तुमचा अनुभव वाचून मी नशिबवान होतो असं वाटलं. माझ्याकडे काहिही सामान नव्हतं पण काही त्रास न होता आलो हे नशिब. अनेक हेल्पर टाइप लोकांनी बॅगेज पाशी बोलून २०० द्या १० मिनिटात काढून देतो वगैरे केलं.
फक्त जास्त सामान आहे म्हणून ग्रीन चॅनेल मध्ये सुद्धा क्ष किरण तपासणी झाली.
एक विलक्षण अनुभव : रिकाम्या ट्रॉलीज ठेवण्यासाठी पार्किंग मध्ये कुठेही जागा नाही. मुळात ट्रॉली नीटपणे जाईल एवढं तर सोडा सायकल सुद्धा खडखड करेल इतकं खराब डांबरीकरण आहे किंवा खरंतर काहीच केलेलंच नाहीये.
ट्रॉली तिथेच बाजूला होत्या. माझ्या बायको एक ट्रॉली ठेवत असताना अचानक कुठून तरी एक सुमारे १० वर्षाचा मुलगा आला आणि मी मोठी बॅग ठेवायला ड्रायव्हर ला मदत करेपर्यंत दुसरी ट्रॉली घेऊन गेला. ती त्याने बायकोने ठेवलेल्या ट्रॉलीशेजारी नेली. गाडीपासून अंतर सुमारे ५-७ फूट इतकंच. आणि आम्ही बसताना येऊन पैसे मागायला लागला. लहान मुलगा पाहून मला राहवलं नाही मी ५- १० रूपये काढले तर म्हणाला हे नको 'बाहेरचे' द्या. खिशात काही पेन्स (ब्रिटिश) होते. ते देऊ लागलो. खरं तर कारण नाही पण म्हटलं जाउ दे. तर मागे लागला की त्यात एक पाऊंड आहे तोच द्या आणि हटून बसला, सोडेना की मला तेच नाणं पाहिजे.
मी शेवटी चिडून विचारलं की कशासाठी, आणी त्याची किंमत किंवा ते काय आहे माहीत आहे का. तर म्हणाला माहीत नाही पण तेच नाणं चालतं. अखेर त्याने दहा रूपये पण घेतले नाहीत पण १ पाऊंड शिवाय काही कबूल केलं नाही.
आणि नवल म्हणजे हे कशासाठी - काहीच तर केलं नाही त्याने खरं तर.
बाहेर पडेपर्यंत लगेच झटका बसला.
तुमच्या शांतपणे आणि चिवटपणे हवालदाराला नमवण्याबद्दल खुप अभिनंदन. बरेचदा लोक त्रास नको म्हणून काही पैसे देऊन मोकळे होतात.
कचरा हा तर मोठा विषय आहे. भारतातल्या अग्रगण्य आणि नामवंत आय टी कंपनीत जिथे कॅम्पस हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे तिथे किमान इंजिनिअर असलेले लोक असे रॅपर्स टाकतात. फक्त दार ओलांडलं की रस्त्यावर अगदी कंपनीच्या दारात सिगारेट्ची थोटकं, विविध पाकीटं व रॅपर्स टाकतात. टपरी वर चहा पिऊन प्लॅस्टिकचे कप दारात फेकतात तिथे सर्व सामान्यांची काय कथा.
दोन चार वर्ष इंग्लंड अमेरिकेत व्यवस्थित राहून आणि पाहून दुसर्या दिवशी बस मधून कचरा रस्त्यावर टाकतात.
यावर लिहिलेल्या मेल ला कंपनीच्या ग्रुप मध्ये (बी बी) एक ही उत्तर आलं नाही...
मिपाकरहो, काही उपाय सुचवा....
भावना व्यक्त केल्यात... बरे वाटले... आपल्या सारखा समदु:खी बघून ;)
२०० द्या १० मिनिटात काढून देतो वगैरे केलं
-- माणसं माणसं पाहून बोली लावतात वाटतं. ;) माझी बोली ४० डॉलरवर लावली होती यातून मी पक्का गबाळा दिसत होतो याची खात्री झाली. :)
बाकी तुमचा विलक्षण अनुभव हा सुद्धा एक सर्वसाधारण अनुभव झाला आहे असं बरेच जनांकडून ऐकून आहे.
तुम्ही शेवटच्या उतार्यात कचर्याबद्दल मांडलेल्या प्रश्नाबद्दल शासन तसेच सर्वसामान्य जनता सुद्धा उदासिनच दिसतेय... जनजागरणाशिवाय पर्याय नाही हेच खरे.
आपला,
(गबाळा) भास्कर
आम्ही येथे वसतो.
मला असाच अनुभव आला होता. हेल्पर तर गळ्यातच पडत होते.. त्याना म्हटले नुसते कपडे(कपडे असलेल्या बॅगा) काढून द्यायला तुम्हाला कशाला पैसे देऊ..
पुण्याचे पेशवे
मस्तच हो भास्कर भौ !! एकदम किल्लास !!
पण हे काही भारतातच नाही, अफ्रिकेत काही वेगळं नाही. जेंव्हा मी युगांडाहुन केन्याला गेलेलो तेंव्हा , नैरोबी एयरपोर्ट वर मला एक हेल्पर भेटला, त्याने मला इमिग्रेशन मधून विना झंझट बाहेर काढला आणि २० डॉलर मागायला लागला, मी कसले ? विचारताच म्हणए आय'म युवर फ्रेंड, मी तुला इमेग्रेशन मधून बाहेर काढलं, नाही तर तुला लै त्रास झाला असता, म्हंटलं झाला तर झाला ना , मी काही क्रिमिनल नाही, माझ्याकडे क्लायंटच इन्व्हाईट लेटर आहे, क्लायंट केन्यातला नामांकित आहे , मला कसलंच टेंशन नव्हतं, पण पैशांचा हट्ट सोडेना तेंव्हा ,मी म्हणालो, मला युगांडामधे लुटलाय आणि माझ्याकडे पैसेच नाहीत, तुच मला पैसे दे, मी इथे इथे असेल, तुला मी २० काय ४० डॉलर जास्त देइल,
भाउ गुमान निघून गेले.
भारतात पण साले इमिग्रेशन वाले कारकुन त्या पासपोर्टला पार रद्दी समजतात राव , बाकी आपल्यात काय आहे काय माहित पण मुंबैतले पोलिस आपल्याशी लै म्हणजे लैच सभ्य वागले बॉ .. आणि कोणतीही मागणी करण्याची अपेक्षा न दाखवता, "साहेब काय मदत करू का ? " असं पण विचारलं होतं , मला वाटलं पैसे मागतो की काय ? पण साला मला मदत करून मलाच २ कॉंप्लिमेंट्स देउन गेला होता.
-- इन्स्पेक्टर टारझन
हम्म !
मला तरी नशिबाने अशी अडचण आलेली नाही. बहुधा युरोपातून आलेल्या लोकांकडे लक्ष दिले जात नसावे. मुंबईच्या विमानतळावर माझ्या बॅगेकडे कस्टमवाल्याने पाहिले देखील नाही. ती तपासकामधून (स्कॅनर) बाहेर आल्यावर मीच त्याच्याकडे पाहत उभा राहिलो तर त्याने लक्षच दिले नाही. मग मी बॅग उचलून निघालो. बहुधा माझी बॅग आतल्या सामानापेक्षा महाग आहे हे त्याने ओळखले असेल :) (व्हिआयपीच्या बॅगा काय महाग असतात हो !)
मला मित्रांनी आधीच सांगीतले होते की गाडीच्या टपावर बॅग टाकू नकोस आणि टाकलीस तर सर्व सुरक्षा-बिल्ले काढून टाक. म्हणजे पोलिस त्रास देणार नाहित. ..
कलामसाहेबांना दिलेले वचन पाळताना तुम्हाला कायकाय अनुभव आला ते ऐकण्यास उत्सुक आहे.
-- लिखाळ.
व्हिआयपीच्या बॅगा काय महाग असतात हो !
-- आणि तुटतात सुद्धा! "लाईफ टाईम" वॉरंटी वगैरे म्हणतात पण पावत्या नसल्या तर तुम्हाला दारातही उभे राहू देत नाहीत.
बहुधा युरोपातून आलेल्या लोकांकडे लक्ष दिले जात नसावे.
नाही हो, नशीब म्हणून कटकटी वाट्याला नाही आल्या. लुटारुंना काय, तुम्ही कुठुणही का आलेले असेनात. त्यांच्या कामाचे बकरे असाल तर झाले.
आपला,
(बकरा) भास्कर
आम्ही येथे वसतो.
भास्कर प्रमाणे आपण सगळ्यांनी करायला हवे.
मी भारतात असताना देखील, रस्त्यावर थुंकत नाही. काही खाल्ले तरी त्याचे कागदी वेष्टण घरी सांभाळून आणतो. घरच्या कचरयातच टाकतो. हीच सवय मी माझ्या ५ वर्षे वयाच्या मुलीला लावली आहे.
रिक्षा थांबवून तिच्या भोवतीने पिंकेची रांगोळी घालणारया चालकांकडे फक्त एकच जबरदस्त "लूक" द्यावा. मनात त्यांच्या नक्की टोचणी लागेल.
आमच्या पुण्यातील हापिसातील कचरा जनरेटींग बेशिस्त लोकांना समजण्यासाठी, मी लंच टाइम मध्ये हापिसाच्या आवारात, टाकलेली गुटखा पाकिटे, सिगरेट ची थोटके वगैरे उचलून गांधीगिरी केली. पहिल्यांदा दोन आठवडे हसं झालं. डोक फिरलय पासून बरच एकायला मिळालं, पण उशीरा का होइना त्याचा परिणाम झाला. आता कोणी हापिसाच्या आवारात कचरा करत नाही. कचरा पेटीतच टाकला जातो.
चॅरिटी बिगिन्स एट होम...स्वत:पासून सुरुवात करावी. छोटीशी का होइना. ..
अभिनंदन!
म्हणतात ना ##णार्याने नाही तर बघणार्याने तरी लाजावे ;)
आपण नशिबवान आहात बॉ.. दोन्-तीन आठवड्यांनी का होईना आपल्या कार्यालयातल्या लोकांनी मनावर घेतले.
आपला,
(स्वकियांसमवेत गांधिगिरी करणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.
अजून एक.
मला दोन लॅपटॉप न्यायचे आहेत. पैकी एक कंपनीचा आहे. जो मी सध्या वापरतोय.
खाजगी वापरासाठी मी एक इथे खरेदी केला आहे
असे आता दोन लॅपटॉप माझ्याकडे आहेत.
कस्टममधून क्लीयर कसे करावेत मुंबईला?
http://kalekapil.blogspot.com/
त्यासाठी कंपनीच्या लेटरहेडवर लॅपटॉपचा ब्रँड, मॉडेल नं, सिरिअल नं. इ. गोष्टी व्यवस्थित नोंदवून तो कंपनीच्या कामाकरताच वापरला जातोय आणि विक्रीकरता नाही असे स्पष्ट लिहून घ्या. त्या पत्राच्या ३ प्रती जवळ ठेवा.
पत्रावर कंपनीच्या योग्य त्या अधिकार्याचा सही, शिक्का, ई-मेल व फोनसहित असावा.
तुमच्या खाजगी लॅपटॉपचे खरेदीचे बिल आणि लॅपटॉपसह आलेली इतर मूळ कागदपत्रे (जर असतील तर चांगले) ठेवावीत.
भारतात जाताक्षणीच स्वतःहून थेट वरच्या कस्टम अधिकार्याकडे जाऊन दोन्ही लॅपटॉप्स डिक्लेअर करावेत. (कस्टम ऑफिसरकडे जाणे चांगले मधले लोक त्रास देण्याची शक्यता फार असते!)
कंपनीकडून घेतलेल्या पत्राची एक कॉपी सुपूर्त करावी व त्याची पोच सही शिक्क्यासह घ्यावी.
खाजगी लॅपटॉपची किंमत ड्यूटी आकारण्याएवढी नसेल तर काहीही पैसे भरावे लागणार नाहीत.
काहीही त्रास होत नाही. मी स्वतः हे दोनदा केले आहे.
तुम्हाला शुभेच्छा!!
चतुरंग
धन्यवाद चतुरंग,
मी ही असेच कुठुन कुठुन एकले होते. पण ते भूताच्या गोष्टीत जसे भूत कोणी स्वत: बघितलेले नसते, तसे अमक्या मित्राच्या मित्रानी... असे केले... वगैरे प्रकार .
पण आता तुम्ही स्वानुभव, तोही दोनदा सिद्ध झालेला.. अगदी त्यातील सूक्ष्म वर्णनासकट सांगितलात.. धन्यवाद.
करतोच कार्यवाही....
मंगळ्सूत्र व सोन्याच्या चार बांगड्यांसाठी अडवले होते व पावती मागत होते.
आता लग्नातल्या मंगळ्सूत्राची व चार बिलवरांची पावती लग्नानंतर ९ वर्षांनी कोण किती जपून ठेवणार?
रात्रीच्या २ वाजता एयरपोर्टवर मी व माझा दोन वर्षाचा मुलगा असे खोळंबलो होतो.
खूप हुज्जत घातल्यावर सोडून देताना तिथली तपासनीस बाई खवचटपणे म्हणाली," नाहीतरी बांगड्यांचं हे डिझाईन आता जूनच झालयं".
मी तीच्याकडे बघतच राहिले.
रेवती
रात्रीच्या २ वाजता एयरपोर्टवर मी व माझा दोन वर्षाचा मुलगा असे खोळंबलो होतो.
-- व तेही मंगळसुत्राच्या व बांगड्याच्या पावत्यांसाठी. काय हलकट असतात ही माणसं!! :O
सोडून देताना तिथली तपासनीस बाई खवचटपणे म्हणाली," नाहीतरी बांगड्यांचं हे डिझाईन आता जूनच झालयं".
=))
आपला,
(सहप्रवासी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
अतिशय संतापजनक गोष्ट आहे. आणि मंगळसूत्रासारख्या गोष्टीचं भारतात येताना बिल मागणं ही त्रास देण्याची परिसीमा आहे. तुम्ही काय भांडलात किंवा तक्रार केलीत का? कमाल आहे या लोकांची.. काही वेळा अडवायला काही मिळालं नाही तर जेवढी बुद्धी असते त्याप्रमाणे काहिही वाद घालतात...
कुठे करणार?
आणखी कुठल्या नव्या प्रॉब्लेममध्ये फसायची भीती वाटत होती.
पुन्हा बाहेर माझ्या भावाला टेंशन आले होते की अडीच तास झाले ही अजून बाहेर कशी नाही आली?
त्या लोकांचे म्हणणे होते की तुम्ही एकतर ह्या दागिन्यांची पावती दाखवा,
नाहितर तुमच्याकडे असलेले (म्हणजे नसलेले) दोन किलो सोने दाखवा.
त्यावरून मी हुज्जत घातली की दोन किलो सोनं आणणं हे दोन किलो चॉकलेटस
आणण्याइतकं सोप आहे काय? सगळं सामान तपासायला सांगितलं,
जे त्यांना करायच नव्हतं. मग आपलं उगिच काहीतरी त्रास द्यायचा, दुसरं काय?
रेवती
मी आजपर्यंत अनेकदा भारतात (मुंबई विमानतळ) उतरलो आहे. आज पर्यंत कधीच कोणी सुदैवाने त्रास दिला नाही की अडवले नाही. इंमिग्रेशनच्या रांगेत अथवा कस्टमच्या रांगेत. खोटे वाटेल पण मला बर्याचदा सुहास्यवदनाने कर्मचार्यांनी वागवले आहे. (माझी कुणाशिही ओळख नाही अथवा मला कोणीही ओळखत नाही).
नाही म्हणायला एकदा एका बंगाली कस्टम कर्मचार्याने मी ग्रीनलाईन मधे उभा असताना माझ्या कॅमकॉर्डरवरून प्रश्न विचारला. म्हणाला की हा कुणाचा आहे. म्हणलं माझा आहे. तो म्हणाला की तसे सर्वच म्हणतात, त्या ड्युटी पडेल. म्हणलं, पासपोर्टवर शिक्का मार. म्हणाला येताना तू चोरला म्हणून सांगशील. म्हणलं तसे काही करायचा प्रश्न नाही. मग म्हणाला, काही स्कॉच वगैरे आहे का? त्यावर त्याला खडसावत सांगीतले, नाही आहे आणि तुला काही मिळणार नाही... ग्रीनलाईनवर बसलेला माणूस शांतपणे ऐकत होता, त्याने दुर्लक्ष केले आणि एका मिनिटात मला बाहेर सोडले.
या वेळेस माझ्या वडीलांबरोबर जात असताना,सामान जास्त होते आणि आम्ही दोघेच होतो. मग तेथील एका कर्मचार्याने मदत पाहीजे का म्हणल्यावर हो म्हणून सांगीतले, पण म्हणले की माझ्याकडे गैर अथवा ड्यूटी पडेल अशी काहीच गोष्ट नाही आहे. फक्त सर्व बॅगा घेऊन घेऊन जायला आणि कधी नव्हे ते वापरत असलेल्या के के ट्रॅव्हलला शोधायला वेळ लागेल, त्यात वडलांना घेऊन इकडे तिकडे सामान घेऊन हिंडायला लागू नये म्हणून मदत हवी आहे इतकेच... त्यावर त्याने देखील कुठलीही अपेक्षा न ठेवता तसे सांगून सामान पट्टयावरून काढून गाडीत ठेवेपर्यंत मदत केली. त्यावेळेस जशी बॉस्टन अथवा इतरत्र अशी मदत करणार्यांना टिप दिली जाते तशी त्याला दिली. (बॉस्टनला पण अशी मदत करायला कर्मचारी पुढे येतात आणि बाहेर पर्यंत आणून सोडतात. त्यांना साधारण $१० पर्यंत टिप देतात असे ऐकून आहे). पण परत त्याने कुठलीच अपेक्षा ठेवली नव्हती, मागीतले नाही. त्यामुळे त्यात लाच दिली असे वाटण्यासारखे काहीच नव्हते.
मी परत आल्यावर एक माणुस (हमाल) एक ट्रॉली घेऊन आला व म्हणाला साहेब दुसरी कडुन बाहेर काढतो फक्त ४५० डॉलर ध्या!!!मी त्याला म्हंटल की असं कोणतही सामान माझ्याकडे नाही जे काढुन देण्यासाठी तुझ्या बरोबर येऊ.तरी सुध्दा तो माझा पिच्छा सोडेनाच्..शेवटी बराच वेळ वाट पाहुन कटाळुन तो निघुन गेला.काऊंटर वरचे कर्मचारी तर इतके उध्दटपणे वागले की सौजन्य कशास म्हणतात ते त्यांना माहितच नव्हते!!!माझ्या बॅगेत डिजिटल कॅमेरा होता,,मला वाटले की त्याच्या वरुन हेलोक त्रास देणार पण नशीबाने तसे काहीच झाले नाही.
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
काऊंटर वरचे कर्मचारी तर इतके उध्दटपणे वागले की सौजन्य कशास म्हणतात ते त्यांना माहितच नव्हते
अहो हे सगळे भिकारी असेच वागणार. आमचे सरकारी कर्मचारी उपकार केल्यासारखे नोकरी करतात. वर परत लाज गेल्यासारखे भिक मागायला तयार. इथे अमेरिकेत बस चा चालक सुद्धा व्यवस्थीत बोलतो. आमच्याकडे तथाकथीत शिकलेले सरकारी कर्मचारी अरे तुरे ची भाषा वापरतात. मी तरी या लोकांकडुन जास्त अपेक्षा करत नाही. भारत भेटीवर येताना याची तयारी करुनच येणार आहे.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
इथे भारतात , अमेरिकन एंबसी मधे , भारतीय लोक अत्यंत उध्दट पणे वागतात. लोकाना भिकार्या सारखी वागणूक देतात आणि अमेरिकन मात्र सौजन्यपुर्ण वागणूक देतात. ही सौजन्यपुर्ण वागणूक पाहुनही त्याना स्वतःची वागणूक खटकत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.
भास्कर आणि इतर बर्याच लोकांचे अनुभव वाचले. त्यांना तसे अनुभव आलेही असतिल. पण सुदैवाने मला असे किंवा इतके त्रासाचे अनुभव कधीच आले नाहीत. छोटे मोठे प्रसंग तर घडतातच, पण ते तर कुठेही घडतात. विमानतळावर पोर्टर लोकांनी पैसे मागणे, सामान न येणे, बॅगांची मोडतोड होणे असे सर्व प्रकारचे अनुभव आले आहेत. पण कॅमेरा, सोनं किंवा लॅपटॉप वगैरे असं पाहून कधीच त्रास झाला नाही. आणि लक्षात घ्या, अगदी परवा परवा पर्यंत अमेरिकेतून येणार्यांपेक्षा आखातातून येणार्यांकडे जास्त डोळा असायचा या लोकांचा.
इमिग्रेशन वर तर आजतागायत कधीही त्रास झाला नाही. तिथे एवढी मरणाची गर्दी असते की कोणाला वेळ आहे भानगडी करायला. नाही म्हणता, परवा मुंबई एअरपोर्टवर मात्र बायको आणि मुली इमिग्रेशन क्लियर करताना तिथला माणूस म्हणाला की मॅडम तुमचा पासपोर्ट जरा प्रॉब्लेमवाला आहे. ५०० रू. द्या. ती जरा घाबरली. पण तिने डिटेलमधे विचारायला सुरूवात केली आणि तो नरमला. तेवढ्यात तिथला एक सुपरवायझर तिथे आला आणि त्याने तिला जायला सांगितले. इतक्या वर्षांत कानावर आलेले हेच एक प्रकरण.
अजून एक. बर्याच लोकांचा सूर असा असतो की अस्ताव्यतपणा, ओंगळपणा, खडबडीत पार्किंग लॉट्स वगैरे फक्त आपल्याकडेच असतात. तसेच विमानतळावर त्रास देणारे लोक / अधिकारी पण इथेच भेटतात. मी असं सांगू इच्छितो की, 'मित्रहो, माणूस सगळीकडे सारखाच. रूप आणि व्यक्त व्हायच्या पद्धती बदलतात.' कुठे काय, कुठे काय. तर आपल्याकडे जे चांगले आहे ते बघा, वाईट आहे ते आपापल्या तर्हेने नीट करायचा प्रयत्न करा.
कपिल काळेंचं अभिनंदन. खरंच खूप छान केली गांधिगिरी.
बिपिन कार्यकर्ते
अमेरिकेत ट्रॉली वापराय्ल ३ $ दयावे लागतात हे कोणी का लिहित नाही.
मी आजपर्यन्त दुबइ , मस्कत, मॅन्चेस्टर, सिंगापूर, लंडन अश्या विविध ठिकाणी जाउन भारतात परत आलो आहे. ( मी ह्याचीशेखी मिरवत नाही. सांगण्याचा हेतू हा की परत येण्याच्या ठिकाणावर आपल्याला मिळणारी वागणूक अवलंबून नसते.)
असो. पण एकदाही मला कोणताही वरील प्रकारचा अनुभव आला नाही. मुंबइ विमानतळाचे नूतनीकरण बरेच दिवस चालू आहे . हे मान्य. मी अमेरिकेला येताना माझ्या बोर्डिंग गेटाजवळ वातानुकुलन बंद होते. मी थोडा पूढे जाउन बसलो. बोर्डिंग घोषणा झाल्यावर योग्य तिथे गेलो. भारतासारखा देशाला हे सगळं उभारायला फक्त ६० वर्षे मिळाली आहेत. त्यात आपण इतके करुन दाखवले. अजून ६० वर्षांनी आपण कुठे असू ह्याचा कधी विचार केलाय का?
पण आपल्याला आलेल्या अनुभवावरुन एखादया गोष्टीचा निष्कर्ष काढणे कितपत योग्य?? (अहो हे सगळे भिकारी असेच वागणार.)
मुंबइला विमानतळावर ट्रॉली फुकट मिळते वापरायला. अमेरिकेत त्याचे ३ $ मोजता, ते का नाही लिहित? प्रत्येक ठिकाणच्या वाइटावर बोट ठेवा ना.
नाहितर प्रत्येक ठिकाणाचे चांगले ते सांगा. ट्रॉली च्या वापराचे पैसे देणे हा मला भांडवलशाही अमेरिकेने दिलेला दणका होता. नशीब इथल्या सुपरस्टोअर्स मध्ये तरी फुकट देतात.
http://kalekapil.blogspot.com/
'सगळे फायदे हवेत तोटे कोणतेच नकोत' हा सहजभाव असतो, अगदी सगळे म्हणजे सगळे ह्याचे गुलाम असतात, कुणी कमी असेल कुणी जास्ती एवढाच फरक! त्यातल्यात्यात तरतम भावाने आपण शहाण्यासारखे वागायचा प्रयत्न करु शकतो.
कोणत्याही देशात गेलात तरी माणूस बर्याच अंशी इथूनतिथून सारखाच. जिथे रहायचे असेल तिथल्या फायद्या-तोट्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यातले काय आपल्याला रुचते आहे हे बघून रहाणे शहाणपणाचे.
अर्थात चांगल्या गोष्टी अंगिकारण्यात गैर काही नाही पण ऊठसूठ तुलना करणे तितके फायद्याचे नसते.
(अवांतर - ३$ न देता ट्रॉली हवी असेल तर डिपार्चर चेकिन लाऊंजमधे चक्कर टाका आत नेलेल्या ट्रॉलिंपैकी एखाददोन नक्की मिळतात! हा माझ्यातला खास भारतीय माणूस! ;))
चतुरंग
कोणत्याही देशात गेलात तरी माणूस बर्याच अंशी इथूनतिथून सारखाच. जिथे रहायचे असेल तिथल्या फायद्या-तोट्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यातले काय आपल्याला रुचते आहे हे बघून रहाणे शहाणपणाचे.
अर्थात चांगल्या गोष्टी अंगिकारण्यात गैर काही नाही पण ऊठसूठ तुलना करणे तितके फायद्याचे नसते.
सहमत आहे.
भारताला फक्त ६० वर्षे मिळाली असे म्हणताना मला अनेकदा ऐकू येणारी विधाने आठवतात.. 'भारत हा प्राचीन देश आहे', ' भारताला हजारो वर्षांची संस्कृती आहे', 'अनेक उत्तम शोध आपल्या पूर्वजांनी आधीच लावले होते' इत्यादी.
कपिल यांना ही थेट प्रतिकिया नाही. त्यांना हे सांगण्याचा हेतू नाही. पण ओघाने आठवले म्हणून लिहिले.
-- लिखाळ.
अमेरिकेत ट्रॉली वापराय्ल ३ $ दयावे लागतात हे कोणी का लिहित नाही.
सगळ्याच गोष्टी फुकट मिळाव्यात असे का वाटावे? एखादी सुविधा वापरण्यासाठी जर काही शुल्क द्यावे लागत असेल तर काय हरकत आहे? एखाद्या ठिकानी गाडी पार्क करण्यासाठी आपण पार्किंग शुल्क देतोच ना? भारत सोडुन बाकी सारे देश धुतल्या तांदळासारखे स्वछ आहेत असे मी म्हणत नाही. परंतु केवळ अधीकार आहे म्हणुन त्याचा गैरवापर ज्या प्रकारे भारतात होतो तो मला खटकतो. पासपोर्ट मधे काही प्रोब्लेम आहे म्हनुन ५०० रुपय द्या असे त्या अधिकार्याने का म्हणावे? त्यपेक्षा जर त्या अधिकार्याने तो प्रोब्लेम दुर करण्याविषयी काही सुचना केल्या असत्या तर चांगले की वाईट. मी इथे पहिल्यांदा जेव्हा स्टेट आय डी काढायला गेलो होतो तेव्हा मला माझ्या राहत्या घराचा पुरावा देण्यासाठी काही अडचण आली. काउंटर वरचा अधिकारी काही केल्या मी आणलेला पुरावा ग्राह्य मानायला तयार नव्हता. तेव्हा त्याने मला विज कंपनीचे बिल / केबल कंपनीचे बिल / लीज करार / पोष्टाने आलेले बँक पेपर वगेरे इतके पर्याय दिले की माझी अडवणुक करण्यापेक्षा मला मदत करण्याचीच त्याची इच्छा साफ दिसत होती. फरक हा ईथे आहे. "पासपोर्ट मधे काही प्रोब्लेम आहे म्हनुन ५०० रुपय द्या" किंवा "देवाच्या नावानं १ रुपाया द्या" ही दोन्ही वाक्ये माझ्या द्रुष्टीने सारखीच. भिकार्याची.
आम्हाला आमची मानसिकता बदलायला हवी. बाकी ठिकाणचे दोषच बघितले तर आपली प्रगती कधीच होणार नाही.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
"बाकी काय पण म्हणा, पान खाऊन भररस्त्यात पचाऽऽक कन थुंकण्याची मजा काही औरच..! " - इति तात्या
----------------------------------------------------------------
तात्या,
या संस्थळाचे मालक या नात्याने आपण काही 'मौलिक' मते / विचार द्याल असे वाटले होते. पण कसले काय ? वर असलेल्या २५/२६ मतांपैकी एखाद्या तरी मताला आपण कोणताही साधक / बाधक प्रतिसाद दिला असता तर त्यानंतर मग पान थुंकण्याबद्दल केलेले आपले वरील विधान एक गंमत / विनोद म्हणून ठीक होते, पण एखाद्या अवघड जागीच्या दुखण्यावरील / विषयावरील मत गिळून वा धरुन ठेवून 'तोंडात पान असल्यासारखे' सोयीस्कर मौन धारण करुन विनोद करुन वेळ निभावून नेणे हे उचित नाही हे खचितच. यापेक्षा प्रतिसाद न देणेच एकवेळ बेहतर.
असा विनोद करणे हे माझ्यासाठी खालीलपैकी कोणतेही विधान विनोद म्हणून करण्यासारखेच आहे :
"बाकी काय पण म्हणा, रस्त्यात कचरा टाकण्याची मजा काही औरच..!"
"बाकी काय पण म्हणा, रात्री २ वाजता विमानतळावर मुलांसह असलेल्या प्रवाशांना खोटा / नाहक त्रास देण्याची मजा काही औरच..!"
"बाकी काय पण म्हणा, प्रवाशांना अडवून धरून पैसे उकळण्याची मजा काही औरच..!"
आपणा सगळ्यांचा मराठी / मराठमोळा बाणा आणि महाराष्ट्राविषयीचा अभिमान 'पान खाऊन भररस्त्यात पचाऽऽक कन थुंकण्याइतका' संकुचित नाही आहे हे वेगळे सांगण्याची गरज निश्चितच नाही.
आपल्या भारतात इतर (विशेषतः पाश्चात्य) देशांनी घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत ही बाब जेवढी अभिमानास्पद आहे, तेवढीच लज्जास्पद वर उल्लेखिलेले अनुभव (सर्वांना येत नसले तरी) कित्येकांना येतात ही वस्तुस्थिती आहे. या दोन्ही गोष्टी नाकारता येत नाहीत / कोणीही नाकारु नयेत - मग तो पक्का भारतीय असो, अनिवासी भारतीय असो वा एखादा परदेशी फिरंगी असो. खोटा वा वृथा अभिमान - मग तो कोणत्याही गोष्टीचा असो (देशाचा / भाषेचा / धर्माचा / ...) - नेहमीच घातक ठरतो. एखादी वस्तुस्थिती नाकारल्यामुळे काही ती गायब होत नाही.
या संस्थळावर आपण करीत असलेल्या कितीतरी कामांचा / लिखाणाचा / प्रतिसादांचा / कल्पनांचा आम्हाला निश्चितच भरपूर आदर आहे, त्या आदराला आणि प्रेमाला तडा जाऊ नये म्हणून हा प्रपंच ... माझ्या लहान तोंडातील हा थोडासा मोठा घास व त्यामागील कारण / भावना आपण समजून घ्याल ही आशा .. निदान माझा हा प्रतिसाद तरी आपल्याला या बाबतीतील आपले खरे मत सांगायला आपल्याला आता उद्युक्त करेल असे वाटते ... बाकी सू.जा.सां.न.ल.
आता येऊन द्या आपला परखड प्रतिसाद.
-दिपोटी
या संस्थळाचे मालक या नात्याने आपण काही 'मौलिक' मते / विचार द्याल असे वाटले होते.
दिपोटीसाहेब, एक मालक म्हणून नव्हे तर एक सभासद या नात्याने मी केंडेसाहेबांना उत्तर दिले आहे..तेच माझे उत्तर.
आणि इथे मालकीचा प्रश्न कुठे आला हे मला कळले नाही.. या संस्थळावरच्या कुठल्याही लेखनाशी याचे मालक/संपादक सहमत असतीलच असे नाही..
एक सभासद म्हणून इथे प्रत्येकाला मत आहे तसंच मलाही आहे...
केंडेसाहेबांनी भारताला नावे ठेवण्याचा जो लेख इथे लिहिला आहे (हल्ली एनाराय लोकांची ती फ्यॅशनच झाली आहे म्हणा!) तो लेखही इथे आहे/राहील, आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रियाही इथे आहेत/राहतील. हे सर्व लेखन सभासदांच्या वैयक्तिक मतातून आलेले आहे आणि ते द्यायचा त्यांचा अधिकार अबाधित आहे आणि राहील..
तेव्हा यात मालकीचा प्रश्न आलाच कुठे?
असो,
आपला,
(निवासी भारतीय!) तात्या.
--
आमचा भारत हा आहे हा असा आहे..!
तात्यासाहेब,
झालं ... झाला / केलात ना विपर्यास आमच्या प्रतिसादाचा !
माझ्या प्रतिसादाचा रोख भास्कररावांच्या मूळ विषयाला आपल्या प्रतिसादात मिळालेल्या बगलेचा / हुलकावणीचा होता ... आता मात्र आपण भास्कररावांना खाली आपले रोखठोक उत्तर / मत दिले आहे ... कसे का असेना, हेही नसे थोडके ...
'मालक' असा मी केलेल्या आपल्या उल्लेखात 'मालक / संपादक (असल्यास) / सभासद / लेखक / चोखंदळ वाचक' या सर्वाचा समावेश होता / आहे ... निदान तसा हेतू होता ... पण या एका typo वर घसरुन आपण माझ्या इतर / मुख्य मुद्द्यांनाही चक्क बगल दिली आहे ... चलो, ठीक है !
भास्करावांना आपण खाली दिलेल्या उत्तरातील आपल्या मताशी मी सहमत मात्र नाही आहे ... भ्रष्टाचाराचं समर्थन करुन (किंवा आपण करता तसं त्याकडे दुर्लक्ष करुन) व 'आहे हे असं आहे' असा पलायनवादी सूर लावून देश पुढे जात नाही ... आपल्या भारताचं भवितव्य उज्ज्वल आहे हे निश्चित ... पण ते भवितव्य लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी भ्रष्टाचार / अवास्तव लोकसंख्या / अंधश्रध्दा / अज्ञान यासारख्या घोर अडचणींचा समूळ नायनाट होणे आवश्यक आहे. प्रगतीच्या या मार्गावर आपला देश आता आहेच ... पण सरळसोट रस्त्यावर केलेली प्रगती ही खाचा-खळग्यांतून केलेल्या प्रगतीपेक्षा फार मोठी असते ... तेव्हा प्रगतीपथावर असतानाच या प्रगतीच्या मार्गात येणार्या समस्यांचा / प्रवृत्तींचा बीमोड करणे तेवढेच महत्वाचे आहे ... आणि यासाठी सर्वप्रथम या सर्व समस्या / प्रवृत्तींचे अस्तित्व अजिबात न नाकारता त्या आपल्यात / समाजात आहेत या वस्तुस्थितीचा स्वीकार केला तर त्यांचा नायनाट करणे तेवढे सोपे आणि जलद होईल ... To acknowledge the existence of a problem is the first and most effective step towards solving it ... आणि माझ्या मते भास्कररावांच्या या विषयाचा (व त्याला वर मिळालेल्या बहुसंख्य प्रतिसादांचा) हेतू असाच problem-solving / समस्या-पूर्तीचा आहे. त्यासाठी त्यांची हिंमत काढण्याची / आव्हानात्मक भाषेची गरज मुळीच नाही आहे. अन्यथा हे म्हणजे कोकणवासीयांनी मुंबैकर चाकरमान्यांना "काय गणपती/दिवाळीला यायचं ते या आणि चालू पडा ... आमचं आम्ही पाहून घेऊ" अशा भाषेत ऐकवल्यासारखं आहे.
- दिपोटी
... भ्रष्टाचाराचं समर्थन करुन (किंवा आपण करता तसं त्याकडे दुर्लक्ष करुन) व 'आहे हे असं आहे' असा पलायनवादी सूर लावून देश पुढे जात नाही ... आपल्या भारताचं भवितव्य उज्ज्वल आहे हे निश्चित ... पण ते भवितव्य लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी भ्रष्टाचार / अवास्तव लोकसंख्या / अंधश्रध्दा / अज्ञान यासारख्या घोर अडचणींचा समूळ नायनाट होणे आवश्यक आहे. प्रगतीच्या या मार्गावर आपला देश आता आहेच ... पण सरळसोट रस्त्यावर केलेली प्रगती ही खाचा-खळग्यांतून केलेल्या प्रगतीपेक्षा फार मोठी असते ... तेव्हा प्रगतीपथावर असतानाच या प्रगतीच्या मार्गात येणार्या समस्यांचा / प्रवृत्तींचा बीमोड करणे तेवढेच महत्वाचे आहे ...
अहो मग करा की बिमोड! नाही कोण म्हणतंय? ज्यांना असं वाटतं, त्यांनी इथे यावं, आणि ग्राऊंड लेव्हलला उतरून झडझडून काम करावं, आम्हाला त्यांचं निश्चितच कौतुक वाटेल! गाडगेबाबांनी नाही का, अस्वच्छतेवर नुसत्या गप्पा मारत न बसता, स्वत: हातात झाडू घेतला ते! म्हणूनच ते मोठे ठरले. डॉलर्सच्या मागे लागून अमेरीकेला नाही गेले हो! :)
आणि यासाठी सर्वप्रथम या सर्व समस्या / प्रवृत्तींचे अस्तित्व अजिबात न नाकारता त्या आपल्यात / समाजात आहेत या वस्तुस्थितीचा स्वीकार केला तर त्यांचा नायनाट करणे तेवढे सोपे आणि जलद होईल ...
वस्तुस्थितीचा स्वीकार केलेलाच आहे.. एनाराय लोकांना भारताला नावे ठेवण्याचा काहीही अधिकार नाही इतकाच माझं वैयक्तिक मत आणि मुद्दा आहे!
त्यासाठी त्यांची हिंमत काढण्याची / आव्हानात्मक भाषेची गरज मुळीच नाही आहे.
का नाही? आहे ना त्यांना भारताबद्दल प्रेम आणि कणव? मग या इथे आणि घ्या भारत नवनिर्माणात उडी! च्यामारी, इथे येऊन काही दिवसांनी ही मंडळी तिकडे परत जाणार आणि तिच्यायला जातायेता भारताला नावं ठेवणार! हा कुठला न्याय?
'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!' हेच खरं!
अन्यथा हे म्हणजे कोकणवासीयांनी मुंबैकर चाकरमान्यांना "काय गणपती/दिवाळीला यायचं ते या आणि चालू पडा ... आमचं आम्ही पाहून घेऊ" अशा भाषेत ऐकवल्यासारखं आहे.
खरंच आहे ते! हल्ली देवगडातल्या घरी मी फार क्वचित जातो, त्यामुळे चुलत्याने ते घर कसं चालवावं हे मी सांगत नाही..! आंब्याफोफळीच्या बागांचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यावं, काय करावं हे मी सांगत नाही/ठरवत नाही/ चुलत्याला कुठलेही फुकटचे सल्ले देत नाही..!
नायतर चुलता म्हणेल, "मायझया, तुम्ही मुंबै सोडा अन् इथे येऊन रहा व सांभाळा तुमची वाडी आणि करा तिच्यायला कोकणचा कॅलिफोर्निया का काय ते! आम्ही अगदी दिवे-पंचारत्या तैय्यार ठेवू!
भास्कररावांना आणि अन्य एनाराय मंडळींनाही आमचं हेच सांगणं आहे! :)
तात्या.
तात्यांनु,
एनाराय लोकांना भारताला नावे ठेवण्याचा काहीही अधिकार नाही इतकाच माझं वैयक्तिक मत आणि मुद्दा आहे!
का नाही ? जेवढा अधिकार तुम्हाला भारतातील (किंवा इतर कोणत्याही देशातील) कोणत्याही प्रांताची स्तुती वा त्यावर टीका करण्याचा आहे / असलाच पाहिजे, तेवढाच अधिकार / हक्क कोणत्याही व्यक्तीस (भारतीय / एनाराय / आफ्रिकन, युरोपियन, चिनी वा कोणत्याही फिरंग्यास) जगातील कोणत्याही प्रांताला वा ठिकाणाची स्तुती / टीका करण्यास आहे. यात ही स्तुती / टीका वस्तुस्थितीला धरुन आहे का तिचा विपर्यास करणारी आहे हा सर्वात महत्वाचा व विचार करण्याजोगा मुद्दा आहे, स्तुती / टीका करणारी ती व्यक्ती कोण कुठली आहे हा मुद्दा एकदम गौण / बाद (किमानपक्षी दुय्यम) ठरतो. वैयक्तिक मत जगातील कोणाचेही जगातील कोणत्याही मुद्यावर असू शकते.
यदाकदाचित जर आपण कोणीही कोकणावर काय, बिहारवर काय, अमेरिकेवर काय किंवा झुमरीतलैय्यावर काय - विधायक / सकारात्मक टीका करायची ठरवली, तर आपला तिथला चुलता / मामा / मित्र काहीही म्हणाला(किंबहुना त्याने कितीही 'मायझयां'वरुन डोकेफोड केली) तरीही हा टीकेचा हक्क कोणीही नाकारु शकत नाही. आता, वर लिहिल्याप्रमाणे, ही टीका खरी / वास्तववादी आहे का खोटी आहे हे प्रत्येकाने आपापल्यापुरते ठरवायचे ... त्यात भावनेच्या आहारी जाऊन आकांडतांडव करण्याने आपण मूळ मुद्यापासून दूरच जात आहोत.
मला वाटते, तात्या, तुमची लेखणीला 'काय म्हणतो' यापेक्षा 'कोण म्हणतो' याला उत्तर देण्यात जास्त स्वारस्य दिसते ... तेव्हा जरा सबूर ... तूर्तास विराम ... असो.
- दिपोटी
अहो मग करा की बिमोड! नाही कोण म्हणतंय? ज्यांना असं वाटतं, त्यांनी इथे यावं, आणि ग्राऊंड लेव्हलला उतरून झडझडून काम करावं, आम्हाला त्यांचं निश्चितच कौतुक वाटेल!
आमक्या एका पद्धतीने केली तर तीच केवळ देशसेवा असे म्हणने मला तरी पटत नाही. आमच्या येशूला/मुहम्मदाला मानले तरच तुम्ही स्वर्गात जाल अन्यथा नरकात ही माझ्या संस्कृतीची पद्धत नाही. कोणत्याही रुपातल्या इश्वराला माना, तो तुम्हाला भेटेल ही आपली संस्कृती. मला वाटते ते इथे सुद्धा लागू होते. मी मुंबईत असताना सकाळ संध्याकाळ झोपडपट्ट्यांत नि:शुल्क शिकवण्या घेतल्या, काही संस्थांच्या सोबतीला जाऊन आम्ही व्यसनमुक्तीसाठी झटलो, गरिबांसाठी नि:शुल्क आरोग्य शिबिरे आयोजित केली. पण म्हणून ते केले तरच देशसेवा असा माझा अट्टाहास कधिही नव्हता. जिथे जाल तिथून व ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे देशसेवा, समाजसेवा करत रहावी यावर मी ठाम आहे. तेव्हा तुमच्या म्हणण्यानुसार केवळ भारतात आल्यानेच देशसेवा होईल हे मला तरी पटत नाही. उगी स्वतःबद्दल डांगोरा पिटायची इच्छा नाही म्हणून येथेच थांबवतो.
डॉलर्सच्या मागे लागून अमेरीकेला नाही गेले हो!
माझ्याबद्दल काहीही वैयक्तिक माहिती नसताना तुम्ही केलेला हा वैयक्तिक आरोप मला अमान्य आहे. खरे तर खेद झाला हे वाचून.
तात्या ,तुमच्या देवगडात आंब्यांच्या बागा लावणं आमच्या मराठवाड्याच्या मानानं खूप सोपं आहे हो. माझं स्वप्न होतं माझ्या उजाड, बोडक्या रानात बागा करण्याचं. भारतातल्या नोकरीनं बहिणीची लग्न सुद्धा झाली नसती. मला माहित नाही तुम्हाला अनुभव आहे का नाही... पाच्-पाच मैल डोक्यावरुन पाण्याची घागर आणताना पायातल्या कुरपाच्या होणार्या वेदना, म्हातार्या आई-वडिलांच्या डोक्यावर छप्पर नसल्याची सल, बहिनींना लेकाराच्या दुधासाठी दिवसभर राबताना बघनं, हे सगळं कसं असतं हे तुम्हाला माहित आहे किंवा नाही हे मला माहित नाही. पण माहित असेल तर यासाठी डॉलर किती महत्वाचा असतो हे मला तरी नक्की माहिती आहे.
हो, तुम्हाला थोडा वेळ असेल तर मी चालवत असलेल्या शाळेचा पत्ता देईन. एकदा बघून या. तिथं आनवाणी पायानं पाच-पाच मैलांवरुन येणारी भोळी-भाबडी बालगोपाळं बे एके बे लिहिताना बघा. कदाचित असा अरोप कोणावरही करण्या अगोदर तुम्ही दहादा विचार कराल ही खात्री.
आपला,
(कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नसलेला कट्टर देशभक्त) भास्कर
आम्ही येथे वसतो.
बाकी काय पण म्हणा, पान खाऊन भररस्त्यात पचाऽऽक कन थुंकण्याची मजा काही औरच..!
"हे धरणी माते, तुझ्यावर पाय ठेवण्याचे पातक माझ्याकडून होत आहे त्याबद्दल मला क्षमा कर" असे म्हणून दिवस सुरु करायला सांगणारी आपली संस्कृती. ह्याच संस्कृतीचा ढोल आपण सगळे भारतीय जगभर पिटत असतो. पण तो पिटताना मला वाटतं आपण तिचा मूळ गाभाच विसरुन चाललोय. त्या धरणीवर पिंक मारण्यात धण्यता मानने हा त्याचाच एक भाग असे मला वाटते.
बाकी दिपोटीने प्रतिसाद दिला आहेच. त्यामुळे जास्त लिहित नाही.
आपला,
(परखड) भास्कर
आम्ही येथे वसतो.
हे पाहा केंडेसाहेब,
आमचा भारत हा आहे हा असा आहे..
लेको, तुम्ही आमचा देश सोडून गेलात, आता तुम्हाला काय अधिकार आहे याच्याबद्दल बोलायचा सांगा पाहू? :)
तुमच्या मते जर याला सुधरवायचा असेल तर तुम्ही या इथे आणि घ्या या सामाजिक कार्यात उडी! साला, नाही कोण म्हणतंय??
आहे हिंमत? साला, स्वत: परदेशात राहून भारताला नावं ठेवणं खूप सोप्पं आहे. हो, आहेत दोष आमच्या देशात! आहे ना तुम्हाला त्याबद्दल कणव, माया, ममता, आणि प्रेम? मग या इथे आणि साकारा तुमच्या स्वप्नातला भारत..! आम्हाला कौतुकच वाटेल..
नायतर जसे येता तसे इथे या, इथल्या गैरसोयी, गरीबी, भ्रष्टाचार, उकाडा सहन करून काय रहायचंय ते रहा, काय आंबेफणस, मिसळ खायची ती खा, अन् चालू पडा तुमच्या त्या सुखवस्तू, छान छान, सुंदर सुंदर अमेरीकेत. आमचं आम्ही पाहून घेऊ..
तात्या.
आदरणीय तात्या,
तुमच्या देशप्रेमाचे पुन्हा एकदा दर्शन झाले, अर्थात शंका कधीही नव्हतीच... सहर्ष आनंद झाला. आपल्या भारत मातेला तुमच्या सारख्या पुत्रांची खरच नितांत आवश्यकता आहे.
आता हे पहा. आपण एखादे चांगले चरित्र वाचून काढले व चिंतन केले तर त्या चरित्रातल्या हस्तीची पहिली तुलना कोणाशी करणार? आपल्या स्वतःशीच ना? त्या तुलनेतून, चिंतनातून काही नवीन चांगल्या गोष्टी आमलात आणायच्या ठरवल्या तर आपण आपलेच भले करत असतो. तसेच एखाद्या परक्या देशाला पाहून आल्यावर आपण आपल्या देशात तिथले काय चांगले आणू शकतो हे विचार येणारच. हे विचार आले म्हणजे देशद्रोह थोडाच आहे?
मी परदेशात असलो म्हणून काय झाले? प्रत्येक दिवस, प्रत्येक श्वास, हा भारतमातेच्या आठवणीशिवाय जातच नाही. तेव्हा परदेशात राहिल्याने मातृप्रेम कमी होते हे मला तरी मान्य नाही.
आता देश सेवेबद्दल - परदेशात राहून देश सेवा करता येत नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला? अनेक मार्ग आहेत. एक उदाहरण म्हणून सांगतो. इथून अमेरिकेतून जनसेवेच्या नावाखाली ते हरामखोर मिशनरी लोक अब्जावधी डॉलर्स भारतात घेऊन जातात अन त्याचा वापर धर्मां परिवर्तनासाठी पर्यायाने देशात दुश्मन पैदा करण्यासाठी वापरतात. या आक्रमकांना आपल्या घरात आल्यावर रोखायणे फार आवघड होत आहे. त्यांच्याच देशात जाऊन त्यांचे पितळ उघडे करायचे असेल तर अनेकानेक देशभक्तांनी परदेशात जाऊन ते काम केले पाहिजे की नाही सांगा बरे? हे लक्षात घ्या, थोरले आबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या शिकवणीतली एक ही सुद्धा आहे की शत्रूशी सामना त्याच्या घरात करावा आपल्या घरात नव्हे.
लेको, तुम्ही आमचा देश सोडून गेलात, आता तुम्हाला काय अधिकार आहे याच्याबद्दल बोलायचा सांगा पाहू?
देश सोडून गेलेल्यांनी देशसेवा केलीच नाही असे आपणास म्हणायचे आहे काय? इंग्लंडात राहून तात्यासाहेबांनी, जपान-युरोपात राहून नेताजींनी, आफ्रिकेत राहून गांधीजींनी, आणि सगळ्या जगभरात फिरुन स्वामी विवेकानंदांनी केलेली देशसेवा नव्हती काय?
तात्या, भारत हा केवळ भूमीचा तुकडा नाही. ती आपली माता आहे. कालानुरुप पुत्र मातेपासून दूर गेला तरी तीच त्याची माता असते. त्यामुळे तो केवळ "तुमचा" देश नाही. आम्हीही त्याचे देशाचे अगदी "संपूर्ण" नागरिक आहोत. माझ्या देशाबद्दल चांगल्या गोष्टी बोलताना जसे माझा ऊर भरुन येतो तसाच ज्या काही कमी आहेत त्या उघड्या डोळ्यांनी मान्य करुन त्यावर चर्चा घडवून आणायला मला तरी लाज वाटत नाही.
शेवटी तुम्हाला काय अन आम्हाला काय सगळ्यांना याच मातीत मिसळायचं आहे. अर्थात आपण बाहेर नाही गेलात तर ;)
वंदे मातरम!
आपला,
(कोणालाही ज्याचे नागरिकत्व हिरावून घेता येणे शक्य नाही असा भारतीय) भास्कर
आम्ही येथे वसतो.
प्रतिसादांची (आणि लेखाची) शंभरी भरणार तर! चालू द्या!!
म्हणूनच तर उतरलो मैदानात! :)
च्यामारी भारत अस्साच आहे अन् भारत तस्साच आहे ही एनाराय लोकांची नेहमीची गाणी खूप वेळ ऐकून घेतली राव!
आता बघतो एकेकाला..! :)
आपला,
(निवासी भारतीय) तात्या.
एकलव्यसाहेब,
विहिरीत पाव टाकणे व वाजवणे या व्यतिरिक्त या विषयावरील आपले मत सुद्धा येथे नोंदवलेत तर चर्चा पुढे नेण्यास हातभारच लागेल. आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे.
- दिपोटी
> > विहिरीत पाव टाकणे व वाजवणे या व्यतिरिक्त या...
दिपोटी - आपण प्रामाणिक भावनेने सल्ला दिला आहे असे गृहित धरले आहे म्हणून हा प्रतिसाद तरी देतो आहे.
पहिली गोष्ट म्हणजे मी साहेब नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे इतर बहुतेक प्रतिसादकर्त्यांनी विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. त्यात मुद्दाम भर घालण्यासारखे आणखी काही माझ्याकडे नाही. "विहिरीत पाव टाकणे व वाजवणे"हे काळ सोकावू नये म्हणून दिलेले प्रतिसाद वर आहेतच. नीट पाहिलेत तर तुम्ही जो पाने भरभरून प्रतिवाद मांडला आहे अगदी तोच आम्हीही मांडला आहे पण फक्त दोन शब्दांत.
इत्यलम.
आदरणीय तात्या,
च्यामारी भारत अस्साच आहे अन् भारत तस्साच आहे ही एनाराय लोकांची नेहमीची गाणी खूप वेळ ऐकून घेतली राव! आता बघतो एकेकाला..!
--पण भिडू चुकीचा निवडालात राव! :)
आपला,
(स्नेही) भास्कर
आम्ही येथे वसतो.
तात्यासाहेब,
च्यामारी भारत अस्साच आहे अन् भारत तस्साच आहे ही एनाराय लोकांची नेहमीची गाणी खूप वेळ ऐकून घेतली राव!
एखाद्याने भारत देश सोडला तर त्याला तात्काळ 'देशद्रोही' हे बिरुद लावण्याची सोयीस्कर प्रथा सध्या रुढ होऊ पहात आहे.
देशात रहाणारे ते सर्व 'देशप्रेमी' आणि देशाबाहेर गेलेले ते सर्व 'देशद्रोही' अशा बाळबोध व्याख्या एकदा रुढ झाल्या की मग देशात राहून पान खाऊन भररस्त्यात पचाऽऽक कन थुंकण्यात मजा घेण्यात व धन्यता मानणार्यांपेक्षा व त्याहीपुढे जाऊन - उदाहरणार्थ - विमानतळावर सरकारी नोकरीचा अधिकार गाजवून निरपराध प्रवाशांना लुबाडणार्यांपेक्षा नोकरी-धंद्यानिमित्त देशाटन केलेल्यांचे देशप्रेम फारच कमी आहे असाही अर्थ रुढ होईल - जे अर्थात निखालस असत्य आहे.
"भारत अस्साच आहे अन् भारत तस्साच आहे" अशी एखाद्या एनारायने केलेली सरसकट टीका व "हे एनाराय अस्सेच आहेत अन् एनाराय तस्सेच आहेत" अशी एखाद्या निवासी भारतीयाने केलेली सरसकट टीका - दोन्ही टीका सारख्याच ... सर्रास केल्यामुळे बिनबुडाच्या आणि बेजबाबदार. सरसकट विधाने - ज्याला आपण इंग्रजीत blanket statements म्हणतो - बव्हंशी चुकीची ठरतात.
"मूळचा देवगडचा!" आणि "आमचो देवगड" असे सार्थ अभिमानाने सर्वांना सांगणारे आमचे ठाणेकर (देवगडकर नाही) तात्या जेव्हा एखाद्या एनारायला "आमचा भारत ..." (आमचा .. म्हणजे आपला नव्हे ... म्हणजे पर्यायाने परदेशस्थ भारतीयांचा नव्हे) असे सुनावतात तेव्हा त्यांच्या या विधानांतील ढळढळीत विसंगतीचे आश्चर्यच वाटते.
४०-५० वर्षांपूर्वी रुपयांच्या मागे लागून देवगडस्थ (किंवा आमचे सावंतवाडीस्थ सुद्धा) तुमचे / आमचे पूर्वज मुंबैला / पुण्याला जाऊन चाकरमानी झाले आणि आजच्या युगात मुंबैकर / पुणेकर / देवगडकर - तात्यांच्या भाषेत - डॉलर्सच्या मागे लागून परदेशस्थ झाले - या दोहोंत मूलतः काहीही फरक नाही आहे. आपापल्या परिस्थितीत फरक घडवणे किंवा घडवण्याची इच्छा असणे - ही एक नैसर्गिक व स्वाभाविक प्रक्रिया आहे - त्यामागे देशद्रोह तर निश्चितच नाही आहे.
- दिपोटी
एखाद्याने भारत देश सोडला तर त्याला तात्काळ 'देशद्रोही' हे बिरुद लावण्याची सोयीस्कर प्रथा सध्या रुढ होऊ पहात आहे.
मी माझ्या एकाही प्रतिसादात "देशद्रोही" हा शब्द वापरलेला नाही!
असो, खाई त्याला खवखवे! :)
तात्या जेव्हा एखाद्या एनारायला "आमचा भारत ..." (आमचा .. म्हणजे आपला नव्हे ... म्हणजे पर्यायाने परदेशस्थ भारतीयांचा नव्हे) असे सुनावतात तेव्हा त्यांच्या या विधानांतील ढळढळीत विसंगतीचे आश्चर्यच वाटते.
हो, आम्ही आमचे देवगड, आमची मुंबै, आमचे पुणे असे म्हणतो, परंतु एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या, देवगड, मुंबै, पुणे य सर्वांचा देश एकच आहे! गोर्या माकडांचा अमेरिका युरोप नव्हे!
४०-५० वर्षांपूर्वी रुपयांच्या मागे लागून देवगडस्थ (किंवा आमचे सावंतवाडीस्थ सुद्धा) तुमचे / आमचे पूर्वज मुंबैला / पुण्याला जाऊन चाकरमानी झाले आणि आजच्या युगात मुंबैकर / पुणेकर / देवगडकर - तात्यांच्या भाषेत - डॉलर्सच्या मागे लागून परदेशस्थ झाले - या दोहोंत मूलतः काहीही फरक नाही आहे.
फरक आहे तो देशाचा! देवगडकर आले ते मुंबैपुण्याला! परंतु देश एकच आहे!
आपापल्या परिस्थितीत फरक घडवणे किंवा घडवण्याची इच्छा असणे - ही एक नैसर्गिक व स्वाभाविक प्रक्रिया आहे - त्यामागे देशद्रोह तर निश्चितच नाही आहे.
असं म्हणता? बरं बरं! :)
असो, या विषयावर हा आमचा शेवटचा प्रतिसाद..!
(दोन वेळची रुखीसुखी, परंतु स्वाभिमानाची भाकरी स्वत:च्याच देशात कमवून खाणारा!) तात्या.
तात्या,
मी माझ्या एकाही प्रतिसादात "देशद्रोही" हा शब्द वापरलेला नाही!
वापरला नाही पण आपल्या या संस्थळावर व्यक्त झालेल्या असंख्य मतांतून आपला हा सदोदित होत असलेला आडून इशारा लक्षात तर येतो. अहो, मला हा शब्द पटत नसला तरी आपणास वापरायचा झाला तर आडून का, बेलाशक सरळ वापरा - त्यासाठी लेखणी अडखळण्याची गरज नाही - त्यास जरुर उत्तर देऊ. नपेक्षा, 'शब्द वापरलेला नाही' म्हणालात म्हणजे 'वापरायचा इरादा नाही / म्हणणारच नाही' असे आपणास म्हणायचे आहे असा आम्हास सोयीस्कर अर्थ त्यातून काढून घेतो, मग पुढील वादच मिटला ! काय म्हणता?
आता तात्या, माफ करा, पण या विषयावरील आपल्या मतांत काही विसंगती आढळल्या त्या आपल्या नजरेस (खुलासा मिळेल या आशेवर) आणून देतो :
- परंतु एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या, देवगड, मुंबै, पुणे य सर्वांचा देश एकच आहे!
फरक आहे तो देशाचा! देवगडकर आले ते मुंबैपुण्याला! परंतु देश एकच आहे!
स्थलांतराबाबतीत आपली मते नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यात मात्र येथे घोळ होत आहे. मुंबै/पुण्यातून परदेशात झालेले स्थलांतर आपणास पटत नाही, कारण येथे देश एक नाही आहे. देवगडहून मुंबै/पुणे/ठाण्यात झालेले स्थलांतर अलबत चालते, कारण - अर्थातच 'सोयीस्कर' आहे म्हणून नाही तर - येथे देश एक आहे. पण, बिहार, युपी मधून मुंबै/पुण्यात झालेले स्थलांतर मात्र (आपण इतरत्र व्यक्त केलेल्या मतांनुसार) आपणास नाही चालत - देश या बाबतीत एक असला तरी ! स्थलांतराच्या आपण 'ठरवीत' असलेल्या स्थळ-मर्यादा आपल्या सोयीनुसार बदलतात असे दिसते ... हम्म !
- गोर्या माकडांचा अमेरिका युरोप नव्हे!
मुंबई विमानतळावर झालेल्या त्रासाचा एक स्वानुभव सांगणार्या भास्कररावांना आपण 'देशाबाहेर आहात तर याच्याबद्दल बोलायचा काय अधिकार' असे ठणकावून विचारता, पण गोर्यांविषयी बोलताना मात्र हा आपलाच नियम स्वतःला लावून घेण्याची (व consistent रहाण्याची) गरज आपण सोयीस्कर रीत्या विसरता ... हम्म ! (गोरे असो, निवासी / अनिवासी भारतीय असो, इतर कोणीही असो वा कोणतीही गोष्ट असो - अशी सरसकट / सर्रास विधाने (blanket / generalised statements) कोणालाच लागू पडत नाहीत).
असो.
म्हणूनच तर उतरलो मैदानात! ... आता बघतो एकेकाला..!
हा आमचा शेवटचा प्रतिसाद..!
वरील विसंगतींचा आपणास खुलासा करायचा आहे, भास्कररावांच्या 'तात्यांसाठी', 'विपर्यास' व 'संस्कृती' या तिन्ही प्रतिसादांना उत्तर द्यायचे आहे, असे अर्ध्यातच मैदान सोडून कसे चालेल ? पण नको म्हणता? बरं बरं! :-)
विरामापूर्वी : तात्या, एक आपला हितचिंतक व आपल्या लिखाणांचा (विशेषतः व्यक्तिचित्रणांचा) एक पंखा या नात्याने सांगतो ... पटत असेल तर बघा ... शेवटी प्रत्येक व्यक्तीची बरी-वाईट ओळख त्याच्या / तिच्या वर्तनाने / कामगिरीने / कार्याने / चांगुलपणाने होते ... ती व्यक्ती निवासी/अनिवासी भारतीय आहे की गोरा आहे की निमगोरा आहे की हबशी आहे - या निकषाने नाही. स्वाभिमानाची कांदा-भाकर कोणीही स्वकष्टाच्या व हिंमतीच्या जोरावर या धरतीमातेच्या पाठीवर कोठेही कमावून खाऊ शकतो.
आपला -
(ज्ञानेश्वर माऊलींची 'हे विश्वचि माझे घर' ही संकल्पना अंमलात आणणारा) दिपोटी
प्रतिक्रिया
वाइट
२०० द्या ???
हाहा...
हा हा हा
हम्म ! मला
व्हिआयपीच्या बॅगा
स्वत:पासून सुरुवात करावी.
गांधीगिरीबद्दल
यशस्वी गांधिगिरी बद्दल
दोन लॅपटॉप
कंपनीचा जो लॅपटॉप आहे
धन्यवाद
मला
हुज्जत
संताप
मी तक्रार केली नाही.
माझे अनुभव
मी परत
सौजन्य अन् सरकारी कर्मचारी ??????
इथे भारतात
माफ करा...
धन्यवाद
ट्रॉली
मानवी प्रवृत्तीत
कोणत्याही
रंगुनी रंगात माझ्या
सुवीधा . .
बाकी काय
तात्या, आप भी ?
दिपोटीशी
या
परत एकदा, तात्यासाहेब !
...
स्तुती आणि टीका
तात्यांसाठी
संस्कृती
हे पाहा
विपर्यास
शंभरी
प्रतिसादा
चीअर्स!
मत ?
नीट वाचा!
चुकीचा भिडू
देशद्रोही ?
एखाद्याने
पुनश्च तात्या
+१ नेमका आणि नेटका प्रतिसाद!
धन्यवाद !
नेमका आणि नेटका प्रतिसाद!