Skip to main content

सगळेच सुरळीत चालले आहे

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 27/07/2015 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात यंदा सगळेच सुरळीत चालले आहे..... देशाच्या उज्जवल भवितव्याची सर्वांना खात्री पटली आहे..... सर्वत्र पुरेसा पाऊस पडतोय... एल नीनो चा प्रभाव अजिबात जाणवत नाहीये. कुठेच दुष्काळाचे सावट नाही. विदर्भातला शेतकरी आत्महत्या करत नाहीये. कर्णाटकाच्या शुगरबेल्टचा शेतकरी उभ्या उसाला आग लावत त्यात स्वतःची होळी पेटवत नाहीये, त्यांचा ऊस वेळीच उचलला कारखान्यांनी... मराठवाड्यात जायकवाडी तुडुंब भरले आहे, टैंकरची गरजच भासत नाहीये कुठेही. मोसंबीडाळिंबाच्या बागा अजिबात सुकल्या नाहीत. जनावरे छावणीत गेली नाही बिल्कुल. उस उत्पादकांना मनाजोगता भाव भेटतोय. धानाची दुबार पेरणी करायची गरज नाही. उत्तरेच्या राज्यांत हाईप्रोटीन गहू मुबलक आहे, आयात करायची गरज नाही. गुजरातेत भुईमुगाचे विक्रमी उत्पादन होणार आहे, खाद्यतेल आयात करायची गरज नाही. उडीद तूर मूग वगैरेंची रोपे मध्यभारतात तराटलेली आहेत, शेतकरी जाम खुश आहेत, यंदा डाळींमध्ये भारत स्वयंपूर्ण होणार आहे. ओडिशाच्या आदिवासींचे कुपोषण थांबले आहे. केबीकेच्या लोकांना हैदराबादच्या वीटभट्टयांवर वेठबिगारी करायची यंदा गरज नाही. भैयालैंडचे शेतकरी, अल्पभूधारक मजूर आणि इतर रोजगाराच्या स्थानिक संधीमुळे आनंदात आहेत. ते यंदा दिल्लीपंजाबमुंबई कुठेच स्थलांतर करणार नाहीत. ईशान्य भारतीय शेतकरी आणि लघुउद्योजकांना, उर्वरित भारतासोबत व्यापार करणे सहजसोपे झाले आहे. त्यांचा माल वेळेवर पोचतो आहे भारताच्या सांदीकोपऱ्यात. शेतकरी, लघुकुटिरोद्योजक सगळे कसे मजेत आहेत, आपल्या उदरनिर्वाहाची सर्वांना खात्री पटली आहे. पर्यायाने देशाच्या उज्जवल भवितव्याची सर्वांना खात्री पटली आहे. देशभरातल्या अशिक्षित-अल्पशिक्षित-अर्धशिक्षित-उच्चशिक्षित-कुशल-अकुशल तरुणांच्या हाती काम आहे. कोणी बेरोजगार नाही, सर्वांना पुरेशा संधी आहेत. दिल्लीपुणेबेंगळुरात लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांचे जत्थे नाहीत. 100 जागांसाठी 10-12 लाख तरुण 2-2वर्षे 3-4 टप्प्यांत झुंजत नाहीयेत. शिक्षणाचा दर्जा प्रचंड सुधारलाय देशात! बेसिक न्यूमरसिमध्ये भारतीय विद्यार्थी जगात अव्वल आले आहेत! मिडडेमिलच्या कृपेने एक वेळतरी पोटभर जेवायला मिळावे पोराला, म्हणून आता शाळेत पाठवले जात नाही. खासगी कॉलेजवाल्यांनी लूट बंद केली आहे. एडमिशनच्या काळजीने झोप उड़णे बंद झाले आहे. पोरांच्या उज्जवल भवितव्याची सर्वांना खात्री पटली आहे. पर्यायाने देशाच्या उज्जवल भवितव्याची सर्वांना खात्री पटली आहे..... भारतात यंदा सगळेच सुरळीत चाललेआहे..... ..... आणि म्हणूनच कोणतेही न्यूज़चॅनल ह्यापैकी कशावरही बातमी दाखवत नाहीये रिपोर्ताज आणत नाहीये.... --स्वामी संकेतानंद
लेखनविषय:

वाचने 1154
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

एकदम मार्मिक आहे भाष्य.

ह्म्म. पण मेली आशा (चुकल होप्स हो होप्स) काही सुटत नाही. कदाचित ते म्हणतात ना उम्मीद पे दुनिया कायम है...

दिल पे हात रखके बोलो.... आल इज वेल आल इज वेल सब अपने आप ठिक हो जायेगा.... पैजारबुवा,