आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १
सर्व प्रतिसाद दात्या मिपाकारांन कोटीकोटी धन्यवाद. माननीय संपादकांनी आरंभीच इशारा देऊन संभाव्य धोक्याची हवाच काढून टाकली. आपली दर्दभरी कहाणी सांगून लोकांना मानसिकरीत्या छळणे आणि काहीतरी आर्थिक मदत मिळवणे हा माझा उद्देश नव्हताच मुळात.
या लेख मालेत माझ्यावर हा प्रसंग का ओढवला, त्यात माझ्या चुका, नशिबाचा भाग ह्याची पूर्ण पार्श्वभूमी, सद्यस्थिती आणि भविष्यातली वाटचाल लिहिणार आहे. त्याचबरोबर सर्व मिपाकर मंडळींनी जो उस्फुर्त आणि भरभरून प्रतिसाद व सल्ले दिले, काही प्रश्न टाकले त्याबद्दल पण लिहिणार आहे.
असा अनुभव आहे कि ज्या गोष्टी डोक्याचा भुगा करतात त्यांचा भुगा करून विचार केल्यास प्रश्न सुटतात किंवा निदान त्या प्रश्नाची खरी औकात कळते. म्हणून वेळ काढून हे लिहायचे. जेणेकरून सर्वांनाच सगळी उत्तरे मिळतील, मला, मिपाकरांना आणि भविष्यात सारख्याच परिस्थितीत अडकू शकणाऱ्या अभागी लोकांना.
आज ज्या स्थिती मध्ये मी आहे तसा अगदी पहिल्यांदाच सापडलो. खिश्यात एक रुपया नसताना सुद्धा दिवस काढले. पण कुणाची कर्जे डोक्यावर नव्हती. त्यामुळे देणेकरी काय असतात त्यांची काय मानसिकता असते, त्यांना कसे हाताळायचे याचे काहीच अनुभव नव्हते. मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे देणेकरी मागे लागणे म्हणजे स्वाभिमानास ठेच लागणे वैगेरे विचार येत होते.
कुठेसं वाचलेले आठवते, योगायोग हा भ्रम आहे. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कार्यकारण भाव असतोच. द्रष्टे भविष्याचा अदमास भूतकाळाचे निरीक्षण आणि वर्तमानाचे भान ठेऊन करतात. दोघांचेही तारतम्य सुटले कि माणूस तोंडावर आपटतो.
लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा स्वभाव आधीपासूनच होता. जे जे पाहिजे ते ते हट्टाने कष्ट करून मिळवले. यशाचा वारू चौखूर उधळत होता. मनात तीव्र इच्छा धरली आणि ते झाले नाही असे कधीच घडले नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती म्हणजे संदीप डांगे असे समीकरण एके काळी होते.
असा स्वभाव असला कि काय होते याचा अनुभव आला. अमुक एक गोष्ट होणारच असे मनात धरले कि ती झाली नाहीतर काय हा विचार केलाच नाही. ती झाली नाहीतर काय करायचे याचा काही विचार केला नसल्याने प्रचंड गोंधळ आणि मानसिक त्रास. बायको नेहमी सांगायची जे हातात आहे त्याचा विचार करूनच नियोजन करायचे आश्वासन द्यायची. हे पैसे येतील. तिथून काम येईल ह्या बेभरवश्यच्या नियोजनाला काही अर्थ नसतो. पण तिचे कधी ऐकले नाही. कारण मागचे "अनुभव". मी तिला म्हणायचो असे जर असेल तर जगण्याला काय अर्थ आहे. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार. शेवटच्या क्षणापर्यंत आपण आयुष्य प्लान नाही करू शकत. माझे आणि तिचे सगळेच बरोबर नसले तरी काही गोष्टी शाश्वत असतात.
साधारण गेल्या ४ वर्षापासून परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. पहिला मुलगा झाला तेव्हापासून मी फार हळवा आणि सेफगेम खेळणारा झालो. मुलाची जबाबदारी अंगावर पडल्यावर फारच घाबरट झालो असे म्हटल्यास हरकत नाही. प्रत्येक ठिकाणी मी माझ्या तत्वांना कठोरपणे पाळणारा जर मवाळ झालो. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली. कुणास ठाऊक कसा पण स्वतावरचा विश्वास फारच कमी झाला.
त्यातच मुलगा ५ महिन्याचा असताना अंगावर गरम दुध सांडून ५०% भाजला. त्याचे शरीर भाजले आणि आमच्या दोघांची मने. तिथूनच आमच्या विचित्र मानसिकतेची सुरुवात झाली. सोन्यासारखा संसार कायम राहू शकत नाही. आपल्या हातात काहीच नाही. सगळे सुरळीत आणि छान छान असताना अचानक वाईट घडू शकत. आमचा संसार दृष्ट लागण्यासार्खाच आहे. त्यामुळे आपल्या सोबत काही चांगले होईल तर त्याचीच भीती वाटू लागली. कारण त्या चांगल्याला कुणाची तरी नजर हमखास लागतेच लागते असा वाईट अनुभव.
भन्नाट आत्मविश्वास ते शुन्य आत्मविश्वास असा प्रवास फार झपाट्याने झाला. तोच मुलाखतींमधून दिसू लागला. त्यामुळे लायकी मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराच्या संधी असूनही आपण हे करू शकणार नाही असा न्यूनगंड आला. तो बराच काळ होता.
म्हणून एक कमी महत्वाची कमी पगाराची नोकरी दोन वर्ष केली. पण तिथेही सारखा पगार उशिरा म्हणजे २ महिने उशिरा व्हायला लागला. त्यादरम्यान बर्याच उलथापालथी झाल्या. नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण न्यूनगंड आडवा येत होता.
असाच मुलाला खेळताना बघत होतो. त्याच्या भाजण्याच्या अपघातातून फार लौकर त्याने बरे होण्याची किमया साधली. तो पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. दिवसभर त्याचे तेच पडणे, उठणे परत पडणे, उठणे सुरु असायचे. शंभरदा पडला तरी बेट्या स्वताच्या पायावर उभे राहायचेच हि जिद्द काही सोडत नव्हता. त्याला बघून अचानक पेटलो. म्हटले यार हा केवढासा आहे तरी अथक प्रयत्न करत आहे. आपल्याला काय धाड भरली आहे म्हणून ह्या कंपनीच्या तुकड्यांवर जगायचे तेही फडतूस पगाराची वाट बघत.
सरळ राजीनामा दिला. त्या आधी एक २ लाखाचे लोन घेतले. पुढच्या ९ महिन्याचा खर्च भागवाण्यासाठी ते पुरेसे होते. माझ्या कामाच्या दर्जावर खुश असणाऱ्या लोकांना भेटलो, त्यांना काम देण्यासाठी, ओळखी देण्यासाठी सांगितले. साधारण नोकरी सोडल्याच्या ३ महिन्याने पहिले काम मिळाले. नंतर कामाचा ओघ लागला आणि पगाराच्या दुप्पट कमाई सुरु झाली तेही नोकरीच्या अर्ध्या वेळेमध्ये.
पण त्या आधी तीन फटके बसलेच. नोकरी सोडल्यावर दुसर्याच महिन्यात बायकोची एक आणि मुलाची एक अश्या दोन शस्त्रक्रिया यात बराच खर्च झाला. त्याच्या दुसर्या महिन्यात गाडीचा एक क्षुल्लक अपघात होऊन त्यात ४० हजार खर्च झाले.
जी गंगाजळी ९ महिन्यासाठी प्लान केली होती ती ३ महिन्यात साफ झाली. नशिबाने पुढे साथ दिली आणि कामाचा ओघ सुरु झाला. एप्रिल २०१२ ते एप्रिल २०१३ फारच मजेत गेले. परत दिवस फिरले. मे, जून जुलै ऑगस्ट अक्षरश: कोरडे गेले. घरखर्च निघत नव्हता. नाशिक त्यामनाने फार स्वस्त होते. म्हणून नाशिक ला शिफ्ट झालो. माझे सर्व ग्राहक मुंबईत असल्याने व सगळा कारभार इंटरनेट वरून चालत असल्याने त्यांना मी कुठे राहतो याने काही फरक पडत नव्हता. नाशिक मध्ये व्यवसाय वाढवणे हा उद्देश नव्हता कारण नाशिककराना माझे चार्जेस डोक्यावरून जातात. अश्या रीतीने खर्च कमी करून कमाई वाढवण्याचा निर्णय घेतला.
तेंव्हा एका ग्राहकाने पार्टनरशिप चा प्रस्ताव ठेवला. त्याचे पैसे आणि माझी मेहनत व ज्ञान असा तो एकंदर मामला होता. नाशिकची होतकरू आणि हुशार मुले ठेऊन मुंबईची कामे करायची असा एक विचार यामागे होता. सुमारे १० ते १५ लाख गुंतवणूक होती. सर्व तयारी चालू होती. एक चांगले ऑफिस बघून मुलाखती सुरु केल्या. पार्टनर एक मोठा बिल्डर होता. त्याने त्याची काही माणसे ह्या सगळ्यावर देखरेख व संयोजना साठी दिली. ईथेच घात झाला. हि माणसे मला नोकरासारखी वागवण्याचा प्रयत्न करत होती. माझा आणि पार्टनर चा संपर्क होऊ दिला जात नव्हता. मी पण मालक असल्याने ह्या लोकांच्या फाट्यावर मारत होतो. त्या लोकांनी माझ्याविरुध्द भडकावणे सुरु केले. ऑफिस सुरु करण्यासाठीचा पैसा त्यांच्याकडून आलाच नाही. त्यांच्या भरवश्यावर मी इकडे नेमणूक प्रमाणपत्र दिलेली. सर्वोच्च मूर्खपणा म्हणजे ह्या पार्टनरशिप ची कुठेही लेखी नोंद नव्हती. कुठलाही करार नव्हता. ऑफिस सुरु करण्याचा घाई मध्ये हे काय नंतर होतच राहील असा विचार नडला. ऑफिस रेंट साठी मालकाचा तगादा सुरु झाला. त्याला माझा भरवसा येत नव्हता. कारण आम्ही फक्त टोकन देऊन ताबा घेतला होता.
मी आणि बायकोने ऑफिस सोडायचा निर्णय जवळ जवळ घेतला होता. माझ्या स्वताच्या कामात आमचे नीट चालले होते. पार्टनरशिप सुरु व्हायच्या आत संपली.
एकेदिवशी वडील ऑफिस बघायला आले. तोपर्यंत मी त्यांना कहीही सांगितले नवते. कारण मी करतो त्या प्रत्येक त्यांचा मनोमन विरोध असतो. तो एक वेगळाच विषय आहे. पण ऑफिस बघून त्यांना आनंद झाला. ते पार्टनरशिप करण्याबद्दल रागावले. म्हणाले मी तुला पैसे देतो. बुडाले तरी हरकत नाही. (हा आशीर्वाद असल्यावर धंदा चालेल तर काय बिशाद) त्यांची तयारी ६ लाख देण्याची होती. मी म्हटले सुरुवात करायला मला एवढेच लागणार आहेत. स्वताची काहीही बचत नव्हती. माझ्या प्लानिंग नुसार मला सुरुवात करायला फक्त रक्कम लागणार होती. उपलब्ध काम आणि ग्राहक यानुसार योग्य तो परतावा मिळायला काहीच त्रास नव्हता.
वडिलांनी २ लाख दिले. त्याचे कॉम्पुटर घेतले आणि पहिले भाडे दिले. महिन्याचा खर्च (त्यात घरखर्च) सगळे धरून १ लाख होता. उपलब्ध स्र्तोतानुसार हा खर्च व्यवस्थित निघत होता.
आता शब्द बदलायची बाबांची वेळ होती. त्यांनी पुढचे पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. वरून माझीच खरडपट्टी काढायला लागले. तू मला न विचारता ऑफिस का सुरु केले. ऐपत नव्हती तर कशाला एवढा डोलारा उभा करायचा. या वयात तू आम्हाला पैसे द्यायचे तर आम्हालाच अजून मागतो आहेस, तू घरीच बैस मी तुला पोसतो, वगेरे वैगेरे. हा माझ्यासाठी परत एक मोठा धक्का होता. कबूल केलेला पैसा तर नाहीच वरून अनपेक्षित टोमणे. पुढच्या ६ महिन्याचा खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न यामुळे उभा राहिला.
नशिबाने परत एकदा चांगली साथ दिली. नोव्हेंबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत खर्च भागेल एवढी कमाई होत होती.
ज्यामुळे आजचा दिवस आला त्या घटना मार्च ते जुलै या ५ महिन्यात घडल्या.
एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते. १० लेबल चे ग्राफिक आणि प्रिंटींग चे काम होते प्रिंटींग चे काम मोठ्या प्रमाणात होते. त्यातून येणार फायदा भरपूर होता. म्हणजे ग्राफिक चे काम एकदा झाले कि दर महिन्याला प्रिंटींग वर कमिशन मिळणार होते. पण ते लोक फारच विचित्र निघाले. १० लेबल साठी २ महिने पूर्ण गेले. या काळात दुसरे काही काम करू शकलो नाही कारण ते लोक सकाळ पासून रात्री पर्यंत बसून राहायचे. माझ्या नेहमीच्या कार्यपद्धती पेक्षा वेगळाच घडत होते. आणि भविष्यात मिळणाऱ्या रग्गड कमाई साठी हि गुंतवणूकच आहे असे समजत गेलो. पण त्यांचे अंतर्गत काहीतरी बिनसले आणि सुमारे १० लाख अपेक्षित असलेला हा ग्राहक स्वताच कोलमडला. त्यांची कंपनी बंद पडली. केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते.
आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या वेळेत तुमचे इम्प्लोयी काय करत होते तर ती हि एक गम्मत आहे.
खेदाने असे म्हणावे लागेल, धंदा बुडायला चांगले डिझायनर न मिळणे हे एक मोठे कारण आहे.
मी ६ महिन्यात ६ डिझायनर बदलले. अपेक्षेप्रमाणे कुणीच भेटले नाही. पण पगार सगळ्यांनी मात्र वाजवून घेतला. नोकरदारांच्या बाबतीत असे म्हणावसे वाटते कि हे लोक फक्त पगाराच्या तारखे कडे बघून दिवस ढकलायचे. उत्पादकता, कामाविषयी निष्ठा, बहुतेकवेळा त्यांनी दिवसभर केलेली कामे बघून मला चीड यायची, तीच कामे मला रात्री बसून पूर्ण करावी लागत. माझ्या ग्राहकांना माझ्या दर्जाची सवय झालेली. यांना कितीही समजावले तरी काही फरक पडत नव्हता.
मार्च मध्ये आलेले ब्रेक इवन परत लयाला गेले. शेवटी मी ऑफिस बंद करायचे ठरवले. जून मध्ये ऑफिस बंद केले.
बायको गर्भवती होती. तिला ६ व्या महिन्यात placenta previa हा प्रोब्लेम झाला. डॉक्टर ने कधीही काहीही होऊ शकते असे सांगितले. म्हणजे रक्तस्त्राव सुरु झाल्यास दवाखान्यात जायला पण मिळणार नाही अशी परिस्थिती होती. टायमबॉम्ब ची टिकटिक सुरु झाली. आठवा संपे पर्यंत कसे तरी वेळ काढा, बेडरेस्ट घ्या असे सांगितले. बाळाचे वजन २ किलो झाल्याशिवाय काढता येणार नाही असे सांगितले. तश्यातच नाळ त्याच्या गळ्याभोवती लपेटलेली. पण वजनामुळे काढू शकत नव्हते.
आठवा महिना लागला आणि नियोजित सोनोग्राफी मध्ये असे लक्षात आले कि वार फाटली आहे. जेव्हा reports डॉक्टरांना दाखवले त्यांनी ताबडतोब superspeciality हॉस्पिटलमध्ये भरती व्हायला सांगितले. कारण परिस्थिती हातघाईची होती. काहीही होण्याची शक्यता होती. बाळाचे योग्य वजन हीच एक जमेची बाजू होती. डॉक्टर फक्त बाळाच्या जन्माकडेच लक्ष देतात असे माझे निरीक्षण आहे. खरेखोटे काही वेगळे असू शकते.
हॉस्पिटल आणि इतर घरखर्च अडीच लाख पर्यंत गेला. हातात फक्त एका नातेवाईकाचे अडीच लाख होते, तेही नशिबाने त्या वेळेस होते. जे मला त्यांना जून मधेच परत करायचे होते. पण त्यातून हॉस्पिटल बिल दिले.
बाळाचा जन्म सुखरूप झाला आणि या सर्व काळात मी काम करू शकलो नव्हतो. त्याकाळात ज्या ग्राहकाचे काम अश्या कठीण प्रसंगी रात्र दिवस एक करून केले त्याने पद्धतशीर टांग दिली. इतरही छोट्या मोठ्या ग्राहकांचे पैसे अडकले, नियोजित कामे पुढे गेली, अश्या पद्धतीने सगळे गळ्याशी आले. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट ह्या महिन्यात खात्रीने यायचे ५ लाख आलेच नाहीत. हेच पाच लाख फार महागात पडत आहेत.
ज्या दोघांचे मिळून साडेचार लाख द्यायचे आहेत, त्यांची हालत खरच खराब झाली आहे, म्हणून ते प्रचंड मागे लागले माझ्यावर विश्वास वैगेरे ह्या गोष्टींसाठी त्यांना खरोखरच वेळ नाही हे मला स्वताला माहिती आहे. मी जर हे पैसे दिले नाहीत तर त्यांच्यावर जीव द्यायची पाळी येईल हे मला त्यांनी न सांगता माहिती आहे. त्यामुळेच ते जीव खाउन मागे लागले आहेत.
एकूणच चक्र असे फसले आहे. हि परिस्थिती भयानक आहे. दोघांपैकी एकानेही मला आयुष्यभर विचारले नसते हेही मला माहिती आहे. कारण मी बुडवणार नाही याची त्यांना हि खात्री आहे. पण त्यांना जेंव्हा गरज आहे तेंव्हा त्यांनी कुठे जावे हा प्रश्न माझा जीव खातो आहे आणि त्यांचाही.
माझ्या अक्षम्य चुका. (स्वताचे दोष शोधणे आणि मान्य करणे आवश्यक आहे.)
१. कागदपत्रे बनवण्याचा प्रचंड कंटाळा.
२. लग्न होऊन ५ वर्षे झाली तरी अजून लग्नाचे प्रमाणपत्र बनवले नाही
३. ल. प्र. नाही म्हणून कुटुंबाचा वैद्यकीय विमा नाही
४. माझा विमा आहे पण मला काही धाड भरली नाही
५. मागील ३ वर्षात घरात ४ मोठी operations झाली
६. शुन्य आर्थिक नियोजन
७. सगळ्यांवर प्रामाणिकपणे विश्वास ठेवणे
एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असताना माझा बॉस मला बोलला होता "तुझा पगार १ हजार जरी असेल तरी ITR बनवणे आवश्यक आहे" तू असा बेफिकीर राहू नको.
आज त्याची किमत कळली. कारण ITR असते तर २५ लाखांचे बिझनेस लोन विनातारण ७ वर्षासाठी मिळाले असते. हे सगळे त्रास नसते झाले. असो. जर तर ला काही अर्थ नसतो.
सद्यस्थिती काय आहे आणि मी काय ठरवले आहे हे पुढील भागात सांगतो.
Book traversal links for आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म
अंगावर काटा आला
तुमच्या त्या धाग्यावर मी काही
संदीप, आत्महत्त्येचा विचार सोडलास यातच तू जिंकलास!
३. लग्नाचे प्रमाणपत्र नाही
ह्यात काही सांगू शकाल का?
भाऊ जॉईंट विमा पॉलीसी (हजबंड
नाशिककर नोकरदारांना मी कुठेही जनरलाइज केलेलं नाही.
संदीपभाऊ तुम्हाला तुमच्या
प्रांजळ आत्मकथन
पैसाताई, धन्यवाद!
माझे अनुभव.
प्रतिसाद प्रचंड आवडला.
+१
+२
परिस्थिती चे सर्वच कंगोरे इथे मांडणे शक्य नाही.
नशिब आणि कर्तृत्त्व, यशासाठी दोन्हींचा समन्वय आवश्यक.
कुठे गल्लत होत असेल तर जरूर सांगा. तुमचा हक्क आहे.
कांही स्पष्टीकरणे....
धन्यवाद काका,
वरच्या इतका उत्तम व्यवहारी
अतिशय उत्तम, अनुभवातून आलेला
ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल
अप्रतिम...तुम्हाला भेटायचा
नकारात्मक घटनेचा आधी विचार
प्रभाकर पेठकर सर
पेठकरकाकांशी सहमत. बाकी
लेख आणि प्रतिसाद , दोन्ही मस्त....
पेठकर काकांशी सहमत.
खूपच महत्त्वाचे आणि अनुभवी
व्यावसायिक चिकीत्सा
सहमत.
अश्याच मुलभूत आणि नेमक्या सल्ल्याची अपेक्षा होती
सेवा उद्योगाचं मर्म
अगदी ...अगदी.
हे लिहून काढत आहात हे अतिशय
औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा
डॉ. गोल्डरॅट म्हणतो की बर्
घटनेचे गांभीर्य त्यातले बारीकसारीक तपशील कळले कि कमी होतेच.
सहमत.
हे सगळं