मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संतापजनक अनुभव

pradnya deshpande · · काथ्याकूट
संतापजनक अनुभव मलाच नाही तर अनेकांना मी नुकतीच ज्या अनुभवातून गेले त्याला समोरे जावे लागले असेल. रसभंग झाल्यानंतरच हा संताप होता. त्याबरोबरच आपण काहीच करु शकत नाही याची आगतीकताही होती. पांढरपेशा माणसांमधला कचखाऊपणा होता की आणखी काही पण मी त्यावेळी समोरच्यांवर जेव्हढी संतापले होते तेव्हढीच स्वतःवरही संतापले होते हे नक्की. तुम्ही म्हणाल असे काय झाले. त्याची कथा अशी. पाडव्याच्या दिवशी मुंबईहून आलेल्या भाऊ आणि वहिनीसोबत मुंबई पुणे मुंबई २ हा चित्रपट पहाण्याचा कार्यक्रम ठरवला. उशीराचाच शो असल्याने घराजवळची टॉकीज निवडली. बरोब्बर पावणे दहा वाजता चित्रपटगृहात दाखल झालो. दिवाळीचे दिवस असल्याने रात्रीचा शोही हाऊसपुâल्ल होता. चांगल्या घरातील मंडळी सहकुटुंब चित्रपट पहायला आलेली दिसल्याने चला पब्लीक चांगली आहे असा विचार मनात येऊन गेला. पडद्यावर टायटल झळकू लागली. पहिल्या सीन नंतरच मागच्या रांगेत चुळबुळ सुरु झाली. तरुणांचे टोळके मागच्या रांगेत बसले होते. त्यांचे खुर्चीला मागून पाय लावणे, चित्रपटातील प्रसंगांवर उगाचच हसणे, कॉमेंट करणे असे चाळे सुरु झाले. त्यांच्याच बाजूला एक कुटुंब बसले होते. पतीने जागा बदलून पत्नीला मुलाच्या जागेवर बसवले तसे या टोळक्याने मोठ्याने हसणे सुरु केले. अखेर ते जोडपे पहिल्या पंधरा मिनीटातच चित्रपट अर्धवट टाकून निघून गेले. चित्रपट जस जसा पुढे जाऊ लागला तस तसा या टोळक्याच्या गोंधळ वाढला. प्रत्येक डायलॉगवर त्यांच्या व्दिअर्थी कॉमेंट येऊ लागल्या तसे मला माझ्या भावासमोर आणखी ओशाळवाणे वाटू लागले. माझा संताप वाढू लागला तसा बाजूलाच बसलेल्या माझ्या मुलाने आई जाऊ दे म्हणत मला शांत करण्याचा प्रयत्न केला. आता या टोळक्याला चित्रपटगृहातील इतरत्र बसलेल्या काही तरुणांनी साथ द्यायला सुरुवात केली. चित्रपटगृहाच्या वेगवेगळया कोपऱ्यायातून स्पर्धा लागल्या तशा घाणेरड्या कॉमेंट सुरु झाल्या. सुशिक्षीत प्रेक्षकांना सर्व असह्य झाले. शेवटपर्यंत हा गोंधळ सुरु होता. चित्रपट नको पण प्रेक्षक आवर अशी आमची अवस्था झाली होती. अखेर चित्रपट संपला. लाईट लागले. मला संताप अनावर झाला होता. मी ताडकन उठले आणि गोंधळ घालणाऱ्या मागच्या रांगेतील तरुणांना धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला चित्रपटाचा आनंद घेता आला नाही असे बोलून गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला. मला साथ देण्यास काही जण पुढे आले त्यांनीही त्या मुलांना हात जोडून थँक्यू म्हटले. ते टोळके एवढे निगरगट्ट होते की त्यांनीही थँक्यू आंटी म्हटले. सर्वात जास्त धक्का बसला ते त्या मुलांचे चेहरे पाहून. कारण ते सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते. माझ्या सारखाच अनुभव अनेकांना आला असेल. त्यामुळेच मी माझा अनुभव शेअर केला आहे. इतरांनीही त्यांचे म्हणणे आवर्जून मांडावे.

वाचने 22053 वाचनखूण प्रतिक्रिया 116

जिन्क्स 16/11/2015 - 17:31
आज काल सर्व गर्दीची ठिकाणे आपल्या साठी नाही आहेत ही जाणीव होऊ लागली आहेत. भले ते लोणावळा, महाबळेश्वर, लवासा असो की इ-स्क्वेर, अ‍ॅडलॅब्ज, सिनॅपोलिस. ओरबाडणाऱ्या संस्कृतीचे पाईक सगळीकडे वावरत असतात. त्या मध्ये आपणंच अल्पसंख्याक होऊन जातो. आपण २० वर्षे उशिरा जन्म घेतला आहे ही जाणीव आज काल ठायी ठायी होते.

In reply to by जिन्क्स

प्रसाद१९७१ 16/11/2015 - 17:34
आपण २० वर्षे उशिरा जन्म घेतला आहे ही जाणीव आज काल ठायी ठायी होते. >>>>>>>>>>+११११११ तसेच ५-६ हजार मैला नी जन्माची जागा पण चुकली आपली.

काकासाहेब केंजळे 16/11/2015 - 17:45
बाहेर तिकीट चेकर उभा असतो तो करतो सरळ अशा लोकांना,एकदा असेच एक टोळके सरळ केले होते,त्यातल्या लिडरला फाडकण ठेऊन दिली होती ,सगळी टीमच थेटरातून गायब झाली त्यांची.

पगला गजोधर 16/11/2015 - 18:19
आता मराठी चित्रपट होता, म्हणजे यु पी बिहार ची कार्टी नसावी, सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते म्हणताय, तर ती झोपडपट्टी वा खेड्यातली वा गुंठामंत्री छाप पण दिसत नाही. च्यायला आता खापर फोडयाला पांढरपेश्या लोक्कांना कमी कमी ऑप्शन होत चाललेयत आजकाल, कं क्रवे ब्रे ?

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय 17/11/2015 - 10:15
या लेखातुन आणी त्यावरच्या आपल्या वरच्या प्रतिक्रियेतुन हे तर सरळ स्पष्ट होते आहे की सरळमार्गी पांढरपेशी लोक "खापर फोडत नाहित". जे आहे जसे आहे ते सत्यकथन करतात. आता उपद्व्याप करणारे, उपद्रव देणारे, मवाली गुंड जर एखाद्या ठराविक समाजातुन येत असतील तर सरळमार्गी पांढरपेश्यांचा त्याला नाइलाज आहे. याच सरळमार्गी पांढरपेशी लोकांना जेव्हा सुशिक्षित (आता यांना सुशिक्षित कसे म्हणायचे म्हणा) तरुण असे करताना दिसतात तेव्हा ते त्यांनाही नावे ठेवतात. काही ठराविक गटातल्या लोकांना सरळमार्गी पांढरपेशी लोक पसंतच नसतात त्यामुळे जिथे जमेल तिथे त्यांच्याविरुद्ध ते कावकाव च करतात. कं क्रवे ब्रे ?

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 17/11/2015 - 11:58
नॉनमराठी लोक्स मराठी पिच्चर बघायला का येतील? अन असे अनुभव मलाही आलेले आहेत. त्यात मराठी-बिहारी असे काही नसते.

रेवती 16/11/2015 - 18:28
हे अनुभव आजच नव्हे तर पूर्वीपासून यायचे. प्रज्ञाताई, तुम्हाला फट्यावर मारणे शिकायला लागेल. तुमचा अनुभव वाईट आहेच. अशावेळी तेथील व्यवस्थापनाची काही मदत नाही का होऊ शकणार? (हे मला त्यावेळी सुचले नव्हते) भारतातच नव्हे तर भारतीय चित्रपट पहायला गेल्यास परदेशातही असा अनुभव आलाय. तेथे भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी होते. एक चायनीज जोडपेही दंगा करत होते. त्यांना त्या सिनेमातले काय समजत असेल कोणास ठाऊक? दुसर्‍याला शांतपणे नाटक, सिनेमा पाहू न देणे हे परमकर्तव्य असते. ही पैदास नक्की कोठून आलीये कळत नाही. आपल्याला इतका त्रास होतो तर त्या शिनेमातील कलाकारांना जगात वावरणे किती अवघड जात असेल असे वाटले. प्रत्यक्षात येतात तसे जालावरही अनुभव येतात. कित्येकांशी आपण संवाद साधणे टाळतो तरी मुद्दाम होवून उपप्रतिसाद द्यायला येणे वगैरे लोचटपणा चालतच असतो. त्यांना शून्य किंमत देणे एवढे आपण करू शकतो.

In reply to by रेवती

जातवेद 17/11/2015 - 14:32
जपान मधल्या थेट्रात बघितलेले पिच्चर आठवले. बाजूच्याशी साधी कुजबूज केलेली देखील खपत नाही तिकडे. सगळे ध्यानमग्न असल्यासारखे पिच्चर बघतात.
अतिशय उद्वेगजनक अनुभव आहे हा. असे अनुभव सार्वत्रीक आणि सर्वकालिक आहेत. फक्तं तरूण मुलांना दोष देण्यातही अर्थ नाही. कारण कित्येकदा सभ्य पोषाखातल्या, आणि सुसंस्कृत वाटणार्‍या मध्यमवयीन अथवा वयोवृद्ध व्यक्तींकडून देखिल अशाप्रकारचे संतापजनक वर्तन अनुभवास येते. पण ते सहन करून गप्प रहाणे एव्हढाच उपाय उपलब्ध असतो.

श्रीरंग_जोशी 16/11/2015 - 21:18
चित्रपटाचा खेळ सुरू असताना उस्फुर्तपणे एखादा विनोद करणे एक वेळ सहन केले जाऊ शकते पण हे म्हणजे फारच. चित्रपटगृहातही बाउंसर्स ठेवायची वेळ न येवो. युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे. यावरून आचार्य अत्र्यांचा एक किस्सा आठवला. एकदा एका भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी 'सभ्य स्त्री-पुरुषहो' असे म्हणून सुरुवात केली. सभागृहातील मागच्या रांगांमधील युवकांच्या गटाने यावर हुर्यो केलं. त्यावर अत्रे तडक उद्गारले, 'मी तुम्हाला नाही, सभ्य स्त्री पुरुषांना म्हंटलं'. त्यानंतर संपूर्ण भाषणात त्या गटाने खोडी काढली नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

प्रसाद गोडबोले 16/11/2015 - 21:25
युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे.
है शाबास ... ह्याला म्हणतात राजकारण .

In reply to by श्रीरंग_जोशी

मोदक 16/11/2015 - 21:50
युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे. याच लॉजिकने युती सरकारच्या पूर्वी शिक्षण घेतलेली आणि अयोग्य वर्तन करणारी पिढी म्हणजे "हिंदू कुटुंबसंस्थेचा पराभव" समजावा का? ;)

In reply to by श्रीरंग_जोशी

प्रभाकर पेठकर 17/11/2015 - 12:14
तो प्रसंग असा आहे की जेंव्हा अत्रे म्हणाले, ' सभ्य गृहस्थ हो!' तेंव्हा कोणीतरी ओरडले 'ओssss!' त्यावर अत्रे म्हणाले, ' मी सभ्य गृहस्थांबद्दल बोलतो आहे.' असा माणूस अत्रे ह्यांच्या सांगण्यावरूनही 'पेरलेला' असू शकतो. हे पेरलेल्या माणसाचे काम मी सुद्धा केले आहे. अत्रे ह्यांच्या पश्चात श्री सदानंद जोशी 'मी अत्रे बोलतो आहे' हा कार्यक्रम सादर करायचे. त्यांचा सदर कार्यक्रम मस्कतला झाला तेंव्हा हे 'ओssss' ओरडण्याचे काम माझ्याकडे होते. ते त्यांच्या सांगण्यावरूनच मी केले. सभागृहात हशा पसरला.

आरोह 16/11/2015 - 21:37
तुम्ही पोलीस हेल्प लाईन वर फोन का नाही केलात? तुम्ही पत्रकार असून हे सगळं सहन केलत??

In reply to by आरोह

रेवती 16/11/2015 - 22:20
तुम्ही पत्रकार असून हे सगळं सहन केलत?? हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे पण घरी पाहुणे आले असताना, आपण दोन घटका निवांत घालवाव्यात म्हणून आपले चार चव्वल खर्च करून शिनेमा बघायला जातो, त्यावेळी दुसर्‍यांशी भांडणे करण्याचा मूड नसतो. काय होते की अंगचटीला येणार्‍या पुरुषांना त्याचवेळी धडा शिकवा, थेट्रात त्रास देणार्‍यांची लगेच तक्रार करा हे म्हणायला सोपे असते पण महिलांसाठी हे रोजचे अनुभव असतात. कधीतरी त्या मनुष्याला निवांतपणा मिळावा असे वाटत असते. त्रास होतो, वैताग येतो पण दरवेळी धडा शिकवणे, दोन हात करणे ही मानसिक अवस्था असेलच असे नसते. तसे जर असते तर याप्रसंगी तेथे उपस्थित असलेले शंभर एक पुरुष त्या मुलांना दम देण्यास पुढे का आले नाहीत? त्यांनाही त्रास होतच होता ना! पत्रकार असणे हे दुय्यम आहे. आधी माणूस असणे याला प्राथमिकता दिली गेली पाहिजे.

In reply to by रेवती

आरोह 16/11/2015 - 23:02
त्यांचा उद्वेग समजू शकतो (पत्रकार असून.....हि माझी प्रतिक्रिया त्यांना दुखवण्याच्या हेतूने न्हवती) .पण अशा प्रसंगी कोणत्याही स्त्रीने अगदी ठामपणे प्रतिकार करायला हवा असे वाटते.
तुमच एकंदरीत सामाजिक स्थान बघता तुमच्या कडुन अधिक कणखर प्रतिकाराची अपेक्षा होती. तुमच्या अनुभवाने तुम्हाला हे कळायला हवे होते की ते गांधीगीरी ला दाद देण्यालायक नाहीत. किमान माहीत झाल्यानंतर मोबाइल मधुन फोटो वगैरे काढता आला असता. सिनेमा चालु असतांना तुमच्या पत्रकार मित्र मैत्रिणींना संपर्क साधुन किमान कोणा पोलिसाला कळवायला तरी हव होत. बाहेर जाण्याचा बहाणा करुन एसेमेस करुन काहीना काही तर जमल असत यापेक्षा जास्त

In reply to by मारवा

वेल्लाभट 17/11/2015 - 10:41
तुम्ही तक्रार करायला हवी होती असं वाटतं. मान्य आहे, त्या वेळी जे सुचतं ते होतं आपल्याकडून, पण तरीही, जर तक्रार करणं किंवा फोटो काढणं असं काही पाऊल उचललं असतं तर कदाचित पेपरात हा अनुभव देता आला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, एक अनुभवजन्य लेख तुम्ही पेपरमधे नक्कीच देऊ शकता. पुढे ज्यांना असा अनुभव येईल त्यांना प्रत्युत्तराची प्रेरणा मिळेल.
प्रत्येक मल्टिप्लेक्स मधे २- ४ सिक्युरिटी गार्ड नक्की असतात. तुम्ही त्यांची मदत घ्यायला हवी होती. शिवाय त्या मुलांचे फोटो काढुन सोशल मिडियामधे टाकु असेही सुनावु शकतो. गांधिगिरी सिनेमात ठिक आहे. प्रत्यक्षात असे 'लाथोंके भुत बातोंसे नही मानते'.

परिकथेतील राजकुमार 16/11/2015 - 22:30
आपण आपला संताप इथे शब्दाद्वारे व्यक्त केलात आणि थोडे मोकळेपण अनुभवलेत. आता पुढे?? थोडे वाईट वाटेल; पण स्पष्ट सांगायचे तर एकतर तुम्ही अशा प्रसंगांना ठामपणे विरोध करा अथवा गुमान सहन करा. असे आंतरजालावरती शब्द खर्च करून काही होणार नाही. असे प्रसंग फक्त थेटरातरच नाही, तर प्रवासी बस, हॉटेल्स अशा अनेक ठिकाणी येतच असतात. अशावेळी आपल्या शहरातील प्रमुख पोलीस अधिकार्‍यांचे नंबर जवळ असल्यास त्वरीत संपर्क साधत येतो आणि त्वरेने मदत देखील मिळते. http://www.punepolice.gov.in/ https://mumbaipolice.maharashtra.gov.in/ इथे अधिकार्‍यांच्या नावांसकट त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. तसेच इमर्जन्सीच्या वेळेसचे वेगळे संपर्क क्रमांक देखील देण्यात आलेले आहेत. काही शहरात पोलीसांनी व्हॉटसएप ग्रुपची सोय देखील उपलब्ध करून दिलेली आहे. थोडेसे धाडस दाखवून तर बघा. तुम्हालाच नाही, तर याचा फायदा पुढे खूप जणांना मिळणार आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा जी फारच उपयुक्त माहीती पुरवलीत तुम्ही या माहीतीचा मी पण जमेल तसा प्रसार करतो. ही कल्पना खरच व्यावहारीक आहे अनेक अनेक धन्यवाद यासाठी

उगा काहितरीच 17/11/2015 - 01:13
खरंच संतापजनक अनुभव ! माझे असे निरीक्षण आहे की , कधी कधी मित्रांच्या आग्रहामुळे वा अजून काही कारणांमुळे "थर्ड क्लास" चित्रपट पाहायला गेलो तर अशा कॉमेंटस जास्त बोचत नाहीत . पण नातेवाईक किंवा घरचे काही लोक सोबत असतील किंवा संवेदनशील चित्रपट असेल तर या प्रकाराची तिव्रता जास्त जाणवते. (मला तर "किल्ला" सारखा नितांत सुंदर चित्रपट पाहताना पण असा अनुभव आलेला आहे)

पाषाणभेद 17/11/2015 - 01:34
समजा थेटरमध्ये काहीतरी करून ते टगे शांत बसले असते पण नंतर थेटरच्या बाहेर पडतांना त्यांनी वरील ताईंच्या कुटूंबीयांना काही इजा रस्त्यात किंवा त्यांच्या वाहनाला काही केले असते तर? असे होवू शकले असते. एकूण प्रकार पाहता असले टगे टोळभैरव संख्येने वाढले आहेत.

In reply to by पाषाणभेद

परिकथेतील राजकुमार 17/11/2015 - 11:00
समजा थेटरमध्ये काहीतरी करून ते टगे शांत बसले असते पण नंतर थेटरच्या बाहेर पडतांना त्यांनी वरील ताईंच्या कुटूंबीयांना काही इजा रस्त्यात किंवा त्यांच्या वाहनाला काही केले असते तर?
ही असलीच मनोवृत्ती अशा नालायाक लोकांना अजुन उत्तेजन देणारी ठरते. पाभे सॉरी टू से पण असे घाबरत जगण्यापेक्षा विहीर नाहीतर दोरी जवळ करावी.

सिरुसेरि 17/11/2015 - 10:48
असे उद्वेगजनक अनुभव वाढतच चालले आहेत . शक्यतो , नव्या चित्रपटाला अगदि पहिल्या २,४ दिवसांत तेही रात्री उशीराच्या शोला जाणे टाळावे असे वाटते.

वेल्लाभट 17/11/2015 - 10:56
मला कट्यार बघताना आलेला अनुभव. टगेगिरी वगैरे नाही. घटनेचा संदर्भ वेगळा आहे, पण आवाज उठवला की सोबतीने आवाज देणारे जमतात हे सुचवण्याकरिता एक किस्सा. शो हाउसफुल्ल होता. पिक्चर सुरू होताच २ मिनिटात बंद पडला. पुन्हा ५ मिनिटांनी सुरू झाला, पुन्हा बंद पडला. असं चौथ्यांदा झाल्यावर प्रेक्षागृहाच्या दाराशी घुटमळणारे प्रेक्षक एकवटून मॅनेजरच्या ऑफिस पर्यंत पोचले. आवाज सुरू झाला. मॅनेजर ने रिफंड देतो शो होणार नाही असं म्हटलं. त्यावर एकमताने रिफंड नको आम्ही पिक्चर बघायला आलोय असा सूर लावला गेला. मॅनेजर ने "टेक्निकल प्रॉब्लेम येतोय, हवं तर मी तुम्हाला प्रेम रतन चा शो लावून देतो" असं म्हटलं आणि तिथेच चूक केली. पब्लिक जे पेटलंय, जे पेटलंय... तो रडायचा बाकी होता. सुदैवाने फटकावलं नाही कुणी. पण अखेर ४० एक मिनिटं उशीराने शो व्यवस्थित सुरू झाला आणि निर्विघ्न पार पडला. यातही सुरुवातीला एका दोघांनी आवाज केला, मग सगळे जमले. एका व्यक्तीने डायरेक्ट जय भवानी जय शिवाजी म्हटल्यावर गर्दीचा वाढलेला सूर हा लक्षवेधी आणि निर्णायक होता. तात्पर्यः आवाज जिथे गरज आहे तिथे करायला हवा. अर्थात; हा मात्र एक सल्ला आहे. स्थळ काळ वेळानुसार याची वैधता बदलते.

In reply to by वेल्लाभट

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 11:04
खरोखर चा तांत्रीक प्रॉब्लेम असेल तर मॅनेजर नी काय करणे अपेक्षीत होते? आणि शो हाऊसफुल होता म्हणजे मॅनेजर ला शो कँसल करुन रीफंड देण्यात काही फायदा नव्हता. हल्ली सिनेमा कुठुन तरी दुरवरुन प्रक्षेपीत होत असतो. त्या प्रकारात कीतीतरी तांत्रीक प्रॉब्लेम होऊ शकतात. अश्या वेळेसे आरडाओरडी आणि गुंडगीरी करुन तुम्ही काय मिळवलेत. ही निव्वळ टगेगिरीच होती. तुम्हाला तसे वाटणार नाही हे मला नक्की माहिती आहे ( कारण तुम्ही ढोल वाजवून सामान्य लोकांना तसेच त्रास देता. ) पण तुम्ही मॅनेजर च्या जागी असता आणि ४० मिनिटानी पण तांत्रीक बिघाड दुरुस्त होऊ शकला नसता तर तुम्ही काय केले असते.

In reply to by प्रसाद१९७१

प्रभाकर पेठकर 17/11/2015 - 12:29
प्रसाद, थिएटरात एकच प्रोजेक्टर नसतो. स्टँडबाय सोय असतेच असते. अन्यथा चिडलेले प्रेक्षक थिएटराची मोडतोड, जाळपोळ करू शकतात. तो खर्च आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी स्टँड्बाय प्रोजेक्टरची आवश्यकता असते. ज्या चित्रपटासाठी आपण पैसे खर्च केले आहेत तो पाहायला न मिळणं हा अन्याय आहे आणि अन्याया विरुद्ध आवाज ऊठविणे टगेगिरी नाही होऊ शकत. उलट, 'शो होणार नाही, दुसरा चित्रपट दाखवतो' असे म्हणणे टगेगिरी आहे. शक्यता अशी आहे की त्यांचा स्टँडबाय प्रोजेक्टर आधीच बिघडला असेल आणि तो त्या मॅनेजरने दुरुस्त करून घेतला नसेल आणि आपली चुक झाकायला तो प्रेक्षकांना दुसरे पर्याय स्विकारायला भाग पाडत असेल. 'तांत्रिक बिघाड' ही संज्ञा अनेकदा थातूरमातूर कारण म्हणूनही पुढे केली जाते. कारण तंत्रज्ञानाची ओळख सामान्य माणसाला नसते आणि त्यावर तो प्रश्न, शंका विचारू शकत नाही म्हणूनही ती वापरली जाते. असेच झाले असेल असे मी म्हणत नाही पण अशाही शक्यता असतात एव्हढेच सांगू इच्छितो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 12:48
एक तर तो मॅनेजर दुसरा सिनेमा दाखवायला तयार होता म्हणजे प्रोजेक्टर बिघडला नक्की नव्हता. पेठकर काका, तुम्हाला तर नक्कीच माहिती आहे. अगदी प्रगत देशात सुद्धा असे बिघाड किंवा त्रास होतात. बस, रेल्वे लेट होतात. मधेच बंद पण पडतात. पण झुंडीने जाऊन मॅनेजर किंवा रेल्चे च्या स्टेशन मास्टर ला मारहाण करणे / दमबाजी करणे असले प्रकार होत नाहीत. माझ्या मते सॉफ्ट टारगेट मिळाले की हात धुवून घ्या ही वृत्ती आहे. रीफंड आणि झालेल्या त्रासाची भरपाई मिळावी ही अपेक्षा बरोबर आहे. पण क्वचित प्रसंगी असे होऊ शकते हे समजुन घेण्या इतका विवेक पण हवाच. जी लोक झूंडीने गेली होती त्यातली कीती लोक त्यांच्या कामात एकदम परफेक्ट होती?

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 17/11/2015 - 14:19
आपल्याला विशेष माहिती नसेल गोष्टींची तर ती किमान करून घ्यावी वाद घालण्यापूर्वी. माहितीखातर सांगतो, पिक्चर सॅटेलाईट मार्फत दाखवले जातात आता. स्ट्रीमिंग. तांत्रिक अडचण सॅटेलाइट रिसेप्शन मधे होती प्रोजेक्टर मधे नाही. नाहीतर मुळात चित्रच दिसलं नसतं. आणखी म्हणजे दुसरा सिनेमा दाखवायला तयार होता याहीपेक्षा त्याने एक तर झाला प्रॉब्लेम निस्तरायचं न बोलता प्रेम रतन चं नाव घेतलं तिथे लोकांना राग आला. तांत्रिक अडचण असताना मारामारी/दमबाजी करणारी लोकं कट्यार सारख्या पिक्चर ला नसतात. निरर्थक वाद घालणारी तर त्याहून नाही. राहिला भाग विवेकाचा, किंवा कामात परफेक्ट वगरे असण्याचा, तर तो माझ्यामते आपापला आपण सांभाळावा. याहून काय सांगणे?

In reply to by वेल्लाभट

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 14:27
तांत्रिक अडचण सॅटेलाइट रिसेप्शन मधे होती प्रोजेक्टर मधे नाही.
इतके जर तुम्हाला कळते आहे तर त्यात मॅनेजर फार काय करू शकत होता? नेटवर्क कंपनी कडे तक्रार करुन फॉलोअप करण्या पलिकडे तो काय करु शकत होता? त्याच्या नशिबानी ४० मिनिटाने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, नाहीतर त्यानी मारच खाल्ला असता जय भवानी वाल्या कडुन. एक सांगा, तुम्ही मॅनेजर च्या जागी असता तर काय केले असते?

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 17/11/2015 - 14:42
हेच अपेक्षित होतं त्याच्याकडून. की बाबा प्रॉब्लेम आहे खरोखर मी बघतो तुम्ही जरा थांबा. लोकं समजणारी होती. आधी म्हटल्याप्रमाणे हिंदी पिक्चर दाखवतो हे म्हणणं, आणि शो होणार नाही तुम्ही हवं तर रिफंड घ्या आणि जा असलं काहीतरी त्याला नडलं (असतं). याच ग्रूपमधल्या एकाने त्याला नीट बाजूला घेऊन समजवलं की तू ट्राय कर, आणि इतर जय भवानी पब्लिकलाही बाजूला नेलं. सो इट वॉज नॉट लाइक व्हाट यू आर इमॅजिनिंग.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेल्लाभट 17/11/2015 - 14:28
काही जणांना आपण एखाद्या प्रसंगाशी, गोष्टीशी तसूभरही संबंधित नसताना, आपल्याला त्याबद्दल काहीही माहिती नसताना गोष्टी समजून न घेता उगाच वाद घालायची सवय असते. ऑलमोस्ट लाईक ती टवाळखोर मुलं जी पिक्चरशी देणंघेणं नसल्याने उगाच फक्या मारायला थेटरला येऊन बसतात.

नितीनचंद्र 17/11/2015 - 11:14
आम्ही पण गोंधळ घालायचो. आज हे वाचल्यावर खेद होत आहे. पण ते सिनेमे कुणी सिरियसली पहायला येत नसावे. क्लासीकल किंवा ज्याला आर्ट सिनेमा म्हणल जायच त्याली तरुणाई फारशी जात नव्हती. कोरा कागज सा ये मन मेरा... लिखलिया नाम उसपे तेरा म्हणल की आजही चवदा, पंधरा सोळा ऐकु येत. नवरंग सिनेमात मोठा गणपती पाहिला की गणपती बाप्पा मोरया ऐकु येत असे. शम्मी च्या सिनेमाला तर आणखी दंगा असायचा.

पद्मावति 17/11/2015 - 12:10
फारच वाईट अनुभव. सिनेमा हॉल मधे एखादा तरी त्यांचा सेक्यूरिटी चा माणूस पाहिजे. जरा तरी वचक राहील.

प्रभाकर पेठकर 17/11/2015 - 12:32
प्रेक्षागृहात कोणी दंगा मस्ती करीत असेल तर डोअरकिपर, मॅनेजर ह्यांच्याकडे थेट तक्रार करावी. त्या टोळक्याने थिएटरबाहेर त्रास दिला तर पोलीसात तक्रार करावी. मॅनेजरजवळ आपले पत्रकार कार्ड नक्कीच प्रभावी ठरले असते.

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 12:39
त्या टोळक्याने थिएटरबाहेर त्रास दिला तर पोलीसात तक्रार करावी.
काका, हे सर्व भारतात घडल्याचे सांगितले आहे रेवती ताईंनी. इथे असले काही करणे फारच जोखमी चे आहे. हॉस्पिटल ची वारी नक्की होईल. कोणी कीती जोखिम घ्यावी हे ज्याचे त्याने ठरवावे. वर ज्या ज्या मॅनेजर / पोलिसांकडे जावे वगैरे लिहीले आहे त्यापैकी कीती लोकांनी स्वता असे काही केले आहे? ( पोलिसांकडे जाणे वगैरे ), कारण भारतात अश्या घटनांना सर्वांनाच अधुन मधुन सामोरे जावे लागते. बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्या कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे?

In reply to by प्रसाद१९७१

प्रभाकर पेठकर 17/11/2015 - 16:53
प्रसाद, इथे असले काही करणे फारच जोखमी चे आहे. हॉस्पिटल ची वारी नक्की होईल. फारच जोखमीचे वगैरे अजिबात नसते. पुण्यात सररास पोलीस स्टेशनला फोन जातात (आणि पोलीस कृतीही करतात) मग तो गुंडांचा त्रास असो की घरासमोर चुकीचे पार्किंग केलेले असो. वर ज्या ज्या मॅनेजर / पोलिसांकडे जावे वगैरे लिहीले आहे त्यापैकी कीती लोकांनी स्वता असे काही केले आहे? ( पोलिसांकडे जाणे वगैरे ) मी गेलो आहे. माझ्या गाडीसमोर जबरदस्तीने दुचाकी घालणार्‍याला तशी संधी मी दिली नाही म्हणून नंतर मला ओव्हरटेक करून मधले बोट उंचावून दाखवणार्‍याला पुढच्याच सिग्नलला माझी गाडी आडवी घालून गाडीतूनच त्याची गचांडी धरली. त्याने सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याचा शर्ट फाटला. तिथे पोलीस आले आणि मी त्याला घेऊन पोलीसस्टेशनला घेऊन गेलो. पोलीसांपर्यंत न जाता पुण्याच्या रहदारीत अनेकदा मारामारीचे प्रसंग आले. पण माझ्या आकारमानामुळे आणि भयंकर संतापाच्या अभिनयामुळे बहुतेक प्रकरण क्षमा याचना होऊन तिथेच मिटली आहेत. माझ्या एका मित्राने ठाकूर काँप्लेक्स मधल्या एका गुंडाच्या चुकीच्या पद्धतीने पार्कींग केलेल्या गाडीच्या मागे आपली गाडी टेकवून अर्धातास त्याचा खोळंबा करून सॉरी म्हणायला लावले होते. शिवाय त्याच्याकडून सोसायटीला यायच्या ६ लाखाची वसूलीही करून घेतली. आधीचे सेक्रेटरी घाबरत होते त्याला विचारायला सुद्धा. पण माझ्या मित्राने स्मरण पत्र आणि कायदेशिर कारवाईची धमकी दिल्यावर मांडवली करायला आला आणि मांडवली करून ८० टक्के पैसे भरून टाकले. दुसर्‍या एका मित्राच्या घरा समोर खाजगी बसवाले गाड्या उभ्या करायचे, गाड्या दुरुस्ती करायचे. रस्त्यावर ग्रीझ आणि ऑईलचे पॅचेस आले होते. ह्यांना पार्कींग मिळायचे नाही. पोलीसात तक्रार करूनही कांही कारवाई झाली नाही. तेंव्हा पठ्ठ्याने थेट पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली आणि सुत्र फिरुन बोरिवली पोलीस स्टेशनला धावपळ झाली. आठवड्याभरात सगळ्या खाजगी वाहनांची तिथून हकालपट्टी झाली. बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्य कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे? क्वचित प्रसंगी कृती होत नाही पण त्यावरही उपाय असतात. तक्रारीची एक प्रत कमिश्नर ऑफिसला पाठविली की पोलीस दल हलतं. मला मान्य आहे ह्यात त्रास, धोके असतातच पण प्रत्येक घटनेला घाबरून तुम्ही सहन करायला लागलात की गुंड शिरजोर होतातच. बायकांना त्रास जास्त होतो हेही माहित आहे. पण सोबतच्या पुरुषांनी धैर्य दाखविले पाहिजे. आणि एकट्यादुकट्यापेक्षा समुहाने तक्रार केली तर तक्रारीचे वजन वाढते.

In reply to by प्रभाकर पेठकर

शलभ 17/11/2015 - 17:33
मस्तच.
http://fortknox.rtp.lab.emc.com/codestriker/codestriker.pl?action=view&topic=8106206
ह्याला +१

In reply to by शलभ

मला मान्य आहे ह्यात त्रास, धोके असतातच पण प्रत्येक घटनेला घाबरून तुम्ही सहन करायला लागलात की गुंड शिरजोर होतातच.
ह्याला +१ आधी कॉपी नीट झालं नाही.

In reply to by प्रसाद१९७१

पद्माक्षी 17/11/2015 - 20:44
मी स्वतः रात्रपाळीच्या पोलिसांना २-३ दा अशा केसेसमध्ये फोन केला आहे. पोलिस येतात आणि स्पीकर बंद करायला लावतात. पोलिस फोनवर फक्त एरिया आणि पत्ता विचारतात. तुमचे नाव पण विचारत नाहीत.

In reply to by पद्माक्षी

प्रसाद१९७१ 20/11/2015 - 12:42
हा प्रतिसाद वाचुन माझी खात्रीच पटली आहे की "समांतर जग" नक्कीच अस्तीत्वात असतात. मी रहातो तो भारत आणि पद्माक्षींचा भारत हे दोन वेगवेगळ्या समांतर जगात एकाच वेळेस अस्तीतवात असावेत.

In reply to by प्रसाद१९७१

एक सामान्य मानव 19/11/2015 - 08:44
आणि दुर्दैवाने अनुभव निराशाजनक आहे. पोलिस ह्या तक्रारी फार गंभीरपणे घेत नाहीत. पहिल्यांदा त्यांचा सल्ला असतो की जाउद्या तुम्हीही मजा करा. आज सणाचा दिवस आहे/तरूण पोरं आहेत मजा करणारच वगैरे. फारच मागे लागलो तर सांगतात माणूस पाठवतो पण कोणी येत नाही. परत फोन केला की सांगतात रस्त्यात आहे/निघालाय जरा दम धरा. ह्या सगळ्यानंतर तुमचा उत्साह संपलेला असतो किंवा त्रासतरी...

pradnya deshpande 17/11/2015 - 12:59
त्यांना धडा मिळाला आपण माझ्या संतापजनक अनुभवावर सर्वांनी मत व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद. अनेक्षीत अशाच प्रतिक्रीया होत्या. सर्वात अपेक्षीत प्रतिक्रीया आरोह यांची होती. पत्रकार असून हे सहन कसं केलत हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. परंतू प्रत्येकवेळी पत्रकारितेचे शस्त्र उगारुन चालत नाही. टोळक्यांची अर्थात समुहाची मानसिकता चटकन लक्षात येत नाही. अशावेळी आपल्याजवळ असलेल्या शस्त्राचा वापर जपूनच करावा लागतो. मी तसेच केले. आम्ही ज्या चित्रपटगृहात गेलो होतो त्याचे मालक औरंगाबादचे भाजपाचे आमदार अतुल सावे आहेत. चित्रपट वितरणातील बडे प्रस्थ असलेल्या माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे ते पूत्र. पत्रकारिततेच्या निमित्ताने त्यांची ओळख होती. त्यापेक्षाही चित्रपटगृहाच्या मॅनेजरशी जास्त ओळख आहे. कारण पूर्वी दर शुक्रवारी नव्याने प्रदर्शित होणारा चित्रपट पत्रकारांना मोफत फस्ट डे फस्ट शो दाखवण्यात येत असे. चित्रपटाच्या प्रसिध्दीचा उद्देश त्यामागे होता. पुâकट चित्रपट बघून पत्रकार दुसNया दिवशी चांगले परिक्षण लिहतील अशी वितरकांचा भाबडी आशा असे. आता हा प्रकार बंद झाला आहे. असो विषय मॅनेजरच्या ओळखीचा होता. टवाळखोरांचा दंगा सुरु होता त्याचवेळी मॅनेजरला एसएमएस केला होता. त्यात सीट नंबरही लिहले होते. मध्यंतरात चित्रपटगृहात पॉपकॉर्न आणि कोल्डड्रिंक घेउ्न येणाNया मुलांना मॅनेजरने संबंधित सीट नंबर देऊन टवाळखोरांना हेरुन ठेवले होते. चित्रपट संपताच या मुलांना पार्विंâगमध्ये गाठून दम देण्यात आल्याचे मॅनेजरने आवर्जून फोन करुन सांगितले. त्यांनी माफी मागितल्याने पोलिसात देण्यात आले नाही. चित्रपट सुरु असताना गोंधळ होऊनये यासाठी ही कारवाई चित्रपट संपल्यानंतर केली त्याबद्दल मॅनेजरने दिलगिरी व्यक्त केली. नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले. तिथल्या तिथे त्या टोळक्याला दम देता आला असता परंतू आपल्यासोबत नातेवाईक , लहान मुले आहेत याचे भान ठेवणे गरजेचे होते. चित्रपट रात्री एकच्या सुमारास सुटणार होता. चित्रपटगृहापासून घरी पायी जाणार होतो. यावेळी त्या टोळक्याने त्रास देण्याची शक्यता होती. सुरक्षा हा मुद्दा अशा प्रसंगात सर्वोच्चस्थानी असतो. त्यामुळे सहाजिकच बचावात्मक पवित्रा आधी घेतला जातो.

In reply to by pradnya deshpande

मांत्रिक 17/11/2015 - 13:14
मस्त अनुभव शेयर केलात. यापूर्वी किल्ला चित्रपटाबाबतही अशीच चर्चा झाली होती. तुम्हाला त्रास भोगावा लागला. परंतु आता अशा स्वरूपाच्या पब्लिक फोरमवरील लिखाणामुळे याबाबत जागरुकता वाढून चित्रपटगृहाचे मालक देखील पुरेशा उपाययोजना आधीच योजतील अशी आशा आहे. नव्हे तुम्ही हा लेख तुमच्या संपर्कातील सर्व थियेटर मॅनेजरना दाखवा. इथली गरमागरम चर्चा व लोकांचा संताप त्यांना पाहू देत. नक्कीच फरक पडेल.

In reply to by pradnya deshpande

प्रभाकर पेठकर 17/11/2015 - 17:00
नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले. ही चक्क फसवणूक आहे. आम्ही आमचा मौल्यवान वेळ वाया घालून तुमच्या प्रसंगाशी एकरुप होत सात्विक संतापाने कांहीतरी प्रतिक्रिया द्याव्यात आणि तुम्ही नंतर असले खुलासे करावेत. हेच तुमच्या मुळ लेखात टाकले असते तर कांही बिघडलं असतं का?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 17:09
फसवणुक केली लेखिकेनी ह्याच्याशी पूर्ण सहमत. माझा वेळ अजिबात मौल्यवान नसल्यामुळे तो काही वाया वगैरे गेला नाही ( तो तसाही वायाच जात होता ). लेखिकेशी मॅनेजरशी ओळख होती म्हणुन त्याने जी काही कारवाई केली ती केली का तो सर्वांच्या बाबतीत ती करतो? तसेही इतके आधी कळवून सिनेमा संपे पर्यंत वाट बघण्याला काय अर्थ आहे. लोकांना त्रास होयचा तो झालाच.

In reply to by प्रभाकर पेठकर

श्रीरंग_जोशी 17/11/2015 - 17:11
असे वागणे (समोरच्या व्यक्तींची त्यांच्या नकळत परीक्षा घेणे) कधीच पटत नाही.

In reply to by असंका

असंका 17/11/2015 - 17:16
मॉडेल उत्तर येतात. त्यातलं वाचल्यासारखं वाटत होतं...अनेक विद्यार्थ्यांनी अपेक्षित उत्तरे दिली. पण विषयाची सखोल जाण दिसून आली नाही.

In reply to by असंका

आदूबाळ 17/11/2015 - 19:52
लोल. ती मॉडेल उत्तरं वाचून खच्चीकरण नक्की होतं. "विषयाची सखोल जाण दिसून आली नाही", "मूलभूत संकल्पना समजलेल्या दिसत नाहीत", "या पातळीला असे प्रश्न सोडवता येणं ही किमान अपेक्षा आहे" वगैरे वाचून आपली खरोखर काय लायकी आहे असा प्रश्न पडायला लागतो. खरोखर संतापजनक अनुभव!

याॅर्कर 17/11/2015 - 14:43
आम्ही तिघे मित्र सिनेमा बघत असताना मागच्या बाजूस बसलेल्या काॅलेजच्या सात-आठ मुली फारच गोंगाट घालत होत्या.त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली नाहीत,तरीही त्यांच्या गोंगाटामुळे चित्रपटाची मजा घेता आली नाही.

In reply to by याॅर्कर

प्रसाद गोडबोले 17/11/2015 - 14:49
ह्यॅ , शक्यच नाही . लहानपणी आम्ही माहेरची साडी चित्रपट पहायला गेलो होतो तेव्हा मुली तर अगदी मुसमुसुन रडत होत्या , अजिब्बात एकीनेही गोंधळ घातला नाही =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

दिपक.कुवेत 17/11/2015 - 17:09
तू लहानपणीही बघून बघून "माहेरची साडी" चित्रपट पाहिलास?? ते सुद्धा थेटरात जाउन?? अरेरे....

In reply to by दिपक.कुवेत

नाखु 17/11/2015 - 17:13
तो नावावरून फसला असावा ती इंग्लीश आव्रुत्ती असावी किंवा इथे सांगण्य्साठी (तरी) सिनेमाचे नाव बदलले असावे. रास्त शंकायन नाखु

सिरुसेरि 17/11/2015 - 14:45
आजकाल राक्षसी यंत्रांवर विणलेले तामसी कपडे घातल्यावर लोकांची मानसिकता तामसी बनत चालली आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 17/11/2015 - 14:58
आपले अमुल्य ज्ञानामृत द्यावे.

म्हणजे थेटरासाठी हा गणवेष अनि वार्य करू ( त्रिमिती सिनेमाचक्षु सारखा) हा का ना का

कपड्या-कपड्या नुसार न बदलणारा (आतला) नाखु

In reply to by सिरुसेरि

याॅर्कर 17/11/2015 - 16:53
राक्षसी यंत्रांवर विणलेले तामसी कपडे
आमचे पोटपाणी चालवणार्या यंत्रांना "राक्षसी" म्हणून संबोधल्याबद्दल निषेध. . . . ---(राक्षसीयंत्रप्रेमी टेक्स्टाईल इंजिनिअर)

प्रसाद गोडबोले 17/11/2015 - 14:56
आम्ही फ्यँड्री चित्रपट पाहिला थेटरात गेलो होतो तेव्हा काही टवाळ लोकांचे हेच चालु होते काही ना काही कमेन्ट्स करणे , पण जसा जसा चित्रपट उलगडत गेला तसा तसा त्यांचा आवाज थंडावत गेला ... अन शेवटी फेकुन मारलेल्या दगडा नंतर तर सारे सुन्न होवुन थेटराबाहेर पडले. अवांतर : एरव्ही स्वप्नील जोशीच्या चित्रपटावर टिका टिपण्णी करणे ( अर्थातच मर्यादा न सोडता) ह्यात काही जास्त वाईट नाही असे आपले स्पष्ट मत आहे . हां आता नाना पाटेकरच्या प्रकाश आमटे किंव्वा येवु घातलेल्या नटसम्राट किंवा आपल्या सुबोधचा बालगंधर्व वगैरे क्लासिक चित्रपट चालु असताना कोणी असली काही टिकाटिपण्णी करेल तर त्याला तिथल्या तिथे पुणेरी माज दाखवावा :)

विवेकपटाईत 17/11/2015 - 18:34
साक्षर आणि सुशिक्षित यात फरक असतो. लिहिता वाचता न येणारा व्यक्ती हि सुशिक्षित असू शकते. साक्षर व्यक्ती हि अशिक्षित असू शकते हे संस्कारांवर अवलंबून आहे.

आदिजोशी 17/11/2015 - 19:39
हाच एक मोठा संतापजनक अनुभव आहे. हे असले धेडगुजरी सोशल एक्सपिरीमेंट कोणत्या अधिकारात केलं तुम्ही? लोकांनी तुमच्या अनुभव खरा समजून मनापासून प्रतिक्रीया दिल्या आणि नंतर हे 'नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले' वाचायला लागलं. का वेळ वाया घालवलात लोकांचा? आणि लोकांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटण्यासारखी अशी काय ऐतिहासिक घटना होती ही? की चारचौघात कसं वागावं ह्या उपदेशाचे डोस पाजायचे होते? मूर्खच बनवलेत लोकांना.

In reply to by आदिजोशी

अस्वस्थामा 18/11/2015 - 16:06
:)))

In reply to by आदिजोशी

परिकथेतील राजकुमार 17/11/2015 - 20:00
माय फ्रेंड आदि इज संतापींग सो मच... जौ दे रे आदु. लोकं मिपावर प्रयोगाला येतात आणि काही काळात स्वतःचा गीनीपीग होतात हे तुला काय ठौक नाय काय? ;)

रेवती 17/11/2015 - 19:54
हात्तिच्या! आम्हाला तावातावाने प्रतिसाद द्यायला लावून ते प्रकरण निकालात निघाल्याचं नंतर सांगताय होय! तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? नै, मला फार महत्वाची कामे त्यावेळी नव्हती, पण तुम्ही असं का करावं? असो, जे काही केलत ते आवडलं नाही. पराकडून नवी माहिती मात्र समजली.

परिकथेतील राजकुमार 17/11/2015 - 19:57
नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले.
ओक्के! पुढच्या वेळी असा फालतुपणा करू नका. अशा स्वभावामुळेच मग थेटरमध्ये घडले तसे प्रसंग वारंवार अनुभवाला येतात. बाकी, तुमच्या (मोठ मोठ्या) ओळखीने मला कोणी पार्किंगमध्ये गाठून दमात घेऊन नये म्हणून भितीने येवढीच प्रतिक्रीया दिली आहे.

चैतन्य ईन्या 17/11/2015 - 20:49
हे असले प्रयोग करून आपण दुर्दैवाणे पत्रकार लोकांवर वकील लोकांप्रमाणेच विश्वास ठेवू नये असे सिद्ध करताय काय?

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 16:28
अनुभव वाचुन अतिशय वाइट वाटले. मल्टीप्लेक्समधे अनावश्यक गोंधळ करणार्‍यांना तिकीटाचे पैसे परत करुन बाहेरचा रस्ता दाखवतात हा अनुभव घेतलेला आहे (मी आतच होतो). बाकी रात्री टोळके पाठलाग करेल, सोबत पोरं आहेत इतकी परिस्थीती वाइट असेल तर अशा रात्री अशा परिसरात चित्रपट बघायला गेलात कशाला ? तसंही तुमचं शांत बसणं तुमच्या मुलांना भविष्यात असेच निर्लज्ज अथवा त्याउलट भित्रट बनवायला कारणीभुत ठरु शकते हे लक्षात आले नाही काय ? बाकी तो नंतरचा तुमचा गौप्यस्फोट अजिबात मास्टर-स्ट्रोक वगैरे समजु नका. तुम्ही पत्रकार आहात. एका सामान्य माणसाप्रमाणे झालेली फटफजीती तुम्ही स्वतःच्य लेखणीने नक्किच चितारणार नाही याची खात्री असल्याने तुम्ही नंतर काय कारवाइ केली हे प्रकाश झोतात येणार हे गृहीत धरलेच होते. फार कमी लोकांनी तुम्ही पत्रकार असुनही हे कसे सहन केले विचारले नाही ? मिपा आहे हे अस्चं आहे :) असो. सामान्यांना असे अनुभव खरेच त्रासदायक असतात.

राजेश कुलकर्णी 20/11/2015 - 12:01
पडद्यावर बाई दिसली की लोक चेकाळतात. दंगा घालणारी मुले मराठी की अमराठी यावर का जागा घालवण्यात आली? त्याने काय फरक पडतो? असा उपद्रव होऊ नये हे पाहणे ही थिएटरमालकाची जबाबदारी.ती पार न पडल्यास तक्रार करणे, तिची दखल न घेतली गेल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागणे हे उपायही योजता येतील. आपण त्याचवेळी या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला तरी इतर लोक षंढासारखे बसून असतात. सर्वांनी मिळून आवाज उठवून थोडावेळ शो बंद पाडायला लावून या मुठभर लोकांना बाहेर काढायला भागे पाडणे ही तशी अवघड गोष्ट नाही. पण या षंढांच्या बहुमतामुळे तसे होताना दिसत नाही.

आनंदी गोपाळ 20/11/2015 - 23:26
एखाद्या पत्रकाराच्या संपर्कात येणे, हा किती संतापजनक अनुभव असू शकतो, याचा तुम्ही अनुभव घेतला असेल, तर त्या लोकांच्या जवळपास फिरकणेही नको, हा धडा नक्कीच घेतला असेल. पुन्हा एकदा इथे तो धडा मिळालेला आहे.

राजेश कुलकर्णी 21/11/2015 - 09:38
तुमच्या या अनुभवाचा संदर्भ देऊन मी आजच्या फुसके बार या स्फुटात त्याच्या अनुषंगाने पुढे लिहिले आहे.

मनिमौ 22/11/2015 - 17:48
बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्य कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे? मी दोम्बिवली ला होते तेव्हा रात्री १० नन्तर लग्नाची वरात जात होती. स्पीकर वर मोठ्याने वाजणारी गाणी आणी फटाके. १०० नम्बर वर फोन केल्यावर १० मिनिटात पोलिस आले व तो गोन्धल बन्द पाडला. नन्तर आम्हाला आवाज खरच बन्द झाला आहे ना ही खात्री करण्या परत फोन पण आला होता. राम नगर पोली दोम्बीवली