✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सत्याचा जय...

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
गुरुवार, 09/04/2014 - 15:44  ·  लेख
लेख
पूर्वपिठिका: नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले... शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच. पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद ! ============================================ "नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो."; "गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते."; "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे... अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्‍या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते. सर्वात वाईट गोष्ट ही की बर्‍याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते). जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे." म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल: १. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा. याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे. सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता. २. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो. सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते. पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील. ३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत. वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही. ४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे. जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते. वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील. या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्‍याचा डबा दाखवणे आवश्यक आहे... कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
55448 वाचन

💬 प्रतिसाद (218)

प्रतिक्रिया

उत्तम.

विटेकर
गुरुवार, 09/04/2014 - 15:53 नवीन
लेखातील वाक्या- वाक्याशी तीव्र असहमत ! तूर्तास इतकेच ! मी पैला हे लिहायचे राहीलेच !
  • Log in or register to post comments

हजारो वर्षांची गुलामगिरीची

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/04/2014 - 16:09 नवीन
हजारो वर्षांची गुलामगिरीची प्रथा आणि शेकडो वर्षांचा वसाहतवाद या दोन गोष्टी "सत्याचा असत्यावर विजय" होता काय हे सांगा, मग पुढे बोलू... अन्यथा डोळे गच्च मिटून राहणे हा लोकशाही हक्क तुम्हाला आहे, हे आम्हाला मान्य आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

लेख खुप आवडला.

एसमाळी
गुरुवार, 09/04/2014 - 16:06 नवीन
लेख खुप आवडला. वाक्यावाक्याशी सहमत. बाकी माझे अत्यंत नावडता quote देतो. "There is crime,behind every fortune" साला मेहनत करुन आणी व्यवहारी राहुन ही मोठ्ठ होता येते.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.विटुकाकाशी पुन्हा

जेपी
गुरुवार, 09/04/2014 - 16:12 नवीन
लेख आवडला.विटुकाकाशी पुन्हा असहमत.
  • Log in or register to post comments

सहमत

योगी९००
Sat, 09/06/2014 - 12:02 नवीन
लेख आवडला. विटेकरांच्या लेखाच्या प्रत्येक वाक्याच्या असहमतीच्या जेपींच्या असहमतीला मी सहमत...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

विटेकरांचा लेख नसतांना त्यांच्याशी असहमती व्यक्त करणार्‍या

संजय क्षीरसागर
Sat, 09/06/2014 - 12:23 नवीन
योगी (९००) आणि जेपी (१) यांच्याशी, ९०३ वेळा असहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

लेख विटेकरांचा नाही हे कळतेय हो...

योगी९००
Sat, 09/06/2014 - 13:22 नवीन
लेख विटेकरांचा नाही हे कळतेय हो...मलाही मिपावर ५ पेक्षा जास्त वर्षे झालीत.. या लेखाच्या विटेकरांच्या वाक्या- वाक्याशी तीव्र असहमतीच्या जेपी यांच्या असहमतीशी माझी सहमती...असे म्हणायचे आहे मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आवडलं लिहिलेलं. आणि पटलंही

अनुप ढेरे
गुरुवार, 09/04/2014 - 16:15 नवीन
आवडलं लिहिलेलं. आणि पटलंही
  • Log in or register to post comments

'ठेविले अनंते तैसेची रहावे..

स्वप्नांची राणी
गुरुवार, 09/04/2014 - 17:19 नवीन
'ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असो द्यावे समाधान' एकदा ही हतबलता स्विकारली की मग 'भला उसका यश/पैसा/किर्ती मेरे यश/पैसा/किर्ती से ज्यादा कैसे' याचे स्वतःला कुरवाळणारे भंपक कारण शोधावेच लागते..त्यातूनच जन्मतो हा 'लुळी पांगळी.. आणि 'लबाडी केल्याशिवाय.. ई.ई. भोंदूपणा.
  • Log in or register to post comments

+ असंख्य

बाळ सप्रे
गुरुवार, 09/04/2014 - 17:33 नवीन
+ असंख्य असत्याला confront केल्याशिवाय त्याच्याशी संघर्ष केल्याशिवाय सत्याला यश मिळू शकत नाही..
  • Log in or register to post comments

एकूण लेखाशी अतिशय अतिशय सहमत.

बॅटमॅन
गुरुवार, 09/04/2014 - 17:35 नवीन
एकूण लेखाशी अतिशय अतिशय सहमत.... विटेकरांशी असहमत. हे असेच चालायचे, सबब स्वतः घट्ट असणे हीच प्राथमिकता असावी.
  • Log in or register to post comments

ह्या वाक्यांमधले तुलनात्मक

प्यारे१
गुरुवार, 09/04/2014 - 18:10 नवीन
ह्या वाक्यांमधले तुलनात्मक अनावश्यक भाग काढून टाकल्यास स्वयंसूचना वाली छान वाक्यं बनतील. अमुक शिवाय तमुक नाही वगैरे का असतं? मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन पुरेसं नाही?
  • Log in or register to post comments

.

पोटे
गुरुवार, 09/04/2014 - 18:55 नवीन
अजुन काही लबाड वाक्ये. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. हिंदु धर्म हा त्यागवादी आह्हे व इतर सर्व भोगवादी आहेत. बुडाला औरंग्या पापी.
  • Log in or register to post comments

बुडाला औरंग्या पापी हे वाक्य

बॅटमॅन
गुरुवार, 09/04/2014 - 18:56 नवीन
बुडाला औरंग्या पापी हे वाक्य अतिसुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे

काय पोटेसाहेब, प्रत्येक

प्रचेतस
गुरुवार, 09/04/2014 - 20:51 नवीन
काय पोटेसाहेब, प्रत्येक ठिकाणी सिग्रेडीपणा दाखवायलाच हवा असे काही की काय आँ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे

सिग्रेडी? वाय्झेड्ग्रेडी

प्यारे१
गुरुवार, 09/04/2014 - 21:02 नवीन
सिग्रेडी? वाय्झेड्ग्रेडी म्हणायला हवं खरंतर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

दशानन
गुरुवार, 09/04/2014 - 23:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अमुक शिवाय तमुक नाही वगैरे का

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/04/2014 - 19:25 नवीन
अमुक शिवाय तमुक नाही वगैरे का असतं? मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन पुरेसं नाही? याची उत्तरे "आस्तिक-नास्तिक..." लेखाच्या पुढच्या भागात येतील, (जर्रा वेळ मिळू द्या). आतासाठी फक्त दोनच विधाने: १. माणूस समाजातले "बेट" (मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन) म्हणण्याइतका वेगळा राहू शकणार नाही... संन्यास घेऊन जंगलात गेला तरी आजच्या काळात ते शक्य नाही. व्यक्ती व समाज यांची क्रिया-प्रतिक्रिया अनिवार्य आहे. २. एडवर्ड मरो म्हणून गेलाय : "क्लिष्ट गोष्टींची समज आपल्याला काही काळाने येईलच. पण समोर असलेल्या उघडउघड गोष्टीच्या उकलीला त्यापेक्षा जास्त वेळ लागतो असेच दिसते (The obscure we see eventually. The completely obvious, it seems, takes longer)."
  • Log in or register to post comments

"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी"

यसवायजी
गुरुवार, 09/04/2014 - 20:06 नवीन
लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. यासाठी +१ पण, "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" याचा शिंपल अर्थ असा घेतला तर? की, श्रीमंतीमागे धावताना लुळेपांगळे व्हायची वेळ येणार असेल तर त्यापेक्षा धडधाकट गरिबी परवडली.
  • Log in or register to post comments

साक्षेपी वर्तन ठेवावे.

एस
गुरुवार, 09/04/2014 - 20:25 नवीन
"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" याचा अन्वयार्थ असा आहे की श्रीमंत होण्याच्या नादात आपले मूल्यसंस्कार विसरू नयेत. एवढंच. शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही. तसेच श्रीमंत होणे वाईट असते, पाप असते असेही मानू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

त्या वाक्प्रचाराचा अर्थ

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/04/2014 - 20:36 नवीन
त्या वाक्प्रचाराचा अर्थ सर्वसाधारणपणे तुम्ही म्हणता तसा घेतला जात नाही. असा ओढून ताणून अर्थ काढण्यापेक्षा "श्रीमंती वाईट नाही, पण तिच्या मागे धावताना सारासारविवेक बाळगा." असे म्हणायला हरकत नाही... आणि या सारासारविवेकात स्वतःची पात्रता आणि अपेक्षा यांचे प्रामाणिक गुणोत्तर ठेवले तर मग भ्रमनिरास आणि त्यावरची भ्रामक मलमपट्टी करायची गरज नाही. मुख्य म्हणजे श्रीमंती लुळीपांगळी असते किंवा तिच्याकरता कष्ट करण्याने माणूस लुळापांगळा होतो, या स्वतेजभंग करणार्‍या आणि गरिबीला भ्रामक उच्चासनावर बसवण्याच्या आत्मघातकी प्रवृत्तीला माझा विरोध आहे. ज्या समाजाच्या मनात उच्च स्वप्ने नाहीत आणि त्यासाठी कष्ट करायची तयारी नाही त्या समाजाचे केवळ वर्तमानच नव्हे तर भविष्य सुमार राहिले तर आश्चर्य कसले ? मुख्य म्हणजे हा उतारावरचा प्रवास इथेच थांबत नाही... स्वतःबद्दल असा कमीपणा (low self-esteem) वाटणारे समाज दुसर्‍या वरचढ समाजांचे गुलाम होतात हा इतिहास आहे... कारण सत्याचा/चांगल्याचा आपोआप विजय होण्याची कमीतकमी नगण्य शक्यता तरी असते पण तेजोहीन समाज मात्र हमखास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुलाम बनतो. याला इतिहास आणि वर्तमान साक्षी आहेत, फक्त डोळे उघडून पहायची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

यसवायजी. खरेतर मराठी तील हे

विजुभाऊ
Sat, 09/06/2014 - 16:08 नवीन
यसवायजी. खरेतर मराठी तील हे सर्वाक भयानक आणि सर्वांगाने विकासाला मारक वाक्य आहे. या वाक्यावर पुलं नी एकदा लिहुन ठेवलय की श्रीमंती इताके धट्टकट्टे जगात काही नाही हे समजेपर्यन्त लोक गरीबीने लुळेपांगळे होऊन गेलेले असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हो. पैशाचं महत्व मी तरी

यसवायजी
Sun, 09/07/2014 - 01:32 नवीन
हो. पैशाचं महत्व मी तरी नाकारत नाहीच. पण मला वाटतं की, कुठल्याही म्हणी,वाक्प्रचाराचा अर्थ ती/तो वापरल्या जाण्याच्या 'टाइमिंग'वर ठरवावा. जसे की 'आराम हराम है' याचा अर्थ शब्दशः "आजारी असताना देखील आराम करु नये" असा नाही. सर सलामत तो पगडी पचास, Health is wealth, यातून सुद्धा एवढंच अपेक्षीत आहे की, एखाद्या गोष्टीमागे धावताना आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर त्यापेक्षा ती तसली श्रीमंतीच नको. पैशामागे जिव तोडून धावताना धाप लागली तरी थांबायला वेळ नाही, आणी एक दिवस कोसळलो तर पाणी पाजायला आपली माणसं नाहीत अशी वेळ न येवो. बस्स.. बाकी सगळ्या शिर्‍या-उपमा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

क्लास !!!

धन्या
गुरुवार, 09/04/2014 - 20:51 नवीन
क्लास !!! पैशाच्या संदर्भातीलः
तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही.
यचा दाहक अनुभव घेतला आहे, घेतोय. अजून एक असंच टुकार वाक्यः जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
  • Log in or register to post comments

आरोग्याचे महत्त्व.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/04/2014 - 20:52 नवीन
>>>>"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" ह्यात पैशापेक्षा आरोग्य महत्त्वाचे हा संदेश दिला आहे. गरीबच राहा किंवा श्रीमंत होऊ नका असा संदेश नाहिये. आरोग्याला योग्य तितके महत्व देऊन श्रीमंती आली तर त्याला आक्षेप नाही. पण, श्रीमंतीच्या मागे धावताना, शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल आणि कांही व्याधी कायमस्वरूपी मागे लागल्या तर आलेल्या श्रीमंतीचा उपयोग काय? असा साधा सरळ अर्थ आहे. गरीबी म्हण़जेच 'धडधाकटपणा' आणि श्रीमंती म्हणजे 'लुळेपांगळेपणा' असा शब्दशः अर्थ घेऊ नये. लहानपणी शाळेत शिकताना "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" ह्या संदेशातून आयुष्यातील मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे महत्व अधोरेखित केले आहे.
  • Log in or register to post comments

याबद्दल माझे मत मी वरच्या एका

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 09/05/2014 - 00:26 नवीन
याबद्दल माझे मत मी वरच्या एका प्रतिसादात जरा विस्ताराने दिले आहे, त्यात मला काय म्हणायचे आहे ते जास्त स्पष्ट होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

थिअरेटिकली हे पटतय की, अपयश

कवितानागेश
गुरुवार, 09/04/2014 - 21:31 नवीन
थिअरेटिकली हे पटतय की, अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला हवा.... पण त्यावरचं एक आर्ग्युमेन्ट असंही असतं, की एकाचवेळेस "सगळेच" यशस्वी कसे होतील? काहीजण अपयशी होणारच. मग त्यांनी मनाची समजूत कशी घालायाची?
  • Log in or register to post comments

खरंतर यात काहीच थिअरेटिकल

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/04/2014 - 22:04 नवीन
खरंतर यात काहीच थिअरेटिकल नाही. सगळंच प्रॅक्टीकल आहे. वस्तूस्थिती साधारण अशी असते: * सगळेच जण एकाच वेळी एकाच स्पर्धेत नसतात * एक संधी एका वेळी अनेकांना (उदा. नोकरी, व्यवसाय, इ) उपलब्ध असते आणि त्यांत अनेक जण यशस्वी होउ शकतात. * सगळे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतील असे नाही, पण भविष्यात त्याच / इतर प्रकारच्या अनेक प्रकारच्या संधींच्या अनेक फेर्‍या उपलब्ध असतात * महत्वाकांक्षी व्यक्ती स्वतःच्या संधी स्वतः निर्माण करतात... अश्या प्रकारचा (आउट ऑफ बॉक्स) विचार करणार्‍या माणसांची परंपरा असलेले देश इतर देशांना कोसांनी मागे टाकतात. अश्या देशांचे आपण कौतूक करतो, त्याबरोबरच त्यांचे अनुकरण करणे जास्त फायद्याचे आहे, नाही का? * आणि शेवटी अजून एक निर्दयी सत्य, ज्याला सर्वांनाच सामोरे जावे लागते... जीवनाच्या शर्यतीत काही मोहरे अयशस्वी होणारच... असे कोण म्हणाले की जगातले सर्वच "गुडिगुडी" आहे ? जग त्याच्या नियमाप्रमाणॅच चालणार, प्रत्येकाला आपल्या प्रयत्नाने आपले जगातले स्थान बनवायचे असले. अगदी प्रामाणिक आस्तिकही मान्य करतात की, "स्वतःला मदत करणार्‍यालाच देव मदत करतो (God help them who help themselves) ! ... इ. इ. इ. सतत प्रयत्नांच्या अभावामुळे अयशस्वी होणे हे नाकर्तेपणाचे आणि अक्षम्य आहे असे मला वाटते. जरा टोकाची पण सर्वमान्य उदाहरणेच द्यायची तर असा इतिहास सांगता येईल की "मायक्रोसॉफ्ट" हा बिल गेटचा पहिला प्रयत्न नव्हता... ना "रिलायन्स" धिरुभाई अंबानीचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

God helps them who help

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/04/2014 - 22:08 नवीन
God helps them who help themselves
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अपयशाचे कारन प्रत्येकवेळेस

कवितानागेश
गुरुवार, 09/04/2014 - 22:53 नवीन
अपयशाचे कारन प्रत्येकवेळेस प्रयत्न कमी पडणं हेच नसतं. म्हणजे प्रयत्न करु नयेत, असं मला म्हणायचं नाहीये. (खरं तर मला काहीच म्हणाय्चं नाहीये! :) ) पण प्रत्येकानी महत्त्वाकांक्षीच असायला हवं असं मात्र मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

महत्वाकांक्षी असावे की नसावे

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 09/05/2014 - 00:42 नवीन
महत्वाकांक्षी असावे की नसावे हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे... अगदी हक्क आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे येथे तो मुद्दाच नाही. "मला फारशी महत्वाकांक्षा नाही, मला फार मोठे काही करण्यात रस नाही" असे म्हणणार्‍या आणि कमी / नसलेल्या यशाला झाकण्यासाठी भ्रामक वचनांचा आधार न घेणार्‍या प्रामाणिक लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्याविरुद्ध, अपयश अथवा अपेक्षेपेक्षा कमी यशाला झाकण्यासाठी भ्रामक कारणसंहिता वापरणे म्हणजे केवळ दुसर्‍यांचीच नाही तर स्वतःची दिशाभूल करणारा खोटेपणा आहे... आणि तो त्या व्यक्तीकरता आणि समाजाकरता घातक ठरतो. हा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सहसा 'यश' ही गोष्ट भौतिक

कवितानागेश
Fri, 09/05/2014 - 07:28 नवीन
सहसा 'यश' ही गोष्ट भौतिक परिमाणांमध्ये मोजली जाते आणि त्यासाठी 'महत्त्वाकाम्क्षा' असणं आवश्यक आहे असंही बिम्बवलं जातं. त्यात बरेच लोक विनाकारण स्पर्धा निर्माण होउन भरडले जातात. जर का 'यश', हे स्वतःचीच 'संपूर्ण' कौशल्य वापरण्यावर मोजलं गेलं, आणि त्यातून मिळणार्‍या आनंदाप्रमाणे मोजलं गेलं, तर तुम्ही लिहिताय ते सगळं पटतंय.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१ आणि +२

एस
Fri, 09/05/2014 - 12:00 नवीन
वरील दोन्ही प्रतिसाद चिंतनीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

केवळ सहमतच नाही तर हा मुद्दा

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/06/2014 - 01:07 नवीन
केवळ सहमतच नाही तर हा मुद्दा फार मह्त्वाचा आहे आणि म्हणूनच तो लेखातील विधान ४ च्या विश्लेष्णात खालीलप्रमाणे आला आहे... मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

@मात्र ऐहीक सुख समाधानकारक

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/04/2014 - 21:33 नवीन
@मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते>>>> __/\__
  • Log in or register to post comments

मस्त लेख....

मुक्त विहारि
गुरुवार, 09/04/2014 - 21:45 नवीन
आवडला...
  • Log in or register to post comments

मला ते फळ्यावर लिहिलेले

सुहास..
गुरुवार, 09/04/2014 - 22:12 नवीन
मला ते फळ्यावर लिहिलेले सुविचार घंटा कधी आवडलेले नाही .... एक मात्र होत ...if it is very clean, means it was dirty somewhere ! असो .... अजुन एक ... ते काही चांगदेव पाटील टाईप लोक्स, जी टॉक ला स्टेटस टाकायचे , " दुचाकीची मळवटलेली मागची सीट म्हणजे स्वच्छ चारित्र्याच लक्षण " ...आम्ही च्यायला पुसुन ठेवायचो ;)
  • Log in or register to post comments

दुचाकीची मळवटलेली मागची सीट

बॅटमॅन
Fri, 09/05/2014 - 12:41 नवीन
दुचाकीची मळवटलेली मागची सीट म्हणजे स्वच्छ चारित्र्याच लक्षण "
अरारा =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मस्त लेख. अनेक प्रस्थापित

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/04/2014 - 22:27 नवीन
मस्त लेख. अनेक प्रस्थापित सत्यं म्हणून वावरणारी विधानं गैरसमजातून आलेली असतात. अगदी मोजक्या, विशिष्ट परिस्थितीत ती लागू होतात. मात्र त्यांना मान सर्वसाधारण सत्याचा मिळतो. 'धट्टीकट्टी गरीबी' इतका गैरसमज तर दुसरा कुठचाच नाही. गरीब देशांत बालमृत्यूंचा दर श्रीमंत देशांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतो. हे धट्टेकट्टेपणाचं नाही, तर हलाखीचं लक्षण आहे. 'मागच्या जन्मीचं फळ म्हणायचं झालं...' हे असंच हतबलता व्यक्त करणारं वाक्य.
  • Log in or register to post comments

माझी हि एक वीट

सुबोध खरे
गुरुवार, 09/04/2014 - 22:39 नवीन
माझी हि एक वीट शेवटी न्याय नीती वगैरे हा आपल्या कल्पनेचा आणि संस्काराचा भाग असतो. पण प्रयत्नवादाला उत्तेजन देणे आवश्यक आहे दैववादाला नव्हे. एडिसन चे उदाहरण का देतात? १००० पेक्षा जास्त वेळा अपयशी ठरूनही शेवटी बनवण्यात तो यशस्वी झालाच ना? माझ्याकडे आलेले एक दैववादी रुग्ण मला म्हणाले. डॉक्टर जे माझ्या नशिबात असेल तेच होइल. नशिबात मृत्युयोग नसेल तर काहीही होणार नाही. मी त्यांना शांतपणे म्हणालो साहेब तुमच्या नशिबात मृत्यू योग नाही हे तुम्हाला माहित असेल तरीही हि समोर रेल्वे लाईन आहे हि आपण डोळे मिटून पार कराल काय? शेवटी दैववाद नव्हे तर दुर्दम्य आशावादच राष्ट्राला पुढे नेत असतो. याची उत्तम उदाहरणे जर्मनी किंवा जपान हि आहेत. दुसर्या महायुद्धात राख रांगोळी झालेले हे देश केवळ प्रयत्नवादाने केवढ्या उंचीवर पोहोचले आहेत. 'ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असो द्यावे समाधान' असे राहिले असते तर त्यांची गणना इथिओपिया पाकिस्तान सारख्या देशांबरोबर झाली असती.
  • Log in or register to post comments

+१ सर!!!

स्वप्नांची राणी
गुरुवार, 09/04/2014 - 23:15 नवीन
+१ सर!!! आणखिन एक डोक्यात जाणारं वाक्य म्हणजे 'आजच्या धकाधकीच्या जिवनात उर फुटेस्तोवर धावतांना..ई.ई."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 09/05/2014 - 01:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

.

पोटे
गुरुवार, 09/04/2014 - 23:10 नवीन
आणि एक लबाड वाक्य ! कर्मविपाकाचे फळ मिळते
  • Log in or register to post comments

लेख आवडला

पैसा
गुरुवार, 09/04/2014 - 23:13 नवीन
एकूण काय, बरीचशी चमकदार वाक्ये ही अर्धसत्ये असतात. आणि आपला मेंदू शाबूत ठेवून सदैव प्रयत्न करत राहिले पाहिजे! श्री पोटे, एका चांगल्या धाग्यावर पुन्हा एकदा हिंदू, औरंगझेब इ. विषय काढून धाग्याचा खरडफळा केल्याबद्दल धन्यवाद आणि पोटे यांच्या काड्यांना इंधन पुरवल्याबद्दल इतर मिपाकराचे झाईर कौतुक.
  • Log in or register to post comments

.

पोटे
गुरुवार, 09/04/2014 - 23:22 नवीन
कर्मविपाकाचे फळ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

"hope is a good thing, maybe

दशानन
गुरुवार, 09/04/2014 - 23:19 नवीन
"hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies." याच्या विरुद्धअर्थी आपले तत्त्वज्ञान असते हा माझा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

माझा अर्धाच मुद्दा

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 09/05/2014 - 00:53 नवीन
माझा अर्धाच मुद्दा तुमच्यापर्यंत पोचला आहे असे दिसते आहे. माझे म्हणणे... "hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies." इथे थांबत नाही. ते तेथेच थांबले तर, "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" इथेच त्याचा अर्थ संपेल. माझे म्हणणे जास्त चांगल्या प्रकारे असे सांगता येईल... "Dream hard; and work harder and smarter to make it a reality."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

भारताच्या स्वातंत्र्यानंतर

मराठे
गुरुवार, 09/04/2014 - 23:26 नवीन
भारताच्या स्वातंत्र्यानंतर समाजवादी विचारसरणीचा चांगलाच जोर होता. तेव्हाचे जुने चित्रपट पाहतानासुद्धा ही बाब वारंवार जाणवते (आठवा: श्री चारसोबीस .. मुनाफाखोर वगैरे शिव्या). त्यामुळे एकूणच श्रीमंत म्हणजे वाईट आणि गरीबच चांगले असा संदेश जनतेच्या गळी उतरवला जात होता. अगदी अमिताभच्या सिनेमापर्यंत ही परंपरा अखंडीत होती. त्याच विचारसरणीतून असली वाक्य मागच्या पिढीतील माणसं वापरत असावीत.
  • Log in or register to post comments

.

पोटे
गुरुवार, 09/04/2014 - 23:26 नवीन
अजुन एक लबाड वाक्य ! जींकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. मेलास तर स्वर्गात जाशील.
  • Log in or register to post comments

एकच मोठी लिस्ट करा की पोटे

प्यारे१
Fri, 09/05/2014 - 01:05 नवीन
एकच मोठी लिस्ट करा की पोटे साहेब. हे काय उन्हाळी लागल्यासारखं ठिबक सिंचन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा