मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भीतीच्या भिंती:३ इस्लामिक रिपब्लिक

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भाग (नोंद: स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चा, विकिपीडिया आणि तत्कालीन वृत्तपत्रातील बातम्या आणि लेख यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे.) मी काबूलमध्ये शनिवारी पोचले होते. रविवार निवांत असायला हवा आजवरच्या अनुभवानुसार. पण नाही! रविवार हा कामाचा दिवस. ‘साप्ताहिक सुट्टीचा दिवस शुक्रवार’ ही इस्लामिक राजवटीची प्रमुख खूण. ज्यांना आठवड्यात पाच दिवस काम असतं त्यांना गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुट्टीचे. सरकारी कार्यालयं गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस बंद असतात. पण हे केवळ केंद्रीय कार्यालयांसाठी. प्रादेशिक कार्यालयं आठवड्यातले सहा दिवस काम करतात. एकूण केंद्र स्तरावरच्या लोकांचे जास्त लाड होण्याची पद्धत इथंही दिसतेय. युएन कार्यालयं मात्र शुक्रवार आणि शनिवारी बंद. कामासाठी National Action Plan for the Women of Afghanistan (2007 to 2017) पाहत होते; तेव्हा त्यात सुरुवातीच्या पानांवर ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’ आणि ‘In the name of Allah, the Merciful, the Compassionate’ हे स्पष्ट दिसलं. ‘इस्लामिक रिपब्लिक’ बद्दल कुतूहल आणखी जागं झालं. अफगाणिस्तान ‘रिपब्लिक’ नेमकं कधी झालं? आणि ‘इस्लामिक रिपब्लिक’ हा शब्दप्रयोग नक्की काय सांगतो आहे? ज्या देशातले ९९% लोक इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत तो देश ‘इस्लामिक रिपब्लिक’ असणं ही काही फार आश्चर्याची बाब नाही खरं तर. पण या देशाचा भूगोल आणि इतिहास हे दोन्ही लक्षात घेतलं, तर आजची गुंतागुंत नेमकी काय आहे याची काही अंशी उकल होते. पुढचं विवेचन करण्यापूर्वी मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छिते. एक, मी इस्लाम धर्माची अभ्यासक नाही. दुसरं म्हणजे ‘एक धर्म दुस-या धर्मापेक्षा श्रेष्ठ की कनिष्ठ’ या वादात मला रस नाही. मी हिंदू घरात जन्माला आले आणि वाढले ही एक वस्तुस्थिती आहे - त्याचा मला ना न्यूनगंड आहे ना त्यामुळे माझ्यात श्रेष्ठत्वाची भावना आहे! लोक वेगवेगळ्या धर्मांच्या घरांत जन्म घेतात आणि वाढतात. तिसरा मुद्दा असा, की कुटुंबव्यवस्था, राज्यव्यवस्था, शिक्षण... अशा अनेक मानवनिर्मित व्यवस्थांसारखी धर्म हीदेखील एक मानवनिर्मित व्यवस्था आहे असं मी(ही) मानते. कुठल्याही व्यवस्थेची असतात तशी प्रत्येक धर्माची बलस्थानं आहेत आणि त्यात सुधारणेला वाव आहे – तो कमी-जास्त असेल; पण सर्वांत आहे. ज्ञानाच्या कक्षा आणि मानवी हक्कांच्या जाणिवा विस्तारताना ‘धर्माची’ आपली समज आणि अभिव्यक्ती या दोन्हीत बदल होणं अपरिहार्य आहे. धर्मात मला रस आहे तो सामाजिक दृष्ट्या! धर्म मानवी समूहांच्या आचार-विचारांना आकार देतो. काही चांगले पर्याय त्यातून पुढे येतात आणि अनेक सामाजिक प्रश्नांचे मूळही त्यातच असते; म्हणून ‘धर्म’ मी पाहते, आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम समजून घ्यायचा प्रयत्न करते. अफगाणिस्तानमधल्या इस्लामचा विचारही मी याच मर्यादित अर्थाने करते आहे. पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, तजिकीस्तान, चीन (आणि सातवा भारत) हे देश सध्याचा अफगाणिस्तानच्या सीमांना स्पर्श करतात. afgan (मूळ नकाशा आंतरजालावरून साभार) (‘पाकव्याप्त काश्मीर ही वास्तवात भारतीय भूमी आहे’ या भूमिकेतून भारत सरकार अफगाणिस्तानला सीमा-शेजारी मानते, पण बाकी जग तसं मानत नाही.) ६४७,५०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा आणि सुमारे अडीच ते तीन कोटी लोक असलेला हा देश ३४ प्रांतांत विभागला आहे. काबूल ही देशाची राजधानी आहे आणि तो एक प्रांतही आहे. काबूलमधली वेगवेगळी ठिकाणं वेगवेगळ्या जिल्ह्यांत आहेत हे कळल्यावर गंमत वाटली होती. भौगोलिकदृष्ट्या अफगाणिस्तानची संपर्क आणि दळणवळणाची स्थिती आजही बिकट आहे. त्यात भर पडते तिथल्या हवामानाची. स्वाभाविकरीत्या इतिहासात अफगाणिस्तान टोळ्यांमध्ये – पारंपरिक/स्थानिक समूह हा शब्दप्रयोग जास्त योग्य आहे - विभागला गेला आणि आजही आपापल्या पारंपरिक समूहाशी निष्ठा फार महत्त्वाची आहे. सरकार नागरिकांना जे ओळखपत्र देते, त्यावर त्याच्या/तिच्या पारंपरिक समूहाची नोंद असावी की नसावी हा २०१३ च्या डिसेंबरमध्ये मोठा वादाचा विषय झाला होता. यावर काय निर्णय झाला ते अदयाप माझ्या नजरेस आलं नाही, पुढे हा विषय पुन्हा येईल तेव्हा सांगते. पश्तुन (Pashtun) हा सगळयात मोठा गट – सुमारे ४५% ते ६०% लोक. हे ‘पाश्तो’ भाषा बोलतात. भारतरत्न खान अब्दुल गफारखान उर्फ सरहद्द गांधी हे आपल्या माहितीत असलेले उत्तुंग पश्तुन व्यक्तिमत्व! ‘हमीद करझाई’ जे २००४ ते २०१४ अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते, तेही पश्तुन आहेत. एक अपवाद वगळता इथले सर्व राजे पश्तुन होते. २०१४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत सर्वच्या सर्व ११ उमेदवार पश्तुन होते, असं वाचल्याचं आठवतं. दुसरा गट आहे ताजिक (Tajik). हे ‘दरी’ (अफगाणिस्तानी पर्शियन) भाषा बोलतात. तालिबानला यशस्वी विरोध करणा-या Northern Alliance मध्ये मुख्यत्वे ताजिक होते. ताजिक आणि पश्तुन यांचे संबंध म्हणजे ‘तुझं नि माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असे आहेत. कटटर विरोधी राजकीय भूमिका – पण भागीदारीत व्यवसाय करतात आणि विवाहाद्वारा एकमेकांशी नातेसंबंधही जोडतात. हझारा (Hazara) किंवा हजारा हा ‘दरी’ बोलणारा आणखी एक समूह. बहुतांश अफगाण ‘सुन्नी’ आहेत तर हझारा ‘शिया’ – इतकं पुरेसं आहे त्यांची स्थिती समजायला! उझबेक (Uzbek), ऐमाक (Aimaq), तुर्कमेन (Turkmen), बलोच (Baloch), नूरिस्तानी (Nuristani) हे तुलनेने कमी लोकसंख्येचे पण आपापल्या परिसरात प्रभाव असणारे गट. शिवाय आणखीही अधिक छोटे गट आहेत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रगीतात १४ पारंपरिक समूहांचा उल्लेख आहे. एखादा देश अथवा समाज लोकशाही मूल्यांकडे वळतावळता धर्माचा अंकित कसा होऊ शकतो, हे समजून घ्यायचं असेल तर अफगाणिस्तानचा इतिहास उद्बोधक आहे. बौद्ध, हिंदू, पारसी अशा विविध धर्मांचा प्रसार या प्रदेशात इस्लामच्या आगमनापूर्वी आठ-नऊ शतकं इतका आधी झाला होता. शिवाय समूहांच्या पारंपरिक समजूती होत्या. त्याबद्दल एक वेगळा लेख लिहावा लागेल इतका मोठा विषय आहे तो हे धर्म सत्ता परिवर्तनातून आले हे खरं; पण या धर्मांचे स्वरूप पाहता त्यांचा प्रसार शांततामय असावा असा. कयास करता येतो. सातव्या शतकात अरब इथे आले आणि ‘इस्लाम’ही. नवव्या शतकात ‘कुराणा’चा पर्शियन अनुवाद उपलब्ध झाला. बाराव्या शतकात हेरात (Herat) इथं अफगाणिस्तानमधली पहिली मशीद बांधण्यात आली. पण इस्लामचा प्रभाव वाढत असला तरी ‘पश्तुनवाली’ ही गावपातळीवरची न्यायव्यवस्थाच दैनंदिन जीवनातले निर्णय करत होती. ही व्यवस्था १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत चांगली कार्यरत होती. १७४७ मध्ये अहमदशाह दुराणी याने ‘अफगाण राज्य’ स्थापन केले तेव्हाही म्हणजे इस्लाम येऊन हजार वर्ष झाल्यावरही ‘फतवा’ आणि ‘जिहाद’ फारसे प्रचलित नव्हते. अब्दुर रहमान खान (१८८० ते १८९१) याने सत्तेच्या केंद्रीकरणासाठी ‘शरिया’ कायदे स्वीकारुन त्यांच्या अंमलबजावणीसाठी उलेमांची नेमणूक केली. यामुळे एका बाजूने इस्लामचं, धार्मिक नेत्यांचं स्थान बळकट झालं हे खरं! पण या लोकांना प्रशासकीय रचनेत सामावून घेतल्याने, व्यवस्थेची पुनर्रचना केल्याने राजसत्तेचा वरचष्मा कायम राहिला. इस्लाम नैतिक अधिष्ठान होते पण राजकीय अधिष्ठान नव्हते. जेव्हा जेव्हा अस्तित्व धोक्यात आले त्या त्या वेळी उठाव करून राजसत्ता बदलण्याचे प्रयत्न झाले, पण धार्मिक नेतृत्वाने सत्ताग्रहण मात्र केले नाही. या काळात राज्यकर्त्यांनी इस्लाम आणि आधुनिकता यांची सांगड घालण्याचे प्रयत्न केले. या देशाचा इतिहास दुर्दैवाने आक्रमणांचा म्हणून युद्धाचा आहे आणि आपापसातील यादवीचाही आहे . लोकशाहीचा इथला प्रवास साधासरळ नाही तर वळणा वळणाचा आणि खाचखळग्यांचा आहे – अगदी एकोणिसाव्या, विसाव्या आणि एकविसाव्या शतकातही! १८३७ मध्ये ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केले. रशिया आणि ग्रेट ब्रिटनच्या ‘ग्रेट गेम’ च्या डावपेचात अफगाणिस्तानचं प्यादं होऊन बसलं. स्थानिक समूहांमधल्या विश्वासाला आणखी तडे गेले ते याच कालावधीत. Peter Hopkirk याचं Great Game हे पुस्तक अफगाणिस्तान समजून घेण्यात मोलाची मदत करतं. अखेर १९१९ मध्ये अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. अमानुल्ला खान (१९१९ ते १९२९) यांची दशकभराची कारकीर्द हा अफगाणिस्तानमधला महत्वाचा सुधारणावादी कालखंड म्हणावा लागेल. ‘लोया जिरगा’ (याबद्दल अधिक माहिती नंतर घेऊ.) या महासभेने १९२१ मध्ये पहिली राज्यघटना मंजूर केली होती (१९२३ मध्ये दुसरा मसुदा आला); त्यानुसार अफगाणिस्तानमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे (आणि मोफत) झाले; मुलांच्या आणि मुलींच्या एकत्र शिक्षणाचा - सहशिक्षणाचा कार्यक्रम आखण्यात आला; स्त्रियांनी बुरखा किंवा हिजाब वापरायचा की नाही हा त्या स्त्रीचा व्यक्तिगत निर्णय असेल –तिच्यावर याबाबतीत कोणीही सक्ती करू शकणार नाही – असे अतिशय मूलगामी निर्णय अमानुल्ला खान याने घेतले. अमानुल्ला खान आणि राणी सरय्या यांच्या नेतृत्वाखाली. स्त्रियांना माणूस या नात्याने जगता येईल असे वातावरण तयार झाले. धर्मसत्तेला पडती बाजू घ्यावी लागली - पण थोडासाच काळ. धार्मिक लोकांना या सा-या सुधारणा म्हणजे स्वधर्मावर आघात आणि परधर्माचे आक्रमण वाटू लागले (तसे ते आजही वाटते हे विशेष!) १९२९ मध्ये अमानुल्ला खानला देश सोडून जावे लागले आणि परक्या भूमीत तो मृत्यूला सामोरा गेला. (श्रीमती प्रतिभा रानडे लिखित ‘अफगाण डायरी’ मध्ये याबाबतीत सविस्तर माहिती आहे.) मोहम्मद नदिर खान याने १९२९ मध्ये सत्ता हाती घेतल्यावर सगळ्यात आधी सुधारणांची गती कमी केली. १९३१ मध्ये त्याने नवी राज्यघटना (तिसरी) आणली. हनाफी शरिया (सुन्नीपंथीय) अधिकृतरीत्या धर्म म्हणून स्वीकारला गेला. १९३३ मध्ये काबूलमधल्या एका विद्यार्थ्याने मोहम्मद नदिर खान याची हत्या केली. खानचा मुलगा झहीर शाह वयाच्या १९ व्या वर्षी सत्तेवर आला. १९४६ मध्ये पंतप्रधान शाह महमूद याने मुक्त निवडणूक, मुक्त प्रसारमाध्यम, संसद या सुधारणा जाहीर केल्या. १९६४ मध्ये आणखी एकदा नवी राज्यघटना (चौथी) जाहीर झाली. झहीर शाहने त्या अनुषंगाने राज्यव्यवस्थेत काही बदल केले. संसद द्विस्तरिय केली; त्यात १/३ प्रतिनिधी लोक थेट निवडून देणार; १/३ प्रतिनिधी प्रांतीय मंडळे पाठवणार आणि बाकी १/३ प्रतिनिधी राजा नियुक्त करणार अशी व्यवस्था होती. हे बदल एका अर्थी ‘प्रायोगिक लोकशाहीच्या’ दिशेने टाकलेले पाऊल होते. या प्रक्रियेतून उदयास आलेल्या राजकीय पक्षांनी पुढे अफगाणिस्तानच्या भवितव्याला बरा-वाईट आकार दिला. १७ जुलै १९७३ रोजी तत्कालीन पंतप्रधान मोहम्मद सरदार दाऊद खान यांनी झहीर शाहविरुद्ध उठाव करून सत्ता हस्तगत केली. हा सत्तापालट रक्तपाताविना झाला. पण आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर ही राजवट पूर्ण अपयशी ठरली. १९७७ ची नवी राज्यघटना (पाचवी) राजकीय स्थैर्य आणि आर्थिक विकासाला चालना देण्यास कुचकामी ठरल्या. यावेळी राजेशाही संपली होती आणि हा देश आता होता ‘रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’. २७ एप्रिल १९७८ रोजी नूर मोहम्मद तराकी, बब्रक करमल आणि अमीन ताहा यांनी संगनमताने दाऊद खानची हत्या केली. यांच्या पक्षाचं नाव: People's Democratic Party of Afghanistan (PDPA). १ मे रोजी तराकी राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि पक्षाचा महासचिव झाला. यावेळी हा देश झाला ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’. हे टिकलं एप्रिल १९९२ पर्यंत. दरम्यान सप्टेंबर १९७९ मध्ये तराकीला मारून हफीझुल्ला अमीन राष्ट्राध्यक्ष झाला. १९७८ ते १९९२ या काळात रशियाशी आणि पर्यायाने कम्युनिस्ट विचारांशी जवळीक राखणा-या PDPA ने अनेक ‘सुधारणा’ केल्या. स्त्रियांना मतदानाचा अधिकार; त्याचा राजकारणात सहभाग वाढावा यासाठी योग्य ते वातावरण; बळजबरीने केल्या जाणा-या लग्नावर बंदी असे अनेक स्त्री-हिताचे निर्णय कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावातून घेण्यात आले. पण स्त्री-पुरुष समतेचा हा ‘डोस’ धर्मसत्तेच्या पचनी पडणार नव्हताच. कोणत्याही समाजात फार कमी लोक सुधारणेस उत्सुक असतात; कुणालातरी सुधारणेचे मुद्दे रेटून न्यावे लागतातच. सुधारणा म्हणजे प्रस्थापित हितसंबंधांना धक्का. आपल्या समाजातल्याही कित्येक महनीय व्यक्तींचं जीवन आणि कार्य आपल्याला हेच सांगते. शिवाय कालपरत्वे कोणत्याही समाजाचा सुधारणांचा प्राधान्यक्रम आणि त्या पचवायची ताकद लक्षात घ्यावी लागते. PDPA ने रशियाकडून अनेक क्षेत्रांत मदत घेतली. राजकीय आणि सामाजिक स्थैर्य तर नव्हतेच. विरोधकांना, विचारवंताना, धार्मिक नेत्यांना, पारंपारिक टोळी प्रमुखांना (ज्यांचा मान मोठा असतो) कारण नसताना तुरुंगात टाकणे; मारून टाकणे नित्याचे होते. किती लोक त्या काळात उध्वस्त झाले त्याची गणती नाही. आणि हे सारे घडत होते ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक’ च्या नावे! रशियन तिथं असल्याने बाकी जग निवांत होत! उत्साहाच्या भरात PDPA ने मुस्लिम पुरुषांनी दाढी वाढवायची नाही, स्त्रियांनी ‘चादोर’ घ्यायची नाही अशाही सुधारणांची सक्ती केली. विखुरलेल्या अफगाण समाजाला हजारो वर्ष बांधून ठेवणारी एक गोष्ट होती ती म्हणजे ‘इस्लाम’. अफगाण मातीत आणि परंपरेत रुजलेला आणि फुललेला इस्लाम. कम्युनिस्ट त्याच्यावर आघात करायला लागले. स्वत;च्या प्रजेवर परकीयांच्या मदतीने अनन्वित अत्याचार करणारी राजवट एक ना एक दिवस संपणं अपरिहार्य होत! कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनेला पर्याय म्हणून काबूल विद्यापीठात ‘मुस्लीम युथ ऑर्गनायझेशन’ उदयाला आली. (भविष्यातले मुजाहिद्दीन इथलेच!) इस्लाम आता अफगाणला जोडणारा एकमात्र दुवा राहिला होता. १९७९ मध्ये रशिया मदतीच्या नावाखाली देश गिळंकृत करून बसला. उंटाच्या मानेवरचा तो शेवटचा खडा ठरला. मग मुजाहिद्दीन आले; ‘इस्लाम खतरे मे है’ ही भावना आली; ‘जिहाद’ ची हाक आली. पाठोपाठ परक्या भूमितून मुस्लीम मदतीला आले आणि अफगाणेतर कडव्या मुस्लिमांच्या हाती नेतृत्व गेलं. १९८९ मध्ये रशियाने सैन्य माघारी घेतलं पण तोवर या भूमीत शस्त्रात्र ओतली गेली होती. मुजाहिद्दीनना अमेरिकन समर्थन होतं, पण रशियन माघारीनंतर अमेरिकेनेही दुर्लक्ष केलं. पर्यायी राजकीय व्यवस्था निर्माण करण्यात मुजाहिद्दीन पूर्ण अपयशी ठरले. १९९२ मध्ये निर्माण झालं ‘इस्लामिक स्टेट ऑफ अफगाणिस्तान’. पैसा आणि शस्त्र हे नेतृत्वाचे मुख्य निकष ठरू लागले. परकीय मदतीचा ओघ आटला. मग अपहरण, खंडणी, दरोडे, स्त्रियांवर अत्याचार हे रोजचे झाले. अफू उत्पादन वाढलं; रस्तेही असुरक्षित झाले. वारलॉर्ड आपापसात लढायला लागले. देशाला पोखरून टाकणारी वारलॉर्ड नावाची कीड समूळ उखडून टाकण्याची घोषणा करत ‘तालिबान’ समोर आले ते ११९४ मध्ये. ‘शरिया’नुसार ‘पवित्र इस्लामिक राज्य’ स्थापन करण्याच्या त्यांच्या घोषणेला पाकिस्तानमधून समर्थन मिळाले. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेले अफगाणी निर्वासित नव्या दमाने सीमारेषा पार करू लागले. हे युवक आणि प्रौढ मुख्यत्वे पश्तुन होते. १९९६ मध्ये तालिबानने काबूल ताब्यात घेतले. यादवी युद्ध संपवून ‘तालिबान’ सत्ताधीश झाले. सुरुवातीला शांतता प्रस्थापित झाल्यासारखं वाटलं. मग इस्लामिक कायदे लागू झाले. अफू लागवड बंद केली. संगीत बंद, चोरी केल्यास हात छाटणार, रेडीओवर स्त्रियांच्या आवाजावर बंदी, त्यांनी शिकायचं नाही, अर्थार्जन करायचं नाही ..... अफगाणी जनतेला इस्लामचं हे भयंकर रूप नवं होतं. व्यक्ती, कुटुंब आणि टोळी यांचा सन्मान त्यांनी आजवर महत्त्वाचा मानला होता. आजवर त्यांचे मुल्ला-मौलवी त्यांच्यातलेच होते आणि ते मुख्यत्वे नैतिक शिक्षणाला जबाबदार होते. राजकीय सत्ता धार्मिक नेत्यांच्या हाती जाऊन काही शतकं मागे जावं लागणं क्लेशदायक होत. तालिबानसोबत ‘अल-कायदा’ आले. मग अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर हल्ला झाला. अमेरिका लादेनच्या मागे लागली. नोव्हेंबर २००१ मध्ये अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी अफगाणिस्तानवर हल्ला केला. तालिबानचा पराभव झाला. २००१ मध्ये ‘प्रासंगिक सरकार’ अस्तित्वात आलं. २००४ मध्ये नवी राज्यघटना. आता अफगाणिस्तान आहे ‘इस्लामिक रिपब्लिक’. रशिया-ब्रिटन ग्रेट गेम; रशिया-अमेरिका शीतयुद्ध; रशियाने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणाची बाकी जगाने घेतलेली “दखल”; आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकट झालेला अरब जगातील इस्लाम; भूक आणि गरीबीला न जुमानणारी यादवी; धर्माला अफू समजून त्याला संपवू पाहणारा कम्युनिस्ट धर्म; सर्वमान्य अशा स्थानिक नेतृत्वाचा अभाव; स्थानिकांमध्ये दूरदृष्टीचा अभाव, किडे-मुंग्यांच्या जीवनापेक्षा स्वस्त झालेलं मानवी जीवन... आता नवं सरकार इस्लाम विरोधी आहे अशी शंकाही निर्माण होता कामा नये. ...... . अफगाणिस्तान ‘इस्लामिक रिपब्लिक’ च्या अपरिहार्य टोकावर (point of no return) येऊन पोचला. क्रमशः भीतीच्या भिंती:४: खिडकीतून पाहताना..

वाचने 62053 वाचनखूण प्रतिक्रिया 78

यशोधरा Mon, 12/29/2014 - 17:17
वाचतेय.. तुमचे हे लेख वाचताना, मला अफगाणिस्थानमध्ये चक्क आयटीमधल्या नोकरीसाठी कॉल आला होता, हे आठवले. जायची फार इच्छा होती पण घरुन एकदम व्हेटोच वापरला गेला होता. अगोचरपणा करायची गरज नाही ह्या वाक्याने समारोप झाला होता :) म्हणून तुमचे अधिक कौतुक वाटते. अफगाणिस्थान पहायची खूप इच्छा होती आहे.

In reply to by यशोधरा

गवि Wed, 12/31/2014 - 13:17
..एक्झॅक्टली सेम यशोधरा. ऑफर आली होती.. अशीच प्रतिक्रिया उमटली. ..शिवाय ६ डेज वर्किंग वीक असल्याने विचार टाळला. णो वीकेंड..??..यक्क.

एस Mon, 12/29/2014 - 17:30
नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग म्हणून आलाय, ते खटकलं. बाकीचं जग काय म्हणतंय हे तुम्ही एक राष्ट्र म्हणून काय म्हणताय ह्यातुलनेत यःकिंचित असतं असं माझं मत आहे. 'द ग्रेट गेम' अजूनही संपलेली नाही आणि भारतही या अनेकपदरी बुद्धिबळात शांतपणे आपल्या खेळ्या खेळत असतो. २६/११ च्या नंतरच्या परिस्थितीत 'नॉर्दर्न अलायन्स' ला गुपचूप टॅक्टिकल मदत देत तालिबान्यांविरुद्ध लढायला बळ देणं आणि नंतर वरवर लष्करी सहभाग टाळून नागरी मदत देत अफगाणिस्तानला उभं रहायला सहाय्य करणं हा ह्या 'बिग पिक्चर' चा एक भाग होता. अर्थात या विषयावर मोदक, हृषिकेश इत्यादींसारखे जाणकार नंतर प्रकाश टाकू शकतील, पण लेखमालेच्या दृष्टीने हा मूळ मुद्दा नाही. बाकी हाही लेख मस्तच. हळूहळू पार्श्वभूमी तयार होतेय पुढच्या लेखांसाठी. आवडला.

In reply to by एस

आतिवास Mon, 12/29/2014 - 17:39
नकाशाबद्दल सहमत आहे. मी चुकीचा नकाशा निवडलाय. क्षमस्व. मी शोधते पुन्हा एकदा, पण तोवर कुणाला योग्य नकाशा मिळाल्यास संपादकांनी नकाशा बदलावा ही विनंती.

In reply to by आतिवास

प्रसाद१९७१ Mon, 12/29/2014 - 18:19
@अतिवास - नकाशा योग्यच आहे हो. नकाशात पाकव्याप्त काश्मीर भारतात दाखवुन काय होणार आहे? तो भारताला थोडाच मिळणार आहे? गेल्या ६६ वर्षात तो भाग भारतात नव्हता आणि ही वस्तुस्थिती स्वीकारणे गरजेचे आहे. खरे तर काश्मीर ला पाक्व्याप्त आणि भारत व्याप्त अश्या दोन भागात दाखवले पाहीजे.

In reply to by प्रसाद१९७१

एस Mon, 12/29/2014 - 18:27
ती वस्तुस्थिती अधिकृतपणे स्वीकारली गेल्यानंतर खुशाल दाखवा. मी काही आंधळा, ज्वलंत असा देशप्रेमी नाही. राष्ट्रवादाच्या अतिरेकामुळे होणार्‍या दुष्परिणामांची पूर्ण जाणीव आहे. पण आपल्या सरकारने, संसदेने वेळोवेळी जी भूमिका ठामपणे घेतलेली आहे तिला एक भारतीय नागरिक म्हणून पूर्ण पाठिंबा देणे मी माझे कर्तव्य मानतो. आणि, भारताच्या अखंडपणाला आणि सार्वभौमत्वाला नाकारणे हा कायद्याने राजद्रोहाचा गुन्हा ठरू शकतो.

In reply to by एस

भारताच्या अखंडपणाला आणि सार्वभौमत्वाला नाकारणे हा कायद्याने राजद्रोहाचा गुन्हा ठरू शकतो.
जस्ट अ क्युरियोसिटी असा एक तरी गुन्हा आजवर दाखल झाला आहे का ? मागे त्या फेमस लेखिका अरुंधरी रॉय भर दिल्लेत म्हणाल्या होत्या ना , काय झाले त्यांचे ? अवांतर : प्रसाद १९७१ , तुमची मते वाचुन तुम्ही माझाच डु आयडी आहात काय अशी लोकांना शंका यायला लागली आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

एस Mon, 12/29/2014 - 20:17
गुन्हे दाखल झाले आहेत, अगदी निरपराध लोकांवरही झाले आहेत. गूगलून पहा. काही उदाहरणे ओरिसा/छत्तीसगढमधली लगेच सापडतील.

In reply to by एस

विकास Mon, 12/29/2014 - 21:38
आता नकाशा बदल्याने येथे जरी हा प्रश्न नसला तरी फारच चर्चा झाली असल्याने खुलासा करत आहे. Section 69A of IT Act, 2000. Survey of India नुसार भारतात भारताने ठरवलेला अधिकृत नकाशाच वापरणे गरजेचे आहे. मिपा हे भारतीय संस्थळ असल्याने, भारतीय नियमानुसार नकाशा वापरणे योग्य ठरेल. गुगल संदर्भात ही बातमी वाचण्यासारखी आहे. Govt asks DoPT to take action against Google for incorrect maps त्या व्यतिरीक्त, गुगलचे धोरण हे त्या त्या देशातील संस्थळावर त्या देशाने ठरवलेला अधिकृत नकाशा वापरावा असे आहे आणि सर्व वादग्रस्त सीमा ह्या त्यांच्या गुगल.कॉम संस्थळावर दाखवाव्यात असा असे आहे. म्हणून भारतीय संस्थळावरील गुगलने दाखवलेला भारताचा नकाशा आणि गुगल.कॉम वर गुगलने दाखवलेला भारताचा नकाशा यातील फरक देखील बघता येईल.

In reply to by एस

अभिजित - १ Wed, 12/31/2014 - 20:09
पण आपल्या सरकारने, संसदेने वेळोवेळी जी भूमिका ठामपणे घेतलेली आहे >>> कधि भौ घेतलि अशि भुमिका ?? कारगिल हल्ला जेव्हा झाला , तेव्हा आपल्याच भागात ( POK ) मध्ये आपल्या सैनिकांना जाऊ द्यायला भारत सरकार घाबरले. कशाला उगाच नाही त्या राष्ट्रवादाच्या पोकळ गप्पा .. आपले सैनिक खूप मोठ्या संख्यने बळी पडले आपल्या सरकारच्या ( BJP ) या कृतीने

In reply to by अभिजित - १

विनोद१८ Wed, 12/31/2014 - 21:16
...अहो अभिजीत-१भौ,
पण आपल्या सरकारने, संसदेने वेळोवेळी जी भूमिका ठामपणे घेतलेली आहे >>> कधि भौ घेतलि अशि भुमिका ??
इथे, इतक्या सहजपणे आयते उत्तर मिळायचे नाही, त्यासाठी आपल्याला वाईज मेहनत घ्यावी लागेल, ते तुमचे तुम्हीच शोधा नक्कीच सापडेल.
कारगिल हल्ला जेव्हा झाला , तेव्हा आपल्याच भागात ( POK ) मध्ये आपल्या सैनिकांना जाऊ द्यायला भारत सरकार घाबरले. कशाला उगाच नाही त्या राष्ट्रवादाच्या पोकळ गप्पा .. आपले सैनिक खूप मोठ्या संख्यने बळी पडले आपल्या सरकारच्या ( BJP ) या कृतीने
तुमची आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज कमी आहे असे दिसते, ती आधी वाढवावी लागेल. 'उचलली जीभ लावली टाळ्याला' अशा पद्ध्तीने प्रतिक्रीया इथे देउन कसे चालेल ?? अभ्यास वाढवा. भारत सरकारचा घाबरलेला चेहरा तुम्हालाच कसा काय हो दिसला ?? भारत सरकार घाबरलेले बघून पाकिस्तानी सैनिक तिथून निमूटपणे निघुन गेले हे नव्हते बा आम्हाला माहित.

In reply to by अभिजित - १

एस Wed, 12/31/2014 - 23:06
कारगील युद्धाच्या वेळी प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडणार नाही अशी भारत सरकारची औपचारिक भूमिका होती. पण ताबारेषा ओलांडूनच हे युद्ध खेळले गेले. ताबारेषा पायदळ आणि वायुदल या दोन्हींनी ओलांडली. ह्या माहितीची खातरजमा काही सामरिक तज्ञ आणि युद्धात प्रत्यक्ष सहभागी अशा अधिकार्‍यांशी बोलून केली आहे त्यामुळे इथे टाकत आहे. काँग्रेस वि. भाजप यांच्या परराष्ट्रधोरणांमध्ये वरवर विसंगती वाटत असली तरी आत्तापर्यंतची सर्व सरकारे (त्यात थर्ड फ्रंटही आले) ही ढोबळमानाने पूर्वसुरींच्या मार्गाने वाटचाल करत आली आहेत. अमुक पक्षाचे सरकार असा विचार करत जाऊ नका. 'भारत सरकार' असा विचार करून त्या दृष्टीने पहा. @आतिवास, आपल्या धाग्यावर बरेच अवांतर झाल्याबद्दल क्षमस्व. हा शेवटचा प्रतिसाद.

In reply to by प्रसाद१९७१

काळा पहाड Mon, 12/29/2014 - 18:37
एक वाक्य चुकीनं गोबेल्सला चिकटवलं जातं ते असं: If you tell a lie big enough and keep repeating it, people will eventually come to believe it. त्याचं ब्रिटिशांबद्दल एक वाक्य मात्र बरोबर आहे. ते असं: "The English follow the principle that when one lies, one should lie big, and stick to it. They keep up their lies, even at the risk of looking ridiculous." अर्थ सरळ आहे. तो कायदेशीर दृष्ट्या भारताचा भाग आहेच. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग दाखवत रहा आणि त्याचा प्रसार करत रहा. अशी वेळ येईल की जेव्हा भारताला हा भाग गट्टम करायचा असेल, तेव्हा भारत हे ब्रेड क्रम्ब्ज दाखवून आपल्या दाव्याला पुष्टी देवू शकेल.

In reply to by काळा पहाड

प्रसाद१९७१ Mon, 12/29/2014 - 18:49
तसे काय हो पाकीस्तानाला पण दाखवा की भारताचा भाग. कोण अडवते आहे. नाहीतरी "सिंधु वाचुन हिंदु म्हणजे अर्था वाचुन शब्द" असे काहीतरी आहेच ना.

In reply to by एस

स्पंदना Tue, 12/30/2014 - 03:47
नकाशाबद्दल विकासदांच मत मान्य. नाहीतर सिंगापुरात भारताचा नकाशा चक्क पुर्वेलापण कातरला आहे. चिनला देउन टाकलाय भूभाग त्यांनी मुक्तहस्ते.

कपिलमुनी Mon, 12/29/2014 - 18:45
अमेरिका आणि रशिया यांच्यामधला युद्ध अफगाणिस्तानच्या भुमीवर झाला आणि हा देश कट्टरपंथीयांच्या ताब्यात गेला. फक्त प्यादे म्हणून वापरला गेला. बाकी भारतीय शासकीय प्रमाणित नकाशेच वापरणे योग्य!

प्रसाद१९७१ Mon, 12/29/2014 - 18:52
अमेरिका आणि रशिया यांच्यामधला युद्ध अफगाणिस्तानच्या भुमीवर झाला आणि हा देश कट्टरपंथीयांच्या ताब्यात गेला.
तो देश कायमच कट्टरपंथी, मागास विचारसरणीच्या टोळीवाल्यांचा होता, मधल्याकाळात तिथे अमेरिकन आणि रशियन येउन गेले, इतकेच. कोणी कोणाला प्यादे म्हणुन वापरले हा पण वादाचा विषय आहे.

In reply to by प्रसाद१९७१

काळा पहाड Mon, 12/29/2014 - 19:09
आय एम अफ्रेड मिस्टर प्रेसिडेंट दॅट दॅट इस नॉट एन्टायरली ट्रू. थिंग्ज वेअर डिफरंट इन सिक्स्टीज. खालील फोटो १९६२ मध्ये घेतलेला आहे. उजवीकडची मेडिकलची शिक्षिका आणि डावीकडच्या विद्यार्थीनी. http://cdn.theatlantic.com/static/infocus/afghan070213/s_a01_51953148.jpg अफगाणिस्तानचा राजा मोहम्मद झहीर शाह केनेडींबद्दल बोलतोय (१९६३) http://cdn.theatlantic.com/static/infocus/afghan070213/s_a18_51514062.jpg जुना काबूल हेरात हायवे: http://cdn.theatlantic.com/static/infocus/afghan070213/s_a22_51959378.jpg बाकी अफगाणिस्तान्चे त्यावेळचे सुंदर फोटो इथे बघू शकता http://www.theatlantic.com/infocus/2013/07/afghanistan-in-the-1950s-and-60s/100544/

In reply to by प्रसाद१९७१

स्पंदना Tue, 12/30/2014 - 03:52
तो देश कायमच कट्टरपंथी, मागास विचारसरणीच्या टोळीवाल्यांचा होता
अतिशय तोकडी विचारसरणी आहे तुमची. टोळ्या म्हणजे मागास हा विचारच मुर्खपणाचा आहे. टोळी हा एक समाज असतो. त्यांच्यापुरता, अश्या भौगोलिकदृष्ट्या कठीण हलाखीच्या ठिकाणी जीव जगवायला टोळी (समूह) अतिशय उपयोगी होती. आणी टोळ्या म्हणजे लगेच दरवडेखोर नसतात. अफगाणीस्तान किती सुंदर होता अन आहे याचे थोडीतरी कल्पना असल्याशिवाय अश्या काही कमेंटस वाचण म्हणजे खरच वाईट वाटत.

In reply to by स्पंदना

प्रसाद१९७१ Tue, 12/30/2014 - 09:45
अफगणीस्तान नैसर्गीक रीत्या सुंदर आहे ( काही भाग ) पण तेथिल टोळ्या ह्या सर्व दृष्टीनी मागासलेल्या आहेत आणि गेली शेकडो वर्ष होत्या. प्रचंड हिंसा , स्त्रीयांचे सर्व प्रकारे दमन, कसल्याही प्रकारचे साहीत्य-संगीत निर्मीती नाही, शिक्षण नाही. फार वाईट.

श्रीगुरुजी Mon, 12/29/2014 - 19:28
आतापर्यंतचे सर्व भाग उत्सुकतेने वाचलेत. सध्या "मॅन हंट" वाचतोय. हातातून सोडवत नाहीय्ये. >>> हझारा (Hazara) किंवा हजारा हा ‘दरी’ बोलणारा आणखी एक समूह. बहुतांश अफगाण ‘सुन्नी’ आहेत तर हझारा ‘शिया’ – इतकं पुरेसं आहे त्यांची स्थिती समजायला! माझ्या माहितीप्रमाणे हझारा हे स्थानिक अफगाणी व चिनी/मंगोलियन्स यांच्या संकरातून निर्माण झालेली जमात आहे. त्यामुळे त्यांना पश्तून, ताजिक व इतर अफगाणी आपल्यापेक्षा खालच्या दर्जाचे समजतात. सामान्यपणे बरेचसे हझारा घरकाम किंवा इतर मजुरीची व कष्टाची कामे करताना आढळतात. "काईट रनर" या पुस्तकात हझारांबद्दल बरीच माहिती आहे.

विशाखा पाटील Mon, 12/29/2014 - 19:37
आवडला. सुरूवातीच धर्मावरच विवेचन तर फारच सुरेख. पुढच्या भागाबद्दल उत्सुकता आहे. नुकतंच Amin Saikal यांचं 'Modern Afganistan: A History of Struggle and Survival' हे पुस्तक वाचलं. त्यात त्यांनी अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीला कारणीभूत असलेले तीन मुद्दे मांडले आहेत. त्यातले दोन मुद्दे - इतर देशांची लुडबुड आणि मुलतत्ववादी शक्ती तुमच्या लेखात आले आहेतच. त्यांनी मांडलेला अजून एक मुद्दा म्हणजे सत्ताधारी वर्गातलं बहुपत्नीत्व. १८ व्या आणि १९ व्या शतकात दुर्रानी पश्तून सत्ताधाऱ्यांमधल्या सावत्र भावंडानमध्ये सत्तास्पर्धा चालायची. सत्ता टिकवण्यासाठी या भूराजकीयदृष्ट्या मोक्याच्या भागातल्या लोकांनी नेहेमीच परकीयांची मदत घेतली. त्यामुळे एक राष्ट्र म्हणून हा देश उभा राहू शकला नाही. २० व्या शतकातही तीच अवस्था राहिली. अनेक पंथीय आणि वांशिक समूह इतर देशांकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू लागले. १९९२ पासून हझरा इराणकडे झुकले, उझबेक उझबेकिस्तानकडे आणि पश्तून तालिबानी पाकिस्तानकडे.

सखी Mon, 12/29/2014 - 21:12
वाचतेय, हा भागही मस्तच. फक्त हा प्रथम यायला हवा होता का असं वाटत राहीलं (त्यातल्या इतिहासामुळे). अर्थात यात तुमच्या अनुभवाची उत्सुकता आहेच.

धर्मराजमुटके Mon, 12/29/2014 - 21:19
पुढील भाग लवकर येउद्या. मी हिंदू घरात जन्माला आले आणि वाढले ही एक वस्तुस्थिती आहे - त्याचा मला ना न्यूनगंड आहे ना त्यामुळे माझ्यात श्रेष्ठत्वाची भावना आहे! हे वाक्य विशेष आवडले. आजकाल आजूबाजूला हिंदू असण्याचा न्युनगंड असणारे जरा जास्तच आहेत. तुलनेत श्रेष्ठत्वाची भावना असणारे कमी आहेत असे माझे निरिक्षण आहे. मात्र माझा प्रतिसाद आपल्या या चांगल्या लिखाणाशी विसंगत आहे हे ही मला ठाऊक आहे. यावर अधिक चर्चा होऊन धागा भरकटणार नाही अशी अपेक्षा. अफगाणिस्तान, पाकीस्तान आणि एकूणच काही इस्लामिक राष्ट्रे अजून ५०० वर्ष तरी आहे त्या परिस्थितीतून बाहेर येतील अशी अपेक्षा करणे निष्फळ आहे. जोपर्यंत सामान्य जनतेची कडवट धार्मिक बुरखा फेकून दयायची मनापासून तयारी नाही तोपर्यंत सुधारणा होणे कठीण आहे. अफगाणिस्तान, इराक घ्या किंवा इतर देशांतील कोणताही धर्म घ्या, प्रत्येक धर्मियाला वाटते की आपला धर्म संकटात आहे. त्यामुळे तो अधिकाधिक आंधळा धर्माभिमानी आणि कट्टर होत चालला आहे. दुसर्‍याबद्दल / दुसर्‍या धर्माबद्दल जोपर्यंत आपण सहिष्णू होत नाहि तोपर्यंत जगात शांतता नांदणे कठीण आहे. दुर्दैवाने काही गाढवांना या जगात आपण जसे आहोत तसेच बाकीच्यांनी गाढव बनून राहावे असे वाटते. त्यामुळे ते जगात असलेल्या घोड्यांना, जिराफांना आणि इतर प्राण्यांना आपल्यासारखे बनविण्याचा मागे लागले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

स्पंदना Tue, 12/30/2014 - 03:57
याच अफगाणीस्तानात बामियान बुद्धा अजुन प्र्यंत शाबित होता हे नका विसरु मुटके साहेब. तालीबान जी पूर्णपणे पाश्च्यात्त्यांची निर्मीती, तिच्या उदयानंतर हा बामियान बुद्धा तोडला गेला. त्यावेळेस एका अफह्गाणी स्थानिकाची टिप्पणी माझ्या फार लक्षात आहे. "इट वॉज समबडीज गॉड. ईत वॉज स्टँडीग देर फॉर सेंच्युरिज. वी डीड नॉट हॅव एनिथिंग अग्न्स्ट इट. वी डु नॉट हॅव एनिथिंग अगेन्स्ट इट. सच अ सॅड इन्सिडन्ट"

विकास Mon, 12/29/2014 - 21:28
आत्ताच आत्तापर्यंतचे ३ भाग एकत्रित वाचले. खूप चांगले लिहीले आहे आणि बरीच नवीन माहिती देखील त्यातून कळत आहे. १९८९ मध्ये रशियाने सैन्य माघारी घेतलं पण तोवर या भूमीत शस्त्रात्र ओतली गेली होती. मुजाहिद्दीनना अमेरिकन समर्थन होतं, पण रशियन माघारीनंतर अमेरिकेनेही दुर्लक्ष केलं. या संदर्भात टॉम हँक्सने अभिनय केलेला, २००७ चा "Charlie Wilson's War" हा वास्तवाधारीत चित्रपट बघण्यासारखा आहे. ज्या कॉंग्रेसमन चार्ली विल्सनच्या रशियाला अफगाणिस्तानात नेस्तनाबूत करण्याच्या धोरणास अमेरीकन काँग्रेसने मिलियन्स ऑफ डॉलर्स देऊ केले, त्याच अमेरीकन काँग्रेसने, चार्ली विल्सनने जेंव्हा रशियन्स अफगाणांना सोडून गेल्यावर शालेय शिक्षणासाठी (आणि शिक्षणातून अफगाणांमधे मूलभूत करण्यासाठी) केवळ $१ मिलियन मागितले तेंव्हा अनाठायी खर्च म्हणून नाकारले....

In reply to by विकास

काळा पहाड Mon, 12/29/2014 - 22:35
जग न्यायाधिष्ठित नाहिये? हो. ते नाहीये. तुम्हाला काय वाटतं भारत तिथे कशासाठी जातोय? अफगाणिस्तानचा फार कळवळा आहे म्हणून? भारताला पाकिस्तानचा गळा दोन्ही बाजूनं आवळायचा आहे आणि अफगाणिस्तान हे अनेक देशांशी सीमा असलेलं एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. आणि हे असंच असणार आहे.

In reply to by काळा पहाड

जग न्यायाधिष्टीत (कथा-कादंबर्‍या सोडून) कधी होते ? या जगात, आक्रमक व्हायचे नसेल तरीसुद्धा, जो आपल्यावर आक्रमण करू शकतो त्याचा प्रतिबंध करण्यासाठी काहीच केले नाही तर ते स्वतःच्या नाशाला आमंत्रण दिल्यासारखेच असते. भारताचा अफगाणिस्तानमध्ये हात असणे हे पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया रोखण्यासाठी आवश्यक आहे. तालिबान आणि अल कायदाला जन्म देताना अफगाणिस्तानला आपले मांडलिक राष्ट्र बनवून त्याचा भारत व इतरांविरुद्ध दबाव निर्माण करण्यासाठी "स्वतः नामानिराळे राहून वापरता येणारे आक्रमक स्ट्रॅटेजिक अ‍ॅसेट" वापरण्याचे पाकिस्तानचे स्वप्न होते... साधारणपणे पाकिस्तानचा गुरु चीन आणि त्याचा मांडलिक उत्तर कोरिया यांच्या संबंधांसारखे. पण पाकिस्तानकडे चीनसारखी जागतिक स्तरावरची आर्थिक व सामरिक ताकद नाही; आणि कडव्या धर्मांध तालिबान्यांना ताब्यात ठेवणे पाकिस्तानी लष्कराला वाटले तेवढे सोपे ठरले नाही. आता "धरला तर चावतो आणि सोडला तर पळतो" अशी गत झाली आहे. तरीही, पाकिस्तानी लष्करातील कडव्या धर्मांध गटांचा दबाव पाकिस्तानचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंद्ध होण्यात अडथळा करतच राहील यात शंका नाहीच. त्यामुळे, विशेषतः अमेरिकन सैन्याच्या परतीच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तान पाकिस्तानच्या वर्चस्वाखाली न जावू देणे हेच भारताच्या हिताचे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Tue, 12/30/2014 - 08:40
पाकिस्तानने अफगाणिस्तानचा वापर एक 'स्ट्रॅटेजिक डेप्थ' मिळवण्याच्या दृष्टीने केलाय. याविषयी कुणी स्वतंत्र धागा काढल्यास सविस्तर चर्चा करता येईल. इथे अवांतर होण्याच्या भीतीने लेखनसीमा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विनोद१८ Tue, 12/30/2014 - 22:16
..हिच रणनीती भारताच्या हिताची जी त्याने अनुसरलीये, अतिशय योग्य. अवांतर :- अफगाणिस्तानबद्दल सर्वसामान्यपणे कुतुहल जरुर आहे कारण कधीकाळी तो आपलाच भाग होता, पण आज त्याच्याकडे आदराने पहावे असे त्यात काही नाही, शतकानुशतकाची राजकीय अस्थिरता, हिंसाचार, अनाचार, अफुची शेती इ.इ. सगळाच वैराण रखरखीतपणा नुसता, असे आजचे त्या देशाचे व्यक्तिमत्व दिसते, त्याची कारणे अनेक आहेत सगळेच ती जाणतात. दुर्दैव त्या अफगाण नागरिकांचे. हा देश कधी सुजलाम सुफलाम होइल काय ??

In reply to by विनोद१८

थॉर माणूस Wed, 12/31/2014 - 10:24
अफगाणिस्तानबद्दल सर्वसामान्यपणे कुतुहल जरुर आहे कारण कधीकाळी तो आपलाच भाग होता
कधी??? माझ्या मते इथल्या राज्यांचे त्या भागातील राज्यांशी चांगले संबंध होते इतकंच. तो आपलाच भाग होता वगैरे म्हणण्याआधी मुळात आपला भाग म्हणजे कुणाचा हे विचारात घ्यावं लागेल.

In reply to by विनोद१८

थॉर माणूस Wed, 12/31/2014 - 12:59
माझा मुद्दा बहुतेक तुमच्या लक्षात आला नाही... "आपला" म्हणजे कुणाचा असा माझा प्रश्न होता. अफगाणिस्तानामधे अनेक राज्ये/टोळ्या होत्या आणि भारतात सुद्धा, इस्लामपूर्व कालखंडातदेखील. त्यामुळे त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते म्हणणे वेगळे आणि तो आपला भाग होता म्हणणे वेगळे.

In reply to by थॉर माणूस

विनोद१८ Wed, 12/31/2014 - 15:36
इस्लामपूर्व काळात भारतातसुद्धा तशीच अनेक राज्ये होती, तशीच ती तिकडेही होती त्या देशाला तेव्हा 'गांधार' असे म्हणत तिकडचे राजेही हिंदू होते, महाभारतातील 'गांधारी' व तिचा भाऊ 'शकुनीमामा' हे तिकडचेच. गांधार हा त्यावेळ्च्या आर्यावर्ताचा (अखंड भारत) एक भाग म्हणुया फार तर , तो एक हिंदुबहुल देश होता तसेच बुद्ध धर्माचाही प्रभाव त्या प्रदेशावर होता. बामियानमधल्या बुद्ध्मूर्ती आठवत असतीलच. म्हणुनच 'आपला' मग भले तो आज आहे तसा असेला तरीही.

In reply to by विनोद१८

थॉर माणूस Wed, 12/31/2014 - 16:04
exactly. :) मलाही तेच म्हणायचे होते. आपला म्हणजे नक्की काय हे विचारले कारण तुम्हाला "आपला" शब्दाचा काय अर्थ अभिप्रेत आहे हे कळत नव्हते. गांधार काय, कुशाण वगैरेनीही राज्य केलेच कि त्या भागात. पण शेवटी ती वेगळी राज्ये, वेगळे देश होते. त्यांचे आपल्या भागातील राज्यांशी चांगले संबंध होते असे माझे म्हणणे होते. आणि त्यांच्यात युद्धे सुद्धा झालीच होती. शेवटी वेगळे देश होते ते. अर्थात तुम्ही "आपला" म्हणजे "आपल्या धर्मातल्या/संस्कृतीतल्या लोकांचा" असा अर्थ घेत होतात हे कळाले. या व्यतिरीक्त अवांतर नको या धाग्यावर. धन्यवाद.

In reply to by विनोद१८

प्रचेतस Wed, 12/31/2014 - 22:16
हिंदू होते असे म्हणणे चुकीचे आहे. फारतर वैदिक होते असे म्हणता येईल. महाभारतात गांधार प्रांताला अतिशय निम्न दर्जाचे ठरवले आहे. कर्णकृत शल्य निर्भत्सनेत मद्र, गांधार आणि वाहिक प्रदेशांची अनाचारी, अल्पमती, धर्मबाह्य, अशुची, अतीनिंद्य, धर्मभ्रष्ट असे म्हणून निंदा केली आहे. तसेही हा प्रांत पहिल्यापासून रानटी टोळीवाल्यांचाच होता. मौर्य सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत अफगाणिस्तानापर्यंत त्याचे राज्य विस्तारले गेले व तदनंतर येथे बौद्धधर्माचा विपुल प्रसार झाला. २ र्‍या शतकातील कुशाणांच्या कालखंडापर्यंत ही स्थिती कायम होती. बामियानच्या भव्य बुद्धमूर्ती ह्याच काळात कोरल्या गेल्या. केवळ इतकाच आधार घेऊन अफगाणिस्तान पूर्वी वैदिक धर्मीयांचा (हिंदूबहुल) होता असे म्हणणे चुकीचे आहे.

In reply to by प्रचेतस

विनोद१८ Wed, 12/31/2014 - 23:09
..मला हे दर्शवावयाचे आहे की तो प्रदेश अगदी महाभारत कालापासूनचा आपल्याला ज्ञात आहे त्यावेळेपासून तो आजचा वेगळा अफगाणिस्तान देश होइपर्यंत तो प्रदेश या भरतखंडाशी / आर्यावर्ताशीच निगडीत होता - भाग होता. अर्थात आज ज्याला आपण हिंदू संस्क्रुती म्हणून ओळखतो तिच्या पारंपारीक प्रभावाखाली होता भले मग तो प्रांत निम्न दर्जाचा का असेना. कदाचित सुसंस्क्रुत नागर समाजाचे प्रमाण कमी असेल व रानटी टोळीवाले अधिक असतील, म्हणुनच त्यावेळचा तो गांधार आपल्याला परका नाही वाटत उलट आम्हाला तो आमचाच किंवा जवळचा वाटतो. ( अशी आपुलकिची भावना आजच्या अफगाणिस्तानच्याबाबतीत नाही वाटत हे नक्की परंतु त्याप्रदेशाबद्दल कुतुहल मात्र वाटते ) त्याकाळातल्या ( मौर्य सम्राट अशोकाच्या कारकिर्दीपुर्वी ) संपुर्ण आर्यावर्तभर असलेल्या प्रभावशाली वैदीक धर्माचा किंवा आज ज्याला आपण पारंपारिक हिंदु संस्क्रुती म्हणून ओळखतो तिचा गांधारावर अंमल होत हे निश्चित त्या अर्थाने तो हिंदुप्रदेश / हिंदुबहुल होता हे चुकीचे कसे ??

In reply to by विनोद१८

प्रचेतस Wed, 12/31/2014 - 23:23
आफगाणिस्तानावर कुठल्याच राजवटीचा एकछत्री अंमल कधीच नव्हता, भले काही काळ तो वैदिक, बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आलाही असेल पण म्हणून त्यास हिंदूबहुल्/हिंदूप्रदेश म्हणावे कसे?

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Fri, 01/02/2015 - 19:59
अफगाणिस्तानात काबूल व झाबूल या नावाची दोन राज्ये मध्ययुगात फेमस होती. या राज्यांच्या राजांना 'हिंदू शाही' असे अजूनही नाव आहे. वैदिक काळच कशाला, नंतरही अफगाणिस्तानात हिंदू प्रभाव लै होता. अशोकाच्या शिलालेखांपैकी त्या साईडच्या शिलालेखांतली भाषा संस्कृतशी सर्वांत जास्त साम्य असलेली आहे. पाणिनी हाही त्याच भागातला होता. तक्षशिला विद्यापीठही तिथलेच. महाभारत काळात मध्यदेशाचे सांस्कृतिक महत्त्व वाढले म्हणून हा इतिहास नजरेआड कसा काय करता येईल बरे? काबूल व झाबूलच्या राजांनी अरब व तुर्कांशी जवळपास २०० वर्षे लढा दिला आणि तोही यशस्वीरीत्या. त्यांचा पाडाव करून झाल्यावर मगच भारतावर मुसलमान आक्रमणे एकसाथ सुरू झाली. अफगाण हिंदू नामक लोक आजही अल्पसंख्य का होईना, आहेत. त्यामुळे हा भाग हळू हळू 'भारता'पासून तुटत गेला असला तरी चंद्रगुप्त मौर्यापासून ते सर्वांनीच अफगाणिस्तानचे महत्त्व जाणले होते. वैदिक संस्कृतीचे आद्यस्थान इतकीच त्याची ओळख नाही, तर भारताची किल्ली म्हणूनही त्याचे महत्त्व अपरंपार आहे.

In reply to by बॅटमॅन

@ वैदिक संस्कृतीचे आद्यस्थान इतकीच त्याची ओळख नाही, तर भारताची किल्ली म्हणूनही त्याचे महत्त्व अपरंपार आहे.>>> मस्स्त माहिती रे ब्याटुक!

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Sat, 01/03/2015 - 18:28
उम्म. माझे दोन शब्द. झाबूलविषयी पहिल्यांदाच ऐकतोय. हिंदू शाही हे नाव पर्शियनांनी दिलेले असू शकते का? माझ्या माहितीप्रमाणे पर्शियनांनी पहिल्यांदा हिंदू हा शब्द वापरला. ('स' चा फारसी भाषेत 'ह' होतो). अशोकाचे शिलालेख खरोष्टीत आहेत. आणि संस्कृतचा प्रभाव नैसर्गिकरित्या असणारच. ढोबळ मानाने तो इंडो इराणियन गटच होता की. बाकी पाणिनी हा अफगाणिस्तानातला ही माहिती नवीन आहे. तक्षशिला अफगाणिस्तानात नसून पाकिस्तानात रावळपिंडीनजीक होते अर्थात अफगाणिस्थानला जास्त जवळ ते आहेच. काबूल झाबूलच्या राजांनी अरब आणि तुर्कांशी लढा देणे साहजिकच वाटते कारण अशोकाच्या अफगाणिस्थानातल्या धर्मप्रसारानंतर तिथे इकडील संस्कृती बर्‍यापैकी झिरपली असावी. पण केवळ इतक्यामुळे तो भाग हिंदूबहुल होता असे म्हणणे जरा धार्ष्ट्याचे ठरावे.

In reply to by प्रचेतस

विनोद१८ Sat, 01/03/2015 - 20:22
मी लौकिक धर्माबद्दल बोलतोय, तेव्हा आसेतुहिमालय सर्वत्र हिंदुधर्म किंवा हिंदुसंस्क्रुती म्हणुन ज्याला आज ओळखतो त्याचा समाजावर प्रभाव होता अशा अर्थाने. कदाचित तिथल्या रानटी टोळ्या वेगळ्या परंपरेच्या असू शकतील, जसे आपल्याकडचे आदिवासी हे थोड्या वेगळ्या परंपरेचे असतात.
पण केवळ इतक्यामुळे तो भाग हिंदूबहुल होता असे म्हणणे जरा धार्ष्ट्याचे ठरावे.
मग त्यावेळचा तो 'गंधारी / अफगाणी' समाज कोणत्या धर्मतत्वाच्या प्रभावाखाली होता वा अनुयायी होता. ?? याबद्दल काही लिहा.

In reply to by विनोद१८

प्रचेतस Sat, 01/03/2015 - 22:49
मग त्यावेळचा तो 'गंधारी / अफगाणी' समाज कोणत्या धर्मतत्वाच्या प्रभावाखाली होता वा अनुयायी होता. ?? याबद्दल काही लिहा.
अफगाणी समाज इस्लामच्या उदयापूर्वी ढोबळमानाने कुठल्याच धर्माचा अनुयायी नव्हता असे म्हणता यावे. इथल्या भूभागावर पर्शियन, मेसेडोनीयन, तदनंतर अशोक अशा मोठ्या राजवटी नांदून गेल्या. त्याच अनुशंगाने इथे झोराष्ट्रीयन, हेलेनिस्टिक, बौद्ध, हिंदू प्रभावाखाली हा भाग राहिला असे म्हणता यावे. इथल्या टोळ्या मात्र बहुतांशी धर्मविहिन राज्यविहिन अशा भटक्या होत्या. परकीय राजवटी स्थानिक टोळीप्रमुखांना (वॉरलॉर्ड्स) हाताशी धरुन आपला कार्यभाग साधून घेत. थोडाफार धर्मप्रसार झालाही असेल पण संपूर्ण अफगाणी समाज कुठल्याच एका धर्माचा संपूर्ण अनुयायी झालाय असे इस्लामपूर्वकाळात कधीच झाले नाही. मधे अधे सेलुसिद, शक, हूण, कुशाण अशा राजवटीसुद्धा येथे राज्य करुन गेल्या. इथल्या कठीण भौगोलिक प्रदेशामुळे कुठल्याही एका धर्माला इथे सार्वभौम राजवट स्थापणे शक्य झाले नाही. जो काही बदल झाला तो इस्लामच्या उदयानंतरच.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Sat, 01/03/2015 - 23:03
हिंदू शाही हे नाव अरब सोर्सेसमध्ये दिल्याचे वाचले आहे. ते पहिल्यांदा पर्शियनांनी दिले असावे. बाकी संस्कृतचा प्रभाव सगळीकडे होता हे आहेच, पण मेन मुद्दा हा आहे की तत्रस्थ शिलालेख हे ज्या भाषेत आहेत ती भाषा अन्य भागातील शिलालेखांच्या भाषेपेक्षा संस्कृतच्या अतिशय जवळ आहे. इरफान हबीबने प्राचीन भारताचा एक अ‍ॅटलास बनवलाय त्यात हे मस्त दाखवलेले आहे. एक साधे उदा. सांगतो, "ष" हे अक्षरचिन्ह केवळ तिथल्या शिलालेखांत दर्शवलेले आहे. पाणिनी हा शालातुर नामक गावातला होता. हे गाव गांधार भागात असल्याचे प्रसिद्ध आहे. बाकी अशोकानंतर तिथे बौद्ध धर्म गेला ही वस्तुस्थिती आहे, परंतु हिंदू धर्माचा प्रभाव मात्र तिथे लै अगोदरपासून आहे.

In reply to by बॅटमॅन

वैदिक संस्कृतीचे आद्यस्थान इतकीच त्याची ओळख नाही, तर भारताची किल्ली म्हणूनही त्याचे महत्त्व अपरंपार आहे. सहमत. मध्या आशिया आणि दक्षिण आशिया यांना विभागणार्‍या हिंदुकुश या हिमालयाच्या पर्वतशाखेचे नावाचा अर्थ पर्शियन भाषेत हिंदूंचे रक्त / शिरकाण केलेली जागा असा आहे. याचाच अर्थ असा की या पर्वतशाखेने इराण आणि मध्य आशिया पासून हिंदू समजला जाणारा दक्षिण आशिया विभागला गेला होता. हे दोन भूभाग अगदी मुस्लीम आक्रमणापर्यंत सांस्कृतिकरित्या एकमेकापासून वेगळे ठेवण्यात तेथिल कडव्या राज्ये / टोळ्या यांच्याइतका हिंदुकुश पर्वतरांगांतील अवघड भौगिलिक परिस्थिती आणि हवामान यांचाही निर्विवाद वाटा होता.

नंदन Tue, 12/30/2014 - 01:38
लेखमालेतले सारेच लेख आवडले - विशेषतः वैयक्तिक अनुभवांतून आले असल्याने पहिले दोन काकणभर अधिकच. पुढील भागांची वाट पाहतो आहे.

काळा पहाड Tue, 12/30/2014 - 10:40
तालिबानसोबत ‘अल-कायदा’ आले.
तालिबान ही अफगाणिस्तानपुरती मर्यादित संघटना होती. मी वाचल्या प्रमाणे मुल्ला ओमर नं ओसामा बिन लादेन ल आश्रय दिला होता. पण अल-कायदा नं आपल्या कारवाया अफगाणी भूमीवरून पण चालू ठेवल्या. तालिबान ला सुरवातीला ते सगळं अभिमानास्पद वाटलं. पण जेव्हा अल-कायदाच्या कारवाया अमेरिकेविरूद्ध चालू झाल्या (१९९८ मध्ये अमिरिकेच्या सुदानिज एम्बसी वर हल्ला झाला) तेव्हा राष्ट्रपती क्लिंटन यांनी तालिबानवर अफगाणिस्तान मध्ये मिसाईल हल्ला केला. मुल्ला ओमर यातून वाचला पण तालिबान च्या मनातून लादेन आणि अल-कायदा उतरायला सुरवात झाली. पण त्यांना काही करता सुद्धा येत नव्हतं कारण त्यांनी लादेनला सहकार्याचं वचन दिलं होतं. तालिबाननं लादेनला अमेरिकेच्या ताब्यात द्यायचं नाकारलं आणि मग ट्विन टॉवर आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे. ओसामा बिन लादेनच्या पत्नीनं एक पुस्तक लिहिलय ज्याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ते जरूर मिळवून वाचावं. बाकी अल-कायदा आणि तालिबान मधला फरक म्हणजे अल-कायदा ही अरब संघटना आहे. अरब हे मुळातच भडक डोक्याचे (खरं तर बिनडोक्याचे) असतात. बाकीच्या जगातही अरबांशी व्यवहार करणं म्हणजे डोकेदुखी असंच मानलं जातं. इराण हा आशियन असल्यानं त्याचं अरबांशी जमत नाही. इराणियन स्वतःला अरबांपेक्षा वेगळे आणि हुशार मानतात आणि ते बहुधा आहेतही.

In reply to by काळा पहाड

खटपट्या Wed, 12/31/2014 - 07:05
इराणियन स्वतःला अरबांपेक्षा वेगळे आणि हुशार मानतात आणि ते बहुधा आहेतही.
खरंय, माझं नासामधे काम करणार्‍या एका ईराणी माणसाबरोबर बोलणेही झाले. याउलट पाकीस्तानी लोक मात्र स्वतःची मुळं अरबांमधे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजुनही काही पाकीस्तानी मुस्लीम हे मान्य करतात की ते कधीतरी हींदू होते. खालील लिंक पहा https://www.youtube.com/watch?v=d8Xqy_sHVWE

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी गुरुवार, 01/01/2015 - 20:35
>>> ओसामा बिन लादेनच्या पत्नीनं एक पुस्तक लिहिलय ज्याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ते जरूर मिळवून वाचावं. त्या पुस्तकाचे नाव "ग्रोइंग अप बिन लादेन". लादेनची पहिली बायको नज्वा बिन लादेन, त्याचा मुलगा व इंग्लंडमधील एका महिला पत्रकार यांनी एकत्रितपणे हे पुस्तक लिहिले. याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त लादेनच्या भावजयीने लिहिलेले देखील एक पुस्तक आहे. तेदेखील मराठीत अनुवादीत झालेले आहे.

मित्रहो Tue, 12/30/2014 - 11:18
ह्या लेखात स्वानुभवाएवजी विवेचन जास्त आले तरीही तुम्ही स्वतः परिस्थिती जवऴून बघितली असल्याने हे विवेचन नुसतेच पुस्तकी नाही हे पटते.
कोणत्याही समाजात फार कमी लोक सुधारणेस उत्सुक असतात; कुणालातरी सुधारणेचे मुद्दे रेटून न्यावे लागतातच. सुधारणा म्हणजे प्रस्थापित हितसंबंधांना धक्का. आपल्या समाजातल्याही कित्येक महनीय व्यक्तींचं जीवन आणि कार्य आपल्याला हेच सांगते. शिवाय कालपरत्वे कोणत्याही समाजाचा सुधारणांचा प्राधान्यक्रम आणि त्या पचवायची ताकद लक्षात घ्यावी लागते.
हे पटले. हे सर्वदूर लागू होत मग ते कुटुंबात असो, समाजात कींवा कॉर्पोरेट जगतात.

कंजूस Tue, 12/30/2014 - 20:55
लेखमाला आवडली. अतिउत्साहाने लिहितांना धर्म, इतिहास, समाजजीवन, अर्थकारण, भौगोलिक रूपरेखा हे सर्व एकदम एकाचवेळी येतंय. इतर संस्थळांवरही लेखाची भलामण होत आहे.

पहाटवारा Wed, 12/31/2014 - 05:02
सुरेख लेखमाला.. अन् नेहमीप्रमाणेच त्रयस्थ्-पणे केलेले विवेचन आवडले, त्यातही स्वत: अशा परिस्थीतीत असताना ! अफगाणी लोकांविषयी नेहमीच कुतुहल वाटत आलेले आहे..शूर, धाडसी, देखण्या अशा लोकांच्या ह्या प्रदेशाची झालेली धूळधाण कायम मनात प्रश्न ऊभा करते की कदाचीत हे लोक मनस्वी अन कुणावरही विश्वास ठेवून त्यासाठी काहिहि किंमत द्यायला तयार असावेत, म्हणूनच वेळोवेळी त्यांचा वापर अनेकांनी करुन घेतला पण त्यांच्या वाट्याला काहिच आले नाहि. या लेख्-मालेत खुद्द अफगाणी लोकांच्या स्वभावा-बाबत वाचायला मिळेल अशी आशा करतो. प्.भा.प्र. -पहाटवारा

थॉर माणूस Wed, 12/31/2014 - 10:26
अफगाणिस्तानविषयी फर्स्ट हँड अनुभव असलेल्या व्यक्तीकडून येणारं लिखाण आणि ते ही अत्यंत संयत असं लिखाण वाचायला मिळतंय म्हणजे पर्वणीच. अर्थातच, वाचतोय... :)

सुधीर Fri, 01/02/2015 - 12:18
तीनही भाग एकत्र वाचले. लेखमाला माहितीपूर्ण आणि उत्कंटावर्धक आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे. काही वाक्य खूप आवडली.
आपल्या प्रतिक्रिया फार “क्षणिक” असतात, त्या बदलतात हे मला माहिती होतं आजवरच्या अनुभवाने.
सुधारणा म्हणजे प्रस्थापित हितसंबंधांना धक्का. आपल्या समाजातल्याही कित्येक महनीय व्यक्तींचं जीवन आणि कार्य आपल्याला हेच सांगते. शिवाय कालपरत्वे कोणत्याही समाजाचा सुधारणांचा प्राधान्यक्रम आणि त्या पचवायची ताकद लक्षात घ्यावी लागते.

हुप्प्या Sun, 01/04/2015 - 07:37
एक मोठ्ठा मुद्दा इथे दुर्लक्षिला गेला आहे तो म्हणजे इस्लाम. १४०० वर्षे जुन्या ह्या धर्माचे मूळ रुप पुन्हा पुनरुज्जिवित करावे म्हणून अरबी पैसा (विशेषतः सौदी अरेबिया) बाकी देशात खर्च केला गेला. कुठलेही कर्तृत्व नसताना दैवयोगाने खाली तेल सापडले आणि ते विकून अमाप पैस मिळवला त्याचा "सदुपयोग" हा बाकी देशातील सौम्य होत जाणारा इस्लाम बदलून त्याला त्याच्या मूळ रानटी, कडव्या, असहिष्णू रुपात आणायचा चंग गेल्या ५० वर्षात बांधला गेला आणि सगळे इस्लामी जग ह्या विषात आकंठ बुडत आहे. अफगाणिस्तानचे बेचिराख होण्यामागे इस्लामचे कडवेपण हे एक मुख्य कारण आहे. मुळात इस्लाम हा सुधारणांना विरोध करतो. आपले धर्मग्रंथ हे देवाचा अखेरचा शब्द आहे आणि त्यात काडीचाही बदल होणे नाही, त्याला कालबाह्य ठरवता येणार नाही अशी ताठर भूमिका असल्यामुळे हा धर्म अशा वहाबीकरणाला सहज बळी पडतो. म्ह्णून धर्मनिंदा वगैरे केल्यास मृत्यूदंड दिला जातो. धर्म बदलल्यास मृत्यू दिला जातो. हा मुद्दाही चर्चिला गेला पाहिजे.