Skip to main content

फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०.

शुक्रवार, 08/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
विशेष सूचना: हा लेख 'माझे बरोबर का तुझे बरोबर' ह्या वादासाठी नसून सगळ्या बाजूने विचार करून एखाद्या किंवा अनेक पर्यायांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न समजूया. नुकत्याच झालेल्या ह्या धाग्यावरच्या चर्चेत बरेच मुद्दे मांडले गेले. त्यात काही बाबतीत गोंधळ आहे असं वाटतंय म्हणून नवीन धागा काढतोय. हा सगळा खटाटोप पुन्हा करण्याचं कारण आजच्या ५-८ वयोगटातली मुलं असलेल्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून. आधीच्या धाग्यात चर्चिले गेलेले महत्त्वाचे दोन मुद्दे: १. इंग्रजी समर्थकांचे सगळे मुद्दे इंग्रजी ही व्यवहार-भाषा, संपर्कभाषा, ज्ञानभाषा आहे म्हणून तीच शालेय शिक्षणाचे माध्यम असली पाहिजे यावर बेतलेले आहेत. २. मातृभाषा समर्थकांचे सगळे मुद्दे प्रथम संपर्काची, थेट सामाजिक व्यवहाराची, आजूबाजूच्या वातावरणातली मुख्य भाषा म्हणून मातृभाषा ही प्राथमिक, माध्यमिक शालेय शिक्षणाचे माध्यम असावे यावर बेतलेले आहे. इथे खरा गोंधळ होत आहे म्हणून दोन्ही पक्ष परस्पर संबंध नसलेल्या दोन वेगवेगळ्या बाजूंनी वाद करत आहेत असं वाटतं. इंग्रजीचे जागतिक महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही. शालेय शिक्षणात इंग्रजी अजिबातच नसावी असं कुणीही म्हटलेलं नाहीये. उलट अव्वल दर्जाची इंग्रजी भाषा बोलायला लिहायला शिकवणारे अव्वल दर्जाचे शिक्षक प्रत्येक शाळेत असलेच पाहिजेत असं माझं मत आहे. मुद्दा जर फक्त इंग्रजीवरच्या प्रभुत्वाचा आहे तर ते प्रभुत्व मिळवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातल्या सगळ्याच विषयांवर इंग्रजीची सक्तीची गरज नाही. आज मेट्रोशहरे सोडली तर निम-शहरी व ग्रामीण भागात इंग्रजीची दहशतवजा भीती आहे. मुले आपल्याला इंग्रजी जमणारच नाही कारण ती हुशार, श्रीमंत लोकांची भाषा आहे म्हणून दडपून जातात. त्यांना शिकवणारे शिक्षकही यथातथा याच अवस्थेतून शिकलेले. अशा परिस्थितीत लेवल-प्लेईंग फिल्ड होत नाही याला माझा आक्षेप आहे. माझ्या मते सहजतेने शिकवली तर जगातली कुठलीच भाषा अवघड नाही. जगात इंग्रजी संपर्कभाषा असेल. पण भारतात हुशारी, श्रीमंती, सुशिक्षीतपणाचे, उच्चभ्रूपणाचे मानक म्हणून इंग्रजीकडे पाहिले जाते. मधुराताईंनी दिलेल्या जर्मन कंपनीच्या उदाहरणात आपल्या इंग्रजी येत नाही हे जर्मनांना कमीपणाचे निश्चितच वाटत नसेल. जे इथे कित्येक भारतीयांना कायम वाटत असते आणि इंग्रजी येणारे त्याची त्यांना जाणीव करून देत असतात. जर्मनांसाठी ते व्यवसायवृद्धीसाठी लागणार्‍या दहा वस्तूंपैकी एक असेल, तर भारतीयांना ते नसेल तर आपल्यात काहीच क्षमता नाही इतकं भयंकर वाटायला लावणारं असतं. इंग्रजीकडे पाहण्याचा हा जगाचा आणि भारतीयांचा मूलभूत फरक मी अनुभवलाय. देशोदेशी प्रत्यक्ष वावरणार्‍यांनी सुद्धा अनुभवला असेल. एक जुना विनोद ही परिस्थिती कशी विशद करतो बघा: संता आपल्या भावाकडे लंडनमधे काही दिवस राहून परत येतो. बंता त्याला विचारतो, क्या खास है बे उधर? तर संता म्हणतो, अबे पूछ मत, उधर तो छोटासा बच्चा भी फर्राटेसे अंग्रेजी बोलता है. हे इंग्रजीचं वेड आलं तरी कुठून..? माझ्या निरिक्षणात आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणूनच त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल असा भाबडा विश्वास बाळगणारे पालक आहेत, आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणून आपण पुढारलेले, उच्च्भ्रू आहोत असे मिरवणारे पालक आहेत. इंग्रजी शाळेत जाणार्‍या मुलांना व पालकांना तो मान/स्टेट्स्/प्रतिष्ठा हवी आहे. मातृभाषेचा आग्रह धरणार्‍यांवर बाण्याचे बिनबुडाचे आरोप करणारे इंग्रजी-वेड्या पालकांच्या वेगळ्याच प्रकारच्या बाण्याचा अवलंब करणार्‍या मानसिकतेकडे अगदी सोयिस्कर दुर्लक्ष करत आहेत. आजचे पालक शिक्षणाच्या (परम-आवश्यक अशा) दर्जापेक्षा फक्त (तुलनेने कमी महत्त्वाच्या) भाषा माध्यमावरच जोर देतायत. हे माझे निरिक्षण आहे. ते असं करण्यामागे मागच्या १५-२० वर्षात घडलेले आर्थिक-सामाजिक बदल आहेतच. इंग्रजी बोलणार्‍यांना चांगल्या संधी मिळतात हे त्यांनी बघितले म्हणून त्यांचा असा ग्रह झाला आहे की इंग्रजीतून शिक्षण घेतल्याने चांगल्या आर्थिक संधी मिळतात. प्रत्यक्षात त्या काळातल्या मोजक्याच असलेल्या इंग्रजी शाळांचा दर्जा इतर सरकारी व मराठी शाळांच्या मानाने फार चांगला होता. शक्यतो ह्या शाळा मिशनरीज संचालित व भरपूर फीया घेणार्‍या होत्या. त्यात शिकणारे श्रीमंत, उच्चपदस्थ यांची मुले होती. या वर्गात सुबत्तेमुळे आलेला एक आत्मविश्वास जन्मत:च असतो. वरच्या वर्तुळात असलेल्याने उत्तम संधींची जास्त माहितीही असते. त्यायोगे कुठले शिक्षण घ्यावे याचीही तयारी चांगली असते. त्यातून चांगले शिक्षक, चांगल्या शैक्षणिक दर्जाचा होणारा संस्कार. हे सर्व दिमतीस असलेली मुले यशस्वी होतांना पाहून सामान्य पालकांच्या महत्त्वाकांक्षेला मात्र एकच कारण दिसले ते हे की 'इंग्रजी शाळेत शिकले की यश मिळते'. कारण फक्त 'इंग्रजी माध्यमच' त्यांच्या आवाक्यात होते. याला थोडी फुंकर घालून इंग्रजी शाळावाल्यांनी आपले मार्केटींग केले. त्याला आजचे पालक आंधळेपणाने भुलतायत. याचं छोटेखानी उदाहरण मी अकरावी सायन्सला असतांना बघितलंय. माझ्या वर्गात महाराष्ट्रातून प्रथम आलेला मुलगा होता. अकोला जिल्ह्यातले सगळे मेरिटचे विद्यार्थी याच कॉलेजला असतात. माझ्या वर्गातली निम्मी जनता मेरीटवाली होती. ह्या मेरिटवाल्यांमधे बहुसंख्य मुलं कॉन्व्हेंटवाली होती. हे सगळं सांगण्याचं कारण वर्गात अ‍ॅवरेज मुलं अजिबात नव्हती. पण एक फरक होता. कॉन्वेंटवाल्या मुलांचा आत्मविश्वास, स्वत:ला प्रेझेंट करण्याची, छाप पाडण्याची हातोटी विलक्षण होती. सेमी-इंग्लीश, साध्या शाळेतून आलेली मुले त्यांच्या पुढ्यात दडपून जायची. आणि याचे कारण या मुलांना दुर्दैवाने त्यांचे फाडफाड इंग्लीश वाटत असे. आज ५ ते १० वयोगटातली मुले जेव्हा शिकल्यावर बाहेर पडतील तेव्हा आपल्यासारखीच योग्यता असलेली लाखो मुले बघतील. तेव्हा जी स्थिती १०-१५ वर्षाआधी लाखो मराठी मुलांची होती तीच या इंग्रजी शिकलेल्या मुलांची असेल. कारण हजारोंकडे जेव्हा एकसारखं स्किल असतं तेव्हा त्या स्किलला तेवढं आर्थिक महत्त्व राहत नाही. लक्षात घ्या हा सगळा काथ्याकूट मी आता पद्व्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलांबाबत घातलेला नाहिये. त्यांच्याबद्दल आता काही बोलून उपयोगच नाही. खरा प्रश्न येणार्‍या पिढीचा आहे. ती फाड फाड इंग्रजी बोलू शकणारी पण इतर काही स्किल्स नसलेली मुले मॉलच्या फरशाच पुसतील. रिक्षा चालवतील, धुणीभांडी करतील. तेव्हा हा भ्रमाचा भोपळा फुटेल. हेच होत आलंय. पन्नास-साठ वर्षांपुर्वी बी ए पास माणसाला हमखास नोकरी लागत असे. त्यानंतर इंजिनीअर-डॉक्टर्सचे प्रस्थ वाढले. त्यानंतर नुसत्या बी ए/बी एससी/बी कॉमचे पीक आले. पदवीचे अवमुल्यन झाले. आज इंजिनीअर-डॉक्टर्सचे अवमुल्यन झाले आहे. आज इतके इंजिनीअर झालेत की काही विशेष स्किल्स असल्याशिवाय तुमच्या नुसत्या इंजिनीअरींगला कुत्रं विचारत नाही. आज नुसतं एमबीबीएस करून पुर्वीच्या एमबीबीएस डॉक्टरांसारखे वैभव कमावता येत नाही. आयटीची सुद्धा वेगळी परिस्थिती आहे असं नाही. बी.एससी वैगेरे करून चपराशाची नोकरी करणारे मागच्या पिढीत बरेच पाहिलेत. सॅचुरेशन, गर्दी होण्याआधी जे हजर असतात तेच यशस्वी होतात. दुर्दैवाने सामान्य लोकांच्या डोक्यात हे कधीच शिरणार नाही. ते नेहमी दुसरे काय करून यशस्वी झाले त्याची कॉपी करण्याचा सोपा पण अयशस्वी मार्ग पत्करतात. आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ उद्या परत तेच चक्र पुन्हा फिरवतील. वरच्या जागांवर त्यांचीच मुले परत असतील. परत सामान्य लोक उच्चवर्गाने काय केले हे बघून आपल्या जे जमते तेवढ्याचे फॅड घेऊन धावत राहतील. काही लोकांनी म्हटलंय की ठीक आहे ना, फॅड असले म्हणून काय झाले. पैसा व सन्मान मिळतोय ना? पण खरंच किती लोकांना हा फायदा मिळतोय? आज भारतात सुशिक्षित तरुणांपैकी फक्त ३४% तरुण नोकरी करण्यायोग्य आहेत. नोकरी देणार्‍या कंपन्यांना या नोकरीयोग्य नसलेल्या मुलांवर प्रशिक्षणाचा प्रचंड खर्च करावा लागतो ज्याचा या मुलांच्या किमान ३ वर्षाच्या पगाराच्या आकड्यावर परिणाम होतो. कंपन्यांना आज किंवा उद्याही लागणार असलेले काही स्किल्स असे आहेत. १. विशिष्ट उद्योगक्षेत्रात लागणारे मूलभूत व्यावसायिक कौशल्य २. तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान. ३. संवाद कौशल्य ४. निवडलेल्या क्षेत्रासाठी उपजत कल आजची शिक्षणपद्धती फक्त नोकरदार तयार करणारी आहे. सांगितलेले काम सांगितलेल्या पद्धतीत करायचे. त्यात काही अडचण आल्यास मार्ग शोधण्यासाठी डोके चालवणार्‍यास प्रमोशन, भत्ते, बक्षीसं मिळतात. या शिक्षणाने व प्रवृत्तीने घातलेला दुसरा घोळ म्हणजे पारंपरिक रोजगार, व्यवसाय यात काही फायदा नाही असा चुकीचा केलेला प्रचार. कारण या व्यवसाय्/क्षेत्रांबद्दल प्रेम वाटावं असं या पद्धतीत काहीच नाही. किंवा हे शिकून पारंपारिक व्यवसायात पडायची मुलांना लाज वाटते. इतकं शिकून का गल्ल्यावर बसाचं का? किंवा इतकं शिकलो ते का नांगर हाकलायला का? असे वाक्य कानी पडू लागली. म्हणजेच दुकानदारी करणे, शेती करणे हे नोकरी करण्यापेक्षा हलक्या दर्जाची कामे आहेत हे बिंबवण्याचे भयंकर पाप या व्यवस्थेने केले. ज्यांना हे घोकंपट्टी शिक्षण जमतं ते फार हुशार आणि इतर लोक ढं असं काहीसं समिकरण मांडल्या गेलं. याचं कारण इंग्रज साहेब. तो आपला कायम कचेरीत बसून हुकूम चालवणार. त्याला कुणी कधी नांगर धरलेला पाहिला नाही का गल्ल्यावर बसलेला पाहिला नाही. मग त्यालाच आपला रोल मॉडेल बनवायला सामान्य लोकांनी सुरुवात केली. ती आजतागायत सुरू आहे. माझा विरोध आहे तो आपल्या समाजाबद्दल, राहणीमानाबद्दल, उद्योगधंद्यांबद्दल अलिप्तता निर्माण केल्यामुळे झालेल्या नुकसानाला आहे. आज आपण मुलांना मिळणार्‍या पॅकेजच्या बातम्या पहिल्या पानावर पाहतो. त्या मुलाला वर्षभर कष्ट करून जेवढे लाख मिळतील तेवढे लाख त्याच्यापेक्षा एक चतुर्थांश काम करून मिळवणारे हजारो शेतकरी आज महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या बातम्या येत नाहीत. येतात त्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या. कारण बातम्या देणारेही याच व्यवस्थेतून शिकलेत. यशस्वी शेतकर्‍यांच्या बातम्या तुम्हाला फक्त अ‍ॅग्रोवन मध्येच दिसतील. माझ्या ओळखीत एक गृहस्थ आहेत. गुलाबाच्या फुलांची शेती करतात, वर्षाचे ३५६ दिवस. रोजचे उत्पन्न एक लाख रुपये. निव्वळ. आणि असे बरेच आहेत. येणार्‍या काळात असेच वेगवेगळे व्यवसाय करणार्‍यांचीच चलती असेल. त्याची चाहूल आजच लागते आहे. आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ त्यासाठी मुलांना तयार करतायत. आणि आजचा सामान्य पालक ओसरुन जाणार्‍या लाटेसाठी मुलांना तयार करतोय. आजपासून १५ वर्षांनी आपल्या मुलांसाठी काय वाढून ठेवलेलं असेल? त्याला तेव्हा तोंड देण्याची तयारी करण्याचा वेळ व यशस्वी होण्याची मानसिकता त्याच्याकडे असेल काय? जसं आज काही लोक इंग्रजीशी कसे झगडावे लागले, त्यात कसा वेळ गेला असं सांगतायत, तेव्हा असं वेळ घालवणारं काही असेल काय? किंवा भविष्यातल्या कोणत्याही परिस्थितीत मुलांना तोंड देता यावे म्हणून काही विशेष तयारी आजपासूनच करता येईल काय याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. की फक्त इंग्रजी आलं की झालं म्हणून ते यशस्वी होतील काय? याचा सगळा विचार आताच करणे आवश्यक आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाऐवजी शालेय शिक्षणाच्या दर्जाला महत्त्व दिले तर बरे होईल. त्यातून ते मातृभाषेत असेल तर जास्तीत जास्त मुले मुख्य प्रवाहात येऊन कसल्याही न्यूनगंडाशिवाय स्वत:च्या, देशाच्या प्रगतीत हातभार लावतील. मधुराताईंचे मत इथे पुनश्च उदधृत करू इच्छितो: शिक्षणात भाषेशिवाय इतर अनेक बाबीही महत्वाच्या आहेत. इंग्रजीतुन शिक्षण असो अथवा मराठीतुन, शिक्षक, विद्यार्थ्याची वृत्ती, घरातले वातावरण, बुद्ध्यांक, अभ्यास करण्याची तयारी, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती हे इतर मुद्देही तेवढेच महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांना बोली भाषेतुन शिकवले तर ते विशेष लक्ष देऊन शिकतील, सगळे सोपे वाटेल असे काहीही नाही आणि एखाद्याला खरेच इंग्रजीतुन झेपत नसेल तर त्याला जबरदस्ती ते करायला लावणे हेही योग्य नाही. माझेही अगदी हेच म्हणणे आहे. फक्त ज्या विद्यार्थ्याला बोलीभाषेतून समजणार नाही त्याला इंग्रजीतून तर समजण्याचा प्रश्नच येत नाही असे वाटतं. आपले सरकारी शैक्षणिक धोरण बदलेल न बदलेल पण आज ज्यांना पाच ते आठ वर्ष वयाची मुलं आहेत त्या पालकांनी तरी याचा थोडा गंभीरपणे विचार करावा व जाणकारांनी आपली मतं अवश्य द्यावी. माझी निरिक्षणे, निष्कर्ष व अनुमान कुठेही चुकत असतील तर अवश्य सांगा.

वाचने 17997
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

गुलाबाचीशेती . रोज एक लाख !

या विषयावरचं तुमचं सखोल निरिक्षणाअंती केलेलं अभ्यासपूर्ण लेखन भावलं. हा लेख वाचून लहानपणापासूनचे अनेक मित्र डोळ्यासमोर आले जे इंग्रजीच्या दडपणामुळे फारशी प्रगती करू शकले नाही. अमेरिकेतली प्राथमिक अन माध्यमिक शिक्षणपद्धती पाहिल्यावर आपल्या शिक्षणपद्धतीतल्या मर्यादा ठळकपणे जाणवतात. अमेरिकेत लहानपणापासून मुलांना अभ्यासात शिकलेल्या गोष्टींवर आधारीत प्रकल्प करावे लागतात. उलट प्रश्न विचारायचे नाही ही संकल्पना तर त्यांच्या गावीही नसते. या समस्येवर आजवर कधी फारसा गांभीर्याने विचारच केला नाही. या चर्चाविषयावरील अभ्यासपूर्ण प्रतिसादांची वाट बघतो.

आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवावं की नाही हा वैयक्तिक पर्याय झाला. मात्र ज्याला आजच्या काळाशी सुसंगत राहायचं आहे, भौतिक यश मिळवायचं आहे त्याच्यासाठी इंग्रजी भाषा शिकणे अत्यावश्यक आहे. तसेच मातृभाषेतून शिकणे हा प्राथमिक (पहिली ते चौथी) किंवा फार फार तर माध्यमिक (पाचवी ते दहावी) शिक्षणापर्यंतचा पर्याय होऊ शकतो. उच्च माध्यमिक शिक्षणापासूनच्या पुढच्या शिक्षणाची भाषा इंग्रजीच असायला हवी. कारण कुणी काहीही म्हटलं तरी आज आपल्याकडे उच्चशिक्षण शाखांना जे शिकवले जाते ते बरेचसे ज्ञान पाश्चिमात्यांनी मिळवलेले असते. त्यामुळे त्यांच्या भाषेतले ज्ञान आपल्या भाषेत भाषांतरीत करुन शिकण्याचा दुरचा मार्ग घेण्यापेक्षा त्यांची भाषा आपल्याला अवगत असल्यामुळे त्याच भाषेत शिकणे केव्हाही उत्तम. आणि हे सरकारने अंमलातही आणले आहे. पहिलीपासून मराठी किंवा इतर एतद्देशीय माध्यमांच्या शाळांमधून इंग्रजी भाषा शिकवणे तसेच पाचवीपासून सेमी इंग्लिश अर्थात गणित आणि विज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकण्याचा पर्याय देणे हे सध्या चालूही आहे. त्यामुळे एकाच वेळी मुलांची मातृभाषेशी असलेली नाळही तुटत नाही आणि त्याच वेळी ती जगाची ज्ञानभाषा असलेल्या इंग्रजी भाषेचं बोट धरुन अडखळत का होईना, चालू लागतात.
माझ्या निरिक्षणात आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणूनच त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल असा भाबडा विश्वास बाळगणारे पालक आहेत, आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणून आपण पुढारलेले, उच्च्भ्रू आहोत असे मिरवणारे पालक आहेत. इंग्रजी शाळेत जाणार्‍या मुलांना व पालकांना तो मान/स्टेट्स्/प्रतिष्ठा हवी आहे. मातृभाषेचा आग्रह धरणार्‍यांवर बाण्याचे बिनबुडाचे आरोप करणारे इंग्रजी-वेड्या पालकांच्या वेगळ्याच प्रकारच्या बाण्याचा अवलंब करणार्‍या मानसिकतेकडे अगदी सोयिस्कर दुर्लक्ष करत आहेत.
या मुद्द्याशी अंशतः सहमत. मात्र या बाबतीत सरसकटीकरण करता येणार नाही. तुम्ही म्हणत आहात तसे केवळ " आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणूनच त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल असा भाबडा विश्वास बाळगणारे पालक" समाजात जरुर आहेत. हा समाजातील श्रमजीवी वर्ग आहे. मी अगदी रोजंदारीवर काम करणारे वडील आणि इतरांच्या घरची धुणी-भांडी करणारी आई यांनी आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घातलेले पाहिले आहे. त्यांच्या बाबतीत हा खरोखरच भाबडा आशावाद आहे. कारण नावात फक्त "इंग्लिश मिडीयम स्कुल" असले म्हणजे उच्च दर्जाचे शिक्षण मिळत नसते हे कटू सत्य त्यांच्या गावीच नाही. त्याचबरोबर "आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणून आपण पुढारलेले, उच्च्भ्रू आहोत असे मिरवणारे पालक आहेत. इंग्रजी शाळेत जाणार्‍या मुलांना व पालकांना तो मान/स्टेट्स्/प्रतिष्ठा हवी आहे" असाही पालकवर्ग समाजात आहे. हा बहुतांशी बुद्धिजिवी वर्ग आहे. "माय सन गोज टू एक्सवायझेड इंटरनॅशनल स्कुल" असे ऑफीसच्या खालच्या टपरीवर चहाचा घोट घेत, सिगारेटचा झुरका मारत बोलताना अशा वडिलांची छाती फुगते. अशा पालकांनाही फक्त त्या "स्टेटस"शी मतलब असतो. मात्र या दोन बाजूंबरोबरच सारासार विचार करुन आपल्या पाल्याला "इंटरनॅशनल स्कुल" नसलेल्या मात्र उच्च दर्जाचे शिक्षण देणार्‍या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालणारे पालकही आहेतच.

In reply to by सतिश गावडे

दर्जेदार टीका-मीमांसा वाचायला मिळाली. सगा धन्यवाद
तसेच मातृभाषेतून शिकणे हा प्राथमिक (पहिली ते चौथी) किंवा फार फार तर माध्यमिक (पाचवी ते दहावी) शिक्षणापर्यंतचा पर्याय होऊ शकतो. उच्च माध्यमिक शिक्षणापासूनच्या पुढच्या शिक्षणाची भाषा इंग्रजीच असायला हवी. कारण कुणी काहीही म्हटलं तरी आज आपल्याकडे उच्चशिक्षण शाखांना जे शिकवले जाते ते बरेचसे ज्ञान पाश्चिमात्यांनी मिळवलेले असते. त्यामुळे त्यांच्या भाषेतले ज्ञान आपल्या भाषेत भाषांतरीत करुन शिकण्याचा दुरचा मार्ग घेण्यापेक्षा त्यांची भाषा आपल्याला अवगत असल्यामुळे त्याच भाषेत शिकणे केव्हाही उत्तम.
इथे इंग्रजीच कशी अनिवार्य आहे आणि त्या शिवाय तुम्ही जगूच शकणार नाहीत किंवा तुमचे अस्तीत्व कवडीमोल आहे अश्या (आणि अश्याच) आशयाचा प्रतिवाद करणार्या सर्व पालकांना एकच प्रश्न आपली मुले किमान (१०-१२ वर्षांची होईपर्यंत तरी) घरी-दारी जर मराठी बोलत्-ऐकत असतील तर त्यांची बहुपेडी वाचनाची भूक कशी भागवावी, त्यासाठी पालकांचे इंग्रजी त्याच तोडीचे+क्षमतेचे असावे. नसेल तर त्यांनी काय करावे ? व्यावसायीक आणी व्यावहारिक जगात इंग्रजी अनिवार्य आहेच (म्हणूनच स्पोकेन इंग्लीश्चे क्लास असतात स्पोकन हिंदी-तामीळ्-तेलगूचे नसतात.) पण ते अगदी पहिलीपासून सगळीकडे इंग्रजी अनिवार्य केल्यास पास झालेली प्रत्येक मूल दहावीनंतर "फाड्-फाड इंग्रजीवाला आणी यशस्वी" असेलच असे नाही. २५-३० वर्षांत तर मराठीतही स्वागतार्ह बदल झाले आहेत. बरीच पुस्तके-भाषांतरे येत आहेत.(काही शाळांमध्ये सेमी-इंग्रजी प्रकारही आहेच) इंग्रजी जगमान्य भाषा आहेच पण त्याकरीता मराठी भाषा कशी संकुचीत्+मागसलेली+बुरसटलेली आहे असे दाखवण्याचा अनाठायी आणी केवीलवाणा अट्टाहास असू नये इतकेच.(जो मला डांगे साहेबांच्या धाग्यावर प्रतीवाद करताना काही प्रतीसादात दिसला) म्हणून हा लेखन प्रपंच. चूभूदेघे

In reply to by नाखु

"आपली मुले किमान (१०-१२ वर्षांची होईपर्यंत तरी) घरी-दारी जर मराठी बोलत्-ऐकत असतील तर त्यांची बहुपेडी वाचनाची भूक कशी भागवावी, त्यासाठी पालकांचे इंग्रजी त्याच तोडीचे+क्षमतेचे असावे. नसेल तर त्यांनी काय करावे ?" काय बोललायत पण!! वा!! अगदी माझ्या लहानपणीच्या मित्राची आठवण झाली!! तो कॉन्वेंटला जायचा. बिचारा सतत काहीतरी वाचायला मागायचा आणि काहीच मिळायचं नाही.

आपली मुले किमान (१०-१२ वर्षांची होईपर्यंत तरी) घरी-दारी जर मराठी बोलत्-ऐकत असतील तर त्यांची बहुपेडी वाचनाची भूक कशी भागवावी, त्यासाठी पालकांचे इंग्रजी त्याच तोडीचे+क्षमतेचे असावे. नसेल तर त्यांनी काय करावे ?
दुर्दैवाने या प्रश्नाला उत्तर नाही. मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकलेल्या मात्र स्वतःला इंग्रजीचा तितकासा गंध नसलेल्या पालकांना मुलीच्या "प्रोजेक्ट" मध्ये दहा वाक्ये इंग्रजीत लिहिण्यासाठी मदत शोधताना मी पाहिले आहे.
व्यावसायीक आणी व्यावहारिक जगात इंग्रजी अनिवार्य आहेच (म्हणूनच स्पोकेन इंग्लीश्चे क्लास असतात स्पोकन हिंदी-तामीळ्-तेलगूचे नसतात.) पण ते अगदी पहिलीपासून सगळीकडे इंग्रजी अनिवार्य केल्यास पास झालेली प्रत्येक मूल दहावीनंतर "फाड्-फाड इंग्रजीवाला आणी यशस्वी" असेलच असे नाही.
अर्थातच नाही. मात्र काहीच नसण्यापेक्षा काहितरी असणे केव्हाही चांगले. पहिली ते चौथी कोकणातील एका छोटया गावी मराठी माध्यमात शिकलेला माझा भाचा गेल्या वर्षी पाचवीला सेमी इंग्रजी माध्यमात शिकत होता. तो माझ्याशी कधीतरी त्याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला जाणवते की केवळ विज्ञान आणि गणित इंग्रजीतून शिकण्याने तो हे विषय मराठीत शिकणार्‍या मुलांपेक्षा नक्कीच काहीतरी अधिक शिकला आहे.
२५-३० वर्षांत तर मराठीतही स्वागतार्ह बदल झाले आहेत. बरीच पुस्तके-भाषांतरे येत आहेत.
काही सन्माननिय अपवाद वगळता इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे अतिशय टुकार दर्जाची असतात. काही वेळा आपण मराठीच वाचतोय ना असा प्रश्न पडण्याईतपत बोजड भाषा असते. त्यामुळे भाषांतरे वाचणे हे दुधाची तहान ताकावर भागवणे असा प्रकार झाला
काही शाळांमध्ये सेमी-इंग्रजी प्रकारही आहेच
हा अतिशय सुंदर असा पर्याय आहे. यात मुलांचं मातृभाषेशी नातं कायम राहते त्याचबरोबर जे विषय उच्चशिक्षणात इंग्रजीतूनच शिकायचे आहेत ते शालेय वयातच इंग्रजीत शिकायला मिळतात. मला अजूनही आठवते, मी दहावी पर्यंत मराठी माध्यमातून शिकल्यानंतर अकरावीला जेव्हा विज्ञान शाखेला गेलो तेव्हा पहिले तीन चार महिने वर्गात काय शिकवलं जातंय हे कळायचंच नाही. काही मास्तरांनी यावर नामी शक्कल शोधली होती. ते आधी इंग्रजी बोलायचे आणि मग त्याचे मराठी भाषांतर करायचे. :)
इंग्रजी जगमान्य भाषा आहेच पण त्याकरीता मराठी भाषा कशी संकुचीत्+मागसलेली+बुरसटलेली आहे असे दाखवण्याचा अनाठायी आणी केवीलवाणा अट्टाहास असू नये इतकेच.
सहमत. इंग्रजी ही आज जरी जगाची ज्ञानभाषा असली तरी इतर भाषा तिच्यापुढे दुय्यम ठरत नाही. भाषा हे संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे आहे. आयुष्यातील पहिली काही वर्ष प्रत्येकजण मातृभाषेतच संवाद साधतो.

डांगे साहेब संपूर्ण सहमत. पण जरा डेरीवेटीव आणि इक्विटी स्वॉपस मराठीत समजावून सांगा ना. ;-) अवांतर- मराठी उच्चविद्याविभूषितांना प्रगतीची एवढी भुरळ पडली आहे का, की आपण जे जे शिकलो ते मातृभाषेतून इतरांना सांगण्याएवढाही वेळ त्यांना मिळत नाहिये? समजा आज वेळ खरंच नसेल पण इच्छा तरी आहे का? का सगळ्यांनाच कळेल अशा भाषेतनं सांगित्ल्यावर आपलं दुकान बंद पडेल अशी भिती वाटते? मातृभाषेत सोयी नाहीत, तर आपल्याला हातपाय हलवण्यापासून कुणी अडविले आहे का? आपण ज्या विषयात काहीतरी ज्ञान मिळवलेत, ते मराठीत घेऊन या ना...? शक्य आहे ते... मिसळपावचेच बघा ना... अनेक दिग्गजांनी इथे केवढीतरी माहिती मराठीत उपलब्ध करून दिली आहे जे कालपर्यंत फक्त इंग्रजीतच होतं. अडचणी काय आम्हाला माहित नाहित का? त्या अडचणी तुम्हालाही आल्या असतील तर त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तुमच्या मागून येणार्‍यांसाठी रस्ता सोपा व्हावा म्हणून तुम्ही काय प्रयत्न केले? अजून केले नसतील, पण आता करायची इच्छा असेल तर काय काय प्रयत्न करता येतील? नुसत्या अडचणी सांगू नका, उपाय सांगा त्या अडचणींवरचे. जर तुम्ही उपाय नसताल तर तुम्हीच अडचण आहात, अशा अर्थाचं एक इंग्रजी वाक्य आहे बघा.... उसासे सोडू नका हो. काहीतरी मदत करता येत असेल तर करा. मुलांना अवश्य इंग्रजी माध्यमात घाला, पण तरीही जे शिकलात ते मराठीत आणा. नक्कीच कुणालातरी उपयोग होइल.

In reply to by असंका

मराठी उच्चविद्याविभूषितांना प्रगतीची एवढी भुरळ पडली आहे का, की आपण जे जे शिकलो ते मातृभाषेतून इतरांना सांगण्याएवढाही वेळ त्यांना मिळत नाहिये? समजा आज वेळ खरंच नसेल पण इच्छा तरी आहे का? का सगळ्यांनाच कळेल अशा भाषेतनं सांगित्ल्यावर आपलं दुकान बंद पडेल अशी भिती वाटते?
मी मराठीपण आहे आणि उच्चविद्याविभूषितही आहे. त्यामुळे हे वाक्य माझ्यासाठी लागू आहे म्हणून लिहित आहे. मला जे काही माहित आहे त्यापैकी शक्य तेवढे मी पण मिपावर मराठीतच (अनेक वेळा इंग्रजी जार्गनचा वापर करून का होईना) लिहिले आहे. तरीही यामागचा उद्देश भाषेपेक्षाही मला जी गोष्ट अत्यंत आवडली, मला जी गोष्ट शिकून प्रचंड आनंद मिळाला तो आनंद इतरांबरोबर शक्य होईल तितका शेअर करावा एवढाच त्यामागचा उद्देश होता. यापुढेही जे काही लिहेन त्यामागचा उद्देश एवढाच असेल. मिपा हे मराठीतले संकेतस्थळ असल्यामुळे अर्थातच मराठीतून लिहिणे आले. शक्य होईल तितक्या प्रमाणावर मी हाच प्रयत्न नेमक्या त्याच उद्देशाने फेसबुकवरच्या विविध ग्रुपमध्येही इंग्रजीमध्ये केला आहे. तेव्हा माझ्यासाठी तरी मला जी गोष्ट प्रचंड आवडली त्यातला आनंद इतरांबरोबर शेअर करणे हे अधिक महत्वाचे-- कोणत्या भाषेत करतो ही माझ्यासाठी दुय्यम गोष्ट आहे.मला तामिळ भाषा अजिबात येत नाही.पण समजा तामिळ भाषा येत असती तर एखाद्या वडासांबार.कॉमवर जाऊनही मी जे मिपावर लिहिले तेच तिकडे तामिळ भाषेत लिहूनही मला तितकेच समाधान मिळाले असते. शेवटी भाषा हे संवादाचे, आपले विचार प्रकट करायचे माध्यम आहे.भाषेला त्यापेक्षा जास्त महत्व द्यायला मला तरी आवडत नाही.मराठी भाषा मी अगदी जन्मापासून ऐकत आलो असल्यामुळे मला ती भाषा आपली वाटते पण मुळातला विचार मला अधिक महत्वाचा वाटतो. आणि यावर डांगे साहेब विचारायच्या आतच लिहितो की भविष्यात सगळे इंग्रजीतूनच शिकायचे असेल तर सुरवातीपासूनच इंग्रजीत शिकलेले कधीही चांगले हे माझे मत कायम आहे--- कारण आपली किंवा परकी भाषा हा प्रश्नच माझ्यापुढे उभा राहत नाही. इथे प्रश्न सोयीचा आणि व्यवहार्य काय आहे याचा आहे. आणि खरे सांगायचे तर इंग्रजी भाषाही मला परकी वाटतही नाही. कुणास ठाऊक इंग्रजीबरोबरच भारतात जर्मनचेही महत्व असते तर जर्मन भाषाही परकी वाटली नसती. असो.

मला वाटते की कुठच्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक पॅकेज असावे लागते. त्या पॅकेजमधला खूप महत्वाचा भाग असतो सॉफ्ट स्किल्स-- यात अ‍ॅटिट्यूड, महत्वाकांक्षा, आत्मविश्वास, चिकाटी, सकारात्मक विचार, कितीही आव्हाने आली तरी त्याला सामोरे जायची वृत्ती, कष्ट इत्यादी अनेकांचा समावेश असतो. आणि हार्ड स्किल्समध्ये एखाद्या क्षेत्रातले सखोल ज्ञान किंवा ज्यामध्ये पुढे जाता येईल किंवा स्वतःचा व्यवसाय करता येईल किंवा नोकरीत उच्चपदावर पोहोचता येईल अशा आणि मुख्य म्हणजे ज्या क्षेत्राला मागणी आहे त्या क्षेत्रात ज्ञान असणे यांचा समावेश आहे. यापैकी काही सॉफ्ट स्किल्स शाळेत तर बरेचसे घरी शिकविले जातात. तर हार्ड स्किलमधले बरेचसे शिक्षणसंस्थेत शिकविले जातात. शाळेत या हार्ड स्किलचा पाया रचला जातो. सॉफ्ट स्किल हे पूर्णपणे शिकविले जाऊ शकत नाही हे मान्य.पण तरीही शिक्षकांचे अनुसरण करून किंवा नुसते निरिक्षण करूनही हे स्वतःचे स्वतःला शिकता येतात.हे शिकविण्यासाठी भाषा या माध्यमाची मर्यादा नाहीच. मराठी शाळेत किंवा अगदी स्वाहिली माध्यमाच्या शाळेतही हे शिकविता येऊ शकते/ शिकायला व्यासपीठ उपलब्ध करून देता येऊ शकते. मुद्दा आहे हार्ड स्किलचा. असे काही पेशे आहेत ज्यात इंग्रजीची फारशी गरज पडत नाही. उदाहरणार्थ आयुर्वेदिक डॉक्टरसाठी इंग्रजीपेक्षा संस्कृत येणे अधिक महत्वाचे आहे. माझ्या नातेवाईकांचा सांगलीत मंगल कार्यालय आणि केटरींगचा व्यवसाय आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या डायरेक्टरच्या तोंडात मारेल इतकी कमाई या व्यवसायात असलेले लोक करू शकतात.या व्यवसायात इंग्रजीची गरज नाही. तसेच दुधाच्या व्यवसायातही बरेच लोक असतात. त्यांनाही इंग्रजी नाही आले तरी फारसे बिघडत नाही.बिल्डरच्या व्यवसायाविषयीही असेच म्हणता येईल. असे अनेक व्यवसाय आहेत. पण एक गोष्ट लक्षात येईलच की इंग्रजी अजिबात आले नाही तरी चालेले अशा पेशांमध्ये स्वतःच्या व्यवसायांचा जास्त समावेश होतो.किती प्रकारच्या नोकर्‍यांमध्ये इंग्रजी आले नाही तरी चालून जाईल? कदाचित सरकारी नोकरीत चालून जाईल (पण अशा सरकारी नोकरीतही प्रवेश परिक्षा इंग्रजीतच असतात :) ). इतर नोकर्‍यांविषयी असे म्हणता येईल का? आणि स्वतःच्या व्यवसायातही असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात इंग्रजीला पर्याय नाही--उदाहरणार्थ आयुर्वेदिक सोडून इतर डॉक्टर, वकिल इत्यादी. तेव्हा माझा मुद्दा आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायला लागणारे गुण अंगात नाहीत त्यांच्याविषयी. दुसर्‍या चर्चेत म्हटल्याप्रमाणे कॉलेजात गेल्यावर इंग्रजीतूनच शिकायचे आहे. ज्यांना झेपते ते मराठी ते इंग्रजी ही उडी मारू शकतीलच. पण प्रश्न ज्यांना झेपत नाही त्यांचा आहे. मिपावरील अनेकांप्रमाणे मलाही मराठी (किंबहुना सेमी-इंग्रजी) शाळेत असल्याचा मला त्रास झाला नाही.पण तरीही इंग्रजीवर बर्‍यापैकी पकड मिळवायला मला इंजिनिअरींगचे दुसरे वर्ष उजाडले होते.आणि शाळेत असताना मी कायमच आघाडीचा विद्यार्थी होतो तरीही शाळेनंतर जवळपास चार वर्षे मला इंग्रजीवर मनासारखी पकड यायला लागली.ज्यांना हे झेपत नाही त्यांच्यासाठी एकतर कॉलेजात गेल्यावर आणखी क्लिष्ट संकल्पनाही शिकायच्या आणि भाषेशीही झगडायचे हे दुहेरी संकट असेल. त्यांचे काय? आणि मुख्य म्हणजे २०३० मध्ये केवळ इंग्रजीने भागेल का या अर्थाचे या लेखाचे शीर्षकच मला फारसे पटलेले नाही. मला वाटते त्या पॅकेजमधली एकच गोष्ट बाजूला घेऊन विचारले की तेवढे भविष्यात पुरेसे पडेल का तर तो प्रश्न बर्‍यापैकी अर्थहिन ठरेल. म्हणजे समजा सकारात्मक दृष्टीकोन हा त्या पॅकेजचा एक भाग आहे तर केवळ सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन भागेल का असा प्रश्न विचारणे कितपत सयुत्किक आहे? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. पण म्हणून सकारात्मक दृष्टीकोनाचे महत्व कोणी नाकारू शकणारच नाही. तीच गोष्ट इंग्रजीविषयी (इंग्रजीची गरज नाही अशा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय करू न शकणार्‍यांविषयी).

इंग्रजी / मराठी माध्यमातुन शिकणे आणि स्कील डेव्हलप्मेंट याचा काही संबंध आहे असे वाटत नाही. शिक्षणपध्दतीबद्दलची मते पटली

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

इंग्रजी / मराठी माध्यमातुन शिकणे आणि स्कील डेव्हलप्मेंट याचा काही संबंध आहे असे वाटत नाही.
तसा संबंध तर शिक्षणाचे माध्यम वेगळे केल्यानंतर उरणारे शिक्षण आणि विकसित होणारी कौशल्ये यातही नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे याचे उत्तम उदाहरण. अक्षरशः कुठल्याही विद्याशाखेची पदवी, तार्किक विचार करण्याची क्षमता यांच्या जोरावर माणूस या क्षेत्रातील कौशल्ये मेहनत घेऊन विकसित करु शकतो.

शेतकरी आत्महत्या करतात त्या प्रमाणात इंग्रजीत शिक्षण घेणारे आत्महत्या करत नाहीत. काही इंग्रजी शाळांचा दर्जा सुमार आहे म्हणून मातृभाषेत शिक्षण घ्यायला जावे तर त्या शाळांचा दर्जा तरी सुधरतो आहे काय. प्रश्न शिक्षणाच्या दर्जाचा असेल तर इंग्रजी शाळांचा दर्जा का सुधारू नये? मातृभाषेत शिक्षण घेऊनच भवितव्य उज्ज्वल होईल याची काय गॅरंटी? त्यापेक्षा इंग्रजी माध्यम इन्शुरन्स म्हणून वापरणे हे पालकांना चांगले वाटले तर त्यात चूक काय?

नोट :मागील धाग्यातील रिप्लाय वाचलेले नाहीत. तरी रिप्लाय त्या अनुषंगाने पण देतो आहे ------------- थोडे या विषयाला अनुसरुन पण वेगळे बोलतो (कारण विषयानुरुप तुम्हीच सगळे मुद्दे व्यापलेले (कव्हर केले म्हणणार होतो [:)] ) आहेत, त्यामुळे थोडे असेच लिहितो... पहिला मुद्दा थोडा मोठा होईल पण समजुन घेणे जे वाटत आहे ते एकदा लिहितोच.. म्हणजे माझ्याच विचारांना उद्या वाचताना काय करावे हे कळेल असे वाटते.. आणि मुद्दे पटले नसले तरी माझ्या मनात जे आहे ते सरळ देतो असेच वाटते मला... १. इंग्रजी ... मराठी ह्या भाषा आहेत..आपण आपल्या पाल्याला त्यांचे आकलन कसे करुन देवु हे महत्वाचे. मी तरी मध्यम दुवा कसा साधणार आहे हे पाहणार आहे --------- आता पाल्यांचा विचार केला की काय करु असा संभ्रम वाटत आहे... मी चांगली मराठी मेडियम शाळा शोधत होतो घराजवळ .. मिळाली नाही... थोडीशी लांब फक्त ज्ञानप्रबोधीनी. निगडी. माझे मन आहे या शाळेत माझ्या मुलीला घालायचे.. १० किमी अंतर असेल कदाचीत येव्हडे ते अक्सेप्ट करणार नाही असे वाटते. या बाबतीत दुसरा मुद्दा असा की माझ्या बायकोला आणि इतर माझ्या जवळच्या मित्रांना असे वाटते की इंग्रजी मेडियम मध्येच घालावे मी बाळाला... कारण जे कॉलेजला माझ्याबरोबर होते त्यांचे म्हणने तुझी जी फरफट झाली.. टॉपर असुन इंग्रजी सभाषण कौशल्य कमी.. हे तीला पण पुढे फेस करु लागु नये.. हा मुद्दा ही मला योग्य वाटतो.. पण मी त्यांना सांगितले होते की.. आजकाल इंग्रजीत (जवळील माणसे) सर्वजन आपल्या मुलाला घालतात, इंग्रजी शाळा म्हणजे त्यांनी एक मागितले की लगेच द्यायचेच(असेच असेल ), शिवाय वर्गात बरेचसे आई-वडील नोकरीला असणारे घरची श्रिमंती असणारी मुले... मग आपल्या पाल्याला जे जे हवे ते ते कायम देत गेलो तर त्याच्या अपेक्षा आपणच वाढवणार... उद्या त्याला आपलीच लाज पण का वाटणार नाही.. आपण कसे वाढलो.. कसे राहिलो हे त्याला आवडले नाहीतर.. त्याने कंप्यारीझन केले तर. किंवा इतरांचे आई-बाबा त्यांना काही विशिष्ट गोष्टी सर्रास देतात तुम्ही का देवु शकत नाही असे बोलले तर ... आणि मराठी शाळेत घातले तर तेथे सर्व प्रकारची मुले असतील.. मुलांना ही कळु शकते आपली परिस्थीती काय आहे लोक कुठल्या थरातुन कसे जगत आहेत वगैरे.. शिवाय मला मराठी कविता- पुस्तके आवडतात.. उद्या माझ्या मुलाने शी कोण हे पु.ल कोण सु.शी. कोण कुसुमाग्रज आणि कोण वो ते ग्रेस असले काय वाचायचा तुम्ही असे म्हंट्ल्याने मला आवडणार नाही.... मध्यम दुवा : तरीपण असे असुनही, उद्या पाल्याने असे ही म्हणु नये की सर्व आपल्यायेथील मुले इंग्रजी शाळेत जातात त्यांना कीती छान बोलता येते इंग्रजी.. तुमची येव्हडी पण ऐपत नव्हती का ? मग काय बोलणार मी ? अ. म्हणुन मध्यम दुवा हा आहे की.. जर जवळील चांगली ( कमी फीची , कॉन्व्हेंट पण चालेल(जवळ आहेत १-२)) इंग्रजी शाळा असेल तर तेथे अ‍ॅडमिशन घ्यायचे.. आणि स्वता मराठी शिकवायचे ( शुद्धलेखनावर जावु नये ते बाळा साठी सुधारवेल मी) .. स्वता ओळख करुन द्यायची सर्व लेखक - कादंबर्याची तीला लहानपणापासुन .. शाळा.. मित्र संस्कार करत असतीलच पण माझे संस्कार पण मी देइनच ... आजकालची मुले जास्त हुशार आहेत ते समजतील सर्व ... नाहीतर .. ब. जर जवळील चांगल्या मराठी शाळेमध्ये (आता तरी मला ज्ञानप्रबोधीनीच वाटत आहे) प्रवेश घ्यायचा, स्वता इंग्लिशचे थोडे थोडे शब्द शिकवायचे लहानपणापासुन... इंग्रजी स्पिकिंग कोर्स ला लहान पणीच टाकायचे, आणि इंग्रजी वरती ही प्रभुत्व कसे मिळवेल ते पहायचे... अ किंवा ब : अ‍ॅडमिशन कुठे ही होवो... संगित... चित्रकला किंवा इतर काही गोष्टी लहानपणापासुन शिकवायच्या त्याला भाषेची गरज लागत नाही (नशिब) आणि यात जर करिअर करायचे असेल तर पुढे बिंधास्त करु द्यायचे... याला कारण बर्याचदा पालक आपल्याला जे परिस्थीने करता आले नाही ते पाल्याकडे बघतात ( फोर्स नसावा मात्र) मला स्वता चित्र चांगले काढता यायचे.. खुप काढलेली होती.. पण १०-१२ पर्यंत दोन परिक्षा असतात (आता नाव ही आठवेना) त्या द्याव्याच लागतात हे माहित नसल्याने पुढे अभिनव ला अ‍ॅडमिशन मिळणार नाही कळाले ... नाराज.. पुन्हा चित्र काढलेच नाही.. कविता गाणी लिहायला लागलो.. आपणच संगित शिकलो तर त्या ठेक्यात कीती मज्जा येइल म्हणुन गिटार चा क्लास लावला.. पण कामामुळे ते निटसे जमले नाही.. (गिटार घरी आहे पण वाजवता येत नाही) खुप छान स्वयपाक येतो(सध्या कधीतरी फक्त चहा करुन दिला बायकोला तरी खुप खुष.. भाकरी पण खुप मस्त येतात ) म्हणुन हॉटेल मॅनेजमेंट ला जायचे होते ते पण जमले नाही कारण इंजिनियर - डॉक्टरच या जगात टिकु शकतात ही गावाकडच्यांची विचारसरणी हॉटेलिंग आपले काम नाही नाहीतर वेटर व्हावे लागते दुसर्याच्या हॉटेलात हे तेंव्हाचे ज्ञान... अश्या असंख्य गोष्टी असतात.. त्याला शिक्षणाच्या भाषेचा अडसर येत नसतो ... आपन आपल्याला पाल्याला काय बनवणार अश्या अनुषंगाने द्यायचे अ‍ॅडमिशन घेवुन पुढे त्यांचे ते ठरवतील.. असे वाटते.. तात्पर्य : अ किंवा ब : दोन्ही बाबतीत टोकाची भुमिकाच का घ्यायची... ? दोन्हीचा मध्य शक्य नाही का ? फक्त शास्त्रीय संज्ञा हे कारण नाही संभाषण कौशल्य ही गरजेचेच.. पण ते दोन्ही भाषेंचे असले तर छान असे माझे मत. मी शक्यतो 'अ'(इंग्रजी माध्यम) हा पर्याय निवडेल असे वाटते, कारण मुलांमध्ये इतर मुलांचे पाहुन न्युनगंड येवु नये.. ते उत्तम संवाद साधु शकतील.... आणि त्यांना इंग्रजी शाळेत असुनही जमिनीवर राहुन इतर भाषिक शाळेतील मुलांना नावे न ठेवता त्यांच्याकडे ही काहीतरी छान असते ही ओळख करुन देइल म्हणतो .. आपल्यावर पण आपला विश्वास हवाच.

In reply to by गणेशा

प्रतिसाद आवडला. असा विचार प्रत्येक पालकाने केला तर मराठी माध्यम की इंग्लिश मिडियम हा प्रश्नच पडणार नाही.

In reply to by असंका

त्याच हो .. त्या इतक्या गरजेच्या हे माहितीच नव्हते.. आणि सहावीला मला गणिताच्या टिळक (पुढेचे नाव आठवत नाही, टीळक प्रज्ञाशोध का ?) मध्ये ७० मार्क , आणि सातवीला विज्ञान प्रज्ञाशोध ला पण चांगली ग्रेड होती.. पण यांचा मला तसा म्हणावा असा काहीच उपयोग झाला नाही. हिदिंच्या पण किती परिक्षा दिल्या त्यावेळेस .. काही उपयोग नाही.. एक मजेशीर किस्सा आठवला तो सांगतो.. अवांतर आहे पाचवीतील पहिल्याच महिन्यातील किस्सा आहे : तिसरी चौथीत असताना मला आठवत होते की सजीव आणि निर्जीव यातील फरक सांगताना आमच्या एकुलत्या एक ( चार वर्षे एकच मॅडम होत्या पहिली- चौथी पर्यंत, त्या निट शिकवत नव्हत्या की मला भिती होती माहीत नाही, पण गणितात आणि शास्त्रात खुप मार खाल्ला या बाईंचा मी.. कायम शुन्यच .. एकदा शास्त्रात ७ मार्क होते तेच जास्त) तर झाले असे त्या सजीव निर्जीव म्हणजे काय असले शिकवत होत्या.. आणि मला निट आठवते आहे त्यांनी असे सांगितले होते की सजीव म्हणजे जो आपल्यापासुन आपल्या सारखाच प्राणि निर्माण करु शकतात ते सजीव.. म्हणजे झाडे पण त्यात आली झाडा पासुन पण तसेच दुसरे झाड बनते.. हा टेबल पासुन दूसरा टेबल बनतो का ? .... नाही मग हा निर्जीव.. आता पाचवीला शास्त्राच्या मॅडम ने सजिव म्हणजे काय विचारले की माझा हात वर: उत्तर : सजिव म्हणजे जे आपल्यासारखेच इतर प्राणी निर्माण करु शकतात ते.. मॅडम : ये बस्स खाली .. काय शहानपणा हा ( मॅडम आमच्याच कॉलणीत राहत होत्या). अजुनही हसु येते या उत्तराचे.. आमच्या मित्राच्या भाषेत घड्याळ सजीव कारण ते टीक टीक बोलते [:)]

In reply to by असंका

नाही .. खुप चांगल्या शिकवायच्या त्या, विशेष म्हणजे नाव आठवायचा प्रयत्न करतोय पण आठवेनाच. त्याकाळातील सर्व शिक्षकांनी खुप मस्त शिकवले होते.. उरुळी कांचन ची शाळाखुप छान होती.. आजकाल बरेच जन चांगले नाहीत शिक्षक असे बोलत असतात पण मी तिकडे राहत नाही त्यामुळे माहिती नाही...

In reply to by गणेशा

१० वीच्या परीक्षा सुरू असताना शाळेच्या विश्वस्तांच्या मुलाचे लग्न शाळेच्या मैदानात होते. ८-१० दिवस रोज दिवसभर तयारी चालू होती. माझा की लोकमत कोणत्यातरी च्यानेल वर पन दाखवलं होतं.

In reply to by तुषार काळभोर

हो महात्मा गांधी विद्यालयच.. ही बातमी वाचुन वाईट वाटले होते मला सुद्धा.. खुप जुनी शाळा, त्यात ५ वी पासुन हॉस्टेलची सोय असलेली शाळा म्हणुन जुन्या काळात खुप नाव होते.. खुप चांगले शिक्षक .. ग्राउंड तर क्रिकेट स्टेडियम पेक्षा मोठे, खेडेगावत असुनही टेक्निकल विषय ८ वी पासुन.. सर्व विषयास पारंगत असे शिक्षक आणि बरेच काही..साधरण त्यावेळी ५०००+ विद्यार्थी शाळेत अजुनही माझे इतिहासाचे सर काय सुंदर शिकवयाचे ते आठवते... इतिहासाची आवड तेंव्हापासुनची... आता सारे बदलले आहे.. शिक्षक.. विद्यार्थी...पालकांचा द्रुष्टीकोण की आणखिन काही माहित नाही... आता इंग्रजी शाळापण तीन झाल्यात गावात त्याचा ही परिनाम आहेच.. शिक्षण बदलत आहे.. काळ बदलत आहे.. परंतु शिक्षक त्यांचे ध्येय बदलत आहे हे दु:ख देवुन जाते... शाळेच्या आठवणॅए जाग्या झाल्या... बालपण देगा देवा ......

In reply to by गणेशा

उद्या पाल्याने असे ही म्हणु नये की सर्व आपल्यायेथील मुले इंग्रजी शाळेत जातात त्यांना कीती छान बोलता येते इंग्रजी.. तुमची येव्हडी पण ऐपत नव्हती का ?
असं होणार असेल, तर तुम्ही इंग्रजी माध्यमात घातलंत तरी टळणार नाही. मुलं कॉन्वेंट वाल्यांकडे बघून म्हणतील आम्ही त्यांच्याइतकं पण पॉश रहात नाही. कॉन्वेंटमध्ये पण घातलंत, तर म्ह्णतील पाचगणीला का नाही ठेवलंत? कुरकुर करायची, किंवा आपली परीस्थिती आणि दुसर्‍याची परीस्थिती यांची तुलना करायची सवय लागल्यावर असं होतं. प्राप्त परीस्थितीत जे आपल्या पाल्यासाठी आपल्याला सर्वोत्तम वाटेल ते करावे. पाल्य पुढे जाऊन आपल्याला कसली कसली टोचणी देइल त्याचा आत्ताच विचार करून आजचे निर्णय घेणे योग्य नाही. सहज गंमत म्हणून एक सांगतो, आमचे एक परीचित होते, त्यांची मुलं त्यांना काय म्हणून दोष द्यायची माहित आहे? तुम्ही स्वतः उच्च वर्तुळात वावरलात, पण आम्हाला कधी उच्च वर्तुळात वावरायला - त्यांच्याबरोबर दारू प्यायला, पत्ते खेळायला शिकवलं नाहीत....

In reply to by असंका

असं होणार असेल, तर तुम्ही इंग्रजी माध्यमात घातलंत तरी टळणार नाही. मुलं कॉन्वेंट वाल्यांकडे बघून म्हणतील आम्ही त्यांच्याइतकं पण पॉश रहात नाही. कॉन्वेंटमध्ये पण घातलंत, तर म्ह्णतील पाचगणीला का नाही ठेवलंत?
खरेतर असे नाही व्हायचे असे वाटते मला पण झालेच तर उत्तर तयार ठेवायचे मग पाचवी(आठवीपासुन) पासुन तिकडेच घालतो हा.. अगदी तुझ्या मनासारखे ( कुठे तरी खोटी समजुत पण चांगली [:)])
कुरकुर करायची, किंवा आपली परीस्थिती आणि दुसर्‍याची परीस्थिती यांची तुलना करायची सवय लागल्यावर असं होतं. प्राप्त परीस्थितीत जे आपल्या पाल्यासाठी आपल्याला सर्वोत्तम वाटेल ते करावे. पाल्य पुढे जाऊन आपल्याला कसली कसली टोचणी देइल त्याचा आत्ताच विचार करून आजचे निर्णय घेणे योग्य नाही.
- बरोबर आहे हा मुद्दा तुमचा
सहज गंमत म्हणून एक सांगतो, आमचे एक परीचित होते, त्यांची मुलं त्यांना काय म्हणून दोष द्यायची माहित आहे? तुम्ही स्वतः उच्च वर्तुळात वावरलात, पण आम्हाला कधी उच्च वर्तुळात वावरायला - त्यांच्याबरोबर दारू प्यायला, पत्ते खेळायला शिकवलं नाहीत....
-- यात संस्कार कमी पडले त्या मुलांना...संस्कार ही अशी गोष्ट आहे.. की ती आयुष्यभर कीती दिली तरी पुरत नाही.. आणि दिलेली कधी संपत नाही असेच जवळपास जाणारे एक नुकतेच ऐकलेले एक उदा. सांगतो -- मी पिंपरीत चहा प्यायला जातो (२७ वर्षे जुने दुकान).. नेहमीचा कस्टमर आहे मी.. चांगले जमते आमचे. शिगारेट वरुन बोलत होतो मी त्याच्याशी.. आणि तेथे सिगारेट फुकणार्या मुलांविषयी तो. तो सांगत होता.. २० वर्षापुर्वी एक अजन आपल्या मुलाला गाडीवर पुढे घेवुन चहा प्यायला यायचा त्याच्यासमोरच सिगारेट घेवुन प्यायचा.. असेच चालायचे कायम. आता २० वर्षांनंतर तो मुलगा येतो कायम.. सिगारेट प्यायला...चैन स्मोकर. अवघड आहे, फक्त शिक्षण पद्धतीला नावे ठेवताना हा अँगल पण आपण पाहिला पाहिजे असे वाटते. आजकाल पालकांनी मुलांना वेळ पण द्यावा हा एक आनखिन एक मुद्दा..

In reply to by गणेशा

"आता २० वर्षांनंतर तो मुलगा येतो कायम.. सिगारेट प्यायला...चैन स्मोकर." काय बोलायचं...संस्काराबद्दलचं आपलं म्हणणं खरंच आहे.

In reply to by असंका

आप्लया मुलांनी मोठा झाल्यावर करू नये असे वाटत असेल ते, मुले लहान असताना त्यांचा समोरच काय पण अपरोक्षही करू नका नाहीतर मोठे झाल्यावर हे करायचे आपोआप लाय्सन मिळते असा समज होतो आणी मुले लवकर मोठी होतात पण कधीही प्रगल्भ होत नाहीत.

आजकाल चांगले शिक्षक(प्राथमिक आणि माध्यमिक) भेटणे ही खुप दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे मराठीच्या बाबतीत बोलायचे झाले तर माझ्या उदाहरणापासुन चालु करतो .. प्रसंग एक : मी उरुळी कांचन या गावात १९९१-९२ ला पाचवीला होतो... पहिल्या चाचणीत जेमतेम मार्क .. गणितात २ मार्क... गणिताच्या बाईंनी मागील जागेवरुन पहिल्या नंबर वर बसवले.. तरीही फरक नाही.. उभे करुन विचारले काय ते .. तेंव्हा त्यांना कळाले बेरीज सोडुन मला काहीच येत नाही ... जास्त उहापोह न करता त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले.. १ महिन्याच्या आत बेसिक सर्व शिकवले... सहामही ला गणितात पहिला .. सहावीत गणितात पैकीच्या पैकी मार्क गणिताच्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी... कॉलेज संपेपर्यंत गणितात टॉप केले मी.. १२ वी चे क्लास घेतले बिसिएस करत असताना, (मराठीतुनच शिकवले) २० पैकी १७ मुलांना ८० च्या पुढे मार्क. बाईंचे नाव : भोर बाई. असे शिक्षक मला कधी आता दिसत नाहीत.. माझाच मावस भाउ त्याच शाळेत होता नंतर १०-१२ वर्षांनी परिस्थीती बदलेली.. काही येत नाही म्हणुन पालकांना बोलावणे तुम्हीपण लक्ष द्यायला हवे यावर लेक्चर दिले ( अंदाजे २००४ ते २००५) भावाल विचारले का रे काही येत नाही: भावाचे उत्तर : अरे तीच काही निट शिकवत नाही... त्या दूसर्या सरांबरोबर तिचे लफडे चालु आहे त्याच नादात असते... काय शिकवते ते तिला तरी माहिती आहे का ? एका गोष्टीवरुन सर्व तसेच असतील असे नाही.. परंतु खरेच फक्त शिक्षक क्षेत्रात येवुन ज्ञानदान करायचे असे वाटणारी माणसे आता बोटावर मोजण्याइतपत पण नाही.. मराठीत तर खुप हाल.. झेडपी ला लागल्यावर तर मजा म्हणुन या क्षेत्राकडे यायचे.. नाही लागले तर ? दुसरा मार्ग अवघड. माझी बायको, स्वता मराठी डी.एड( फर्स्ट क्लास विथ डिस्टींकशन). आहे, ती पास झाल्यापासुन(२००९ नंतर) एकदाही शिक्षकभरती परिक्षा झालेली नाही... जवळच्या मराठी शाळेत ही काहीच जावुन उपयोग नाही, आपणच त्यांना आधी पैसे द्यायचे आणि मग ते आपल्याला १-२ हजारावर जॉब देणार ... आणि असल्या बाजारात चांगले शिक्षक .. जे मुलांच्या साठी त्यांच्या भविष्यासाठी विचार करणारे कुठे आहेत ? शिक्षण कुठल्या भाषेतुन घेण्यापेक्षा शिक्षकाना शिकवण्यात किती रस आहे हे जास्त महत्वाचे वाटते मला.. आजकालची मुले स्मार्ट आहेत पण शिक्षकांना आपण शिक्षक आहोत म्हणजे काय केले पाहिजे आचरण कसे पाहिजे ..ध्येय काय पाहिजे ह्याचे पण क्लास लावावे लागतील काय ही उगाच माझ्या मनातली शंका नाहीतर कॉलेजला जसे आपण फक्त हजेरी लावायचो आणि आपले आपणच अभ्यास करायचो तसे आता पहिलीपासुन करावे लागेल की काय ही भिती.. मग सांगा मुलाला कुठल्या भाषेच्या शाळेत घालायचे महत्वाचे की कोणत्या शाळेत शिक्षक चांगले .. शिस्त चांगली महत्वाचे ? गावाकडे ऑप्शन नसेल.. पण शहरात ऑप्शन असल्यास त्या त्या पालकांनी त्यांच्या मर्जीने योग्य मार्ग निवडला तर त्याचे अनेक कारणे असतील .. फक्त भाषा हा एकच सरसकट हिशोब तेथे नक्कीच नसेल... असे वाटते. (इग्रजी शाळेतील शिक्षिकांची माहीती नाही.. पण कुठेच नाही तर इंग्रजी शाळा आहेच की अशी वृती काही ओळखीच्यांची दिसली पण अनुभव नसल्याने त्याबद्दल लिहु शकत नाही)

२०११ मध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी आय.आय.टी मधले ८०% विद्यार्थी कमी दर्जाचे असतात ही तक्रार केली होती. याविषयी माझी मते थोडी वेगळी आहेत आणि नारायणमूर्तींच्या मताशी १००% सहमती नक्कीच नाही. तरीही नारायणमूर्तींनी व्यक्त केलेले एक निरिक्षण---"The Infosys mentor also lamented the poor English speaking and social skills of a majority of IIT students, saying with Indian politicians "rooting against English", the task of getting good English speaking students at IITs gets more difficult." म्हणजे जागतिक पातळीवर ठसा उमटविलेल्या भारतीय कंपनीच्या संस्थापकांनाही विद्यार्थ्यांना व्यवस्थित इंग्रजी बोलता येत नसेल तर ती गोष्ट अयोग्य वाटते.

In reply to by क्लिंटन

आपल्या विचारांशी सुसंगत असलेलं काही आवडणे हा मनुष्यस्वभाव आहे. नारायणमूर्ती यांच्या बिझनेसमधे त्यांना ज्या प्रकारची मुलं लागतात त्याबद्दल ते मागणी करणारच आणि मत नोंदवणारच. बरं, भारतीय मुलांना व्यवस्थित इंग्रजी बोलता यायला नको असा काही मुद्दा आम्ही कुठे मांडलेला आढळत नाही.

आय आय टी तल्या मुलांना इंग्रजी चांगलं येत नाही? ढ असतात नाही ती मुलं अगदी? ;-) मराठी माध्यमातल्या मुलांना इंग्रजी चांगलं येत नाही या जावईशोधावर आपला सगळा डोलारा उभा आहे. इंग्रजी शिकू नका, असं म्हणणं नाहिचे. शिक्षणाचं माध्यम मातृभाषाच ठेवावी- जोपर्यंत उपलब्ध आहे तोपर्यंत तरी; एवढंच म्हणणं आहे. पहिलीच्या मुलांना आजकाल कुठलेही माध्यम असले तरी इंग्रजी शिकवतातच.

In reply to by असंका

आय.आय.टीमधल्या मुलांना चांगलं इंग्रजी येत नाही हे मी नाही तर नारायणमूर्ती म्हणत आहेत. मराठी माध्यमातल्या मुलांना इंग्रजी चांगलं येत नाही या जावईशोधावर आपला सगळा डोलारा उभा आहे. आता यापुढे काय कपाळ लिहिणार? मी स्वतः मराठी शाळेतलाच आहे हो साहेब. माझा मुद्दा एवढाच की शाळेत मराठी आणि नंतर अचानक कठिण संकल्पनांबरोबरच त्या इंग्रजीतून असणे हा प्रकार ज्यांना झेपते त्यांना साध्य होईलच पण ज्यांना झेपत नाही त्यांना दुहेरी संकटात टाकण्याऐवजी निदान भाषा व्यवस्थित समजत असेल तर त्यांचे जीवन तेवढे सुसह्य बनेल. आणि दुसरे म्हणजे माझ्यासारख्या विद्यार्थ्याला इंग्रजीवर बर्‍यापैकी पकड यायला १० वी नंतर ४ वर्षे लागली.आणि मी शाळेत असताना एकही स्कॉलरशीप कधीच न सोडलेला (म्हणजे न झेपणार्‍यांपैकी नसलेला) विद्यार्थी होतो.तरीही मला ४ वर्षे लागली.पण मुळात ज्यांना झेपत नसेल त्यांना किती त्रास होत असेल या गोष्टीचा? हा मुद्दा मी अगदी 'न' वेळा मांडला आहे. आता परत त्याची पुनरावृत्ती करणार नाही.

In reply to by क्लिंटन

न वेळा मांडा नाही तर ध वेळा....हा मुद्दा नसून, आपला अनुभव आहे. आपला जसा हा अनुभव आहे तसाच अनेक लोकांचा हाच अनुभव आहे. अगदी माझाही. तो तसा अनुभव आपल्या मुलांना येउ नये ह्या आपल्या भावनेशीही मी सहमत होउ शकतो. पण त्यासाठी तितकाच दारूण अनुभव त्यांना आत्तापासूनच घ्यायला लागावा ह्यात आपल्याला जो फायदा दिसतोय, तो काही मला दिसत नाही. कॉलेजातल्या कल्पना एफ वाय च्या मुलाला जितक्या क्लिष्ट असतात, तितक्याच क्लिष्ट अक्षरओळख आणि अंकगणित या कल्पना पहिली दुसरीतल्या मुलांना असतात. आता या जोडीला परकी भाषा पण शिकायची आहे. परकी भाषा माथी मारतानाचा खडखडाट होणारच आहे. ते आपले दुर्दैव असून त्यातून सुटका नाही. लहानपणी कान टोचणे चांगले की कॉलेजात गेल्यावर एवढाच आपल्यात मतभेद आहे. माझ्या मते एवढ्या लहान मुलांना या त्रासात ढकलण्यापेक्षा त्यांच्या जीवनात थोडीशी सुस्पष्टता आल्यावर हे सगळे करता येतेच. तसंही अकरावी ते एफ वाय वगैरे वेडं वय असतं. त्यात येणार्‍या आपल्या एक दोन अनुभवांवरून मुलांच्या आयुष्याची दिशा ठरवायचा प्रयत्न करणं मला पटत नाही. रच्याकने, इंग्रजी माध्य्मातनं शिकलेले, फॅन्सी कपडे घालून फाडफाड इंग्रजी बोलणारे अनेक लोक पहिल्याच गाळणीत अडकलेले बघितल्याने - जिथून मी आणि माझ्यापेक्षाही खराब इंग्रजी असणारे काहीजण सुळकन सटकलो- माझा न्युनगंड एक वर्षाच्या वर टीकला नाही.

In reply to by असंका

ह्म्म या प्रतिसादाशी सहमत आहे. माझेही तसेच मत आहे. परंतु अकौंटंट साहेब एक मुद्दा असा आहे. की १-५ च्या मुलांना आईवडील अभ्यास घेऊन त्या गोष्टी घोकवून घेऊ शकतात. मग सरावाने मुलं समजत जातात. परंतु एफ्वाय वगैरे ला गेलेल्या मुलांना इंग्रजी झेपली नाही तर ते ऐकण्याच्या मनस्थितीतही नसतात आणि परत बुद्धीमत्ता असतानाही इंग्रजी केवळ येत नाही म्हणून न्यूनगंड. इतकी मोठी मुलं परत पालकांचे ऐकतील असेही नाही. यावर उपाय शोधणे आवश्यक आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इंग्रजीचा बाऊ करण्यातच मुलांना येणारा न्युनगंड लपला आहे. जन्मापासून भारतात राहत असूनही किमान चार भारतीय भाषा बोलता येत नाहीत म्हणून कुणालाही न्युनगंड आलेला पाहिला नाही, त्यावाचून काही अडू शकतं हे ही लोकांना महत्त्वाचं वाटत नाही. बरीच मंडळी भारतात फिरावं लागेल म्हणून इंग्रजी भाषा शिकण्यावर, आत्मसात करण्यावर जोर देतात (भले त्या राज्यांमधे इंग्रजी बोलणारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरीही) पण कुणीही जातोय त्या राज्यातली किमान व्यवहारापुरती तरी भाषा आत्मसात करावी म्हणून जोर देत नाही. हे इंग्रजी प्रकरण दिसतं तेवढं सोपे नाही हे नमूद करू इच्छितो. मुलांच्या शालेय शिक्षणात मातृभाषा मुख्य असावी असा विचार आहे. तिथे इंग्रजीला बंदी असावी असा विचार माझा तरी नाही. इंग्रजीची सवय, सराव होण्यासाठी चांगले शिक्षक व दोन वर्षे पुरे आहेत. त्याचा अगदी जीवनमरणाचा प्रश्न बनवून सामान्यांची जी लूट चालू आहे त्याला माझा विरोध आहे. (उदा.: केजी साठी २ लाख फी). सरते शेवटी एवढंच म्हणेन की जे लोकप्रिय तेच चांगलं असं सर्वसाधारण मत आहे असं दिसून येतं. लोकप्रिय म्हणून चांगलं असं आपण दारू, सिगरेट्लापण म्हणू शकतो. कालपरवापर्यंत मध्यमवर्गीय घरांमधून उच्चारायलाही निषिद्ध असलेली दारू आज समाजशिष्टाचार झालेली आहे. 'अरे धंदा मिळवायला चार लोकांत बसावं लागतं', 'ऑफिसच्या लोकांबरोबर प्यायलो नाही तर ऑकवर्ड होतं' अशी भलामण करणारी लोकंही बघितली आहेत. खरंच लोकप्रिय तेच चांगलं?

In reply to by असंका

सहमत आहे. मातृभाषेतल्या/शाळेबाहेरच्या परिसरात वापरल्या जाणार्‍या भाषेतल्या प्राथमिक शिक्षणाने पोरांचा विकास चांगला होतो हे सांगणारी अनेक संशोधनं दिसतात. सेकंड ल्यांग्वेज थोडी उशीरा पद्धतशीरपणे शिकवा असं म्हणतात.

"आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ उद्या परत तेच चक्र पुन्हा फिरवतील. वरच्या जागांवर त्यांचीच मुले परत असतील. परत सामान्य लोक उच्चवर्गाने काय केले हे बघून आपल्या जे जमते तेवढ्याचे फॅड घेऊन धावत राहतील." हा भेद कायमच रहाणार आहे. ज्याना योग्य माहिती मिळते ते त्या माहितीचा वापर करून घेतात स्वतःची प्रगती करुन घेतात. ज्याना माहिती घ्यायची असते हेच माहीत नसते किंवा त्याचे महत्व वाटत नाही ते सामान्य बनून जगत रहातात

आपल्या पिढी पर्यंत इंग्रजी शाळेत नसताना इंग्रजी येणे खुप अवघड गोष्ट वाटायची.. कारण आपल्या आधीच्या पिढीला इंग्रजीचा गंध नव्हता.. आपला परिसर ही तसाच होता.. कंप्युटर चा उद्य तेंव्हा नुकताच होत होता, त्याबद्दल ही कोणाला काही माहिती नव्हती.. मोबाईल पण साधे जमत नव्हते.. त्यामुळे अगेन्स्ट द ट्रॅक जाण्यासाठी मराठी माध्यमातील मुलांना खुप प्रोब्लेम यायचे.. आता परिस्थीती बदलत आहे.. कुठल्याही भाषेतील संवादाइतपत शिकण्याची सोय आहे, त्यात इंग्रजीचे खुप क्लास आहेत. आता सेमी इंग्लिश पण आल्याने छान आहे, त्यामुळे फक्त इंग्रजीच शाळा महत्वाची आणि मराठी दुय्यम असे नाही.. मराठी माध्यमात शिकुन ही इंग्लिश चांगले करता येते असे माझे मत आहे. इंग्रजीच शिक्षण असले तरी मराठी घरात बोलत असाल आणि घरात मार्गदर्शन भेटत असेन तर ते ही चांगले.. पण मला खरा प्रश्न वाटतो पालक या गोष्टींचा.. पालकांनी कीती जागुरकता दाखवावी हे महत्वाचे.. आपला पाल्य मराठी माध्यमात जातो की इंग्रजी या पेक्षा तो कीती कंफर्टबल आहे त्या शिक्षणाला हे महत्वाचे. इंग्रजी शाळेत जातो म्हणुन मराठी सोडुन देवुन घरी पण इंग्रजी इंग्रजी केल्याने मुलांना मातृभाषाच येत नाही, अशी मुले पाहिली की वाईट वाटते... आणि येथे पालक त्यास जबाबदार आहेत मुलाची प्रगती फक्त शाळेच्या नावावर नसुन .. तो तेथील गोष्टी कशा आत्मसात करतो यात आहे. एक पालक म्हणुन फक्त मोठ्या शाळेत टाकले की कर्तव्य संपले असे पालकांनी करु नये.. पाल्या साठी ते दिवसात किती वेळ देवु शकतात हे महत्वाचे... २०१३ ला चंदिगड ला चाललो असतान ट्रेन मधील किस्सा सांगतो : ( सर्व ८ जन आम्ही मस्त ओळखीचे झालो होतो/ १-२ तास झोपलो फक्त बाकी गप्पाच) तर मुळे नावाचे एकजन त्यांच्या मित्र/कलिग बरोबर चंदिगड ला येत होते. त्यांच्या हातात कामाचे जाड पपुस्तक होते.. आम्ही सगळे बोलत होतो , नंतर विषय मुलांवर आला, ते सआंगत होते आमचा मुलगा ना असा न तसा, फक्त ८० % मार्क पडलेत काय उपयोग तो शेजारचा त्याला ९६ % मार्क पडलेत.. त्याला सांगितले आहे, येव्हडे मार्क पडलेच पाहिजेत..ह्याव न त्याव. मी एकच बोललो.. तुम्हाल दहावीला किती मार्क होते ? मग म्हणाला आपल्या वेळेस वेगळे होते.. त्यापुढचे काम आमच्या गाडीतील पंजाबी गृहस्थाने केले, समजावुन सांगितले.. तर असे हे पालक, असे कुठे असते का? मार्क..भाषा हे दुय्यम आहे ..ज्ञान पाहिजे. ( थ्री इडियट्स आठवला) आजच्या पालकांना स्वताला वेळ द्यायला ही वेळ नसतो ... असे नसले पाहिजे.. पाल्याचे मित्र बनुन जगले पाहिजे, मग बघा अभ्यासात कच्चा असुद्या.. माध्यम कुठले ही असुद्या, आत्मविश्वास त्याचा नेहमी चांगलाच असेन. आत्मविश्वास तेंव्हाच येइल जेंव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्याला समजुन घेणारे घरात कोणी तरी असेल.. नाही तर, येव्हड्या मोठ्या शाळेत काय उगाच घातलाय का? क्लास कशाला लावला आहे मग.. असले ऐकावयचे आण इअपेक्षा ठेवायची न्युनगंड नसण्याची ह्यात काहीच अर्थ नाही.. आजकाल शिक्षणाचा अवडंबर माजवला गेला आहे, १ लाख फी नर्सरी ला लागतेच कशी हे मला पडलेले कोडे आहे, वरती त्या १ लाखात काय शिकणार.. ते जे १ लाखात शिकतील तेव्हडे तर आपण घरी फुकट देवु शकतो .. त्यामुळे पालकांनी फक्त स्टेट्स च्या मागे का लागावे.. स्टेटस च्या मागे लागाल तर पालकांनी पुन्हा त्यांच्या अपेक्षा वाढवलेल्या असतील.. असो बरेच तुटक झाले असेल संमवतो ...

In reply to by गणेशा

आत्मविश्वास तेंव्हाच येइल जेंव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्याला समजुन घेणारे घरात कोणी तरी असेल.. नाही तर, येव्हड्या मोठ्या शाळेत काय उगाच घातलाय का? क्लास कशाला लावला आहे मग.. असले ऐकावयचे आण इअपेक्षा ठेवायची न्युनगंड नसण्याची ह्यात काहीच अर्थ नाही..
हे लाख बोललास!!

सर्व प्रतिसादकर्त्यांच्या संतुलित प्रतिसादांबद्दल आणि विशेषतः गणेशा यांच्या लेखास पूरक अशा प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद!

हा अगदी माझ्या मनाच्या जवळचा विषय आहे. मला मराठी अत्यंत प्रिय आहे आणि माझ्या आजूबाजूला इंग्लिश माध्यमासाठी जो आटापिटा चाललेला आहे, तो अजिबात आवडत नाही. यावर चर्चा केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि अभिनंदन. बाकी सर्वांचे सगळेच विस्तृत अभिप्राय वाचायला जमले नाही. मी माझा व्यक्तिगत अनुभव सांगू मी स्वतः ७वि पर्यंत मराठी माध्यमात शिकलो. ८वि नंतर सेमी इंग्लिश, म्हणजे गणित आणि विज्ञान हे फक्त दोन विषय जे पुढे १२वि विज्ञान, आणि अभियांत्रिकीसाठी महत्वाचे आहेत, तेवढे इंग्लिश बाकी इतिहास भूगोल सर्व काही मराठीत. ११वि नंतर तर सर्व इंग्लिशच. इंग्लिश मध्ये मार्क चांगले असले, लिहिता वाचता येत असलं तरी बोलण्याबद्दलचा न्यूनगंड मनात होता. पण तो बोलण्याचा सराव करून, एक कोर्स करून दूर केला. मग लक्षात आलं कि भीती हि मुळात लोकांसमोर बोलण्याची असते, त्यांच्या समोर चुका न करता बोलण्याची असते. भाषा कोणतीही असो. इंग्लिश मध्ये जास्त चुका होऊ शकतात म्हणून जास्त भीती. ती दूर झाली आणि मी दोन्ही भाषेत स्टेज वर जाऊन बोलू शकलो. आता मी संगणक अभियंता आहे, बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये काम करतो. परदेशी लोकांशी रोज संपर्क येतो. मला मराठी माध्यमा मुळे कसलाही त्रास झाला नाही. उलट मराठी शी चांगली नाळ जोडली गेली आहे. मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेतली पुस्तके वाचतो. दोन्ही भाषेत ब्लॉग लिहितो. त्यामुळे मला वाटतं इंग्लिश माध्यम असले कि सर्व काही झाले असा समाज चुकीचा आहे. उलट इंग्लिश माध्यमातले काही मित्र भाऊ बहिण यांना मराठी नीट येत नाही हे पाहून वाईट वाटते. त्यांना मराठीतले शब्द कळत नाहीत. बोलता बोलता काही म्हणी/वाक्प्रचार वापरले तर ते कळत नाहीत. आणि त्यांची मराठी धेडगुजरी. आपल्या मातृभाषेत कमजोर आणि परक्या भाषेत सगळा जोर हि अभिमानास्पद गोष्ट नक्कीच नाही. इंग्लिश माध्यमात शिकुन सुद्धा मराठी उत्तम असणारा मला एकच जण भेटला. माझा काका. आणि ते त्याच्या वाचनाच्या आवडी मुळे, साहित्याच्या प्रेमामुळे. पण हा छंद तसा तुलनेने कमी लोकांमध्ये असतो, त्यामुळे बाकीच्यांची मराठी सुधारण्याचा मार्ग दिसत नाही. जर्मनी, फ्रांस, इस्रायेल अशा आपल्या भाषेवर प्रेम असणाऱ्या देशांमधल्या लोकांची इंग्लिश खूप चांगली नसते, पण त्यांचा ते बाऊ करत नाहीत. आज काल स्वतः मराठी माध्यमात शिकून यशस्वी झालेले लोक सुद्धा आपल्या मुलांना कटाक्षाने इंग्लिश माध्यमातच टाकतात. काही लोकांची मराठी माध्यमाची इच्छा असेल तर त्याला सगळ्या कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून विरोध होतो. त्यामुळे काही जण ना इलाजामुळे इंग्लिश माध्यमात टाकतात. आणि वर अधोरेखित झाल्याप्रमाणे इंग्लिश मध्यम याचा अर्थ उत्तम शिक्षण असा होत नाही. पण काळजीची एक गोष्ट म्हणजे मराठी माध्यमांना कमी होत चाललेल्या प्रतिसादामुळे तिथले शिक्षक आणि दर्जा घसरायला नको अशी भीती वाटते. आणि मुलांना चांगली संगत आणि थोडी उत्साह वर्धक स्पर्धा हि आवश्यक असते. कमी प्रतिसादामुळे मराठी शाळेतल्या वातावरणावर परिणाम होत असेल तर ते ठीक नाही. मराठी माध्यम कि इंग्लिश माध्यम असा जेव्हा वाद होतो तेव्हा ह्या मुद्द्यावर समाधानकारक उत्तर कसं मिळेल?

मी लहान असताना माझ्या गावातील मराठी माध्यमाच्या शाळेत प्रत्येक वर्गात 30-40 मुल असत(गाव छोट आहे). आज शेजारील गावामधे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केलीय तर गावातील शाळेत फक्त 2-3 मुल असतात एका वर्गात..! आणि शिवाय लोकसंख्या double झालीय गावाची. ही गोष्ट प्रथम एकली तेव्हा shock बसला. पण आपण काहीही करू शकत नाही कारण गावात नवीन ट्रेंड आलाय इंग्रजी शाळेचा आणि लोकांची अशी धारणा झालीय की quality फक्त त्याच शाळा देउ शकतात.

गमतीचा भाग सोडला तर. हा विषय व्यक्तीपरत्वे बदलतो असे दिसते. काही शहरी उच्च वर्गीय भारतीय घरात बोली भाषा आता इंग्रजीच होत चालली आहे हे एक निरिक्षण आहे. सुशिक्षित उच्च-मध्यम वर्गात इंग्रजी माध्यमात घालणे हा काही वेळा दांपत्यांचा विचाराअंती घेतलेला "व्यावहारीक" निर्णय असतो. तर सर्वसाधारण शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मध्य-निम्न स्तरातल्या कुटुंबांमध्ये तो प्रवाहपतितासारखा निर्णय असतो. असं चित्र निदान शहरापुरता तरी दिसते. अशा चौथीतल्या एका ओळखीच्या मुलाला ना धड मराठी वृत्तपत्र वाचायला येत होतं ना धड इंग्रजी. हे चित्र खूप विदारक आहे. बाकी भाषा संस्कृती जोपासली पाहीजे या भावनेशी असहमत होणारी होणारी मंडळी खूप कमी असतील.

२०३० पर्यंत बोली भाषा हिंदी (+ उर्दू) भाषा आंग्ल भाषेला जागतिक स्तरावर मागे टाकेल. पुढच्या १० वर्षांत सर्वप्रकारचे उच्च शिक्षण या भाषेत सुरु होईल.

In reply to by विवेकपटाईत

नंबर ऑफ स्पीकर्स या निकषावर मागे टाकेल, पण उच्चशिक्षण? ही जरा जास्तच अपेक्षा झाली.

इंग्रजी भाषा न जाणणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या माध्यमिक वर्गांत बसावं न लागता त्यांना पाश्चात्त्य वैद्यक शिकता यावं यासाठी १८५१ साली, 'कलकत्ता मेडिकल कॉलेज'मध्ये बंगाली विभाग सुरू करण्यात आला. वैद्यकीची सनद किंवा डॉक्टरांचा मदतनीस बनण्यासाठीचे कोर्सेस फारच यशस्वी झाले. पहिल्या वर्षी २२ विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या विभागाने १८६४ मध्ये इंग्रजी विभागाला मागे टाकलं. १८७२ मध्ये तर इंग्रजी विभागात शिकत असलेल्या ४४५ विद्यार्थ्यांच्या तुलनेत बंगाली विभागात ७७२ विद्यार्थी शिकत होते. १८६७ ते १९०० ह्या काळात, मुख्यतः विद्यार्थ्यांकडून मागणी असल्याने, जवळपास ७०० वैद्यकीय पुस्तकं बंगालीत प्रकाशित झाली. पण हे कोर्सेस लोकप्रिय असतानाच, १८७० च्या सुमारास, व्हर्न्याक्युलर विभागात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल तक्रारी ऐकू यायला सुरुवात झाली. ह्या विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे सार्वजनिक हॉस्पिटलांत युरोपीय डॉक्टरांचे मदतनीस म्हणून काम करण्यास ते अपात्र आहेत, असा प्रचार सुरू झाला. हा तो काळ होता जेव्हा बंगालमध्ये नुकतीच हॉस्पिटलांची व्यवस्था आकाराला येत होती आणि 'जनरल मेडिकल कौन्सिल ऑफ लंडन' ह्या संस्थेच्या देखरेखीखाली ह्या व्यवस्थेचं व्यावसायिक नियंत्रण केलं जात होतं. विसावं शतक उजाडण्याच्या सुमाराला हॉस्पिटलं, मेडिकल कौन्सिल्स, औषधांची पेटंट्सं ह्या माध्यमांतून भारतात आधुनिक वैद्यकाचं संस्थात्मीकरण होत असताना, मेडिकल कॉलेजमधला बंगाली विभाग अचानक अस्तंगत झाला. १९१६ सालापासून आपल्या देशातलं वैद्यकीय शिक्षण हे केवळ इंग्रजीतूनच दिलं जातं.- साभार. गुलामगिरीत हे शक्य झाले तर आज मराठी भाषेचा अभिमान बाळगनाऱे सत्तेत असताना आपण मौन का? शोध लावणारे मातृभाषेत लावतात पण प्रसिद्ध सर्व भाषांत करतात, पण आपण समजतो की इंग्रजी ज्ञानभाषा. जे पालक सुदैवाने शिक्षणसंधी प्राप्त आहेत त्यांनी जरूर आत्मविश्वास बाळगावा की मी माझ्या पाल्याला पुढील १०-१२ वर्षात न अडखळता (अस्खलित) इंग्रजी (किंवा इतर एखादी देशी-विदेशी) भाषा नक्की शिकवेन. जे स्वतः आत्मसात केलेय ते आपल्या बाळापर्यंत पोहोचवने खरंच, इतकं कठीण नाही.

In reply to by नमकिन

लावणारे मातृभाषेत लावतात पण प्रसिद्ध सर्व भाषांत करतात, पण आपण समजतो की इंग्रजी ज्ञानभाषा. ...... शोध लावणारे आधी इंग्रजीतुन पब्लिश करतात. मग लोकल पेपरमधुन भाषांतरे येतात. पण म्हणुन यांची संकलने करुन पाठ्यपुस्तके तयार होउ शकतात का ? प्रचलित इंग्रजी पाठ्यपुस्तकांची भाषांतरे उपलब्ध झाल्यास लोक मातृभाशेत डिग्री घेतील. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी हे उदाहरण्सांगु नये. ते अवतार होते . त्याना नौशेच श्लोक भाशांतरीत करायचे होते. पारिभाशिक शब्द , कॉपे राइट ,प्रकाशक असे प्रश्न नव्हते

पालकांची (पुरुषप्रधान संस्कृती असल्याने, बर्याचदा वडिलांची नोकरी) नोकरी हा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आज मी पुण्यात किंवा महाराष्ट्रात रहात आहे.. माझी नोकरी जर आयटी किंवा तत्सम आहे.. ज्यात मला देशात सुनिश्चित असे ठिकाण रहाण्यासाठी कायम सांगता येणार नाही.. म्हणजे प्रोजेक्टच्या गरजेनुसार किंवा नोकरी निमित्त वेगवेगळ्या स्टेट मध्ये तुम्ही जाणार असताल .. तर मात्र तुम्ही इंग्रजी ह्या भाषेत मुलांना नोकरी घालावे असे वाटते.. आपले मुल ते लहान असताना आपल्या बरोबर (त्याच्या शालेय जीवनात म्हणण्यापेक्षा त्याच्या संस्कारक्षम वयात) असावे या सारखा योग्य मार्ग कुठलाच नाही.. उद्या जर माझा प्रोजेक्ट चेन्नई ला असणार असेल आनि माजेहे मुलगी मराठी मेडियम मध्ये शिकत असेल तर आणि पहिली दुसरीत असेल तर ? पुढे नक्कीच प्रॉब्लेम येवु शकेल असे वाटते.. सोल्युशन असु शकेल पण त्याचा त्रास मुलांनाहोउ शकेल.. मुले येथेच ठेवुन आपण दुसरीकडे वर्षाअतुन १-२ दा येणार फक्त घरी.. यात मला योग्य वाटत नाही.. उद्या भाषे पेक्षा वेगळ्याच समश्या उभ्या राहु शकतील.. त्याचे काय ? जर आपण कायम स्वरुपी आपल्या मातृभुमीत रहाणार असु तर पहिले ३ मुद्दे त्यात कव्हर होतील असे वाटते. त्यामुळे आपली नोकरी काय ? आपण कुठे कायम रहाणार आहे या गोष्टींचा जर पालक विचार करत असेल तर त्या दृष्टीने त्याने घेतलेला निर्णय नक्कीच चुकीचा नसणार असे मला वाटते.

छान चर्चा.इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलाची मराठी माध्यमात शिकलेली आई असण्याचे मला अनेक फायदे जाणवतात.विशेषतः मराठी साहित्याची ऒळख करुन देताना.मला मातृभाषेत शिकल्याने व्यवस्थित आकलन झालेल्या गोष्टी त्याला शिकवतानादेखील.त्याचबरोबर मीही त्याच्याबरोबर गेली दहा वर्ष इंग्रजी माध्यमाचा अभ्यास घेताना स्वतःही शिकत गेले आहे!

साभार- श्रीज्ञान हालदार ह्याच्या स्मृतीनिमित्त ३ सप्टेंबर १९९४ रोजी कलकत्त्यात पार्थ चटर्जी[१] यांनी बंगाली भाषेत दिलेलं व्याख्यान. इंग्रजी भाषांतर १९९७ मध्ये लेखकाने प्रसिद्ध केले. त्याचा 'धनुष' यांनी केलेला अनुवाद.) प्रकाशित - ऐसी अक्षरे, दिवाळी अंक २०१४