Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विवेकपटाईत on Sat, 06/27/2015 - 09:53
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे. वानर समाज पुरुष प्रधान होता. स्त्रिया केवळ भोग्य वस्तू. पतीच्या मृत्यू नंतर, त्याच्या भावाची अधीनता स्त्रीला स्वीकारावी लागत असे. इथे तर प्रत्यक्ष ज्या भावाने, तारेच्या पतीचा षड्यंत्र रचून वध केला, त्या सुग्रीवला पती म्हणून स्वीकारावे लागले. सुग्रीवची कनिष्ठ पत्नीचा दर्जा ही तिला स्वीकार करावा लागला. तारेला किती मानसिक यातना झाल्या असतील, याची कल्पना करवत नाही. तरी ही आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी आणि वानरांच्या हितासाठी तिने सर्व यातना आनंदाने सहन केल्या. रामायणात तारे सारखी प्रखर स्त्री अन्य नाही. तारा केवळ वालीची पत्नी आणि किष्किंधा नगरीची सम्राज्ञी नव्हती अपितु राजकार्यात ही तिचा पर्याप्त दखल होता. गुप्तचर तंत्राचा कसा वापर करावा हे ही तिला माहित होते. राज्यात आणि संपूर्ण भरतखंडातल्या घडामोडींचे त्याचे ज्ञान ही तिला होते. वालीपासून लपून राहणार्या सुग्रीवने, वालीला द्वंद युद्धासाठी ललकारले आणि तो पराजित झाला. पण तारचे मस्तक ठणकले, सुग्रीवच्या असे दुस्साहस कारण काय, हे शोधून काढण्याचे तिने ठरविले. गुप्ताचरांकडून इत्यंभूत माहिती मिळवली. त्याच दिवशी भरपूर मार खाऊन ही सुग्रीवने पुन्हा द्वंद युद्धासाठी वालीला ललकारले, निश्चितच या मागे काही षड्यंत्र असणारच असे तारेला वाटले. तिने वालीला युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तारेने वालीला किमान सकाळपर्यंत तरी थांबण्याचा सल्ला दिला. पण क्रोधग्रस्त वाली तिचे ऐकायला तैयार नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून तारेने गुप्तचरांकडून मिळालेली सूचना आपल्या पतीला दिली. इक्ष्वाकू वंशातील श्रीराम आणि लक्ष्मण ज्यांनी दंडकारण्यातल्या खर दूषण सहित हजारों राक्षसांचा वध केला आहे आणि दंडकारण्यातल्या जनतेची राक्षसी अत्याचारांपासून मुक्तता केली आहे. अश्या श्रीरामांशी सुग्रीवने मैत्री केली आहे आणि श्रीरामाने त्यांना किष्किंधाचे राज्य देण्याचे ही प्रलोभन दिले आहे. तारेने बालीला सल्ला दिला, परिस्थितीला ओळखा, या घटकेला श्रीरामासारख्या पराक्रमी व्यक्तीशी वैर पत्करणे हिताचे नाही. त्यांना शरण जा. सम्मानपूर्वक रुमाला सुग्रीवच्या स्वाधीन करून, त्याचा युवराज पदावर अभिषेक करण्याचा करा. वालीला तिची सूचना आवडली नाही. कदाचित् वालीला असे वाटले असेल, श्रीराम न्यायी आहेत दोन भावांच्या युद्धात ते पडणार नाही. वालीने तारेच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. वालीचे हितचिंतक वानरांनी वालीच्या मृत्यूची वार्ता तारेला कळवली आणि तिला अंगद सहित पलायन करण्याचा सल्ला दिला. पण तारेने ते मान्य केले नाही. ती कुठे ही पळून गेली नाही. अपितु युद्धाच्या जागी गेली. त्या परिस्थितीत ही आपला क्रोध आवरून, आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले. वाली वधाचा दोष तिने श्रीरामावर लावला नाही. तारेला माहित होते इक्ष्वाकु कुलभूषण श्रीरामचंद्र हे न्यायी आहेत, ते कधी ही अन्याय करत नाही. जे काही घडले त्याला तिचा पतीच कारणीभूत आहे. तिने वाक्चातुर्य दाखवत श्रीरामाला तिचा ही वालीप्रमाणे वध करण्याची विंनती केली. तिची मात्रा बरोबर लागू पडली. श्रीरामाने सुग्रीवचा किष्किंधा नगरीच्या राजपदावर अभिषेक केला आणि वाली पुत्र अंगद याचा युवराज पदावर अभिषेक केला. अश्यारितीने तारेने आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले. भविष्यात त्याचा राजा होण्याचा मार्ग मोकळा केला. क्रोधीत लक्ष्मण नगरात आले. तेंव्हा सुग्रीव तारेच्या निवासी होते. या वरून कळते, तारेने सुग्रीवला ही आपल्या मुठीत ठेवले होते. लक्ष्मणाच्या येण्याची वार्ता ऐकून वानरराज सुग्रीव घाबरून गेले, या विकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुग्रीवणे तारेलाच पुढे केले. वेळप्रसंग ओळखून ताराने लक्ष्मणाची मनधरणी केली, हे वीर राजकुमार ही क्रोध करण्याची वेळ नाही. सुग्रीवच्या मनात तुमचे कार्य करण्याची इच्छा आहे, काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. क्रोधग्रस्त असल्यामुळे तुला कामासक्त माणसाच्या परिस्थितीची कल्पना नाही. कामासक्त होऊन वानरराज माझ्याकडे आले होते, कामाच्या अधीन झाल्यामुळे त्यांच्या हातून चूक झाली असेल, त्यांना आपला बंधु समजून क्षमा करावी. महर्षयो धर्मतपोऽभिकामाः कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः । अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु कथं न सज्जेत सुखेषु राजा ॥ किष्किंधाकांड (३३/५) (तपस्यारत महर्षी ही कामाच्या अधीन होतात, सुग्रीव तर एक चंचल वानर आहे, तो कामाच्या अधीन झाला, त्यात चूक काय). तारा पुढे म्हणाली, जरीही सुग्रीव कामासक्त झाले असतील तरी ही त्यांनी आपले कार्यसिद्ध करण्याचा उद्योग सुरु केलेला आहे. लवकरच लाखोंच्या संख्येने वानर इथे येऊन पोहचतील आणि कार्याला सुरवात करतील. अश्या रीतीने तारेने लक्ष्मणाचा क्रोध काही अर्थी शांत केला. सुग्रीवला भेटल्यावर ही लक्ष्मणाचा क्रोध पुन्हा जागा झाला. लक्ष्मणाने अत्यंत कठोर शब्दात सुग्रीवची नालस्ती सुरु केली. या वेळी मात्र ताराने कठोर भूमिका घेतली. तिने कठोर शब्दात लक्ष्मणाला बजावले, सुग्रीव हे वानरांचे राजा आहेत. राजा समोर कटू बोलणे कुठल्याही परिस्थितीत उचित नाही. तिने लक्ष्मणाला सांगितले, सुग्रीव कृतघ्न तर नाही, पण असत्य ही बोलत नाही. ते निश्चितच अधम राक्षसांचा वध करून, सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त करतील. तारा पुढे म्हणाली, वर्षोनुवर्षे दुखी असलेल्या माणसाला सुख मिळाले आणि त्याचा उपभोग घेण्यात तो दंग झाला तर त्यात गैर काय. थोडा उशीर झाला, म्हणून त्याच्याशी कठोर वागणे उचित नाही. तारेने लक्ष्मणा समोर श्रीरामाच्या न्यायाची प्रशंसा केली. तिने रावणच्या सैन्यबलाचे ही वर्णन करत लक्ष्मणाला स्पष्ट शब्दात बजावले: ते न शक्या रणे हन्तुमसहायेन लक्ष्मण:l रावण: क्रूरकर्मा च सुग्रीवेण विशेषत:l (किष्किंधाकांड ३५/१७) [सारांश: कुणा एकट्याला रावणाचा आणि राक्षसांचा वध करणे अशक्य आहे. वानरराज सुग्रीवची मदतची श्रीरामाला ही तेवढीच आवश्यकता आहे]. अश्यारितीने आपल्या वाक्चातुर्य आणि युक्तिवादाने तारेने लक्ष्मणाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. लक्ष्यात असू द्या, ज्या प्रमाणे सुग्रीवला तुम्ही मदत केली, त्याच प्रमाणे सुग्रीवच्या मदतीची तुम्हाला ही तेवढीच गरज आहे. लक्ष्मणाला तिचा युक्तिवाद पटला. त्याला सत्य परिस्थितीची जाणीव झाली. त्याचा क्रोध शांत झाला. अश्या रीतीने तारेने लक्ष्मणाच्या क्रोधापासून सुग्रीव आणि वानरांचे रक्षण केले. तारेचे प्रखरव्यक्तित्वाचा प्रभाव त्या वेळचा समाजावर पडला, म्हणून तारेला प्रात:स्मरणीय पंच कन्येत स्थान मिळाले. अहल्या द्रोपदी कुंती तारा मंदोदरी तथा:l पंचकन्यादस्मरेनित्यं महदपातक नाशनम् l या पाच ही स्त्रियांनी अन्याय सहन केला नाही आणि आपले उद्दिष्ट साध्य केले. पण तारा या पाच ही स्त्रियेत सर्वश्रेष्ठ आहे कारण तिने केवळ स्वत:चाच स्वार्थ नाही सिद्ध केला अपितु संपूर्ण वानरजातीचे ही हित साध्य केले.
  • Log in or register to post comments
  • 27235 views

प्रतिक्रिया

Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 06/29/2015 - 22:43

Permalink

श्रीरामासामोरचे पर्याय

तुडतुडी, १. >> वालीला घाबरून रावणाने सीतेला परत केली तर ती त्याच्याबरोबर पळून गेली ह्या आरोपास पुष्टी कशी मिळते ? सीतेने कांचनमृगाची इच्छा प्रदर्शित केल्यावर श्रीराम म्हणाले की सोन्याचं हरीण कोणी पाहिलं नाही किंवा त्याविषयी कधी ऐकलं नाही. हा मायावी प्रकार दिसतो आहे. तस्मात दुर्लक्ष कर. पण तरीही तिने श्रीरामाला हरणामागे जाण्यास प्रवृत्त केलं. नंतर लक्ष्मणास देखील पाठवलं. साहजिकच ती उघड्यावर पडली. आता लोकप्रवाद असा असू शकतो की तिने हे सारं हेतुपुरस्सर केलं. ती रावणाला आतून सामील होती. जर ती साममार्गाने परत आली असती तर हा आरोप धुतला गेला नसता. रावणाने तिचं हरण करून एके प्रकारे आपलं भवितव्य काळकुट्टं करून घेतलं. या आरोपावर एकमेव उत्तर म्हणजे श्रीरामाने रावणास ठार मारणे. श्रीरामाने रावणास संधी करण्यासाठी दूत पाठवला तो राजनीतीच्या नियमांना अनुसरून. जर रावण शरण आला असता तर मोठा पेचप्रसंग उद्भवला असता. हनुमानाने श्रीरामास जाणीव करून दिली की बिभीषणास लंकेचं राज्य कबूल केलं आहे. जर रावणाने संधी मान्य केली तर बिभीषणास दिलेल्या वचनाचा भंग होईल. तर श्रीराम म्हणाले की रावणाला मी अयोध्येचं राज्य देईन आणि आम्ही चौघेही भाऊ रानात जाऊन राहू. मग सीतेचा त्याग करायची जरुरी उरली नसती. श्रीरामांची कुठल्याही परिस्थितीस तोंड द्यायची तयारी होती. २. >> दुसरी गोष्ट म्हणजे वाली जसा रावणाचा वध करू शकला असता तसाच हनुमंत हि रावणाचा वाढ करू शकला असता . >> मग रामांनी त्यालाही सामील करून घ्यायला नाही पाहिजे होतं . हनुमंत रावणाचा वध करू शकला असता असं माझ्या मते वाल्मिकींनी कुठेही सूचित केलं नाहीये. ३. >> समजा वालीने सुग्रीवाला हाकलून दिलं नसतं . वालीने सुग्रीवावर अन्याय केला नसता तरीही श्री रामांनी वालीचा >> काटा काढला असता काय ? या जरतर परिस्थितीविषयी भाष्य करणं अवघड आहे. :-) दोन पर्याय दिसतात. अ. वालीशी समेट करणे : जर वालीला कळलं असतं की सीतेला रावणाने अन्यायाने पळवली आहे, तर त्याने रावणास तिला परत करायला लावलं असतं. राम रावण युद्ध झालंही नसतं. श्रीरामाने मग वालीमार्फत राजनैतिक दबाव टाकून रावणाच्या कारवायांना पायबंद घालायचा प्रयत्न केला असता. आर्जवशक्ती वापरून वालीला आपलंसं केलं असतं. या पर्यायातून सीतेवरील आरोप पूर्णपणे धुतला गेला नसता. आ. वाली व सुग्रीव यांच्याशी युद्ध करून त्यांना हरवून त्यांना नष्ट वा अंकित करणे : हा अतिशय कठीण पर्याय आहे. शिवाय वानरराज्यावर आक्रमण करायला कोणतंही कारण उपलब्ध नाही. श्रीराम मर्यादेत वागणारे असल्याने हा पर्याय संभाव्य दिसंत नाही. हे झालं माझं आकलन. तुमची व/वा वाचकांची मते वेगळी असू शकतात. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Tue, 06/30/2015 - 13:00

Permalink

राम रावण युद्ध झालंही नसतं. >

राम रावण युद्ध झालंही नसतं. >>> exactly . म्हणजेच युद्ध होणं आवश्यक होतं . मी माझ्या पराक्रमाने सीतेला सोडवून आणली हे रामांना जगाला दाखवून द्यायचं होतं . युद्ध न करताच सीता परत येण्याचा तिच्यावरच्या आरोपाशी काही संबंध नसून श्री रामांच्या पराक्रमाशी आहे . त्यासाठी वालीचा काटा काढलेला असू शकतो . श्रीराम म्हणाले की रावणाला मी अयोध्येचं राज्य देईन आणि आम्ही चौघेही भाऊ रानात जाऊन राहू.>>> :-D . ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत . कारण वेळ आल्यावर मात्र त्यांना राज्यापेक्षा सीतेचा त्याग करण जास्त सोपं वाटलं काहीही लेख आणि काहीही अनुमाने.>>>+11111111
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Tue, 06/30/2015 - 16:20

Permalink

या मध्ये माझा एक प्रश्न

या मध्ये माझा एक प्रश्न जेव्हा राम ला जटायूकडुन माहिती मिळते की सीतेचे रावणाने हरण केले आहे. तेव्हा तो तसाच दक्षिणेकडे तिच्या शोधात निघाला परंतु तेव्हा ही बातमी रामाने कोणा तर्फे अयोध्येला जर क़ळवली. असती तर मग वानरांची मदत न घेता स्वतःचे सैन्य त्याला येवुन मिळाले असते. कारण सीतेचे अपहरण झाले ती जागा (पंचवटी) अयोध्येलाच जास्त जवळची होती. ( चुभुद्याघ्या)
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Tue, 06/30/2015 - 17:37

Permalink

प्रमोद देर्देकर - मलाही हा

प्रमोद देर्देकर - मलाही हा प्रश्न पडतो
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Tue, 06/30/2015 - 17:41

In reply to प्रमोद देर्देकर - मलाही हा by तुडतुडी

Permalink

.

पानिपत असो वा लंका प्रकरण , उत्तर भारतीय राजानी दक्षिणेतल्या सटरफटर लोकाना वापरून स्वतःचा स्वार्थ साध्य केला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on Tue, 06/30/2015 - 17:50

Permalink

@ मानले हो तुम्हांला दादासाहेबदरेकर...!!!

मला वाटते तुमच्यासाठी एक खास कट्टा ठरवून तिकडे तुमचा तसाच 'खास-सत्कार' करावा, तयारी असेल तर तसे कळवा, म्हणजे तसा धागा टाकता येइल. ??
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Tue, 06/30/2015 - 17:59

In reply to @ मानले हो तुम्हांला दादासाहेबदरेकर...!!! by विनोद१८

Permalink

का ?

माझे अनुमान चुकीचे आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Tue, 06/30/2015 - 19:01

In reply to का ? by dadadarekar

Permalink

हा! हा! हा! या दृष्टीने ही

हा! हा! हा! या दृष्टीने ही विचार करायला हवा...
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Tue, 06/30/2015 - 23:41

In reply to हा! हा! हा! या दृष्टीने ही by विवेकपटाईत

Permalink

.

पाणपताच्या वेळी दिल्लीच्या बादशाने पुणेकराना मोठी खंडणी व चौथाइ की काय यांची लालूच दाखवली होती. ( बरॉबर ना ? ) रामानेही सुग्रीव बिभिषणाला अशीच लालूच दाखवली होती. .... दोन्ही वेळेला खरे तर ती त्या त्या राज्यांची ( दिल्ली व अयोध्या )वैयक्तिक दुखणी होती. पण त्यांचे सैन्य लढलेच नाही. दक्षिणी लोकच जणु काय फार मोठे पुण्यकर्म करायला जात आहोत अशा आवेशात लढायला पुढे सरसावले. अगदी नगण्य किंमतीत उत्तरेच्या राजांनी स्वार्थ साधला. हानी मात्र दक्षिणी लोकांच्या वाट्याला आली .
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 07/01/2015 - 11:46

Permalink

१. प्रतिज्ञा आणि २. युद्धहेतू

तुडतुडी, १. >> ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत . कारण वेळ आल्यावर मात्र त्यांना राज्यापेक्षा सीतेचा त्याग करण जास्त सोपं वाटलं श्रीराम दुसऱ्या दिवशी होणारा राज्यभिषेक अव्हेरून १४ वर्षांच्या वनवासास चटकन तयार होतात. त्यांची आयुष्य रानात काढायची प्रतिज्ञा अगदीच तकलादू नसावी. श्रीरामांना झुकतं माप द्यायला माझ्या मते हरकत नसावी. तुम्ही म्हणता ती वेळ प्रजेने श्रीरामावर आणलेली आहे. अकारण राज्यत्याग करायचा नसतो. सीतेला जवळ ठेवून जर राज्यत्याग केला असता तर कित्येक लोकं त्याच्या मागोमाग रानात जाऊन राहिले असते. तो पूर्वी वनवासास निघालेला तेव्हा असंच झालं होतं. शिवाय बाकीचे भाऊही वैतागले असते ते वेगळंच. सीतेला फक्त त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं आहे. तेसुद्धा प्रजेने आक्षेप घेतला म्हणून. त्याने दुसरं लग्न केलं नाही. बापाप्रमाणे दासी ठेवल्या नाहीत. राज्य केलं ते कर्तव्य म्हणून. २. >> म्हणजेच युद्ध होणं आवश्यक होतं . मी माझ्या पराक्रमाने सीतेला सोडवून आणली हे रामांना जगाला दाखवून द्यायचं होतं . >> युद्ध न करताच सीता परत येण्याचा तिच्यावरच्या आरोपाशी काही संबंध नसून श्री रामांच्या पराक्रमाशी आहे . >> त्यासाठी वालीचा काटा काढलेला असू शकतो . बरोबर. मूळ हेतू रावणास पायबंद घालणं हा होता. त्यासाठी साम वा दंड हे दोन पर्याय होते. सीताहरणामुळे साम निकालात निघाला. सीताहरण ही रामाच्या मूळ योजनेस मिळालेली अनपेक्षित कलाटणी आहे. तिच्यामुळे सीतामुक्ती हा उपहेतू उत्पन्न झाला. मात्र हा उपहेतू मूळ हेतूस पूरक आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 07/01/2015 - 11:46

Permalink

१. प्रतिज्ञा आणि २. युद्धहेतू

तुडतुडी, १. >> ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत . कारण वेळ आल्यावर मात्र त्यांना राज्यापेक्षा सीतेचा त्याग करण जास्त सोपं वाटलं श्रीराम दुसऱ्या दिवशी होणारा राज्यभिषेक अव्हेरून १४ वर्षांच्या वनवासास चटकन तयार होतात. त्यांची आयुष्य रानात काढायची प्रतिज्ञा अगदीच तकलादू नसावी. श्रीरामांना झुकतं माप द्यायला माझ्या मते हरकत नसावी. तुम्ही म्हणता ती वेळ प्रजेने श्रीरामावर आणलेली आहे. अकारण राज्यत्याग करायचा नसतो. सीतेला जवळ ठेवून जर राज्यत्याग केला असता तर कित्येक लोकं त्याच्या मागोमाग रानात जाऊन राहिले असते. तो पूर्वी वनवासास निघालेला तेव्हा असंच झालं होतं. शिवाय बाकीचे भाऊही वैतागले असते ते वेगळंच. सीतेला फक्त त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं आहे. तेसुद्धा प्रजेने आक्षेप घेतला म्हणून. त्याने दुसरं लग्न केलं नाही. बापाप्रमाणे दासी ठेवल्या नाहीत. राज्य केलं ते कर्तव्य म्हणून. २. >> म्हणजेच युद्ध होणं आवश्यक होतं . मी माझ्या पराक्रमाने सीतेला सोडवून आणली हे रामांना जगाला दाखवून द्यायचं होतं . >> युद्ध न करताच सीता परत येण्याचा तिच्यावरच्या आरोपाशी काही संबंध नसून श्री रामांच्या पराक्रमाशी आहे . >> त्यासाठी वालीचा काटा काढलेला असू शकतो . बरोबर. मूळ हेतू रावणास पायबंद घालणं हा होता. त्यासाठी साम वा दंड हे दोन पर्याय होते. सीताहरणामुळे साम निकालात निघाला. सीताहरण ही रामाच्या मूळ योजनेस मिळालेली अनपेक्षित कलाटणी आहे. तिच्यामुळे सीतामुक्ती हा उपहेतू उत्पन्न झाला. मात्र हा उपहेतू मूळ हेतूस पूरक आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Wed, 07/01/2015 - 13:44

In reply to १. प्रतिज्ञा आणि २. युद्धहेतू by गामा पैलवान

Permalink

.

पातिव्रत्याचा भंग होऊनही अहिलेला रामाने पुन्हा स्थान मिळवून दिले. त्याच रामाने प्रज्रेने निव्वळ संशय घेतला म्हण्न सीतेला पुन्हा वनवासात ढकलले हा किती मोठा विरोधाभास आहे. प्रजेला समजावून सांगण्यात राम कमी पडला असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Wed, 07/01/2015 - 15:42

Permalink

श्रीराम दुसऱ्या दिवशी होणारा

श्रीराम दुसऱ्या दिवशी होणारा राज्यभिषेक अव्हेरून १४ वर्षांच्या वनवासास चटकन तयार होतात. >>> ते पुत्रकर्तव्य म्हणून . मग पतिकर्तव्य पाळायला काय झालंय ? सीतेला लग्नाच्या वेळी दिलेली वचनं कुठे गेली ? तुझ्या प्रत्येक सुखदुखात सहभागी असेन , तुला अंतर देणार नाही , तुझं योग्य पालन पोषण करेन bla bla bla. दुसरं लग्न केलं नाही कारण त्यांनी खूप आधीच तशी प्रतिज्ञा केली होती . ती प्रतिज्ञा मोडली असती तर त्यांना नावं ठेवण्यात आली असती . त्यापेक्षा सीतेला दूर करून त्यांनी लोकनिंदा टाळली . सीतेला जवळ ठेवून जर राज्यत्याग केला असता तर कित्येक लोकं त्याच्या मागोमाग रानात जाऊन राहिले असते. >>> हे तर अतिशय हास्यास्पद आहे . सीतेला अयोध्येत स्वतः बरोबर ठेवली असती तर लोक अयोध्येतच राहिले असते ना . सीतेला फक्त त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं आहे. तेसुद्धा प्रजेने आक्षेप घेतला म्हणून.>>> प्रजेला आक्षेप घेण्याचा अधिकार कोणी दिला ? सीता त्यांच्या बापाच्या घरचं खात होती का? आणि प्रजेनं आक्षेप घेतला असेल तर त्यांच्यासमोर सत्य प्रकट करून रामांनी योग्य तो न्याय करायला हवा होता .कारण यथा राजा तथा प्रजा . रामाचं उदाहरण देवून पुढे कित्येक नवर्यांनी आपल्या बायकांवर अन्याय केला असेल . आणि नुसता आक्षेप तर घेतला होता ना . त्यापासून प्रजेला काही नुकसान तर होणार नवतं . पूर्वी त्यांच्या वनवासी होण्यावर प्रजेने प्रचंड आक्षेप घेतला होता . अगदी त्यांच्या रस्त्यात आडवे पडले . पण कोणालाही न जुमानता ते वनात गेलेच ना त्याच रामाने प्रज्रेने निव्वळ संशय घेतला म्हण्न सीतेला पुन्हा वनवासात ढकलले हा किती मोठा विरोधाभास आहे. >>>exactly
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 07/01/2015 - 16:02

In reply to श्रीराम दुसऱ्या दिवशी होणारा by तुडतुडी

Permalink

बर मग?

.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Wed, 07/01/2015 - 19:30

In reply to श्रीराम दुसऱ्या दिवशी होणारा by तुडतुडी

Permalink

इथेच प्रश्न उभा राहतो, सीता

इथेच प्रश्न उभा राहतो, सीता कोण होती. सीता भूमी कन्या होती. भूमीतच गडप झाली. भूमीतून काय उत्पन्न होते, आपल्या सर्वांना माहित आहे. बाकी रामायण कथा सीता यात स्पष्ट केले आहे. r
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on गुरुवार, 07/02/2015 - 12:51

In reply to इथेच प्रश्न उभा राहतो, सीता by विवेकपटाईत

Permalink

सीता कोण होती??

एका आख्यानानुसार सीता रावणाची मुलगी होती असे पण ऐकले आहे … :D
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 07/02/2015 - 00:38

Permalink

तुडतुडी,

तुडतुडी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं लिहितो. १. >> मग पतिकर्तव्य पाळायला काय झालंय ? सीतेला लग्नाच्या वेळी दिलेली वचनं कुठे गेली ? तुझ्या प्रत्येक >> सुखदुखात सहभागी असेन , तुला अंतर देणार नाही , तुझं योग्य पालन पोषण करेन bla bla bla. पतीकर्तव्य म्हणून तिला रावणाच्या कचाट्यातून मुक्त केली. मात्र नंतर राजकर्तव्य म्हणून तिला दूर ठेवावं लागलं. अत्रींच्या आश्रमात तिची आवश्यक ती काळजी घेतली गेली आहे. तसंच मुलांचं संगोपनही व्यवस्थितपणे झालं आहे. २. >> दुसरं लग्न केलं नाही कारण त्यांनी खूप आधीच तशी प्रतिज्ञा केली होती . ती प्रतिज्ञा मोडली असती तर त्यांना नावं >> ठेवण्यात आली असती . आपली प्रतिज्ञा पाळणे हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे. ३. >> त्यापेक्षा सीतेला दूर करून त्यांनी लोकनिंदा टाळली . माझं मत थोडं वेगळं आहे. पतीकर्तव्य आणि राजकर्तव्य यात राजकर्तव्याला त्याने प्राधान्य दिलं. कारण पतीकर्तव्य खाजगी आहे, तर राजकर्तव्य सार्वजनिक आहे. ४. >> सीतेला अयोध्येत स्वतः बरोबर ठेवली असती तर लोक अयोध्येतच राहिले असते ना . नेमकी तिथेच प्रजाजनांत फूट पडत होती. ती टाळण्याकडे रामाचा कल होता. ५. >> प्रजेनं आक्षेप घेतला असेल तर त्यांच्यासमोर सत्य प्रकट करून रामांनी योग्य तो न्याय करायला हवा होता . सीतेने अग्निदिव्य करून तिच्यापरीने स्वत:चं निर्दोषत्व सिद्ध केलं आहे. मात्र खरा आक्षेप वेगळाच आहे. सीतेला आणि लक्ष्मणाला वनवासाची आज्ञा झाली नव्हती. ते आपणहून गेले. वनवासाचं राजकीय उद्दिष्ट नक्की होतं. अशा प्रसंगी सीतेकडून प्रमाद घडला. रामाला अगोदर कांचनमृगाच्या मागे त्याच्या इच्छेविरुद्ध पाठवलं. मागोमाग लक्ष्मणालाही रामाच्या आज्ञेविरुद्ध पर्णकुटीहून दूर पाठवलं. ही पार्श्वभूमी पाहता तिने रामाची निकटवर्तीय म्हणून वावरणं प्रजेच्या दृष्टीने कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उद्भवतो. तत्कालीन पौरजनांनी जे मत प्रदर्शित केलं ते पूर्णपणे वस्तुस्थितीवर आधारित आहे. या मताच्या आधारे जर लोकं राज्य सोडून जाऊ लागले तर रामाच्या प्रजाकर्तव्यात बाधा येते. ६. >> रामाचं उदाहरण देवून पुढे कित्येक नवर्यांनी आपल्या बायकांवर अन्याय केला असेल . हा रामासमोरील प्रश्न नव्हे. ७. >> आणि नुसता आक्षेप तर घेतला होता ना . त्यापासून प्रजेला काही नुकसान तर होणार नवतं . नुकसान होऊ शकलं असतं. वालीचा आणि रावणाचा नाशही संभाव्य नुकसान टाळण्यासाठीच केला होता. ८. >> पूर्वी त्यांच्या वनवासी होण्यावर प्रजेने प्रचंड आक्षेप घेतला होता . अगदी त्यांच्या रस्त्यात आडवे पडले . >> पण कोणालाही न जुमानता ते वनात गेलेच ना पूर्वी वनवासात जाण्यामागे पित्याची आज्ञा पाळणं हे कर्तव्य होतं. आता मात्र पतीकर्तव्य आणि राजकर्तव्य यांत तेढ उत्पन्न झाली. त्यात राजकर्तव्याचं पारडं जड ठरलं. ९. >> त्याच रामाने प्रज्रेने निव्वळ संशय घेतला म्हण्न सीतेला पुन्हा वनवासात ढकलले हा किती मोठा विरोधाभास आहे. प्रजेचं नुकसान संभाव्य असलं तरी ते टाळायला हवं ही राजकर्तव्याची प्रेरणा यामागे आहे. उगीच गंमत म्हणून सीतेला आश्रमात पाठवलेली नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on गुरुवार, 07/02/2015 - 11:43

In reply to तुडतुडी, by गामा पैलवान

Permalink

.

रामाबरोबर राहिली असती सीता तर प्रजेचे काय बिघडणार होते ? सीता रावणाच्या ताब्यात होती. पण त्यानंतर राज्य बिभिषणाचे म्हणजे रामाच्या मित्राचेच आहे. मग सीतेची उपस्थिती प्रजेला का खpuu नये ? सीता हेरगिरी करणार होती की काय ? हायला , आमचे लाडकेमुसलमान राजे दुसर्‍या राजांच्या बायका धरुन आणत होते... त्या राजाबरोबर रहायच्या . जनता मुकाटपणे रहायची. आणि रामाने स्वतःचीच बायको ठेउन घ्यायची म्हटली तर जनतेची बडबड सुरु झाली ! सीता संगनमताने रावणाबरोबर गेली हाही असाच फुकाचा वाद आहे. सीताहरणासाठी रावण अचानकपणे आला होता. त्याने आणि सीतेने प्लॅन करायला आधी तो सीतेला कधी भेटला तरी होता का ? की इ मेल फ्याक्स केला होता ? मी येतोय तू तयारीत रहा म्हणून ?
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on गुरुवार, 07/02/2015 - 12:48

In reply to . by dadadarekar

Permalink

काय पण प्रश्न!

उत्तरे मिळाल्यावर कळवा :D
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 07/02/2015 - 18:00

In reply to . by dadadarekar

Permalink

dadadarekar,

dadadarekar, १. >> सीता हेरगिरी करणार होती की काय ? प्रजेला नेमका हाच संशय आला. २. >> हायला , आमचे लाडकेमुसलमान राजे दुसर्‍या राजांच्या बायका धरुन आणत होते... त्या राजाबरोबर रहायच्या . >> जनता मुकाटपणे रहायची. आणि रामाने स्वतःचीच बायको ठेउन घ्यायची म्हटली तर जनतेची बडबड सुरु झाली ! भविष्यात कोणी मुस्लिम राजे अमुक एका प्रकारे वर्तन करणार आहेत असं कळलं असतं तर अयोध्येच्या जनतेने आपलं मत कदाचित बदललं असतं. दुर्दैवाने तशी सूचना मिळाली नाही. ३. >> सीताहरणासाठी रावण अचानकपणे आला होता. त्याने आणि सीतेने प्लॅन करायला आधी तो सीतेला कधी भेटला >> तरी होता का ? कोणामार्फत तरी संधान बांधता येतं ना? रावण सर्वशक्तिमान राजा होता. ४. >> सीता संगनमताने रावणाबरोबर गेली हाही असाच फुकाचा वाद आहे. तुमच्या आमच्या दृष्टीने फुकाचा वाद असेल, पण तत्कालीन अयोध्येच्या जनतेच्या दृष्टीने नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on गुरुवार, 07/02/2015 - 18:26

In reply to dadadarekar, by गामा पैलवान

Permalink

.

रावण मेला. बिभिषण मित्रच होता. मग आता सीतामैय्या हेरगिरी कुणासाठी करणार होती ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 07/02/2015 - 22:08

Permalink

संभाव्य धोका टाळणे

dadadarekar, >> रावण मेला. बिभिषण मित्रच होता. मग आता सीतामैय्या हेरगिरी कुणासाठी करणार होती ? भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रजाजनांना सीतेचा सहवास नको आहे. इथे संभाव्य हा शब्द महत्त्वाचा आहे. रावण आणि वाली यांचा नाशही संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने केला गेला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Fri, 07/03/2015 - 02:02

In reply to संभाव्य धोका टाळणे by गामा पैलवान

Permalink

सभाव्य !

संभाव्य धोका हाच मुद्दा असेल तर अयोध्येतील सएवच स्त्रीपुरुष वनवासात धाडावे लागतील. शत्रूशी संधान असणे हे कुणाहीबाबतीत संभवनीय आहे. ता. क. ... दुसर्‍या राष्ट्रात मनुष्य राहिला तर त्याच्यापासून धोका संभवतो. हे सांगितल्याबद्दल आभार. आता आपण लंडनातून भारतात आलात की हाच नियम लावुन आपणासही आम्ही वनवासात आनंदाने धाडू. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 07/03/2015 - 16:43

Permalink

वर्तन आणि संशय

dadadarekar, १.>> शत्रूशी संधान असणे हे कुणाहीबाबतीत संभवनीय आहे. सीतेच्या बाबतीत जरा जास्त संभवनीय होतं. काय करणार घटनाच तशा घडल्या. सीतेवर नियतीने अन्याय केला हे मान्य. २. >> दुसर्‍या राष्ट्रात मनुष्य राहिला तर त्याच्यापासून धोका संभवतो. हे सांगितल्याबद्दल आभार. रामाला आणि लक्ष्मणाला दूर पाठवणे यावरून सीतेवर संशय घेतला गेला आहे. ती रावणासोबत राहली म्हणून नव्हे. त्यासोबत तर बिभीषणसुद्धा राहिला होता. आणि वालीसोबत अंगददेखील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Fri, 07/03/2015 - 16:53

Permalink

अन्य्याय

सीतेवर झालेल्या अन्यायाच काय त्यावर कोणीच बोलत नाही…।
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 07/03/2015 - 16:56

Permalink

पैलवान आणि दादा मंडळी चर्चा

पैलवान आणि दादा मंडळी चर्चा करताहेत म्हटल्यावर बाकींच्यांचा काही लाग नाही :) (ह. घ्या)
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on गुरुवार, 07/09/2015 - 16:41

Permalink

पतीकर्तव्य म्हणून तिला

पतीकर्तव्य म्हणून तिला रावणाच्या कचाट्यातून मुक्त केली. मात्र नंतर राजकर्तव्य म्हणून तिला दूर ठेवावं लागलं. >>> पतीकर्तव्य म्हणून नाही तर सगळ्यांची वाहवा मिळावी म्हणून . पतीकर्तव्य म्हणून तिला सोडवलं असतं तर पुढेही तिला साथ दिली असती . तिला वार्यावर सोडलं नसतं . त्यानंतर तिला जे हाल भोगायला लावले त्यापेक्षा तिला लंकेतच मरू देणं योग्य नवतं का ? राजकर्तव्य म्हणजे नक्की कुठलं राजकर्तव्य ? रावणाने तिला अपवित्र केलं असेल ह्या शंकेपायी तिचा अपमान करण ?समजा हे राजकर्तव्य केलं नसतं तर प्रजेवर अशी कोणती आफत आली असती ? लोकांचं काय नुकसान झालं असतं ? आणि तिला अपवित्र केलं असतं तरी त्यात तिचा काय दोष ? रामाला हे न समजायला तो काय सामान्य माणूस होता का ? अत्रींच्या आश्रमात तिची आवश्यक ती काळजी घेतली गेली आहे. तसंच मुलांचं संगोपनही व्यवस्थितपणे झालं आहे.>>> तो आश्रम अत्रींचा नसून होता . कृपया रामायणाचा आधी अभ्यास करावा . काळजी , मुलांचं संगोपन हे वाल्मिकी ऋषींनी केलेलं आहे . रामाने नव्हे . रामाला तर सीता जिवंत आहे कि मेली हे सुधा माहित नवतं . आपली प्रतिज्ञा पाळणे हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे.>>> तेच म्हणतेय मी . लग्नाच्या वेळेला दिलेली वचन सोडून इतर प्रतिज्ञा पाळणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे काय ? स्वतःच्या सोयीप्रमाणे प्रतिज्ञा पाळल्या गेल्या. बापासाठी वनवास भोगल्याने , रावणाला मारून सीतेला सोडवण हे लोकांची वाहवा मिळावी म्हणून . सीतेला सोडलं नसतं तर त्यांची वाहवा मिळायच्या ऐवजी शिव्या मिळाल्या असत्या ना हा रामासमोरील प्रश्न नव्हे.>>> मग तो राजा कसला ? प्रजेची काळजी घेणं म्हणजे प्रजेतल्या फक्त पुरुषांची काळजी घेणं काय ? रामाच्या राज्यात स्त्रिया नवत्या का ? आता मात्र पतीकर्तव्य आणि राजकर्तव्य यांत तेढ उत्पन्न झाली. त्यात राजकर्तव्याचं पारडं जड ठरलं.>> राजकर्तव्याचं पारडं रामानेच जड ठरवलं . प्रजेचं नुकसान संभाव्य असलं तरी ते टाळायला हवं ही राजकर्तव्याची प्रेरणा यामागे आहे>>> प्रजेचं नुकसान, राजकर्तव्य असले शब्द वापरण्यापेक्षा नक्की काय नुकसान झालं असतं ते सांगावं . आणि सीतेला वनात पाठव्ण्याशिवाय दुसरा कुठलाच option नवता तर राम पण तिच्या बरोबर का गेला नाही ? १४ वर्षे भारताने राज्य संभाळल तसं पुढेही संभाळल असतं . ह्यावरून हेच सिद्ध होतं कि वचन बिचन सगळं खोटं असून रामाला राज्याचा मोह होता प्रजेला नेमका हाच संशय आला.>>> असं असेल तर प्रजेच्या बुद्धीची कीव करून रामाने उत्स्फूर्त पणे राज्य सोडून जायला हवं होतं रामाला आणि लक्ष्मणाला दूर पाठवणे यावरून सीतेवर संशय घेतला गेला आहे.>>> रामाला आणि लक्ष्मणाला दूर कशासाठी पाठवलं हे प्रजेला चांगलंच माहित होतं . आणि त्यांना दूर पाठवून सीतेचा रावणाकडे जायचा उद्देश काय होता ? कारण तिथे गेल्यावर ती कुठल्या परिस्थितीत राहिली हे हि प्रजेला ठावूक होतंच . प्रजेला नक्की कसला संशय आला हे रामायणात कुठेच लिहिलेलं नाहीये . संशय वगेरे आला ह्या आपल्या मनानेच आपण टिंग्या सोडतोय .
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 07/10/2015 - 01:03

In reply to पतीकर्तव्य म्हणून तिला by तुडतुडी

Permalink

तुमचा संदेश वाचला...

तुडतुडी, तुमचा संदेश वाचला. माझी मतं सांगतो. १. >> पतीकर्तव्य म्हणून नाही तर सगळ्यांची वाहवा मिळावी म्हणून . वाहवा मिळवायचा हेत्वारोप आहे. असा आरोपही कुणावरही करता येतो. उदा. : लोकांची वाहवा मिळावी म्हणून शिवाजींनी स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला. २. >> पतीकर्तव्य म्हणून तिला सोडवलं असतं तर पुढेही तिला साथ दिली असती . तिला वार्यावर सोडलं नसतं . तिला वाऱ्यावर सोडलेली नाहीये. ऋषींच्या आश्रमात पाठवलेली आहे. ३. >> त्यानंतर तिला जे हाल भोगायला लावले त्यापेक्षा तिला लंकेतच मरू देणं योग्य नवतं का ? हे तुमचं वैयक्तिक मत झालं. श्रीरामांनी पतीकर्तव्याला जागून तिला अयोध्येस परत आणली. ४. >> राजकर्तव्य म्हणजे नक्की कुठलं राजकर्तव्य ? रावणाने तिला अपवित्र केलं असेल ह्या शंकेपायी तिचा अपमान करण ? सीता रावणापाशी वर्षभर राहिली हे तिच्या त्यागामागील कारण नाहीये. हा मुद्दा पूर्वी इथे (मुद्दा क्र. २) स्पष्ट केलाय. बिभीषणदेखील रावणाबरोबर राहिलेला होता. अंगदसुद्धा वालीसोबतच राहिलेला होता. जर बिभीषण आणि अंगद रामाला स्वीकारार्ह असतील तर सीता निश्चितच स्वीकारार्ह आहे. त्याप्रमाणे त्याने तिला अयोध्येला आणली. ५. >> समजा हे राजकर्तव्य केलं नसतं तर प्रजेवर अशी कोणती आफत आली असती ? लोकांचं काय नुकसान झालं असतं ? ज्या पद्धतीने सीताहरण झालं त्यावरून सीतेचं उद्दिष्टावरून लक्ष हटलेलं होतं हे स्पष्टपणे दिसतं. अयोध्येच्या लोकांना अशी व्यक्ती रामाची निकटवर्तीय म्हणून नको होती. ६. >> आणि तिला अपवित्र केलं असतं तरी त्यात तिचा काय दोष ? रामाला हे न समजायला तो काय सामान्य माणूस >> होता का ? सीता अपवित्र नव्हती. तिचं पावित्र्य वा अपवित्र्य हा कधीच वादग्रस्त मुद्दा नव्हता. ७. >> तो आश्रम अत्रींचा नसून होता . कृपया रामायणाचा आधी अभ्यास करावा . काळजी , मुलांचं संगोपन हे >> वाल्मिकी ऋषींनी केलेलं आहे . रामाने नव्हे . म्हणजेच सीतेला वाऱ्यावर सोडलेली नव्हती. वाल्मिकींच्या ऐवजी चुकून अत्रींचं नाव घातलं तरी माझ्या युक्तिवादात फरक पडंत नाही. पण अर्थात रामायण वाचायचा मला दिलेला तुमचा सल्ला शिरोधार्य आहे. ८. >> रामाला तर सीता जिवंत आहे कि मेली हे सुधा माहित नवतं . हे कशावरून? ९. >> लग्नाच्या वेळेला दिलेली वचन सोडून इतर प्रतिज्ञा पाळणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे काय ? स्वतःच्या सोयीप्रमाणे >> प्रतिज्ञा पाळल्या गेल्या. बापासाठी वनवास भोगल्याने , रावणाला मारून सीतेला सोडवण हे लोकांची वाहवा >> मिळावी म्हणून . सीतेला सोडलं नसतं तर त्यांची वाहवा मिळायच्या ऐवजी शिव्या मिळाल्या असत्या ना हे हेत्वारोप आहेत. 'थोरले बाजीराव वाहवा मिळावी म्हणून नादिरशहाशी लढायला गेले', असाही कोणी उद्या उठून आरोप करेल. खरा धरायचा काय? जगजितसिंह अरोडा यांनी वाहवा मिळावी म्हणून पूर्व पाकिस्तानात सैन्य घुसवून नियाझीला शरण यायला भाग पाडलं. आजून काय? १०. >> रजेची काळजी घेणं म्हणजे प्रजेतल्या फक्त पुरुषांची काळजी घेणं काय ? रामाच्या राज्यात स्त्रिया नवत्या का ? रामाने राज्यातल्या बायकांची काळजी घेतली नाही, असं रामायणात कुठेही लिहिलेलं नाही. तुम्ही रामायण वाचलेलं दिसंत नाही. मला रामायण वाचायचा सल्ला दिलात तो अगोदर स्वत:ला लागू करायला हवा होता. ११. >> राजकर्तव्याचं पारडं रामानेच जड ठरवलं . सार्वजनिक कर्तव्यास नेहमी वैयक्तिक कर्तव्यापेक्षा जास्त प्राधान्य मिळतं. मला वाटतं हा मुद्दा मी अगोदर स्पष्ट केलेला (मुद्दा क्र. ३) आहे. तुम्ही तो वाचलेला दिसंत नाही. १२. >> प्रजेचं नुकसान, राजकर्तव्य असले शब्द वापरण्यापेक्षा नक्की काय नुकसान झालं असतं ते सांगावं . काहीही होऊ शकलं असतं. सीतेने रामाचं आपल्या ध्येयापासून लक्ष विचलित केलेलं आहे. मुद्दाम केलंय म्हणत नाही. पण तसं झालंय खरं. अशा या व्यक्तीच्या निकटपणावर प्रजाजन आक्षेप घेऊ शकतात. १३. >> आणि सीतेला वनात पाठव्ण्याशिवाय दुसरा कुठलाच option नवता तर राम पण तिच्या बरोबर का गेला नाही ? क्षत्रियाला कारणावाचून राज्य सोडून जाता येत नाही म्हणून. १४. >> १४ वर्षे भारताने राज्य संभाळल तसं पुढेही संभाळल असतं . ह्यावरून हेच सिद्ध होतं कि वचन बिचन सगळं खोटं >> असून रामाला राज्याचा मोह होता अजिबात नाही. सीतेचा त्याग केल्यावरही त्याने दुसरं लग्नं केलं नाही. दासी ठेवली नाही. त्यावरून त्याला ऐशआरामाचा मोह पडला नव्हता हेच सिद्ध होतं. १५. >> असं असेल तर प्रजेच्या बुद्धीची कीव करून रामाने उत्स्फूर्त पणे राज्य सोडून जायला हवं होतं कारणावाचून क्षत्रियाने राज्यत्याग करायचा नसतो. बुद्धिहीन प्रजा हे वैध कारण नव्हे. १६. >> रामाला आणि लक्ष्मणाला दूर कशासाठी पाठवलं हे प्रजेला चांगलंच माहित होतं . अजिबात नाही. तुम्हाआम्हाला माहितीये. कारण वाल्मिकींनी लिहिलंय म्हणून. तत्कालीन प्रजेला हे माहीत असायचा संभाव नाही. १७. >> प्रजेला नक्की कसला संशय आला हे रामायणात कुठेच लिहिलेलं नाहीये . >> संशय वगेरे आला ह्या आपल्या मनानेच आपण टिंग्या सोडतोय . सीतेचं पावित्र्य आगोदरच अग्निपरीक्षेतून सिद्ध झालेलं होतं. तर मग तिच्या त्यागामागे एकंच कारण उरतं. ते म्हणजे ध्येयविचलनाचं. प्रजेने जर हा आक्षेप घेतला तर तो रास्त आहे. असो. तुमचे आक्षेप रामावर वैयक्तिक खुन्नस काढल्यासारखे दिसताहेत. त्याच्या वर्तनाची चिकित्सा तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार करायला पाहिजे. बरं, ते जाऊद्या. जशा रामाने आपल्या मर्यादा पाळल्या तशाच सीतेनेही पाळल्या आहेत. आपल्यावर बेतलेल्या प्रसंगांना तिने मोठ्या धैर्याने तोंड दिलंय. तिच्यावर नियतीने अन्याय केला असला तरी तिने कोणालाही दोष दिलेला नाहीये. श्रीरामाइतकीच तीही वंदनीय आहे. त्याच्यावर आगपाखड करतांना तुमचं सीतेकडे दुर्लक्ष झालेलं दिसतंय. आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Wed, 07/15/2015 - 13:26

Permalink

जर बिभीषण आणि अंगद रामाला

जर बिभीषण आणि अंगद रामाला स्वीकारार्ह असतील तर सीता निश्चितच स्वीकारार्ह आहे. त्याप्रमाणे त्याने तिला अयोध्येला आणली.>> बिभीषण आणि अंगद स्त्रिया नवत्या हो . सीता स्त्री होती आणि ती पर पुरुषाकडे होती हा खरा मुद्दा आहे . रामांनी तिला अयोध्येला आणलं . पण कुणातरी मूर्ख धोब्याचा बोलण्याला भुलून तिला त्यागलं सुधा तिला वाऱ्यावर सोडलेली नाहीये. ऋषींच्या आश्रमात पाठवलेली आहे.>>> महाराज आपण रामायण खरच वाचलं आहे का ? रामाने सीतेला ऋषींच्या आश्रमात पाठवल नवतं .लक्ष्मण तिला जंगलात सोडून गेला होता . तिच्या नशिबाने तिला वाल्मिकी भेटले . हि गोष्ट रामाला काय कुणालाच माहित नवती . हिंस्त्र श्वापदांनी तिच्या शरीराचे लचके तोडलेत का ती अजून जिवंत आहे हे सुधा कोणाला माहित नवतं . हा मुद्दा वरती आलेला आहे .तुम्ही प्रतिसाद नित वाचत नाही असं दिसतंय . त्यामुळे आता लांबलचक प्रतिसाद न देता एवढंच म्हणेन कि सीतेचा अपमान करणाऱ्या रामाला श्रेष्ठ सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड थांबवा . वाल्मिकींच्या ऐवजी चुकून अत्रींचं नाव घातलं तरी माझ्या युक्तिवादात फरक पडंत नाही>>> करेक्ट . हे फक्त तुमचे युक्तिवाद आहेत . सत्य नव्हे . तुम्ही सत्याकडे कानाडोळा करून राम कसा मोठा होता हे दाखवायच्या मागे लाग्लायेत. राम शूर , एकवचनी , एकपत्नी होता. त्याने दुष्टांचा नाश केला . पराक्रम गाजवला हे सगळं खरं आहेच . पण तो सीतेचा अपराधी आहे हे सुधा तितकंच खरं आहे . राम नेहमीच confused , संतापी , दुखी राहिला . प्रत्यक्ष रामापेक्षा रामनाम श्रेष्ठ आहे ह्याचे दाखले खुद्द रामायणात आहेत . वाल्याचा वाल्मिकी झाला तो राम नामाच्या जोरावर . तेव्हा रामायण घडलं सुधा नवतं . राम प्रत्यक्षात अवतरीत सुधा नवता झाला . ह्या रामनामाच्या महतीमुळेच दशरथ पुत्राचं नाव राम ठेवण्यात आलं
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Wed, 07/15/2015 - 21:21

Permalink

सोपी आणि समजणारे अर्थासहित

सोपी आणि समजणारे अर्थासहित गीता प्रेसचे रामायण किमान एकदा तरी वाचले किंमत रु. ४५०, पुष्कळ गैरसमज दूर होतील.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 07/16/2015 - 01:15

Permalink

रामाला बोल लावतांना ....

तुडतुडी, तुमचा वरील संदेश वाचला. माझी मतं लिहितो. १. >> सीता स्त्री होती आणि ती पर पुरुषाकडे होती हा खरा मुद्दा आहे . रामांनी तिला अयोध्येला आणलं . पण कुणातरी >> मूर्ख धोब्याचा बोलण्याला भुलून तिला त्यागलं सुधा सीता निष्कलंक आहे हे लंकेतच सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे परपुरुषाचा मुद्दा गौण आहे. तिनं रामाचं लक्ष विचलित केलं हा माझ्या मते खरा मुद्दा आहे. २. >> महाराज आपण रामायण खरच वाचलं आहे का ? संपूर्ण नाही. पण महत्त्वाचा भाग वाचला आहे. मी इथे राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने रामायण अभ्यासायचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न अजूनही चालूच आहे. ३. >> रामाने सीतेला ऋषींच्या आश्रमात पाठवल नवतं .लक्ष्मण तिला जंगलात सोडून गेला होता . >> तिच्या नशिबाने तिला वाल्मिकी भेटले . हिंस्त्र श्वापदांनी तिच्या शरीराचे लचके तोडलेत का ती अजून जिवंत >> आहे हे सुधा कोणाला माहित नवतं . तुम्ही कुठल्या प्रतीच्या आधारे हे विधान करताहात हे मला ठाऊक नाही. मी वाचलेली प्रत इथे आहे : http://ia800501.us.archive.org/31/items/ShrimadValmikiRamayan-SanskritTextWithHindiTranslation-DpSharma10/ShrimadValmikiRamayan-SktHindi-DpSharmaVol09-UttaraKandaPurvardh1927.pdf तिच्यातल्या पीडीएफ पान क्रमांक ५५० वर रामाने लक्ष्मणास गंगेच्या तीरापल्याड तमसातीरी वाल्मिकींच्या आश्रमात सीतेस सोडण्यास सांगितलं आहे. पुढे रामाने असंही म्हंटलंय की सीतेने गंगातटीचे मुनींचे आश्रम पहावयाची इच्छा प्रदर्शित केली होती. तेव्हा हीच सबब सांगून तू तिला ने. ४. >> एवढंच म्हणेन कि सीतेचा अपमान करणाऱ्या रामाला श्रेष्ठ सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड थांबवा . रामाने सीतेचा अपमान केलेला नाहीये. सीता निष्कलंक आहे हे लंकेतच सिद्ध झालं आहे. कृपया इथे पहा : http://ia600501.us.archive.org/31/items/ShrimadValmikiRamayan-SanskritTextWithHindiTranslation-DpSharma10/ShrimadValmikiRamayan-SktHindi-DpSharmaVol10-UttaraKandaUttarardh1927.pdf वरील ग्रंथाच्या पीडीएफ पान क्रमांक ३१४ वर राम स्पष्टपणे म्हणतो की लंकेत देवतांच्या साक्षीने सीतेने तिच्या निष्कलंक चारित्र्याची खात्री पटवली आहे. रामाने सीतेचा अपमान केलेला नाही. ५. >> हे फक्त तुमचे युक्तिवाद आहेत . सत्य नव्हे . तुम्ही सत्याकडे कानाडोळा करून राम कसा मोठा होता हे >> दाखवायच्या मागे लाग्लायेत. अशी सरसकट विधाने करण्यापेक्षा वाल्मिकींच्या जागी अत्री टाकल्याने सत्याचा विपर्यास कसा होतो ते कृपया समजावून सांगा. रामाचा मोठेपणा सांगायला सत्याकडे काणाडोळा करायची काहीच गरज नाहीये. ६. >> राम नेहमीच confused , संतापी , दुखी राहिला . मग त्याला पाहून शबरी, हनुमान, वाल्मिकी इत्यादिंना आनंद का बरं व्हायचा? तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. शिवाजी महाराज आगऱ्यास औरंग्याला भेटायला गेले तेव्हा सपुत्रिक कैदेत पडले. तेव्हा ते (राजपुतांच्या दीनवाणेपणामुळे) confused, (स्वत:वर) संतापलेले आणि (शंभूराजांच्या काळजीपायी) दु:खी होते. तरीपण मार्ग काढलाच ना ? ७. >> प्रत्यक्ष रामापेक्षा रामनाम श्रेष्ठ आहे ह्याचे दाखले खुद्द रामायणात आहेत . वाल्याचा वाल्मिकी झाला तो >> राम नामाच्या जोरावर . तेव्हा रामायण घडलं सुधा नवतं . राम प्रत्यक्षात अवतरीत सुधा नवता झाला . >> ह्या रामनामाच्या महतीमुळेच दशरथ पुत्राचं नाव राम ठेवण्यात आलं ही काही रामाची बदनामी करायची कारणे होऊ शकत नाहीत. असो. सीतेने रामाला जराही दोष दिलेला नाही. ही तुमच्यासामोरील समस्या आहे. खरंतर तिच्यावर नियतीने घोर अन्याय केला आहे. राम निदान काही प्रसंगी सैरभैर तरी झाला होता. सीता कधीतरी अशी झालेली दिसते काय? हरण झाल्यावर तिने प्राणांतिक धडपड केली ती वगळता ती पूर्ण आयुष्यात सदैव स्थिर राहिली आहे. तिच्यावर रामापेक्षाही भीषण प्रसंग ओढवले आहेत. तरीही ती जराही कचरली नाही. तीही रामाइतकीच (किंबहुना कांकणभर अधिकच) वंदनीय आहे. रावणाने रामलक्ष्मणांची शिरे प्रस्तुत केल्यावर ती खोटी मुंडकी आहेत हे धाडकन ठणकावून सांगणारी सीता तुम्हाला कधीच आकळणार नाही. हनुमानाच्या पाठीवर बसून परत जायला नकार देणारी सीता कमालीची धैर्यशीला आहे. ही धृती आणि शौर्य रामाच्या नावे कंठशोष करून अंगी बाणंत नसतं. रामाच्या नावे ठणाणा बोंबलतांना सीतेकडे लक्ष द्यायचं राहूनच गेलं नाही तुमचं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on गुरुवार, 07/16/2015 - 13:09

Permalink

सीतेने रामाला जराही दोष

सीतेने रामाला जराही दोष दिलेला नाही>>> कशी देणार ती ? पतिव्रतेचे वांझोट्या नियमांखाली दाबून गेली होती बिचारी . रामाच्या नावे ठणाणा बोंबलतांना सीतेकडे लक्ष द्यायचं राहूनच गेलं नाही तुमचं?>>> लैच झोंबलेलं दिसतंय . सीते कडेच लक्ष आहे हो माझं . पण तुम्ही नुसत्या सीतेकडे लक्ष न देता तिच्यावरच्या अन्यायाकडे लक्ष दिलं असतं तर तुम्हीही असेच बोम्बलला असता . पण तुम्ही नर ना . तुमच्या घरातल्या स्त्रियेने तुमचा त्याग केल्यावर तुम्ही कसे त्यांच्या नावाने ठणाणा बोंबलत नाही ते बघू
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on गुरुवार, 07/16/2015 - 13:10

Permalink

राम निदान काही प्रसंगी सैरभैर

राम निदान काही प्रसंगी सैरभैर तरी झाला होता>>> exactly . तो सैरभैरच राहिला . म्हणूनच चुका करत राहिला
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 07/16/2015 - 17:41

Permalink

तुमचे संदेश वाचले.

तुडतुडी, १. >> सीते कडेच लक्ष आहे हो माझं . आपल्या लेखनावरून तसं दिसंत तरी नाही. २. >> तो सैरभैरच राहिला . म्हणूनच चुका करत राहिला युक्तिवादापुरतं हे विधान खरं धरूया. तर मग सीतेने अशा सैरभैर माणसासोबत राहण्याऐवजी ऋषींच्या आश्रमात राहिलेलं काय वाईट? रामाच्या नावाने कंठशोष करायची गरजच काय मुळातून? ३. >> कशी देणार ती ? पतिव्रतेचे वांझोट्या नियमांखाली दाबून गेली होती बिचारी . कोणी लादलेत नियम तिच्यावर? ४. >> पण तुम्ही नुसत्या सीतेकडे लक्ष न देता तिच्यावरच्या अन्यायाकडे लक्ष दिलं असतं तर तुम्हीही असेच >> बोम्बलला असता . पण तुम्ही नर ना . हे तुम्ही बोललात ते बरं झालं. तुम्हाला नर-मादी अशी भांडणं लावून मजा बघत बसायची आहे. त्याकरिता राम सीता किंवा आजून कोणीही चालेल. तस्मात् तथास्तु ! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on गुरुवार, 07/16/2015 - 18:58

In reply to तुमचे संदेश वाचले. by गामा पैलवान

Permalink

..

नराच्या उलट्या बोंबा !
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Fri, 07/17/2015 - 14:41

Permalink

जावू द्या हो ग पै . तुम्ही

जावू द्या हो ग पै . तुम्ही कितीही ओरडून सांगितलं तरी सत्य बदलणार नाही त्यामुळे रामचं निरपराधीत्व सुधा सिद्ध होणार नाहीये आणि त्यामुळे माझ्या किवा माझ्यासारख्या अनेक लोकांच्या मनात राम मोठा होणार नाहीये . रामाच्या अन्यायाचे अनेक दाखले रामायणात आहेत. रामाने सीतेला जंगलात सोडणं , ज्या हनुमंताने रामासाठी सगळं जीवन वाहिलं त्याच्याशीच युद्ध करण , लव कुश रामाला जाब विचारायला येतात तेव्हा कशावरून सीतेची हि मुल रामापासून झाली आहेत असा हरामखोर प्रजेने आक्षेप घेवून सुधा रामचं गप्प बसणं आणि मग बिचारी सीता दुखातीरेकान जमिनीत गेल्यावर रामाचं आक्रोश करण्याचं नाटक करण . हा आता वर कोणी तरी म्हणल्याप्रमाणे राम आत्मा , सीता शरीर असा काही प्रकार असेल तरच ह्या वागण्याचं समर्थन होऊ शकतं
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 07/17/2015 - 22:24

Permalink

तुमचे आरोप कुठल्या रामायणात आहेत?

तुडतुडी, तुमच्या मनातला राम मोठा करण्यात मला फुटक्या कवडीइतकाही रस नाही. फक्त हे आरोप तुम्ही रामायणाच्या कुठल्या प्रतीत वाचलेत ते जाणून घ्यायचंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com