Skip to main content

भाडेकरू व नैतिकता

लेखक राजेश कुलकर्णी यांनी सोमवार, 23/11/2015 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाडेकरू व नैतिकता . . भाडेकरू व घरमालक यांचे संबंध हा या पोस्टचा विषय नाही. तसेच 'घरमालक व नैतिकता' हाही या पोस्टचा विषय नाही. घरमालक व भाडेकरू यांच्या संबंधातला कायदा हा भाडेकरूच्या बाजुने झुकणारा आहे असे आपण ऐकतो. घर भाड्याने देताना लिव्ह&लायसन्सच्या तत्वावरच द्यावे, अन्यथा भाडेकरू घरावर हक्क सांगू शकतो व घराचा ताबा देण्यात अडथळा आणू शकतो ही शंका मनात आसते. दुसरीकडे ‘तू निश्चिंतपणे रहा, फक्त मला गरज पडेल त्यावेळी घर रिकामे करून दे’, अशा तोंडी व्यवहारावर, म्हणजे कोणतीही चिठ्ठी-चपाटी न करता केवळ विश्वासावर आपला बंगला दुस-याच्या हवाली करणारे मित्रही माझ्या पाहण्यात आहेत. उद्या या मित्राच्या वा त्याच्या बायकोच्या डोक्याचे ग्रह फिरले तर काय होईल, असा विचार हे घरमालक-मित्र करताना दिसत नाहीत. हे दुसरे टोक. काही कायद्यांमुळे जुने भाडेकरू हे जवळजवळ जागामालक झालेले दिसतात. शिवाय खूप जुने भाडेकरू असल्यामुळे भाडेही नाममात्र. त्यातून मालकाला फायदा तर सोडाच, पण घराची डागडुजी करणेही शक्य होऊ नये अशी परिस्थिती. मुंबईसह अनेक ठिकाणी इमारत केव्हा पडते आणि या भाडेकरूंचा जागेवरचा हक्क केव्हा संपतो, याची वाट पाहणारे घरमालक दिसतात. तर इमारत मोडकळीला आली व जीव धोक्यात आला तरी केवळ ताबा जाऊ नये म्हणून तेथेच राहणारे भाडेकरू हे वास्तवही. तर घरमालकाचीच असलेली जागा रिकामी करून देण्याच्या बदल्यात घरमालकाकडून घसघशीत रक्कम वसूल करणारेही दिसतात. जागा आपली नाही, आपण पैसे देऊन का होईना पण येथे भाडेतत्वावर रहात आहोत याची जाणीव व कृतज्ञता जाऊन तो घरमालक भाडेकरूच्या दृष्टीने खलनायक केव्हा होतो आणि मग आपल्यावर त्याच्याकडून कसा अन्याय होत आहे, याचे आपल्या मनचेच पुरावे तयार करत राहण्यात तो मश्गुल होतो. हे मानसिक स्थित्यंतर फार गंमतीशीर असावे. आपण आपल्यासाठी जागा भाड्याने घेतलेली असताना स्वत:चे घर/सदनिका घेण्यासाठी प्रयत्न करणे, कमीत कमी आपल्या मुलांनी तरी राहण्याची वेगळी सोय करण्याची अपेक्षा ठेवणे, या गोष्टी सोयीस्करपणे विसरल्या जातात. आपली जागेची ‘गरज’ अजूनही संपलेली नाही अशी सोयीस्कर समजूत आपणच करून घ्यायची. मग ती तशी कधीच संपत नसते. ग्रामीण भागात जसे कायद्याचा आधार घेऊन शेतजमीनी बळकावण्याचे प्रकार चालतात, त्याची ही शहरी आवृत्ती. ग्रामीण भागात तरी यातल्या नैतिकतेबद्दल कोण कधी बोलते? प्रत्येकाला आपला हक्क गजवायचा असतो. तेव्हा माणूस सामान्य असो किंवा पैसेवाला, याबाबतीत नैतिकता पाळणारा आहे का, हेही आपल्याला पडताळून पाहता येण्यासारखे आहे. या बाबतीत कोणी कायद्याचा दाखला देत असेल तर त्याला कमीत कमी वास्तवाची व याबाबतीतल्या नैतिकतेची जाणीव करून देण्याची तसदी आपण घेतो का? आता मुद्द्याकडे. वर्षानुवर्षे घरमालकाच्या जागेत राहत असताना त्याच्याशी वेळोवेळी विविध मुद्द्यांवरून कितीही वाद झाले, तरी आपली जागेची गरज संपली की दुसरीकडे आपल्या राहण्याची सोय करून घरमालकाला जागा रिकामी करून देणारे सज्जनही मी पाहिलेले आहेत - शिवाय त्याबदल्यात कोणतीही रक्कम स्विकारता. हे आणखी विशेष. त्यातले काही जण प्रतिष्ठित म्हणून आपल्या प्रतिष्ठेला बाधा येऊ नये म्हणून तसे वागले असे म्हणावे, तर काही जण अगदी सामान्यही आहेत. तेव्हा नैतिकता ही केवळ प्रतिष्ठेशी संबंधित बाब नाही, हे स्पष्ट व्हावे. अशा परिस्थितीत आपल्या भाडेकरूकडून रिकामे झालेले घर स्विकारताना फुटलेले हुंदके - कधी गालावरून ओघळणारे तर कधी मनातल्या मनात - देणारे घरमालक पाहिलेले आहेत मी. असे काही भाडेकरू माझ्या प्रत्यक्ष परिचयातले आहेत. मुळात जागा सोडायची गरज नव्हती, सोडलीच तर पैसे तरी मागायचे होते, त्यात वावगे वाटण्याचे कारण काय, ती तर जगरहाटीच आहे असे सल्ले त्यांना नक्कीच मिळाले असतील. तरीही त्या प्रलोभनाला बळी न पडणे हे नक्कीच विशेष. ही पोस्ट एकेकाळी भाडेकरू असणा-या अशा सज्जनांना सलाम करण्यासाठी आहे. ता.क.: १) कोणाला यात एखाद्या चित्रपटाच बीज दिसते का? अपेक्षा एवढीच की शेवटचा अतिमेलोड्रामा न करता आतल्या आत दिलेले हुंदके दाखवावेत. २) मी घरमालकांचा एजंट म्हणून ही पोस्ट लिहिलेली नाही.

वाचने 9661
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मे आय हॅव योर अटेंशन प्लिज, मे आय हॅव योर अटेंशन प्लिज विल द रिअल स्लिम शेडी प्लिज स्टँडप ? आय रिपीट विल द रिअल स्लिम शेडी प्लिज स्टँडप ? विआर गोइंग टु हाव अ प्रोंब्लम हिर.

तुमच्या इतक्या लेखांपैकी हा एक लेख थोडाफार वाचनीय आहे. पण सविस्तर आणि सुस्पष्ट भूमिका घेणारा किंवा भाष्य करणारा हवा होता. सज्जन भाडेकरू हा प्रकार दुर्मिळातली दुर्मिळ केस म्हणावी लागेल असे एक माजी वाडामालक कुटुंबातला म्हणून म्हणतो. फार वाईट अनुभव आहेत. आख्ख्या वाड्याचे भाडे तीस रुपये येई. आम्ही तेही घेणे बंद करून टाकले होते. असो. नको त्या आठवणी पुन्हा! सूचनांचा सकारात्मकतेने विचार करा. अजून छान लिहू शकाल. रोज धडाधड भारंभार लिहिण्यापेक्षा मोजके, परंतु वाचनीय लिहा. मिपाकर आवर्जून कौतुक करतात.

In reply to by एस

तुमच्या इतक्या लेखांपैकी हा एक लेख थोडाफार वाचनीय आहे. पण सविस्तर आणि सुस्पष्ट भूमिका घेणारा किंवा भाष्य करणारा हवा होता. सज्जन भाडेकरू हा प्रकार दुर्मिळातली दुर्मिळ केस म्हणावी लागेल असे एक माजी वाडामालक कुटुंबातला म्हणून म्हणतो. फार वाईट अनुभव आहेत. आख्ख्या वाड्याचे भाडे तीस रुपये येई. आम्ही तेही घेणे बंद करून टाकले होते. असो. नको त्या आठवणी पुन्हा! सूचनांचा सकारात्मकतेने विचार करा. अजून छान लिहू शकाल. रोज धडाधड भारंभार लिहिण्यापेक्षा मोजके, परंतु वाचनीय लिहा. मिपाकर आवर्जून कौतुक करतात.

In reply to by एस

एसभौंचे धागालेखकाच्या वतीने धन्यवाद! अन्यथा आम्ही डायरेक्ट प्रतिसाद उघडलेले.... का करे मनोरंजन तिथेच आहे ना?

आमच्या माहितीत एक भाडेकरू आहे, जो शून्य भाडे देऊन पुर्ण हाटेल काबीज करून बसला आहे, आणि त्याला काढले तर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी मालकाला देत आहे. आणि मालक घाबरला आहे असे त्याला वाटते!

आमच्या माहितीत एक भाडेकरू आहे, जो शून्य भाडे देऊन पुर्ण हाटेल काबीज करून बसला आहे,
+१११११११११११११११११ घरमालका ला नोकर समजुन ऑर्डर देतो आहे.

बेडेकर मसाले वाले यांनी आपल्या चाळी तील घरे भाडेकरूंच्या नावाने करून टाकली. मुळात भाडे २० रुपये(१९४४ सालापासून भाडे गोठवले आहे) होते ते जमा करण्यासाठी ठेवलेल्या माणसाचा पगार जास्त. या आत बट्ट्याच्या व्यवहारा ऐवजी त्यांनी घरांच्या मालकीवर पाणी सोडले. परंतु त्यामुळे त्या चाळींच्या डागडुजी वरील त्यांचा खर्च वाचला आणि भाडेकरू( आता घर मालक)आता भांडत आहेत कि दुरुस्तीचा खर्च किती कोणी आणि कसा करायचा. पाणी येत नाही तर टाकी बसवायची आहे तळमजल्याचे लोक खर्च द्यायला तयार नाहीत कारण त्यांच्या कडे पाणी "येते" पण वरच्या मजल्यावर पाणी "चढत" नाही. सार्वजनिक शौचालये तुटली बिघडली तरी आता चाळीतील लोकांना स्वतःच पाहावे लागते. उद्या चाळ पडली तरी बेडेकराना कायद्याने कोणतीच बांधिलकी नाही. १०० भाडेकरू असलेल्या चाळीतून भाडे रुपये २०००/- मात्र मिळतात त्यात सरकारी कर हि वसूल होत नाही.दुरुस्तीचा खर्च अव्वाच्या सव्वा. कोण करणार? पण चाळ/ इमारत पडून मनुष्य हानी झाली तर चाळ मालक सदोष मनुष्यवधास जबाबदार म्हणून "आत"जातो. खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा १० रुपये. "लोकांनी लोकांचे लोकांसाठी" निवडलेले मायबाप सरकार भाडे वाढवून देत नाही. आई जेवू घालत नाही बाप भिक मागू देत नाही. सगळा मुर्खांचा बाजार आहे.

घरमालकाने जणु अपराधच केलेला आहे. म्हणजे भाड कमी घ्या वर डागडुजी चा खर्च वर सदोष मनुष्यवध अरे बापरे काय कमाल आहे. बेडेकरांच्या चाळी च्या उदाहरणाच्या बाबतीत चाराने की मुर्गी बाराने का मसाला असा हिशोब बेडेकरांनी लावला असावा. बाकी मोठ मासलेवाइक उदाहरण दिल तुम्ही. पुर्णपणे सहमत आहे. मात्र मालकी अशी कशी सोडता येते हे एक कुतुहल आहे म्हणजे नावे वगैरे करुन दिली की जाहीर केलं आम्ही या चाळीचे आजपासुन मालक नाही. नाहीतर परत रजीस्ट्रीचा खर्च ही बेडेकरांनीच करावा.

In reply to by मारवा

बेडेकरांनी सर्व भाडेकरूंच्या नावाने खरेदी खत करून त्याचे सरकारी कार्यालयात पंजीकरण( प्रत्येकाचे त्यांच्या स्वतःच्या खर्चाने) करून दिलेले आहे. मुळात व्यवहार फुकट असल्याने त्यावर भरायला लागणारी ष्टांप ड्युटी निम्नच असणार. सर्व व्यवहार विस्तृतपणे मला माहित नाही.

In reply to by सुबोध खरे

मुळात व्यवहार फुकट असल्याने त्यावर भरायला लागणारी ष्टांप ड्युटी निम्नच असणार.
व्यवहार खरोखरीचा फुकट असला तरी सरकारी नियमा प्रमाणे तिथल्या जागेच्या सरकारी किंमती प्रमाणे ड्युटी वगैरे भरायलाच लागते ना. बिचारे बेडेकर. त्यांच्या खानदानात कोणी पुन्हा भाड्यानी घर देणार नाहीत. ह्या मूर्ख कायद्या मुळे त्यातुन घर मालकाला घ्याव्या लागणार्‍या रिस्क मुळे लाखो फ्लॅट मुंबई पुण्यात पडुन आहेत रिकामे.

राकु, "भाडेकरूने घरमालकासोबत केलेल्या कराराप्रमाणे राहणे" ही अपेक्षा तुमच्या मते बरोबर आहे की चूक आहे..?

In reply to by मोदक

मालक आणि ''तो'' भाडेकरू पाहून घेइलच कि, मी म्हणतो, इतर भाडेकरूंनी नाक का खुपसावे ? (हळू घ्या, वैयक्तिकपणे घेऊ नका) कळावे पग (आणखी एक काडीसारू भाडेकरू)

वाड्याचा मालक(?) असूनही १९९८ पासून २०१३ पर्यंत भाड्याने रहात होतो. पण कधी आमच्या भाडेकरूने वा घरमालकाने कुठलाच त्रास दिल्याचे आठवत नाही.

मुळात भाड्याकडे 'रेंट टु ओन' या कन्सेप्टप्रमाणे बघावे म्हणजे असा जीवाला त्रास होणार नाही. वर दिलेल्या उदाहरणात वीस रुपये ही फार क्षुल्लक रक्कम वाटली तरी १९४४ सालात ती फार मोठी रक्कम होती. (आअजचे वीस हजार धरा) ज्याप्रमाणे टीव्ही , फ्रीज सारख्या वस्तू ठराविक काळासाठी भाड्याने घेऊन नंतर ती ग्राहकाच्या मालकीची करण्याचा व्यवहार काही ठिककणी केला जातो, तसेच भाडेकरूने आत्तापर्यंत दिलेल्या भाड्याचे त्या-त्या वेळीचे मूल्य धरून बेरीज केली तर तीस-चाळीस वर्षात घरमालकाला प्रचंड रक्कम मिळालेली असते, मग भाडेकरूला त्या जागेची मालकी मिळण्यात अनैतिक काय आहे? मुळात जमिनीची मालकी कुणाकडे असणे हीच कन्सेप्ट अनैतिक आहे. 'सब भूमी गोपालकी' या नात्याने मालकाने जमीन निर्माण केलेली नसते. त्याची मालकी फक्त इमारतीवर असते. मग मोडकळीस आलेल्या इमारतीची सध्याची (भाडेरुपी) किंमतसुद्धा कमीच असायला हवी. मोकळ्या जमीनीवर अतिक्रमण करून तिची मालकी मिळवणारे झोपडीधारक नंतर तिच्या जीवावर फुकट फ्लॅट मिळवून , पुन्हा तो विकून किंवा भाड्याने देऊन जुन्या जमिनीचा ताबाही ठेवतात, त्याच्यापेक्षा हे कितीतरी बरं आहे. कोणी अकाउंटंट आहे का इथे? कृपया वीस रुपये अ‍ॅन्युईटी घेऊन १९४४ ते आत्तापर्यंतच्या भाड्याची आजच्या रुपयांतली टोटल काढून दाखवा यांना.

In reply to by सायकलस्वार

१९४४ साली साली सोन्याचा भाव ६२ रुपये होता. त्यामानाने आज ते भाडे साधारण ८००० रुपये होईल. फरक एवढाच आहे कि हि जागा गिरगावसारख्या प्राईम ठिकाणी होती. आणी १९४४ पासून त्या भाड्यात वाढ झालेली नाही. म्हणजे काही दिवस वाजवी भाडे घेतल्यावर घरमालकांचे आयुष्यभर नुकसान झाले आहे.

बेडेकर ह्यांना भिक नको पण कुत्रा आवर हि मराठी म्हण नक्कीच आठवली असेल