Skip to main content

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 09/02/2015 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची ११ वी विश्वचषक स्पर्धा शनिवार १४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीला न्यूझीलँड वि. श्रीलंका हा स्पर्धेतील सर्वात पहिला सामना खेळला जाईल. १८-२१ मार्च या चार दिवशी ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत, उपांत्य फेरीचे २ सामने २१ मार्च व २४ मार्च रोजी आहेत व अंतिम सामना रविवार २९ मार्च या दिवशी खेळला जाईल. ही स्पर्धा न्यूझीलँड व ऑस्ट्रेलिया हे दोन देश संयुक्तपणे आयोजित करीत आहेत. यापूर्वी १९९२ मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा याच देशांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. पहिल्या १० स्पर्धांची संक्षिप्त माहिती अशी आहे. (१) वर्ष - १९७५, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - ऑस्ट्रेलिया (२) वर्ष - १९७९, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - इंग्लंड (३) वर्ष - १९८३, यजमान - इंग्लंड, विजेता - भारत, उपविजेता - वेस्ट इंडीज (४) वर्ष - १९८७, यजमान - भारत व पाकिस्तान, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - इंग्लंड (५) वर्ष - १९९२, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - पाकिस्तान, उपविजेता - इंग्लंड (६) वर्ष - १९९६, यजमान - भारत, पाकिस्तान व श्रीलंका, विजेता - श्रीलंका, उपविजेता - ऑस्ट्रेलिया (७) वर्ष - १९९९, यजमान - इंग्लंड, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - पाकिस्तान (८) वर्ष - २००३, यजमान - द. आफ्रिका, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - भारत (९) वर्ष - २००७, यजमान - वेस्ट इंडीज, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - श्रीलंका (१०) वर्ष - २०११, यजमान - भारत, बांगलादेश व श्रीलंका, विजेता - भारत, उपविजेता - श्रीलंका (११) वर्ष - २०१५, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - ?, उपविजेता - ? ________________________________________________________________________________ १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ बसलेले (डावीकडून) - दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, कपिलदेव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावसकर, मदनलाल उभे (डावीकडून) - पी आर मानसिंग (संघ व्यवस्थापक), यशपाल शर्मा, कृष्णम्माचारी श्रीकांत, बलविंदरसिंग संधू, रवी शास्त्री, संदीप पाटील, रॉजर बिन्नी, कीर्ति आझाद, सुनील वॉल्सन ________________________________________________________________________________ २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ (डावीकडून) - झहीर खान, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुनाफ पटेल, गौतम गंभीर, श्रीशांत, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, सुरेश रैना, पियूष चावला, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, आशिष नेहरा, रविचंद्रन अश्विन, युसुफ पठाण ________________________________________________________________________________ पूर्वीच्या स्पर्धांवर नजर टाकली तर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसतात. - ऑस्ट्रेलिया सर्वाधिक म्हणजे ४ वेळा विजेते ठरले आहेत. त्याखालोखाल भारत व वेस्ट इंडीजने ही स्पर्धा प्रत्येकी २ वेळा जिंकली आहे. - ऑस्ट्रेलिया २ वेळा उपविजेता सुद्धा आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया १० पैकी ६ वेळा अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत. - इंग्लंड ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचून सुद्धा त्यांना विजेतेपद मिळविता आलेले नाही. श्रीलंका व भारत देखील ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचले होते. श्रीलंकेने एकदा तर भारताने दोन वेळा अंतिम फेरीत विजय मिळविला आहे. - पहिल्या ३ स्पर्धात वेस्ट इंडीजचा जबरदस्त दबदबा होता. तीनही स्पर्धात ते अंतिम फेरीत पोहोचले व २ वेळा विजेते झाले. त्यानंतर त्यांची कामगिरी एकदम ढेपाळली व नंतरच्या ७ स्पर्धात ते एकदाच १९९६ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २०८ धावांचा पाठलाग करताना जेमतेम ५ धावांनी त्यांचा पराभव झाला होता. - न्यूझीलँड १० पैकी ६ स्पर्धात उपांत्य फेरीत पोहोचले होते. परंतु उपांत्य फेरीचा अडथळा त्यांना पार करता आलेला नाही. - १९९२ पासून स्पर्धेत सामील झालेल्या द. आफ्रिकेने खेळलेल्या ६ पैकी ३ स्पर्धात उपांत्य फेरी गाठली. परंतु त्यांना देखील उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. महत्त्वाच्या सामन्यात मोक्याच्या वेळी नेहमीच कच खाल्ल्यामुळे त्यांचा संघ चोकर्स म्हणून ओळखला जातो. - पाकिस्तानचा जावेद मियांदाद (१९७५-१९९६) व भारताचा सचिन तेंडुलकर (१९९२-२०११) हे दोघे प्रत्येकी ६ स्पर्धा खेळलेले आहेत. वेस्ट इंडीजचा शिवनरीने चंद्रपॉल, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन व केनयाचा थॉमस ओडोयो हे प्रत्येकी ५ स्पर्धा खेळलेले आहेत. - कोणत्याही स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या करण्याचा मान कॅनडाकडे आहे. कॅनडाचा संघ दोन वेळा (एकदा श्रीलंकेविरूद्ध व १९७९ मध्ये इंग्लंडविरूद्ध) ४५ धावसंख्येवर बाद झाला होता. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या भारताने केलेली आहे (२००७ मध्ये बर्म्युडाविरूद्ध ४१३ धावा). - भारत व पाकिस्तान एकमेकांविरूद्ध एकूण ५ सामने खेळलेले आहेत. सर्व सामने भारताने जिंकले आहेत. ४ सामन्यात प्रथम फलंदाजी करून व एका सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करून भारताने विजय मिळविला होता. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकर खेळला होता व त्यापैकी २ सामन्यात त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला होता. या स्पर्धेतसुद्धा भारत वि. पाकिस्तान ही लढत होणार आहे व प्रथमच भारत सचिनशिवाय सामन्यात खेळेल. - मागील ५ स्पर्धांमध्ये अंतिम फेरीतील किमान १ संघ हा आशियातील संघ आहे. - २००७ मध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने द. आफ्रिकेविरूद्ध लागोपाठ ४ चेंडूवर ४ बळी मिळविले होते. _________________________________________________________________________________ २०१५ मधील विश्वचषक स्पर्धा एकूण १४ संघात खेळली जाईल. संघांची विभागणी २ गटात करण्यात आली आहे. 'अ' गट - न्यूझीलँड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्कॉटलँड, अफगाणिस्तान, बांगलादेश 'ब' गट - द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, झिंबाब्वे, आयर्लँड, संयुक्त अरब अमिराती _________________________________________________________________________________ स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.

प्राथमिक फेरीतील सामने

(१) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. श्रीलंका, स्थळ - ख्राईस्टचर्च (२) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, स्थळ - मेलबोर्न (३) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. झिंबाब्वे, स्थळ - हॅमिल्टन (४) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. पाकिस्तान, स्थळ - अ‍ॅडलेड (५) सोमवार १६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), आयर्लँड वि. वेस्ट इंडिज, स्थळ - नेल्सन (६) मंगळवार १७ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (७) बुधवार १८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. बांगलादेश, स्थळ - कॅनबेरा (८) गुरूवार १९ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), यूएई वि. झिंबाब्वे, स्थळ - नेल्सन (९) शुक्रवार २० फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. इंग्लंड, स्थळ - वेलिंग्टन (१०) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज, स्थळ - ख्राईस्टचर्च (११) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, स्थळ - ब्रिस्बेन (१२) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. श्रीलंका, स्थळ - ड्यूनेडीन (१३) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. द. आफ्रिका, स्थळ - मेलबोर्न (१४) सोमवार २३ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. स्कॉटलँड, स्थळ - ख्राईस्टचर्च (१५) मंगळवार २४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), वेस्ट इंडीज वि. झिंबाब्वे, स्थळ - कॅनबेरा (१६) बुधवार २५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. यूएई, स्थळ - ब्रिस्बेन (१७) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (१८) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), श्रीलंका वि. बांगलादेश, स्थळ - मेलबोर्न (१९) शुक्रवार २७ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. वेस्ट इंडीज, स्थळ - सिडने (२०) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. ऑस्ट्रेलिया, स्थळ - ऑकलँड (२१) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. यूएई, स्थळ - पर्थ (२२) रविवार ०१ मार्च, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. श्रीलंका, स्थळ - वेलिंग्टन (२३) रविवार ०१ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), पाकिस्तान वि. झिंबाब्वे, स्थळ - ब्रिस्बेन (२४) मंगळवार ०३ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. आयर्लँड, स्थळ - कॅनबेरा (२५) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. यूएई, स्थळ - नेपिअर (२६) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, स्थळ - पर्थ (२७) गूरूवार ०५ मार्च, वेळ - सकाळी ३:३० (भाप्रवे), बांगलादेश वि. स्कॉटलँड, स्थळ - नेल्सन (२८) शुक्रवार ०६ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. वेस्ट इंडीज, स्थळ - पर्थ (२९) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. द. आफ्रिका, स्थळ - ऑकलँड (३०) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. झिंबाब्वे, स्थळ - होबार्ट (३१) रविवार ०८ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. अफगाणिस्तान, स्थळ - नेपिअर (३२) रविवार ०८ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, स्थळ - सिडने (३३) सोमवार ०९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), इंग्लंड वि. बांगलादेश, स्थळ - अ‍ॅडलेड (३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन (३५) बुधवार ११ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्कॉटलँड वि. श्रीलंका, स्थळ - होबार्ट (३६) गूरूवार १२ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. यूएई, स्थळ - वेलिंग्टन (३७) शुक्रवार १३ मार्च, वेळ - सकाळी ०६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. बांगलादेश, स्थळ - हॅमिल्टन (३८) शुक्रवार १३ मार्च, वेळ - पहाटे ९:३० (भाप्रवे), अफगानिस्तान वि. इंग्लंड, स्थळ - सिडने (३९) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), भारत वि. झिंबाब्वे, स्थळ - ऑकलँड (४०) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलँड, स्थळ - होबार्ट (४१) रविवार १५ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), यूएई वि. वेस्ट इंडीज, स्थळ - नेपिअर (४२) रविवार १५ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. पाकिस्तान, स्थळ - ओव्हल _______________________________________________________________________________

उपांत्यपूर्व फेरीतील सामने

(१) बुधवार १८ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना ('अ' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ) , स्थळ - सिडने (२) गुरूवार १९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना ('अ' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - मेलबोर्न (३) शुक्रवार २० मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा सामना ('अ' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - अ‍ॅडलेड (४) शनिवार २१ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील चौथा सामना ('अ' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ) , स्थळ - वेलिंग्टन ________________________________________________________________________________

उपांत्य फेरीतील सामने

(१) मंगळवार २४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील पहिला सामना, स्थळ - ऑकलँड (२) गुरूवार २६ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील दुसरा सामना, स्थळ - सिडने ________________________________________________________________________________

अंतिम सामना

रविवार २९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्थळ - मेलबोर्न ________________________________________________________________________________ २०११ व २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेतील नियमातील फरक खालीलप्रमाणे - (१) २०११ ची स्पर्धा - २०११ मध्ये सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असायचा. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. नंतर षटक क्रमांक ११ ते ५० या दरम्यान ५ षटकांचे २ पॉवरप्ले असायचे व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ५ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. २०१५ ची स्पर्धा - २०१५ च्या स्पर्धेत सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असेल. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. नंतर षटक क्रमांक ११ ते ४० या दरम्यान ५ षटकांचा एकच पॉवरप्ले असेल व तो फलंदाजी करणार्‍या संघाला आपल्या सोयीने घेता येईल. ३६ व्या षटकाच्या आधी पॉवरप्ले घेतलाच नाही तर षटक क्रमांक ३६-४० ही पॉवरप्लेची षटके असतील व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३५ षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक असल्याने फलंदाज वर्तुळाच्या बाहेर उंच फटके मारण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अर्धवेळ गोलंदाज तसेच फिरकी गोलंदाज कमी वापरले जातील. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या तशाही फिरकी गोलंदाजांना फारशी साथ देत नाहीत. त्यामुळे फिरकी गोलंदाज एकंदरीतच कमी वापरले जातील. (२) २०११ ची स्पर्धा - एकच पांढरा चेंडू ५० षटके वापरला जात असे. जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी व फिरकी गोलंदाजांना चेंडू जुना झाल्यावर फायदा मिळे. जर खराब व्हायला लागला किंवा खूप ओला झाला तर ३४ षटकानंतर तितकाच झिजलेला वेगळा चेंडू वापरला जात असे. २०१५ ची स्पर्धा - - विकेटच्या दोन्ही बाजूने २ नवीन पांढरे चेंडू वापरले जातील. ५० व्या षटकापर्यंत कोणताही चेंडू जास्तीत जास्त २४-२५ षटके वापरला गेला असेल. जलदगती गोलंदाजांना याचा फायदा मिळेल. फिरकी गोलंदाजांना व जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी फारसा फायदा नाही. ________________________________________________________________________________

स्पर्धेतील संघ

(१) भारत महेंद्रसिंग धोनी*, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहीत शर्मा, मोहम्मद शमी भारताने २०११ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. सर्वात धक्क्कादायक बातमी म्हण्जे त्या विजयी संघातील १५ खेळाडूंपैकी फक्त ४ च खेळाडू या संघात आहेत (धोनी, कोहली, रैना, अश्विन). इतर कोणत्याही देशाच्या संघात मागील स्पर्धेतील संघातील इतके कमी खेळाडू आताच्या संघात नसावेत. या चौघांपैकी रैना ९ पैकी फक्त ४ सामने खेळला होता तर अश्विन फक्त २ सामने खेळला होता. कोहली व धोनी सर्व ९ सामने खेळले होते. भारताची फलंदाजी बर्‍यापैकी दिसत असली तरी गोलंदाज अत्यंत निष्प्रभ आहेत. या संघात स्टुअर्ट बिन्नीची निवड सर्वात धक्कादायक आहे. त्याचे वडील रॉजर बिन्नी निवडसमितीत आहेत हा योगायोग नसावा. स्टुअर्ट बिन्नीऐवजी सध्या रणजी स्पर्धेत असलेला युवराज सिंग संघात हवा होता. परदेशात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या शिखर धवनऐवजी सध्याच्या रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करत असलेला सेहवागला घेता आले असते किंवा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत यशस्वी ठरलेल्या मुरली विजयला घेता आले असते. तसेच रायडूऐवजी रॉबिन उथप्पा हवा होता. रविंद्र जडेजा सध्या जायबंदी आहे. जायबंदी असल्याने त्याला ऑस्ट्रेलियातील कसोटी व तिरंगी स्पर्धेतील ४ पैकी ३ एकदिवसीय सामने खेळता आले नाहीत. जो एकमेव सामना तो खेळला त्यातही तो अपयशी ठरला. यावर्षीच्या रणजी स्पर्धेतील एकही सामना तो खेळलेला नाही. थोडक्यात गेले अनेक महिने तो एकही स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेक महिने सरावाशिवाय असलेल्या या जायबंदी खेळाडूला कशाला घेतले? स्पर्धा सुरू होईपर्यंत तो तंदुरूस्त झाला नाही तर पंचाईत आहे. अश्विन, रोहीत शर्मा हे परदेशात फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. त्यांच्याऐवजी इतर खेळाडूंचा विचार करायला हवा होता. भारत यावेळी उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे. (२) ऑस्ट्रेलिया मायकेल क्लार्क*, जॉर्ज बेली, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॅडीन, जॉश हॅझलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन ऑस्ट्रेलियाचा संघ अत्यंत समतोल आहे. या संघात स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, शेन वॉटसन, मिचेल जॉन्सन, मायकेल क्लार्क, जेम्स फॉकनर अशा अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ हे फलंदाजीत तुफान फॉर्मात आहेत, तर गोलंदाजीत मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क फॉर्मात आहेत. तरीसुद्धा या संघात रायन हॅरिस व नेथन लायन ची उणीव जाणविते. ऑस्ट्रेलिया यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. (३) इंग्लंड ऑईन मॉर्गन*, मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, ईयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, स्टिव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स मॉर्गन, जो रूट, ईयान बेल आणि जॉस बटलर हे चांगले फलंदाज इंग्लंडच्या संघात आहेत. जेम्स अँडरसन, फिन आणि ब्रॉड हे चांगले गोलंदाज देखील आहेत. मोईन अली व रवी बोपारा हे उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहेत. इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे. (४) न्यूझीलँड ब्रँडन मॅकलम्*, कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, ग्रँट ईलियट, मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, मिचेल मॅकलेंघॅन, नेथन मॅकलम्, कायल मिल्स, अ‍ॅडम म्लाईन, ल्यूक राँकी, टीम साउदी, रॉस टेलर, डॅनियल व्हिटोरी, केन विल्यमसन किवीज सध्या तुफान फॉर्मात आहेत. ब्रँडन मॅकलम् ने २०१४ मध्ये २ त्रिशतके, १ द्विशतक, एकदा १९५ अशी तुफान वेगवान शतके केली आहेत. केन विल्यमसन देखील जबरदस्त फॉर्मात आहे. कोरी अँडरसन, टॉम लॅथम, ल्यूक राँकी हे देखील भरात आहेत. तुफान फटकेबाज रॉस टेलर हा माझा अत्यंत आवडता खेळाडू. परंतु तो अजून फारसा भरात नाही, परंतु घरच्या मैदानावर तो कधीही फॉर्मात येऊ शकतो. किवींची गोलंदाजी फलंदाजीच्या तुलनेत जरा दुर्बळ वाटते. बोल्ट बर्‍यापैकी फॉर्मात आहे. परंतु इतर गोलंदाज तितके चांगले वाटत नाहीत. तरीसुद्धा जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलँड यावेळी चमत्कार करून दाखवतील असं वाटतंय. न्यूझीलँड यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात यावेळी प्रथमच न्यूझीलँड अंतिम फेरीत दिसेल असाही माझा अंदाज आहे. (५) पाकिस्तान मिसबाह उल हक*, अहमद शेहझाद, एहसान आदिल, हॅरिस सोहेल, नासिर जमशेद, मोहम्मद इरफान, सर्फराजअहमद, शाहीद आफ्रिदी, सोहेब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल, वहाब रियाझ, यासीर शाह, युनिस खान या संघात बर्‍याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. कर्णधार मिसबाह हा ४० वर्षांचा असून युनिस खान (३७ वर्षे), मोहम्मद हफीझ (३४ वर्षे), मोहम्मद इरफान (३२ वर्षे), शाहीद आफ्रिदी (३४ वर्षे), सोहेल खान (३० वर्षे) असे अनेक ३०+ वयाचे खेळाडू या संघात आहेत. पाकिस्तान हा अत्यंत बेभरवशाचा संघ आहे. हा संघ एखाद्या दिवशी तुफान कामगिरी करून लगेच दुसर्‍याच दिवशी अत्यंत खराब कामगिरी करून दाखवू शकतो. अत्यंत गुणी खेळाडू असूनही सातत्याचा अभाव व खेळाडूंना बेटिंग आणि मॅचफिक्सिंगचे लागलेले ग्रहण यामुळे या संघाबद्दल कोणताच अंदाज करता येत नाही. दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच या संघाकडे देखील जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत. शाहीद आफ्रिदीसारखा जबरदस्त फटकेबाज असलेला अष्टपैलू या संघात आहे. परंतु अत्यंत बेभरवशाची फलंदाजी असल्याने पाकिस्तान कधीही अपेक्षित कामगिरी करीत नाही. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा पाकिस्तानने नशीबाची जबरदस्त साथ मिळाल्याने जिंकली. त्या स्पर्धेत प्रत्येक संघाला ८ सामने खेळायचे होते. पहिल्या ५ सामन्यांपैकी पाकिस्तान ४ सामन्यात पराभूत होता. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची अवस्था सर्वबाद ८७ अशी दयनीय होती. पाकिस्तानच्या सुदैवाने मध्यंतरापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने इंग्लंडला फलंदाजी करताच आली नाही व सामना अनिर्णित घोषित होऊन दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला होता. पाकिस्तानने नंतर उर्वरीत तीनही सामने जिंकले. परंतु उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंडविरूद्ध नशीबाने मिळालेल्या १ गुणाचा फायदा झाला होता. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान ५ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने जिंकले आहेत. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरूद्ध १५ फेब्रुवारीला आहे व यावेळी सचिन नाही. या सामन्याची तिकिटे ऑनलाईन विक्री सुरू झाल्यावर काही मिनिटातच संपलेली आहेत. बघूया यावेळी काय होतंय ते. अत्यंत बेभरवशाचा संघ असल्याने यावेळी पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करेल की नाही हे नक्की सांगता येणे अवघड आहे. (६) दक्षिण आफ्रिका एबी डी व्हिलिअर्स*, हशीम आमला, कायल अ‍ॅबॉट, फरहान बेहार्डिअन, क्विंटन डी कॉक, जीन पॉल ड्युमिनी, फाफ डू प्लेसि, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, वेन पार्नेल, एरॉन फांगिसो, व्हरनॉन फिलँडर, रिली रॉसॉ, डेल स्टेन अत्यंत समतोल आणि जबरदस्त संघ. याही संघात बर्‍याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. तब्बल ९ खेळाडू ३०+ वयाचे आहेत. अत्यंत जबरदस्त गोलंदाज व जबरदस्त फलंदाज हे या संघाचे वैशिष्ट्य. एबी डी व्हिलिअर्स, आमला, फाफ डू प्लेसि, रॉसॉ, डेव्हिड मिलर इ. फलंदाज तुफान फॉर्मात आहेत, तर मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन, फिलँडर हे फलंदाजांना धडकी भरविणारे वेगवान गोलंदाजही भरात आहेत. या संघाचे क्षेत्ररक्षण देखील अत्यंत उच्च दर्जाचे आहे. अत्यंत गुणी खेळाडू असूनही महत्त्वाच्या सामन्यात आयत्यावेळी कच खाऊन अनेकवेळा या संघाने सामने गमाविलेले आहेत. अनेकवेळा नशीबाने देखील या संघाला तडाखा दिलेला आहे. विश्वचषक स्पर्धेत १९९२ पासून ६ वेळा सहभागी होऊन त्यात ३ वेळा उपांत्य फेरी गाठूनही या संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलेले आहे. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-द. आफ्रिका ३ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने गमावले आहेत. या सर्व ३ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा दुसरा सामना द. आफ्रिकेविरूद्ध आहे आणि यावेळी सचिन नाही. बघूया यावेळी काय होतंय ते. या स्पर्धेत हा संघ नक्कीच उपांत्य फेरीत प्रवेश करेल. बहुतेक प्रथमच अंतिम फेरीत सुद्धा असेल आणि कदाचित यावेळी प्रथमच विश्वचषकावर आपले नाव कोरेल असा अंदाज आहे. (७) श्रीलंका अँजेलो मॅथ्यूज*, लाहिरू थिरीमाने, दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगाना हेराथ, माहेला जयवर्धने, दिमुथ करूणारत्ने, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, जीवन मेंडीस, थिसारा परेरा, धम्मिका प्रसाद, कुमार संगक्कारा, सचित्र सेनानायके श्रीलंका संघाची कामगिरी लक्षात घेताना १९९२ पूर्वी व १९९२ नंतर (म्हणजे १९९६ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९९२ पर्यंत श्रीलंका हा एक अत्यंत दुर्बल व अतिसामान्य संघ म्हणून ओळखला जात होता. परंतु अचानक नशीबाची साथ मिळून १९९६ ची विश्वचषक स्पर्धा श्रीलंकेने जिंकली आणि त्या संघाने एकदम कात टाकली. तेव्हापासून हा संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. १९९६ पासून झालेल्या ५ विश्वचषक स्पर्धांमध्ये ४ वेळा हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. त्यापैकी ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचला व एकदा अंतिम फेरी जिंकली. आताच्या संघात एकाहून एक जबरदस्त फलंदाज आहेत. कुमार संगक्कारा व दिलशान जबरदस्त फॉर्मात आहेत. यांच्या जोडीला अत्यंत शैलीदार व सभ्य फलंदाज जयवर्धने सुद्धा आहे. जयवर्धने हा माझा अत्यंत आवडता फलंदाज आहे. संघात अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा व कुलसेकरा सारखे अष्टपैलू आहेत. मलिंगासारख्या अत्यंत भेदक यॉर्कर टाकून हमखास बळी घेणारा गोलंदाज आहे. हेराथ सारखा खडूस फिरकी गोलंदाजही आहे. परंतु या संघाची गोलंदाजी खूपच दुर्बल वाटते. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. (८) वेस्ट इंडीज जेसन होल्डर*, मर्लॉन सॅम्युअल्स, सुलीमान बेन, डॅरेन ब्राव्हो, जोनाथन कार्टर, शेल्डन कॉटरेल, ख्रिस गेल, दिनेश रामदीन, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, जेरोमी टेलर वेस्ट इंडीज संघाची कामगिरी लक्षात घेताना १९८३ पूर्वी व १९८३ नंतर (म्हणजे १९८७ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९८३ पर्यंत विंडीज हा एक एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यातील सर्वाधिक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जात होता. १९७५ व १९७९ अशा दोन्ही विश्वचषक स्पर्धा या संघाने जिंकल्या. १९८३ च्या स्पर्धेत देखील हा संघ अंतिम फेरीत आला होता. परंतु अचानक दुर्बल समजल्या जाणार्‍या भारताने तो सामना जिंकला आणि तेव्हापासूनच विंडीजची सर्व प्रकारच्या सामन्यात घसरण सुरू झाली. १९८७ पासून २०११ पर्यंत फक्त एकदाच १९९६ मध्ये हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. इतर सर्व स्पर्धात हा संघ उपांत्य फेरीपूर्वीच गारद झालेला आहे. आताच्या संघात खरं तर जबरदस्त खेळाडू आहेत. परंतु एक संघ म्हणून त्यांची एकत्रित कामगिरी होताना दिसत नाही. ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, डॅरेन सॅमी हे अत्यंत स्फोटक फलंदाज आहेत. आंद्रे रसेल, सॅम्युअल्स यासारखे तुफानी अष्टपैलू खेळाडू आहेत. डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स हे उपयुक्त फलंदाज आहेत. परंतु गोलंदाजी अत्यंत कमकुवत आहेत. नियामक मंडळाशी झालेल्या मतभेदामुळे ड्वेन ब्राव्हो व किरॉन पोलार्ड या अत्यंत जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान न देण्याचा धक्कादायक निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. त्यात भर म्हणून जादूभरा फिरकी गोलंदाज सुनील नारायण त्याच्या शैलीविषयी शंका व्यक्त केली गेल्यामुळे स्वतःहूनच बाहेर पडला. या ३ खेळाडूंची अनुपस्थिती विंडीजला खूपच महागात जाणार आहे. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची फारशी शक्यता वाटत नाही.

लिंबूटिंबू संघ

(९) बांगलादेश मुश्रफ मोर्तझा*, अल-अमीन होसेन, अनामूल हक, अराफत सनी, महंमदुल्ला, मोमिनूल हक, मुशफिकर रहीम, नासिर होसेन, रुबेल होसेन, सब्बीर रहमान, शकीब अल हसन, सौम्य सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इक्बाल, टस्किन अहमद बांगलादेश कडे काही चांगले खेळाडू आहेत. कर्णधार मुश्रफ मोर्तझा, शकीब अल हसन, तमीम इक्बाल, मुशफिकर रहीम, महंमदुल्ला या खेळाडूंवरच या संघाची मदार आहे. तसा हा लिंबूटिंबू संघ आहे, परंतु काहीवेळा या संघाने बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पहिल्याच सामन्यात बांगलादेशाकडून झालेला पराभव व त्यामुळे प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेला भारतीय संघ ही कटू आठवण भारतीय कधीच विसरणार नाहीत. तरीसुद्धा हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१०) आयर्लँड विल्यम पोर्टरफील्ड*, अँडी बॅलबर्नी, पीटर चेस, अ‍ॅलन कुसॅक, जॉर्ज डॉकरेल, एड जॉईस, अँडी मॅकब्राईन, जॉन मूनी, केव्हिन ओ'ब्रायन, नील ओ'ब्रायन, मॅक्स सोरेनसेन, पॉल स्टर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन, क्रेग यंग, टीम मर्टाघ आय्रलँडने २००७ व २०११ या दोन्ही स्पर्धात काही बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पाकिस्तान व बांगलादेशाला पराभूत करून झिंबाब्वेबरोबर सामना बरोबरीत सोडवून त्यांनी धक्के दिले होते. २०११ मध्ये इंग्लंडच्या ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना केव्हिन ओ'ब्रायन ने केवळ ५० चेंडूत शतक झळकाविले होते. यांच्याकडे ब्रायन बंधू, पोर्टरफील्ड, कुसॅक, जॉन मूनी इ. चांगले खेळाडू आहेत. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (११) झिंबाब्वे एल्टन चिगुंबुरा*, रेजिस चकाब्वा, टेंडाई चटारा, चामू चिभाभा, क्रेग एरविन, टफाड्झ्वा कामुंगोझी, हॅमिल्टन मसाकाड्झा, स्टुअर्ट मॅट्सिकेन्येरी, सॉलोमन माईर, तवांदा मुपारिवा, तिनाशी पन्यानगारा, सिकंदर रझा, ब्रेंडन टेलर, प्रॉस्पर उत्सेया, शॉन विल्यम्स झिंबाब्वेने कधी कधी बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. परंतु हा संघ लिंबूटिंबू संघच आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१२) अफगाणिस्तान मोहम्मद नबी*, अफसर झझाई, अफताब आलम, अश्गर स्टानिकझाई, दौलत झद्रान, गुलबदीन नैब, हमिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अश्रफ, नजीबुल्ला झद्रान, नासिर जमाल, नवरोझ मंगल, समीउल्ला शेनवारी, शापूर झद्रान, उस्मान घनी, हशमतुल्ला शैदी, इझातुल्ला दौलतझाई, शफीकुल्ला, शराफुद्दीन अश्रफ अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. मागील वर्षी ट-२० विश्वचषक स्पर्धेत या संघाने बांगलादेश संघाला हरवून धक्का दिला होता. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१३) स्कॉटलँड प्रेस्टन मॉमसेन*, कायल कोएटझर, रिची बेरिंगटन, फ्रेडी कोलमॅन, मॅथ्यू क्रॉस, जॉश डेव्ही, अ‍ॅलासडेर इव्हान्स, हॅमिश गार्डिनर, मजिद हक, मायकेल लीस्क, मॅट मॅकन, कॅलम मॅकलीऑड, सफयान शरीफ, रॉब टेलर, ईयान वॉर्डलॉ हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१४) युनायटेड अरब अमिराती मोहम्मद तकीर*, खुर्रम खान, अमजद अली, अमजद जावेद, अ‍ॅंड्री बेरेंगर, फहाद अल्हाश्मी, मंजुळा गुरूगे, कामरान शहजाद, कृष्णा चंद्रन, मोहम्मद नवीद, नासिर अझीझ, स्वप्निल पाटील, रोहन मुस्तफा, सकलेन हैदर, शैमन अन्वर हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या संघात ठाण्याचा मराठमोळा स्वप्निल पाटील हा यष्टीरक्षक आहे. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. ________________________________________________________________________________ लिंबूटिंबू संघांकडून फारसे अपसेट्स होतील असे वाटत नाही. विश्वचषक स्पर्धेच्या आजपर्यंतच्या इतिहासात आजतगायत अंदाजे ३२५ हून अधिक सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी फक्त १४ सामन्यात (म्हणजे फक्त ४ टक्के सामन्यात) अनपेक्षित निकाल लागलेला आहे. खालील यादीवरून हे लक्षात येईल. (१) १९७९ - भारत वि. श्रीलंका (श्रीलंका विजयी) (२) १९८३ - ऑस्ट्रेलिया वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी) (३) १९९६ - वेस्ट इंडीज वि. केनया (केनया विजयी) (४) १९९९ - भारत वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी) (५) १९९९ - बांगलादेश वि. पाकिस्तान (बांगलादेश विजयी. हा सामना फिक्स केलेला होता असा दाट संशय आहे.) (६) २००३ - केनया वि. झिंबाब्वे (केनया विजयी) (७) २००३ - केनया वि. श्रीलंका (केनया विजयी) (८) २००७ - भारत वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी) (९) २००७ - पाकिस्तान वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१०) २००७ - द. आफ्रिका वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी) (११) २००७ - झिंबाब्वे वि. आयर्लँड (सामना बरोबरीत) (१२) २००७ - बांगलादेश वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१३) २०११ - इंग्लंड वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१४) २०११ - बांगलादेश वि. इंग्लंड (बांगलादेश विजयी) २००७ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागले होते. आतापर्यंत बांगलादेश, केनया, आयर्लँड व झिंबाब्वे यांनीच सर्वाधिक अपसेट्स केलेले दिसताहेत. एकंदरीत २०१५ मध्ये लिंबूटिंबू संघ एखाददुसरा अपसेट करू शकतील. परंतु त्या निकालाने फार फरक पडेल असे वाटत नाही. ________________________________________________________________________________

माझे अंदाज

१९८७ पासून भारताची कामगिरी एकाआड एक स्पर्धेत चांगली होत आहे. भारताने १९८७ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, १९९२ मध्ये भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. भारताने नंतर १९९६ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण १९९९ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. २००३ मध्ये भारत चक्क अंतिम फेरीत पोहोचला, पण २००७ मध्ये भारतावर प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की आली. त्यापाठोपाठ २०११ मध्ये भारत चक्क विजेता बनला. हाच क्रम सुरू राहिला तर भारताला २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची आशा नाही. याच्या बरोबर उलटा क्रम दक्षिण आफ्रिकेचा आहे. दक्षिण आफ्रिकेने १९९२, १९९९ व २००७ च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली, तर १९९६, २००३ व २०११ मध्ये ते उपांत्य फेरीपूर्वीच गारद झाले. या इतिहासावरून असं वाटतंय की २०१५ मध्ये हा संघ नक्की उपांत्य फेरीत पोहोचणार. यातला योगायोगाचा भाग सोडला तरी भारताची गेल्या काही काळातील कामगिरी पाहिली तर या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याची शक्यता धूसर दिसतेय. २०११ च्या तुलनेत भारताचा संघ खूपच दुर्बल वाटतो. २०११ च्या संघातील तब्बल ११ खेळाडू या संघात नाहीत. त्यांच्या जागी जे आले आहेत ते तितके चांगले नाहीत. शिखर धवन, जडेजा, रायडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, अश्विन इ. खेळाडूंच्या कामगिरीबद्दलच शंका आहे. त्यांच्याऐवजी मुरली विजय, रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज सिंग इ. खेळाडू हवे होते. मुरली विजय इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर चांगला खेळल होता. रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज हे स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहेत. अक्षर पटेल, धवन, अश्विन हे तिघेही ऑस्ट्रेलियात संपूर्ण अपयशी ठरले आहेत. रायडूलाही फारसा प्रभाव पाङता आलेला नाही. जडेजा जवळपास साडेतीन महिने दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब होता. तो नंतर एकच सामना खेळला व त्यातही अपयशी ठरला. स्टुअर्ट बिन्नी २ सामने खेळला. त्यातल्या एक सामन्यात त्याने बर्‍यापैकी फलंदाजी केली व दुसर्‍या सामन्यात बर्‍यापैकी गोलंदाजी केली. परंतु त्याच्याऐवजी युवराज सिंग कधीही जास्त योग्य ठरला असता. भारतीय गोलंदाजांबद्दल काहीच बोलण्यासारखं नाही. स्वतः धोनी निवृत्तीच्या मूडमध्ये असल्याने त्याच्या देह्बोलीतून उत्साहाचा पूर्ण अभाव जाणवितो. हे सर्व लक्षात घेता भारत या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणार नाही असे मला वाटते. माझ्या अंदाजानुसार द. आफ्रिका, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका हे चार संघ उपांत्य फेरीत असतील. अंतिम लढत न्यूझीलॅंड व द. आफ्रिकेत होऊन द. आफ्रिका विजेता होईल. न्यूझीलँड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया 'अ' गटात व द. आफ्रिका 'ब' गटात असल्याने उपांत्यपूर्व फेरीतच द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया किंवा द. आफ्रिका वि. न्यूझीलॅंड किंवा द. आफ्रिका वि. श्रीलंका असा सामना होण्याची ७५ टक्के शक्यता आहे. तसे झाले तर उपांत्य फेरीतील संभाव्य ४ संघातील एक संघ उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत होईल व त्यामुळे इंग्लंड, भारत किंवा पाकिस्तानला उपांत्य फेरीत जायची संधी मिळू शकेल. कदाचित त्यामुळे अंतिम फेरीत अंदाजापेक्षा एखादा वेगळाच संघ असेल. ________________________________________________________________________________ विनंती - वरील लेखातील तपशिलात काही चुका असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात.

वाचने 98819
प्रतिक्रिया 361

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेकंड स्पेल मस्त टाकला त्याने. अशिव च्या गोलंदाजीवर लावलेला शॉर्ट लेग आणि स्लीप या आक्रमक फिल्डींग मुळे मिळालेली सोहेलची विकेट जबरदस्त. धीनी ला पुर्ण श्रेय या फिल्डींग साठी आणि उमर अकमल ला घेतलेला रीव्हिव्य पण ग्रेट, बॅटला बॉल लागला आहे हे ते तंत्रद्नान पण निट दाखवु शकले नाही. थर्ड हंपायर चे धन्यावाद या निर्नयासाठी , कारण चेंडु खुप थोडासा कड घेवुन गेला होता

In reply to by गणेशा

रिप्लेमध्ये चेंडू बॅटची अगदी पुसटसी कड घेऊन गेल्याचे दिसत होते. परंतु चेंडू बॅटपाशी येण्यापूर्वी चेंडूची शिवण सरळ दिसत होती आणि बॅटपासून पुढे जाताना चेंडूची दिशा किंचित बदललेली असून शिवण वेडीवाकडी झालेली दिसत होती. त्यामुळे चेंडूचा बॅटला स्पर्श झाला हे स्पष्ट झाले.

३६.२ पाकची आशा केवल मिस्बाह उल हक वर... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

४२ ओव्हर मिस्बाह खेलतोय पण पाक म्याच जिंकतील असं काही वाटत नाही. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद. मजा आली. दिलीप बिरुटे

जिंकला भारत, माझा अंदाज होताच २८० रन्स पण खुप होतील पाकिस्तान ला ( ते इंझमाम उल हक, जावेद मियादाद अश्या प्लेअर ला मिडल ऑर्डर मध्ये नक्कीच मिस करत असतील) सोमवार च्या मॅच चा माझा अंदाज (तसे कोणीही सांगु शकेन, पण सगळ्या वर्ल्ड कप मॅचेस चे प्रेडिक्शन देण्याचे ठरवले आहे) ५. West Indies Vs Ireland विजेता West Indies ( परंतु आयर्लंड पण खुप टफ देवु शकेन असे वाटते आहे, विशेष करुन टॉप ऑर्डर चांगली आहे त्यांची) कदाचीत मॅच रिझल्ट बदलण्याची क्षमता त्यांच्यात असेनही)

In reply to by श्रीगुरुजी

हो, आयर्लंड आणि स्कॉटलंड चांगले संघ आहेत. तरीही वेस्ट इंडिजच जिंकेन, बाकी खाली दिलेले विस्लेशन आवडले, तरीही टर्निंग पॉइंट मला तरी दूसरी विकेट वाटली.. (अवांतर : कंपणीमध्ये थे प्रेडीक्टर म्हणुन गेम आहे, त्यात प्रेडिक्शन द्यायचेच आहे, त्यामुळॅ येथेही देतोय. खरे तर IPL ला जास्त मजा येते गेसिंग ला, येथे बरेचसे रिझल्ट अ‍ॅनालाईज करु शकतो आपण)

In reply to by गणेशा

आयरीश टीम माझ्या आवडत्या टीम्स पैकी एक आहे. जबराट खेळतायत आज. त्यांच्याकडून किमान १ अपसेट अपेक्षीत आहेच. पण आज जे काही खेळतायत ते पाहून ही टीम या वेळेस जड जाऊ शकते की काय असं वाटतंय. तसेही आयरीश सध्या आयसीसीवर जाम चिडलेले आहेत (पुढच्या वर्ल्ड कप पासून परत दहा देश खेळवण्याच्या निर्णयाने). बहूतेक तो सगळा राग इथे निघणार आहे. :)

In reply to by गणेशा

चला पहिला अंदाज चुकला. आर्यंलंड टफ देणार असे वाटले होतेच, तरीही म्हंटले निदान गेल आणि इतर स्ट्रोक प्लेअर मुळे वेस्ट इंडिज थोडे भारी पडेल. पण नाही. वेस्ट इंडिज चे गत वैभव कधीच पुन्हा त्यांना प्राप्त होणार नाही का ?

In reply to by गणेशा

आयरीश धावांचा पाठलागही चांगले करतात. डॉकरेल चांगला फिरकी गोलंदाज आहे, आणि इतर कमजोर संघांच्या उलट यांच्या संघाची फलंदाजी बर्‍यापैकी खोलवर चालते. योग्य संधी मिळाल्या तर हा संघ झिंबाब्वे आणि बांग्लादेशच्या मानाने बरीच प्रगती करू शकतो. (अफगाणिस्तान सुद्धा त्या मार्गावर आहे, पण त्यांचे भविष्य कायम अंधारात असते).

In reply to by थॉर माणूस

स्कॉट्लंड पण मस्त संघ आहे. जर हे दोन संघ अआणि झिंबाब्वे आणि बांग्लादेश मस्त खेळायला लागले तर मजा येइन

In reply to by गणेशा

आयर्लंड जिंकले ४ गडी राखून... स्कॉटलंड मधे अजूनही क्रिकेटचे वेड आयर्लंड इतके पसरत नसल्याने त्यांचा संघ थोडा मागे पडतो (टॅलेंट हंट मधे मार खातात). आयरीशना मोठ्या संघांची शिकार करायची आता सवय होत चालली आहे (इंग्लंड यांचे खेळाडू ढापत असतो तरी), जे एक चांगला संघ निर्माण होत असल्याचे लक्षण आहे. अफगाणिस्तान हा एक "नथिंग टू लूज" अ‍ॅटीट्यूडवाला संघ आहे, ते जीव ओतून खेळतात. त्यामुळे त्यांची प्रगती झालेली पहायलाही आवडेल. झिंबाब्वे इतकी वर्षे खेळूनही पुढे का सरकत नाही ते मात्र मला अजूनही समजलेले नाही. माझ्या मते आता पुढचा इंटरेस्टींग सामना परवा आहे. फिरकीविरुद्धचा अननुभव भोवला नाही तर अफगाणिस्तान बांग्लादेशला रडवू शकते.

मजा आली. अपेक्षेप्रमाणे भारत आणि द. आफ्रिका जिंकले. पण द. आफ्रिका वि. झिंबाब्वे अपेक्षेइतका एकतर्फी झाला नाही. झिंबाब्वेने जोरदार झुंज दिली. आफ्रिकेला फक्त ६२ धावांनी विजय मिळाला. काल किवीज आणि कांगारू तगड्या संघाविरूद्ध तब्बल ९८ आणि १११ धावांच्या फरकाने जिंकले होते. त्या तुलनेत आफ्रिकेला लिंबूटिंबू संघाविरूद्ध कमी धावांनी विजय मिळाला. प्रथम फलंदाजी करताना एकवेळ झिंबाब्वेने आफ्रिकेची अवस्था २०.२ षटकांत ४ बाद ८३ अशी केली होती. परंतु नंतर त्यांची गोलंदाजी ढेपाळली. फलंदाजी करतानाही एक वेळ झिंबाब्वे ३६ षटकात ३ बाद २१४ अशा भक्कम स्थितीत होते. परंतु नंतर त्यांचा डाव कोसळला. आपण मात्र मस्त ७६ धावांच्या फरकाने जिंकलो. खरं तर रोहीत व धवन दोघेही लवकर बाद होऊन मधल्या फळीवर दबाव येईल असे वाटले होते. रोहीत आखूड टप्प्याचा चेंडू पुढे येऊन उचलून मारायला गेला आणि फक्त १५ वर तंबूत परतला. धवन मस्त खेळला. त्याच्याबाबतीत माझा अंदाज पूर्ण चुकला. परंतु सुखद अपेक्षाभंग झाला. सुदैवाने रैना व कोह्ली योग्य वेळी फॉर्मात येऊन मस्त खेळले. ४० षटकांत भारत २ बाद २१७ होता. किमान ३२५ होतील असे वाटत होते. ४५ व्या षटकांत २ बाद २७३ वरून भारताला जेमतेम ३०० चा आकडा गाठता आला. २०११ मध्ये भारत ३८.५ षटकांत १ बाद २६९ वरून सर्वबाद २९६ असा कोसळला होता. तोच सामना आठवायला लागला. तरीही ३०० धावा पुरेश्या होत्या. यापूर्वी भारताने पाकड्यांविरूद्ध विश्वचषकात २८७, २६०, २२७ आणि २१६ अशी धावसंख्या रचून सामने २८ ते ४७ धावांच्या फरकाने जिंकले आहेत. त्यामुळे ३०० धावा विजयासाठी नक्कीच पुरेश्या होत्या. पाकडे सुरवातीचे २०-२२ षटके चांगले खेळत होते. २२ षटकांत २ बाद ९८ ही चांगली दमदार सुरूवात होती. परंतु २ बाद १०२ वरून ५ बाद १०३ झाल्यावर आपला विजय नक्की झाला. २४ वे आणि २५ वे षटक सामन्याला निर्णायक वळण देणारे ठरले. भारत उपांत्यपूर्व फेरीतच हरेल असा माझा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अंदाज होता. आजच्या खेळावरून असं वाटतंय की भारत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता वाढलेली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

शिखर धवन आणि रैना चांगले खेळतील हा अंदाज पण बरोबर आला माझा, मस्त वाटले. मॅच ला मजा आली, तरी आनखिन थोडा पाकिस्तान कडुन प्रतिकार अपेक्षित होता.

झिंबाब्वे अपसेट करेल असे दिसत होते, पण ते थोडक्यासाठी कमी पडले. आयर्लंडने मात्र विंडीजला चीत केलं. आता कुठलीच टीम मिनो राहिली असं म्हणता येणार नाही ....

मॅच ६ , न्युझीलंड vs स्कॉटलंड विजेता : न्युझीलंड (स्कॉटलंड ची बॅटींग चांगली आहे, परंतु न्युजिलंड बॉलर स्कॉटलंड च्या बॉलर पेक्षा सरस असल्याने मॅच न्युझीलंड जिंकेन

आयर्लँडने स्पर्धेतला पहिला धक्कादायक निकाल नोंदविला. २००७ मध्ये त्यांनी पाकिस्तान व बांगलादेशाला हरविले होते तर झिंबाब्वेवरचा सामना बरोबरीत सुटला होता. २०११ मध्ये इंग्लंडच्या ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करून इंग्लंडला हरविले होते. त्याच स्पर्धेत त्यांनी हॉलंडच्या २९४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आज विंडीजच्या ३०४ धावांचा यशस्वी पाठलाग केला. एकंदरीत आयर्लँड चांगले चेसर दिसताहेत. या सामन्याचा माझा अंदाज पूर्ण चुकला. विंडीजने ५ बाद ८७ वरून ३०४ अशी चांगली धावसंख्या रचली होती. विंडीजची गोलंदाजी सुमार आहे हे माहित होते. परंतु आयर्लँडसारखा संघ इतकी मोठी धावसंख्या आरामार पार करू शकेल इतकी फालतू गोलंदाजी विंडीजचे गोलंदा़ज टाकतील असे वाटले नव्हते. असो. पुढील ३ सामन्यांसाठी अंदाज. (६) मंगळवार १७ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (७) बुधवार १८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. बांगलादेश, स्थळ - कॅनबेरा (८) गुरूवार १९ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), यूएई वि. झिंबाब्वे, स्थळ - नेल्सन संभाव्य विजेते - न्यूझीलँड, बांगलादेश आणि झिंबाब्वे. अफगाणिस्तान बांगलादेशला चांगलीच झुंज देणार हे नक्की.

आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने ३००+ धावा केलेल्या आहेत. पॉवरप्ले नसलेल्या ३५ षटकांत ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर फक्त ४ क्षेत्ररक्षक ठेवण्याचा नवीन नियम गोलंदाजांच्या मुळावर येतोय. तसेच दोन्ही चेंडू नवीन असल्याने फिरकी मारा फारसा प्रभावी होत नाहीय्ये. त्यामुळे धावा रोखण्याला आपोआपच मर्यादा आल्यात.

आज अपेक्षेप्रमाणेच किवीजनी स्कॉटलँडला हरविले. पण हा लो स्कोअरिंग सामना झाला. आधीच्या ५ सामन्यातल्या १० डावांपैकी ६ डावात ३००+ धावा होत्या तर उर्वरीत ४ डावात किमान २२४ धावा झाल्या होत्या. आज दोन्ही डावात १५० हून कमी धावा झाल्या. १४३ धावांच्या किरकोळ आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलँडने ७ गडी गमाविले. याचा अर्थ स्कॉटलँडची गोलंदाजी उच्च दर्जाची होती असा नाही. न्यूझीलॅंडच्या फलंदाजांनी हा सामना फारसा गंभीरतेने न घेता भराभरा विकेट्स फेकल्यामुळे त्यांचे ७ गडी बाद झाले. स्कॉटलँडच्या डावात त्यांचे तब्बल ४ फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाले. हा कदाचित एक विक्रम असावा.

मॅच ७: अफगानिस्तान vs बांग्लादेश , संभाव्य विजेता : अफगानिस्तान

अपेक्षेप्रमाणे बांगलादेश अफगाणिस्तानविरूद्ध व झिंबाब्वे यूएई विरूद्ध विजयी ठरले. झिंबाब्वेने धावांचा पाठलाग करण्यात खूपच सुधारणा केली आहे. अफगाणिस्तान व यूएईचा अनुभव कमी पडला. उद्याच्या न्यूझीलँड वि. इंग्लंड सामन्यात न्यूझीलँड आपला लागोपाठ तिसरा विजय मिळविण्याची व इंग्लंडचा लागोपाठ दुसरा पराभव होण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंड जरी उद्या दुसरा सामना हरले तरी त्यांची पुढील वाट सोपी आहे. त्यांच्या उर्वरीत ४ सामन्यांपैकी ३ सामने लिंबूटिंबू संघाबरोबर आहेत व एक सामना श्रीलंकेशी आहे. त्यामुळे गटात वरचे स्थान मिळविण्यासाठी व निव्वळ धावगती उंचावण्यासाठी त्यांच्याकडे सोपे सामने शिल्लक आहेत.

मॅच ९ : न्यूझीलँड वि. इंग्लंड जरी सगळीकडे न्युझीलंड जिंकणार असेच बोलले जात असले तरी मला इग्लंड जिंकेन असेच वाटते आहे. त्यामुळे माझा संभाव्य विजेता : इग्लंड. मॉर्गन सर्वात जास्त रन काढण्याची शक्यता

In reply to by गणेशा

आपली वाटचाल श्रीगुरुजींच्या नक्शेकदमवर चालु आहे....आपला दुसरा होरा मोडीत निघत आहे.... इंग्लंड मानहानीकारक पराभवाकडे अग्रेसर...

In reply to by असंका

इंग्लंडचा इतका दारूण पराभव होईल असे वाटले नव्हते. असो. इंग्लंडची पुढील वाटचाल सोपी आहे. ४ पैकी ३ सामने लिंबूटिंबू संघांबरोबर आहेत. त्यामुळे निदान ४ थ्या क्रमांकाने तरी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करायला हरकत नाही. 'ब' गटात वेस्ट इंडीज मात्र अडचणीत आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना उद्या पाकड्यांविरूद्ध जिंकलेच पाहिजे. उद्या विंडीजच जिंकतील असं वाटतंय.

In reply to by गणेशा

इतकं वाईट वाटून घेऊ नका, त्यातले ३ प्रेडीक्शन्स तर आधीच गंडलेत. :) उगाच कुणीतरी पुडी सोडून देतं आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या बिंडोक फॉरवर्डवाल्या जमान्यात लोक लगेच दोरीलापण साप ठरवून मोकळे होतात.

In reply to by गणेशा

>>> आणि नेट वर सगळे प्रेडिक्शन आधीच आले होते असे कळाल्याने वाईट वाटले. नेट किंवा व्हॉट्सअप वर फिरणार्‍या अशा भाकितांवर विश्वास ठेवू नका हो. काही जणांना पुड्या सोडून इतरांची मजा बघायची असते. काल दुपारी अचानक व्हॉटसअप वर "लोणावळ्याजवळ अपघातात शक्ती कपूर गेल्याचा" असा कोठूनतरी आलेला संदेश फॉरवर्ड केला होता. विश्वास ठेवलाच नव्हता. असल्या अफवा पसरवून कोणाला कसला आनंद मिळतो खुदा जाने. काही भोळेभाबडे लोक विचार न करता, बातमीची सत्यासत्यता पारखून न घेता लगेच असल्या अफवा पुढे पाठवितात. बहुदा "सबसे तेज" हा बहुमान त्यांना मिळवायचा असावा.

आज भारतीय वेस्ट इंडीज ने जिंकावे म्हणून तर रविवारी तमाम पाकिस्तानी दक्षिण आफ्रिकेने जिंकावे म्हणून देवाला साकडे घालतील. तेरी मेरी दुश्मनयारी मग भोकात गेली वल्डकप ची बारी

उद्याचे सामने - (१०) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज, स्थळ - ख्राईस्टचर्च (११) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, स्थळ - ब्रिस्बेन विंडीजला मुख्य भीति पाकड्यांच्या फिरकी गोलंदाजांची होती. पाकिस्तानी संघात सईद अजमल आणि महमंद हफीझ हे दोघेही फिरकी गोलंदाज नसल्याने व मध्यमगती गोलंदाज फारसे भेदक नसल्याने पाकिस्तानची गोलंदाजी खेळणे विंडीजच्या फलंदाजांना फारसे अवघड जाणार नाही. अर्थात विंडीजचे गोलंदाजही सामान्यच आहेत. परंतु विंडीजची फलंदाजी पाकिस्तानच्या तुलनेत तगडी आहे. त्यामुळे उद्या विंडीज जिंकतील असं वाटतंय आणि विंडीज जिंकावे हीच इच्छा आहे. दुसर्‍या सामन्यात ऑसीज बांगलावर एकतर्फी विजय मिळवतील असं दिसतंय. या सामन्यात पावसाचा व्यत्यय यायची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला तर बांगलाला विनासायास मिळालेल्या १ गुणामुळे इंग्लंड व श्रीलंकेची पंचाईत होईल.

विंडीज वि. पाकडे या सामन्याचा अंदाज खरा ठरला. पाकडे हरले. ते हरणारच होते, पण अत्यंत वाईट पद्धतीने हरले. धावांचा पाठलाग करताना पाकड्यांची नेहमीच दमछाक होते ही वस्तुस्थिती असताना नाणेफेक जिंकूनसुद्धा गोलंदाजी का घेतली ते समजलेच नाही. त्यानंतर सर्फराजऐवजी नासिर जमशेदला का घेतले तेही समजले नाही. युनुस खान हा ४ थ्या किंवा ५ व्या क्रमांकावर चांगला खेळतो. त्याला आजच्या सामन्यात सुद्धा ३ र्‍या क्रमांकावर का पाठविले ते समजले नाही. क्षेत्ररक्षण करताना पाकड्यांनी ५ झेल सोडले. २५ वे षटक संपल्यावर विंडीजची धावसंख्या फक्त १०६ होती. उर्वरीत २५ षटकांत विंडीजच्या फलंदाजांनी तब्बल २०४ धावा चोपल्या. त्याचे मुख्य कारण म्हणजे सोडलेले झेल, गचाळ क्षेत्ररक्षण आणि स्वैर गोलंदाजी. विंडीजने २५० च्या पुढे धावसंख्या नेली तेव्हाच पाकिस्तान हरणार हे दिसत होते. पाकड्यांच्या फलंदाजांचे हाल बघवत नव्हते. धावफलकावर फक्त १ धाव असताना ४ पाकडे तंबूत परतले होते. सर्वजण झेलबाद झाले होते. 'कॅचेस विन मॅचेस' हे आज पुन्हा एकदा पाकड्यांना समजलं असेल. फक्त ३.१ षटकात ४ बाद १ आणि इथेच पाकड्यांचा पराभव निश्चित झाला. पहिला सामना ७६ धावांनी आणि आजचा दुसरा सामना १५० धावांनी हरल्यामुळे पाकिस्तानची निव्वळ धावगती अत्यंत वाईट अवस्थेत आहे. पाकड्यांनी उर्वरीत ४ सामन्यांपैकी किमान ३ सामने जिंकावे लागतील आणि तेही मोठ्या फरकाने. तरच त्यांना बाद फेरीत प्रवेश करता येईल. वेस्ट इंडीजच्या गेलचा अपवाद वगळता सर्व फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजीतही सर्वच गोलंदाजांना बळी मिळाले. गेल पुन्हा एकदा अपयशी ठरला. गेल्या अनेक वर्षात गेल कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यात क्वचितच चांगला खेळला आहे. आयपीएल मध्ये मात्र तो धावांचा रतीब टाकतो. विंडीज व्यवस्थापनाने धाडसी निर्णय घेऊन पुढील सामन्यांसाठी गेलला वगळावे व किमार रोचला आत आणावे. दुसरीकडे बांगला वि. ऑसीज सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले. त्यामुळे इंग्लंड व श्रीलंकेची अडचण झाली आहे. इंग्लंडला उर्वरीत सर्व ४ सामने जिंकावे लागतील. श्रीलंकेलाही उर्वरीत ५ पैकी ४ सामने जिंकावे लागतील. अन्यथा उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेश येऊ शकतो.

उद्याचे सामने - (१२) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. श्रीलंका, स्थळ - ड्यूनेडीन (१३) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. द. आफ्रिका, स्थळ - मेलबोर्न श्रीलंका अफगाणिस्तानविरूद्ध सहज जिंकेल. भारत व द. आफ्रिका विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ३ वेळा लढले आहेत व तीनही सामन्यात द. आफ्रिकेने विजय मिळविला होता. उद्याच्या सामन्यातही इतिहासाची पुनरावृत्ती होणार. एकच उत्सुकता आहे ती म्हणजे भारत किती धावांच्या फरकाने हरणार. भारताची प्रथम फलंदाजी असल्यास भारत जिंकण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे भारताने नाणेफेक जिंकल्यास क्षेत्ररक्षण घेऊन धावांचा पाठलाग करावा. कदाचित दुसरी फलंदाजी असल्यास भारत जिंकण्याची थोडीफार शक्यता आहे. असो. भारत जिंकावा हीच मनोमन इच्छा आहे, परंतु तसे होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

अंदाज १२. अफगाणिस्तान वि. श्रीलंका : श्रीलंका १३. भारत वि. द. आफ्रिका: द. आफ्रिका १४. इंग्लंड वि. स्कॉटलंड : इंग्लंड

भारत आजचा सामना १००% हरणार तरी म्याच पाहणार धन्यवाद. -दिलीप बिरुटे

१५ षटकं झालीत काफी धीमा क्रिकेट देखनेको मिल रहा है -दिलीप बिरुटे

३७ ओव्हर्स झाल्यात शेवटच्या १३ षटकात किती धावा येतात बघू तो स्टेन लै तोफगोळे डागतोय. राहाणे फार्मात आणि शिखर ११४ वर खेलतोय.

द. अफ्रिका चक्क पराभवाच्या दारात...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दा रु ण!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वाचले "दारूणे" मॉनीटर बदलू काय ??? बाकी अजिंक्य खरा वारसदार आहे द्रवीडचा, "शिस्तीत फटके" आणि "सुमडीत धावा" या बाबतीत !!

अफगाणिस्तान ने श्रीलंकेला रडवलं अक्षरशः. थोडक्यात वाचलेत श्रीलंकन्स. यावेळेस खेळणारे छोटे संघ सुद्धा बर्‍यापैकी तयार दिसतायत. अगदी एकतर्फी झालेल्या सामन्यांपैकी त्यामाने कमीच छोट्या संघांविरूद्ध आहेत. नाहीतर मोठ्या फरकाने हरलेले संघ पहा... इंग्लंड, पाकीस्तान, दक्षिण आफ्रिका. :)

निकाल बघता आपण उपांत्यपूर्व फेरी गाठणार हे नक्की ! आणि आपण प्रथम क्रमांकाने गाठू शकतो . तसे झाल्यास (४) शनिवार २१ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील चौथा सामना ('अ' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ) , स्थळ - वेलिंग्टन आपल्याला इंग्लंड / श्रीलंका सोबत खेळावे लागेल असा अंदाज आहे .

In reply to by कपिलमुनी

भारत उपांत्यपूर्व फेरी गाठणार यात कधीच शंका नव्हती. उपांत्य फेरीत पोहोचेल का नाही हीच मुख्य शंका होती. भारत आपल्या गटात दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमांकावर राहील असे सुरवातीला वाटत होते व त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड किंवा श्रीलंका यांच्याशी गाठ पडून सामना अवघड जाईल असे वाटत होते. परंतु आता भारत 'ब' गटात प्रथम क्रमांकावर असेल हे नक्की. त्यामुळे 'अ' गटातील ४ था संघ भारताबरोबर उपांत्य फेरीत खेळेल. तो संघ श्रीलंका किंवा इंग्लंड असेल. कदाचित बांगलादेशही असेल कारण बांगलाला ऑस्ट्रेलियाबरोबरील सामना रद्द झाल्याने १ बोनस गुण मिळाला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ इंग्लंडशी पडू नये हीच इच्छा. कारण नुकत्याच संपलेल्या तिरंगी मालिकेत भारत इंग्लंडविरूद्ध दोन्ही सामने हरला. बांगलादेश प्रतिस्पर्धी म्हणून आला तर सोन्याहून पिवळे.

भरतीय संघाची जबरदस्त कामगिरी धवनला संघात घेऊ नये असे वाटत होते. पण धवनने बॅटनेच तोंड बंद केले. जबरदस्त फोर्म. २ महिन्यापुर्वीचे शामी आणि धवन हेच का असे वाटतय त्यांचा खेळ बघुन. रहाणेची फलंदाजी तर प्रेक्षणीय बाकी जडेजाने बॅटींगमधे चांगले योगदान द्यायची गरज आहे. आपल्या गटात आपण एक नंबरला किंवा फार तर २ नंबरला राहु असे दिसतय. ३/४ राहिलो तर उपांत्य फेरी ऑसीज किंवा किवीज आता ब्रिटीश किंवा लंका

कालचा अंदाज पूर्ण चुकला याचा आनंद होतोय. अजून विश्वासच बसत नाहीय्ये की आपण द. आफ्रिकेसारख्या एका अत्यंत तगड्या संघाला प्रचंड फरकाने पाणी पाजले. धवनमध्ये एकदम बदल झालाय. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत आणि नंतरच्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत तो पूर्ण अपयशी होता. आता एकदमच बदललाय. आता पुढची वाटचाल सोपी आहे. 'ब' गटात प्रथम क्रमांकावर असणार आपण बहुतेक. काल अफगाणिस्तानने श्रीलंकेची हवा टाईट केली होती. शेवटी लंकन्सच जिंकले. आतापर्यंतच्या १४ सामन्यात एकूण २६ डाव फलंदाजी झाली (एक सामना पावसामुळे रद्द झाला). तब्बल १० डावात फलंदाजांनी ३००+ धावा केल्यात. प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने १४ पैकी (खरं तर १३ पैकी) तब्बल ९ सामन्यात ३००+ धावा केल्यात व त्यातले ८ जिंकलेत. फक्त एकाच सामन्यात दुसर्‍या डावात फलंदाजी करणार्‍या संघाने ३००+ धावा करून सामना जिंकला. क्षेत्ररक्षणातील फलंदाजधार्जिण्या नवीन नियमामुळे धावांचा रतीब वाढलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाला लवकरच हे बदल रद्द करावे लागतील, नाहीतर खेळातील मजा कमी होईल. या विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत श्वास रोखून धरणारा एकही सामना झाला नाही. बहुतेक सामने एकतर्फी आणि मोठ्या फरकाने विजयाचे/पराभवाचे ठरले. १३ पैकी ११ सामने प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने जिंकले आणि ते सुद्धा खूप मोठ्या फरकाने. ५० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला, जेमतेम १ धावेने विजय मिळविलेला, बरोबरीत सुटलेला किंवा जेमतेम १ गडी राखून विजय मिळविलेला अजूनपर्यंत एकही सामना झालेला नाही. फलंदाजधार्जिण्या नवीन नियमांमुळे सामन्यातील थरारकता कमी झालेली दिसतेय.

आतापर्यंत झालेल्या १४ पैकी ११ सामन्यांचे अंदाज बरोबर आले व २ चुकले. १ सामना रद्द झाला. भारत वि. द. आफ्रिका सामन्याचा अंदाज चुकल्याचा आनंदच झाला. पुढील २ सामने - (१५) मंगळवार २४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), वेस्ट इंडीज वि. झिंबाब्वे, स्थळ - कॅनबेरा (१६) बुधवार २५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. यूएई, स्थळ - ब्रिस्बेन वेस्ट इंडीज जिंकेल असं वाटतंय. अर्थात झिंबाब्वेला कमी लेखून चालणार नाही. दुसरीकडे आयर्लँड यूएई विरूद्ध अगदी सहज जिंकेल.

रोहीत शर्मा दोन्ही सामन्यात अपयशी झाला आणि ते दोन्ही सामने भारताने जिंकले. रोहीत शर्मा अपयशी ठरेल तो सामना भारत जिंकतो असा सिद्धांत मांडायला हरकत नाही.

In reply to by किसन शिंदे

सध्या तरी तो एका सामन्यातील धावा ५ सामने खेळून काढतोय. *LOL* भारताचा पुढचा सामना यूएई बरोबर आहे. त्यामुळे रोहीत शर्माला चंगळ करायची संधी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

रोहित शर्माला चंगळ करायची संधी आहे म्हणजे काय हो श्रीगुरुजी? तो भरपूर रन काढेल या मॅचमध्ये असं भाकित वर्तवताय का आपण? पण मग भारताच्या जिंकण्याची काही संधीच रहाणार नाही ना आपल्या मते? कारण भारत जिंकण्यासाठी रोहित अपयशी ठरला पाहिजे म्हणे....?

In reply to by असंका

चंगळ करायची संधी म्हणजे भरपूर धावा. तो विंडीजविरूद्धही चंगळ करणार. कदाचित तिसरे द्विशतकही लावेल. सध्याच्या स्पर्धेत रोहीत दोन्ही सामन्यात अपयशी होता आणि दोन्ही सामने आपण जिंकले. याचा अर्थ असा नव्हे की तो यशस्वी झाला तर भारत हरेल. गणितातली कॉन्व्हर्स नावाची संकल्पना माहिती असेल ना? *LOL*

In reply to by श्रीगुरुजी

रोहीत शर्मा दोन्ही सामन्यात अपयशी झाला आणि ते दोन्ही सामने भारताने जिंकले. रोहीत शर्मा अपयशी ठरेल तो सामना भारत जिंकतो असा सिद्धांत मांडायला हरकत नाही.
हे एक झालं. याचाच व्यत्यास म्हणजे रोहित शर्मा यशस्वी ठरला की तो सामना भारत हरतो.
सध्याच्या स्पर्धेत रोहीत दोन्ही सामन्यात अपयशी होता आणि दोन्ही सामने आपण जिंकले. याचा अर्थ असा नव्हे की तो यशस्वी झाला तर भारत हरेल.
गुरु़जी वरच्या दोन्ही प्रतिसादातली पहिली वाक्य अगदी सेम टु सेम आहेत. पण निष्कर्श केवढे विरुद्ध..? १. रोहित अपयशी= भारत यशस्वी २. रोहित यशस्वी= भारत यशस्वी म्ह्णजेच रोहित अपयशी=रोहित यशस्वी!! रोहित खरंच आपला नावडता आहे याबद्द्ल आता शंका येऊ लागली आहे!!
गणितातली कॉन्व्हर्स नावाची संकल्पना माहिती असेल ना?
नाही...माहित नाही. कृपावंत होऊन सांगणेचे करावे...!! :-))

In reply to by असंका

>>> १. रोहित अपयशी= भारत यशस्वी २. रोहित यशस्वी= भारत यशस्वी म्ह्णजेच रोहित अपयशी=रोहित यशस्वी!! नाही, नाही. चुकीचे तर्कशास्त्र आणि चुकीचा निष्कर्ष आहे. मूळ सिद्धांत खरा असल्याचे सिद्ध करता आले तरी त्याचा कॉन्व्हर्स (व्यत्यास ?) खरा असेलच असे नाही. >>> नाही...माहित नाही. कृपावंत होऊन सांगणेचे करावे...!! पाऊस पडला तर जमीन ओली हो

In reply to by श्रीगुरुजी

चला रोहित शर्माचा आपण एवढा पण राग राग करत नाही हे तरी कळले त्या निमित्ताने...त्याबद्दल तरी मंडळ नक्कीच आपले आभारी आहे. कारण ज्या घाईने आपण आपला वर्जिनल सिद्धांत मांडला होतात, त्यावरून मला तर खात्रीच होती की भारत जिंकण्यासाठी रोहित अपयशी ठरलाच पाहिजे अशी आपली दृढ समजूत असून रोहित अपयशी ठरावा यासाठी आपण देवच पाण्यात घालून बसले आहात!! पण तशी काही भिती आता राहिली नाही असं दिसतंय... आणि कॉन्वर्स म्हणजे व्यत्यास होय? आम्ही मराठी माध्यमवाले हो...घ्या सांभाळून!!

In reply to by असंका

कोण यशस्वी ठरावे आणि कोण अपयशी ठरावे याच्याशी मला देणेघेणे नाही. कोणीही खेळा पण भारतच जिंकला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. आता रोहीत अपयशी ठरल्यावर भारत जिंकतोय असं पहिल्या दोन सामन्यात दिसतंय त्याला मी तरी काय करणार? रोहीत यशस्वी ठरूनसुद्धा भारत जिंकणार असेल तर काहीच हरकत नाही. >>> आणि कॉन्वर्स म्हणजे व्यत्यास होय? आम्ही मराठी माध्यमवाले हो...घ्या सांभाळून!! व्यत्यास हा तुमच्याच आधीच्या प्रतिसादातला शब्द आहे, माझा नाही. असो.

In reply to by श्रीगुरुजी

>>> भारताचा पुढचा सामना यूएई बरोबर आहे. त्यामुळे रोहीत शर्माला चंगळ करायची संधी आहे. अपेक्षेप्रमाणे भारताने यूएईला अगदी सहज लोळविले आणि . . . अपेक्षेप्रमाणेच रोहीत शर्माने मनसोक्त चंगळ केली (५५ चेंडूत नाबाद ५७ धावा, १० चौकार, १ षटकार). *YAHOO* रोहीत शर्माचे आता चंगळ करण्याचे दिवस आलेत. उर्वरीत ३ सामन्यांपैकी झिंबाब्वे व विंडीजविरूद्ध तो हात धुवून घेणार. विंडीजविरूद्ध किमान शतक, कदाचित आपले तिसरे द्विशतकही लावेल. आयर्लँडविरूद्ध तो बहुतेक अयशस्वी ठरेल आणि तो सामना आपण नक्की जिंकणार.

In reply to by श्रीगुरुजी

यस सर!!! चंगळच चंगळ .... (पक्के पुणेकर! अगदी वीस वीस रुपये मिळवले हे वाक्य वीस वीस लाख रुपये मिळवले अशा पद्धतीने म्हणावे! ५५ चेंडूत ५७ धावा! काय चंगळ हो!! खरं म्हणजे त्याने चंगळ केली ती जास्त वेगात धावा करणे शक्य असूनही प्रॅक्टीस मिळवण्यासाठी तिथे उभे राहून...पण त्याचा उल्लेख आपण करणार नाही. खा रोज शिकरण खा...मटार उसळ खा .करा चैन!!)

In reply to by असंका

पहिल्या दोन सामन्यात १५ आणि 0 धावा आणि या सामन्यात एकदम ५७ धावा आणि त्यासुद्धा फक्त ५५ चेंडूत आणि नाबाद. म्हणजे चंगळच की! *LOL*

वेस्ट इंडीज वि. झिंबाब्वे, = वेस्ट इंडीज भारत मागच्या मॅच ला जबरद्स्त खेळला, विशेषता बऑलिंग पाहुन खुप आनंद झाला. असेच पुढे जात राहो अशी इच्छा . झिंब्वावे पण बॅटींग चांगली करत आहे, त्यात वेट इंडिज ची बॉलिंग तशी धारदार वाटत नाही( टेलर सोडुन) त्यामुळे कडव्या प्रतिकाराची अपेक्षा

अजिंक्य राहाने सुरेख खेळला , लोक लवकरच त्याची ही इनिंग विसरतील , त्या पुर्वीच त्यने आणखी एक जबरदस्त इनिंग खेळावी .

गेलचा विश्वचषकामधील प्रथम द्विशतक ! रोहित शर्माने येत्या ३ मॅचमध्ये हे रेकॉर्ड तोडावे :)

१६ . Ireland vs United Arab Emirates = Ireland १७. Sri Lanka vs Bangladesh = Sri Lanka १८ Afghanistan vs Scotland = Scotland