Skip to main content

ऐक स्वखे : त्रिधारा

लेखक नाखु यांनी सोमवार, 20/04/2015 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
  • हे ललीत लेखन एका वेगळ्या धाटणीचे आहे याबाबत व यातील तपशीलांचा खुलासा अतिंम भागात करणे रास्त ठरेल
  • ह्या लिखाणादरम्यान आलेली गाणी फक्त त्या प्रसंगवर्णनासाठी आहेत त्यांचे श्रेय त्या त्या निर्मात्याचे आहे आणी इथे त्यांचा वापर फक्त भावना प्रगट करण्यापुरताच आहे
  • याहीपेक्षा समृद्ध आणी चतुरस्त्र अनुभव असलेली जेष्ठ मिपा मंडळी आहेत तरी त्यांचे तुलनेने विस्कळीत असे लि़खाण करीत आहे याची नम्र जाणीव आहे.
स्वखे:भाग १ *** "वन्स फोन आलाय तिकडून आणि बाबा बोलतायत त्यांच्याशी" वहिनीने निरोप दिला आणि मी आतल्या खोलीत आईकडे गेले. "आई मला जमेल का गं पुण्यात त्यात भाषेची अडचण मी कानडी ते मराठी त्यात देवधर्म -कुळाचार फरक असेल ना ! तू सांग कसं होईल ते?" माझी सकाळपासूची भूण्भूण वजा शंकाना आई न थकता उत्तरे देत होती. "काही काळजी करू नकोस आणि तसही भाऊ आहेत ना दोन्ही इथेच तुझ्यापासून जवळच पुण्यात, तू जरी कर्नाटकातून पुण्यात असलीस तरी आम्हाला काळजी रहणार नाहीच तुझी" आईची समजावणी . "हो पण भाषेचं काय ???" माझी शंका-शेपटी चालूच. "ते जमेल हळू हळू तुझे भाऊ नाही का नोकरीनिमित्त पुण्यात आले त्यांचं काही अडलं नाही तेव्हा नसती काळजी नको, तुला कसा वाटतोय मुलगा ते सांग?" असा आईचा प्रश्न. माझी चल्-बिचल आणि भाऊ बाबांना माहीती सांगताना लक्ष देऊन ऐ़कण,काही तरी कारण काढून आईपाशी जाणं,आईच्या नजरेतून सुटेल तर शपथ. तीन भावंडात एकच बहीण आणि तालुकाच्या गावातून (कर्नाटकातल्या) थेट पुण्यात स्थळ बघायाला सुरुवातीला आईची फारशी तयारी नव्हती.पण भावांनी पुण्यात स्वतःची घरे-संसार केल्यावर विरोध मावळला होता. आता माझ्या उत्तरासाठी मोठी वहिनीही थांबली होतीच्,तशी धाकट्या दोघींपेक्षा हिच्याशी जास्त गट्टी होती माझी. (मी शाळकरी असल्यापासून ही घरी आल्यामुळे सुद्धा असेल) "मी काय सांगू तुम्ही म्हणाल तसं" मी मोघम पण सावध उत्तर दिलं "तरी तुम्हाला काही वाटत असेलच ना" वहीनी उपप्रश्न घेऊन तयार. "ठीक आहे निर्व्यसनी आहे स्वतःचे घर आहे फक्त धाकट्या भावा-बहिणीचे लग्न.." माझे वाकय मध्येच तोडत आई म्हणाली ते होईल नंतर आपल्या घरी काय कमी गोतावळा होता का आणि तोही माझ्या माहेरचाच, अगदी शिक्षणा पासून लग्नापर्यंत केलंच ना तुझ्या अण्णांनी " हे मात्र खरे होते जेम्तेम बेताची परिस्थिती फक्त बाबा नोकरीला आणी स्वतःच्या सख्ख्या मामाला वचन दिले म्हणून मामाचे पश्चात ४ मेव्हणे आणि ३ मेव्हणींचे शिक्षण ते लग्न असं सार बाबांनी बिनतक्रार केले. खरंच मुलगी होणार्या नवर्यामध्ये बापाचे गुण-विशेष पाहते का ? मला उत्तर ठाऊक नाही पण जबाबदारी स्विकारणारा आणि निभावणारा बाबा अगदी कळत्या वयापासून पहिलाय मी. कधी कधी हे करताना आईवर अन्याय व्हायचा पण बिचारी आपल्याच माहेरच्यांचा संभाळ करत आहेत म्हणून निभावून न्यायची. मी आईला बिलगले आणि उत्तर आपसूक कळले. एकीकडे आई-बाबांपासून दूर जाण्याची विरहाची तगमग तर नव्या जीवनाची ओढ अश्या मध्ये बघता बघता १५ दिवस कसे भूर्र्कन उडाले ते कळलेच नाही. पुण्यातच भावाचे घरी साखरपूडा झाला आणि मी परत गावी पोहोचले. ****** त्यापूर्वी पसंतीसाठी त्यांच्या घरी गेलो होतो तेंव्हाचा किस्सा अजून लक्षात आहे. घरच्यांच्या आग्रह्+संमतीने दोघे जोडीने देवदर्शनासाठी जवळच्या मंदिरात गेलो होतो. जाताना वाटेतही आणि देवळातही हे काही बोलेचनात, शेवटी मीच मनाचा हिय्या करून एका बाकड्यावर थांबूयात का असं विचारलं तेव्हा हो म्हणाले. "मी नोकरी करीत नाही आणि तुम्हाला तर नोकरी करणारी मुलगी पाहिजे होती ना ?" आत्ता मी सलग लिहिते आहे पण तेव्हा हा प्रश्न अगदी तोडक्या-मोड्क्या मराठीत शब्द जूळवून विचारला होता. "तसं काही नाही नंतर्ही बघता येईल त्याचे पण माझ्या घरी जबाबदारी आहे भावाची-बहीणीची (आणि हो ती घट्स्फोटीत आहे)हे माहीतीय ना तुम्हाला" "चालेल मला , बाकी काही अपेक्षा बोला की".मी "घरचे वाट पहात असतील,निघूयात". ते मला वाटलं हे फारसे बोलके नाहीत पण तसं नव्हतं पुढे पक्क लक्षात राहिलं अगदी मला मराठी गाण्यांचा/शब्दांचा अर्थ समजावून सांगताना तासन-तास बोलत असतात. पण त्यादिवशी ज्या विश्वासाने हातात हात घेऊन आणि अगदी हळू आवाजात "तू पेलशील ही जबाबदारी माझ्या बरोबरीने मला खात्री आहे" मनावरचा ताण हलका करणारे आश्वासक शब्द कानावर पडले आणि मनाची (मीच घालत होते स्वप्नांची समजूत), त्यांचे काय विचार चालले होते कुणास ठाऊक ५ मिनिटात घरी आलो. (यांनी माझ्या घरच्यांची विशेषतः बाबांची+एकत्र कुटुंबातील मुलगी ही माहीती अगोदरच मिळवली होती भावाचे शेजारी रहाणार्या यांच्या मित्रा कडून, हे मला लग्नानंतर कळले) पण न बोलताही जे ५-१० मिनिटे बसलो तेव्हाच मनाने होकार दिला होता. दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते ! प्रीत तुझीमाझी फुलावी या फुलत्या वेलीपरी भाव मुके ओठांत यावे गंध जसा सुमनांतरी शब्दांविना मनभावना अवघ्याच मी तुज सांगते ! साखरपूडा ते लग्न हे दिवस कसे गमतीचे असतात म्हणजे लग्नाच्या तयारीला घरच्यांसाठी अगदी अपूरे तर होणार्या वधू-वरांसाठी जरा जास्त लांबणीचे.त्याकाळी (१९९९) मध्ये मोबाईल फोन नसल्याने (म्हण्जे आम्च्याकडे) घरच्या दूरध्वनीवरून्च बोलावे लागत असे सुदैवाने यांचे घरीही दूरध्वनी असल्याने तशी अडचण नव्हती पण दुसराच तोटा होता नो एकांत जे काही बोलायचे ते सर्वांसमोर (हॉलमध्ये) आणि जुजबीच. हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी मी तुझिया मागून यावे आस ही माझ्या उरी तुजसंगती क्षण रंगती निमिषात मी युग पाहते ! लग्नापूर्वी फक्त दोन-तीन आठवड्यांसाठी पुण्यात आले होते (लग्न एप्रिलमध्ये ठरले आणि साखरपूडा जानेवारीत झाला ) त्यावेळी भेटायची परवानगी मिळाली तेव्हा वेळ मिळेल तेव्हां (रवीवारी) पुण्यात जात असू सगळा प्रवास बसने (तेव्हा यांच्याकडे दुचाकी नव्हती)मला मराठी लवकर समजत नसे.आणि अर्थ समजवण्यात यांचा वेळ जाई.तसही त्या दिवसात शब्देविना संवादू अशीच अवस्था असते ना. पाहता पाहता लग्नाचा दिवस उजाडला.यांचे घरच्यांच्या आग्रहाने लग्न पुण्यात करायचे ठरले किमान लेकीचे लग्न तरी घरी+गावी व्हावे असे आईचे मत होते (कारण मोठ्या तीनही भावांची लग्ने परगावी त्यांच्या सासुरवाडीचे ठिकाणी झाली होती) लग्नानंतर सगळे धार्मीक विधी झाल्यावर आम्ही उभयता मधूचंद्रासाठी "कोयना नगर" ला गेलो नव्याचे नऊ दिवस सरले आणि माझ्या भाषेची अडचण आणि मराठी व्याकरणाची बोंब यामुळे अनर्थाला सुरुवात झाली..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6494
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

नव्याचे नऊ दिवस सरले आणि माझ्या भाषेची अडचण आणि मराठी व्याकरणाची बोंब यामुळे अनर्थाला सुरुवात झाली..
साखरपूडा ते लग्न हे दिवस कसे गमतीचे असतात म्हणजे लग्नाच्या तयारीला घरच्यांसाठी अगदी अपूरे तर होणार्या वधू-वरांसाठी जरा जास्त लांबणीचे.
=)) कस्से दिवस गेले कै कळ्ळ्चं नै ओ ;) ;)!! ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

मस्त लिहिले आहे. क्रमशः लिहायचे राहिले आहे का? पुभाप्र

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

खरंच क्रमशः राहिलय वाटतं.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत ..

आवडली. पु.भा.प्र. रच्याकने त्रिधारा म्हणजेच तीन भागांची मालिका, क्रमशः लिहायची गरज नाही.

सुरेख सुरुवात ... हे गाणे तर खास जागी आले.. मस्तच
दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते !
---- आता रिप्लाय शेवटच्या धाग्यावर सगळे वाचल्यावरच