मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी बाणा/ मोडेल पण वाकणार नाही ?????

विवेकपटाईत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(तीन पूर्वी ब्लॉग वर लिहलेला लेख, त्या वेळच्या संदर्भात,कुणाची ही भावना दुःखविण्याचा हेतु नाही) ते देवतेचे दर्शनास दिल्ली दरबारात आले. सहज विषय निघाला. दरबारात मुजरा करावा लागतो ही रीत. पण मुजरा करण्या साठी पाठीचा कणा मोडावा लागतो व मान ही झुकवावी लागते, हे आलंच. शिवाजी महाराज मुग़ल दरबारात आले होते. त्यानी बादशाहास मुजरा केला नाही. बादशाह समोर ही त्यांची मान ताठ होती व पाठीचा कणा सरळ होता. मान झुकवण्या एवजी त्यानी कारावास पत्करला. ते म्हणाले, आम्ही ही मराठा, एका अर्थी त्यांचेच वंशज! स्वाभिमानी! खरे मराठा! मोडेन पण वाकणार नाही हाच आमचा बाणा??? आम्ही ही मुजरा करत नाही. त्यांचे विचार ऐकून मला आश्चर्य वाटले व आनंद ही झाला आपले नेते आज ही स्वाभिमानी व मोडेन पण वाकणार नाही या बाण्याचे आहेत पाहून. पण एक प्रश्न मनात उभा राहिला, बिना मुजरा करता हे देवतास कसे प्रसन्न करणार, हे बघण्याची उत्सुकता मनात जागृत झाली. तेवढ्यात देवतेचे पदार्पण झाले. आश्चर्य म्हणजे, आपल्या मराठी नेत्याने साक्षात् दंडवत प्रणाम करत देवतेचे पायांना स्पर्श केला. त्यांची नाक जमिनीला घासल्या जात होती. पण एक गोष्ट नक्की खरी होती. त्या ही अवस्थेत त्यांचा पाठीचा कणा सरळ होता व मान ही ताठ होती. मी आ! वासून बघतच राहिलो. "खरा मराठी बाणा म्हणतात तो हाच का????"

वाचने 6351 वाचनखूण प्रतिक्रिया 12

अर्धवटराव 12/10/2014 - 09:11
छत्रपतींनी बादशहाला मुजरा केला नसावा हा पहिला भ्रम. ते शक्यच नव्हतं. फर्मानबाडी स्थापुन बादशाही खलित्याला अगदी जमीनीवर डोकं टेकवुन नमस्कार करणारे महाराज त्याच बादशहाच्या दरबारात मुजरा करत नाहि असं कसं होईल. आणि त्या भ्रामक समजुतीवरुन आपला उद्धट, उर्मट, अव्यवहारी बोगसपणा जनतेच्या माथी मारण्याचा जो खटाटोप महाराष्ट्रात चालतो ते तर केवळ हास्यास्पद आहे. असो.

श्रीगुरुजी 12/10/2014 - 22:21
मोडेन पण वाकणार नाही असा बाणा अव्यवहारी आहे. त्याऐवजी "मोडणार नाही व वाकणारही नाही. जर मोडण्याचीच वेळ आली तर नाईलाजाने वाकण्याचे नाटक करीन व वेळ येताच पुन्हा ताठ उभा राहून परत मोडण्याची वेळ येणार नाही अशी कामगिरी करून दा़खवेन" असा बाणा हवा. व्यवहारात अनेकवेळ वाकण्याची वेळ येते. तिथे ताठ राहून उपयोग नसतो. सरकारी कार्यातयातले कागद अडविणारे कर्मचारी, चौकातला वाहतूक पोलिस, दुचाक्या उचलून नेणारा बकासुराचा गाडा इ. ठिकाणी तुमच्या ताठ बाण्याचा काहीही उपयोग नसतो. अशा ठिकाणी नाईलाजाने वाकावेच लागते.

In reply to by श्रीगुरुजी

'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' असे एक संतवचन आहे. सिंह चार पाऊले मागे गेला म्हणजे तो घाबरला असे समजू नये तो पुढे मोठी झेप घेण्यासाठी चार पाऊले मागे जातो.

पैसा 14/10/2014 - 23:56
माणसं इथून तिथून सारखीच! त्यातून आताचे राजकारनी तर काय विचारता! मात्र शिवाजी महाराज प्रचंड धोरणी होते. त्यांनी औरंगझेबाला मुजरा करतो असं दाखवून मनात माँसाहेबांना मुजरा केला असेल अशी शक्यता वाटते!

In reply to by पैसा

काळा पहाड 15/10/2014 - 11:09
शिवाजी महाराजांची एकूणच प्रतिमा आपल्यासमोर चुकीची उभी करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचं धोरण मोडेन पण वाकणार नाही असं नव्हतंच. ते गनिमी काव्याचं होतं. गनिमी कावा हा फक्त लढाईचा प्रकार नसून एक प्रकारच्या धोरणात्मक डावपेचांचा भाग आहे. औरंगजेबाबरोबर सलोखा रहावा ही महाराजांची मनापासून इच्छा होती. कारण त्यामुळे राज्य स्थिर आणि बळकट व्हायला मदत झाली असती. त्यासाठी औरंगजेबाची मनसबदारी पत्करणे त्यांना भाग होते. औरंगजेबाच्या दरबारात जे झालं ते अर्थातच एक प्रकारच्या गैरसमजुतीचा प्रकार होता ज्यात औरंगजेबाचा आणि राजांचा काहीच सहभाग नव्हता. ज्या प्रकारे आपण हा भाग समजतो तसा तो झाला नसण्याचीच शक्यता आहे.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 15/10/2014 - 11:34
मोडेन पण वाकणार नाही हा बाणा शिवाजी महाराजांचा होता हे म्हणणे चुकीचे आहे. पुरंदरचा तह म्हणजे काय होते? त्यावेळची परिस्थिती अशी होती की महाराजांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. महाराजांना काही प्रसंगी रणांगणातूनही माघार घ्यावी लागली होती. आग्र्याला जाण्यापूर्वी पन्हाळ्यावर हल्ला केला होता तेव्हा आपल्या सैन्याचा पराभवच झाला होता आणि महाराजांना माघार घ्यावी लागली होती.तेव्हा मोडेन पण वाकणार नाही हा महाराजांचा बाणा होता असे म्हणणे मला तरी पटत नाही. माझ्या मते त्यांचा बाणा होता--वेळ पडली तर वाकेन पण योग्य वेळ येताच वाकायला लावणार्‍याचा चांगलाच वचपा काढेन.
औरंगजेबाच्या दरबारात जे झालं ते अर्थातच एक प्रकारच्या गैरसमजुतीचा प्रकार होता
मला वाटते की आग्र्याच्या दरबारात झाले ते महाराजांच्या पूर्ण कारिकिर्दीत भावनेच्या भरात जाऊन चुकीचे पाऊल उचलायची महाराजांची एकमेव वेळ होती.आपल्या मुलखापासून इतक्या लांब शत्रूच्या राजधानीत जाऊन, त्याच्याच दरबारात जाऊन आपले केवळ पाच-सहाशे लोक बरोबर असताना शत्रूलाच (आणि ते सुध्दा औरंगजेबासारख्या खुनशी शत्रूला) आव्हान देणे हा भावनेच्या भरात झालेला अविचारच होता.भारताचे भाग्य बलवत्तर म्हणून महाराज त्या प्रसंगातून सहिसलामत निसटले.इतर प्रत्येक वेळी आपले हात दगडाखाली असताना भावनेच्या भरात जाऊन कोणतेही चुकीचे पाऊल कधीच न उचलणार्‍या महाराजांनी आग्र्यात असे कसे केले असावे हे मात्र मोठे कोडेच आहे.

विजुभाऊ 15/10/2014 - 12:01
शिवाजी महाराजानी त्याम्च्या हयातीत किमान तीन वेळा तरी संभाजी महाराजाना औरम्गजेबाकडे चाकरीसाठी ठेवले होते. त्यामुळे त्यानी औरम्गजेबाला कुर्निसात केला नसेल हे संभवत नाही. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा व्यवहारात चालेल नाही. ज्या मराठीत "मोडेन पण वाकणार नाही" अशी उक्ती आहे त्याच मराठीत तुकारामानी "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती" असेही म्हंटले आहे.

दुश्यन्त 15/10/2014 - 13:42
शिवाजी महाराजानी त्याम्च्या हयातीत किमान तीन वेळा तरी संभाजी महाराजाना औरम्गजेबाकडे चाकरीसाठी ठेवले होते. त्यामुळे त्यानी औरम्गजेबाला कुर्निसात केला नसेल हे संभवत नाही. +१ . संभाजी राजे दोन वेळेस मोगलांचे मनसबदार झाले होते ( एकदा महाराजांनी सांगितल्यावर आणि दुसर्यांदा ते दिलेरखानाला जावून मिळाले तेव्हा) तेव्हा बादशाह समोर असताना मनसबदार त्यांना मुजरा करणारच. शहाजी राजांना तर मनात राज्य स्थापण्याचे असूनही कधी मोंगल, कधी आदिलशाह तर कधी निजाम अश्या ठिकाणी चाकरी करावी लागली. महाराज मनसबदार नव्हते तरी पण दरबारात औरंगजेबाला मुजरा केला होता तसेच वर बादशाही खलीत्याला डोक वाकवून नमस्कार करण्याचा उल्लेख आहे हे पण खरे आहे. प्राप्त परिस्थिती नुसार ते करणे भागच होते. मात्र नंतर दरबारात झालेल्या अपमानामुळे महाराज रागावले होते आणि बाणेदारपणा दाखवला होता. शिवाजी महाराज व्यवहारी आणि चतुर होते परिस्थिती पाहून योग्य निर्णय घायचे कसब त्यांच्याकडे होते.

प्यारे१ 15/10/2014 - 14:16
वरील प्रतिसादांशी सहमत. महाराज अत्यंत त्या बरोबरच मागेही एका लेखात मांडलेल्या विचारानुसार महाराजांना त्यांच्या 'व्हिजनचे' लोक मिळालेले नव्हते असं वाटतंय. प्रचंड शूर, जीवाला जीव देणारी पण राजकारणात साधी असावीत माणसं. महाराजांवर तुटून प्रेम करणारी असली तरी महाराज त्यांच्यावर चिडले की उलटून रागावणारी ही माणसं. महाराजांच्या दोन सेनापतींची उदाहरणं प्रकर्षानं जाणवतात अशा वेळी. नेताजी पालकर आणि कुडतोजी (प्रतापराव) गुजर. एक जण महाराजांना सोडून गेला आणि दुसरा चिडून शत्रूवर चढाई करुन गेला तो गेलाच.

विवेकपटाईत 18/10/2014 - 19:42
दिल्ली दरबारात साक्षात् दंडवत प्रणाम करणाऱ्या नेतांबाबत हा लेख आहे, शिवाजी राजांच्या बाबतीत नाही. ह्या दृष्टीकोणातून या लेखाला पाहावे.