Skip to main content

रामप्पा

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 01/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नोकरीत सर्वात जास्त त्रास पगार वेळेवर न मिळण्याचा असतो असं म्हणतील काही लोक. मी म्हणेन एक वेळ ते चालेल , पण मालकाची बायको / मुलगा म्हणून ती/तो मालक बनून आपली नसलेली अक्कल पाजळून तुमच्या फील्ड मधल्या गोष्टी तुम्हाला सांगायला लागले, आणि तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर कंपनी ला त्यांच्यामुळे होत असलेलं नुकसान बघून हि काही करू शकत नाही हा असतो . माझं हि तेच होत होतं . एका नामांकित संस्थेत ट्रेनर आणि सेंटर मेनेजर म्हणून काम करत होतो, नशिबाने माझ्याबरोबरच तिथे लागलेला मार्केटिंग वाला हि प्रचंड उत्साही आणि डोकेबाज होता. आम्ही दोघांनी मिळून जवळपास कर्जबाजारी झालेली संस्था वर उचलली होती ५-६ महिन्यात. यात त्याचा रोल जबरदस्त होता, पूर्वी होत असलेल्या चुका शोधून त्याने त्या सुधारल्या होत्या, असलेल्या ट्रेनर लोकांना हि त्याने बरेच बदल सुचवले होते, जे खूप परिणामकारक होते. आणि दुसरं म्हणजे आम्ही दोघेही कधी ९-५ या वेळेत कधी अडकून पडलो नवतो, एका वयाचे होतो . त्यामुळे जोडी मस्त जमली होती . हे एवढं सगळं चांगलं चालू असताना एक दिवस मालक म्हणाले कि " यापुढे मी इथे रोज येउन बसायची गरज नाही , आठवड्यात एकदाच येईन . किंवा मध्ये कधी वेळ मिळाला तर येउन जाईन तसाच . तुम्ही दोघे सांभाळून घ्या. आणि कुठे सही वागेरा लागली तर मी माझ्या बायको ला राइट्स देऊन जातोय , म्हटलं ठीक आहे. पण त्यानंतर जे काही झालं ते फक्त आणि फक्त त्रासदायक होतं. या सगळ्याचा परिणाम ? दोघांनीही एकदम रिजाइन केलं. असो , नोकरी सोडून परत बेळगावात आलो होतो . पण बेळगावात गेल्यावर काय करायचं. नोकरी करावी स्वतःच धंदा सुरु करावा. याची काहीच निश्चिती नवती . नेहमीप्रमाणे आई अति टेन्शन मध्ये येउन ओरडत चिडत होती .पण बाबा मात्र शांत होते .हा माणूस प्रचंड चिडचिड करणारा आहे . अगदी छोट्या छोट्या कारणावरून लहानपणी मार खाल्लाय त्यांच्याकडून . पण अशी एखादी वेळ असली कि अगदी डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्या सारखं वागायचे . आत्ता हि तेच चाललं होतं . मी घरी आल्यावर१०-१२ दिवस माझ्या नोकरी बद्दल काहीच विषय नाही काढला त्यांनी . आईलाही सांगितलं . "उगाच त्रास करून घेऊ नकोस . लहान नाही तो . जे काही असेल ते त्याने त्याच्या बाजूने पूर्ण विचार करूनच केलं असेल . होईल नीट काही दिवस शांत राहा . " आणि या एवढ्या एका वाक्यावर आई सुद्धा शांत झाली होती . रोज १०-११ ला उठावं . दुपार पर्यंत कासवाच्या गतीनं सगळं आवरावं आणि मग कम्प्युटर वर गेम खेळत , सिनेमा बघत वेळ काढावा . असे दिवस जात होते . एक दिवस अचानक बाबा म्हणाले . उद्या माझ्या बरोबर कारखान्यात ये . मी काही बोलणार त्याआधी तेच बोलले . " तुला तिथे कामाला नाही लावणार काळजी करू नको . शारीरिक कष्ट घ्यायची लायकी नाही पिढीची . बोलायचं आहे मला तुझ्याशी . आणि घरी नाही बोलू शकत ." म्हटलं बरं येतो . दुसर्या दिवशी तिथे पोचलो . अर्धा पाऊण तास इकडे तिकडे गप्पा मारल्यावर बाबांनी १-२ जणांचे पत्ते आणि फोन नंबर दिले .म्हणे , या लोकांशी बोल, जाऊन भेट . स्वतःच कार्ड छापून घे . आणि त्यांना दे . त्यांना मुलं पाहिजे असतात कामाला . तू जा पण नोकरी करू नको . त्यांना लागेल तेव्हा मदत कर. आणि पैसे घे . किती आणि कसे ते तू ठरव . मी नाही सांगणार . हे लोक म्हणजे मोठ मोठ्या कंपन्या , गावातल्या बेंक आणि सहकारी संस्थाना संगणक पुरवणे . आणि त्या बरोबर येणारे सगळे मेंटेनन्स आणि इतर करार मिळवून काम करणे . एवढ्या सोप्प्या बिजनेस मध्ये होते .ओळखीचे असल्यामुळे मला काम पण लगेच मिळू लागलं . अश्या एका माणसाचा फोन आला एक संध्याकाळी . "मला १५ मिनिटात माझ्या घरी येउन भेट . तुला पैसे देतो . उद्या पहाटे ५ ची ट्रेन पकड आणि रायबाग ला जाउन ये . तिथे स्टेट बँक ची शाखा उघडतिए. तुला त्यांचं केबिन लेऔट मेल केलंय ते बघून नेटवर्क केबल सगळी टाकून ये . " म्हटलं ठीक आहे . दुसऱ्या दिवशी पोचलो तिथे . २-३ तासाचा प्रवास होता . साधारण ८ ला पोचलो . केबल टाकणे काम सोप्पं वाटतं पण एकट्याला खूप कंटाळवाणं काम आहे . त्याच गावातला कोणी माणूस मदतीला मिळतो का बघायचं ठरवून स्टेशन बाहेर पडलो . आणि एक साधारण पन्नाशीचा माणूस समोर आला . . "साहेब २० रुपये द्या . नाश्ता करायचा आहे " मी आजपर्यंत कुठल्या भिकाऱ्याला पैसे नाही दिले . त्यातल्या त्यात जर तो /ती शरीराने घट्ट असेल तर कधीच नाही . जवळ काही खाण्याचे पदार्थ असतील तर तेच देत आलोय .किंवा काही काम असेल ते करवून घेऊन मग पैसे दिलेत . त्या सवयी प्रमाणे त्याला म्हटलं चल मी देतो चहा पोहे . नाही म्हणाला . मला पैसेच पाहिजेत . डोक्यात एकदम ट्यूब पेटली . त्याला म्हणालो . माझ्या बरोबर चल आज . ४-५ तास काम आहे . तुला दिवसाचा पगार देतो .नाही म्हणून कन्नड मध्ये जोरजोरात ओरडत निघून गेला .आता दुसरा माणूस शोधणे आलं मदतीला . एक तर ते गाव नवीन होतं . त्यात मराठी बोलणारा कोणी भेटणे हि जवळपास अशक्य गोष्ट वाटत होती . आणि माझं अगम्य कन्नड ऐकून लोकांनी दगड मारायला सुरुवात केली असती . त्यापेक्षा एकटाच काम करू . वेळ लागुदे असा विचार करत समोरच्या हॉटेल मध्ये घुसलो . या छोट्या गावात प्रश्न खूप सोप्पे असतात . कुठल्याही हॉटेलात गेलं कि ढीग भर पदार्थ असलेले मेनू कार्ड कधीच नसतील . तिथे फक्त एकाच सोप्पा प्रश्न असतो . नाश्ता कि जेवण ? उत्तरानुसार तेव्हा तिथे जो पदार्थ गरम तयार असेल तो आणून दिला जातो . . त्यामुळे मी तिथल्या पोऱ्याला फक्त चहा आणि नाश्ता एवढीच ऑर्डर दिली . त्याने मस्त गरमागरम चहा आणि ४ पुऱ्या आणून समोर ठेवल्या . चहा पुरी किंवा चपाती बुडवून खायला मस्त मजा येते. तोंडात घास टाकणार तोच एक बाई त्या मागासाच्याच माणसाला ओढत माझ्या समोर घेऊन आली .पुढील संवाद सगळे कन्नड मध्ये झाले . . ती : सावकाररी इउंगे केलसा कोड्तीरा ? (सावकार, तुम्ही याला काम देणार ? ) मी : नि यार अम्मा? इवा यार निंदू? (तू कोण? हा कोण लागतो तुझा ? ) माझं कन्नड ऐकून ती हसली आणि मराठीत बोलू लागली सरळ . ती : हा माझा नवरा साहेब . दारू पिउन जातो कामाला म्हणून नोकरी गेली ह्याच. इलेक्ट्रिक च्या ऑफिस मध्ये होता .सगळं काम करतो साहेब . तुमची वायर हा टाकून देईल आरामात . मी : ठीक आहे . पण मधेच पळून गेला तर काय करायचं ? आणि काम नीट झालं नाही तर ? आणि आत्ता हि दारूचा वास येतोय . तिथे काही गोंधळ घातला तर ?? ती : हसली कसंनुसं. रात्रीची हाय ती. उतरेल थोड्यावेळात, तेवढं काय द्या साहेब, मी पण येतु थोड्या वेळात. त्यो नाही पळून जैत. मी बी येतु . बाकी कोणी काम देन्नाय तेला. आता या शेवटच्या वाक्यावर मी थोडा टरकलो. पण का माहित नाही. हा धोका घ्यावा वाटला . मी : ठीक आहे . किती द्यायचे ? यावेळी तो माणूस बोलला . "साहेब दिवसाचे ४-५ तास म्हणजे अर्धा दिवस , दोनशे होत्याल , तेवढे देवा, आणि काम आवडलं तर वर च्या पाणी देवा. एक बी केबल लटकणार नाही साह्येब. मस्त चकाचक करून देतो काम. पण माझ्याकडे काय सामान नाई. दारूसाठनं विक्लाव समदं . मी सगळं सामान घेऊनच आलो होतो . माझच सामान त्याला वापरायला देतो असं सागून नाश्ता दिला दोघांना आणि अजून अर्ध्या तासाने कामाच्या ठिकाणी यायला सांगितलं. थोडी भीती होती कि हा येणार नाही. पण पठ्ठ्या उगवला वेळेत. आणि नेहमीप्रमाणे केबलिंग ने आमचा अंदाज चुकवला . अक्खा दिवस गेला त्यातच . गडी अगदी कामाचा होता . दुपारी बँकेच्या पर्चेज वाल्याशी बोलताना समजलं कि फक्त दारूमुळे नोकरी गेले रामप्पा ची , नाही तरी एका फोन वर काहीही काम कमीतकमी पैश्यात करून देणारा माणूस आहे तो, फक्त तेवढी एक सवय वाईट आहे . संध्याकाळी निघताना त्याच्या हातात पाचशे रुपये टेकवले, त्याने लगेच खिशात टाकले . तिथेही त्याची बायको होतीच, साहेब २०० ठरल्यालं तेवढेच द्या. आता कसं सांगावं या बाइला . कि काम डबल झालंय. तरी जबरदस्तीने पैसे रामप्पाच्या खिशात कोंबले आणि त्याला सहज म्हणालो, ह्या बेंकेत इलेक्ट्रिशियन हवाय. तू दारू सोडलास तर तुझं नाव पुढे करतो. एवढं बोलून तिथून घेऊन गेलो. आणि पुढे इथे माझीही नोकरी सुरु झाली, विसरलोच होतो हि गोष्ट मी . सकाळी सकाळी एक फोन आला, "आदित सावकार, रामप्पा बोलतु " म्हटलं बोला, तर म्हणतो "बिजिनेस चालू केला साहेब परत , तुमच काय वायरिंग असेल तर सांगा सावकार. दारू सोडली पूर्ण. बायकू पण खूश हाय . देव माणूस तुमी बेकेंत सांगून गेला होतात . " बरं म्हणून फोन ठेवला . आणि तिथल्या पर्चेज वाल्याला फोन लावला , तिथे समजलं कि रामप्पा ने मी त्याला सहज म्हणलेलं वाक्य बँक मध्ये ऐकवून काम घेतलं होतं, मुळात मी त्याच्या नोकरी बद्दल काहीच बोललो नवतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4612
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

चांगला किस्सा आहे. कधीकधी आपण नकळतही एखाद्याला चांगल्या मार्गावर आणण्यास कसे कारणीभूत ठरू शकतो हे पाहून छान वाटलं.

:)

एखादी मोठी गोष्ट अगदी साधेपणाने सांगण्याची तुझी पद्धत खूप भावते..

In reply to by सूड

+२

In reply to by यसवायजी

+786

छान. नकळत कोणाचं तरी आपल्यामुळे भलं झालं ही जाणीव सुखावणारी असते.

छान !

पण बाबा मात्र शांत होते .हा माणूस प्रचंड चिडचिड करणारा आहे . अगदी छोट्या छोट्या कारणावरून लहानपणी मार खाल्लाय त्यांच्याकडून . पण अशी एखादी वेळ असली कि अगदी डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्या सारखं वागायचे. ---- माझे पण असेच आहेत.

व्व्वा ! क्या बात है ! मस्त जमली भट्टी ! साहित्य असंच जन्माला येतं.

In reply to by अद्द्या

तुझ्या किंवा सोन्याबापूंच्या कथांची खासियत ही आहे. कथा तुमच्याशी संबंधित असल्या, अनुभव तुमचे असले तरी कथानक निव्वळ 'मी' भोवती फिरत नाही. त्या रामप्पाचं आयुष्य 'माझ्यामुळे' कसं बदललं हे सहज प्रदर्शित करता आलं असतं आणि 'अय्याऽऽऽ कित्ती चाऽऽन!!' टाईप प्रतिक्रिया सहज मिळाल्या असत्या. पण तसं न केल्याबद्दल विशेष अभिनंदन. keep it up!!

नुसतं एक आयुष्य नाही तर एक संसार मार्गाला लावलात! जर कुनाला गरज असंल तर त्याच्या उपयोगी पडण्याची ताकद द्यव आम्हाला देवो.

केबल टाकतानाच (जीवन)"लाईन" टाकली त्याबद्दल विशेष अभिनंदन !!!! पुभाप्र.