Skip to main content

आसरा

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 17/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
घर तसं छपराचं. एका बाजुला गुरांचा गोठा. दुसऱ्या बाजुला माजघर. पाठीमागे पडवी. मध्येच सारवलेला ओटा. गोठ्याला लागुन भली मोठी चिंच ऊभी. लागोलाग ओढा. कोरडा. फक्त पावसाळ्यात भरून वाहीलेला. ओढ्याकाठी चिंच, सिताफळ, कवठ आणि केक्ताडाची वैविध्य झाडं. या झाडांत बुजुन गेलेलं ते छपराचं घर. एकटं. गावापासुन दुर. घरापासुन निघालेली पायवाट उतरती होत ओढ्यात शिरलेली. वगळी वगळीतुन जात पुन्हा चढाला लागलेली. या पायवाटेवरुन घरातील माणसे येजा करीत. घरातील प्रमुख पुरुष याच वाटेवरून बैलगाडी नेई. लहानग्यांचा पोरखेळही याच वाटेवर चाले. त्या घरात एक म्हातारा रहात होता. पांढरट अंगरखा, मळकट धोतर, डोक्यावर केशरी पटका अशी वेशभुषा असलेला. आल्यागेलेल्या पै- पाहण्याला गगणभेदी "राम्ब.....राम्ब....!" घालायचा. एखादा नवखा पाहुणा क्षणभर बुचकळ्यातच पडायचा. पण या भारदस्त स्वागताने भारावुन जायचा. स्वयंपाकघरातील कर्ती बाई या आवाजाने बाहेर डोकावायची. लगबगीने चहा ठेवायची. गोठ्याशेजारीच एक बाज होती. त्यावरच म्हातारा पै-पाहुण्याला घेऊन बसलेला असायचा. शिळोप्याच्या गप्पा सुरू व्हायच्या. ईकडच्या तिकडच्या खबरबाती दिल्या घेतल्या जायच्या. सुग्रास भोजनाच्या मेजवाण्या झडायच्या. पाहुण्यासोबत आलेल्या एखाद्या लहानग्याचे लाड लाड केले जायचे. घरातली चिल्लीपिल्ली या लहानग्या पाहुण्यासोबत रानोमाळ खेळत जायची. घरातली पाळीव कुत्रीही त्यांच्यात सहभागी व्हायची. ओढ्या वगळीत लपाछपी, सुरपारंब्या, चोर पोलिस, लंगडी कोंबडीचे बेसुमार खेळ व्हायचे. जिवापाड मेहनत करुन रानमेव्याचा आनंद लुटला जायचा. संध्याकाळी पै पाहुणा निघताना त्याला मुक्कामाचा आग्रह व्हायचा. या स्वछंद वातावरणला बघुन तो ही आनंदाने तयार व्हायचा. पाहुणा निघुन गेल्यावर घर रित रित व्हायचं. नव्या पाहुण्याच्या वाटेवर डोळे लावुन बसायचं. एखाद्या सकाळी म्हाताऱ्याची आरोळी घुमायची " राम्ब....राम्ब..!". घर पुन्हा तरारून उठायचं. या घराने कित्येक पाहुणे पाहिले, त्यांच्या लहानग्यांना आपले केले. कित्येक वाटसरुंनी या घरांच्या भितींना आनंदाने कवटाळले. दिवाळी दसऱ्याच्या कित्येक पहाटा या घरात ऊजळुन फुलुन गजबजुन गेल्या. रानफुले, करवंदे, जाईजुई, मोगरा कित्येक चिंचा या घरात दरवळुन बहारून गेल्या. दिवस सरत गेले. म्हाताऱ्याने घराचा अखेरचा निरोप घेतला. घर क्षुब्ध क्षुब्ध रडले. त्याच्या माथ्यावर अवकळा पसरली. वासे फिरुन उलटुन गेले. घरातल्या ईतरांनी गावातच निवारा शोधला. तिथे उरलेले ओबडधोबड अवशेष अजुनही घराच्या अस्तित्वाच्या खुणा सांगतात. आताशा या घराकडं जाणं मी बंद केलयं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2949
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

छान लिहिताय. थोड्या शुद्धलेखनाच्या व व्याकरणाच्या चुका असतील तर त्या टाळा म्हणजे अजून वाचनीय होईल.

In reply to by एस

स्वॅप्स आभार :) शुद्धलेखनाच्या व व्याकरणाच्या चुका? लेखन पुन्हा वाचले, पण एकही चुक नजरेत आली नाही. आपणास काही जाणवल्यास कळवावे.:)

In reply to by प्यारे१

मला दिसलेल्या एक दोन पै- पाहण्याला गगणभेदी वगळी वगळीतुन - वघळ असावा इथे ईकडच्या घरांच्या भितींना ऊजळुन फुलुन गजबजुन दरवळुन बहारून ईतरांनी

असच एक घर आणि म्हातारा पाहिला आहे. मी तुम्हांला याआधीही सांगितल्याप्रमाणे अगदी गावच समोर येऊन उभा राहतो तुमच्या कथा वाचल्यावर. 'केक्ताड'(घायपात) शब्द वाचला आणि लगेच वाक आणि वाकाचा कासरा दिसला. लहानपणी वाक वळायला जायचो ते आठवलं. हल्ली नाही दिसत वाक आणि वाकाचा कासरा! दिवसभर काम केल्यावर तेव्हा १० पैसे मिळायचे जे खूप वाटायचे! अशाच धा-धा पैशांचा खूपदा रूपाया केल्याचेही आठवले. असो, एकदम नॉस्टाल्जिकच झालो! अस बघा गावात घेऊन जात तुमच लिखाण! कुठल गाव आहे तुमच?

संदीप साहेब धन्यवाद, महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अशी बरीच घरं दिसतील. आपली संस्कृती त्याबाबतीत अगदी श्रीमंत आहे.

मला ही उगा सारख, कायतरी भुताची भानगड असावी अस वाटल. लेख चांगला आहे.