Skip to main content

अजंठा लेणी सहल माहिती हवी आहे

लेखक फिलोकॅलिस्ट यांनी सोमवार, 09/11/2015 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मला अजंठा लेणी बघायला जायचं आहे पण तिथे राहण्याची-जेवणाची काय सोय आहे याची माहिती नाही, तरी त्याबद्दल काही माहिती दिलीत तर खूप मदत होईल. तसेच अजून कोणती ठिकाणं बघता येतील. धन्यवाद...

वाचने 6987
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

"प्रचेतस" ह्यांना घेवून जाणे, हा नम्र सल्ला. हा सल्ला फाट्यावर मारलात तर, आपल्यासारखे लेणी-दरिद्री आपणच. आम्ही नुसतीच शिल्पे बघतो, "प्रचेतस" दगडातील आकार-उकार पण समजावून सांगतात, हा स्वानुभव २ वेळा घेवून झाला आहे.

अजंठा लेणी फर्दापुर गावापासून ५/६ किमी अंतरावर आहेत. राहण्यासाठी अजंठा टी जंक्शन आणि फर्दापुर येथे एमटीडीसी ची दोन रिसॉर्ट्स आहेत. टी जंक्शन गावापासून थोडे लांब पडते. पण दोन्ही रिसॉर्ट्स उत्तम आहेत पैकी फर्दापुरमधले तर खूपच सुंदर आहे. अतिशय उत्तम, आरामदायक खोल्या वाजवी दरात. ह्याशिवाय फर्दापुरात काही खाजगी लॉजसुद्धा आहेत. पण सर्वात एमटीडीसीच सर्वोत्तम आहे. एमटीडिसीमधेच त्यांचे उपाहारगृहसुद्धा आहे मात्र तिथे अजिबात जाऊ नका. दर प्रचंड महाग आहेत आणि त्यामानाने क्वालिटी इतकी ख़ास नाही. त्यापेक्षा गावात ४/५ ढाबे आहेत. गरमागरम फुलके, दाल फ्राय आणि ख़ास खानदेशी शेवभाजीचा आस्वाद आवर्जून घ्याच. प्रचंड भारी चव आहे. बाकी अजिंठ्याजवळच पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. सिल्लोड-गोळेगावजवळचे अण्व मंदिर, आडबाजूची घटोत्कच लेणी, गौताळ्याची लेणी, वेताळवाडी किल्ला ही काही ठळक नावे. मात्र अजिंठा लेणी पाहायला किमान १ दिवस द्यावाच लागतो. त्यासाठी टी जंक्शनला सकाळी ९ वाजेपर्यंत पोचावे. तिथून एसटीच्या सीएनजी बसेस ने अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पोचावे १०/१५ मिनिटात पायऱ्या चढून १ नंबरच्या विहारापाशी पोहोचतो. दुसरा मार्ग म्हणजे फर्दापुरअलीकडे ८/१० किमी अंतरावर अजिंठा व्ह्यू पॉइंट येथे जावे. इथून संपूर्ण वाघूर नदी आणि तिच्या प्रवाहाने कापलेल्या अजिंठा लेणी समूहाचे उत्कृष्ट दर्शन होते तिथून अर्ध्या तासात डोंगर उतरून ९/१० क्रमांकाच्या चैत्यगृहापाशी पोहोचतो.

मुंबईकडून जाणार असाल तर- कुर्लाLTT-अमृतसर एक्स ने जळगावला सकाळी सहाला उतरा.तिथे नाश्ता करून औरंगाबादला जाणाय्रा बसने "अजिंठा T junction stop"ला उतरा ( सवा तास,६० किमी ).तिथून चार किमी एमटीडीसीच्याच बसने लेण्यापाशी जा.तिथे सामान ठेवण्यासाठी क्लोकरूम,चांगली टॅाइलेटस आहेत.लेणी पाहिल्यावर परत T junction ला या.परत औरंगाबादच्याच बसने औरंगाबादला जाता येते ( २ तास,१०० किमी ).शेअर ओम्नी टॅक्सीजपण सतत असतात.औरंगाबादला राहून दुसय्रा दिवशी धुळे / कन्नड कडे जाणाय्रा बसने दौलताबाद किल्ला ( २२ किमी,) आणि पुढेच आणखी १० किमीवर वेरूळ लेणी स्टॅाप आहे.लेण्याच्या पुढेच एक किमी वर घृष्णेश्वर( ज्योतिर्लिंग ) आहे.शेअर टॅक्सी सतत असतात.औरंगाबादमधले पाणचक्की,मकबरा ,गावातल्या लेण्यांसाठी आणि तारा पानवालाचे पान आणखी एक दिवस लागेल.परतीसाठी तपोवन एक्स 17618 दुपारी अडीचला असते.दहा वाजता मुंबई. अजिंठा लेणी सोमवारी बंद असतात,वेरूळ( एलापूर /Ellira )मंगळवारी बंद असतात.एरवी साळी सहा ते संध्याकाळी सहा पाहता येतात.ही झाली झटपट सहलीची माहिती.लेण्यांची माहिती वर जयंततराव,प्रचेतस यांच्या धाग्यांत आहेच.पीडीएफ पुस्तक ( फ्री ) आहेच.

औरंगाबाद मध्ये मुक्कामी राहून, आजूबाजूचा प्रदेश पाहता येवू शकतो. स्वतचे वाहन असेल तर हे सोयीचे आहे. वरील धाग्यात सांगितल्या प्रमाणे, बीबी का मकबरा, पाणचक्की, घृष्णेश्वर मंदिर, अजिंठा वेरूळ लेणी आणि देवगिरी (दौलताबाद) किल्ला हे पाहण्या सारखे आहे. औरंगाबाद मध्ये हि लेणी आहेत, आमची ती बघायची राहिली होती. राहण्यसाठी चांगली हॉटेल औरंगाबाद मध्ये आहेत. आम्ही औरंगाबाद जिमखाना येथे राहिलो होते, चांगले हॉटेल होते