मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सर्दीवरील उपाय आणि अनुभव

वेल्लाभट · · काथ्याकूट
नमस्कार मिपाकर सर्दी, या जास्तीत जास्त आढळणा-या आजाराने प्रत्येक मानवाला कधी ना कधी, कमी जास्त प्रमाणात ग्रासलेलं असतंच. तर या अतिशय लोकप्रिय आजाराशी वर्षातून एखाद दोनदा माझीही नाकभेट होत असते. मग काही दिवस आम्ही एकमेकांना अजिबात दूर जाऊ देत नाही. एकत्र मिळून शिंकांचे फटाकेही फोडतो. अखेर कंटाळून मग आम्ही सोडतो एकमेकांना. असो. गमतीचा भाग वेगळा. पण या सर्दीवर अनेक उपचारपद्धतीत अनेक उपाय सांगितलेले आहेत, औषधं सांगितलेली आहेत. घरगुतीपासून ते गोळीबारापर्यंत. मला लागू झालेले काही उपाय इथे देत आहे, १) काढा - सर्दी झाली रे झाली की आई, आजीचं हे वाक्य येणारच. `काढा देते करून चांगला' या काढ्याचं स्वरूप साधारण असं असतं की, चार कप (अंदाजे) पाणी घेऊन त्यात धने, जिरे, पाती चहा, थोडी मिरी या गोष्टी उकळवायच्या, पाणी अर्ध होईपर्यंत. गरम गरम प्यायचा. सर्दीवर जबर ईलाज. फरक पडायला दोन दिवस जातात पण सर्दी प्रदीर्घ काळासाठी बरी होते. २) गरम पाणि विथ लिंबू - हे सतत, म्हणजे अक्षरशः कंटाळा आला की घेत रहावं. लिंबू सी विटॅमिन पुरवतं, प्रतिकार्शक्ती वाधते, सर्दी बरी होते. ३) सी विटॅमिन च्या गोळ्या - सेलिन किंवा लिमसी किंवा सिट्रावाईट नावांच्या च्युएबल, म्हणजेच चघळता येणा-या गोळ्या कुठल्याही औषधांच्या दुकानात मिळतात. त्या दिवसाला ४ खाणे. येता जाता मस्तपैकी. यांचा अपाय नाही. जास्त घेतल्या तरीही. यामुळेही सी विटॅमिन बूस्ट मिळतो, प्रतिकारशक्ती वाढते, सर्दी बरी होते. आपसुक. हा उपाय एका डॉक्टरांनीच सांगितलेला आहे. ४) मासा खा - हा मी शोधलेला उपाय. आपापल्या जबाबदारीवर हे करावं. परंतु ही ट्रिक मला तरी लागू होते. सर्दी, खोकला, कणकण वाटली की हॉटेलात जाऊन (तुम्हास घरी बंदी नसल्यास घरी) एखादा पापलेट, सुरमई फ्राय खावा. तेल कमी सांगावं. माशातील बी विटॅमिन, प्रोटीन, इत्यादी गोष्टींमुळे ताकद येते, व सर्दी तापाची लक्षणं बळावण्याच्या आतच त्या गोष्टी दूर पळतात. ५) साखर निलगिरी - हा उपाय माझ्या चुलत भावाने सांगितला. इट वर्क्स. एक चमचा भरून साखर घ्यावी. त्यात दोन थेंब निलगिरी तेल टाकावं. आणि रात्री झोपताना खावं. वर पाणी पिऊ नये. सकाळी आराम मिळतो. पूर्ण नाही तरी बराच मिळतो. असंच दोन दिवस केल्यास पूर्ण बरं व्हायला होतं. ६) महासुदर्शन काढा - कुठल्याही औषधांच्या दुकानात मिळतो. सकाळ दुपार संध्याकाळ खाण्यानंतर घ्यावा. सर्दी गुल - ३ ४ दिवसात. ७) कपाळाला वेखंड लावणे - हाही आईचा उपाय. सर्दीमुळे डोकं धरलेलं असेल तर हे बेस्ट. गरम गरम चटके लागत वेखंड लावावं कपाळाला, छातीला. सर्दी पूर्णपणे खेचून घेतं. आराम मिळतो. हे गारही लावलेलं चालतं, नुसतं उगाळून. असे अनेक उपाय आहेत. आत्ता इतकेच आठवले. माझी खात्री आहे तुम्हालाही असे अनेक हुकमी, हटके, उपाय ठाऊक असतील. ते वाचण्यास उत्सुक आहे...

वाचने 37656 वाचनखूण प्रतिक्रिया 49

In reply to by सुहास..

वेल्लाभट Mon, 08/11/2014 - 11:55
ठाऊक आहे ! :) गरम पाण्यातून रम घ्यावी असा एक उपायही ऐकिवात आहे. फक्त धागा हेलकावे खायला लागेल म्हणून नमूद केला नव्हता.

In reply to by धन्या

नाव आडनाव Mon, 08/11/2014 - 16:47
लोक स्व"देशी" चा आग्रह धरत नाहीत आजकाल, जो तो वृद्ध सन्याश्याचा भगत झालाय :) काही लोक फलाहार (फळांचा रस) करतात तर काही गोपाळकाला (बरेच रस एकत्र).

सुहास.. Mon, 08/11/2014 - 11:58
मिपावर मध्यंतरी सर्दी वर गाढ चिंतन झाले होते , त्याबद्दल कुणी पुराण पुरुष धागे उकसुन लिंका देतील का ? ..उदा " सर्दी झाल्यावर बदललेला आवाज " म्हणजे " बम्मी, तु जेवायला आज माचे केले आहेत का ? " ;)

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 12:00
६० मिलीवोडका जाळुन त्याची शिल्लक असलेली राख एक चमचा मधातुन घ्यावी. असे एका दिवसात तीनदा करावे. अक्सीर इलाज, मी करुन पाहीला नाही फक्त ऐकला आहे. स्वतःच्या जबाबदारीवर करावा ;)

पिवळा डांबिस Mon, 08/11/2014 - 12:09
१. ठेचलेलं आलं + ६० मिलि स्कॉच + गरम पाणी... २. ठेचलेली सुंठ + ६० मिली स्कॉच + गरम पाणी... ३. ओव्याची पूड + ६० मिली स्कॉच + गरम पाणी... अधिक विचार करता.... आलं, सुंठ आणि ओवा नसला तरी चालेल.... आणि गरम पाण्याऐवजी बर्फाचे खडे घ्यायलाही काही हरकत नाही!!!! ;)

एस Mon, 08/11/2014 - 12:30
सर्दीवरून संदीप खरेची 'यलो ऑकर' नावाची कथा आठवली. 'त्याला सर्दीही बरीच झाली होती आणि ती बरीही होत नव्हती.' 'तो कॅनव्हासवर हलकेहलके फटकारे मारू लागला.' 'यलो ऑकर. खूपच जपून वापरावा लागतो.' 'तुझी रेष अशी बोअरिंग वाटते. नाचरी नसते. ती म्हणायची' 'माझ्या रेषांमध्ये एक अनोखे कंटाळलेपण आहे.' 'बॉस तिला तिरुअनंतपुरमला घेऊन गेला आहे - राघवने डोळा मारून सांगितली न्यूज.' असोत. सर्दी बरी होत नसली की चित्र काढायला घ्यायचे. पॅलेटमध्ये यलो ऑकर. मनात न संपणारा रिकामपणा. डाव्या हातांच्या बोटांत कालचेच विझलेले थोटूक. विझलेलेच असू देत. पेटूनतरी काय करणारेय!

In reply to by संजय क्षीरसागर

एस Tue, 08/12/2014 - 10:45
'साप्ताहिक सकाळ' मध्ये आली होती सुमारे १९९८-९९ च्या आसपास. कथास्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती कथा होती ती. तेव्हा संदीप खरे हा 'संदीप खरे' म्हणून प्रसिद्ध झाला नव्हता बहुतेक. पण काय कथा होती ती! माझ्याजवळ कदाचित जुना अंक असेल. सापडल्यास फोटो काढून व्यनिने पाठवतो. कथेचा सारांश असा आहे: तो आर्टस्कूलमधून नुकताच बाहेर पडलेला चित्रकार. त्याचं सगळंच कसं अ‍ॅवरेज. हुशारी, यश, दु:ख, अगदी सगळंच. म्हटलं तर नेत्रदीपकही नाही, किंवा छातीला कवटाळून बसावं असं वाईटही नाही. कॉलेजातले सगळेच कुठे ना कुठे अ‍ॅड एजन्सीत पार्टटाईम चिकटलेले म्हणून हाही एका एजन्सीत जातो. तिथे त्याला 'वेणू' भेटते. त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी. बोलकी, हसरी, अगदी परी नाही तरी नीटस. तिच्या रेषा कशा तिच्यासारख्याच मस्त. ह्याची रेष मात्र बोअरिंग. सरळसोट जाणारी. 'नाचरी नसते रे तुझी रेघ.' तिला आश्चर्य. ह्याला तिच्याबद्दल काय वाटतं तो सांगू शकत नाही. थोडं बोलतातही ते आता. म्हणजे ती जास्त. तो थोडेफार गायचाही तिच्या आग्रहामुळे. एकदा पार्टीला थोडं नाचूनही दाखवलं होतं. तशातच राघवने त्याला ऑफिस सुटल्यावर ती दाखवली. 'काय?' 'अरे, तुला ठाऊक नाही? ओपन सिक्रेट आहे. तिचा नवरा रे. म्हणजे थोडा वेगळाच आहे तो. उगाच नाही ऑफिसमधले सगळे तिच्या पुढेपुढे करत! हा, पण मानलं तिला. कुणाला इतकं नाही सरकू देत.' गाडीवर त्याच्यामागे बसून ती गेली. एकदा अशीच त्याचा हात एकदम हातात घेऊन ती म्हणाली, 'तू मला आवडतोस की नाही माहीत नाही. सगळ्या जखमा कुठे बर्‍या होतात. पण छोटी असली तरी बरी न होणारी जखम त्रास देतेच ना!' दुसर्‍या दिवशी त्याने रिजाइन केलं. एक महिन्याची नोटिस. शेवटच्या दिवशी सेंडऑफ झाला. त्या तिघांतच. दुसर्‍या दिवशी बॉस तिला घेऊन तिरुअनंतपुरमला मीटिंगला गेल्याची बातमी राघवने डोळा मारून सांगितली. 'तुझी अ‍ॅनाटॉमी सुधारायला पाहिजे.' बॉस तिला म्हणायचा. 'आता काय करणारेस?' 'काही नाही. झक्क चित्रं काढणारेय. माझ्या रेषांमध्ये जिवंतपणा नाही. अनोखे कंटाळलेपण आहे. बोअरडम आहे. पण तरीही रोजच्या जगण्याचा पवित्र व्यभिचारही आहे.' पॅलेटमध्ये रंग घेऊन तो कॅनव्हासवर हलकेहलके फटकारे मारू लागला. 'यलो ऑकर. सर म्हणायचे, वापरायला खूप अवघड. जमला की चित्राचं सोनं करतो. बिघडला की वाटोळं.'

कविता१९७८ Mon, 08/11/2014 - 16:02
लहानपणापासुन मला अ‍ॅलर्जीची सर्दी होती. जरा वातावरण थंड झाले की घशाला काटे येत, वारंवार शिंका यायच्या, सकाळी उठल्यावर किमान अर्धा तास वारंवार शिंका, पंखा लावला की शिंका , फुलांचा किंवा अत्तराचा किंवा कुठलाही उग्र वास आला की शिंका , धुळीमुळे शिंका, रोज रोज शिंका देउन देउन कंटाळायचे. मग प्राणायाम सुरु केले आणि आता ८०-९०% आटोक्यात आहे.

सविता००१ Mon, 08/11/2014 - 16:51
माझ्या नवर्‍यालाही अ‍ॅलर्जिक सर्दीचा प्रचंड त्रास होता. आता प्राणायामाने खूप आटोक्यात आहे. तरीही सुंठीचा लेप वगैरे अधुन मधुन चालते. पण नाहीतर प्रचंड औषधांनीच कंटाळायचा तो. शिवाय मग अ‍ॅसिडिटी व्हायची ती वेगळीच!

In reply to by सस्नेह

धन्या Mon, 08/11/2014 - 19:13
सर्दी औषध घेतल्यास सात दिवसात व न घेतल्यास एक आठवड्यात बरी होते
हे वाक्य बर्‍याच आरोग्यविषयक पुस्तकांमध्ये असते. :)

In reply to by सस्नेह

सुहास.. Wed, 08/13/2014 - 21:47
खेकड्याचा रस्सा प्यावा. >>> सर्दी न होता , वर्षभर पेण्याचे सोय असल्याल आम्ही " मॅनेजर " आख्ख ऑफीस " तिकडे" शिफ्ट करु शकतो .... क्लाईंट बरोबर वट्ट असलेला वाश्याच

स्पा Mon, 08/11/2014 - 19:18
१. गरम पाण्यात बचकभर विक्स टाकायचं आणि दणकून वाफारा घ्यायचा २. नेहमीचा चायनिस वाला गाठायचा आणि कडक मंचाव सूप प्याच. ३. गरम दुधात चमचाभर हळद. छोटा चमचा सुंठ टाकून रात्री झोपताना घ्यायचं ४. खडीसाखर -कोरफडीचा गर मिक्स करून दिवसातून तीनदा :)

In reply to by धन्या

स्पा Mon, 08/11/2014 - 19:53
धन्य मिळत असावा, आम्ही घरीच लावलीये ग्यालरीत मल्टी पर्पज युज कापून फ्रीज मध्ये ठेवायची आणि रात्री झोपताना गार डोळ्यांना लावायचा, दिवसभर सिस्टिम्स वर काम करून डोळ्यांची हालत होते, त्यासाठी मस्ट. कैलास जीवन पण बेस्ट :)

In reply to by धन्या

हाडक्या Mon, 08/11/2014 - 22:14
अंम्मळ गडबड होतेय काय ? घायपात वेगळी आणि कोरफड वेगळी. घायपातीची पाने लांब असतात आणि त्या पानांचे दोर वळून तात्पुरती दोरी म्हणून जळण, भारे नेण्यासाठी भरपूर उपयोगी. कोरफड तशी नाजूक, गरवाली आणि अंगचटीला लहान. घायपात (Agave cantala अथवा agave) : http://subirimagen.infojardin.com/subida/images/opt1292629424r.jpg कोरफड (Aloe vera): http://en.wikipedia.org/wiki/Aloe_vera

केदार-मिसळपाव Mon, 08/11/2014 - 19:54
सकाळी नी संध्याकाळी एक चमचा चवनप्राश खात जा मग नाष्टा करा. बहुतेक आजार जवळच येणार नाहित कारण रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असेल.

कंजूस Mon, 08/11/2014 - 19:56
जुनी पुस्तके कपाट इत्यादीची आवराआवर केल्यावर रात्री शिंका आल्यास ओळखावे की ही जुनाट धुळीची अथवा त्यात लपलेल्या बुरशिची अॅलर्जी आहे .त्यासाठी १)डॉक्टरचे औषध न घेता वरीलपैकी आवडीचे औषध चार मिपाकरांसमवेत घ्यावे , २)ट्रेकला जावे .तिथल्या मोकळ्या हवने नाक एकदाही फुरफुरत नाही परंतू परत आल्यावर पुन्हा शिंका आल्यास अॅलर्जि कन्फर्म .रात्री परवडेल असा उतारा ,गवती चहा ,इत्यादि घ्यावा . हातपाय गळताहेत ,अशक्तपणा वाटल्यास बदामाचा शिरा खावा .त्याची कृती : पाच बदाम किसावेत . चमचाभर तुपावर सावकाश भाजावेत .लालसर होऊ लागले की झाले .खडीसाखरेबरोबर खावे .शिरा एवढा गुणकारी आहे की अधूनमधून सर्वाँनाच सर्दी झाल्यासारखे वाटते .

In reply to by कंजूस

पिंगू Mon, 08/11/2014 - 21:41
ह्या शिर्‍यात एक-दोन चमचे खसखस घाला आणि मग खाऊन बघा.. टोटल विश्रांतीसाठी हा प्रकार करावा. मज्जा म्हणून करु नये.

सर्दी हा शरीराचा, टॉक्सीन्स बाहेर फेकण्याचा उपाय आहे. अशा वेळी शरीराला सहकार्य करणं हिताचं आहे. सर्दी घालवण्यासाठी केलेले उपचार शरीराच्या इनबिल्ट करेक्शन सिस्टमला खिळ घालतात. पहिली गोष्ट, सर्दीला सहकार्य करा, ती शरीर शुद्धीकरणाला मदत करतेयं. तिच्याशी पंगा घेऊ नका. या अ‍ॅटीट्यूडनं ९०% सर्दी बरी होते. शिंका येणं आणि नाक साफ करणं उत्साहानं करा. विरोध आणि चिडचिड सोडून द्या. दुसरी गोष्ट, शरीराचं तापमान कायम ठेवण्यासाठी जमेल तसं गरम पाणी प्या. रात्री झोपतांना आणि सकाळी उठल्यावर तर नक्की प्या. तिसरी गोष्ट, झोपतांना कपाळ, नाक आणि छातीला निलगिरीचं तेल (किंवा विक्स) चोळा. यानं श्वास मोकळा राहून मधे जाग येणार नाही. तुम्हाला सर्दी उपकारक वाटेल आणि दोन-तीन वर्षातनं, ती एकदा कधी तरी येईल तेव्हा तुम्ही तिची मजा घेऊ शकाल.

माहितगार Wed, 08/13/2014 - 20:15
*डीसक्लेमर खालील माहिती व्यक्तीगत अनुभव अथवा ऐकीव असू शकते. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नव्हे काही उपाय वर दिले आहेतच. सी व्हिटॅमीन इफेक्टीव्ह असतच पण त्या सोबतच टोमॅटो सूप किंवा कढी ही चालू शकेल. बरेच जण गरम पाणी घेतात पण जमल्यास सूप्स त्याच्या थीकनेसमुळे अधीक उत्तम ठरतात. काढ्यांचे विवीध प्रकार आहेतच. आहार घेणे नकोसे होते पण प्रत्यक्षात कॅलरीज आणि प्रोटीन्स वाढवण्याची गरज असू शकते (खास करून स्वाईन फ्लू ची शक्यता टाळण्यात मदत म्हणून कॅलरीज आणि प्रोटीन्स अत्यंत आवश्यक) म्हणून गरम वरण पिणे हाही एक चांगला उपाय. हरबर्‍याच्या दाळीचे विवीध गरम पदार्थ खाताना सहसा त्रास कमी होतो खास करून घसाही धरला असेल तर पापड, फुटाणे अथवा दाळव (याला अजून एक शब्द आहे आठवत नाहीए) भाजून वर किंचीत हळद मीठ जीरे टाकल्यास तोंडाला बरी चव येण्यास मदत होते. तोंड आलेले नसेल आणि हैशी तीखट खवय्ये असालतर तर मिरचीचा भरपूर लसूण+मिरे+लवंग+ दालचीनी आणि हळद (हे सारे तव्यावर परतून) केलेला ठेचा आणि भाकरी. काही लोक खूप पिकलेला पेरू खाण्यास सूचवतात. असाच विश्वास बसणार नाही असा जालीम उपाय म्हणजे किंचीत उपाशी पोटी चिक्कार आईस्क्रीम पाठोपाठ गरम पाणि पिऊन छान झोप घेणे, यात बहुधा हाय कॅलरी लेव्हल मदतीस धावून येत असावी. सातत्याने सर्दीचा त्रास होणार्‍यांना गरम पाण्याने स्नान टाळण्याचाही थंड पाण्याने सल्ला दिला जातो याची येथे नोंद घेता येईल. कॅलरी लेव्हल खास करून मुलांमध्ये वाढवण्यासाठी (आणि मोठ्यांनाही ठिक) मुक्त हस्ताने चॉकलेट्स द्यावीत सोबत गरम पाणी आणि पक्के व्हेजेटरीअन असालतर प्रोटीन लेव्हल वाढण्यासाठी दोन बदाम दोन काजू न मोजता पाव किलो मिक्स ड्रायफ्रूटचा पॅक फस्त करण्याची गरज असू शकते. कच्ची हळद असलेल्या काळात कच्च्या हळदीची राजस्थानी स्टाईल भाजी (पाकर्‍ विभागात मागे अस्मादीकांनी रेसिपी दिली आहे). भाजलेले लसूण हळद गूळ यांची गोळी + हळद दूध हा झोपतानाचा उपाय करत असाल तर हळद गूळ गोळी + हळद दुध घेतल्या नंतर काही न बोलणे अथवा तोंड न उघड्ण्याचे पथ्य पाळावयास हवे नाहीतर हवा तसा परिणाम न मिळण्याची शक्यता असते. आयूर्वेदाच्या बाजूला नस्य नावाची प्रक्रीया असते पण त्या साठी खूपच सिंसीयर आयुर्वेदीक वैद्याची आवश्यकता असते. खासकरून त्या पद्धतीतले कमीत कमी वाफारा अथवा शेकण्याची पद्धत माहित करून घेणे. खूपच जास्त सर्दी असेल तर गरमपाण्याची पिशवी घेऊन सरळ माथा शेकणे इफेक्टीव्ह असू शकते. वारंवार सर्दी होण्याची प्रकृती असेल तर सर्दी पुर्ण गेल्या नंतर अ‍ॅलोपथिक फेमिली फिजीशीयनच्या मदतीने अँटीव्हायरल इंजेक्शन उपयूक्त ठरू शकते असे ऐकुन आहे. * डीसक्लेमर वरील माहिती व्यक्तीगत अनुभव अथवा ऐकीव असू शकते. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नव्हे.

कंजूस Fri, 08/15/2014 - 13:49
डिस्क्लेमरच्या छत्रीखाली बरीच सावली आहे . हळद गुळचाच तयार पर्याय म्हणजे डेकोफ्सिन गोळया मिळतात .नाव अलोपथिक वाटले तरी आयुर्वेदिक आहे .लहान मुलांच्या सर्दी आणि खासकरून खोकल्यावर चांगला उपाय .अर्धी गोळी चुरडून चार थेँब मधात चाटवायची . नस्य करायचा सोपा आणि सुरक्षित उपाय :कपभर पाण्यात चिमुटभर मीठ विरघळवायचे हे पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवणे .आइड्रॉप्स टाकायच्या चोचवाल्या (नॉझल) बाटलीत ठेवले तर उत्तम .डोके मागे करून छताकडे पाहत या बॉटलमधून चार चार थेंब नाकपुडींत तासातासाने टाका .डोळयांतही टाका .चोंदलेले नाक ,कपाळात साठलेली सर्दी लगेच सैल होते .प्रवासात नेण्यास उपयोगी .डोळ्यांत कचरा गेला ,उन्हाने डोळे लाल झाले की चार थेंब टाकले की गारवा येतो .