Skip to main content

पुण्यातला गणेशोत्सव -माहिती हवी आहे

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 27/08/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय. घराघरात आपल्या लाडक्या दैवताच्या तयारीची लगबग आणि धावपळ अगदी मनापासून सुरु आहे. ज्यांचा घरचा गणपती कोकणात आहे त्यांची तर तऱ्हाच वेगळी….गणपती म्हटला की मनात पहिल्यांदा आठवतं ते पुणं …. ह्या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते…. खरा पुणेकर आणि इतकंच काय ह्या पुण्यनगरीत आलेला प्रत्येक माणूस त्या दहा दिवसात भक्तिरसात नखशिखांत न्हाऊन निघतो. गेल्या कित्येक वर्षांपासून माझीही पुण्यातला गणेशोत्सव याची देही अनुभवायची इच्छा आहे परंतु आमच्याच घरी बाप्पा मुक्कामाला येत असल्यामुळे ते काही केल्या जमत नाहीये. परंतु ह्या वर्षी मात्र मी ठरवलंच आहे की कसंही करून पुण्याला यायचंच त्यामुळे घरच्या बाप्पांना जड अंतकरणान निरोप देऊन मुंबईहून पुण्यनगरीचा रस्ता धरावा असा विचार आहे !! तरी समस्त पुणेकरांना (आणि इतरांनाही ) ही नम्र विनंती की त्यांनी कृपया पुण्यातल्या गणपतींबाबत आणि दर्शनाबाबत मार्गदर्शन करावे म्हणजे कुठे आणि कसे जावे ,काय काळजी घ्यावी वगैरे वगैरे …. मानाचे गणपती एकमेकांपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत का ही माहिती सुद्धा हवी आहे. तसेच अजून कुठचे गणपती आवर्जून पाहावेत हेही जाणून घेण्यात रस आहे .गौरींच्या विसर्जनानंतर आणि अनंत चतुर्दशीच्या आधी दर्शन घेण्याचे ठरवले आहे . ह्या निमित्ताने समस्त मिपा परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा…. गणपती बाप्पा मोरया !!

वाचने 21077
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

कशाला नाही त्या भानगडीत पडताय. मुलांना गणपतीत दाखवण्यासारखे देखावे काही ठीकाणी असतात. गणेशोत्सवाचा उद्देश सामाजीकजागृती वगैरे असावा अशी किंचीतही शंकासुद्धा येवु शकणार नाही अशी चोख व्यवस्था केलेली असते पुण्यात. केवळ स्वस्त मनोरम्जन या उपर फारसे काही पुण्यातील गणेशोत्सवातून साधत असेल असे काही अनुभवास येत नाही. पूर्वीचा गणेशोत्सव( ८०च्या दशका पर्यन्तचा) काहीतरी वेगळेपणा असायचा. स्पर्धा , कार्यक्रम वगैरे असायचे. पण जेंव्हापासून गणेशोत्सव पुणेफेस्टीव्हल बनला त्यानंतर गणेशोत्सव हे दादागिरी दाखवण्याचे आणि पैशे कमवण्याचे साधन बनले आहे. अर्थात मुम्बैतही परिस्थिती वेगळी नाही. गणेशोत्सवाची सामाजीक सोबत केंव्हाच हरवली आहे. आता उत्सव सम्पून इव्हेन्ट उरले आहेत.

हो. मानाचे गणपती चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. वाहनांना तसाही प्रवेश नसतो. कसबा - तांबडी जोगेश्वरी - (आतल्या गल्लीतून) - गुरुजी तालीम - तुळशीबाग - केसरीवाडा असा क्रम सोपा पडतो. तुळशीबागेतून दगडूशेठ आणि मंडई हेही जवळच आहेत. सकाळी लवकर (म्हणजे भल्या पहाटे) गेल्यास सुखकर पडतं असा अनुभव आहे. गर्दीही नसते आणि वातावरण प्रसन्न असतं.

या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते…. खरा पुणेकर आणि इतकंच काय ह्या पुण्यनगरीत आलेला प्रत्येक माणूस त्या दहा दिवसात भक्तिरसात नखशिखांत न्हाऊन निघतो.
हे वाचून तुमच्या भाबडेपणाची कमाल आहे असेच म्हणावे लागेल. पुण्यात या दिवसात बारची किती चलती असते ते एकदा पहा. गणपती उत्सवनाम्तर होणार्‍या गर्भपात आणि व्ही डी मधे होणारी संख्यात्मक वाढ एकदा पडतालून पहा. म्हणजे ते नागरीक कोणत्या भक्तीरंगात न्हात असतात ते कळेल. कोणत्याही मांडवाच्या मागे पडलेल्या बीयरच्या/दारुच्या बाटल्या किंवा सिगारेटची थोटके तसेच गुटख्याच्या पुड्या पाहिल्या तरीही ते कळेल. एवढे मोठाल्ले मांडव उभारणारी / देखावे दाखवणारी मंडळे नक्की काय सामाजीक कार्य करत असतात हे कोणीच विचारत नाही. ( उगाच एखादे घ्यायचे म्हणून दगडू शेठ गणपती ट्रस्ट चे नाव साम्गु नका.) अर्थात दगडू शेठ गणपती मंडळाच्या "कोणत्यातरी मंदीराची रोषणाई असलेली प्रतीकृती" यातूनतरी काय सामाजीक जाणीव निर्माण होते ते माहीत नाही. पुणेरी गणेशोत्सव म्हणजे असह्य गोंगाट , दादागिरी , विजेचा भरपूर अपव्यय आणि पैशांचा चुराडा ( अर्थात हस्तांतरण सुद्धा) या पेक्षा वेगळे काही नाही. त्या उलट कोकणात गणपतीच्या सणाचे पावित्र्य साधेपणा आणि त्यातील भाव खूपच जाणवतो. तेथे भजन स्पर्धा , नाटके किंवा इतर छोटेमोठे सामाजीक उपक्रम ( उदा लेझीम स्पर्धा , राम्गोळी स्पर्धा इत्यादी ) यांची रेलचेल असते.

In reply to by विजुभाऊ

गर्भपात आणि व्ही डी मधे होणारी संख्यात्मक वाढ
हाच प्रकार गुजरातमधे नवरात्री दांडीया उत्सवादरम्यान होतो. तसेच वेल्लाभटाने लिहील्याप्रमाणे शहरातील दहीहंडी उत्सवपण निव्वळ बडेजाव म्हणुन केला जातो. काही महिन्यापुर्वी (कदाचित वडापाव ने)दिवाळीवर पण असाच लेख लिहीला होता. धुळवडीला पण तेच कोणत्याही मोठ्या शहरात होणार्‍या कोणत्याही सार्वजनिक उत्सवात हीच परिस्थिती असते
उत्सव सम्पून इव्हेन्ट उरले आहेत.
सामान्य माणसे आता तेच एंजॉय करतायत. मात्र पुण्या-मुंबईतपण कॉलनी/सोसायट्यांमधे जी गणपती मंडळे असतात ती तुम्ही म्हटल्याप्रमाणे भजन,रांगोळी, पाककृती स्पर्धा घेत असतात.

In reply to by विजुभाऊ

तुमचे म्हणणे रास्त आहे पण आपण जातो ते गणपतीचे दर्शन घ्यायला…. मंडपाच्या मागचा तमाशा पाहायला नाही…. छिद्रान्वेषी पद्धतीने जगायचे ठरवले तर सगळेच अवघड आहे ….

गणेशोत्सव (व इतर उत्सव सुद्धा) पूर्णपणे बंद करायला हवेत. कायद्याने. तुमचा धर्म घराच्या आत. तिथे कितीही ढोल पिपाण्या वाजवा.

In reply to by काळा पहाड

काळा पहाड यांच्याशी सहमत.च्यायला सकाळी 5amला झोप मोड करणारे भोंगे आणी उत्सवात कानाचे पडदे फाडणारे ढोल आणी डिजे.दोन्ही विट आणतात.

In reply to by काळा पहाड

ही टोकाची भूमिका झालि. नासके आम्बे दूर करण्या ऐवजी सगळी पेटिच फेकून द्या म्हणण्या सारखे आहे हे. असो, तुमचे मत.

In reply to by सह्यमित्र

नाही. जरी गणपती अत्यंत संयमाने आणि संस्कृती जपून साजरे करता येत असतील तरी सुद्धा माझे हेच मत असेल. धर्म घराच्या किंवा मग मंदिराच्या आत. बाहेर पावूल टाकले की धर्म संपला पाहिजे. Strict separation between state and religion. आमच्या ऑफिसमध्ये एका विशिष्ट धर्माच्या लोकांना (काँग्रेसची भाषा, दुसरं काय!) दिवसात किमान एक वेळा एका डोस्कं टेकण्यासाठी मिटींग रूम दिलेली आहे. पहिल्यांदा मला वाटलं की हे लोक उगिचच आगावूपणा करतायत. नंतर कळलं ऑफीस ची ऑफिशियल पॉलिसी आहे धार्मिक विविधता जपून त्याला "बढावा" देण्याची. हा अर्थातच मूर्खपणा आहे. उद्या एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी तिथं टाळ बडवायला सुरू केली तर कसं दिसेल? पण या मल्टीनॅशनल कंपन्यांना भिती वाटते की त्यांच्यावर धार्मिक संकुचितपणाचा आरोप होईल म्हणून.

In reply to by काळा पहाड

करेक्ट!! आमच्या ऑफिसमध्ये गणपतीत होणार्‍या आरतीबद्दलही माझे हेच मत आहे.. रस्ते तर फक्त आणि फक्त वहातुकीसाठी असावेत.

In reply to by काळा पहाड

एका विशिष्ट धर्माच्या लोकांना (काँग्रेसची भाषा, दुसरं काय!) दिवसात किमान एक वेळा एका डोस्कं टेकण्यासाठी मिटींग रूम दिलेली आहे भयंकर सहमत. हापिसात डोके टेकण्याचा खोल्या पसंत नाहीत पण मला विचारतय कोण? ;)

In reply to by रेवती

डोके टेकणे हे गणपति उत्सवात बहुतान्शि सगळेच करतात - रात्री भसाड्या भोन्ग्यान्चे गायन उशिरापर्यन्त चालूच असेल तर झोपमोड ही होणारच आणि "बॉस" ची वळलेली पाठ दिसत असल्यास जमेल तेथे डोके हे टेकले जाणारच !

In reply to by शेखरमोघे

हा हा. तसे नाही, आजकाल बोलायची पंचाईत होते हो. भावनादुखी झालीये बर्‍याचजणांन्ला. तुमचा विनोद आवडला. तोही खराच आहे म्हणा!

In reply to by काळा पहाड

परवा दगडूशेटसमोर रजनीकांत ढोल बडवत होता, तेवढ्यात परग्रहावरून ऐक एलियनशिप तिथे मजूरअड्ड्यावर ल्यांड झाली, त्यातून ऐक एलियन बाहेर पडला, त्याने रजनीकांतला ढोल जरा हळू बडवायची विनंती केली, कारण एलियनच्या मुलाला परीक्षेसाठी अभ्यास करता येत नव्हता.

तुम्ही शिवाजी रस्त्याने (शनिवारवाड्याकडे तोंड केल्यावर डाव्या बाजुचा रस्ता)चालायला सुरु करा. नवग्रह, कसबा, दगडुशेठ, बाबुगेनु, मंडई, हिराबाग करुन यु टर्न घ्या येताना तुळशीबाग, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, गुरुजी तालीम, नातुबाग वगैरे करुन बाजीराव रस्त्याने (शनिवारवाड्याकडे तोंड केल्यावर उजव्या बाजुचा रस्ता) परत या. रस्त्यात अजुन अनेक मंडळांचे देखावे बघायला मिळतील. अंदाजे ३/४ तास लागतील. मधेच पोट्पुजापण करुन घ्या. वर दिलेले अंतर अंदाजे ४-५ किमी असावे. तेवढे चालायला जमतय का बघा. काळजी म्हणजे लहान मुले, पाकीट, मोबाईल वगैरे नीट सांभाळा गणेशोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा…. गणपती बाप्पा मोरया

बापरे! तुम्हाला शुभेच्छा! पाच मानाचे गणपती बघून लवकर घरी परत जावा. अगदी भीती घालत नाहीये पण गर्दीतून जाताना क्षेत्राच्या ठिकाणी जशी काळजी घ्यायची तशीच घ्यावीत असे सुचवते. बाकी मुंबैच्या गर्दीला सरावलेल्या तुम्हाला आम्ही काय सांगणार हेही आहेच!

खिसा पाकीट, मोबाईल, सोबत स्त्रीवर्ग असेल तर दागिने सांभाळा. या कालावधीत पाकीटमार, गुन्हेगारांच्या टोळ्या खास कमाईसाठी पुण्यात आलेल्या असतात. :(

प्रश्न पाहून आनंद झाला नि प्रतिसाद पाहून दुखः असो. मी स्वतः गिरगावकर आहे नि गेली ५-६ वर्षे न चुकता पुण्यातील गणेशोत्सवात जातो. एक वर्षी तर हिराबाग वाल्यांनी बर्ड फ्लू च्या भीतीने त्यांचा देखावा रद्द केला होता आणि त्या वर्षी बर्ड फ्लू च्या भीतीने एवढी गर्दी सुद्धा नव्हती. आणि त्यावर्षी सुद्धा मी दर्शनास गेलो होतो. हे सांगण्याचे कारण एकच " हौसेला मोल नसते!!!" आपणास बासुंदी आवडत नसेल म्हणून दुधाचे विरजण लावण्याची कृती सांगू नये. आपल्या माहितीसाठी सांगतो कि पुण्यातील मोठ्या मूर्तींचे विसर्जन होत नाही. त्यामुळे दरवर्षी मूर्ती एकच असते. दगडूशेठ गणपतीची मूर्ती फक्त देवळातून मंडपात हलवितात. पुण्यातील गणपतीसाठी योग्य वेळ हि रात्री ११.०० नंतरची आहे. कारण हवेत गारवा असतो आणि रस्त्य्वरील गर्दी हि फक्त गणेश दर्शनासाठीच असते. आपण मुंबईहून जाणार असाल तर स्वारगेट वा शिवाजीनगरला उतरावे. स्वारगेटला उतरणे जास्ती श्रेयस्कर. अगर रात्री ज्यादा उशीर झाल्यास स्वार गेट जवळील नटराज हॉटेल ला जावे. अगर आपण खवय्ये असाल तर संध्याकाळी थोडे लवकर पोहोचून दुर्वांकुरला जावे.नटराज हॉटेल चांगले आहे. पण दुर्वांकुरला जेवायची हौस असून योग आलेला नाही.एकदा तर रांग पाहून परतलो होतो. शिवाजी नि बाजीराव मार्ग हे स्वार गेट हून शनिवारवाड्याकडे येणारे मार्ग. दोन्ही मार्गावर एकेरी वाहतूक असते.कोणता शिवाजी नि कोणता बाजीराव हे सांगण्याचे धाडस करत नाही कारण इतकी वर्षे जाऊनसुद्धा माझा घोळ होतो. कारण मी गणेश दर्शनाची सुरुवात स्वारगेटला उतरून पायी करतो. अगर आपण शिवाजी नगरहून आलात तर शनिवारवाड्याजवळ उतरून स्वारगेट च्या दिशेने पदभ्रमण करा. रात्री ११.०० ला सुरुवात केली तर ३-४ तासात त्या परिसरातील अनेक गणपती बघून होतात. महत्वाची गोष्ट म्हणजे इथले सर्व गणपती पडद्याआड नसतात. तसेच रांगासुद्धा वेगाने सरकतात... PASS, VIP PASS असला प्रकार नसतो. काही देखावे तर प्रेक्षणीय नि श्रवणीय असतात. सौंदाल्यांचा प्रतिसाद अतिशय उपयुक्त आहे. त्या क्रमाने आपण गणपती पाहू शकता. आणि गर्दीचे म्हणाल तर आपण मामालेदारचे पंखे आहात.ठाण्यातील SATIS पूर्व आणि नंतरची गर्दी आपणास चांगलीच माहिती आहे. जो मुंबईत फीट तो जगात फीट!!!! ता.क - दगडूशेठ नि बाबू गेनू मंडळाचे देखावे जरूर पहा. हिराबाग गणपती तिठ्यावर आहे.

In reply to by विअर्ड विक्स

बाबू गेनू मंडळाच्या गणपतीची लाईंटींग फेमस होती म्हणजे काहीतरी रिदम धरुन असायची. आणि त्यातुनही 'होटो पे ऐसी बात' या एका गाण्यासाठी पब्लिक वाट बघुन असायचं काही वर्षांपूर्वीपर्यत. हिराबागेचा हलता देखावा कलात्मक रितीने साजरा केला जायचा खूप वर्षांपासुन. पण दोन्ही गणपतीबाबत सध्याचे माहीती नाही.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

तुमचा घोळ होतोय शास्त्रीय देखाव्यांसाठी प्रसिध्द असलेला गणपति नातूवाड्यचा. तो शनिवार पेठेत आहे. अप्पा बळवन्त चौका जवळ. नातूबागे चा गणपति हा बाजीराव रस्त्यावर, केळ्कर सन्ग्रहालया जवळ आहे.

In reply to by विअर्ड विक्स

आपणास बासुंदी आवडत नसेल म्हणून दुधाचे विरजण लावण्याची कृती सांगू नये.
या एकाच वाक्यावरून आपल्याला पुण्याचे नागरिकत्व मिळायला हरकत नसावी.

आपणास बासुंदी आवडत नसेल म्हणून दुधाचे विरजण लावण्याची कृती सांगू नये.
हम्म...... एखाद्या फालतू गोष्टीचे एवढे उदात्तीकरण कशासाठी? पुण्यात गणेशोत्सव नावाचा एक भीषण गोंगाटी धांगडधिंगा चालतो त्यावर कोणी काही प्रतिक्रीयाच व्यक्त करू नये यासाठीच अशी पुणेरी प्रतिक्रीया असावी. असो. एखाद्याने नासकवणीलाच बासुंदी म्हणायचे ठरवले तर त्याला कोणी अडवायचे? गोष्टीतल्या राजाच्या अंगावरच्या तलम वस्त्रांप्रमाणे घडतय. राजाच्या अंगावर वस्त्रेच नाहीत असे म्हणणाराच खोटा ठरत होता.

In reply to by बाळ सप्रे

ज्यांना ईच्छा आहे ते येतातच. ज्यांना घ्रुणा आहे त्यांनी लांब राहीलेलेच बरे.

In reply to by विजुभाऊ

बहुतेक मंडळांचा कल हा धांगडधिंगा करण्या कडे अस्तो. हे जरी खरे असले तरी,सरसकट सर्वाना एकाच मापत तोलणे बरोबर नाही.

In reply to by विजुभाऊ

>>पुण्यात गणेशोत्सव नावाचा एक भीषण गोंगाटी धांगडधिंगा चालतो त्यावर कोणी काही प्रतिक्रीयाच व्यक्त करू नये यासाठीच अशी पुणेरी प्रतिक्रीया असावी. ओके, मग मुंबई आणि इतर ठिकाणी काय अथर्वशीर्षाची आवर्तनं चालतात का रात्रंदिवस?

In reply to by सूड

सूड काका मुम्बै या बाबतीत पुण्याच्या वरताणच असेल बहुतेक. पण इथे निदान मंडळे आम्ही देखावे दाखवतो / आम्ही समाजप्रबोधन करतो असला आव आणत नाहीत. जे आहे ते स्पष्ट बोलतात उगाच मोठेपणाचा आव आणत नाहीत. महत्वाचे म्हणजे मुम्बैतील मंडळे कितीही मोठ्या मूर्ती असल्या तरी त्यांचे विसर्जन करतात.दरवर्षी नवीन मूर्ती बसवतात.आणि उगाच वर्षभर ( म्हणजे कायमचीच) मूर्ती जपण्याच्या नावाखाली भरचौकातील कोपर्‍याची जागा अडवत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

मी ही अता पुणेकर झालेलो असूनही कित्येक वर्षात गणपती पहायला गेलो नाहीये. कारणं तीच - गर्दी, घाण, गोंगाट, पाकीटमार, चोर्‍या आणि शेवटी मानसिक नी शारिरीक थकवा. पण "विअर्ड विक्स" म्हणाले तसं रात्री ११:०० गेल्यास चांगला अनुभव आलेला आहे (हे ९-१० वर्षा पुर्वी अनुभवलं होतं, त्यानंतर नाही). पण अगदी फालतू वगैरे म्हणण्यासारखं काही नाहीये त्यात - ज्याची त्याची आवड.

पुण्यातच कशाला ? मुंबईत देखील चांगले चांगले गणपती आहेत. साधारण तुमच्या मागणीप्रमाणे पुरवठा. १. जर एखादा नवस करायचा असेल तर लालबागचा राजा, सिद्धीविनायक किंवा जीएसबीचा माटुंगा येथील गणपती. २. मोठे देखावे, रोषणाई पाहायची असेल तर भाई लोकांच्या मंडळांनी स्थापन केलेले गणपती. नावे सांगत नाही. :) ३. भजन किर्तन किंवा तत्सम कार्यक्रम पहायचे असतील तर कोणत्याही गल्लीतील गणपती. वेळ रात्री १० च्या पुढे. ४. सांस्कृतीत कार्यक्रम ( उदा. ऑर्केस्ट्रा, बॉलीवुडी गाण्यांवरचा नाच, आयटम नं इ.) तर गणेश विसर्जनाच्या आधिचा दिवस. ज्यादिवशी सकाळी सत्यनारायण पुजा असते. अधिक माहितीसाठी त्या त्या मंडळाचे वार्षिक अहवाल पहावेत.

आगाऊपणे नकारात्मक सल्ला देतोय त्याबद्दल क्षमस्व! शहाणे असाल तर पुण्यात गणपतीचे देखावे बघायला जाण्याच्या भानगडीत पडू नका. विशेषत: दगडूशेठ, मंडई इ. प्रसिद्ध मंडळांचे गणपती आणि विसर्जनाची मिरवणूक अवश्य टाळा. नाहीतर नंतर पश्चाताप होईल. त्याऐवजी १० दिवस कोणत्यातरी शांत पर्यटनस्थळी जा.

तुम्हाला खरंच बासुंदी खायची इच्छा असेल, तर रात्री गणपती बघायला जाण्याऐवजी विसर्जनाची मिरवणूक जी अनंतचतुर्दशीला सकाळी १० वाजता सुरु होते, त्यातले मानाचे पहिले ५ गणपती पहा. दगडूशेठ गणपती विसर्जनात मध्यरात्रीनंतर सहभागी होतो. पहायचा असेल तर तोही पाहू शकता.

In reply to by काळा पहाड

दगडूशेठचा गणपती मध्यरात्री सहभागी होतो. मिरवणुकीत त्याच्या आसपासच दगडू शेठच्या मूर्तीशी साधर्म्य असणारा एक गणपती असतो. त्यावरील चित्ररथ प्रेक्षणीय असतो. माझ्यामते जिलब्या मारुती चा गणपती असावा तो ... जाणकार सांगतीलच म्हणा..... लालबागमधील एक गणेश मूर्ती पुलाजवळ पडली होती. त्यावर्षी पुण्यास गेलो होतो. आपणास ढोल पथक ऐकायची हौस असेल तर "नादब्रह्म" पथक असेल तेथे जरूर जा. त्या पथकाचे नाव अगदी सार्थ आहे. पण विसर्जन मिरवणुकीपेक्षा एखाद्या रात्रीच जा... मिरवणुकीत देखावे पहावयास मिळत नाही.आणि रस्ते चिंचोळे असल्याने काहीवेळेस अक्षरशः कोंडी होते. नि आपणास दुसर्या दिवशी ऑफिसही गाठायचे असते.

पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे गर्दी,गोंगाट,धक्काबुक्की,ध्वनीवर्धकांच्या भिंती,ट्रॅफिक आणि वरती माहीतगार लोकांनी म्हटल्याप्रमाणे पाकीटमारी,गर्भपात वगैरे वगैरे आहेच. पण त्या वातावरणाचा फील आहे ना, तो घ्यायला तुन्ही पुण्यात याच राव.काळा पहाड,विअर्ड विक्स्,सौन्दाळा यांनी सांगितलेला क्रम चांगला आहे. मलातरी सण समारंभातुन आपल्याकडे जी ईकॉनॉमी बहरते ना तिचे फार महत्व वाटते. गणपती काय दहीहंडी काय,दिवाळी दसरा काय...होऊ दे खर्च

भारतातल्या सर्वच सार्वजनिक उत्सवांवर कायद्याच्या नियंत्रणाची गरज आहे. उत्सवांच्या मिरवणूकीत उत्सवापेक्षा 'उन्माद' जास्त प्रमाणात दिसून येतो. भक्तीभाव केंव्हाच हरपला आहे. भक्तगण भारावण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक असते की 'गेल्या कित्येक वर्षात मी एकदाही दर्शन चुकविलेले नाही.' हा स्टेटस सिंबॉल. देवावर (म्हणजे अर्थातच सर्व चांगल्या गोष्टींवर) माझा विश्वास आहे हा सहज उभा करता येणारा देखावा. देव नाही, श्रद्धा ठेवू नका असं माझं म्हणणं नाही. भक्तीभावाचा व्यापार होऊ देऊ नका. देवाला मानवी ऐहिक भावनेत तोलू नका. न खात्या देवाला नैवेद्य दाखविण्यापेक्षा खाणार्‍या गरीबाच्या तोंडी घास द्या. आपला देव आपल्या मनांत, घरात पुजा. रस्त्यावर आणून र॑हदारीला अडथळा निर्माण करून, कर्णकर्कश्य आवाजाने वृद्धांना, रुग्णांना असह्य वेदना देऊन कोणते समाजकार्य होत असते? ह्या, आधीच हाताबाहेर गेलेल्या सार्वजनिक उत्सवांना आपल्या उपस्थितीने हातभार लावून समाजविघातक शक्तींचे हात बळकट करू नका. बाकी प्रत्येकाची इच्छा आणि श्रद्धा.

In reply to by प्रभाकर पेठकर

बरोबर आहे पेठकर काका. गाडगेबाबा म्हणतात ते किती चपखल आहे पहा. "जत्रा मे फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भयी दिवानी भई पैसे की धूलधानी" अर्थातच ज्याला धांगडहिंगाण्यातच रस आहे त्याना हा व्यक्तीस्वातन्त्र्यावर हल्ला वाटतो. धार्मीक ढवळाढवळ वाटते. मशीदीवरील कर्ण्याबद्दल बोलणारे मात्र नवरात्र / गणपती /गोविंदा समोरील स्पीकरच्या भिंतींबद्दल बोलत नाहीत. रोज सकाळी सकाळी सरकारी रेडीओ आकाशवाणी वर वाजणारी भक्तीगीते तसेच विवीध टीव्ही चॅनलवरील विवीध देवळातील आरत्यांचे दर्शन किंवा तत्सम उबग आणणारे विवीध बाबांचे कार्यक्रम , यात सत्यसाईबाबा , राधे मां , आसाराम बापूं , निर्मल,नित्यानंद असल्या खोटारड्याना संत म्हणवत त्यांची जहीरातबाजी करणारी प्रवचने यांबद्दल बोलताच तोंडी मिठाची गुळणी धरतात. त्याना या गोष्टी दिसतच नाहीत. अगदी खरे सांगायचे तर आजकाल ज्याला धार्मीक उत्सव्/कार्यक्रम म्हणतो ते सगळेच रद्द करायला हवेत. कारण हे बहुतेक सगळे इव्हेन्ट कोणत्या ना कोणत्या आर्थीक जमवाजमवीचा भाग असतात.

In reply to by विजुभाऊ

अर्थातच ज्याला धांगडहिंगाण्यातच रस आहे त्याना हा व्यक्तीस्वातन्त्र्यावर हल्ला वाटतो. धार्मीक ढवळाढवळ वाटते. - सहमत रोज सकाळी सकाळी सरकारी रेडीओ आकाशवाणी वर वाजणारी भक्तीगीते तसेच विवीध टीव्ही चॅनलवरील विवीध देवळातील आरत्यांचे दर्शन किंवा तत्सम उबग आणणारे विवीध बाबांचे कार्यक्रम , यात सत्यसाईबाबा , राधे मां , आसाराम बापूं , निर्मल,नित्यानंद असल्या खोटारड्याना संत म्हणवत त्यांची जहीरातबाजी करणारी प्रवचने यांबद्दल बोलताच तोंडी मिठाची गुळणी धरतात. त्याना या गोष्टी दिसतच नाहीत. - याबाबत असहमत. एकतर सरकारी आकाशवाणी आता जास्त कोणी ऐकत नाहीये एफएम. पण रेडीओवरील भक्तीगीते जी सकाळी लागतात ती खरोखरच कर्णमधूर असतात आणि त्याचा कोणाला जास्त त्रास होत नाही. शिवाय रेडीओ / टिव्हीचा गळा दाबणे तुमच्या हातात असते.

In reply to by प्रभाकर पेठकर

बासुंदी चांगली फक्त कुरुंदवाडची. चितळे वगैरे म्हणजे पुणेरी पाणीदार बासुंदी देणारे. पुण्यात कुरुंदवाडची बासुंदी बर्‍याच ठिकाणी मिळते.

In reply to by काळा पहाड

पुण्यात कुरुंदवाडची बासुंदी बर्‍याच ठिकाणी मिळते.
कुठे मिळते सांगा की राव आम्हाला पण

In reply to by कपिलमुनी

खरं म्हणजे मलाही हेच म्हणायचं होतं पण उगीच ती प्रसिद्ध झाली तर हे मुंबै पुणे वाले त्या गोष्टी महाग करतात. म्हणून..

In reply to by काळा पहाड

बासुंदी चांगली फक्त कुरुंदवाडची>>> या वाक्याला प्रचंड सहमत .. एकदा पाहुण्यांना बासुंदी दिली जाताना, दुसर्‍या दिवशी त्यांचा फोन्..तक्रारीच्या सुरात बोलले 'बासुंदी चांगली होती हो पण फारच घट्ट' आम्हाला हसावे की रडावे कळेना. ~आसिफ.

In reply to by काळा पहाड

कुरुंदवाडची बासुंदी पुण्यात कुठे मिळते? वाडीची मिळते. तीच आवडते देखील. एरवी आठवल्यांकडे आणि पुरोहितकडे चांगली बासुंदी मिळते. चितळ्यांकडे बरी मिळते. पण चांगली म्हणवत नाही. त्याला पुणेरी पाणीदार बासुंदी म्हणणे म्हणजे मात्र निव्वळ आकस आहे. अर्थात सणासूदीला कधीतरी त्यांनी तसे केले असल्यास मला माहिती नाही. मी काही चितळे बासुंदीचा मोठा भोक्ता नाही.

In reply to by स्पा

गणेश पेठेत गुरूद्वाराजवळील एका हलवायाच्या दुकानात गरमागरम बासुंदी खूप चांगली असते (म्हणे).

In reply to by विजुभाऊ

चितळ्यांकडे मिळते तो बासुंदीचा झी सारेगमप असतो. कुमारांचं गाणं माहीत असणारे त्याला चांगलं म्हणत नाहीत.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गणपतीचा धागा आहे फारतर मोदकाचे सतरा प्रकार होतील असं कुणालाही वाटेल :)