मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुस्तके सुचवा ना !

आशु जोग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना ! पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम. मीही जराशी यादी देत आहे.
पुण्याची अपुर्वाई - अनिल अवचट
... बाबाने पुण्याचे केलेले पर्यटन, पुस्तक वाचताना आपणही बाबाबरोबर पुणे पहात हिंडत आहोत असे वाटते.
राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे
... शिवाजी महाराजांचे चरीत्र आहे.
शतदा प्रेम करावे - अरुण दाते
... अरुण दाते यांचा जीवनप्रवास. लता मंगेशकर ते सलमानखान आणि जावेद अख्तर ते जगजीतसिंग यांचे संदर्भ येतात. अतिशय संदर्भसंपन्न पुस्तक आहे.
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस)
... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.
पवनाकाठचा धोंडी - गो. नी. दांडेकर
... पवनेकाठच्या मावळ परिसरात घडलेली ही दोन भावांची गोष्ट आहे. यात धाकट्या भावाला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवणारा मोठा भाऊ आणि वहिनी आहेत. यावर आधारीत मराठी चित्रपटही आला होता. चंद्रकांत सूर्यकांत यांच्या भूमिका होत्या. गोनीदांच्या लिखाणाची मोहिनी का पडते हे समजण्यासाठी वाचकांनी त्यांची 'माचीवरला बुधा', 'शितू' ही पुस्तकेदेखील अवश्य वाचावीत.
पानिपत - विश्वास पाटील
... पानिपतच्या युद्धावरील ही कादंबरी आहे. कादंबरी असली तरी सत्यावर आधारलेली आहे. लिखाण ओघवते आहे. प्रत्ययकारी आहे. या पुस्तकाने मराठीतील ऐतिहासिक कादंबर्‍यांची पूर्वीचे चौकट मोडून नवी निर्माण केली असे मानले जाते.
अमरनाथ संघर्ष - गिरीश प्रभुणे
... पालावरचं जिणं, पारधी हे विषय सोडून प्रभुणे यांनी वेगळ्या विषयावर लिहिलेले पुस्तक आहे. अमरनाथ हे भारतामधे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. यात्राकाळात राज्याचा वनविभाग काही जमीन अमरनाथ बोर्डाला वापरायला देते. त्याचे भाडेही वसूल करते. मेहबूबा मुफ्ती, गुलाम नबी आझाद यांचे राज्यात शासन असताना ही जमीन बोर्डाकडून काढून घेतली. त्याविरुद्ध हिंदूंनी संघर्ष केला. हिंदूंचा जोर पाहून देशाबाहेर निष्ठा असलेले लोकही त्यात सामील झाले. अखेर मुफ्ती-आझाद यांना माघार घ्यावी लागली. काश्मीरमधील सद्यस्थिती समजून घेण्यास पुस्तक उपयुक्त आहे.
शांतारामा - हे हिंदी चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम यांचे आत्मचरीत्र आहे. पुस्तक अत्यंत रंजक पद्धतीने लिहिले आहे. लेखनसहाय्य शांताराम यांच्या मुलीने म्हणजे मधुरा जसराज यांनी केले आहे. मूकपट, काळेपांढरे बोलपट आणि रंगीत चित्रपट अशा तीनही कालखंडात शांताराम वावरले. भारतीय चित्रपट व्यवसायात होत गेलेले बदलही त्यांनी पाहिले. हिंदी चित्रपटाचा इतिहास म्हणून या पुस्तकाचे मोठे महत्त्व आहे.
आवरण - एस एल भैरप्पा (अनु उमा वि कुलकर्णी)
... हिंदूस्थानावर अल्लाउद्दीन खिलजी, मोह बिन कासिम अशा परक्यांची आक्रमणे झाल्यानंतर या देशाची स्थिती काय झाली? हिंदूस्थानातल्या अनेक देवळांची मोडतोड कशी झाली हे यात वाचायला मिळते. अर्थात हा इतिहास आजचे वर्तमान समजून घेण्यासही उपयुक्त आहे. या पुस्त्कावर गिरीश कर्नाड, यु. आर. अनंतमूर्ती यांनी एकांगी असल्याचा आरोप करीत खूप टीका केली होती. पण मोठा वाचकवर्ग या पुस्तकाला लाभला. एक नवी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे.
मी इडली आणि ऑर्कीड - विट्ठल कामत
... ही एका हॉटेल व्यावसायिकाची गोष्ट आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय कसा वाढवला याबाबत यामधे वाचायला मिळते. शाकाहारी भोजनासाठी प्रसिद्ध असणार्‍या कामत हॉटेलमधे नॉन-व्हेजलाही बदलत्या काळाप्रमाणे विट्ठल कामत यांनी स्थान दिले. वाचताना भारावून जायला होते. पण नीट विचार केला तर अनेक विसंगती सहज लक्षात येऊ शकतात. लेखकाच्या काळात व्यवसाय वाढला असे मानले तरी. वडीलांच्या काळातच कामत हॉटेल्सची संख्या प्रचंड होती. कामत स्वतःला इकोफ्रेंडली व्यावसायिक म्हणवून घेतात. पण हॉटेल व्यवसाय इकोफ्रेंड्ली असूच शकत नाही असे तज्ञांचे मत आहे. अनिल मुकेशपेक्षा शून्यातून उद्योगविश्व निर्मिणार्‍या धीरुभाईंचे मोठेपण अधिक आहे. तेच इथेही. बा द वे काही वर्षापूर्वी 'मी मनू आणि संघ' या नावाचे पुस्तक मराठीत आले होते. त्याच्या शीर्षकाची आठवण झाल्यावाचून राहात नाही.
मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट
... मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची ही कहाणी आहे. डॉ सुनंदा अवचट यांनी या संस्थेची सुरुवात केली. पुढील काळात अनेकांनी याचा लाभ घेतला आणि नव्या जीवनाला सुरुवात केली. पेशंटबरोबर वावरताना त्याच्या मनाचा, मानसशास्त्राचाही मोठा अभ्यास यात पहायला मिळतो.
नॉट गॉन विथ द विंड - विश्वास पाटील
... बर्‍याच गोष्टी काळाबरोबर पाचोळ्यासारख्या उडून जातात. काही गोष्टी मात्र टिकून राहतात. अशाच वर्षानुवर्षे टिकून राहिलेल्या जगभरातील कलाकृतींबद्दल यात वाचायला मिळते. रोमन पोलन्स्कीपासून स्टीवन स्पिलबर्गपर्यंत अनेकांच्या कलाकृतींचे यात रसग्रहण आहे. गॉडफादर आहे, अ‍ॅथेल्लो आहे. पानिपतातला नजीब आणि अ‍ॅथेल्लोमधला इयागो यांचा नेमका काय संबंध आहे हे समजण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तकच वाचायला हवे. विश्वास पाटील यांचा जगभरातल्या सिनेमाचा आणि साहित्याचा व्यासंग थक्क करायला लावणारा आहे. पाटील यांना एवढा वेळ कुठून मिळतो असा प्रश्न पडतो. त्यांच्या दिवसाला २४ पेक्षा अधिक तास असावेत असा अंदाज आहे.

वाचने 69547 वाचनखूण प्रतिक्रिया 227

चौकटराजा Mon, 08/12/2013 - 16:56
दास्तां ए नौशाद - लेखक नौशाद अली.--- लखनौ येथे वाद्यांच्या दुकानात झाडू मारण्याच्या नोकरीपासून चित्रपट संगीतात उच्च कामगिरी असा पट. मुक्य म्हणजे नौशाद यानी " मी" टाळला आहे. चार्ली चापलीन मला सर्वात जास्त आवडलेले आत्मचरित्र. केलेली लफडी, नाकारलेले पितूत्व, चापलीनच्या खुनाचा प्रयत्न, महायुद्धात भाग न घेतल्याबद्द्ल लोकांचा रोष, मित्र मैत्रिणी, आई, चित्र्पट निर्मीतीचे खुलासे. एवढेच काय कुठे काय खाल्ले कुठे पैसे गुंतविले सगळे सगळे ...एकदम बहारदार पुस्तक .

In reply to by मालोजीराव

सौंदाळा Mon, 08/12/2013 - 17:51
अरे हो, मायकल क्रायटन राहीलाच की.. आणि आर्थर हेली पण (कालच मायकल क्रायटनचे 'काँगो' वाचुन संपवलेला) सौंदाळा..

In reply to by मालोजीराव

आदूबाळ Mon, 08/12/2013 - 18:59
:) क्या बात! या धाग्यावर जूल वर्नची आठवण निघेल असं वाटलं नव्हतं. छोटी दुरुस्ती - जूल वर्नची काही पुस्तकंच चांगली आहेत. मागे एक "द एण्ड ऑफ नाना साहिब" नामक त्याचं तद्दन भिकारडं पुस्तक वाचलं होतं...

In reply to by मालोजीराव

चौकटराजा Tue, 08/13/2013 - 10:41
या असामीच्या उल्लेखाने बालपणात गेलो. " बालमित्र " मासिक मग त्यावरून भा रा भागवत मग त्यावरून फास्टर फेणे असा प्रवास आठवणींचा झाला. एडगर राईज बरोज यांची " टारझन" ही मालिका, एच जी वेल्स यांचे मूळ लिखाणाचे रुपांतर " कालयंत्र" सारे आठवले ! धन्यवाद !

विटेकर Tue, 08/13/2013 - 11:58
दुर्गा भागवात .. क्लास पुस्तक आहे ! ललित लेखनाचा मानदंड ठरावा असा लेखसंग्रह !त्यातील पैस लेख तर खासम खास ! उमा कुलकर्णीनी भैरप्पांची अनुवाद केलीली सारी पुस्तके वाचावीत.. अप्रतिम आहेत , वर वंश चा उल्लेख आला आहे. नर्मदा परिक्रमेवरील भारती ठाकूर यांचे पुस्तक . एका बैठकीत संपवले आहे.. क्लास ! गोनिदा - सारी पुस्तके त्यातही भ्रमणगाथा आणि स्मरणगाथा विशेष ! प्रादेशिक मध्ये पूर्णामायची लेकेरं झकास ! पावलांपुरता प्रकाश - बा. भ बोरकर आणि आतले आणि बाहेरचे - अनंत काणेकर - सुरेख लेख्स ! समिधा - साधना आमटे जरुर वाचा - तेथे कर माझे जु़ळती असे वाटायला लावणारे पुस्तक ! आणि ब. मो,च्या शिव-चरित्राची पारायणे करावीत !

In reply to by तिलोत्तमा

सागर Sun, 09/08/2013 - 22:20
एकदम सुंदर पुस्तक आहे. पलायनकथांमध्ये ही कदाचित सर्वोत्कृष्ट ठरावी मूळ लेखक गंथर बान्हमान एक जर्मन सैनिक आफ्रिकेतून का पळ काढतो आणि त्याला काय काय अनुभव येतात याची एक सत्यकथा या निमित्ताने वाचायला मिळते. दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचे अगदी सुंदर व अनेकदा वाचले तरी आनंद मिळेल असे पुस्तक आहे

आदूबाळ Tue, 08/13/2013 - 15:57

नावं विसरलेली पुस्तकं

[कधीतरी वाचलेली, पण आता विस्मृतीत जात चाललेली] (या धाग्यातच हात धुवून घेतो, जोग साहेबांची हरकत नसेल तर) १. कुर्ला स्टेशनवर बूटपॉलिश करणार्‍या एका मुलावर आधारित कादंबरी आहे. लेखक जयवंत दळवी किंवा रत्नाकर मतकरी असावेत. २. सुशिंची एक कादंबरी आहे त्यात एक अपंग मुलगी एका कॉलेज हीरो टाईप तरूणाला आपल्या प्रेमपाशात अडकवते आणि लग्न करायला भाग पाडते. ३. वॉर अँड पीसचा एक मराठी अनुवाद आहे. लेखक आठवत नाही, पण प्रकाशक बहुदा गिरगावांतले लाखाणी बुक डेपो असावेत. ४. समांतर विश्व आणि टाईम ट्रॅवलच्या कल्पनेवर आधारित एक विज्ञान कादंबरी आहे. त्यात एक माणूस एका मुलीच्या प्रेमात पडतो. काही कारणाने तो समांतर विश्वात जातो, तिथे ती त्याची मुलगी असते असं काहीतरी कथानक आहे. कुणाला या पुस्तकांची नावं आठवत असतील तर प्लीज सांगा. :)

In reply to by प्रचेतस

किसन शिंदे Wed, 08/14/2013 - 11:20
पहिली कादंबरी ' झिपर्या' , लेखक अरूण साधू.
येस्स! लोकलच्या लायनीवर वावरणार्‍या ८-९ वर्षाच्या मुलाचं भावविश्व फार सुरेख लिहलंय त्यांनी.

In reply to by आदूबाळ

चिगो Wed, 08/14/2013 - 17:52
सुशिंची एक कादंबरी आहे त्यात एक अपंग मुलगी एका कॉलेज हीरो टाईप तरूणाला आपल्या प्रेमपाशात अडकवते आणि लग्न करायला भाग पाडते.
ही कुठली? "काटेरी"चा विषय ह्याच्या जवळपास जाणारा आहे, पण हाच असा नाही.. सुशिंची इतर : दास्तान (सुहासने आधीच सांगितलंय), कल्पांत, क्षितीज, दुनियादारी (डिपेंड्स ;-)), झूम.. मला सगळीच आवडतात.. :-) गोनिदा : दुर्गभ्रमणगाथा, पवनाकाठचा धोंडी, माचीवरचा बुधा आणि इतर अरुण साधु : झिपर्‍या, मुंबई दिनांक पुलं : सगळीच.. वपु : वन फॉर द रोड, सखी, कर्मचारी, कॅलेंडर बायको आणि मी.. जेफ्री आर्चर : केन अँड आबेल, देअरबाय हँग्स अ टेल, पाथ्स ऑफ ग्लोरी.. आत्ता-आत्ताची काही सोडल्यास बाकीची चांगली आहेत.. नॉन-फिक्शन आवडत असल्यास, "द लास्ट मुघल", "द व्हाईट मुघल्स", "इंडीया आफ्टर गांधी"..

In reply to by चिगो

बाबा पाटील गुरुवार, 08/15/2013 - 11:55
व पुं ची सखी आनी पर्टनर .......या दोन्ही कथांनी मनावर वेगळच गारुड केल. तशी सखी आनी पार्टनर मिळण असे माझ्यासारख्या असंख्य वेड्यांच स्वप्न असत.

In reply to by बाबा पाटील

सागर Wed, 09/04/2013 - 19:51
व पुं ची सखी आनी पर्टनर .......या दोन्ही कथांनी मनावर वेगळच गारुड केल. तशी सखी आनी पार्टनर मिळण असे माझ्यासारख्या असंख्य वेड्यांच स्वप्न असत. एकदम सहमत आहे. पार्टनर एकदम बेस्ट

दशानन Tue, 08/13/2013 - 22:43
गांधीनंतरचा भारत रामचंद्र गुहा, यांचे एक अप्रतिम पुस्तक. नेमकं मुद्दे मांडणारे, नेमकं काय घडले व काय घडत आहे यावर प्रकाश टाकणारे एक उत्तम पुस्तक. ज्यांना या विषयात आवड आहे, त्यांनी आवर्जून वाचावेच असे पुस्तक. मेकर्स ऑफ मॉर्डन इंडिया ज्यांनी वाचले आहे, त्यांना नक्कीच आवडेल हे पुस्तक.

In reply to by आशु जोग

आदूबाळ Wed, 08/14/2013 - 12:11
हो मलाही चटकन व्यंकटेश माडगूळकरांचंच आठवलं होतं. माकडांच्या टोळीतली सत्तास्पर्धा असा काहीतरी विषय आहे बहुतेक...

In reply to by आदूबाळ

मोदक Wed, 08/14/2013 - 19:17
हो. आज दोन्ही पुस्तके मुद्दाम चाळून पाहिली. तुम्ही म्हणताय ते व्यंकटेश माडगुळकरांचे आहे. मी म्हणतो आहे ते "सत्तांतर - १९४७" खंड १ व २ - लेखक गोविंदराव तळवळकर.

In reply to by मोदक

सागर Sun, 09/08/2013 - 22:36
मोदका छान विषय छेडलास तू. सत्तांतर ही गोविंद तळवलकरांची ३ खंडांची मालिका आहे. सत्तांतरः १९४७ हे पुस्तकाचे नाव. १९४७ च्या फाळणीच्या इतिहासावर अतिशय परखड भाष्य तळवलकरांनी केलेले आहे. माझ्याकडे हे तिन्ही खंड सुदैवाने आहेत. पुस्तकाचा दर्जा काय आहे हे बुकगंगावर झलक पाहून ठरवता यावा सत्तांतरः १९४७ - खंड १ सत्तांतरः १९४७ - खंड २ सत्तांतरः १९४७ - खंड ३

In reply to by सागर

मोदक Sun, 09/08/2013 - 23:52
माझ्याकडे सत्तांतरचे दोनच खंड आहेत तेही १९८३ च्या पहिल्या आवृत्तीचे. तिसर्‍या खंडाच्या माहितीबद्दल आभार्स!

मालोजीराव Wed, 08/14/2013 - 12:13
फिलाडेल्फिया एक्सपेरिमेन्ट एका सत्यघटनेवर वर आधारित एक पुस्तक वाचल होतं, लेखकाचं नाव आठवत नाही पण जबरदस्त होतं पुस्तक अमेरिकेत बहुतेक बंदी आहे त्यावर

नानबा Wed, 08/14/2013 - 14:16
बखर बिम्मची - जी.ए.कुलकर्णी जी.ए. म्हटलं की एक गूढ अर्थ दडलेलं लेखन हे वेगळं सांगायला नकोच. आणि त्यांनी हाच गाभा बालसाहित्यात कायम ठेवलाय तो या पुस्तकातून. बिम्म नावाच्या एका ४-५ वर्षांच्या मुलाची ही कथा. त्याची आई, बहिण बब्बी, आणि त्याच्या आजूबाजूचं निरागस जग खास जी.ए. शैलीत असल्यामुळे वाचायलाच हवं. आणि या पुस्तकाच मला भावलेलं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या वयात वाचताना त्या त्या वयाला अनुसरून वेगवेगळा गर्भितार्थ कळत जातो

आशु जोग Wed, 08/14/2013 - 19:59
एक होती प्रभात नगरी - हे बापू वाटवे यांचे पुस्तक अफाट आहे. 'एका स्टुडीओचे आत्मवृत्त' हे प्रभाकर पेंढारकर यांचे पुस्तक त्यामानाने सपाट आहे. बापू वाटवे 'प्रभात नगरी'मधे एक वेगळेच विश्व उभे करतात. अलिकडे अशी चांगली संदर्भमूल्य असलेली पुस्तके बाजारात उपलब्ध नसतात. ती मुद्दाम मिळवून वाचावी लागतात.

In reply to by आदूबाळ

आशु जोग Wed, 07/30/2014 - 12:16
शाळा वाचले. स्वानुभव वाटतो. लेखकाने तो काळ उभा केलेला आहे. पण एवढ्या वर्षापूर्वीच्या घटना बारकाईने लिहिल्यात हे विशेष वाटते. अनेकांना हे आपले स्वतःचे अनुभव वाटू शकतील. यावर आलेला चित्रपटही छानच होता. तो आधी पाहीला असल्याने पुस्तक वाचताना चित्रपटातलीच पात्रे डोळ्यासमोर येत राहतात.

आशु जोग गुरुवार, 08/15/2013 - 11:24
हिंदूस्थानच्या इतिहासात आर्य चाणक्य हा एक द्रष्टा महापुरुष होवून गेला. त्याचे आर्थिक आणि सामरीक (strategic) चिंतन आजही उपयुक्त आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी चाणक्यावर काढलेली दूरदर्शन मालिका चाणक्य समजून घेण्यास उपयोगी आहे. चाणक्यावर मराठीमधे एखादे पुस्तक आहे का ? (बाळशास्त्री हरदास यांचे पुस्तक वाचले होते. पण काही समजले नाही.)

In reply to by आशु जोग

अर्धवटराव गुरुवार, 08/15/2013 - 22:50
लेखक बहुतेक कोणि कानि(ने)टकर आहेत. प्रकाशक आता आठवत नाहि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आशु जोग Fri, 08/16/2013 - 00:57
वसंत कानेटकर, वि ग कानिटकर दोन्हीही बघेन कौटिल्यासाठी.

यशोधरा गुरुवार, 08/15/2013 - 19:50
सर्वप्रथम आशु जोग, तुमचे आभार इतका सुरेख धागा काढल्याबद्दल. खूप जणांनी बरीचशी पुस्तके सुचवली आहेत, त्यात हे माझे २ पैसे. जशी पुस्तके आठवत आहेत तशी यादी टंकते - त्यातल्या त्यात साधारण एका प्रकारची पुस्तके एकाच ग्रूपमध्ये ठेवायचा प्रयत्न करते. सुरुवात कवितांपासून करते. अनेक कवितासंग्रह अत्यंत आवडीचे आहेत, सद्ध्या हे - १. बोरकरांची समग्र कविता, खंड १ व २. - बोरकरांच्या कवितासंग्रहांतल्या बहुतांशी कविता ह्या २ खंडांमधून एकत्र केल्या आहेत. बोरकर म्हणजे केवळ निसर्गसौंदर्य, प्रेमभावना वा तत्सम कविता असे समेकरण मनात धरुन असलेल्यांनी ह्या खंडांमधील त्यांच्या अभंगरचना, सामाजिक विषय हाताळणार्‍या कविता, जीवनविषयक आणि मृत्यूविषयक चिंतन करणार्‍या कविता वाचण्यासारख्या आहेत.खंडांमध्ये जाणवणारी उणीव? - मेघदूताचा बोरकरांनी केलेला अनुवाद, कोकणी कवितांचा समावेश नाही. बहुधा ते तिसर्‍या खंडात यावे? अजून जमेच्या बाजू म्हणजे बोरकरांच्या हस्ताक्षरातली कविता आणि त्यांच्या प्रसन्न मुद्रांची प्रकाशचित्रे. अरुणा ढेरे ह्यांनी लिहिलेली शब्ददेखणी प्रस्तावना. २. उत्तररात्र - रॉय किणीकर. झपाटून टाकणार्‍या कविता. रॉय किणीकरांनी खूपच थोडे लिहिले पण भाराभर पुस्तके एका पारड्यात आणि उत्तर रात्र एका पारड्यात - तरीही उत्तर रात्रीचे पारडे जड राहील असे माझे मत आहे. आयुष्यभर अस्थिर आयुष्य वाट्याला आलेल्या ह्या कविच्या कविताही अशाच अतिशय उत्कट आणि अस्वस्थ करुन टाकणार्‍या आहेत. कोलाहलातला एकटेपणा व्यक्त करणार्‍या कविता. ३. दिवेलागण - आरती प्रभू - मनात खोलवर कुठेतरी लपवून ठेवलेली दु:खे जेह्वा तळापासून वर येतात आणि पुनर्प्रत्ययाचा विसकटून टाकणारा अनुभव देऊन जातात, पण कोणापाशी शब्दांमध्ये ते दु:ख व्यक्त करता येणे कठीण, तसे काहीसे ह्या कवितासंग्रहातल्या कविता वाचताना वाटते. साध्या शब्दांमध्ये गहन आशय पोचवणार्‍या कविता. ४. मर्ढेकरांची कविता - बा सी मर्ढेकर - शिशिरागम, किती तरी दिवसांत आणि मर्ढेकरांच्या बाकीच्या कविता. चपखल शब्दयोजना अणि लखलखीत आशय. काही काही कविता मह्णजे शब्दांचे आसूड. ५. किनारे मनाचे - शांता शेळके - शांताबाईंच्या निवडक कविता. सुरेख शब्दकळा ल्यायलेल्या आणि जाणींवाचा प्रवास संयतरीत्या मांडणार्‍या. **** ललित लेखन - १. डोह - श्रीनिवास कुलकर्णी - माझ्या काही अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. सत्यकथा आणि मौज मासिकांमधून ह्यातले लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या ११ लेखांचं हे पुस्तक. लेखकाच्या बालपणी लेख जिथे वावरला, ज्या परिसराशी, माणसांबरोबर त्याचे भावबंद जुळले, आठवणी गुंतल्या, त्या सर्वांचं अत्यंत साध्या पण सहज, ओघवत्या आणि मनाला स्पर्शून जाईल आणि मनात रेंगाळत राहील अशा प्रामाणिकपणे केलेलं शब्दचित्रण. फार फार लोभस. इतक्या समंजस मनोज्ञपणे उलगडलेल्या कोणाच्या अंतरंगातल्या आठवणी वाचायला मिळणं हेच एक भाग्य! .. ललित लेखनात्मक अजूनही पुस्तके आहेत, नंतर लिहिते... पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by यशोधरा

आशु जोग Fri, 08/16/2013 - 01:01
'डोह' बद्दल बर्‍याच जणांनी लिहिले आहे. २०१२ च्या कुठल्याशा दिवाळी अंकामधेही त्यावर श्रीनिवास कुलकर्णी यांचा लेख वाचल्याचे आठवते.

दशानन Sat, 08/17/2013 - 23:11
काही पुस्तके वेड लावतात, त्यांना वाचणे म्हणजे एक वेगळा अनुभव असतो. असेच एक पुस्तक म्हणजे "श्रावणसोहळा" दोन व्यक्ती, एक वयस्कर पुरुष, जो व्हिआरस घेऊन आहे व एक तरुणी, यांचा संवाद व त्यासाठी माध्यम महाजाल! श्रावणसोहळा वाचले की जाणवतं की काही नाती ही स्वभावावर निर्माण होतात, टिकतात व त्याचा सोहळा साजरा करण्याएवढे आपल्याला आनंद देऊन जातात.. नक्कीच वाचा! श्रावणसोहळा लेखक - संजय भास्कर जोशी

यशोधरा Sun, 08/18/2013 - 13:50
कुमार गंधर्व - मुक्काम वाशी. संकलन - मो वि भाटवडेकर - २२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर १९९० रोजी वाशी येथे 'कुमारजींच्या सान्निध्यात' नावाचे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. कुमारांचे संगीतविषयक विचार जाणून घेणे हा ह्या शिबिराचा उद्देश्य होता. ह्या शिबिराचे ध्वनीमुद्रण व चलचित्रण केले गेले, (कुठे मिळेल पहायला? ) व त्यावरुन शब्दांकन करुन संकलित रुपात हे पुस्तक तयार केले आहे. कुमार प्रेमींसाठी संग्राह्य. पुस्तकाआरंभीचे कथनही अतिशय वाचनीय. माझ्या काही आवडत्या पुस्तकांपैकी. पुन्हा मर्ढेकर - विजया राजाध्यक्ष - मर्ढेकरांच्या कविता, त्यांचे वैयक्तिक आयुष्य ह्याविषयीचे पुस्तक. सुरुवातीचाच तीन ऋणानुबंधी: बालकवी, मर्ढेकर आणि आरती प्रभू हा लेख खूप सुरेख जमलेला आहे. आठा उत्तरांची कहाणी - ग प प्रधान -लोकशाही व्यवस्थेमधील अनेकविध प्रश्नांना आपापल्या वकुबानुसार आणि विचाराच्या धारेनुसार उत्तरे शोधणारे अनेक कार्यकर्ते. आपल्याला योग्य वाटेल ते उत्तर स्वीकारायचे आणि इतरानांही सांगायचे, पटणारे घेताता अणि न पटणारे आपला शोध सुरुच ठेवतात. तर अशा ५ क्रियाशील आणि ३ विचारशील कार्यकर्त्यांच्या गटाची ही खरी कहाणी. १९८० ते २००७ परेंतची राजकीय बखर. अंतरीचे धावे - भानू काळे -अंतर्नाद मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या काही सुरेख लेखांचे संकलन. मासिकाच्या पहिल्याच अंकात प्रसिद्ध झालेला महात्मादेखील माणूस असतो हा अतिशय हृद्य लेख ह्या पुस्तकात आहे. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक. संवादाचा सुवावो - महेश एलकुंचवार -राम शेवाळकरांसोबतच्या गप्पा. अतिशय उत्तम सर्जनशील संवाद ह्या पुस्तकात आहे. उत्तम प्रास्ताविक. जास्वंद - माधव आचवल. - गंघाधर गाडगीळ, इंदिरा संत, जीए, पु शि रेगे, अणि आरती प्रभू ह्यांच्या लिखाणावरचे जबरदस्त समीक्षात्मक पुस्तक. अतिशय आवडते! किमया - माधव आचवल - आचवलांचे पहिलेच पुस्तक. त्यांच्या १३ ललितांचा संग्रह. ह्या पुस्तकाचे वर्णन करणे कठीण आहे. आचवलांच्याच शब्दांत सांगायचे तर दैनंदिन आयुष्यातल्या अति परिचयात अवज्ञा ह्या न्यायाने नजरेआड झालेल्या संवेदनांविषयीचे हे पुस्तक. मस्ट रीड. माधव आचवलांची पुस्तके मला अतिशय आवडतात. काल मला त्यांनी अनुवादित केलेल अमेरिकन चित्रकला हे पुस्तकही मिळालेय. किती दिवस शोधत होते! कार्यरत - अनिल अवचट - समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करणार्‍या व्यक्तिमत्वांची ओळख करुन देणारे पुस्तक. चित्रकथी - व्यंकटेश माडगुळकर - अफाट पुस्तक! लेखकाचे स्वतःचे अनुभव. संग्राह्य पुस्तक. ... बाकीची नंतर..

यशोधरा Sun, 08/18/2013 - 16:05
सखा नागझिरा - किरण पुरंदरे -४०० दिवस नागझिर्‍याच्या जंगलात राहून गोळा केलेल्या क्षणांचे शब्दांकन. अफाट सुंदर पुस्तक. आसमंत - श्रीकांत इंगळहळीकर. - निसर्गनिरीक्षणांवर आधारीत लेखांचा संग्रह. अप्रतिम फोटो. सुरेख पुस्तक. हिमालय सर्वांगदर्शन - तिसरा ध्रुव - रमेश देसाई - एका गिर्यारोहकाने हिमालयाच्या प्रेमापोटी लिहिलेले पुस्तक अशी ह्या पुस्ताकची करुन दिलेली ओळख अगदी सत्य आहे. खूप माहिती, सुरेख फोटो, नकाशे. सुरेख पुस्तक. अगस्तीचे अंगण - प्रभाकर पाध्यांचे निवडक साहित्य. माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. सुरुवातीच्या संपादकांच्या मनोगतापासून पुस्तक सुरेख आहे! पत्र - माधव आचवल - पुन्हा एकदा माधव आचवल! वेगवेगळ्या लेखांचे एकत्र संकलन. विंचूर्णीचे धडे - गौरी देशपांडे - गौरीने लिहिलेलं माझ सगळ्यात आवडतं पुस्तक! प्रिय जीए - सुनिता देशपांडे - सुनीताबाई आणि जीए ह्यांच्यामधला पत्र व्यवहार.

यशोधरा Sun, 08/18/2013 - 17:20
चित्रे आणि चरित्रे - व्यंकटेश माडगूळकर - अतिशय सुरेख पुस्तक. हृद्य व्यक्तीचित्रं, भटकंतीविषयक अनुभव. संग्राह्य. सरवा - व्यंकटेश माडगूळकर - ( कोरडवाहू जमिनीत भूईमूग, हरभरा वगैरे पिकं निघाल्यावर काही शेंगा, लोंब्या इत्यादि मातीत राहतात, ती वेचतात, त्याला सरवा वेचणं म्हणतात.) हा अशाच काही लेखांचा सरवा. मनातलं अवकाश - सुनीता देशपांडे - पहिलाच, पुलंना उद्देशून असलेला आण्यांतलं लग्न हा लेख फार सुरेख. बाकीचेही. संग्राह्य. मण्यांची माळ - सुनीता देशपांडे - सोयरे सकळ नंतरचे पुस्तक म्हणजे मण्यांची माळ. सोयरे सकळबद्दलवर लिहिलंच आहे कोणी ना कोणी. कसदार ललित लेखन. गीतयात्री - माधव मोहोळकर -जुन्या काळातील संगीतकार, गायक, गायिका, गीतकार आणि एकूणच त्या काळचा माहौल, ह्यावर अतिशय आत्मीयतेने लिहिलेलं पुस्तक. फार सुरेख पुस्तक आहे.

In reply to by यशोधरा

सखी Mon, 08/19/2013 - 19:47
छानच निवड आहे यशो. बरीसशी यातली वाचली नाहीत आणि वाचायला आवडतील अशी आहेत. वर कुणीतरी म्ह्टल्याप्रमाणे मला ही सगळी माहीती एखाद्या एक्सेल फाईल मधे ही गोळा करायला आवडेल, आणि ती लेखक वा विषयाप्रमाणे फिल्टरपण करता येईल. स्वलेकर यांनी दिलेली लिंक चालत नाहीये त्यांनीच लिहल्याप्रमाणे.

In reply to by सस्नेह

आदूबाळ Sun, 08/18/2013 - 22:59
अरूण साधूंची पुस्तकं मिळवून वाचलीच पाहिजेत. "झिपर्‍या" आणि "विप्लवा" तरी. जयंत नारळीकरांची "प्रेषित" ही सुद्धा सुंदर विज्ञान कादंबरी आहे.

आशु जोग Mon, 08/19/2013 - 00:20
काही वर्षापूर्वी देशातील एका उच्चपदस्थ व्यक्तीकरता पुण्यातील संरक्षण खात्याची जमीन ताब्यात घेण्यात आली. काही जण माहिती अधिकार कायद्याचा वापर करून त्याविरुद्ध लढले. अखेर त्या उच्चपदस्थाला आपला हट्ट सोडावा लागली आणि सत्ता झुकली. सत्ता झुकली - या प्रकरणावरच हे आधारलेले आहे. याविशवियीची बातमी सर्वप्रथम जिथे प्रसिद्ध झाली त्या वेबसाइटची लिंकही देत आहे. सत्ता झुकली पुस्तक विनिता देशमुख यांनी लिहिलेले आहे.

संदीप चित्रे Mon, 08/19/2013 - 18:31
पुस्तकाचे नाव आणि लेखकाचेही नाव ह्यात वेगळेपण आहे :) सध्या मी हे पुस्तक वाचतोय. भारतातली वेगवेगळी ठिकाणे आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणे अशा लांब-रूंद पटलावर घडत असलेली ही रहस्यमय कादंबरी आहे. लेखकाचा गिरिभ्रमणातला उदंड अनुभव पदोपदी जाणवतो. कादंबरीतल्या सगळ्या स्थळांना भेट देऊन यावं असं वाटतं :) ... अभिनेता सचिने खेडेकरने कादंबरीच्या प्रतिक्रियेत लिहिल्याप्रमाणे ह्या कादंबरीवर खरंच एक उत्त्म चित्र्पट तयार होऊ शकेल.

१) रारंग ढांग २) चक्रीवादळ ३) एका स्तुडिओचे आत्मवृत्त लेखक प्रभाकर पेंढारकर ४) तत्वमसी मूळ गुजराथी लेखक ब्रम्ह भट्ट अनुवाद अंजनी नरवणे ५) मी अल्बर्ट एलिस अनुवादकाचे नाव आठवत नाही ........... जोशी ६) तांडव लेखक महाबळेश्वर सैल (गोव्यातील पोर्तुगीज आक्रमणाचे वास्तव )

१) क्रुतुचक्र , दुर्गा भागवत मराठी महिन्या प्रमाणे बदलणाऱ्या प्रत्येक कृतुचे अत्यंत सुरेख वर्णन २) व्यासपर्व दुर्गा भागवत वाचाच मी काय लिहू? ३) निसर्गायण दिलीप कुलकर्णी "बोले तैसा चाले " अशा वृत्तीच्या एका अवलियाने लिहिलेले सुंदर पुस्तक ४) सम्यक विकास दिलीप कुलकर्णी ५) भारताच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधात पॉल ब्रन्टन अनुवाद पुरंदरे (इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया )

मेकिंग द कट लेखक महम्मद खादरा एका निष्णात शाल्याविशारदाचे जिवंत अनुभव , विशेषता Palestinian असून "मोसाद" च्या प्रमुखावर शस्त्रक्रिया करतानाचा अनुभव तर वाचण्यासारखा

आशु जोग Fri, 08/23/2013 - 23:13
स्वातंत्र्यलढ्यात पुरुषांप्रमाणे स्त्रियांचाही महत्त्वाचा सहभाग होता. पण बहुतेक जणींचा उल्लेख कुणाची बहीण, कुणाची मुलगी, कुणाची आई असाच केला जातो. स्वातंत्र्यलढ्यात लढणार्‍या स्त्रियांची माहिती देणारे पुस्तक आहे नाही चिरा नाही पणती लेखक आहेत य दि फडके.

यशोधरा Sat, 08/24/2013 - 09:43
मौनराग -महेश एलकुंचवार - ललित लेखांचा संग्रह. पश्चिमप्रभा - महेश एलकुंचवार - पाश्चात्य साहित्यातील लेखकाला आवडलेल्या पुस्तकांची ओळख. एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे - मदुमलाईच्या जंगलात १ वर्ष राहून घेतलेल्या अनुभवांची मांडणी. आहे मनोहर तरी - वाचन आणि विवेचन - संपादक: विजया राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत. - आहे मनोहर तरी ह्या पुस्तकानंतरचा वाचकांनी सुनीताबाईंशी केलेला पत्रव्यवहार

A Search In Secret India अनुवाद भारताच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधात Dr . Paul Brunton ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी प्रतिभा रानडे व्यासपर्व दुर्गा भागवत कृतूचक्र दुर्गा भागवत मी अल्बर्ट एलिस

सागर Wed, 09/04/2013 - 19:49
रक्तरेखा - शशी भागवत मर्मभेद - शशी भागवत चंद्रकांता - मूळ लेखक देवकीनंदन खत्री - मराठी अनुवाद - जनार्दन ओक हिरण्यदुर्ग - संजय सोनवणी (आगामी - पुढील महिन्यात प्रकाशित होईल- जबरदस्त आहे) शालिवाहन = शक - गो.ना.दातार अधःपात - गो.ना.दातार इंद्रभुवनगुहा - गो.ना.दातार कालिकामूर्ति - गो.ना.दातार बंधुद्वेष - गो.ना.दातार वीरधवल - नाथमाधव

सागर Wed, 09/04/2013 - 19:56
सध्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिलेले वाचकप्रिय लेखक संजय सोनवणी यांची काही सुंदर पुस्तके थरार कथा : रक्त हिटलरचे अंतिम युद्ध वॉर टाईम मृत्युरेखा डेथ ऑफ प्राईम मिनिस्टर विश्वनाथ ब्लडी आयलंड ऐतिहासिक: ...आणि पानिपत असूरवेद कुशाण क्लिओपात्रा अश्वत्थामा सामाजिक : सव्यसाची वरील सर्व पुस्तके भरपूर वाचनानंद देतात.

आशु जोग Wed, 09/04/2013 - 23:30
मिसळीवर पुस्तकांचा विषय निघाला पण शेषराव मोरे यांचा अद्याप उल्लेख झाला नाही हे विशेष आहे.

सागर गुरुवार, 09/05/2013 - 12:31
तुकाराम दर्शन - सदानंद मोरे - तुकारामांवरचे आतापर्यंतचे सर्वात विश्वासार्ह व सुंदर पुस्तक म्हणता येईल शेषराव मोरेंच्या पुस्तकांवर @वल्ली नेमके लिहू शकेल. अलिकडेच त्याने त्यांची बरीच पुस्तके वाचली आहेत. बाकी अनुवादीत कादंबर्‍यांबद्दल सिडने शेल्डनची ब्लडलाईन, अदर साईड ऑफ मिडनाईट एकदम भारी (मराठी अनुवाद) आयर्विंग वॅलेसची सेकंड लेडी, द सेव्हन्थ सिक्रेट(मराठी अनुवाद) मारिओ पुझो ची गॉडफादर सगळ्या अफलातून कादंबर्‍या आहेत

कपिलमुनी गुरुवार, 09/05/2013 - 14:08
खरे तर सर्व कांदबर्‍या वाचनीय आहेत.. मला खास आवडणारी "काजळमाया.."

सुधीर मुतालीक Sun, 09/08/2013 - 23:23
साकेत प्रकाशन चे "सत्तर दिवस" नामक एक पुस्तक एकदम भारी आहे. पियर्स लॉर्ड नामक मुळ इंग्रजी लेखकाचे !! मला हे पुस्तक खूप उर्जा देतं !

म्हैस Tue, 09/10/2013 - 16:16
मिसळपाववर हात-पाय, आणि काय काय आपटत स्वताच्या नसलेल्या अकलेचा टेंभा मिरावनार्यांसाठी (टोला कोणाला हाणलाय ते ज्याचं त्याला कळलं असेल ). Princes: JEAN SASSON - सौदी अरेबिया ची राजकुमारी किती पारतंत्र्यात असते .सगळी सुख हाथ जोडून उभी असताना सुधा कशी दुखात असते हे तिच्याच शब्दांमध्ये. श्रीमंत अरब देशांमध्ये स्त्रियांची काय अवस्था आहे ह्याची कल्पना येते. Diary of Ann frank : नाझींच्या दहशतवादावर आधारित आहे. एका किशोर्वायातल्या मुलीने चोरून लिहिलेली हि diary . हिचा मराठी अनुवाद पण आहे. पण अनुवाद करणारे लेखक कोण आहेत ते आठवत नाही. वैरयाची रात्र : नाझींच्या क्रूर पणावर आधारित असलेला हे पुतक. श्रीमान योगी : शिवाजी महाराजांचं चरित्र. पण हे वाचताना आपण कुठलाही रणजीत देसाई चरित्र वाचत आहोत असं वाटत नाही. जणू काही आपण तिथेच उपस्थित आहोत असा वाटत. मृत्युंजय : रणजीत देसाई. कर्णाच्या जीवनावरचा हे पुस्तक बहुदा सगळ्यांनी वाचलेलं असतं. wise and otherwise: sudha मूर्थी . सुंदर पुस्तक .sudha मूर्थीना भेटलेली वेगवेगळी माणसं आणि त्यांचे किस्से. काही किस्से मनाला चटका लावून जातात. गंमत गोष्टी : द मा मिरासदार . विनोदी पुस्तक. ग्रामीण भागातल्या विनोदी कथा. द मा मिरासदारांची सगळीच पुस्तके भन्नाट. थोडीशी गूढ पण खर्या विषयांवरची पुस्तके; many masters many lives : वर कोणीतरी ह्याचा उल्लेख केला आहे. दिव्यस्पर्शी - Dhananjay Deshpande : The Third Eye - Lobsang Rampa. आपल्यातल्या अध्यात्मिक शक्तीला कसं जागवला आणि त्याचा उपयोग कसं करून घेतला ह्यावरचा हे पुस्तक. Lobsang रामपा हे तिबेट चे राजपुत्र. परंतु वयाच्या ७ व्या वर्षी ज्योतिषाने वर्तवलेल्या भाविश्यावरून ह्यांना राजवाडा सोडून जावं लागतं आणि पुढे काय होतं हे वाचण्यासारख आहे.(Third Eye म्हणजे २ भुवयांच्या मध्ये असणारं आज्ञा चक्र ) योगी कथामृत - परमहंस योगानंद . हि एका योग्याची आत्मकथा आहे. जन्नाथ कुन्ठेंची खालील ५ पुस्तके वाचावी अशीच आहेत. नर्मदा परिक्रमा, त्यांची अध्यात्मिक साधना, ईश्वर कृपा , त्यांचे अद्भुत अनुभव ह्या सगळ्यांवर हि पुस्तके आहेत. कृपया हि पुस्तके खाली दिलेल्या क्रमानेच वाचावीत. नर्मदे हर हर साधनामस्त धुनी नित्य निरंजन कालिंदी

In reply to by म्हैस

हेमन्त वाघे Sat, 08/06/2016 - 19:30
मृत्युंजय : रणजीत देसाई.नि केंव्हा लिहिले माझ्या वडिलांकडे कोणीतरी शिवाजी सावंत म्हणून आहेत त्यांचे नाव असलेले पुस्तक आहे - बहुदा डुप्लिकेट असेल !

भ ट क्या खे ड वा ला गुरुवार, 09/12/2013 - 11:06
कमला सोहनी या भारताच्या पहिल्या आहार शास्त्रज्ञ होत्या . हे पुस्तक वाचून आपल्या आहाराकडे बघण्याची एक नवीन दृष्टी लाभते. उदा. कलिंगड खाल्यावर सहसा बिया टाकल्या जातात, पण या बी मध्ये बदामा इतकीच उपयुक्त जीवनसत्वे असतात आणि खायला देखील वाईट लागत नाही, अशा बर्याच टिप्स मिळतात.

भ ट क्या खे ड वा ला गुरुवार, 09/12/2013 - 11:26
डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर श्रीराम गीत यांनी या पुस्तकात कासव पासून क्रायोजेनिक इंजीन अशा सर्व प्रकारची प्राथमिक माहिती साधारण १ पान इतकी फार सुरेख दिली आहे. सारखे प्रश्न विचारणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी फारच उपयुक्त

आशु जोग Sun, 09/22/2013 - 22:35
काही दिवसांपूर्वी एक पुस्तक हाती लागले. "मुस्लिम मनाचा शोध". लेखक शेषराव मोरे. शेषरावांनी इतर अनेक पुस्तके लिहिली पण मुस्लिम मनाचा शोध हे पुस्तक त्यांची ओळख बनले. शेषराव हे मुळात इंजिनीयर. अनेक वर्षे इंजिनीयरींग कॉलेजात अध्यापन केल्यावर केवळ अभ्यासासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. या पुस्तकात कुराण, हदीस आणि इतिहासातील काही घटना यांच्या आधारे इस्लामचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मोठमोठे इस्लामिक विद्वान जेव्हा एखाद्या ठिकाणी अडतात तेव्हा हे वाद शेषरावांपर्यंत येतात. आज भारतात(कदाचित जगात) इस्लाम या विषयात शेषराव मोरे हा अंतिम शब्द मानला जातो. या पुस्तकात लेखकाने कुठेही स्वतःचे वैयक्तिक मत मांडलेले नाही. असे असूनही लेखकाने खूप काही म्हटले आहे असा अनुभव वाचकांना येतो.

आशु जोग Wed, 10/16/2013 - 18:27
नक्षलवादाचे आव्हान - देवेंद्र गावंडे देवेंद्र गावंडे हे लोकसत्तामधील पत्रकार आहेत. नक्षलग्रस्त भागातील असल्याने नक्षलवादाचा जवळून परिचय आहे. नक्षलवादालाही एक तत्त्वज्ञानाची बैठक देण्याचा प्रयत्न केला जातो परंतु कुठल्याही इझमशी तत्त्वाशी नक्षल्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही हे या पुस्तकात ध्यानात येते. शासनही याबाबतीत अपुरे पडते आहे असे दिसते. वाचल्यानंतर आपल्या मनातल्या नक्षलवादासंबंधीच्या कल्पनांना सुरुंग लागू शकतो.

बलि Wed, 10/16/2013 - 18:35
अप्रतिम पुस्तक आहे. ह्यावर आत्ताच एक चित्रपत देखिल येउन गेल आहे.

आशु जोग Sat, 11/16/2013 - 20:55
धागा थोडा उसवतोय माफी असावी एक जुन्या काळातले, पहिल्या पिढीतले संघातले कार्यकर्ते होते स ह देशपांडे. रा स्व संघाच्या शाखांच्यावाढीसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. पुढे काही काळाने ते संघापासून ते दूर झाले. हे सगळं आलं आहे स. ह. देशपांडे यांच्या संघातले दिवस या पुस्तकात.

आशु जोग Wed, 05/07/2014 - 10:07
माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे नाव बराच काळ ऐकून होतो. पुढे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावरचे अभिप्राय वाचायला मिळाले. पण त्यांचे पुस्तक वाचण्याचा योग कधी आला नव्हता. तो अलिकडे आला. अंतर्वेध - हे गडाखसाहेबांनी लिहिलेले पुस्तक वाचनीय आहे.

आशु जोग गुरुवार, 05/08/2014 - 13:58
पुण्याच्या एका माजी खासदारांनी लिहिलेले पुस्तक वाचायला मिळाले. राजकारणातला माणूस एवढं चांगलं लिहू शकतो याचे आश्चर्य वाटते. पण या माणसाने एक नव्हे अनेक पुस्तके लिहीली आहेत. त्या पुण्याला असे खासदार आता का मिळत नाहीत पुस्तकाचे नाव आहे अनगड मोती - १९५५ च्या आसपासचे पुस्तक आहे, १९१८ पासूनच्या घटनांचे उल्लेख त्यात येतात ललित लेखन म्हणून हे पुस्तक उत्तम आहे. फार साधे सोपे सरळ लेखन आहे.

असा मी असामी Fri, 05/09/2014 - 15:31
पु.ल. यांनी लिहिलेले एक हि पुस्तक नाही. मला आवडलेली काहि पुस्तके व्यक्ती आणि वल्ली : लेखक - पु ल देशपांडे बाराला दहा कमी : अणूबॉंब शोध आणि इतिहासावर मस्त पुस्तक. मला वाटते लेखक - पद्मजा फाटक रारंग ढांग : लेखक - प्रभाकर पेंढारकर बाकी यादी नंतर वेळ मिळेल तशी

पुरंदरे प्रकाशनच्या स्किम मधे घेतलेले बाबासाहेबांचे शेलार खिंड सध्या वाचतो आहे. लहानपणी लायब्ररीतून घेउन वाचले होते. परत वाचायला तितकीच मजा येत आहे. या नंतर राजाशिवछत्रपती वाचणार आहे. त्याच प्रमाणे मो. रा. गुणे यांचे "अमित आनंदाचे विश्र्व" हे सुध्दा एक सुरेख पुस्तक आहे. गुण्यांनी कोणताही तत्ववेत्याचा आव न आणता करुन दिलेली उपनिशदांची ओळख. एकदा वाचायला घेतले की झपाटल्या सारखे होते. तसेच झपाटलेपण विवेकानंदांचा ज्ञानयोग, कर्मयोग वाचताना पण आले होते.

जयराज Tue, 05/13/2014 - 01:48
माझीही थोडीशी भर .. फ्रीडम ट्रयाप ( लेखक आठवत नाही) इंडिया अंडर औरंगजेब ( जदुनाथ सरकार) हायवेवर हीप्पी ( जेम्स हेडली चेस) :-) @ आशुजोग तुम्ही भा. द. खेर यांचे चाणक्य हे पुस्तक वाचले का?

आशु जोग Fri, 06/27/2014 - 22:24
मोदीनामा - मधु किश्वर मराठी अनुवादही उपलब्ध आहे माहितीपूर्ण आणि अनेकांचे दुकान बंद करणारे हे पुस्तक आहे

आशु जोग Fri, 07/11/2014 - 00:09
ख्रिस्ती धर्मांतरावर आधारीत एक पुस्तक मराठीत आलेले आहे. त्याचे नाव कुणी सांगू शकेल का ! मागच्या वर्षभराच्या कालावधीत त्या पुस्तकाचा परिचय वृत्तपत्रात आला होता. गोव्याला लागून असलेल्या कोकणातील घटना इतिहास यांची पार्श्वभूमी त्यामधे होती.

आशु जोग Mon, 07/14/2014 - 08:11
यशोधराजी जमेल तसे अभिप्राय कळवत राहीन... अलिकडे सुधा मूर्ती यांचे अस्तित्त्व पाहण्यात आले. का कुणास ठाऊक त्यातल्या लॉस्ट अँड फाऊंड फॉर्म्युल्यामुळे टागोरांच्या नौकाडुबीची आठवण झाली. म्हणून नौकाडुबी पुन्हा वाचून काढले. नौकाडुबीची प्रत जुनी होती. पहिली पाने फाटलेली. अनुवाद कुणी केला इ. कळायला काहीच मार्ग नाही. पण अनुवाद छान आहे.