Skip to main content

१० अमेझिंग वेट लॉस टिप्स

बुधवार, 16/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार या काही ट्राईड अँड टेस्टेड वेट लॉस टिप्स आहेत ज्या फार प्रभावी आहेत. वेल; माफ करा. इथे 'वेट लॉस' बद्दल काहीही नाही. पण एका 'ग्रेट लॉस' बद्दल आहे जो आपण आज ना उद्या अनुभवणार आहोत. पावसाचा लॉस; पाण्याचा लॉस, पर्यावरणाचा लॉस. 'वेट लॉस' हे शब्द वाचून ज्या तत्परतेने लोकं पुढचा मजकूर वाचतील त्या तत्परतेने इतर कुठलंही शीर्षक वाचून वाचणार नाहीत, म्हणून ही चखलाशी केली. ही बाब आपल्या प्राधान्यक्रमाविषयी बरंच काही सांगते, पण असो; इथे तो मुद्दा नाही. पाऊस गेल्यावर्षी आणि या वर्षीही वाईट झालाय. पुढेही फार होईल अशी चिन्हं नाहीत. राज्यात, देशात अनेक भागांत दुष्काळ पडलाय. शेतकरी हतबल आहे. धरणं ५०% पेक्षाही कमी भरलेली आहेत. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई अटळ आहे. आपण काय करू शकतो? आपण पाणी सांभाळून वापरू शकतो, वाचवू शकतो. खाली दिलेल्या गोष्टी नवीन नाहीत, आपण या जाणतो. पण आपण त्याप्रमाणे वागत नाही. तेंव्हा, आपण जर तसं वागलो, तर आपण पाणीबचतीत आपला खारीचा वाटा उचलू शकू, आणि पाणीटंचाई जरी टाळू शकलो नाही तरी त्यासाठी सज्ज होऊ शकू. १) शॉवर ला आवर घालणे. अंघोळीसाठी बादली वापरणे. २) टब बाथ नकोच ३) दाढी करताना एका मगात पाणी घेऊन तेवढंच वापरणे; नळ चालू न ठेवणे. ४) गाडी/स्कूटर धुवायला जेट स्प्रे, पाईप न वापरता बादलीभर पाणी वापरणे. किंबहुना आठवड्यातून एकदाच जरी गाडी/स्कूटर धुतली तरी हरकत नाही. ती इतकी वाईट नक्कीच दिसणार नाही जितका तुमचा चेहरा दिसेल, जर तो धुवायला एक दिवस पाणी नसेल. ५) झाडांना दिवसातून एकदा दिलेलं पाणी पुरतं. ते द्यायलाही स्प्रे/पाईप टाळणे. ६) हवं तितकं पाणी घेतल्यावर नळ तत्परतेने बंद करणे; घरातल्या कामवालीलाही तसं बजावणे. ७) थोडा विचार केला तर असे अजून अनेक मार्ग तुम्हाला सुचतील. ८) हा मेसेज जमल्यास, वाटल्यास शेअर करणे. ९) झाडे लावणे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना किमान 'पाऊस' काय असतो हे तरी बघायला मिळावं. १०) प्रार्थना करणे, की पाऊस पडू दे. भरपूर पडू दे. 'होऊ दे खर्च' म्हणत टँकर बिंकरचा माज करणा-यांना ऑल द बेस्ट. त्यांनी वरील सल्ले मनावर घेऊ नयेत. वी नीड टू थिंक अबाउट अवर क्रॉप वी नीड टू थिंक अबाउट ईच ड्रॉप वी मे नॉट नो व्हेअर टू स्टार्ट बट वी नीड टू नो व्हेअर टू स्टॉप - अपूर्व ओक [हा मेसेज इंग्रजीत माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केला आहे. त्याचा दुवा हा.]

वाचने 6936
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आवडले! परवा खफवर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जलयुक्त शिवार बद्दल थोडी चर्चा चालू होती. त्यातले मुद्दे इथे वाचायला आवडतील.

असं परिस्थितीने गांजलेल्या लोकांना धाग्याकडे आकर्षित केलं की देवबाप्पा पाप देतो.....!! असो.... पाणी पेटणे म्हणजे काय ते लगेच कळले.... लवकरच पाणी आणि सोने एकाच भावाला येणार.....

पाणी वाया जाण्याचा मुख्य कारण टाक्या आणि पाईपलाइन्स आहेत. बहुतेक घरी मुख्या टाकीला सरकारी पाईपलाईन्स मधून पाणी येते. टाकी भरली तरी पाणी चालूच असते. ते पाणी वाहून जाते. या साठी सेन्सर आधारीत पाईप्स , टाक्या आणल्या पाहिजेत

'वेट लॉस' हे शब्द वाचून ज्या तत्परतेने लोकं पुढचा मजकूर वाचतील त्या तत्परतेने इतर कुठलंही शीर्षक वाचून वाचणार नाहीत,
... अगदी, अगदी.

मी राहतो त्या सोसायटीत दोन बदल केले आहेत - १) वापरण्याच्या नळाच्या पाण्याचा फ्लो थोडा कमी होइल अशी सेटिंग केली (कॉमन कॉक फिरवून). बर्‍याचदा पाणी जितकं लागतं त्या पेक्षा जास्त वायाला जातं कारण नळ चालूच असतो - जसं दाढी / ब्रश करतांना, हात धुतांना. फ्लो कमी केल्याने थोडा फरक पडेल. पाणी बचत होइल आणि लाईट बिल पण थोडं कमी येइल. २) पिण्याचं पाणी ११-६ या वेळेत रोज बंद केलं जातं. काही कामवाल्या बायका हेच पाणी कामा साठी वापरायच्या. त्यांना सांगून सुध्धा काही बदल होत नव्हता. आता वापरण्याचं पाणी वापरलं तर पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम थोडा कमी होइल.

पाण्यात १० टक्के कपात केली तरी शहरातले नागरिक ओरडतात. खेड्यामध्ये १० किलोमीटर वरून पाणी आणावे लागते याची जाण शहरी लोकांना कशी होणार. यांना कोणीतरी जल साक्षर करण्याची गरज आहे.

In reply to by pradnya deshpande

यांना कोणीतरी जल साक्षर करण्याची गरज आहे. ज्या राजकारण्यांनी लोकांवर पाणी पाणी करायची वेळ आणली आहे, त्या राजकारण्यांना परत "मत" देउन स्वतःच्या मढ्यावर बसण्याची "सोय" करु नये यासाठी साक्षर करण्याची जरा जास्तच गरज आहे, नाही का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- || BLAZE OF GLORY ||

बाकी सर्व गोष्टी पटल्या. पण
शॉवर ला आवर घालणे. अंघोळीसाठी बादली वापरणे.
याबाबत असहमत. शॉवर व्यवस्थित वापरला तर बादलीपेक्षा थोडे कमीच पाणी लागते. मी स्वतः मोजुन पाहिले आहे. अजुन एक उपाय म्हणजे बेसिन मधल्या नळांचे फ्लो कमी करणे. लघवी साठी फ्लश न वापरता छोटी बादली वापरणे. नविन फ्लश टँक ज्यात हाफ फ्लश आणि फुल फ्लश पर्याय असतात त्यातला हाफ फ्लशसुद्धा तीन लीटर पाणी टाकतो (नक्की माहित नाही). ईतक्या पाण्याची गरज नसते.

आमच्या गावी २००३ मधे इतकी भयानक पाणी टंचाई होती की २८ दिवसांत एकदा नळास पाणी येत असे पुरवठा करणाऱ्या धरणा च्या बेड मधे बोरिंग करुन पुरवठा केला जात असे इतकी भयानक परिस्थिती होतई, पण त्याचा एक फायदा झाला नागरीक अन प्रशासन बरेच सुजाण झाले त्यानंतर महापालिके ने बहुतेक एक स्कीम सुरु केली होती ती म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नव्या होऊ घातलेल्या व जुन्या अपार्टमेंट व वैयक्तिक नागरिकांस पाणीपट्टी मधे काही टक्के सवलत वगैरे, ह्या शिस्तीमुळे लोकांस सुद्धा सवय लागली चांगली वरचे बरेच नियम अंगिकारण्यात आले आहेत लोकांकडून उस्फुर्तपणे सद्धया पाऊस कमी असूनही ह्या नियोजनामुळे उत्तम सुरु आहे ५ दिवसांत एकदा नळास पाणी असते ५ तास खरे पाहता व्यय न करता बेगमी केल्यास हे पुरेसे आहे अन अगदी लॉन सहीत बाग़ सुद्धा मेंटेन होते आहे (मातुश्री साहेबांचा शौक आहे तो) पिण्याचे पाणी आम्ही तांब्याच्या भांड्यात साठवतो (ख़राब व्हायचे प्रमाण कमी अन औषधी गुण दोन्ही फायदे) किचन मधले सिंक चे पाणी बागेत सोडतो त्याच्यामुळे तो एक सिंचन व्यय कमी होतो अन वर्हाड़ी उन्हात बाग़ तगते आमची प्रॉपर अळु ची पाने अन भरगच्च लिंबे चिकू देणारी झाडे वगैरे. :)

नळाला रोज पाणी आले पाहिजे ही कल्पनाच चुकीची आहे :)