Skip to main content

अमृतसर २ - सुवर्णमंदीर

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 25/12/2014 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
घंटाघर चौक प्रवेशद्वार. जालियांवाला बागेपासुन या मार्गाने अगदी ५ मिनिटात आपण या द्वाराशी येउन ठेपतो. डाव्या अंगाला पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आहे तर पुढे प्रवेशद्वारजवळ सामान सुमान ठेवायचा कक्ष आहे. प्रवेशद्वारासमोरचा परिसर विस्तिर्ण आहे. प्रवेशद्वारासमोरच अगदी उथळ म्हणजे केवळ पाऊल बुडेल अशी कुंडे आहेत. त्यात पाय धुवायचे आणि मग मंदिरात प्रवेश करायचा. प्रवेशद्वाराचे रक्षक हे येणार्‍या प्रत्येकावर दोन गोष्टींसाठी नजर ठेवुन असतात - मस्तक झाकलेले असणे आणि पाय धुवुन मगच प्रवेश करणे. g1 प्रवेशद्वारासमोर येताच सुवर्णमंदिराचे पहिले दर्शन होते. प्रवेशमार्गावर सर्वत्र देणगीदारांची नावे असलेल्या संगमरवरी पाट्या आहेत. दात्यांमध्ये लष्करी अधिकारी व पलटणींचा मोठा वाटा आहे. b3 b4 b5 आयताकृती तलावात म्हणजे 'अमृतस्रोवरात' (यावरुनच अमृतसर असे नाव पडले) मंदीर आहे. उजवीकडे कमानदार प्रवेशद्वारातुन मंदिर प्रवेशाचा मार्ग आहे. उंच सोनेरी कळ्स दिसत आहेत ते अकाल तख्त आणि केशरी ध्वज असलेली वास्तु म्हणजे निशान साहिब. b6 b7 प्रवेशाद्वारालगतची म्हणजे डाव्या अंगाला शिख वस्तु संग्रहालयाची इमारत आहे. b8 b10 मंदिराकडे पाहुन भाविक माथा टेकतात आणि सरोवराचे पाणी तिर्थ म्हणुन प्राशन करतात. या जागेवर बहुतेक लोक मंदिराच्या पार्श्वभूमिवर स्वतःची छबी टिपुन घेताना दिसत होते. b11 सरोवर स्वच्छ राखण्यासाठी बहुधा मासे पाळले गेले असावेत. या माशांना खायला न घालण्याच्या व सरोवर स्वच्छ राखण्याच्या सुचना आहेत. आपल्याला सरोवरात अभय असल्याचे मासे मंडळींना माहित असावे, ते बिनदिक्कत कठालगत फिरताना व माणसे जवळ आली तरी वावरताना दिसत होते. b12 मंदिराची मागची बाजु. शिख धर्मात बोराच्या झाडाला विशेष महत्व असावे. परिसरात बोराची अनेक झाडे आहेत तसेच 'बेरी बाबा बुध साहिब' देखिल एका पुरातन बोरीच्या झाडाखाली आहे. b14 मागच्या अंगाला दोन उंच मनोरे आहेत व त्यांमध्ये लंगर आहे. या मनोर्‍यांना रामगढिया बुंगे म्हणतात. हे उंच मनोरे रामगढिया वंशातील योद्धा सरदार जस्सासिंह याने मंदिराच्या संरक्षणार्थ उभारले. b15 b16 'सेवादार' - मंदिराच्या परिसरात गस्त घालणारे रक्षक. अगदी साठी उलटलेले रक्षक देखिल सहजगत्या भाला पेलत फिरताना दिसत होते. एका भिंतीलगत एक घोळका बसला होता, त्यातल्या काहींची पाठ मंदिराकडे झाली होती. रक्षक त्यांच्या पुढ्यात जाउन उभा राहिला व त्याने फक्त पालथ्या पंजाने ताणलेली बोटे गोल फिरवली. ताबडतोब पाठ फिरवुन बसलेले मंदिराभीमुख झाले. b17 प्रत्येक अंगाकडुन मंदिराचे वेगळे रुप दिसते. मंदीर आणि त्याचे सोनेरी प्रतिबिंब फार मोहक दिसते. b18 b19 b20 मागच्या अंगाला मंदिराला एक सुंदर सज्जा आहे. अगदी वरच्या बाजुला मधोमध अध्ययन करणारे गुरू आणि चवरी ढाळणारा सेवक पत्र्यावर कोरला आहे b21 जवळुन पाहिले असता मंदिराच्या बाह्य बाजुवरील नक्षिकाम ताजमहालावरील नक्षींशी विलक्षण साधर्म्य दाखवते. b22 कळसावरील सोन्याची झळाळी डोळे दिपवते b23 प्रदक्षिणा करताना सर्व बाजुंनी मंदीर डोळे भरुन पाहुन घेतले. b24 b25 b26 b27 b28 b29 इतका प्रशस्त् परिसर, हजारो माणसांचा राबता तरीही आश्चर्य कारक वाटावी इतकी शांतता आणि स्वच्छता. प्रदक्षिणेच्या आयताकृती मार्गावर चारही कोपर्‍यांमध्ये भाविकांना पाणी देण्यासाठी जे लोक असतात ते पगारी नोकर असून स्वखुषीने व सेवाभावाने करणारे भक्त आहेत हे त्यांना पाहताच समजते. सर्वत्र अखंड व अथकपणे ओल्या फडक्याने संगमरवरी जमीन पुसली जात असते. प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश करताना दिंड्या घेउन आलेले आणि आपापले आलेले भाविक यांना प्रवेशासाठी स्वतंत्र रांगा आहेत. प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत मंद आवाजात प्रसन्न अशी धार्मिक गीते वाजत असतात आणि बहुसंख्य भाविक ती स्वतः देखिल गात असतात. मंदिरात प्रसादाची व्यवस्था आणि पद्धत फारच उत्तम आहे. प्रवेशद्वारासमोर जरा अलिकडे प्रसाद मिळतो. दहा रुपये देउन पावती घ्यायची आणि ती दाखविल्यावर साजूक तुपातला अगदी तूप निथळणारा जाडसर शिरा प्रसाद म्हणुन मिळतो. आम्ही घेतला आणि खायला सुरुवात केली. काही वेळाने लोक आमच्या कडे पाहत् आहेत असे लक्षात आले. एक मुलगी आणि तिची आई आमच्या जवळ आल्या आणि त्यांनी माहिती दिली की तो प्रसाद घेउन दर्शनाला जायचं, आणि दर्शन घेतल्यावर मग प्रसाद खायचा. प्रसादाची पद्धत फारच उत्तम - आत जाताना प्रसाद जमा करायचा, सेवक आपल्या कृपाणाने त्यातला काही भाग काढुन घेतात आणि उरलेला आपल्याला प्रसाद म्हणुन देतात. तो ठेवायला पिश्वीही तत्परतेने दिली जाते. ज्यायोगे भक्तांना चिकट हात घेउन वा हातात द्रोण घेउन मंदिरात जायला लागु नये. आतमध्ये नैवेद्य प्रसाद वगैरे प्रकार नाही. फक्त दर्शन घ्यायचं आणि यायचं वातावरण अगदी प्रसन्न आणि विलक्षण समाधान देणारं. इथुन पाय निघत नाही. आपण निघतो ते पुन्हा एकदा यायचच अस म्हणत.

वाचने 15765
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

अप्रतिम फोटो आलेत. ते खरचं सोनं आहे का हो? (खरचं सीरियसली विचारतोय...अवांतर नाहि)

आणखी 'लेख' वाचायला आवडला असता, पण 'सर्वसाक्षी' या नावाला साजेसे भरपूर फोटो आहेत त्यामुळे उपासमार झाली नाही :-) 'फ्रॉमर्स' च्या संस्थळावरही चांगली माहिती वाचायला मिळाली होती.

फोटो आणि वर्णन आवडले !! अशी चोख व्यवस्था आपल्या मंदीरात का नसते असा विचारा आला.....

अप्रतिम फोटो... (ही कला आमच्या बोटात कधी येणार?)

स्वच्छता, सुंदरता, शांतता व पवित्रता यांचे प्रतिक म्हणजे सुवर्णमंदिर. शिकलेले व मोठमोठे अधिकारी देखील येथे मानवसेवा करायला तत्पर असतात, हि सेवा देवून स्वत:ला धन्य समजतात. येथील उच्च नीच असा भेदभाव न करता लंगर(सहभोजन) करणे देखील पवित्र मानले जाते. असे बरेच काही शिकण्यासारखे आहे येथे. छान सुंदर फोटो व वृत्तांत लिहिल्याबद्दल धन्यवाद.

अप्रतीम. परवाच डिस्कव्हरीवर सुवर्णमंदीरा बद्दल एक फिल्म दाखवत होते. आज हा लेख वाचला. मदीराची परीक्रमा घडवली साक्षीमहाराज.

लेख आणि फोटो दोन्ही आवडले. फोटोंना सर्वसाक्षी टच आहेच :) सुवर्णमंदिर भलतेच आवडले होते. विशेषत: तिथल्या लंगरमध्ये एका वेळी अक्षरशः हजारो लोक जेवायला बसतात तेव्हाची सगळी व्यवस्था आणि शिस्तबध्दता याचे नक्कीच विलक्षण कौतुक वाटले होते.

सर्वांचे आभार. दिपक, सर्व पत्रे अस्सल सोन्याचा मुलामा दिलेले आहेत असे ऐकले आणि पाहताना वाटतात. समिपदृश्ये पाहा, त्यात दागिन्यांच्या घडईचा भास आहे. तुलना नाही म्हटलं तर पण याच गरिब भावंड शोभेल असं दुर्गियाना मंदीर पाहताना भयंकर फरक जाणवतो आणि खटकतो. साधारण सुवर्णमंदिराचीच अल्पशी प्रतिकृती पण काहीतरी चुकताय अस वाटतं. केरळ पाहताना आपल्या कोकणाविषयी वाटतं तसच काहीतरी. आमच्या सारथी सरदारजींनी तात्काळ सांगितले की हरमंदिर साहेब मध्ये सर्व काही भक्त करतात आणि या मंदिरात पगारी नोकर काम करतात. मंदीर पाहिले पण समाधान झाले नाही, एकदा निवांतपणे पाहायचे आहे. हे पाहणे फार घाईत झाले. असो. सहकुटुंब गेल्यावर असे होणारच. एकदा समछंदी लोकांबरोबर जाऊन एक पूर्ण दिवस संपूर्ण मंदीर बारकाईने पाहायची आणि टिपायची इच्छा आहे. शिवय या दौर्‍यात तर्ण तारणही पाहायचे राहुन गेले आहे. साक्षी

In reply to by सर्वसाक्षी

तरणतारणचा गुरूद्वारा मलाही बघायची फार इच्छा होती.पण तो बघायला मिळाला नाही. माझ्या एका नातेवाईकांनी तो गुरूद्वारा बघितला आहे. तिथे शीख इतिहासाचे एक लहानसे संग्रहालय आहे.त्यात शीख धर्माच्या महत्वाच्या टप्प्यांविषयी माहिती आहे.ऑपरेशन ब्लू स्टार हा महत्वाचा टप्पा अर्थातच तिथे आहे.त्यानंतर झालेल्या इंदिरा गांधींच्या हत्येविषयीही तिथे लिहिले आहे.आणि "जैसा किया वैसा पाया" अशा स्वरूपाचे उल्लेख आहेत असे माझ्या नातेवाईकांनी मला सांगितले होते. त्यांनी त्या गुरूद्वाराला फार पूर्वी (१९९५ मध्ये) भेट दिली होती.अजूनही ते उल्लेख तिथे आहेत की नाही याची कल्पना नाही.

अतिशय पुरातन असे गुरुद्वारा आहे ते, अकबराच्या काळात ते बांधण्यात आले असे मी तिकडे गेलो असताना ऐकले. त्यावेळच्या बर्‍याच हिन्दु व शिख राजांनी सढळ्हस्ते आर्थिक सहकार्य त्यासाठी केले, आजही जगभरातुन तमाम शिखबांधव मदत करत आहेतच. अवाढव्य, ऐसपैस, आलिशान व सर्वात महत्वाचे म्हणजे अतिशय स्वच्छ व भव्य असे हे देवालय आहे. एका चांगल्या ठिकाणी जाउन आल्याचे समाधान मिळते. माझ्याकडेही त्यावेळचे काही फोटो आहेत ते डकवीन म्हणतोय.

सुवर्णमंदिर म्हणजे सुवर्णमंदिरच.. मस्त आहेत फोटो! अर्थात वरिल प्रकारच्या स्वच्छतेचा आणि सेवाभावाचा ,प्रसादाचा अनुभव कोणत्याही गुरुद्वारात गेलात तरी तसाच येतो. मी पुण्यातील ठिकाणे पाहिली आहेतच. शिवाय तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गुरुद्वारात दुर्गपूजेच्यावेळी गेलो असताना,तेथिल सेवेकरी व मुख्यगुरुंशी बराच वेळ गप्पाही मारल्या,तेंव्हा या शांत शिस्तीचे मूळ, त्यांच्या ग्रंथात आणि आचरणात असल्याचे मला जाणवले.

स्वच्छता, सेवक/भक्तांचे विनयशील वागणे आणि लंगरमध्ये लोक जेवायला बसतात तेव्हाची सगळी व्यवस्था आणि शिस्तबध्दता हे बहुतेक सर्व गुरुव्दारांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. केवळ सुवर्णमंदिरासारख्या नावाजलेल्या स्थानावरच नाही तर हिमाचल मधल्या मणिकर्ण येथे गरम पाण्यांच्या झर्‍यांशेजारी असलेल्या गुरुव्दारात हाच अनुभव आला. हिंदू देवळांनी यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. पण, मंदिरे पैसे कमावण्याच्या व्यवसायाच्या ठिकाणांऐवजी श्रद्धेची स्थाने बनल्याशिवाय हे होणे शक्य नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

....श्रद्धेची स्थाने बनल्याशिवाय हे होणे शक्य नाही. सहमत...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हिंदू देवळांनी यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. पण, मंदिरे पैसे कमावण्याच्या व्यवसायाच्या ठिकाणांऐवजी श्रद्धेची स्थाने बनल्याशिवाय हे होणे शक्य नाही.
सहमत.मी सुवर्णमंदिर बघितले आहे तसेच दोन चर्चेसही ही इतर प्रार्थनास्थळे बघितली आहेत.सॅम्पल साईझ फार मोठा नाही पण त्या सर्व ठिकाणी मला तरी खूपच शिस्तबध्दता आणि स्वच्छता जाणवली.आपल्याला असे का करता येत नाही?पण सध्याच्या पीकेमय वातावरणात असे काही लिहिले तर हिंदू धर्माचा अपमान वगैरे लेबले चिकटवली जात आहेत :(

अतिशय सुरेख. आमचंही दर्शन झालं. धन्स. -दिलीप बिरुटे

घराजवळच्या गुरुद्वा-यात नेहेमी जाणे असते. तुपाने निथळलेला 'खडा प्रशाद' , गुरुच्या दरबारात होणारे कीर्तन (अतिशय सुश्राव्य, फक्त तबला पेटीच्या साथीने), त्या नंतर होणारी 'अर्दास' (प्रार्थना), " बोलणाजी वाहे गुरु' ची हाक , वेळो वेळी " बोले सो निहाल, सत श्री अकाल" चा 'जयकारा', स्वछता , शांतता, सर्वच मनाला भावते. श्रींमंत आणि प्रतिष्ठित लोक सुद्धा येण-या भाविकांच्या चपला, बूट जमा करणे, टोकन देणे, आणि चपला, बूट परत करणे ह्या सेवे साठी उभे असतात. हा त्यांच्या संस्कारांचा एक भाग आहे. अनेकदा हे लोक चक्क मांडी घालुन बसतात आणि चपला, बूट पॉलिश करत बसतात. रात्री कीर्तन झाल्यावर गुरु ग्रंथसाहेब आपल्या डोक्यावर घेवुन दरबारातुन निघतात आणि एका विशिष्ट मखरात रात्रभर ठेवतात. सकाळी ब्रह्ममुहुर्तावर (त्याला 'अमृत वेले' म्हणतात) पुन्हा ग्रंथसाहेब दरबारात आणुन स्थानापन्न करतात. गुरुद्वा-यातील 'लंगर' जगप्रसिद्ध आहे. शिर्डिचे साई बाबा ज्या प्रमाणे भंडा-याद्वारे सर्वांना खाउ घालत, त्या प्रमाणे गुरु नानकजी यांनी ही ' लंगर' ची प्रथा सुरु केली. प्रत्यक्ष लंगरच्या वेळी सर्व मांडी घालुन खाली सतरंज्यांवर बसतात. सर्व कामे स्वयंसेवकच करतात. ताटे दिली जातात. पाण्याचे ग्लास दिले जातात. मग रोट्या देतात. रोट्यांना 'प्रशादा' असे म्हणतात. रोटी घेताना दोन्ही हात पुढे करुन आदरपुर्वक स्वीकारायचे. स्त्री पुरुषांनी आपले डोके रुमाल, ओढणी किंवा गुरुद्वा-यात ठेवलेल्या कापडाने (दस्तार) झाकणे अनिवार्य. साधारणतः चना मसाला (छोले), खीर (दलिया), कोशिंबीर (ह्याला दिलखुश म्हणतात) असे पदार्थ असतात. अतिशय लहान लहान मुले पाण्याचे जग घेवुन "जल वाहे गुरु, जल वाहे गुरु" असे म्हणत फिरतात , तेव्हा फार कौतुक वाटते. सर्व जण एकमेकांस 'वाहे गुरु' म्हणुन संबोधतात. वाढुन झाल्यावर " बोले सो निहाल, सत श्री अकाल" चा घोष होतो आणि मगच जेवायला सुरुवात करतात. श्रीमंत, अत्यंत गरीब लोकही एकाच पंक्तीत जेवतात. अनेक गरीब लोकांचे पोट भरते आणि ते तृप्त होतात. हीच परमेश्वराची सेवा ह्या भावनेने सगळे खपत असतात. नंतर भांडी धुण्यासाठी परत स्वयंसेवक तयार असतात. कोणताही गोंधळ न घालता सगळे शिस्तित होते. आपल्या धर्मस्थळांच्या पार्श्वभुमीवर हे फार उल्लेखनीय आहे. एकदा तरी हा अनुभव घ्यावा.

वणीच्या मंदिरात, शेगांव, अक्कलकोट, केकतावळे येथे सुधारणा होत आहेत. प्रत्येक धर्माचे एक आगळे वेगळे रुप असते. हिंदु समाज हा सर्वसाधारण असा समाज आहे. त्याला कोणतेही परकिय अथवा स्वकियांचे पाठबळ नाही. काही काही ठिकाणी दिवाबत्ती करणे सुद्धा अवघड असते.