सरकारी बांधकामाची इज्जत ठेवायची म्हणून असेल, कुंपणाला धडक न देताच निघून गेला बिचारा गजराज..

हा.हा.हा... बिरबल कथा वाचल्याचा फायदा आपल्याला बागेत सुद्धा होतो ! :) जाता जाता :- चला आता पंचतंत्र वाचायला घेतले पाहिजे ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

पिडां लांडग्यांच्या तावडीतून वाचले याचा आनंद आहेच, पण त्याहून जास्त आनंद मेन बोर्डावर लेखकांच्या यादीत हे नाव दिसले याचा आहे. बर्‍याच दिवसांनी लिहिलंत मालक. _/\_

सांभाळून रहा.

अकबर - बिरबलाच्या अशा बर्‍याच कथा आहेत, त्यामुळे तुम्ही इतर काहीही न लिहिता , हाच एक धागा पकडून लिहीत राहा म्हणजे तुमचे लिखाण आले की तेव्हढे टाळून, आम्ही पुढे वाचत राहू.

मी सांगितलेली कथा किती उपयोगाला आली. ;) बाकी आमचे काकानु अष्टावधानी आहेत असे आम्ही उगा म्हणत नाहीत.

अरे बापरे! कल्जी घ्या पिडां!! कोयोटे म्हणजे रानटी कुत्रे ना?

येकदम रोचक किस्सा! काळजी घेत चला. बाकी ऐन वेळेस हाती असते ते हत्यार हे मात्र खरेच आहे!

पुढील कोणत्याही लेखनाच्या प्रतिक्षेत.

पण हे coyotes एवढे मनुष्यवस्तीजवळ येतात?

सुलेशबाबू, काळजी घ्या. स्वाती

वा!

भारी :) हिंदी पिच्चरात असं झालं असतं तर लांडग्यांनी बदला घेण्याची शपथ घेतली असती :)

प्रसंगावधान तर बेष्टच आहे. मान लिया! बा द वे - चांदणी रात्र, बागेत खाट वगैरे लिहून इस्ट कोस्टला चिडवू नये ;)

अनुभवचे सुंदर लिखाण ! ह्यावरून नुकताच वाचलेला एक लेख आठवला. ह्यात रानकुत्री अगदी वाघांनाही मारून खातात, त्याविषयी काही माहिती आहे. तसेच रानकुत्री माणसांना घाबरतात, त्यामुळे त्यांचा कळप आंगावर चालून आला की जंगली प्राणी-- त्यात अगदी वाघही आला-- माणसाच्या जवळपास जातो, असे म्हटले आहे.

काका परत लिहिते व्हा असे सांगायला आले असावेत ते लांडगे / जंगली कुत्रे. तुम्ही त्याचं ऐकलत हे फार छान जाहले

बापरे...!! तुमच्या प्रसंगावधानाचे कौतुक आहे... अशा प्रसंगात हे सुचणे म्हणजे सुद्दा कौतूकास्पद आहे. "वाचाल तर वाचाल" हेच खरे... बाकी हा प्रसंग कोठल्या ठिकाणी घडला?

तिथे गन वगरे बाळगत नाही का तुम्ही?

काकांनी असा काय केला असेल ? ज्यामुळे त्यांना घराबाहेरच झोपायला लागला ;) =) ह.घ्या.

प्रसंगावधानासाठी दाद आणि गेल्या काही दिवसातील आणखी एका सुखद पुनरागमनाचा आनंद. आता असेच लिहिते रहा..

तुमच्या कक्षेच्या परिघात चक्क रानकुत्र्यांनी प्रवेश करावा? छे छे. तुमच्या बागेत रानाला, हिंसक तणाला थारा नाही, आणि कुत्र्यांनी मर्यादा ओलांडावी? बाय द वे, बरे झाले की हा २०१५ सालाचा नवंबर महिना आहे. गेल्या हंगामात किंवा काही महिन्यांपूर्वी तिकडल्या पाणीटंचाईमुळे तुमच्या बागेचे पाणी पळाले होते ना? शेवटी, आभार रानकुत्र्यांचे की एक चांगला लेख वाचायला मिळाला. आणि आता सीरियस्ली, ईश्वराचे आभार आणि आपल्या प्रसंगावधानाला दाद.

पण इतके करण्यापेक्षा कोल्हे आहेत हे समजल्यावर घरात जाऊन का नाही झ्होपला ? का "आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है" या वाक्याचे टेस्टिंग करायचे होते ?

अकबर बिरबलाची ही कथा पूर्वीही वाचली होतीच. आज पुनर्वाचनाचा आनंद मिळाला. आमच्याही अंगणात रेड फॉक्सेस येतच असतात अधून मधून पण माणूस दिसला की धूम ठोकतात. बाकी त्या कायोटीजला मनःपूर्वक धन्यवाद पिडांना मिपावर परत लिहिते केल्याबद्दल.

सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना धन्यवाद.