रीत
शहरात राहून आपण आपल्या जाणिवा विसरलोय, वगैरे उगाच लंब्याचौड्या उच्चभ्रू बाता मी मारणार नाही. पण शहरात राहून मी गावातल्या जीवनापासून युगानुयुगांच्या अंतराइतका दूर आहे हे मात्र नक्कीच. अर्थात, हे साहजिकच आहे. त्यात काही फार चांगलं किंवा फार वाईट असं नाहीच. पुण्यात राहून अमेरिकेतलं जीवन अनोळखी आहेच की. अडीचशे किलोमीटरवर असलेलं माझ्या वाडवडीलांचं गावसुद्धा आता मला अनोळखीच. (अमेरिकाच जवळची तुलनेने.)
मागच्या आठवड्यात गावाला जायचा योग आला. रस्त्यात असताना एका मित्राबरोबर व्हॉट्सपवर काही तरी टिवल्या बावल्या चालू होत्या. गावात कसं सगळं इनोसंट, छान छान असतं असा काहीसा सूर त्याने लावला होता. मग त्याला गावाकडले एक दोन ’इरसाल/चवचाल’ किस्से ऐकवले.
त्यावर, ’आयला गावातपण असलं चालतं?’ असं तो म्हणून गेला. मला हसायला आलं.
गावात पोचलो. मुंबईहून डॉक्टर असलेला काकाही पोचला त्याच वेळेस.
आमच्या वाटेकर्याचा तरूण मुलगा नुकताच वारला. म्हणून, त्याला भेटायला शेतावर गेलो. गावात भावकी आहेच भरपूर. त्यातल्या एका शाहण्यासुरत्याने फोनवरच ’जरा जपून बरं का’ असा सल्ला दिला. काही कळेना. शेतावर अक्षरश: १५ मिनिटेच थांबणार होतो. शेतावरल्या त्या झोपडीत तोंड भरून स्वागत झालं. गप्पा झाल्या. म्हातारे वाटेकरी हातात हात घेऊन मायेने बोलले.
’बिमारी सांगिटलीच न्हायी कदी. त्याचं त्याला ठावं होतं. पन कदी बोललाच न्हायी. अगदी शेवटाला बोलला. पार सातार्याला न्हेला त्याला पण डाकटर म्हनं, कायी उपेग न्हायी. घेऊन जा याला. पाचसा दिसात ग्येलाच. एक बायकू अदुगरच ग्येली व्हती. एकीला रंडकी करून ग्येला. चार पोरं ठिवली मागं. या वयात परत कंबर धरून हुबं र्हाया पायजे आता.’
हे सांगतानाही हसत होता गडी. दु:ख खरं नव्हतं असं नाही. त्याची खरी व्याप्ती जाणवत नव्ही असंही नाही. पण जे होईल त्याला, फार पुढचा विचार न करता सामोरं जायची पद्धत जगणं सोपं करत होती. किंबहुना जगणं सोपं व्हावं म्हणूनच ही पद्धत शाण्यासुरत्यांनी पाडली असावी.
नुकत्याच दहावी झालेल्या नातीला जवळच्याच शेतात राहात असलेल्या तिच्या चुलत्याकडे दूध आणायला पाठवलं. ही पोरगी चुणचुणीत. गावातून (आमच्याच) शेताचा रस्ता माहित नव्हता आम्हाला तर शेतातून गावात आली आणि आम्हाला घेऊन गेली.
थोड्या वेळाने त्या ’रंडकी’ने पाण्याचे ग्लास आणले. आम्ही घोट घोट पाणी प्यायलो. फार थांबणं शक्य नव्हतं. पालखी पोचायच्या आत परत गावात पोचणं आवश्यक होतं.
निघताना डॉक्टर काकाला हळूच विचारलं, ’कशाने गेला रे हा?’
तो ही हळूच कानात बोलला ’एड्स!!’
माझी बोलतीच बंद झाली. जगाच्या एका कोपर्या असलेल्या गावातल्याही एका कोपर्यात असलेल्या शेतात राहाणारा एक माणूस एड्सने गेला याची कल्पनाही माझ्या मनाला शिवली नव्हती. त्याला एड्स होता म्हणजे, तो प्रसाद त्याने बायकोलाही दिला असणार. आणि मुलांचं काय?
माझ्या मनात त्या क्षणी काय दाटून आलं ते माझं मलाच अजून समजलेलं नाहीये.
शहरातल्या माणसाला एड्स झाला तर शहरातलं ’सुधारलेलं’ जग त्याला कसं तांदळातल्या खड्यासारखं बाजूला सारतं हे ऐकलं बघितलेलं आहे. (खोटं कशाला बोला... अगदी क्षणभरच का होईना पण मी पण जरा हडबडलो. पण आजवर ऐकलेलं सगळं प्रबोधन कामी आलं आणि भानावर आलो लगेच.)
इथे एड्सने गेलेल्या जवान पोराचं दु:ख तर पचवलेलं होतंच पण त्यानंतर त्याचं कुटुंब त्या मानाने पूर्वीसारखंच नांदत होतं.
जगणं सोपं करण्याची रीत की रितीनं वागून जगणं सोपं करण्याची धडपड?
उत्तर शोधायचा प्रयत्न चालू आहे.
वर्गीकरण
होय, 'रीत' हा प्रकार आता
प्रश्न अवघड असतात तेव्हा
लेख चांगलाय
अवघड आहे.
In reply to अवघड आहे. by आतिवास
सहमत
बिकांचा लेख म्हणून अपेक्षेने लेख वाचला....
आवडला लेख...
खरच. कश्यावर आणि काय बोलु ते
आवडला ..!!
विचारात पाडणारा लेख
है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं
.
बिका..
हम्म...
In reply to हम्म... by पैसा
पटलं..
नेमके काय म्हणावे हा प्रश्न पडला.
रामदास काकानी या विषयावर एक