Skip to main content

नथ........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/10/2014 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ............भाग-२ मानसी आर्य कँपबेल........ एम्बसीवरील हल्ल्याची बातमी कळल्यावर वेळासला माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला. मला चैन पडेना. घरात सर्वजण काळजी करु नकोस असे सारखे समजवत होते पण त्यामुळे मला जास्तच रडू येत होते. शेवटी रडून रडून डोळे सुजल्यावर मी मनाशी ठरविले की आता बस्स झाले. आर्यपाशी परत जायला पाहिजे. अँगसही सारखा पप्पा पप्पा करत होताच. आमच्या मुलाचे नाव आम्ही त्याच्या आजोबांवरुन अँगस ठेवले आहे. आपल्याकडे अशीच पद्धत असते ना ! ही कल्पना आर्यची. तो म्हणे हे असे होत राहिले म्हणजे आपल्या भारतीय रक्ताची सतत आठवण पुढच्या पिढ्यांना होत राहील. अखेर मुंबईला कॉन्स्युलेटला सांगून मी आमच्या दोघांचे वॉशिंग्टनचे तिकीट काढले. वकिलातीतील अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कामावर रुजू होताना प्रथम अमेरिकेला जावे लागते. तसा नियमच आहे. मी दहा दिवसातच वॉशिंग्टनहून आर्यच्या कार्यालयातून कागदपत्रांचा गठ्ठा घेतला व काबूलला प्रयाण केले. विमानतळावर आर्य घ्यायला आला होताच. हवा छान होती संध्याकाळच्या सावल्या लांबल्या होत्या व सूर्याची किरणे डोळ्यात घुसत होती. त्या प्रकाशाच्या पार्श्र्वभूमीवर गाडीजवळ उभ्या असलेल्या आर्यची ठळक आकृती मला सहज ओळखता येत होती. तेथेच मी आर्यच्या मिठीत मी केव्हा शिरले हे आम्हालाच कळले नाही. आजुबाजूच्या अफगाण कर्मचाऱ्यांच्या नजरा चुकवत आम्ही आमच्या गाडीत बसलो. कधी एकदा घरी जातोय असे झाले होते. अँगसला दोन संस्कृतीच्या मिलनाचा त्रास नको म्हणून आम्ही या बाबतीत जरा कर्मठपणेच वागायचो. घरी पोहोचल्यावर कार्यालयाच्या मेसमधून आलेले जेवण जेवत मी आर्यला असंख्य म्हणजे असंख्य प्रश्न विचारले. त्याची उत्तरे देत आर्य शेवटी दमून गेला. ‘मानसी एक गंमत सांगतो. त्या तीन दिवसातील एका संध्याकाळी मी इस्माईलला तुझा फोटो दाखविला’ कुठला ? ‘तोच ग माझ्या पाकिटातला. तोच होताना माझ्याजवळ त्यावेळी’ असे म्हणून आर्यने मला तो प्रसंग सांगितला. ‘पण मला वाटतंय तो त्याला दाखविण्यात माझी चुकच झाली. मी अर्थातच आपल्या सिक्युरिटीला याची कल्पना दिली आहे’ " जाऊ दे रे ! चांगला सभ्य वाटतो तो !‘ ‘ हे अफगाणिस्तान आहे मानसी ! येथे काहीही हो़ऊ शकते. काळजी घे ! घरात एकटीच असतेस म्हणून सांगतोय !’ एवढ्यावरच तो विषय संपला. पण आर्यचे एक सांगणे मला खटकत होते. त्याने सांगितले होते की इस्माईलचे व वलिखानचे वागणे त्या दिवसानंतर बदलले होते. अर्थात या सगळ्याची माहिती आर्य सिक्युरिटीला वेळोवेळी देतच होता. काहीही चांगले किंवा वाईट घडले तरीही त्याची कल्पना आम्हाला सिक्युरिटीला द्यावीच लागते. आर्य सांगत होता की ते दोघे भाऊ त्या प्रसंगानंतर त्याच्याशी जास्त आदबीने वागत होते. तो आल्यावर त्याच्या गाडीचा दरवाजा उघडून उभे रहात होते. कार्यालयीन वेळेत त्याच्या हातात कॉफीचा मग देत होते. एकदा तर वलिखानने आर्यसाठी घरुन जेवणाचा डबाही आणला होता. यावरुन सिक्युरिटीने त्याला चांगलेच धारेवर धरले. आर्य सांगत होता की शेवटी वलिखानच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. नसत्या भानगडी नकोत म्हणून आर्यने वलिखानची दुसऱ्या खात्यात बदली करुन मागितली. पण आर्यवर कामाचा बोजा फारच वाढल्यामुळे त्याला परत बोलाविण्यात आले. इस्माईलला टोळीप्रमुखांमधे अतिशय मान होता असे आर्य सांगे....पठाण जसा वागतो त्याच्या बरोबर विरुद्ध त्याच्या मनात चाललेले असते असे म्हणतात.... अफगाणिस्थान आता बरेच सावरले होते. काबूलमधे आता भारतीय वंशाचेही अनेक लोक दिसू लागले व शनिवार रविवार संध्याकाळी क्लबमधे भेटू लागले.... आता आई बाबांना बोलविण्यास हरकत नाही... आर्य म्हणाला....... इस्माईल बाम्झाई........ ‘ अब इसे कैसे समझाऊ ’ मी मनात म्हणालो. जरी मी अमेरिकन कॉन्स्युलेटमधे एक साधा अधिकारी होतो तरी खुद्द अँबॅसेडरची आणि माझी चांगलीच जान पेहचान होती. ते स्वत: माझ्याकडे खुर्दकाबूलच्या हवेलीत येऊन गेले होते. कितीतरी वेळा. तसा प्रत्येक बदलून येणारा वकील आमच्या घरी येऊन जातोच म्हणा. आर्यला काय माहिती की मी केव्हाही अमेरिकेच्या फॉरेन सेक्रेटरीला फोन करु शकत होतो ते ! अर्थात मला हे कोणालाही सांगायची बंदी होती, म्हणजे तसा करारच होता आमचा. अमेरिकन सि आय ए आणि आमच्यामधे. आमच्यामधे म्हणजे बाम्झाई जमात व अमेरिकेमधे. हे सगळे गुपचुप चालले होते. सिक्युरिटीलाही हे माहीत नव्हते. त्या दिवशी वलिखानच्या डोळ्यातून पाणी येताना बघून माझा पारा चढला होता पण मी स्वत:ला सावरले व वलिखानचीही समजूत काढली. उद्या आर्यला व त्याच्या पत्नीस घरी येण्याचे निमंत्रण दिलेच पाहिजे. त्या अगोदर अमेरिकन वकिलाला कल्पना द्यावी लागेल. द्यावी का ? त्या शिवाय गत्यंतर नाही. पण त्या अगोदर आर्य व त्याच्या पत्नीशी बोलावे लागेल. दुसऱ्या दिवशी मी आर्यचे घर गाठले. सिक्युरिटीचे सर्व सोपस्कार पार पाडल्यावर मला आत प्रवेश मिळाला. ‘सलाम आलेकूम !‘ मी म्हणालो माझे स्वागत करुन आर्यने मला त्याच्या दिवाणखान्यात बसते केले व तो आत गेला. मी त्या दिवाणखान्यात नजर टाकली. साधे पण किमती युरोपियन फर्निचर, भिंतीवर त्याच्या पत्नीचा व मुलाचा फोटो..मोठी गोड मुलगी होती त्याची बायको. मुलगाही एकदम गोड... तेवढ्यात ते दोघे आत आले. मी गडबडीने उठलो व त्या दोघांना सलाम केला. ‘सर मी तुम्हाला दोघांना जेवणाचे निमंत्रण देण्यास आलो आहे. घाबरायचे कारण नाही. माझ्या घरी माझे आई वडील, पत्नी व मुलेबाळे आहेत. शिवाय माझ्या घरासमोर आपलीच सिक्युरिटी आहे’ हे मात्र त्याला विचित्र वाटले पण हे सांगितल्याशिवाय तो आलाच नसता. ‘इस्माईल अरे कसे शक्य आहे ते ? तुला आपल्या इथले नियम माहीती आहेत ना ?’ ‘त्याचे मी बघतो काळजी करु नका सर !’ ‘ अरे पण हिचे आईवडीलही येणार आहेत आता’ ‘दिवाळीला ना ? मग त्यांनाही घेऊन या ! आपण दिवाळीतच कार्यक्रम आखू’’. मी दिवाळीचे नाव घेतल्यावर तो दचकल्याचा मला भास झाला. आता त्याला कसे सांगू....पण जाऊ देत ...पुढे बघू...मी मनाशी म्हटले. ‘बरं बघूया कसे जमते ते !’ आर्य म्हणाला. आमंत्रण देऊन मी त्या दोघांना खुदा हाफ़िज म्हणून बाहेर पडलो.... हा ये़ईल का ? ....हा प्रश्न मात्र मला सतावत होता...... वलिखान बाम्झाई.... त्याच्यासाठी जेवण काय आणले, सिक्युरिटीने माझा केवढा अपमान केला आणि तेही सर्वांसमोर. पठाणाला अपमान म्हणजे छाताडात खंजीर खुपसल्यासारखे आहे हे त्यांना कोण सांगणार ? इस्माईलला मी अनेक तऱ्हेने समजाऊन सांगितले की त्या आर्यचा नाद सोड ! ते होणार नाही पण त्याला काही ते पटत नाही. त्याचे आपले एकच टुमणे चालू होते ‘ अशी संधी परत येणार नाही’.... इस्माईलचे लहानपणापासून असेच आहे. एखाद्या वस्तूचा ध्यास घेतला किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की तो असाच बेचैन व्हायचा. ती मिळेपर्यंत त्याला चैन पडत नाही. ती मिळविण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. मग मीही म्हटले जाऊ देत मरुदेत ! काय व्हायचे आहे ते होईल........... क्रमशः जयंत कुलकर्णी. या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16143
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

अंमळ अंदाज आल्यासारखे उगीचच वाटत आहे...अशीच एक कथा एक मराठी व एक सौदी यांच्या फ्रेंडशिपबद्दल वाचली होती. मराठी माणूस सपत्नीक सौदीवाल्याच्या घरी गेल्यावर सौदीवाल्याने त्याची बायको ठेवून घेऊन मराठी माणसास धक्के मारून बाहेर काढले अन तो अश्रू गाळण्याशिवाय काहीच करू शकला नाही वगैरे..इथे तसे काही नसावे हीच आशा.

In reply to by बॅटमॅन

नाय नाय. त्या खाजगीवाले-भानूंच्या उल्लेखामुळे वेगळा धागा वाटतोय.

In reply to by बॅटमॅन

ब्याटकाका.तुमचा अंदाज जर बरोबर ठरला तर मात्र.. हा हन्त हन्त.. असे म्हणत का हान्तो असे म्हणायची वेळ येईल

In reply to by बॅटमॅन

ही कोणती कथा आहे?सौदी माणूस मराठी माणसाच्या बायकोला ठेवून घेऊन त्याला बाहेर काढतो? INTERESTING!

In reply to by बोका-ए-आझम

नाव विसरलो आता, पण एका दिवाळी अंकात (बहुधा मागच्याच वर्षी) वाचली होती ही कथा. मराठी व सौदी दोघे एका मुंबैतील कॉलेजातले मित्र. सौदीवाला लै श्रीमंत वगैरे. पुढे मराठी माणूस सौदीत नोक्रीला जातो, सौदी मित्राशी भेट होते. कॉलेजात सौदीवाल्याची लाईन असते तिच्यासारखीच मराठी माणसाची बायको सुंदर वगैरे. मग काय, जेवायला बोलावतो अन परत जाताना त्याला १० लाख रुपये देतो की आता तिला विसर म्हणून नायतर तुला ठार मारीन इ.इ. मग काय, मराठी माणूस हरवल्यागत परत येतो मुंबैला, कुणाचाही त्याच्यावर विश्वास बसत नाय. सगळे त्याला 'बायको अरबाला विकली' करत टोचून बोलतात, छीथू करतात. शेवटी एक जवळच्या कॉलेज मास्तराला तो ही कहाणी सांगतो. बास, इतकीच कथा. पुढे काहीच नाही.

In reply to by बॅटमॅन

माझा मेव्हणा दुबईत रहातो, त्याच्या एका मित्राच्या मित्राच्या बाबतीत घडलेली खरी गोष्ट. त्या स्त्रीचा पुढे काहीच पत्ता लागला नाही. तिचा नवरा हताश अवस्थेत भारतात परत आला आणि थोड्या महिन्यांनी त्याने आत्महत्या केली :(

In reply to by वाचक

गल्फ मधे जायलाच नको बायकोसकट...मी कुठेतरी वाचलेले की अरबांना "मुलेसुध्धा" लागतात :(

In reply to by बॅटमॅन

बहुदा कालनिर्णयच्या दिवाळी अंकात होती. मायबोलीवर त्यावर आधारित 'आधुनिक सिता' लिहित होत्या एक लेखिका. त्यातल्या पहिल्या भागात आहे वाटतं ओरिजिनल कथेची लिंक

बॅटमॅनच्या अंदाजासारखं नसावं. ती गुन्हेगारी (क्राईम थ्रिलर) कथा झाली. जयंतरावांचा जॉनर थोडासा ऐतिहासिक टाईपचा आहे.