लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
वांग्याच्या लेखावरून वाडीचा उल्लेख आला आणि आमचा पौर्णिमाक्रम आठवला. बरेच लोक वाडीला नरसोबाची वाडी म्हणतात पण इकडे सगळे नुस्त वाडीच म्हणतात. म्हैसूर डोसाला म्हैसूर मधे नुस्ताच डोसा म्हणतात त्यातला प्रकार. दर पौर्णिमेला वाडीला जाउन यायचे हा बर्याच जणांचा क्रम. मीही वडिलांच्या बरोबर म्हणून बर्याचदा जात असे. अगदी लहानपणीची वाडी आठवते ती म्हणजे खेळणी, ताजे पेढे आणि कवठाच्या बर्फी साठी. बरेच धार्मिक कार्यक्रम वाडीलाच व्हायचे, मग वाडीच्या पुजार्यांची मोठी मोठी थोड्या जुन्या प्रकाराची घरे, त्यांच्याकडच्या त्या तृप्त जेवणावळी आणि कृष्णेत मनसोक्त मारलेल्या डुबक्या. ऐन पावसाळ्यात गेलात तर देव वरती एखाद्या पुजर्याकडे ठेवलेले असतात. कॄष्णेच्या महापुराच्या वेळी मी जेव्हा गेलो होतो, आख्खी वाडी पाण्यात गेलेली. शिरोळ जवळून जाताना एखाद्या समुद्रातुन रस्ता काढलाय काय असे वाटत होते.
असो. तर वाडीला जायचे म्हणजे दिवसातला सगळा क्रम एक्दम पक्का, झोपेतून जागे केले तरी सांगता येईल असा. दुपारचे उन टाळण्यासाठी सकाळी ८ वाजता गाडीला किक, अर्ध्या पाऊण तासात वाडी. मग नेहमीच्या ठिकाणी गाडी लाउन जायचे सुखदेव कडे. प्रत्येकाचा पेढेवाला ठरलेला, तसे आमचे सुखदेव. तर मग तिकडं आधिच्याच ढिगार्यात चपला काढून (ठेवा इथच कुठ जात नईत) त्याच्याकडून नारळ, पावशेर ताजे पेढे (वाडीत दुकान सांभाळणे म्हणजे दुकानात पेढे करत बसणे), खडीसाखर, उदबत्ती आणि मोठा कापूर घ्यायचा आणि मंदिराकडं चालायला लागयचं. उनातून येउन मंदीरातल्या गार गार फरशांवर पाय ठेवले कि जे काही वाटत त्याची सर दुसर्या कशाला नाही. सरळ खाली घाटाच्या पायर्या उतरून नदीकडं जायचं आणि हात पाय मनसोक्त धुऊन दर्शनाला न जाता जायचं उदबत्त्या आणि धुप जाळायला मुख्य मंदिराच्या अगदी समोर टोकाकडच्या जागी. इथुन अशी काही नदि दिसते कि अगदी जलतरण तलावात उंचावरून उडी मारयला केलेल्या फळीवरच उभारल्यासारखं वाटतं. पुढे मुख्य मंदिराच्या मागपर्यंत आलेल्या रांगेत उभ रहायचे. मग पादुका जवळ आल्या कि पहिला शेंदरी रंगात रंगवलेला गणपती, इकडे थोडे पैशे पेटीत टाकयचे आणि पादुकांसमोर यायचे. हातातले सगळे उरलेले पुजारर्याकडे देउन पादुकांसमोरच्या पायरीवर नतमस्तक व्ह्यायचं. पुजारी थोडी खडीसाखर काढुन घेईल नारळावर पुजेतली काही फुलं ठेवेल, परत करेल; बाई असेल तर ओटीत देईल. मग प्रदक्षीणा चालू करयची. सगळ्यात पहिला दक्षिण द्वारासमोर येउन नमस्कार. मग मागच्या बाजुला नरसिह सरस्वतींच्या फोटो च्या इथलं तिर्थ घ्यायचे; कोणि तिर्थासाठी बाटली दिली असेल तर ती भरून घ्यायची. मग तिकडच्या ओळीत असणर्या देवांच्या पाया पडयचे, पुढे अन्नपुर्णा; प्रदक्षिणा पुर्ण. अशा आपल्याला पाहिजेत तितक्या प्रदक्षिणा घालायच्या. गुरूचरित्रात सांगितले आहे म्हणे कि एखादी गरोदर बाई जसे चालते तशा प्रदक्षिणा घालाव्यात, काही लोक त्या बाईचे मुल आता धाउ लागले आहे आनि त्यामागून आपण पळतोय (मुलाच्या) असं चालतात. असो. मग भल्या मोठ्या अंगार्याच्या पेटीतून अंगार्याच्या पुड्या बांधून घ्यायच्या आणि देवासमोरच्या मोकळ्या जागेत येउन स्वस्थ बसायचं. हातातल्या पिशवीतले एक दोन पेढे तोंडात टाकायचे; एखादा बाजुने फिरण्यार्या कुत्र्यांना टाकायचा आणि देवाला साष्टांग नमस्कार करून उठायचे. मग पायर्या चढुन पुन्हा वर यायचे आणि मारूती, पुढे रामचंद्र स्वामी समाधी, नारयण स्वामी, गोपाळ स्वामी करून टेंबे स्वामींच्या मंदिरात. ईथे टेंबे स्वामी, गुळवणी महाराज आणि रंगावधूत महराज. इकडे बसून घरी देण्याएवढे पेढे ठेउन बाकी संपवून टाकायचे. मग मंदिराबाहेर येउन हळद कुंकू विकत घेउन सुखदेव कडे हिशेब करयला (आणि चपला घ्यायला). मग तिकडून म्हादबा पाटिल महाराजंच्या समाधी मंदिरात. इकडे बसुन परत वाटले तर पेढे.
आता यापुढे वाडीच्या बाजारात वांगी वगैरे घ्यायला (अवांतर: तशी कराडला पण फार चांगली मिळतात). हरभर्याचा सिझन असेल तर गाडिच्या मागे बसून खायला सोलाणा. मग त्या स्टंड बाहेरच्या हॉटेल मधे चहा, भूक लागली असेल तर मिसळ नाहितर वडा पाव. परत गाडिला किक मारून घरी जेवायला.
प्रतिक्रिया
करदंट...येस..!
लोक वाडीला जातात पण तिथून
आम्ही उलटा प्रवास केला. आधी
ब्येस्टच.
आपण लवकरच एकत्र जाणार आहोत ना
तिकडे यायला कधीपण तयार. :)
यावेळी खिद्रापूर नक्की, प्रचेतस भाऊ.
वाडी मस्तच !!!!!
"दोन वर्षा पुर्वि गेलो होतो
अजित कडकडे यांचे 'दत्त अवधूता
श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म
पीठापुरम बहुतेक.
धन्यवाद!
पाण्यात नैवेद्य सोडणार्यांना,पाण्याच्या स्वच्छतेची लई काळजी!
आंध्रात कुठल्या गावी?
माहितीकरिता
पौर्णिमा म्हणजे गर्दी असते.
Pagination