Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गंगाधर मुटे on Wed, 12/31/2014 - 23:56
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?


              शेती हा विषयच मोठा विचित्र आहे. या विषयात जितके खोलवर अध्ययन करत जावे तितके गुंते वाढत जातात. एक गुंता सोडवायला बघावं तर तो गुंता सुटायच्या आतच नवे दहा गुंते निर्माण व्हायला लागतात. शेतीच्या उभारणीत साहित्यविश्वाचे काय योगदान असेल याचा आज थोडासा अंदाज घ्यायला निघालो तर चिंतनाची गाडी पहिल्याच पायरीवर अडखळली. शेतीची दहापट अधोगती घडवून एकपट प्रगती झाल्याचं आज जे ठसठशीतपणे जाणवत आहे त्याला बर्‍यापैकी शेतीशी संबंधीत साहित्यविश्व आणि एकंदरीतच सृजनशीलतेची अपरिपक्व मोघमता कारणीभूत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि शरद जोशी यांच्याखेरीज शेतीविषयाची नाडच कुणाला कळली नाही. रोगाचे योग्य निदान न करताच केले जाणारे औषधोपचार जसे रोग्याच्या जिवावर उठतात, कधीकधी चुकीच्या उपचारपद्धतीने जसा रोगी दगावतो अगदी तसेच शेतीमध्ये घडले आहे. शेतीच्या अधोगतीचे कारणच न कळल्याने साहित्यिकांनी जरी शुद्ध भावनेने शेतीच्या उन्नतीसाठी साहित्य निर्माण केले असले तरी ते काही तुरळक अपवाद सोडले तर अन्य साहित्यिकांचे शेतीविषयक किंवा शेतीसंबंधित साहित्य हे शेतीसाठी तारक कमी आणि मारकच जास्त ठरले आहे.

              महात्मा ज्योतिबा फुले, शरद जोशी आणि काही तुरळक अपवाद वगळता शेतीविषयाला लाभलेले साहित्यिक, लेखक आणि शेतकीतज्ज्ञच मुळात उंटावरून शेळ्या हाकलणारे असल्याने ते शेती विषयाला न्याय देऊ शकलेले नाहीत, हे विधान मी अत्यंत जबाबदारी आणि सर्वांचा रोष पत्करण्याची मानसिक तयारी ठेवून करत आहे. शेती हा एकमेव विषय असा झाला आहे की, उठसूठ जो-तो स्वतःच्या पात्रतेचा अथवा आवाक्याचा विचार न करताच शेतीविषयक सल्ला द्यायला उतावीळ असतो. शेती विषयाचे आपल्याला प्रचंड ज्ञान आहे आणि त्यावर आपले मतप्रदर्शन करण्याचा जन्मसिद्धच अधिकार आहे, अशाच आविर्भावात प्रत्येक मनुष्य वावरत असतो. शेती हा कदाचित एकमेव विषय असेल जेथे सल्ला ऐकणार्‍यांची संख्या नगण्य आणि सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड आहे.

              एखाद्या रोगाची साथ आली तर जो-तो उठसूठ आपापले उपचारविषयक ज्ञान पाजळत फिरत नाही. आरोग्य शास्त्रातले तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. कायदेविषयक गुंता असेल तर कायदेविषयक तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. व्यापारामध्ये यशस्वी व्यापार्‍याचा शब्द प्रमाण मानला जातो. मात्र शेतीमध्ये अगदीच उलट आहे. शेतीमध्ये यशस्वी असलेल्या शेतकर्‍याला मूर्ख, अज्ञानी असे गृहीत धरून ज्याने कधीच शेती केली नाही, केली असेल तर निव्वळ शेतीच्या भरवशावर निदान सुपरक्लासवन अधिकार्‍याच्या तोडीचे जीवनमान उंचावून दाखवता आले नाही किंवा ज्याला भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे सुद्धा माहीत नसते तो सुद्धा स्वतःला शेतकीतज्ज्ञ समजून शेतकर्‍याचे प्रबोधन करायला अत्यंत उतावीळ असतो.

              पण खरी मेख त्याही पुढे आहे. विशेषज्ञ डॉक्टरचा पेशा डॉक्टरकीच असतो. नामवंत कायदेतज्ज्ञाचा पेशा कायदेविषयाशीच संबंधीत असतो. शिक्षणतज्ज्ञ हा शिक्षणक्षेत्रातील वाटसरू असतो. किर्तन-पारायण करणारे तर प्रत्यक्ष संत बनून संतत्वाला साजेसे वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. तद्वतच या सर्वांच्या उपजीविकेचे साधनसुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधितच असते. त्याच प्रमाणे या विषयातील साहित्यनिर्मिती करणारे, मार्गदर्शन करणारे अथवा उदबोधन करणारे त्या-त्या विषयातीलच कर्मयोगी असतात. ट्रकचा वाहनचालक आरोग्यशास्त्राशी संबंधीत पुस्तक लिहीत नाही. ढोलकीवादक कायदेविषयक पुस्तक लिहीत नाही, एखादी नृत्यांगना विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवत नाही किंवा मासोळ्या विकून पोट भरणारा किर्तन करत नाही. शेती वगळता अन्य सर्व विषयामध्ये "आधी स्वतः करून दाखवले मग सांगितले" हेच सूत्र असताना शेतीत मात्र अगदी विपरित घडत असते.

              विशेषज्ञ मास्तर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती खडू घेऊन फळ्यावर लिहून दाखवतो. विशेषज्ञ डॉक्टर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती कात्री घेऊन शस्त्रक्रिया करून दाखवतो, विशेषज्ञ वकील उंटावरून शेळ्या हाकत नाही; स्वतः न्यायाधीशासमोर बाजू मांडतो, विशेषज्ञ उद्योजक आपल्या उद्योगात प्रत्यक्ष सहभागी असतो. शेतीविषयात मात्र नेमके याच्या उलट घडत असते. शेती हा विषयच मोठा विचित्र आहे, इथे प्रत्यक्ष शेती कसणारा शेतकरी सोडून अन्य व्यवसायावर किंवा आयत्या शासकीय अनुदानावर उपजीविका करणारेच शेतकी तज्ज्ञ होतात. शेतीवर ज्याची उपजीविका अवलंबून नाही तो शेती साहित्याची निर्मिती करतो. ज्याला शेती करून स्वतःचे पोट जगवण्यात कधीच यश आले नाही तो "शेतीविषयक मार्गदर्शन’’ शिबिरात मार्गदर्शक म्हणून लांबलचक भाषण ठोकून देतो आणि मानधनाच्या स्वरूपात अर्थार्जन करून स्वतःचे पोट भरणारा इतरांना निसर्गशेतीचे सल्ले देत फिरतो. शेतकी तज्ज्ञ किंवा शेतकीविषयावर लिहिणारा साहित्यिक आपल्या हातात नांगर धरत नाही, विळा हातात घेऊन खुरपणी करत नाही, पाठीवर फवारा घेऊन फ़वारणी करत नाही. विशेषज्ञ डॉक्टर डॉक्टरकी करून जगत असतो, विशेषज्ञ वकील वकिली करून जगत असतो. विशेषज्ञ उद्योजक उद्योग करून जगत असतो त्याच न्यायाने स्वतः गहू, धान, बाजरी, दाळी, कापूस, सोयाबीन, कांदा यापैकी एखाद्या पिकाची शेती करून, त्याच शेतीवर आपला उदरनिर्वाह करून आणि इतर सर्व शेतकर्‍यांपेक्षा अधिक मिळकत मिळवून दाखवणारा शेतकरी तज्ज्ञ या संपूर्ण भारत देशात एकही सापडत नाही. झाडून सारेच्या सारे शेतकीतज्ज्ञ सरकारी पगारावर जगत असतात. त्यामुळे शेतकी तज्ज्ञ आणि शेतीसंबंधित साहित्यिक हे उंटावरचे शहाणेच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. शेतीचे विशेष आणि वास्तविक ज्ञान असल्याशिवाय उच्च प्रतीची आणि वास्तवाचे भान असणारी साहित्यनिर्मिती होऊ शकत नाही. हे आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधीतरी सर्वांना मान्य करावेच लागेल आणि तो दिवस उजाडेपर्यंत शेतीला चांगले दिवस येण्याची हातावर हात ठेऊन प्रतिक्षा करत बसावे लागेल.

              शेतीला केंद्रस्थानी ठेऊन विचार केला तर साहित्यविश्व परिपूर्ण नाही, हे विधान करताना मला अजिबात संकोच वाटत नाही. शेतीव्यवसायाचा सर्वांगीण विचार करणारे साहित्यच लिहिले गेलेले नाही. समजा एखाद्या नवतरुणाला नव्याने शेती करायची असेल तर त्याला सर्वंकश मार्गदर्शन करू शकेल किंवा शेती करताना त्याला साहित्याचा आधार घेऊन दमदारपणे वाटचाल करता येईल असे साहित्य उपलब्ध नाही. ज्या साहित्याचा शेतीच्या व्यावहारिक पातळीवर उपयोग नाही असे साहित्य मात्र साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले आहे. शेती करायची असेल तर मशागत कशी करावी, कष्ट कसे करावे, आधीच गळत असलेला घाम आणखी कसा गाळावा, बियाणे कोणते वापरावे, फ़वारणी कोणती करावी एवढेच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज काढून आणखी कर्जबाजारी कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शन करणारी, दिशानिर्देश देणारी पुस्तके रद्दीच्या भावात घाऊकपणे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र बँकेकडून कर्ज काढून बियाणे घेऊन ते मातीत पेरल्यानंतर, खते जमिनीत ओतल्यानंतर, कीटकनाशके फवारून हवेत गमावल्यानंतर जर अतिपावसाने किंवा कमी पावसाने शेतातील उभे पीक नेस्तनाबूत झाले आणि बँकेतून कर्जरुपाने आणलेले पैसे जर मातीत गेले, पाण्यात गेले किंवा हवेत गेले तर मग बँकेचे कर्ज फेडायला पैसे कुठून आणायचे याचे उत्तर देणारे एकही पुस्तक शेतकी तज्ज्ञांना आणि सरस्वतीच्या लेकरांना आजतागायत लिहिता आलेले नाही. शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, कोणत्या पिकाचा उपादनखर्च किती येतो, कोणते पीक घेतले तर खर्च वजा जाता कीती रक्कम शिल्लक असू शकते याचा शास्त्रशुद्ध ताळेबंद उपलब्ध करून देणारे एकही पुस्तक आज उपलब्ध नाही.

              शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय केला आणि व्यवसायावर जर कोणत्या कारणाने विपत्ती आली आणि मुद्दलसुद्धा नष्ट झाले तर विमाकंपनी कडून भरपाई मागावी, कोणता, कुठे आणि कसा फ़ॉर्म भरावा याची शिकवण देणारी पुस्तके आहेत. शेतीसाठी मात्र अशी पुस्तके उपलब्ध नाहीत. जर शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय कुठल्याही कारणाने पूर्णपणे तोट्यात गेला, दिवाळं निघालं तर त्याला दिवाळखोरी/व्यवसाय आजारी किंवा नादारी घोषित करायचा कायदेशीर मार्ग सांगणारी आणि त्या बिगरशेती व्यावसायिकाला संरक्षण देणारी कायद्याची चिक्कार पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र सर्वांना समान न्यायाचं तत्त्व सांगणारी कायद्याची पुस्तके सुद्धा शेतकर्‍याच्या बाजूने उभी राहायला तयार नाही.

              कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काहीही संबंध उरलेला नाही. साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अत्यंत लाजिरवाणेच आहे. साहित्यातून समाजाच्या सामुहिकमनाचे वास्तव प्रतिबिंबित व्हायला हवे; पण मागील काही वर्षाचा साहित्यिक आढावा घेतला तर ते सुद्धा होताना दिसत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नाही किंवा त्याचे प्रतिबिंब काही साहित्यात उमटलेले नाही. एक खैरलांजी प्रकरण झाले तर त्यावर शेकडो पुस्तके लिहिली गेली. दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून करण्यात आला तर शेकड्यांनी पुस्तके लिहिली जातात, मात्र; लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्या दखल घेण्याइतपतही साहित्यक्षेत्राला महत्त्वाच्या वाटत नाही. कारण काय? शेतकरी गरीब असतो म्हणून? की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून? या दोन्ही प्रश्नाची उत्तरे ’होय’ अशीच येत असतील व ”खपणार तेच विकणार" हाच सरस्वतीच्या उपासकांचा अंतरस्थ हेतू असेल तर "साहित्य म्हणजे समाजाचा आरसा" ही उक्ती प्रत्यक्षात उतरेलच कशी? शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्र आणि सरस्वतीची लेकरं यांची पात्रता आणि प्रतिभेची उंची अजूनही अत्यंत खुजी आहे, हे स्पष्ट व्हायला पुरेसे आहे.

              शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे शरद जोशींचे लेखन वगळता काहीही अन्य लेखन साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही, ही उणीव साहित्यक्षेत्रात राहिलेली आहे, हे सत्य आहे. शेतीच्या दुर्दशेचे कारण सांगताना शेतकरी आळशी आहे, त्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही, तो अज्ञानी आहे, तो व्यसनाधीन आहे अशा कांगावखोर आणि शास्त्रशुद्ध अर्थवादाचा लवलेश नसलेल्या लेखनापलीकडे साहित्याच्या महामेरूंना काही लिहिताच आलेले नाही. योग्य कारणाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन करण्यात साहित्यक्षेत्राने कुचराई केली ही पहिली चूक आणि जे लिहिले ते निखालस खोटे, अशास्त्रीय लिहिले ही दुसरी चूक.

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

              शेतीला भाकड शेतकीतज्ज्ञांचा आणि शेती साहित्यिकांचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या साहित्यिकांचे, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर विषाच्या बाटलीपर्यंत किंवा गळफ़ासाच्या दोरापर्यंत शेतकर्‍यांना पोहचवून देऊ शकते. शेतकर्‍यांच्या मुक्तीची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे लेखन शेतकर्‍यांना मुक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही शेतकर्‍यांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना उच्च तंत्रज्ञान वापरायला सांगतो, दुसरा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना निसर्गशेती करायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना जोडधंदे करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना मार्केटिंग कशी करावी हे शिकवू पाहतो. त्यामुळे शेतकरी गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने शेतकर्‍यांनी ते वापरायचा प्रयत्न केल्यास त्यांची शेती आणखी घाट्यांत जाते. त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान तोंड तरी बंद होईल. शेतकरी मरत असेल तर मरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. शेतकर्‍यांसाठी तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त शेतकरी देशोधडीस लागावा म्हणून शासकीय पातळीवरून होणार्‍या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. शेतकरी स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त शेतकर्‍यांच्या छातीवरून उठा. तुम्ही छातीवरून उठलात तर शेतकरी स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही.

              आता काही मिनिटातच वर्षे २०१४ मावळणार आहे आणि नवे वर्ष येणार आहे. हे नववर्षा! जुने जाऊदे मरणालागुनी....... बळीराजासाठी काहीतरी नवीन घेऊन येरे बाबा!!

                                                                                                                - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • 43219 views

प्रतिक्रिया

Submitted by कंजूस on गुरुवार, 01/01/2015 - 07:53

Permalink

अगदी खरं आहे गंगाधरराव.

अगदी खरं आहे गंगाधरराव. हिदी साहित्यात फक्त प्रेमचंद यानेच कथा कादंबरी माध्यमातून सामाजिक ढोंगीपणा आणि शेतीविषयक प्रश्न साहित्यात आणले. खून बलात्कारांवरचे चविष्ट लेखन वाचले जाते शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या नाही.

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 01/01/2015 - 08:48

Permalink

उदाहरणं द्याल का?

शेतीवर अभ्यासपूर्ण लिहिणा-यांची जशी आपण उदाहरणं दिली आहेत, तशी ज्यांच्या लिखाणामुळे शेतीची वाट लागली त्यांची उदाहरणं द्याल का?

Submitted by प्रसाद१९७१ on गुरुवार, 01/01/2015 - 09:29

Permalink

महात्मा ज्योतिबा फुले, शरद

महात्मा ज्योतिबा फुले, शरद जोशी आणि काही तुरळक अपवाद वगळता शेतीविषयाला लाभलेले साहित्यिक, लेखक आणि शेतकीतज्ज्ञच मुळात उंटावरून शेळ्या हाकलणारे असल्याने ते शेती विषयाला न्याय देऊ शकलेले नाहीत
मुटे साहेब- तुम्ही सारखी सारखी दुसर्‍यांकडुन काहीतरी मागत का असता? आता काय तर म्हणे साहीत्यकांकडुन शेतकरी आणि शेतीला न्याय पाहीजे. आता बंद करा ही रडगाणी. त्यापेक्षा तुम्हीच लिहा शेतीवर साहीत्य आणि छापा. सारखे सारखे दुसर्‍यांनी माझावर अन्याय केला, दुसर्‍यांनी माझ्या साठी काहीतरी करावे हेच पालुपद.

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 01/01/2015 - 09:46

Permalink

मुटे साहेब

मुटे साहेब आपल्या म्हणण्याप्रमाणे पुरुष स्त्रीरोग तज्ञ स्त्रियांना प्रसूती विषयक सल्ला देण्यास नालायक आहे कारण त्याने कुठे मुलांना जन्म दिला आहे? दुसरी गोष्ट इतके सगळे धंदे बुडीत जातात त्यांना तुमच्या म्हणण्याप्रमाणे असलेले पुस्तकी ज्ञान कोणत्याही कामाचे नसते. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नसतो. धंदा/ व्यवसाय करायला कोणतेही पुस्तकी ज्ञान पूर्ण मदत करू शकत नाही हि वस्तुस्थिती आहे. तसेच पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही हीही वस्तुस्थिती आहे. शेयर बाजारात धुवून निघालेले असंख्य मध्यमवर्गीय आणि ब्रोकर्स आहेत त्यांना कोणते पुस्तक १००% कामी येते? आपला शेतकीतज्ञान्वरचा विश्वास उडालेला आहे हे मान्य आहे याचा अर्थ १००% लोक नालायक आहेत असा अर्थ निघत नाही. ( गुंतवणूक तज्ञांवरचा माझाहि विश्वास पूर्ण उडालेला आहे याचा अर्थ असा नव्हे कि सगळेच गुंतवणूक तज्ञ नालायक/ पुस्तकी किडे आहेत). "ज्या साहित्याचा शेतीच्या व्यावहारिक पातळीवर उपयोग नाही असे साहित्य मात्र साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले आहे." आपल्या म्हणण्यानुसार असे साहित्य कोणी वाचतच नसेल तर त्याचे प्रकाशक आणि मुद्रक यांचे सुद्धा दिवाळे वाजले पाहिजे आणि त्यांनी सुद्धा आत्महत्या करावयास पाहिजे. बळीराजा कितीही गाळात असेल तरीही आत्महत्येचे उदात्तीकरण ताबडतोब थांबविले गेले पाहिजे. कारण जाणारा जातो आणि पाठीमागे कुटुंबाची वाताहत करून जातो. असंख्य "प्रगतीशील" शेतकर्यांनी शेतीतज्ञांच्या सल्ल्याने आपली भरभराट करून घेतलेली आहे हि वस्तुस्थिती आहे. यात माझे काही मित्रहि आहेत. तेंव्हा आपले म्हणणे एकांगी आणि पूर्वग्रह दुषित वाटते.

Submitted by कोंबडी प्रेमी on गुरुवार, 01/01/2015 - 10:28

In reply to मुटे साहेब by सुबोध खरे

Permalink

खाली काळा पहाड

म्हणताहेत ते अगदी बरोबर आहे :)

Submitted by बाबा पाटील on गुरुवार, 01/01/2015 - 13:10

Permalink

पुर्ण सहमत.

गंगाधर मुटे यांना पुर्ण सहमत्,खरच या वाचाळवीरांच्या मुसक्या आवळुन त्यांना नाल ठोकायची वेळ आली आहे असे वाटतय.

Submitted by यशोधरा on गुरुवार, 01/01/2015 - 13:57

Permalink

आपण स्वतः गजला वगैरे लिहिता

आपण स्वतः गजला वगैरे लिहिता त्यात शेतीविषयक प्रश्न, त्यावरील उपाय मांडता का?

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 01/01/2015 - 23:46

Permalink

शेतीला साहित्यापेक्षा

शेतीला साहित्यापेक्षा राजकारणविरहित, भ्रष्टाचारविरहित आणि सत्यावर आधारलेल्या परखड व्यवस्थापनाची गरज आहे ! असे व्यवस्थापन करणे शेतकर्‍याला (किंवा त्यांच्या नेत्यांना) जमलेले नाही हे सत्य शेतकर्‍यांच्या अनेक दशकांच्या दुरावस्थेतून स्पष्ट दिसत आहे. तेव्हा शेतीचा फायदेशीर व्यवसाय करायचा असेल तर आता तरी डोळसपणे जेथून मिळेल तेथून शेतकर्‍यांनी जरूर तेवढे तरी व्यवस्थापन शिकणे जरुरीचे आहे. उदा. मेकॅनिकल इंजिनियरिंग कंपनीचे अर्थसल्लागार / व्यवस्थापन सल्लागार / कायदे सल्लागार / विपणन सल्लागार / जाहिरात सल्लागार / इ इ, हे सर्व बहुदा मेकॅनिकल इंजिनियर नसतात... पण त्यांचा कंपनीच्या भरभराटीत मोलाचा सहभाग असतो... कारण ते मेकॅनिकल इंगिनियरिंगमध्ये अंगभूत नसलेल्या पण व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचे तज्ञ असतात. एक शंका : शेतीवर उत्तम कथा, कादंबरी अथवा कविता लिहीली म्हणून शेतकर्‍याच्या शेतात भरघोस पीक आले असे कधी झाले आहे का ?

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 01/02/2015 - 00:15

Permalink

ही लोकसत्तामधली लिंक

http://m.loksatta.com/vishesh-news/inventions-from-the-soil-of-maharashtra-1056868/?SocialMedia या लिंकमध्ये अशा शेतकरी/संशोधकांचा समावेश आहे जे स्वतः शेतकरी आहेत आणि त्यांनी स्वतःला आलेल्या अडचणींवर मात करण्याच्या हेतूने या उपकरणांची निर्मिती केलेली आहे. मुटेसाहेबांच्या निकषांमध्ये यातले सर्व शेतकरी संशोधक बसतात. (लेखामध्ये अनेक इतर संशोधकांचाही उल्लेख आहे.) आता यांचं काम महाराष्ट्रात सगळीकडे प्रसिद्ध करुन सर्व शेतक-यांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी मुटेसाहेब घेतील अशी आशा आहे.

Submitted by नाखु on Fri, 01/02/2015 - 09:16

In reply to ही लोकसत्तामधली लिंक by बोका-ए-आझम

Permalink

+१

हे ही तुच तुझ्या जीवनाचा शिल्प्कार वाचा आणि जमले तरच विचार करा अनिवार्य नाही !! *acute* ;D *ACUTE*

Submitted by हुप्प्या on Fri, 01/02/2015 - 02:05

Permalink

नेहमीप्रमाणेच त्रागा आणि आदळआपट

शेतकर्यांचे कैवारी एक तर रडगाणे गातात वा आक्रस्ताळी आदळआपट करतात. आम्हाला यंव मिळत नाही नि त्यंव मिळत नाही. डॉ. खरे म्हणाले ते मलाही म्हणावेसे वाटते. मुलाला जन्म दिला नसेल व दूध पाजले नसेल तर त्या क्षेत्रात डॉक्टरकी करायचा कुणालाही अधिकार नाही असे म्हणण्यासारखे आहे. स्वतः जनावर नसाल तर जनावरांच्या रोगावरील निदान करायच्या भानगडीत पशुवैद्यांनी पडू नये असे काहीतरी आचरट सुचवायचे आहे की काय असे वाटले. असो. आप़ण सगळे उंटावरून शेळ्या हाकणारे असल्यामुळे आपण यावर कुठलेही उपाय सुचवणे हे अपेक्षित नाही हे उघड आहे. शेतकर्यांच्या वतीने कायम रडगाणी गाणे आणि बिगरशेतकर्यांना शाब्दिक चोप देणे हे मुट्यांचे आवडते छंद आहेत. फारतर हे रडताना एखादी जोरकस तान दिली तर आपण दाद द्यावी. पुढील वर्षाच्या रडगाण्यांना शुभेच्छा!

Submitted by बाळ सप्रे on Fri, 01/02/2015 - 11:18

Permalink

शेती विषयाचे आपल्याला प्रचंड

शेती विषयाचे आपल्याला प्रचंड ज्ञान आहे आणि त्यावर आपले मतप्रदर्शन करण्याचा जन्मसिद्धच अधिकार आहे, अशाच आविर्भावात प्रत्येक मनुष्य वावरत असतो.
हे फक्त तुमच्या लेखनाबाबतीत वाटते. बाकी कोणत्या लेख/पुस्तक/प्रतिक्रीया वाचून अथवा मी पाहिलेल्या कुणा माणसाबाबत असं कधी वाटलं नाही !!!

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 01/02/2015 - 14:03

Permalink

अरे

अरे गंगाधर, शेतकर्यांचे प्रॉब्लेम्स नक्कि काय आहेत ते तरी कळू दे. सरकार कुठल्याही पक्षाचे असो, ते नेहमी कृषीक्षेत्राला प्राधान्य देत आले आहे गेली ५०-६० वर्षे.तेव्हा आम्ही जे वाचतो तो "शेतक्र्यांना कर्जमाफी,सबसिडी.. "अशाच बातम्या वाचत असतो. एखादी यूज केस का म्हणतात ती घे येथेच मिपावर व नक्की सरकार किंवा आम्ही कशी काय ती सोडवू शकतो किंवा मदत करू शकतो ते सांग.

Submitted by अत्रन्गि पाउस on Fri, 01/02/2015 - 19:38

In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

लेखनशैली

लेखनशैली लेखनशैली म्हणतात ती हीच .... डू आयडीला यकदम फिट्ट ....

Submitted by जेपी on Fri, 01/02/2015 - 18:12

Permalink

या धाग्यावर श्री.गंगाधर मुटे

या धाग्यावर श्री.गंगाधर मुटे यांच्याशी प्रतिवाद करण्याची इच्छा होती पण शांत राहतो. उगाच आंदोलनाची हवा निघुन जायची. शेती गजाली आणी आंदोलन करायची जागा नाही.हे कळेल तो सुदिन. तस्मात चालु द्या.

Submitted by गंगाधर मुटे on Fri, 01/02/2015 - 19:43

Permalink

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. माझ्या बाबतीत संपादक मंडळाची काय भूमिका आहे, हे कळल्याशिवाय मी कुणालाही व्यक्तिशः उपप्रतिसाद द्यायचा नाही, असे ठरविले आहे. त्यामुळे प्रतिसादकांनी मला प्रश्न विचारू नयेत. लेखानुसार आपापले मत व्यक्त करणार्‍या प्रतिसादकांचे स्वागत आहेच. :) -------------------------------- - रामदेवबाबा स्वत: योग करून दाखवतात. - विशेषज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांना स्वत: ऑपरेशन करून दाखवतो. - प्रशिक्षणार्थी वाहनचालकांना प्रशिक्षक स्वत: वाहन चालवून दाखवतो. - अभियंत्याला स्वत: आराखडा तयार करावा लागतो, साईटवर प्रत्यक्ष जावून आखणी करावी लागते, स्वत:च्या हाताने मोजमाप करावे लागते. नंतरच तो विशेषज्ञ अभियंता बनतो आणि इतरांना प्रशिक्षण आणि सल्ला देतो. - प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला हजामत कशी करावी लागते, हे प्रत्यक्ष हजामत करून शिकविले जाते. उंटावरचे शहाणे शेतकीतज्ज्ञ सल्ला देण्यापूर्वी किंवा सल्ला देताना असे काहीही करत नाहीत. --------------------------------

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 01/02/2015 - 22:38

In reply to प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. by गंगाधर मुटे

Permalink

@उंटावरचे शहाणे शेतकीतज्ज्ञ

@उंटावरचे शहाणे शेतकीतज्ज्ञ सल्ला देण्यापूर्वी किंवा सल्ला देताना असे काहीही करत नाहीत.>> ठिक आहे..असेल तसं. पण मग ते इथे कशाला? जे तसं करतात,त्यांना तिकडे जाऊन सांगा ना! किंवा मग या आपल्याला वाटणार्‍या शहाण्यांची नावे तरी घ्या.. व्यक्ति म्हणून..समाज म्हणून..वर्ग म्हणून.. नक्की तुम्हाला अभिप्रेत कोण आहे? हे तरी स्पष्ट बोला. :)

Submitted by संपादक मंडळ on Sat, 01/03/2015 - 13:58

In reply to प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. by गंगाधर मुटे

Permalink

मिपा धोरण

मिपाच्या धोरणानुसार वैयक्तिक अपमानास्पद उल्लेख असलेले, असांसदीय भाषेतील लेख, प्रतिक्रिया अप्रकाशित केल्या जातात. हे धोरण सर्वांनाच लागू आहे. सं.म. कडून हे धोरण कसोशीने पाळले जाते. तरीही एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक हल्ले करणारे, असांसदीय भाषेतील लिखाण चुकून कुठे राहिले असेल तर कृपया सर्वच सदस्यांनी सं. मं. च्या नजरेस आणून द्यावे. योग्य ती कारवाई केली जाईल. मिपाची धोरणे आणि कारवाई व्यक्तिविषयक किंवा सदस्यकेंद्रित नसून प्रत्येक लेख आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्र विचार करुन त्या त्या लेखावर आणि प्रतिसादावर केली जाते. एखादा सदस्य सतत गंभीर आक्षेपार्ह अश्या स्वरुपाचे लिहीताना दिसला तरच सदस्यत्वविषयक कारवाई होते. त्यामुळे एखाद्या सदस्याविषयी संपादकांचे धोरण काय हा प्रश्न अप्रस्तुत ठरतो.

Submitted by गंगाधर मुटे on Sat, 01/03/2015 - 14:15

In reply to मिपा धोरण by संपादक मंडळ

Permalink

संपादक मंडळ

संपादक मंडळ, मागील एका प्रकरणात संपादक मंदळाने एकतर्फी कारवाई केल्याबद्दल मी संपादक मंडळाशी सामुहिक आणि मंडळातील सदस्यांशी व्यक्तीगत संपर्क साधला होता पण अजून मला त्याविषयी काहीही कळलेले नाही. अथवा पुढील काहीही कर्यवाही झालेली नाही. असो, जुना विषय मी माझ्याबाजूने इथेच संपवत आहे.

Submitted by थॉर माणूस on Mon, 01/05/2015 - 09:51

In reply to प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. by गंगाधर मुटे

Permalink

उंटावरचे शहाणे शेतकीतज्ज्ञ

उंटावरचे शहाणे शेतकीतज्ज्ञ सल्ला देण्यापूर्वी किंवा सल्ला देताना असे काहीही करत नाहीत.
उंटावरच्या शहाण्या शेतकीतज्ञांनी शेतकर्‍याला खते, नांगरणी, फवारणी, रोग निर्मुलन इ. विषयी सल्ले देताना फारसे कधी ऐकले नाही बॉ. त्यामुळे हे सरकसटीकरण आहे. आणि ते करतच आहात तर... - रामदेवबाबांनी त्यांचे हॉस्पिटल आणि औषध कारखाने चालवण्यासाठी व्यवस्थापन कळणारेच लोक बसवलेत, योग येणारे नव्हे. - डॉक्टर ऑपरेशन शिकवतो, फी किती घ्यावी किंवा कुठल्या भागात हॉस्पिटल चालवावे हे ठरवण्यासाठी सर्जनचाच सल्ला लागतो असे नाही. - प्रशिक्षक वाहन चालवून दाखवत असला तरी नंतर त्यातून पैसे कसे कमवायचे हे त्या चालकाने ठरवायचे असते. - अभियंत्याच्या बाबतीतही तेच, प्रमोटर ठरवतो घराचा काय रेट लावायचा ते. - हजामती करणार्‍यालासुद्धा दुकान कुठे टाकावे किंवा काय रेट लावावा हे समजण्यासाठी हजामत करणार्‍या गुरूच्याच सल्ल्याची आवश्यकता असते असे नाही. आणि हो, डॉक्टरच्या मुलाने बापाला कितीही वर्षे प्रॅक्टीस करताना पाहिले असले तरी निव्वळ वडीलांचा दवाखाना आहे या जीवावर तो स्वतः डॉक्टरकी सुरू करू शकत नाही. इंजीनिअरचा मुलगा वडील इंजीनिअर आहेत म्हणून त्यांच्याच पोस्टवर रूजू होत नाही. शिक्षकाच्या मुलाला निव्वळ वडील शिकवतात म्हणून शाळेवर शिक्षक म्हणून घेत नाहीत. उकरून काढायचेच म्हटले तर बरेच मुद्दे निघतील. :)

Submitted by बॅटमॅन on Fri, 01/02/2015 - 19:48

Permalink

त्यामुळे प्रतिसादकांनी मला

त्यामुळे प्रतिसादकांनी मला प्रश्न विचारू नयेत.
मिपा आपल्या मालकीचे असल्यास तसा खुलासा करावा, अन्यथा वरील आज्ञा हास्यास्पद आहे. बाकी चालूद्या.

Submitted by आदिजोशी on Fri, 01/02/2015 - 19:56

In reply to त्यामुळे प्रतिसादकांनी मला by बॅटमॅन

Permalink

अच्रत बॅटॅ

दुश्त कुथ्ला

Submitted by बॅटमॅन on Fri, 01/02/2015 - 20:01

In reply to अच्रत बॅटॅ by आदिजोशी

Permalink

दुश्त कुथ्ला

दुश्त कुथ्ला
मला वरील वाक्यात अबजद दिसले. ;)

Submitted by आदिजोशी on Fri, 01/02/2015 - 21:14

In reply to दुश्त कुथ्ला by बॅटमॅन

Permalink

अबजद

:)

Submitted by हुप्प्या on Fri, 01/02/2015 - 22:46

Permalink

काही म्हणी

सदर लेख वाचून खालील म्हणी आठवल्या: १. नाचता येईना अंगण वाकडे २. अती शहाणा त्याचा बैल रिकामा ३. अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागणे ४. नावडतीचे मीठ अळणी.

Submitted by अत्रन्गि पाउस on Fri, 01/02/2015 - 23:01

In reply to काही म्हणी by हुप्प्या

Permalink

आणि हे पण

आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी वडाचे तेल वांग्यावर ... बाजारात तूर भारी भट भटीणीला मारी ... नळी फुंकिली ...

Submitted by स्वप्नज on Sat, 01/03/2015 - 07:27

Permalink

एकांगी (अ)विचार.

पूर्णपणे एकांगी विचार मांडले आहेत (त्यात नवीन ते काय म्हणा). अवांतर- तुमचा लेख वाचून तुमचे सर्व लिखाण वाचण्याची अतितीव्र इच्छा झाली होती. तुम्हाला काही प्रश्नही विचारणार होतो- १. तुमचे बाकी लिखाण प्रकाशित झाले आहे का? कुठे मिळेल ते. २. इतर लिखाणही विनोदीच आहे कि कसे? ३. संसदेतील प्रश्नोत्तराचा तास बंद करावा का? पण तुम्ही मनाई केल्यामुळे विचारणार नाही मी हे प्रश्न. -(उत्तरांची अपेक्षा नसलेला) स्वप्नज

Submitted by विवेकपटाईत on Sat, 01/03/2015 - 09:35

Permalink

सुबोध खरे, हुप्य्या,स्वप्नज,

सुबोध खरे, हुप्य्या,स्वप्नज, माई साहेब -आणि इतर विद्वान लोकांना, १. आपल्या सरकारचे धोरण शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे असे आहे. उचित भाव देण्याचे नाही. जास्त उत्पन्न झाले तरी ही शेतकऱ्याला नुकसानच होते. २. ग्राहकाला स्वस्तात शेत माल उपलब्ध करून देणे (१६ रुपये लागतच गहू २ रुपयात विकणे). ३. गेल्या २० वर्षांत महागाई जर १००% वाढली आहे, तर शेतमाल केवळ ५०%. उदा: कांदा १९९८ मध्ये ही seasan च्या हिशोबाने ५-५० रु किलो होता आणि आज ही महागाई ५ पटीने वाढली तरी ही १०-५० रु हाच आहे. साखर १३.५० रु. आज ४० रुपये, या काळात महागाई १० पटीने तरी वाढली आहे. ४. महागाईचा हिशोब केला तर खाद्य तेल कमीत कमी २०० रु किलो विकल्या गेले पाहिजे. पण सरकारी धोरण भारतीयांच्या सेहत साठी हानिकारक पामोलीन विदेशातून आणून स्वस्तात विकणे आहे. मग सोयाबीन उत्पादकाला उचित किमत कशी मिळणार. देशात तेल उत्पादन कसे वाढणार, कुणी या साठी निर्णय घेतला तर दुसरा ग्राहकांच्या हिताच्या नावाने आणि कमिशन साठी निर्णय बदलतो आणि उत्पादक आणि तेल मिल वाल्यांवर ही .... पाळी येते. हेच मी 'बळी' या कथेत सांगण्याचा प्रयत्न केला होता. ५. बाकी माई साहेब 'सरकारच्या मते महागाई म्हणजे खाद्य पदार्थ आणि भाजी पाल्यांची महागाई' आणि त्यांची किमत कमी ठेवणे एवढेच मग शेतकरी मेला तरी चालेल.उदा. २००४ मध्ये गव्हाला ५६० एम एस पी होती महागाईचा हिशोब करा आणि शेतीच्या खर्चाचा कमीत कमी २००० तरी मिळाले पाहिजे. पंजाब हरियानात शेतकरी ३ वेळा उत्पादन घेतो. शिवाय घरात कोणी न कोणी केंद्र किंवा राज्य सरकारच्या नौकरीत असतोच. संघटीत असल्या मुळे वीज इत्यादीचे बिले कधीच देत नाही त्या मुळे तो जिवंत आहे. तो ही केवळ गहू आणि तांदूळच लावतो. मधल्या काळात भाज्या (दिल्लीचे मार्केट जवळ असल्या मुळे). स्वत:च्या डोक्यावर महागाईची बदनामी घेऊन केबिनेट मध्ये शरद पवार शेतकर्यांचे हित बघण्याचा प्रयत्न करत होते, आता ते ही नाही. ६. महाराष्ट्रातील ८०% टक्के जमीन कोरडेवाहू आहे, त्यांना बँकांचे कर्ज मिळत नाही. माफीचा प्रश्नच येत नाही. ७. आधीच कमी एम एस पी आणि उत्पादन जास्त झाल्यास ती ही मिळत नाही. सोयाबीन ची एम एस पी किती आहे आणि मंडी मध्ये शेतकर्यांना काय भाव मिळत आहे, सांगू शकाल का? . कापसाचे भाव ही कमी ठेवण्या साठीच सरकारचे नियोजन असते. त्या मुळे या वर्षी रिकॉर्ड उत्पादन झाले पण शेतकर्याच्या पदरी काय पडणार. ७. सबसिडी रासायनिक खाद कारखान्यांना दिली जाते, त्यात हजारो कोटींचा घोटाळा होतो. पकडणे ही अशक्य आहे. शेतकर्यांना वेळेवर खाद मिळत नाही आणि पैशे ही जास्त मोजावे लागतात. ७. एयर इंडियाला दरवर्षी १० ते १५ हजार कोटी अनुदान दिले जाते. पण साखर कारखान्याचे केवळ ७०० कोटीचे व्याज माफ केले जाते तर त्याचा गवगवा सर्व चेनेल वर होतो. मुंबईत पुण्यात राहून सल्ले देणे आणि एक घूंट वर चर्चा करणे वेगळे. जाणकार अधिकारी ही 'डोळ्यांवर पांघरून' घेऊन बसतात. त्याचेच नवल वाटते.

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 01/03/2015 - 11:32

In reply to सुबोध खरे, हुप्य्या,स्वप्नज, by विवेकपटाईत

Permalink

महागाई

या देशात काय फक्त शेतकरी राहतात? बाकीचे लोक राहात नाहीत? जर शेतमालाला शेतकरी म्हणतात तो भाव दिला तर बाकीचे लोक महागाईमुळे त्या गोष्टी विकतच घेऊ शकणार नाहीत. मग बघा कोण आत्महत्या करतं ते. दुसरी गोष्ट म्हणजे या देशात शहरांमध्ये जर जास्त क्रयशक्ती असणारे लोक असतील आणि ते राजकीयदृष्ट्या जागरूक असतील तर ते निवडणुकीत शेतमालाचे भाव वाढवणारं सरकार उलथवून टाकू शकतात. कांद्याचे भाव आणि त्यावरून होणारं राजकारण पाहिलेलंच आहे आपण.

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 01/03/2015 - 13:47

In reply to सुबोध खरे, हुप्य्या,स्वप्नज, by विवेकपटाईत

Permalink

विवेकपटाईतसाहेब,

विवेकपटाईतसाहेब, शेतकर्‍यांचे हे प्रश्न मान्य करूनही विद्वान असलेल्या आणि नसलेल्या लोकांनाही काही प्रश्न पडू शकतात : १. असे असताना देशात (आणि महाराष्ट्रातही) बहुसंख्येने असलेले शेतकरी त्यांच्या हिताविरुद्ध कायदे-नियम बनवणारे लोकप्रतिनिधी का निवडतात ? २. तात्पुरत्या पॅकेजसाठी नेहमी आंदोलने करणारे आणि त्याचे मिडियात "योग्य" प्रदर्शन करवून घेणारे शेतकरी व त्यांचे नेते कायमस्वरुपी योजना व्हावी म्हणून कधी तसे आंदोलन करताना दिसत नाहीत. यामागचे "खरे कारण" काय आहे बरे ? ३. पॅकेजेसमधून अनेक सहस्र कोटींचा खर्च होऊनही अनेक शतके न सुटणार्‍या या समस्येचा दोष शेतकरी नसलेल्या लोकांना लाऊन अथवा सतत रडगाणे गाऊन होणार आहे का ? असो. उत्तरे दिलीच पाहिजेत असे नाही आणि ती इथे देणे सोईचे असेलच असेही नाही. पण जर "खरेच" शेतकर्‍यांचा कळवळा असला तर त्याच्या समस्येंच्या सोडवणूकीच्या "खर्‍या दूरगामी उपायांचा" पाठपुरावा करणे अत्यंत गरजेचे आहे; आणि "शेतकरी नसलेल्या लोकांना विनाकारण दोष लावणे आणि / अथवा त्यांनी शेतकर्‍यांचे अहित केले असे रडगाणे सतत लावणे" हे त्यापैकी असलेले उपाय नाहीत याबाबत तुमचे आमचे एकमत व्हायला हरकत नसावी असे वाटते. अर्थात अजून काही वेगळे मत असल्यास वाचायला आवडेल, हेवेसांन.

Submitted by पैसा on Sun, 01/04/2015 - 14:02

In reply to सुबोध खरे, हुप्य्या,स्वप्नज, by विवेकपटाईत

Permalink

हे नक्की का?

स्वत:च्या डोक्यावर महागाईची बदनामी घेऊन केबिनेट मध्ये शरद पवार शेतकर्यांचे हित बघण्याचा प्रयत्न करत होते, आता ते ही नाही.
कारण अन्नधान्य आणि शेतीमालाचे फ्युचर्स ट्रेडिंग साहेबांच्या कारकीर्दीत सुरू झाले. त्यामुळे शेतकर्‍यांचा काहीही फायदा झाला नाही, मात्र महागाई चक्रवाढ गतीनी वाढली आणि मधल्या ट्रेडर्स लोकांनी मरणाचा पैसा कमवला असेही बहुतांश ऐकले आहे.

Submitted by काळा पहाड on Mon, 01/05/2015 - 18:31

In reply to सुबोध खरे, हुप्य्या,स्वप्नज, by विवेकपटाईत

Permalink

खालचे दोन प्रश्न कसे सोडवणार

खालचे दोन प्रश्न कसे सोडवणार ते सांगा: १. दर करा पूर्णपणे नियंत्रणमुक्त पण शेतकरी सुद्धा सगळं उगवत नाही. शेंगदाणा पिकवणारा शेतकरी फक्त शेंगदाणे खावून जगू शकत नाही. त्यालाही महाग धान्य विकत घ्यावंच लागेल. तेव्हा हे logistical प्रश्न कसे सोडवणार ते सांगा. २. दर नियंत्रण मुक्त केले तर (लॉजिकली) आयात निर्यातीवरील बंदी सुद्धा उठवावी लागेल. बाहेरच्या देशातला आणि भारतातला दरातला फरक लगेच अन्नधान्य बाहेरच्या समपातळीवर घेवून येईल आणि शेतकर्‍यांना बाहेरच्या शेतकर्‍यांशी स्पर्धा करावी लागेल. ते करण्याची तयारी आहे का? चीनमधला (कमी प्रतीचा पण) स्वस्त लसूण आणि इथला चांगल्या प्रतीचा पण महाग लसूण. ग्राहकाला काय परवडेल? आणि मग ग्राहक काय करतील बरं?

Submitted by सुबोध खरे on Sat, 01/03/2015 - 10:09

Permalink

पटाईत साहेब

पटाईत साहेब माझ्या प्रतिसादात आपल्याला कुठे असे दिसले कि शेतकऱ्यांचे प्रश्न गैर वाजवी आहेत किंवा ते प्रश्नच नाहीत. माझे फक्त एवढेच म्हणणे आहे कि आत्महत्येचे उदात्तीकरण थांबविले पहिजे. दुसरे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व शेतकी तज्ञ नालायक आहेत हा त्यांनी काढलेला निष्कर्ष. हा बरोबर नाही एवढेच माझे म्हणणे आहे बाकी शेतीमालाला भाव किती असावा इ प्रश्न याबद्दल मला काहीच माहिती नाही म्हणून मी त्यावर कधीही बोललो नाही. एअर इंडिया बद्दल जेवढं कमी बोलावं तेवढं चांगलं. ते एक कुरण असून असंख्य बोकड त्यावर चरत आहेत एवढेच.

Submitted by विवेकपटाईत on Sat, 01/03/2015 - 10:27

In reply to पटाईत साहेब by सुबोध खरे

Permalink

खरे साहेब, शेतकर्यांसमोर

खरे साहेब, शेतकर्यांसमोर मुख्य प्रश्न हाच आहे, उत्पादन किती ही वाढले तरी ही लागत पेक्षा कमी भाव मिळाला तर शेतकर्याला नुकसानच होणार. फायदा होणार नाही. गेल्या दशकापासून दरवर्षी हेच घडत आहे. शेतमालाचा भाव कमी ठेवणे हाच सरकारचा उद्देश्य होऊन बसलेला आहे, जर भाव जास्त झाला तर सरकार निर्यात बंदी आणते पण कमी असेल तर सरकार काही ही करत नाही. 'वोट बँक' राजनीतीत शेतकर्याचा बळी जात आहे.ह्या परिस्थितीत शेतकरी निराश होणे स्वाभाविक आहे. मला वाईट एवढेच वाटते, शेतकर्याला उचित भाव मिळावा या साठी कुठला ही नेता किंवा तज्ञ प्रयत्न करत नाही. कृषी मूल्य आयोग शेतकर्यांचा खर्च कसा कमी आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करतो. शेतकर्याला योग्य भाव मिळावा या साठी तो प्रयत्न करत नाही, कारण ते सरकारी धोरणाच्या (अलिखित) विरुद्ध जातो.

Submitted by गवि on Sat, 01/03/2015 - 10:27

In reply to पटाईत साहेब by सुबोध खरे

Permalink

खरे साहेब.

खरे साहेब. मला दिसणारी सौ बात की एक बात ..एकूण सार असं आहे की मुंबईत पुण्यात राहून सल्ले देऊ नयेत. यू जस्ट बी द लार्जेस्ट कंझ्युमर. आय थिंक इट्स फेअर इनफ ॲज ओपिनियन. मुंबई पुण्यात असल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी कळत नाहीत असं म्हटलं जातं त्यात आणखी एक. मुंबई पुणे सोडण्यापेक्षा सल्ले सोडून देणे बरे.. नाही का? इनफॅक्ट थोडं व्यक्तिगत बोलतो.. तुम्ही उपचार करतानाही शहरी आजारांवर करत चला. खेड्यातली इन्फेक्षन्स वेगळी. ती तुम्हाला तिथल्या मातीत राहिल्याशिवाय कळणार नाहीत. मुळात भारताच्या मातीशी नाळ नसणार्या तुमच्या परदेशी स्कॅनिंग उपकरणांत भारतीय पोटातले ट्यूमर्स दिसतातच कसे हाही मला प्रश्नच पडतो. तुमचे एम आर आय मशीन ए.सी.त.. त्या मशीनला आधी उन्हात मातीमधे आणून ठेवा आणि मग बोला. तेव्हा सल्ला देण्यापूर्वी पेशंट मुंबईचा रहिवासी असल्याचे आधारकार्ड मागा. बाकीच्यांना सल्ला देऊच नका.

Submitted by गवि on Sun, 01/04/2015 - 10:17

In reply to खरे साहेब. by गवि

Permalink

मुटेसर.. होय ते मी उपरोधाने

मुटेसर.. होय ते मी उपरोधाने लिहिलेय हे खरेच आहे. पण त्यात तुमचे म्हणणे न समजल्याचा मुद्दा नसून तुमच्याच नव्हे तर इतरही काही लेखकांच्या शेतीविषयक विचारधारणेत आता दिसणारा किंवा मला तरी वाटणारा आयव्हरी टावर मुद्दा.. अर्थात प्रथम तुमच्या शहरी हस्तिदंती मनो-यातून खाली उतरा अन एसी केबिनमधे बसून आम्हाला सल्ले देऊ नका असा मुद्दा ठळक अन उठून दिसतो. माझं म्हणणं असं की तसे अनुभवहीन ताशेरे मारणारे बरेच शहरी लोक असतीलही पण जनरलायझेशन करुन उपायांच्या सुचवण्यांची दारे बंद करु नका. सर मला जे दिसतं तेच सांगतो.. इंटेलिजंट उपाय कुठून येतील हे खरोखर सांगता येत नाही. बरेचदा प्रत्यक्ष त्या क्षेत्रात आणि अडचणीत रुतलेल्या माणसाला/ अनुभवी माणसालाही जे सुचत अथवा लक्षात येत नाही ते काठावरुन दुरुन बाहेरुन अलूफ तटस्थ पाहणारा एखादा क्षेत्रातले नोलेज नसणारा निरीक्षक सांगू शकतो.. अगदी कदाचित शहरात एसीत बसूनही. कारण त्याचा परस्पेक्टिव्ह वेगळा असतो. तेव्हा कोणालाच असे बंद करुन टाकू नका..इतकेच म्हणणे आहे. हेच म्हणणे धाग्यावरही पोस्टवतो आहे. आधी नुसते खोचक लिहिले होते. त्याचे हे स्पष्टीकरण..

Submitted by विवेकपटाईत on Sun, 01/04/2015 - 09:44

In reply to पटाईत साहेब by सुबोध खरे

Permalink

१.मी आत्महत्येचे उदात्तीकरण

१.मी आत्महत्येचे उदात्तीकरण केले नाही. शेतकर्यांमध्ये निराशा का आहे, हे मांडले आहे. २. जर सरकार शेतकर्याला योग्य भाव देऊ शकत नाही तर प्रतिबंधकात्म्क उपाय ही सरकारने करू नये. ३. शेतीत सरकारी लुडबुड कमी व्हावी. बाजाराला त्याचे कार्य करू द्यावे. ४. रासायनिक खतांवर दिली जाणारी सबसिडी, वीज सबसिडी इत्यादी पूर्णपणे बंद करावी. ५. कृषी विमा 'व्यापारिक सिद्धांतावर सुरु करावा. ६. बाजाराचा विचार करून शेतकरी शेतात काय ते लावायचे शिकतील. ७. विभिन्न सबसिडी वर वर वाचणारे जवळपास २ लाख कोटी ग्रामीण भागातील रस्ते, रेल्वे या वर खर्च करावे. जेणे करून कृषी माल दूर दूर नेता येईल. उदा: अमृतसर वरून शेतकरी, दिल्ली आजाद्पूर , गुडगांव, ओखला, केशोपूर कुठे जास्त भाव मिळतो तिथे ट्रक लावतो. १० तासात ट्रक दिल्लीत पोहचतो. जर २४ तासांत जर शेतमाल देशाच्या कान्याकोपर्यात पोहचेल तर शेतमालाला चांगला भाव आपसूक मिळेल. ८. महाराष्ट्राचे म्हणाल तर मध्य महाराष्ट्रातून रेल्वे लाईनच नाही. इस्ट-वेस्ट कारीडोर महाराष्ट्रातून जात नाही.

Submitted by पैसा on Sun, 01/04/2015 - 10:25

In reply to १.मी आत्महत्येचे उदात्तीकरण by विवेकपटाईत

Permalink

बरेचसे मुद्दे पटले

मात्र
बाजाराला त्याचे कार्य करू द्यावे.
याबद्दल शंका आहे. शेतकरी बहुसंख्येने अल्पशिक्षित आणि असंघटित आहे. मधल्या दलालांकडून त्यांची फ्सवणूक होतच असते. ती वाढू नये आणि दलालांची पोळी पिकू नये असे वाटते.

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 01/04/2015 - 11:11

In reply to बरेचसे मुद्दे पटले by पैसा

Permalink

@मधल्या दलालांकडून त्यांची

@मधल्या दलालांकडून त्यांची फ्सवणूक होतच असते. ती वाढू नये आणि दलालांची पोळी पिकू नये असे वाटते.>>> मार्केटयार्डात भरपूर पाहिले आहे हे! ४० पैसे दरानॆ कोथिंबिरिचि १ गड्डी ,हां दर ठरवून दलालाने आत एका गाळेवाल्याला सव्वा रुपया ला तीच गड्डी हां दर मिळवून ,अख्खा १ TaTa ४०७ ट्रक कोथिम्बीर विकली होती. हे मेटर सेट केलं फ़क्त २० मिनिटात!

Submitted by गवि on Sun, 01/04/2015 - 11:16

In reply to @मधल्या दलालांकडून त्यांची by अत्रुप्त आत्मा

Permalink

..आणि गिर्‍हाईकाला?

..आणि गिर्‍हाईकाला? ..त्यांचे काय?

Submitted by पैसा on Sun, 01/04/2015 - 11:35

In reply to ..आणि गिर्‍हाईकाला? by गवि

Permalink

तेच ना!

या मुक्त बाजारव्यवस्थेत शेतकरी, मूळ उत्पादनकर्ता आणि अंतिम ग्राहक/उपभोक्ता यांचेच बहुधा नुकसान होते. फ्युचर्स ट्रेडिंग करणार्‍याला कधीतरी नुकसान येऊ शकते. पण असे माल प्रत्यक्ष ताब्यात घेऊन पुन्हा विकणारे दलाल प्रचंड फायदा कमवत असतात. तेव्हा जर सामना व्हायचा असेल तर शेतकरी+ ग्राहक विरुद्ध दलाल असा व्हायला हवा. कारण ग्राहक सुद्धा शेतकर्‍यांसारखेच व्यवस्थेचे बळी आहेत.

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 01/04/2015 - 11:48

In reply to ..आणि गिर्‍हाईकाला? by गवि

Permalink

@..आणि गिर्‍हाईकाला? >>>

@..आणि गिर्‍हाईकाला? >>> मार्केटयार्डातून तीच गड्डी आडिच ते तीन रुपायांना आपले भाजिवाले घेतात,आणि आपल्याला ४ ते ६ रुपायाला मिळते. फ़ुलांच्या मार्केटमधेहि हीच परीस्थिती आहे. सीझनला तुळस सुद्धा ४० ते ५० रुपये १ गड्डी इतकी चढवून विकली जाते.

Submitted by हुप्प्या on Sat, 01/03/2015 - 10:17

Permalink

उत्तरे

असे अनेक व्यवसाय आहेत जे काळाच्या ओघात नष्ट झाले. ते व्यवसाय करणारे काय निव्वळ रडगाणी गात बसले का? की दुसरा काहीतरी व्यवसाय करु लागले? बैलगाडीवाले, टांगेवाले, बांधकामे करणारे मजूर, पाथरवट असे कितीतरी व्यवसाय आहेत जे यांत्रिकीकरणामुळे, आधुनिकीकरणामुळे नष्ट झाले. ते कामे करणारे लोक काय टाचा घासून मरून गेले का? मला वाटत नाही. त्यांनी काही ना काही दुसरा व्यवसाय शोधला. महाराष्ट्रातील शेतकर्यांनाच रडगाणे का गावे लागते? समजा हरियाणा व पंजाबचे शेतकरी गब्बर आहेत, ते वर्षातून तीन चार पिके काढतात. आणि ते शेतकरी रडगाणे गात शेती करत नाहीत तर मग त्यांनाच शेती करू द्या. तुम्हाला जमत नसेल तर दुसरा व्यवसाय बघा. एक दिवस सरकार मदत देत नाही म्हणून रडा, कर्ज मिळत नाही म्हणून रडा, पांढरपेशे सहानुभूती दाखवत नाहीत म्हणून रडा, आज काय साहित्य निर्माण होत नाही म्हणून रडा उद्या शेतकीचे ज्ञान नसणारे ज्ञान पाजळतात म्हणून रडा. असल्या रडतराऊतांचे भवितव्य रडकेच असणार असा जगाचा नियम आहे. असो. आपला एक उंटावरून शेळ्या मेंढ्या हाकणारा अतीशहाणा

Submitted by विशाल कुलकर्णी on Sat, 01/03/2015 - 10:37

Permalink

माफ करा पण तुमची नक्की

माफ करा पण तुमची नक्की अपेक्षा काय आहे. शेतीतज्ञांनी, कृषीशास्त्रज्ञांनी शेतीवर लिहिण्यापूर्वी, सल्ले देण्यापूर्वी स्वतः शेती करुन पाहावी असे तुमचे म्हणणे आहे का? तसे असेल तर ते काम शेतकरीच जास्त योग्य रितीने करु शकतातच की. त्यासाठी तुम्हाला तज्ञांची आवश्यकताच नाही मग. मग विनाकारण अपेक्षा कशाला करताय? मी स्वत: शेतकरी घरातला आहे. आता जरी शहरात स्थायिक झालेलो असलो तरी आठवी - नववीत येइपर्यंत खुरपणी पासून नांगरणीपर्यंत सगळी कामे केलेली आहेत. पण तरीही प्रत्येक वेळी ही रडारड, आमच्यावर सगळे अन्यायच करतात हा ओरडा मला मान्य नाही.

Submitted by गंगाधर मुटे on Sat, 01/03/2015 - 13:00

Permalink

फारच विचित्र आहे!

माझ्या अल्पमतीनुसार मला असे जाणवत आहे की लेखात रडगाणं नाही, कुणाकडेही भिक मागण्यासदृष्य अपेक्षा नाहीत याउलट आमच्या छातीवरून तुम्ही ऊठा, आमचे आम्ही बघून घेऊ, असे म्हटले आहे. शिवाय हे सार्वत्रिक चित्र असल्याने उदाहरणाची गरजच भासत नाहीय. फारच विचित्र आहे हो! ज्याला अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध नाही तो नाईलाजाने शेती करतो आणि ज्याला शेतीतलं काहीच कळतं नाही तो शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतो. :) फारच विचित्र आहे!

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 01/03/2015 - 17:17

In reply to फारच विचित्र आहे! by गंगाधर मुटे

Permalink

याउलट आमच्या छातीवरून तुम्ही

याउलट आमच्या छातीवरून तुम्ही ऊठा, आमचे आम्ही बघून घेऊ, असे म्हटले आहे. हे शेतकरी ज्यांना ते आपले नेते व लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात त्यांना सांगणे योग्य आहे, नाही का ? कारण तेच नेते व लोकप्रतिनिधी राज्याची अथवा देशाची नीति आणि कायदे ठरवतात, शहरातली जनता नाही ! : एक खेड्यात वाढलेला, शेतकीशिक्षण असलेल्या शाळेत शिकलेला आणि 'शेळ्यांवरून उंट हाकणारा' शहरवासी

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 01/03/2015 - 18:31

In reply to याउलट आमच्या छातीवरून तुम्ही by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

@हे शेतकरी ज्यांना ते आपले

@हे शेतकरी ज्यांना ते आपले नेते व लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात त्यांना सांगणे योग्य आहे, नाही का ? कारण तेच नेते व लोकप्रतिनिधी राज्याची अथवा देशाची नीति आणि कायदे ठरवतात, शहरातली जनता नाही ! >>> आणि तीच जबाबदार आहे,असं वाटत असेल(किंवा आपलं मत असेल) तर तसं बोला. नाहितर "आपण हे पोहोचविण्यात अयशस्वी आहोत",हे तरी मान्य करा. नाहितर यापुढे मी आपलं कोणत्याही स्वरुपाचं लेखन उघडणार देखिल नाही.

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 01/03/2015 - 20:48

In reply to फारच विचित्र आहे! by गंगाधर मुटे

Permalink

यशस्वी शेतकरी

http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/01/03/article467214.ece/Mangalvedha-success-story हे वाचा मुटेसाहेब. या लोकांनी मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी भागात चांगलं पीक काढून आणि उत्पन्न मिळवून दाखवलं आहे. यांची कहाणी महाराष्ट्रातील कानाकोप-यात माहीत होईल याची जबाबदारी तुम्ही घेणार काय?

Submitted by थॉर माणूस on Mon, 01/05/2015 - 09:33

In reply to फारच विचित्र आहे! by गंगाधर मुटे

Permalink

ज्याला अन्य कुठलाही पर्याय

ज्याला अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध नाही तो नाईलाजाने शेती करतो
:) ज्यांनी 'काही येत नाही म्हणून बाकी काही नाही तर शेती करू' असा विचार करत शेती स्वीकारली आहे त्यांनी इतरांना "तुम्ही आम्हाला शेतीतलं शिकवू नका" असं म्हणणं योग्य आहे का? अशी संख्या जर मोठ्या प्रमाणात असेल तर अशा शेतकर्‍यांच्या नेत्यांची भूमिका तरी योग्य असू शकेल का?

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 01/05/2015 - 16:00

In reply to ज्याला अन्य कुठलाही पर्याय by थॉर माणूस

Permalink

इतकं लै लॉजिकल नका हो बोलू...

इतकं लै लॉजिकल नका हो बोलू... :)

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com