Skip to main content

वरंधा घाटातले मनुष्यस्पर्श नसलेले बॅक वॉटर

लेखक नितीनचंद्र यांनी सोमवार, 09/11/2015 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात निसर्ग भरभरुन आहे. याची कल्पना जबाबदार सत्ताधारी किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कधी घेईल तो दिवस तमाम जनतेचा सोन्याचा दिवस. मध्यंतरी एक आकडेवारी जमाकरुन मी चकीत झालो. अवघ्या २० वर्षात अनेक पर्यटन विषयक प्रकल्प राबवुन केरळ राज्याने त्यांच्या राज्यातील तरुण परराज्यात जाणे थांबवले आहे. केरळ मधील आयुर्वेदीक उपचार पर्यटन असो की बॅक वॉटरवर आधारीत पर्यटन असो. निसर्गाने दिलेल देण त्यांच्या कल्पकतेने सुरेख लेण चढवुन परत जनतेला रोजगाराच्या निर्मीतीसाठी परत आल आहे. काल मी महाडहुन भोर मार्गाने जेव्हा पुण्याला आलो तेव्हा जाणवले की वरंधा घाटातला किमान २० किलोमीटर लांबीचा रस्ता त्या धरणाच्या बॅक वॉटरची सोबत करतो. थोडाश्या उन्हात पाणी चमकत होत. पण ना कुठे रिसोर्ट्स ना कुठे बोटींगचे स्पॉट्स. मनात आणल तर इथे हॉउसबोटीवर दोन दिवस रहाता येईल इतकी छान व्यवस्था होण्यासाठी निसर्ग वाट पहातोय. जरा आजुबाजुचे डोंगर थोडे उघडे - बोडके दिसतात त्यासाठी काही वर्ष द्यावी लागतील. पण हा निसर्ग कुठेही कमी नाही. ही हाक कुणी पोचवेल का त्या जबाबदार व्यक्तीकडे /संस्थांकडे /सरकार दरबारी ?

वाचने 7560
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

अजुन हे कोणाला कळाले नाहीये म्हणूनच तुम्ही इतक्या सुंदर निसर्गाचा आनंद घेऊ शकलात. नाहीतर वाट लागलेलीच बघायला मिळाली असती

हल्ली जरा चार लोकांना एकादे ठिकाण ठाऊक झाले की अल्पावधित तिथे बजबजपुरी, घाण, प्रदूषण, गोंगाट, बाजारूपणा हे सर्व प्रकार वाढीला लागून मूळ सौंदर्य आणि शांति नष्ट होते. तस्मात निदान काहीतरी जागा जश्या आहेत तश्याच राहू देणे आवश्‍यक आहे .

असाच विचार कोणाच्या तरी मनात आला असेल आणि मग पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा या सारख्या अनेक ठिकाणांचा 'विकास' केला गेला असेल. आता तिथे काय परिस्थिती असते ते आपण बघतोच. पर्यटनाला आक्षेप नाही पण आपल्याकडे जबाबदारी न घेता नुसती मजा घेणे हि प्रवृत्ती खूप आहे आणि अशांना कोणी रोखतही नाही त्यामुळे बरबाद होण्यापेक्षा ती ठिकाणे आहेत तशीच राहूदेत.

अवघ्या २० वर्षात अनेक पर्यटन विषयक प्रकल्प राबवुन केरळ राज्याने त्यांच्या राज्यातील तरुण परराज्यात जाणे थांबवले आहे. ???? http://indianexpress.com/article/india/india-others/kerala-migration-su… The number of Kerala emigrants as estimated by the migration survey in 2014 is 23.63 lakhs. The corresponding number was 22.81 lakhs in 2011, 21.93 lakhs in 2008, 18.38 lakhs in 2003 and 13.62 lakhs in 1998. These numbers indicate that emigration from Kerala has been increasing since 1998. Between 2011 and 2014, the total number of emigrants from Kerala increased by about 81,000. The report said remittances to Kerala have continued to grow ever since Keralites started migrating to the Gulf region. Total remittances to Kerala during the 12-month period ending in March 1, 2014 were Rs 72,680 crores. - See more at: http://indianexpress.com/article/india/india-others/kerala-migration-su…

असल्या पिकनिकबाज नजरा वरंध्यावर आणि सह्याद्रीवर कधी न पडो हीच दिवाळीनिमित्त प्रार्थना!

In reply to by भटकंती अनलिमिटेड

आमेन! आजकाल असल्या जागा कुणास न सांगणे हेच मोठे पर्यावरणसंरक्षक कार्य आहे.

आता विषय निघाला आहे म्हणून... पूर्वी वरंधा घाट नसताना त्या ठिकाणी (आत्ताच्या बॅकवॉटरच्या जागेमधून) एक रस्ता होता आणि धरणाच्या बांधकामानंतर / वरंधा घाट झाल्यानंतर तो रस्ता पाण्याखाली गेला आहे. या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर त्या रस्त्याच्या खुणा आणि अनेक छोटे पूल वगैरे दिसले आहेत. याबाबत कोणाला अधिक माहिती आहे का? भोर पासून महाडपर्यंत नक्की कसा रस्ता होता? आणि शिवथरघळला जाण्यासाठी वेगळा रस्ता होता का?

In reply to by मोदक

मुख्य धारेवर असलेला वरंधा घाट (भजी पॉइंट) पहिल्यापासून तोच आहे. मात्र आधी आता जिथे निरा देवघर धरणाचं बॅकवॉटर आहे त्यातून सध्याच्या घाटवाटेला पूर्वीचा रस्ता जोडला गेलेला होता. आता धरण्याच्या पाण्यामुळे नवीन रस्ता डोंगरातून काढलेला आहे. त्यामुळे ८/१० किमी अंतर वाढले आहे. जुना रस्ता मुख्य धारेच्या अलीकडे खिंडीच्या १/२ किमी आधी सध्याच्या रस्त्याला मिळायचा. पूर्वी मी त्या रस्त्याने प्रवास केला होता.

In reply to by प्रचेतस

हेच सांगायला आलो होतो. जुना रस्ता खूपच वळणावळणांचा होता आणि काही वळणे अशी होती की एसटीची मागची बाजू गाडी वळताना खालच्या रस्त्याला घासायची. वरंधा घाट हा कावळ्या किल्ल्याच्या पोटातून काढलेला आहे. घाटातल्या तिसर्‍या हेअरपिन वळणापासून खाली माझेरीत उतरायलापूर्वी पायवाट होती. कावळ्या किल्ल्याच्या उत्तर बुरुजाकडूनही खाली शिवथरघळीकडे उतरायला वाट होती. दरड कोसळल्यामुळे ती बंद झाली. आता कावळ्या किल्ला ते शिवथरघळ डोंगरभ्रमंती करायला वरंधा घाट पूर्ण उतरावा लागतो.

मागे एका माकडाचे अपहरण झाले होते तोच का हा वरंधा घाट?

भारतातील सर्व राज्ये पर्यटनासाठी धोरण आखुन आपले राज्यस्तरावर रोजगार निर्मीती करत आहेत. त्यांना निसर्ग बिघडेल अशी भिती वाटत नाही. मग आपल्याला का भिती वाटावी ?

अहो, आपल्याकडे शेतीत अतिरिक्त मनुष्यबळ आहे. एक रिपोर्ट म्हणतो की भारतात दरडोई ०.७५ एकर शेती आहे जी बिलकुल किफायतशीर नाही. अश्या वेळेला नकारात्मक द्रूष्टीकोन बाजुला ठेऊन ( किमान आत्महत्या टाळण्यासाठी ) या नैसर्गीक साधनसंप्पतीचा वापर ( डोळसपणे ) करायला काय हरकत आहे ?

In reply to by नितीनचंद्र

या नैसर्गीक साधनसंप्पतीचा वापर ( डोळसपणे ) करायला काय हरकत आहे ? ओके. या नैसर्गीक साधनसंप्पतीचा डोळसपणे वापर झाल्याचे एखादे उदाहरण आहे का?

In reply to by मोदक

किमान एक तरी योग्य पुनर्वसनाचे महाराष्ट्रातील उदाहरण द्या. काल झी २४ तास च्या बातम्यात अभयाअरण्यातील नील गाई कश्या पे पिकांची नासाडी करतात ते दाखवले होते.पुनर्वसनात अक्षम्य हयगय आणि धूळ्धाण होत असेल तर का द्यावी स्थानीकांनी जमीन आणि पाणी???

हे बघा आणखी एक उदाहरण. कास पठार खरोखर्च रमणीय होते. पण मूर्ख पर्यटकानी त्याचे काय केले बघा. त्या मूर्खानी लावलेल्या वणव्यात किती दुर्मीळ वनस्पती , किडे , प्राणी मेले असतील कोण जाणे आजच्या लोकमतमधली बातमी वाचा. सातारा जिल्ह्यातील कास पठारासह गणेशखिंड व पेट्री गावालगत तीन ठिकाणी काही अतिउत्साही पर्यटकांनी वणवा लावून निसर्ग सौंदर्याची अपरिमीत हानी केली आहे. या वणव्यामध्ये शेकडो हेक्टरमधील जनावरांचा सुका चारा जळून खाक झाला आहे. दिवाळीची सुटी साजरी करण्यासाठी सध्या सातारा तालुक्यातील कास पठार परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. काही हौसी पर्यटक ओल्या पार्ट्याही करत आहेत. अशा काही अतिउत्साही पर्यटकांनी गणेशखिंडीचा माळ, पेट्री गाव व कास पठारावर वणवा लावला. त्यामध्ये जनावरांचा सुका चारा जळून नष्ट झाला.