Skip to main content

टिळक, तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी की सनातनी ब्राम्हण?

शुक्रवार, 07/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांवर ब्रिटिशांचे एजंट होते वगैरे टीका पूर्णतः तर्कटी आहे. परिस्थितीजन्य सोडल्यास असा कोणताही पुरावा नाही. पण त्याचबरोबर टिळकांच्या व्यक्तित्वाची सनातनी ब्राम्हणी बाजू समजून घेणेही गरजेचे आहे. छत्रपती शाहू महाराज आणि तत्कालीन ब्राम्हण यांच्यामधील 'वेदोक्त - पुराणोक्त' या वादात टिळकांनी पूर्णतः सनातनी, ब्राम्हणी, संकुचित आणि जातीयवादी भूमिका घेतली होती. युगप्रवर्तक नेतृत्वाला साजेशी दूरदृष्टी दाखवत आणि तत्कालीन भटा ब्राम्हणांच्या विरुध्द भूमिका घेऊन छत्रपतींना वेदोक्त मंत्रोच्चारणात धार्मिक विधी करण्याच्या बाजूने टिळकांनी आपले मत आणि वजन टाकले असते तर आज महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास वेगळा झाला असता. पण टिळक स्वजातीच्या लोकप्रिय विचारसरणीला चिकटून राहिले. क्षत्रियांना केवळ पुराणोक्त मंत्र म्हणून केलेल्या धार्मिक कृत्यांचाच अधिकार आहे. कारण कलीयुगात त्रीवर्णाचा लोप झाला असून ब्राम्हण सोडून उर्वरित सगळे शुद्र आहेत अशी, शिवाजी महाराजांनाही डोकेदुखी ठरलेली, अगम्य भूमिका टिळकांनी उचलून धरली हा इतिहास आहे. वस्तुतः वेदोक्ताचा अधिकार सर्वांनाच आहे अशी रास्त भूमिका टिळकांनी घेतली असती तर आकाश कोसळणार नव्हते. मुठभर ब्राम्हणांच्या विरोधाला भिण्याएवढे टिळक लेचेपेचे नव्हते. तरीसुद्धा त्यांनी घेतलेली प्रतिगामी भूमिका ही त्यांची प्रामाणिक आणि अंतस्थ धारणा होती. त्यातून मग शाहू आणि टिळकांच्यात जन्मभराची तेढ निर्माण झाली. शाहुंनीही त्यावर प्रतिक्रियावादी कृती आणि विचारसरणी अवलंबिली. टिळकांना जरी तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणत असले तरी टिळक जातीयवादी होते. राष्ट्रीय पातळीवरच्या या नेत्याने आधी स्वातंत्र्य अशी भूमिका घेऊन आगरकरांच्या समाजसुधारणेला विरोधाच केला होता. अॅड. संदीप ताम्हनकर, पुणे

वाचने 15596
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

झालं टाकलीत काडी. अहो संता बाबा या अगोदर इथे काही काथ्याकुट झालाय की नाही या विषयावर ते पहा की जरा. असो अता पॉपकॉर्न घेवुन बसतो.

काही सुचना. 1) शिर्षकात स्पर्धेसाठी असा उल्लेख राहिला. 2) शब्द मोजायला हवे होते .100 पेक्षा जास्त आहेत. 3) सुदलेखन चांगले आहे. 4) पुढील (हरदासी)कथेला शुभेच्छा. आपला नम्र. जेपी (अआमिसौपंस)

"टिळकांना" बोलावणे आले मिपावर ! प्रीतीसाद महापूर रत्ने: "अरे संदीपा आमचे हे म्हणतात की टिळक यांच्याकडे स्वतःच म्हणाले मी कुणाचाच पुढारी बिढारी नाही फक्त देश स्वतंत्र व्हावा ही महत्वकांक्षा आहे इतकएच काय ते" इती माई "टिळक कुणाचेही पुढारी असले तरी गरिबांचा उद्धार फक्त आणि फक्त राहुल बाबा करतील हे ल्क्षात ठेवा" : दाद (ना) ढेकर "त्यांची नक्की काय भूमीका होती हे तपास्सून पहावे लागेल आणि तो एक स्वतंत्र लेख विषय होइल. :कॅरी द ट्रुमॅन बरं मग ? भ्वा$$ वड्या तुमच्याकडे काही पुरावे अस्तील तर बोला नाही तर .....चालू द्या तुमचे निरर्थक आत्मरंजन दुदुदुदुदुदु+लूलूलूलू: मठाधिपती तांब्याचार्य आत्मानंद अभामिपासायंदैनीकाप्लेम्हाहनगर्मधून साभार

In reply to by नाखु

छान

टिळक सनातनी होते का न्हवते हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे.मुर्ख सनातन्यांचा विचार करण्यात वेळ् घालवू नये.मला खरं आश्चर्य शाहू महाराजांचे वाटते,काय तर म्हणे वेदोक्ताचा अधिकार द्या.शाहू महाराजांसारख्या द्रष्ट्या माणसाने 'भाकडकथांचे भेंडोळे' या पलिकडे फारसे महत्व नसलेल्या वेदांच्या आणी वेदोक्ताच्या नादी का लागावं?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

फुलथ्रॉटल, १ टिळक सनातनी होतेच व ते त्यांची मते बदलत नसत. मी इंदूप्रकाश या टिळक गुणकलापच्या टिळकांच्या निधनावेळच्या अंकातील प्रकाशकाचे दोन शब्द एका धाग्यात टाकेन ते जरुर वाचा... २ सनातनी मुर्ख होते हे आपल्याला आजच्या काळात वाटते आहे. ३ त्या काळातील विचार केला तर शाहूमहाराजांसारख्या माणसालाही त्याचे अप्रूप होते. ४ शाहू महाराजांसारख्या द्रष्ट्या माणसालाही वेद आणि वेदोक्ताच्या नादी लागावेसे वाटले यातच त्या काळातील वातावरणाची कल्पना येऊ शकते. ५ वेद आपण वाचले आहेत का ? ते एक उत्कृष्ट काव्य आहे. वाचून बघा. आणि त्यात भाकडकथा नाहीत प्रार्थना आहेत... ६ शाहू महाराज आणि लोकमान्यांचे वैचारिक मतभेद असतील पण दोघांनाही एकमेकांबद्दल अत्यंत आदर होता याचे अनेक पुरावे आहेत. त्या काळातील घटनांचा विचार आजच्या काळातील नियम लावून करु नये ही विनंती...

In reply to by जयंत कुलकर्णी

आपल्याला आजच्या काळात वाटते आहे.
कुणाबद्दल मुर्खहा शब्द वापरला तरी त्याचही आकर्षण वाटू शकत म्हणून तो न वापरलेला बरा. पण बाकी मुख्य म्हणजे काळ कोणताही असला तरी स्वधर्म आणि स्वदेश यांच संरक्षण करणार्‍यास (मग क्षत्रिय वैश्य शूद्र अस्पृश्य ब्राह्मण आदीवासी कुणी असू देत) नापास किंवा अपात्र जाहीर करण्यात व्यावहारीक चातुर्य किंवा शहाणपणा काय होता ? हा प्रश्न बुद्धीची मक्तेदारी म्हणून बाळगणार्‍यांबद्दल शिल्लक राहतो किंवा कसे. दुसर्‍या एका वेगळ्या (आधूनिक काळातील) धाग्यात कुणीतरी सैनिकाच्या कामाच मह्त्वच नाही असा घोष लावला होता, संरक्षण करणार्‍या व्यवस्थेला मानसिक दृष्ट्या हतोत्साहीत करण्याची कोणतीही भूमिका ती जुन्या काळातली असू देत का आधूनिक काळातील, अचंबित करणारी वाटते.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

'भाकडकथांचे भेंडोळे' वेदांत अधुन मधुन गोष्टी नक्की आहेत. पण तो त्याचा गाभा नाही. आपली वेद आणी पुराणात गल्लत होते आहे का?

सर्वच देशभक्तांचे / स्वातंत्र्य सैनिकांचे "आधी स्वातंत्र्य की समाजसुधारण" याबद्दलचे विचार , अपेक्षा व देशाची आजची स्थिती बघता , थोडे फार अंतर पडले असण्याची शक्यता आहे . त्यामुळे टिळक आणी आगरकर या दोघांच्याही विचारांना समान महत्व आहे .

ऐ पॉपकॉर्न पॉपकॉर्न ..दस रुपया ..दस रुपया...ऐ लेवो ना लेवो ना..पॉपकॉर्न पॉपकॉर्न..दस रुपया ..दस रुपया..

In reply to by अजया

वेळ थांबा, तोच दोन पाकीटे ५ रुपयाला देतो का नाही बघा? अतिइअवांतर : पाॅपकाॅर्न असो की अस्ले धागे कालांतराने सादळतातच मग कुणाला विंट्रेष्ट राहात नाही त्यात ? हो की नाही चिनार भौ! चणे फुटाणे नाखु

In reply to by नाखु

वेळ थांबा, तोच दोन पाकीटे ५ रुपयाला देतो का नाही बघा?
तोच तो पणा आला की, पॉपकॉर्न नको पण धागे आवरा :) होतेच. मागे कुठेतरी आवरा नावाचा आयडी पाहण्यात आला होता !

In reply to by चिनार

'सत्य'य, पॉपकॉर्नचा व्यवसाय होऊ शकतो पण कसय पॉपकॉर्न विकत घेण्यासाठी पब्लिक थांबण्याची जरा तरी शक्यता असेल असा ऐटम पाहीजे ना ! हार्डलक धिस टैम ! बेस्टलक नेक्स्ट टैम !!

In reply to by अजया

धंदा थोडा सेट झाल्यावर एकावर एक फ्री अशी स्कीम काढणार होतो अजयाताई ..पण तुम्ही तर हवाच काढून टाकली ..पोपकोर्नची आणि धाग्याची पण :-) श्या..मराठी माणसाला धंदा करूच देत नाहीत..असल्या सनातनी विचारांचा पोपकोर्न खाता खाता निषेध !

कुलकर्णी , जोशी , गोखले , टिळक , देशपांडे , इत्यादी इत्यादी आडनावाच्या म्हणजे घरात जन्म झाला कि तो ब्राह्मण हा भयानक मोठा गैरसमज समाजात पसरलेला आहे . स्वतःला 'ब्राह्म'ण म्हणवून घेणाऱ्यांना 'ब्रह्म' मधला 'ब्र' तरी कळत असतो का ? @सिरुसेरि +१११११११११११

टोकाच्या समाजसुधारणा या आपल्या समाजाला झेपणार नाहीत आणि त्यांचा वापर करुन ब्रिटिश या समाजात अजून फूट पाडतील अशी टिळकांना रास्त भीती वाटत होती. आणि ते खरंच होतं हे पुढे गांधी आणि डाॅ. आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या पुणे कराराच्या वेळी दिसून आलंच. शिवाय टिळक हे धर्माचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लोकांना संघटित करण्यासाठी करत होते. सुधारकी विचार त्यात बाधा आणतील या भीतीने त्यांनी सुधारकी विचारांचा विरोध केला. टिळकांना राजकीय स्वातंत्र्य हे नेहमीच प्राधान्यक्रमाचा विषय वाटत होतं आणि त्यामुळे त्यांनी सुधारणांचा विरोध केला, सनातनी असल्यामुळे नव्हे. त्यांना भारतातील असंतोषाचे जनक असं म्हणणा-या व्हॅलेंटाईन चिरोल यांनी टिळक हा ब्रिटिश साम्राज्याला असलेला धोका आहे, कारण हिंदुस्थानातील सर्व जातिधर्मांचे लोक त्यांचे अनुयायी आहेत असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे ते तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी होते हे खरं आहे. ते शाहूमहाराजांच्या विरोधात होते हा ब्रिगेडी प्रचार आहे, ज्यांना ना टिळकांशी घेणंदेणं आहे ना शाहूमहाराजांशी!

In reply to by बोका-ए-आझम

आपण प्रतिसाद देताय, पण धागा लेखक कुठे आहेत ? नेमके संदर्भ नमुद करण्यात सुलभतेच्या दृष्टीने टिळकांच सर्व लेखन जसच्या तसं स्वरुपात आंतरजालावर युनिकोडात उपलब्ध असण्याची गरज आहे. हे धागा महोदय लेखक अ‍ॅडव्होकेट दिसतात, त्यांनी टिळकांच्या लेखनाचे संदर्भ मूळातून किती तपासले आहेत याची प्रथमदर्शनी साशंकता आहे. आंतरजालावर टिळकांचे लेखन वाचन आणि संदर्भ नमुद करण्याच्या दृष्टीने उपलब्ध असते तर बरेच जणांनी (कोणत्याही बाजूचे असूद्यात) त्यांची त्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीने केली असती असे वाटते.

In reply to by माहितगार

लेखनाचे संदर्भ माहीत नाही, पण तसेही मी जेव्हढे टिळकांबद्दल वाचले आहे त्यावरून विचार करायला गेले तर बर्‍याच गोष्टींत टिळकांचे तेव्हाचे विचार आजच्या काळाला तेव्हढे लागू होत नाहीत. अगदी क्रांतीबद्दल देखील. पण तरीदेखील टिळक तेव्हाचे जहालमतवादी म्हणून प्रसिद्ध होते. सावरकरप्रभृती जहाल मतवाद जरी टिळकांच्या साहित्यातून उगम पावलेला असला तरी प्रत्यक्ष टिळकांचे लिखित साहित्य तेव्हढे जहाल नव्हते.. विशेषत: गांधी आणि टिळक यांच्या मागण्यातील काही फरक लक्षात घेतले असता टिळक स्वराज्याची मागणी करत होते, तर गांधी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत होते. प्रथमदर्शनी यात विरोधाभास दिसला तरी मागाहून विचार करता असे दिसून येईल की ते दिवस मुळात "आधी सुधारणा की आधी स्वातंत्र्य" असे विचार करण्याचे होते, आणि त्या मानाने टिळक काळाच्या बरेच पुढे होते. बाकी सनातनीत्वाबद्दल बोलायचे झाले तर सामान्यपणे कोणीही महात्मे जरी झाले तरी त्यांच्या चरित्राचे मूल्यमापन त्यांच्या काळाच्या कसोटीवरच करावे लागते हे लेखक विसरला आहे. त्यामुळे हा लेख एकांगी झाला आहे आणि परिणामस्वरूप त्याला ब्रिगेडी वास येतो आहे. @आदूबाळ - धाग्यावर अश्या टवाळक्या करण्याचे कारण हे आहे. नाहीतर उद्या शिवाजी महाराजांनी एकही विधवा विवाह केला नाही म्हणून पण धागा येईल.

In reply to by आनन्दा

लेखनाचे संदर्भ माहीत नाही, पण...
केवळ टिळकांबाबत म्हणून नव्हे, जेव्हा (कोणताही) नेता स्वत: चांगला लेखक/वक्ता असतो तेव्हा, त्याची बाजू मांडण्यासाठी त्या नेत्याचे स्वतःचेच शब्द / लेखन उधृत करणे पुरेसे महत्वाचे आणि उपलब्ध असणे अधिक श्रेयस्कर असावे. संदर्भ नमुद न करता बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्यासारखे इतर समर्थकांना तात्कालीक मानसिक समाधान मिळाले, तरी विरुद्ध बाजूच्या व्यक्तींपर्यंत मूळ नेत्याची भूमिका मूळ संदर्भ उधृत न करता कितपत नीटपणे पोहोचू शकते या बाबत मी जरासा साशंक असतो.

In reply to by माहितगार

विचार चालू आहे, वेळ मिळाल्यास याच विषयावर माझ्याकडे असलेल्या संदर्भावरून एक धागा टाकावा म्हणतो.. (त्यासाठी अभ्यास करणे आले)

In reply to by माहितगार

सदर विषयावर संदर्भ भरपूर आहेत. मुख्यत्वे श्री. य. दि. फडके यांचे लोकमान्य आणि शाहू हे पुस्तक वाचावे. माझी पात्रता काढण्याची गरज नाही. जमत असेल तर मूळ पोस्ट मधील प्रत्येक विधानाला मुद्देसूद आक्षेप लिहावे ही विनंती.

In reply to by संदीप ताम्हनकर

नमस्कार चर्चेत पुनरागमना बद्दल धन्यवाद. हा प्रतिसाद मी केलेल्या टिकेस आहे का ? टिळकांचे अग्रलेख आणि इतर लेखन आपण मूळातून वाचलेले नाही याची अप्रत्यक्ष पुष्टी आपल्या या प्रतिसादातून होते आहे असे समजून चालतो. आपण टिळकांचे लेखन मूळातून वाचले असते तर आपले विचार कदाचित बदलले नसते मांडणी नक्कीच वेगळी राहू शकली असती जी आपल्या पात्रतेच्या व्यक्तीस कदाचित अधीक प्रशस्त आणि प्रतिष्ठीत वाटली असती असे माझे प्रामाणिक मत आहे. असो. टिळकांचे तथाकथीत आंतरजालीय समर्थक आणि विरोधक सहसा एकाच तराजूच्या वेगवेगळ्या पारड्यात असतात दोघांनीही टिळकांना मूळातून वाचलेले नसते. इतर समी़क्षकांच्या पुर्वग्रहांवर बेतलेले पुर्वग्रहांचे अधिकतम मुल्य पुर्वग्रह एवढेच असते. ज्या लेखनास ज्यांच्यावर टिका आहे त्यांच्या लेखनाचे मुळातून संदर्भच नोंदवलेले नाहीत त्यावर वाचकांनी विश्वास ठेऊन आक्षेप अथवा बाजू मांडावी असे काहीच नाही. त्यामुळे एवढे बोलून धागा लेखास आमचा पास.

सनातनी ब्राह्मण तेल्या-तांबोळ्यांचा पुढारी का असु शकत नाहि ? किंवा तेल्या-तांबोळ्यांचा पुढारी सनातनी ब्राह्मण का असु शकत नाहि? जनसामान्यांचा पुढारी असणं आणि सनातनी ब्राह्मण्य वागवणं या म्युचुअल एक्स्लुसीव्ह गोष्टी आहेत का? बरं ते जाऊ दे... सनातनी ब्राह्मण आणि तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणजे नेमके काय?

टिळक मला तरी एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व वाटतात . स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान वादातीत आहे. गीतारहस्य सारखा ग्रंथ त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत करतो. हं त्यांची काही मते ही आजच्या काळाप्रमाणे बरोबर वाटत नसतील कदाचित ! पण त्यासाठी तो काळ, ती परिस्थिती समजून घ्यावी लागणार नाही का ? टिळकांचे देहावसान होऊनच ९५ वर्षे होऊन गेलेत म्हणजेच त्यांचा उमेदीचा काळ त्यापेक्षा २५-३० वर्षे मागे जातो, आजची समाजव्यवस्था, शासनव्यवस्था त्या काळापेक्षा अतिशय वेगळी आहे .

तेल्या-तांबोळ्या हा जातिवाचक शब्द आहे. यावरुन तुमच्यावर खटला का भरु नये ?

तेल्या तांबोळ्यानचे पुढारी सनातनी ब्राम्हण असू शकत नाहीत का? एक बाळबोध प्रश्न. आणि त्याचा १२५ वर्षांनी आता काय संदर्भ/ संबंध?

शेतक-यांना काळजी लागलीय पाऊस नाही पडला तर पिकवणार काय आणि खाणार काय. कष्टक-यांच्या चिंताच वेगळ्या. त्यांना काय फरक पडत नाय १०० वर्षांपुर्वी होऊन गेलेले सनातनी की आणखी कोणी.

टिळकांवर टीका करण्याची माझी पात्रता नाही. सदर लेखात टिळकांचे दोषदर्शन असाही मुद्दा नाही. हे ब्रिगेडी लेखन नाही. टिळक कॉंग्रेसमधून त्यांच्या हयातीतच बाहेर गेले होते. हा कॉंग्रेस भाजपा वादासंबंधीही लेख नाही. नुस्ती हळहळ व्यक्त करण्यासाठीही सदर लेखन नाही. महान आणि युगप्रवर्तक समजली जाणारी व्यक्तिमत्वेसुद्धा प्रसंगात अतार्किक वागतांना दिसतात हा मूळ मुद्दा आहे. टिळकांचे व्यक्तिमत्व अंतर्बाह्य स्पष्ट होते. त्यांनी भविष्यकाळ सुसंगत तात्कालिक भूमिका न घेता मनापासून जे वाटले ती भूमिका घेतली. वेदोक्त, ग्रामण्य, ताईमहाराज यासारख्या प्रकरणात टिळकांची अनेक (सुमारे १०) वर्षे वाया गेली. टिळक कर्जबाजारी झाले. ते फेडण्यात शक्ती गेली. यामुळे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संपूर्ण इतिहासावर एकंदरीतच मोठे राजकीय आणि सामाजिक परिणाम झाले. स्वातंत्र्य लांबले हा राजकीय परिणाम पुढे सुधारता आला. पण जातीय तेढ हा सामाजिक परिणाम मात्र आजपर्यंत तसाच आहे. वेदोक्ताच्या बाजूने मत टाकून सामाजिक एकीकरणाची महान सुरुवात टिळकांना करता आली असती. एकदा जातीभेद निरपेक्ष भूमिका न घेतल्याच्या पुर्वानुभवातून टिळकांनी लखनौ करार करण्याला महत्व आणि प्राधान्य दिले. लखनौ कराराचे पुढील सामाजिक परिणाम हा स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. इतिहासाचा समग्रपणे जर अभ्यास करायचा असेल तर तो का करायचा हे आधी अभ्यासणे गरजेचे आहे या हेतूने वरील स्फुट लिहिले आहे. बाकी टवाळखोर लोकांनीही नेहमीप्रमाणे मजा आणली आहेच. संदर्भ वगैरे सर्वांना मिळाले आहेतच. (श्री. य. दि. फडके, उत्तम कांबळे, जयसिंगराव पवार, इत्यादी)