Skip to main content

संस्कृत ही मृत भाषा समजावी काय?

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 17/10/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, कुठल्याही जिवंत भाषेची आपल्याला सर्वसाधारणपणे खालील लक्षणे सांगता येतील.. १) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर. २) बोलीभाषेतील तिचे स्वरूप. जसे मराठीबाबत सांगायचे तर कोकणी, मालवणी, आगरी, खास कोल्हापुरी ढंगाची, माणदेशी इत्यादी. ३) त्या भाषेत होणारी नवनिर्मिती. जसे कथा, कांदंबर्‍या, कविता, नाटके, चित्रपट, इत्यादी.. या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला संस्कृत भाषा मला कुठेच दिसत नाही... या बाबतीत वरील मुद्द्यांचा खालीलप्रमाणे उहापोह करता येईल.. १) आज व्यवहारात संस्कृत भाषेचा मला कुठेच वापर होतांना दिसत नाही.. संस्कृत ही भारतीय भाषा आहे. परंतु भारतातल्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ, हैद्राबाद, जयपूर, कोल्हापूर, इत्यादी अनेक शहरातून मी वावरलो आहे परंतु आजतागायत मला यापैकी कुठल्याही ठिकाणी संस्कृत भाषेचा रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोग होतांना आढळला नाही. असे का बरे? २) बोलीभाषा हे माझ्या मते कुठल्याही भाषेचे एक वेगळेच सौंदर्य आहे. तिचा स्वत:चा असा एक खास ढंग आहे, गोडवा आहे. सर्वसाधारण, सामान्य माणसाला भाषेचा बोलीभाषा हा प्रकार वापरायला खूप बरा पडतो. कारण तिथे भाषेचे नियम, व्याकरणाचे नियम आपोआपच थोडे शिथिल झालेले असतात. जसा प्रान्त असतो तशी बोलीभाषा असते. एवढेच नव्हे, तर मुख्य भाषेप्रमाणेच बोलीभाषेतही खूप चांगली निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळेल! जसे एखाद्या चित्रपटातले बोलीभाषेतील गावरान संवाद, गं साजणी..कुन्न्या गावाची.. या सारखी काही फक्कड गाणी इत्यादी.. संस्कृतमध्ये बोलीभाषा हा प्रकार आहे का? असल्यास सर्रास आहे का? नसल्यास बोलीभाषा या भाषेचे सौंदर्य वाढवणार्‍या प्रकाराला संस्कृत भाषा पारखी कशी राहिली? काय कारणे असावीत? ३) आपल्या मायमराठीचे उदाहरण घ्यायचे झाले तर अगदी आजच्या घडीलाही मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती होत आहे. मराठी भाषेत, किंवा हिंदी भाषेत अनेक मंडळी उत्तमोत्तम कथा, कादंबर्‍या, काव्य, गाणी, नाटके, चित्रपट इत्यादींची निर्मिती करत आहेत. आजच्या घडीला संस्कृत भाषेत मला एकही चित्रपट अथवा नाटक पाहायला मिळत नाही. 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या..' सारखे एखादे तरल गाणे आजतागायत मला संस्कृत भाषेत ऐकायला मिळाले नाही.. का बरे असे? आजच्या घडीला मला मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, गुजराथी, तेलूगू, कन्नड, उर्दू, इत्यादी वर्तमानपत्रे अगदी सर्रास पाहायला मिळतात, जी समाजाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आरसा समजली जातात. अगदी सामान्यातला सामान्य माणूस ही वर्तमानपत्रे वाचत असतो व त्याद्वारे तो स्वत:ला जगाशी जोडून ठेवतो. परंतु एखादे बर्‍यापैकी खप असलेले संस्कृत वृत्तपत्र आहे आणि जे समाजात वाचले जात आहे असे चित्र मला तरी आजतागायत कुठेही दिसले नाही! का बरे असे? आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर संस्कृत ही आजच्या घडीला केवळ एक मृतभाषा आहे असे म्हटले तर ते माझ्या मते वावगे ठरू नये! आपले मत काय? वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांची कुणी मुद्देसूद कारणमिमांसा करेल का? बहोत बहोत मेहेरबानी.. कळावे, आपला, -- तात्या अभ्यंकर.

वाचने 26686
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

जी भाषा लोकांच्या वापरात नाहिय्ये जी भाषा लेखनात नाही. ज्यात नवनिर्माण होत नाही ती भाषा अगोदरच मृत झालेली आहे . त्या भाषेतले बहुतांश वाङ्मय इतर भाषांत आलेले आहे. त्या भाषेच्या या अवस्थेला जबाबदार वर्गाला भाषा ही ज्ञान स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे साधन म्हणून हवी होती त्याचीच परिणिती भाषेच्या मरण्यात झाली. भाषा ही नदीसारखी असते. ती वहात असते त्यात नवे झरे उपनद्या मिळत असतात तेंव्हाच ती जिवंत असते. साचून राहिली की त्याचे मृतप्राय डबके होते.

In reply to by विजुभाऊ

त्या भाषेच्या या अवस्थेला जबाबदार वर्गाला भाषा ही ज्ञान स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे साधन म्हणून हवी होती त्याचीच परिणिती भाषेच्या मरण्यात झाली. भाषा ही नदीसारखी असते. ती वहात असते त्यात नवे झरे उपनद्या मिळत असतात तेंव्हाच ती जिवंत असते. विजभाऊ, मी तुमच्याशी सहमत आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मुळात शाळेत जेव्हा ही भाषा शिकवतात ती अतिषय क्लिष्ट प्रकारे. ८/९/१० फक्त व्याकरण शिकलो. बोलायला शिकलो नाही. संस्क्रुत ही एक भाषा म्हणून न शिकवता एक स्कोरींग सब्जेक्ट म्हणून शिकवली गेली. गोडी लावायचे काहिही प्रयत्न केले गेले नाहीत. आधी हे बदलायला पाहिजे. मुळात आपली स्त्रोत्र मुख्यतः ह्याच भाषेत असल्याने शिकायला अडचण नसावी. वयाच्या १० व्या वर्शी जर एखादा मुलगा रामरक्षा, अथर्वशिर्ष, गीतेतले २ अध्याय पाठ करू शकतो तर तिसाव्या वर्षापर्यंत तरी थोडा फार संवाद त्या भाषेत नकीच करू शकेल. त्यामुळे ह्या भाषेत बोलणे हा एकच उपाय आहे. ती गत इंग्रजी / मराठी / हिंदी ची नाही. ह्या भाषा आपण सतत कुठे ना कुठे संभाषणासाठी वापरत असतो. त्यामुळे शाळेत जरी इंग्रजीत गती नसली तरी नंतर शिकता येते.

तात्या / विजुभाऊ, तुमचे मुद्दे व्यवहारीक पातळीवर बिनतोड आहेत. पण ...... कुठल्याही जिवंत भाषेची आपल्याला सर्वसाधारणपणे खालील लक्षणे सांगता येतील.. १) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर. २) बोलीभाषेतील तिचे स्वरूप. जसे मराठीबाबत सांगायचे तर कोकणी, मालवणी, आगरी, खास कोल्हापुरी ढंगाची, माणदेशी इत्यादी. ३) त्या भाषेत होणारी नवनिर्मिती. जसे कथा, कांदंबर्‍या, कविता, नाटके, चित्रपट, इत्यादी.. व्यवहारात नियमीत वापर नाही म्हणून भाषा मृत आणि भाषा मृत म्हणून व्यवहारात नियमीत वापर नाही. हे दुष्टचक्र भेदायचे कसे? आजारी माणसाला तोंडाला चव नाही म्हणून अन्नाची वासना होत नाही, अन्नाची वासना नाही म्हणून पुरेसे अन्न ग्रहण नाही, अन्नग्रहण नाही म्हणून अशक्तपणा, अशक्तपणामुळे रोगप्रतीकारक शक्ती कमी, आजार बरा होण्याची शक्यता कमी. म्हणून मग डॉक्टर सांगतात, रोग्याला आवडेल ते द्या. सुरवातीला बळजबरीने थोडे थोडे द्या मग हळूहळू प्रमाण वाढवा. तिच गोष्ट येथेसुद्धा लागू होत नाही का? मान्य आहे संस्कृतमध्ये नवनिर्मीती थांबलेली आहे. जडजंबाळ वाङमया ऐवजी सुरवातीला शाळेत संस्कृत शिकवायचे आणि हलकेफुलके विनोदी वाङमय वापरायचे हा मार्ग शिक्षणखात्याने चोखाळलेला आहेच, फक्त आजून थोडे लक्ष द्यायला हवे. आता तुम्ही म्हणाल हे सर्व करायचे कशासाठी? त्या भाषेतले बहुतांश वाङ्मय इतर भाषांत आलेले आहे. म्हातारा मरायला टेकलेला आहे. सगळी संपत्ती त्याने पोरा-नातवंडात वाटून टाकलेली आहे. घरकामातही तो हातभार लाऊ शकत नाही. मग त्याच्या कडे थोडे दुर्लक्ष झाले तर काय झाले? हे व्यवहारिक वागणे झाले. पण अर्धवट. म्हातार्‍याचा अनुभव तरी संपलेला नाही ना आजून. आणि काय गॅरंटी त्याने सगळी संपत्ती वाटून टाकली आहे; काहीही राखून न ठेवता? शिवाय आपण आपल्याच घरातल्या लोकांबाबत फक्त व्यवहार पाहायचा? आपलेपणा नाही. कित्यक शोधांबाबत आपण सांगतो हे सर्व आपल्या वेदा-पुराणांमध्ये आधिच होते. मग आपणच वेदा-पुराणांचा अभ्यास आधुनीक शास्त्रांच्या दृष्टीकोनातुन केला तर लाभ कोणाचा? त्या भाषेच्या या अवस्थेला जबाबदार वर्गाला भाषा ही ज्ञान स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे साधन म्हणून हवी होती त्याचीच परिणिती भाषेच्या मरण्यात झाली. भाषा ही नदीसारखी असते. ती वहात असते त्यात नवे झरे उपनद्या मिळत असतात तेंव्हाच ती जिवंत असते. विजुभाऊ, तुमचा मुद्दा निर्विवाद पणे मान्य आहे. पण नदी तुंबली म्हणून दुसर्‍या नदी कडे जाण्या पेक्षा बांध फोडून नदी प्रवाही करु या ना. दूरगामी विचार केला तर ते जास्त फायद्याचे नाही का? माझं मत - संस्कृत भाषा मृत नक्कीच नाही. पण आजारी जरूर आहे. तिची पुढची स्थीती आपणच ठरवू शकतो. सांस्कृतिक आडाणी महेश हतोळकर

प्रेषक''मी'' यांच्याशी मी १००% सहमत.मला तर असे वाटते की तिच्या ह्या अवस्थेला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.त्यामुळे तिला वाचविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.आपल्या थोड्याश्या प्रयत्नांची आवश्यकता आहे एवढेच !

In reply to by वैशाली हसमनीस

तिच्या ह्या अवस्थेला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.त्यामुळे तिला वाचविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.आपल्या थोड्याश्या प्रयत्नांची आवश्यकता आहे एवढेच ! आपण कसे काय जबाबदार? आणि अहो तिला वाचवायला आधी आम्हाला ती समजायला नको का? त्यातलं अत्यंत अवघड व्याकरण, हा हा वाले विसर्गाचे चमत्कारिक उच्चार ह्या गोष्टी आमच्या पार डोक्यावरून जातात... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्यानु, विंग्रजीचं व्याकरण सुद्धा विंग्रजी न समजणार्‍याला अवघडच वाटतं. खरंतर संस्कृतातील व्याकरण हे आपल्या मायमराठीशी खूप जवळचं आहे (विंग्रजीचं अज्याबात न्हाई). हां, आता विसर्गाचे चमत्कारिक उच्चार वगैरे संस्कृताचे वैशिष्ट्य आहे, त्याच्याशी थोडं जुळवून घेतलच पाहिजे. आपण नाही का hour ला 'अवर' म्हणून विंग्रजीशी जुळवून घेतलं? संस्कृतात क्रियापदांची रूपं पुरुष आणि वचनाप्रमाणे बदलतात, मराठीतही बदलतात. संस्कृतात विभक्तीचे प्रत्यय आहेत, मरठीतही आहेत. फक्त मराठी लहानपणापासून कानावर पडल्याने आपल्याला ते एवढं व्याकरणाच्या दृष्टीने पाहायची सवय नसते. पण एकदा शिकायला लागलं की मला नाही वाटत संस्कृत मराठी पेक्षा फार काही अवघड आहे म्हणून. अहो उलट मजा येते, वेगेवेगळ्या स्तोत्रांचे नक्की अर्थ जरी नाही कळले तरी संदर्भाने अर्थ कळायला लागतात आणि मग आपण हे स्तोत्र/मंत्र का म्हणतोय, देवाची नक्की काय स्तुती/प्रार्थना करतोय हे समजतं आणि मग आपण ते जास्त जाणीवपूर्वक नीट करायला लागतो (अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव). --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

In reply to by घाटावरचे भट

अहो पण जेव्हा जेव्हा शिकायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा काहीही समजलं नाही..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अहो पण जेव्हा जेव्हा शिकायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा काहीही समजलं नाही..! तात्या बहुदा संस्कृतला तुही आवडला नसशील. ;)

In reply to by विसोबा खेचर

समजत नाही म्हणून आवडत नाही. आवडत नाही म्हणून समजून घ्यायची इच्छा होत नाही. हे भेदण्यासाठी आपल्या आवडीच्या विषयावर संस्कृत लेखांची भाषांतरे वाचणे ही सुरुवात असु शकेल. उदा - तुम्हाला शास्त्रीय संगीतात रस आहे. शास्त्रीय संगीतावर संस्कृत मध्ये नक्कीच खूप लिखाण असेल. एकदम सामवेद वाचायला जाऊ नका पण इतर लिखाण तरी वाचता येईलच ना. राहिला व्याकरणाचा प्रश्न. भाषा शिकण्यासाठी व्याकरण येण्याची गरज नसते. मराठी शिकताना तुम्हाला तुमच्या आईने मी हे प्रथमपुरषी एक वचनी सर्वनाम आहे असे नक्कीच शिकवले नसेल.

In reply to by महेश हतोळकर

उदा - तुम्हाला शास्त्रीय संगीतात रस आहे. शास्त्रीय संगीतावर संस्कृत मध्ये नक्कीच खूप लिखाण असेल. एकदम सामवेद वाचायला जाऊ नका पण इतर लिखाण तरी वाचता येईलच ना. माझ्यापुरतं बोलायाचं झालं तर मी माझी शस्त्रीय संगीताची आवड निरनिराळ्या गवयांच्या मैफली ऐकून अथवा त्यांची ध्वनिमुद्रणे ऐकून पुरी करतो. माझं त्या बाबतीत अत्यल्प किंवा नही के बराबर..! इतपतच वाचन आहे! आणि मुळात संगीताशी संस्कृतसारख्या अगम्य भाषेची तर सोडाच परंतु कुठल्याच भाषेशी तुलना होऊ शकत नाही! कारण संगीत ही स्वत:च एक युनिव्हर्सल भाषा आहे आणि ती माणसांनाच काय, झाडंवेलींना आणि प्राणिमात्रांनाही डोलायला लावते..! तेव्हा संस्कृतच्या चर्चेतून संगीताला स्पेअर केलंत तर बरं होईल.. :) आपला, (संगीतप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या,आपण माझी उपक्रमवरची प्रतिक्रिया वाचा.खरडवहीत उत्तर दिलेत तरी चालेल.

प्रश्नात मेख आहे. मुळात प्रश्न "पाली वा अर्धमागधी मृत समजाव्यात का?" असा नाही. संस्कृत समजावी का ? असा आहे. म्हणजे अर्धमागधी मृत पण संस्कृत जीवंत असल्याची काही लक्षणे असावीत हे तात्यांना मान्य असावे. अर्धमागधी व संस्कृत मधील मुख्य आणि निर्णायक भेद म्हणजे भारतीय भाषांवरचा संस्कृतचा गहिरा प्रभाव. उल्लेख केलेले वरिल ३ मुद्दे अर्धमागधी व संस्कृतवर लागु होतात. पण जोवर हा प्रभावाचा चौथा मुद्दा राहतो तोवर संस्कृतला पूर्णांशाने मृत कसे म्हणावे ? नाही म्हणायला संस्कृतला मातृभाषा म्हणवणारे २५००० लोक ( २००१ जनगणना) , तुरळक लेख/साहित्यनिर्मिती, विद्यापीठ अध्यापन असे मुद्दे आहेत. भलेही लोकभाषा नसली तरी संस्कृत आज्जी तिच्या मृत्युशय्येवरुन लेकरांना बघते आहे. -- टीप: सकाळी कचेरीत आल्यावर आमची लाईफ-लाईन ३ तास विश्रांती अवस्थेत असल्याची सुचना लटकली होती. गंमत म्हणजे या नोटिशीतले किमान ३ शब्द संस्कृतमधुन चेतले होते. संस्कृत नक्कीच मेलेली नाही :)

In reply to by अभिरत भिरभि-या

भलेही लोकभाषा नसली तरी संस्कृत आज्जी तिच्या मृत्युशय्येवरुन लेकरांना बघते आहे. या भाषेची मृत्युशय्येवर जाईपर्यंत तिची वाताहात का व्हावी हा माझा मूळ चर्चाविषय आहे! असो, तात्या.

मुक्तसंगः अनहंवादि संस्कृतला मातृभाषा म्हणवणारे २५००० लोक आहेत असे जरी ग्रुहीत धरले, तरीही, व्यावहारिकद्रुष्टया संस्कृत भाषा मृत आहे. मान्य होत नसेल, तर मृतप्राय म्हणावे इतकेच! त्या भाषेच्या या अवस्थेला जबाबदार वर्गाला भाषा ही ज्ञान स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे साधन म्हणून हवी होती त्याचीच परिणती भाषेच्या मरण्यात झाली याच्याशी मात्र असहमत. आता ही लोकव्यवहार भाषा पुन्हा होणे (जवळ जवळ) अशक्य दिसते. (ज्यु लोकांनी हिब्रू भाषेसाठी घेतलेल्या कष्टाप्रमाणे श्रम घ्यावे लागतील!) आणखी एक उपयोग संगणकीय प्रणालीत होईल असे म्हणतात. तसे असेल, तर येईलही ऊर्जितावस्था! पण सध्या तरी स्थिती: गति: च चिंतनीयः मला स्वतःला ही भाषा खूप आवडते आणि मी ती पवित्रही मानतो. तरिही वस्तुस्थिती चा स्विकार आवश्यक!

In reply to by वारकरि रशियात

मला स्वतःला ही भाषा खूप आवडते आणि मी ती पवित्रही मानतो. तरिही वस्तुस्थिती चा स्विकार आवश्यक! हेच म्हणतो... देवाची भाषा म्हणजे संस्कृत असे कोठे तरी वाचले होते ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by वारकरि रशियात

धन्यवाद वारकरीराव! व्यावहारिकद्रुष्टया संस्कृत भाषा मृत आहे. मान्य होत नसेल, तर मृतप्राय म्हणावे इतकेच! माझ्या चर्चाप्रस्तावात मी याचीच, कुणाला माहीत असल्यास नेमकी कारणे काय असावीत?, हे विचारले आहे! तात्या.

सप्रेम नमस्कार विसोबा खेचर महोदयः! भवान उक्तवान यत संस्कृत भाषा मृता अस्ति तत कदापि सत्यम न! कथम अहम वदामि! १) आज व्यवहारात संस्कृत भाषेचा मला कुठेच वापर होतांना दिसत नाही.. संस्कृत ही भारतीय भाषा आहे. परंतु भारतातल्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ, हैद्राबाद, जयपूर, कोल्हापूर, इत्यादी अनेक शहरातून मी वावरलो आहे परंतु आजतागायत मला यापैकी कुठल्याही ठिकाणी संस्कृत भाषेचा रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोग होतांना आढळला नाही. असे का बरे? भवतः एतत वचनम निरर्थकम एव! किमर्थम अद्य दिने दिने एषा भाषाया: महत्वम वर्धते एव!मया सदृशः नैके जना: सन्ति ये संस्कृत भाषा वदति !भवान पुर्णतः न जानाति यत न केवलम मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ, हैद्राबाद, जयपूर, कोल्हापूर, इत्यत्र अपि तु कर्नाटक:,केरल:, अमेरिका,इंग्लंड:,जर्मनी,जपानः मध्ये अपि बहवः जनः संस्कृत भाषा वदति ! कर्नाटकमध्ये मुत्तुर इति एकं ग्रामं अस्ति ! अत्र संस्कृत भाषा मात्रुभाषा! वदतु अधुना! ) बोलीभाषा हे माझ्या मते कुठल्याही भाषेचे एक वेगळेच सौंदर्य आहे. तिचा स्वत:चा असा एक खास ढंग आहे, गोडवा आहे. सर्वसाधारण, सामान्य माणसाला भाषेचा बोलीभाषा हा प्रकार वापरायला खूप बरा पडतो. कारण तिथे भाषेचे नियम, व्याकरणाचे नियम आपोआपच थोडे शिथिल झालेले असतात. जसा प्रान्त असतो तशी बोलीभाषा असते. एवढेच नव्हे, तर मुख्य भाषेप्रमाणेच बोलीभाषेतही खूप चांगली निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळेल! जसे एखाद्या चित्रपटातले बोलीभाषेतील गावरान संवाद, गं साजणी..कुन्न्या गावाची.. या सारखी काही फक्कड गाणी इत्यादी.. ३) आपल्या मायमराठीचे उदाहरण घ्यायचे झाले तर अगदी आजच्या घडीलाही मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती होत आहे. मराठी भाषेत, किंवा हिंदी भाषेत अनेक मंडळी उत्तमोत्तम कथा, कादंबर्‍या, काव्य, गाणी, नाटके, चित्रपट इत्यादींची निर्मिती करत आहेत. आजच्या घडीला संस्कृत भाषेत मला एकही चित्रपट अथवा नाटक पाहायला मिळत नाही. 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या..' सारखे एखादे तरल गाणे आजतागायत मला संस्कृत भाषेत ऐकायला मिळाले नाही.. का बरे असे? १ संस्कृत भाषा अन्य भाषाया: जननी! आन्ग्ल भाषाया: अपि नैका: शब्दा: सन्ति ये संस्कृततः ! २ संस्कृतमध्ये नैकानि गीतानि सन्ति यानि गेया:! सामवेदः पश्यतु!स: गानशास्त्रस्य आत्मा एव! ३ अधुना अपि सम्भाषणसन्देशः,गुन्जारवः,इत्यादि बहव: मासिका: सन्ति तथैव बहु नाटकानि,लेखा: अपि!यदि भवान इच्छति तर्हि अहम भवतः क्रुते गीतमुद्रीका प्रेषयिश्यामि! ४ जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे............,वंदे मातरम्....इत्यादि गीतानि न श्रुतं भवता? संस्कृतमध्ये बोलीभाषा हा प्रकार आहे का? असल्यास सर्रास आहे का? नसल्यास बोलीभाषा या भाषेचे सौंदर्य वाढवणार्‍या प्रकाराला संस्कृत भाषा पारखी कशी राहिली? काय कारणे असावीत? अधुना अहम संस्कृतम एव वदामि अतः संस्कृत भाषा बोलीभाषा! किन्तु मध्यकालमध्ये 'एषा भाषा केवलं ब्राह्मणस्य इति मन्तव्यं आसित्!अतः अस्या: एषा दुरावस्था! अधुना अस्माकम कर्तव्यं तस्या: वर्धनस्य!यत सा अस्माकम माता! यदि वयं अस्माकं मातां एतत वदामः यत,"हे माते, त्वम न मम माता!मम माता कापि अन्या अस्ति "तत भवान एव वदतु उचितं एतत. अधुना भवान एव वदतु यत " आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर संस्कृत ही आजच्या घडीला केवळ एक मृतभाषा आहे असे म्हटले तर ते माझ्या मते वावगे ठरू नये! " एतत वक्तव्यं उचितं! क्रुपया प्रत्युत्तरं ददातु! भवतः संस्कृतानुरागी, उर्मिला

In reply to by उर्मिला००

वावॅ ! जबरा प्रतिसाद ! पण कळाले काहीच नाही :D [( आमच्या बुध्दीची झेप नाही हो... येवढी मोठी... जर स्पष्ट भाषेत.. (तुम्ही कोल्हापुरात देखील होता असे वर लिहले आहे... कोल्हापुरी भाषेत लिहले तरी चालेल ) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

फक्त आणखी एकदा वाचलेत तरी कळेल एवढी ही भाषा सोप्पी आहे.खरच आपण त्याबद्दल बाऊ निर्माण केलेला आहे.

In reply to by उर्मिला००

अधुना अहम संस्कृतम एव वदामि अतः संस्कृत भाषा बोलीभाषा! किन्तु मध्यकालमध्ये 'एषा भाषा केवलं ब्राह्मणस्य इति मन्तव्यं आसित्!अतः अस्या: एषा दुरावस्था! अधुना अस्माकम कर्तव्यं तस्या: वर्धनस्य!यत सा अस्माकम माता! यदि वयं अस्माकं मातां एतत वदामः यत,"हे माते, त्वम न मम माता!मम माता कापि अन्या अस्ति "तत भवान एव वदतु उचितं एतत. +१ मला स्वतःला संस्कृत येत नाही. पण हा प्रतीसाद वाचायला फार कष्ट पडले नाहीत.

In reply to by उर्मिला००

प्रामाणीकपणे सांगायचं तर आपला प्रतिसाद केवळ १० टक्केच समजला! बाकी सर्व साफ डोक्यावरून गेले... ! कृपया मायमराठीत लिहाल का? तात्या.

In reply to by उर्मिला००

संस्कृत मृत आहे अथवा मृत होणार आहे या चर्चेत मला रस नाही... मी ८ वी, ९ वी आणि १० वी असं तीन वर्ष संस्कृत शिकलो (शिकलो म्हणण्यापेक्षा तो स्कोअरींग विषय म्हणून होता). त्यानंतर संस्कॄतशी अगदी दुर दुर तक काही संबंध राहीला नाही. तरीही आज जवळ जवळ आठ वर्षानंतर हा प्रतिसाद वाचताना जाणवलं की, अरेच्चा आपल्याला अजुनही खुप चांगलं संस्कृत समजतं... नाही हो... संस्कॄत शिकायला इतकी अवघड नाही जितकी ती समजली जाते... बास फक्त मनापासून शिकण्याची ईच्छा पाहीजे... आणि तसंही कुठलीही नविन भाषा शिकताना सुरुवातीला अवघड जातंच की... जे पाचवी ते दहावी मराठी माध्यमात शिकून नंतर अकरावीला शास्त्र शाखेत जातात त्यांना विचारा... सहा वर्ष इंग्रजी शिकुनही अकरावीला सुरुवातीचे दोन तीन महिने मास्तर काय बडबडताय ते बिलकूल कळत नाही... मग संस्कृत वाचताक्षणी कशी कळेल... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चर्चेतील मुद्दे सर्वच पटणारे आहेत. संस्कृत भाषा दोन-पाच लोक बोलतात म्हणून ती जीवंत आहे, वगैरे माननारे जागोजागी भेटतील. कितीही आटापिटा करुन जीवंत भाषेची लक्षणे तिला जोडून पाहिल्यास जीवंतपणाची कोणतीच लक्षणे तिच्यात दिसत नाही, म्हणून संस्कृत ही मृत भाषा आहे, हे पटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कितीही आटापिटा करुन जीवंत भाषेची लक्षणे तिला जोडून पाहिल्यास जीवंतपणाची कोणतीच लक्षणे तिच्यात दिसत नाही, सहमत आहे....! तात्या.

संस्कृत मृत आहे अथवा मृत होणार आहे या चर्चेत मला रस नाही. माझी एक धारणा आहे की संस्कृतच्या दुरावस्थेमूळेच भारतीय भाषांच्या दुरावस्थेला सुरवात अथवा त्यांच्या दुरावस्थेची गती वाढली आहे. यासाठीच कोणत्याही भाषेचा विकास, वाढ, प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक असते. आम्ही मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी एक उपक्रम म्हणून पुस्तकविश्व www.pustakvishwa.com नावाचे संकेतस्थळ निर्माण केलेले आहे. या स्थळाचे वैशिष्ठय म्हणजे ये थे संस्कृत भाषेच्या प्रकाशकांनाही आपली प्रसिद्धी विनामूल्य करता येईल. माझ्या माहितीप्रमाणे किलापारडी येथे संस्कृत भाषेचे प्रकाशन नियमितपणे होते, कालच पुण्याच्या पुस्तकमेळ्याव्यात मला दिल्लीचे एक प्रकाशक भेटले, की जे संस्कृत भाषेचे पुस्तकेही प्रकाशित करतात, त्यानाही मी या स्थळाचे निमंत्रण दिले आहे. माझी सर्व मिपाकर बंधु आणि भगिनीना विनंती आहे की त्यांनी अश्याच प्रकारची माहिती मला व्यनि द्वारे अथवा सरळ प्रकाशकांना कळवावी. शेवटी सर्वच भारतीय भाषांचा कणा संस्कृत भाषा आहे असे मला वाटते. दिले -घेतले, आव्हान स्विकारणे ही मराठ्यांची खासियत आहे, संस्कृत भाषा वर्धिष्णु करण्याचे आव्हान आम्ही स्विकारले आहेच. जय संस्कृत - जय मराठी - जय सर्व भारतीय भाषा...

In reply to by कलंत्री

संस्कृत मृत आहे अथवा मृत होणार आहे हा मुद्दा माझ्या मते कमी महत्त्वाचा आहे. ग्रीक , ल्याटीन , संस्कृत या भाषांमधे उत्तमोत्तम ग्रंथ, ज्ञानाची भांडारे , काव्ये, नाटके रचलेली आहेत. शतकानुशतके ज्या संस्कृती नांदल्या त्यांनी एकवटलेले ज्ञान हे सर्व जतन करून ठेवण्याजोगे आहे. संस्कृत भाषा भारती यासारख्या संस्था , संस्कृत दिनासारखे उपक्रम हे सगळे त्यामुळे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. भाषा मृत आहे , आउटडेटेड आहे (मराठी शब्द ? ) हे सगळे मुद्दे ठीक आहेत. प्रश्न शिल्लक रहातो (आणि जो माझ्या मते जास्त महत्त्वाचा आहे ) तो असा की, जे आहे ते जतन करण्याच्या दृष्टीने, जास्त जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवावे का ? अशा चळवळी चालू ठेवाव्यात की नाही ? कुणी अशा चळवळी चालू ठेवत असेल तर त्याला आपण होता होईल तितपत मदत करावी की नाही ? माझ्या मते या सगळ्याची उत्तरे "होय" अशीच आहेत. या बाबतीतला अजून एक मुद्दा भाषांतराचा. ग्रीक काव्य आणि नाटकांचे उदाहरण घेऊ. सोफोक्लिस ची नाटके, प्लेटोचे तत्वज्ञान, होमरची काव्ये या सार्‍या गोष्टी प्रयत्न आणि कष्ट घेऊन अनेकानेक विद्वानांनी इंग्रजीत आणल्या. म्हणूनच आजही त्याचा अभ्यास होतो, हे सारे जिवंत राहिले. असे संस्कृतच्या बाबतीत कितपत झाले आहे याची मला माहिती नाही. पण ही प्रक्रिया चालू रहायला हवी.

In reply to by मुक्तसुनीत

संस्कृतच्या बाबतीत कितपत झाले आहे याची मला माहिती नाही. पण ही प्रक्रिया चालू रहायला हवी. बहुतेक सर्व उपलब्ध (पुरातन) संस्कृत साहित्याचे जर्मन तसेच इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. बाकी आपले मुद्दे उत्तम व मी सहमत आहे. नाना

In reply to by मुक्तसुनीत

आउटडेटेड आहे (मराठी शब्द ? ) कालबाह्य याच्या विरुद्धार्थी = कालातीत झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

http://vipravani.wordpress.com/ देव मंड्ळी एकमेकाना शिव्या कसे द्यायचे संस्कुत मध्ये कुणी सांगेल काय? ते शिकुन घ्यावे म्हणतो. म्हण्जे तद माताय टाईप वापरुन उर्जितावस्थेला मदत होईल.

In reply to by विनायक प्रभू

देव मंड्ळी एकमेकाना शिव्या कसे द्यायचे संस्कुत मध्ये कुणी सांगेल काय? जॉली गॉड काकांना (प्रमोद देव काका हो) संस्कृत येतं का? आणि ते शिव्याही देतात?? ते शिकुन घ्यावे म्हणतो. म्हण्जे तद माताय टाईप वापरुन उर्जितावस्थेला मदत होईल. हे बाकी एकदम बरोबर ... शिव्या शिकल्याशिवाय भाषा शिकली असं नाही म्हणता येणार!

मला संस्कृत थोडेफार येते. ज्यांना खूप येते त्यांच्या तुलनेत थोडे आणि आणि ज्यांना काहीच येत नाही त्यांच्या तुलनेत फार..असा त्याचा अर्थ आहे. ;) संस्कृतमधील शिव्या मात्र येत नाहीत. मराठीतल्या आणि मुंबईच्या हिंदीतल्या बहुतांशी शिव्या येतात. पण एक शिवी अशी आहे की जिचा सर्रास आणि सढळपणाने वापर होतो ती म्हणजे........भेंचोद! माझ्या संस्कृतच्या अल्प ज्ञानाप्रमाणे असे सांगता येईल की ही शिवी मूळ संस्कृत भानच्यूत ह्या शब्दाचा अपभ्रंश बनून झालेली आहे. एकाद्याचे भान म्हणजे चित्त थार्‍यावर नसल्यास म्हणजेच त्यापासून ते (चित्त,भान)च्यूत...म्हणजे ढळलेले असल्यास...त्या व्यक्तीला भानच्यूत असे म्हणत. पण कालांतराने ह्याचा अपभ्रंश होऊन एक अशी शिवी तयार झाली(जिचा उल्लेख वर केलेला आहे) की ज्याचा अर्थही पार बदलून गेला. तसेच च्युत्या ह्या शिवीबद्दलही. तोल(मानसिक) ढळलेला म्हणजेच च्यूत्या ...असे त्याचे स्पष्टीकरण देता येईल. वैयक्तिक माझ्या बाबतीत म्हणायचे झाल्यास मला संस्कृत फारशी येत नसली तरी ज्यांना त्याबद्दल प्रेम आस्था आहे त्यांच्याबद्दल आणि एकूणच संस्कृत भाषेबद्दल मला नितांत आदर आहे. ही भाषा जरूर टिकली पाहीजे. आपल्या पूर्वजांनी जो सांस्कृतिक,वैदिक ठेवा जपून ठेवलाय तो समजून घ्यायचा असेल तर संस्कृतला पर्याय नाही. ज्यांना ती शिकाविशी वाटत नसेल त्यांनी अजिबात शिकू नये आणि ज्यांना शिकाविशी वाटत असेल त्यांनी जरूर शिकावी. ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनी न्यूनगंड आणि ज्यांना येते त्यांनी अहंगंड बाळगायची मात्र अजिबात जरूर नाहीये. संस्कृतवरून वाद जरूर घाला. कारण म्हटलंय ना...वादे वादे जायते तत्वबोध:! मात्र वाद घालताना मूळ मुद्दा सोडू नका आणि वैयक्तिक टिकाटिप्पणी टाळा इतकीच प्रार्थना.

In reply to by प्रमोद देव

धन्यवाद प्रमोदकाका! मराठीतील अजूनही काही शिव्यांची संस्कृतोत्भव उत्पत्ती आपल्याला खाजगीत विचारीन म्हणतो..! :) आपला, (भेंचोद..!) तात्या.

In reply to by प्रमोद देव

"भडवा" हा देखील संस्कृत शद्ब आहे भद्र वर्तयती सः भद्रवा: म्हणजे जो चांगली ( शुद्ध) वर्तणूक रखतो तो भद्रवा ( भडवा) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

तात्यांच्या मुद्द्यांच्या बहुतेक उत्तरांशी तथ्य म्हणून सहमत आहे : १) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर. (येथे व्यवहार म्हणजे माणसा-माणसांतला व्यवहार असे गृहीत धरले आहे.) बहुतेक होत नसावा. कर्नाटकात मठूर नावाचे अग्रहार आहे (खेडे), तिथे दैनंदिन बोलचालीसाठी संस्कृतचा व्यवहार होतो, असे ऐकून आहे. २) बोलीभाषेतील तिचे स्वरूप. जसे मराठीबाबत सांगायचे तर कोकणी, मालवणी, आगरी, खास कोल्हापुरी ढंगाची, माणदेशी इत्यादी. संस्कृतच्या अनेक प्रादेशिक बोलीभाषा होत्या - पूर्वेकडची आणि पश्चिमेकडची या महत्त्वाच्या. (त्या आज त्या प्रदेशांत प्रचलित नाहीत - पण तसे म्हणणे म्हणजे प्रश्न-उत्तर १ची पुनरावृत्ती होय. येथे तात्यांना पुनरावृत्ती अपेक्षित नसावी, म्हणून वेगळे उत्तर दिलेले आहे.) ३) त्या भाषेत होणारी नवनिर्मिती. जसे कथा, कांदंबर्‍या, कविता, नाटके, चित्रपट, इत्यादी.. फारशी होत नाही. पण काही थोडे लोक नवनिर्मिती करत असावेत. उदाहरणार्थ मिसळपावावरच अशोक गोडबोले सर. हा प्रश्न भाकड आहे असे मला का वाटते : १.अ. व्यवहार हा माणसा-माणसांतच असतो, याबाबत काही लोकांचे मत माझ्यावेगळे असू शकते. काही लोकांच्या मते मनुष्य आणि त्यांचे आराध्यदैवत यांच्यातही दैनंदिन व्यवहार होत असतो. (माझ्या बाबतीत असा होत नाही, आणि संस्कृतात कुठलाच व्यवहार होत नाही.) पण दुसर्‍या कोणी म्हटले की त्यांचा आराध्य दैवताशी दैनंदिन व्यवहार होतो, आणि तो संस्कृतात होतो, तर त्यांचे आंतरिक मत मी मानलेच पाहिजे. तात्यांनी अन्यत्र लोकांच्या श्रद्धेला मनापासून पाठिंबा दिला आहे. ज्या लोकांची श्रद्धा आहे की ते त्यांच्या आराध्य दैवताशी संस्कृतात दैनंदिन व्यवहार करतात, त्यांच्या श्रद्धेला खोटे म्हणून नेमके काय साध्य होणार आहे. म्हणून मला हा प्रश्न भाकड वाटतो. १.आ. समजा मठूर खेड्यात पोरे-सोरे-बाप्ये-बाया सर्वच दररोज संस्कृतात बोलत असतील - असतील शे-पन्नास लोक. भाषा "जिवंत" ठरवण्यासाठी असा कुठला आकड्याचा निकष आहे काय - म्हणजे कमीत कमी १ लाख बोलणारे हवेत... असा कुठला निकष नसला तर हा प्रश्न भाकड आहे. २. बोलीभाषेतले तिचे स्वरूप आहे की नाही ते ठरवायला मला वेळ आहे का? मठूरमधले म्हातारे-कोतारे कदाचित पोरा-सोरांपेक्षा वेगळे बोलत असतील. मला तो शोध करायला वेळ नाही. मिसळपावावर बहुतेक लोकांना तितका वेळ नसणार. म्हणून हा प्रश्न भाकड आहे. ३. नवनिर्मिती. समजा मिसळपावावरचे एक गोडबोले सर संस्कृतात नवनिर्मिती करतात. भाषा "जिवंत" ठरवण्यासाठी असा कुठला आकड्याचा निकष आहे काय - म्हणजे कमीत कमी १ हजार नवनिर्मिती करणारे हवेत... असा कुठला निकष नसला तर हा प्रश्न भाकड आहे.

In reply to by धनंजय

बहुतेक होत नसावा. दॅट्स इट..! कर्नाटकात मठूर नावाचे अग्रहार आहे (खेडे), तिथे दैनंदिन बोलचालीसाठी संस्कृतचा व्यवहार होतो, असे ऐकून आहे. अपवाद असू शकतात...! संस्कृतच्या अनेक प्रादेशिक बोलीभाषा होत्या - पूर्वेकडची आणि पश्चिमेकडची या महत्त्वाच्या. (त्या आज त्या प्रदेशांत प्रचलित नाहीत - देअर यू आर..! का नाहीत हे सांगू शकाल काय? फारशी होत नाही. पण काही थोडे लोक नवनिर्मिती करत असावेत. उदाहरणार्थ मिसळपावावरच अशोक गोडबोले सर. पुन्हा एकवार अपवादात्मक परिस्थिती..! आपण माझा मूळ चर्चाप्रस्ताव नीटसा वाचलेला दिसत नाही. आज मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, इत्यादी भारतीय भाषांमध्ये जशी सर्रास नवनिर्मिती होते तशी संकृतमध्ये का होत नाही हा माझा प्रश्न आहे! जमल्यास त्याचे उत्तर द्या.. गोडबोलेसरांसारखी असतील काही उदाहरणे..! पण ते साहित्य आज एक अखंड दिवाळी अंक निघावा इतपत तरी आहे का? त्या तुलनेत मराठी, हिंदी आदी इतर भाषांत प्रचंड लेखन होत आहे. समजा मिसळपावावरचे एक गोडबोले सर संस्कृतात नवनिर्मिती करतात. भाषा "जिवंत" ठरवण्यासाठी असा कुठला आकड्याचा निकष आहे काय - म्हणजे कमीत कमी १ हजार नवनिर्मिती करणारे हवेत... असा कुठला निकष नसला तर हा प्रश्न भाकड आहे. याचा खुलासा वर केला आहे! संस्कृत भाषेतील निर्मिती आणि मराठी, हिंदी, बंगाली, इत्यादी भाषेतील निर्मितीकडे तारतम्याने पाहिल्यास असणारी प्रचंड तफावत आपल्या सहज लक्षात येईल..! आकडेवारीचं कारण पुढे करून आपण मूळ प्रश्नाला बगल देत पळवाट काढताहात असे वाटते..! आणि संस्कृतात कुठलाच व्यवहार होत नाही.) यू सेड इट..! आज बर्‍याच भारतीयांची हीच कथा आहे! बोलीभाषेतले तिचे स्वरूप आहे की नाही ते ठरवायला मला वेळ आहे का? मठूरमधले म्हातारे-कोतारे कदाचित पोरा-सोरांपेक्षा वेगळे बोलत असतील. मला तो शोध करायला वेळ नाही. मिसळपावावर बहुतेक लोकांना तितका वेळ नसणार. म्हणून हा प्रश्न भाकड आहे. मठूरचं एक सोडा.. कुठलं मठूर, कुठे आहे हेदेखील कुणाला माहीत असण्याची शक्यता कमी वाटते! माझ्या चर्चाप्रस्तावत मी मुंबई, दिल्ली,कलकत्ता आदी मोठ्या शहरांची नावे घेतलेली आहेत! त्याबाबत काय ते बोला! की, "मुंबईसारख्या प्रचंड लोकवस्ती असलेल्या शहरात मुळात संस्कृत ही बोलीभाषा आहे किंवा नाही आणि तिचे स्वरूप ठरवायला मला वेळ नाही..! आणि म्हणून मला हा प्रश्न भाकड वाटतो...!" हीच सबब सांगणार आहात? बोला..! वस्तुस्थिती मान्य न करता, काहितरी शाब्दिक शब्दच्छल करून मूळ प्रश्नाला पळवाट काढण्याच्या तुमच्या कसबाचे मी पुन्हा एकदा कौतुक करीन..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आपण माझा मूळ चर्चाप्रस्ताव नीटसा वाचलेला दिसत नाही. आज मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, इत्यादी भारतीय भाषांमध्ये जशी सर्रास नवनिर्मिती होते तशी संकृतमध्ये का होत नाही हा माझा प्रश्न आहे! जमल्यास त्याचे उत्तर द्या..
सर्रास म्हणजे किती? महाराष्ट्रात आदिवासींच्या ठाकर, गोंड, कोर्कू वगैरे भाषा आहेत. त्यांच्यात सर्रास नवनिर्मिती होते का? बहुधा वरील भाषांइतकी (म्हणजे मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, वगैरेंच्या इतकी) नाही. त्या भाषांना मृत म्हणून कोणाला तरी हिणवण्यापेक्षा अधिक काय साध्य होते आहे? अगदी म्हणा, अहिराणीसारख्या गोड बोलीत "सर्रास" नवनिर्मिती होते आहे काय? बहिणाबाईंच्या कवितांच्या नंतर किती पुस्तकांची नावे लिहिता येतील? आता तुम्ही जर म्हटले, की संस्कृत, अहिराणी, ठाकर, कोर्कू भाषा १ लाखापेक्षा अधिक लोक व्यवहारासाठी वापरतात का (मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, वगैरेंच्या इतकी म्हणजे कोट्यवधी लोक लागतील)? उत्तर : नाही. (मठूरमध्ये थोडेसेच लोक असतील - पण कुठल्याही ठाकर खेड्यापेक्षा खूप अधिक. मुंबईपेक्षा मठूरमध्ये आणि ठाकरांच्या खेड्यामध्ये - दोन्हीकडे कमी लोकसंख्या असेल.) संस्कृत, अहिराणी, ठाकर, कोर्कू भाषा १ हजारापेक्षा अधिक लोक नवनिर्मिती करतात का (मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, वगैरेंच्या इतकी म्हणजे लक्षावधी लोक लागतील)? यांच्यात दिवाळी अंक निघू शकतात का? उत्तर : संस्कृतमध्ये - होय, पण लेखनाचा दर्जा निकृष्ट आहे. बाकीच्यांमध्ये बहुधा नाही. असे म्हणून अहिराणी, ठाकर, गोंड, कोर्कू भाषांना हिणवण्यापेक्षा अधिक काय साध्य होते? - - - - तुम्ही विचारता :
त्या आज त्या प्रदेशांत प्रचलित नाहीत -... देअर यू आर..! का नाहीत हे सांगू शकाल काय?
तुमचे अन्य प्रतिसाद वाचून असे दिसते की तुम्ही ज्ञानेश्वरीतील भाषेला आणि आजच्या नेवाशातील भाषेला एकच मानता - कारण भाषा प्रवाही असते. हे असे तुमचे मत असेल, तर ज्ञानेश्वराच्या आणि कालिदासाच्या भाषेला एकच मानायला काही हरकत नाही (कालिदास संस्कृत आणि प्राकृत मिसळून लिहीत असे.) आणि कालिदासाची भाषा आणि महाभारताची भाषा एकच म्हणायला हरकत नाही. तुमच्याच मताने ज्ञानेश्वरांची भाषा->प्रवाहाने->तुमची-आमची भाषा असे असेल, म्हणा. तर तुम्ही प्रवाही संस्कृत भाषाच बोलत/लिहीत आहात. (रामायणातली प्रवाही बोली -> कालिदासाची प्रवाही बोली -> महाराष्ट्रातील प्रवाही बोली -> ज्ञानेश्वरांची प्रवाही बोली -> मराठेशाहीची प्रवाही बोली -> आधुनिक ठाण्याची प्रवाही बोली). हे "पूर्वीच्या बोली आजकाल का प्रचलित नाहीत?" याचे उत्तर आहे. "पूर्वीच्या बोली" या आज कधीच प्रचलित नसतात. आज कित्येक मराठी लोकांना ज्ञानेश्वरी वाचून अर्थ लागत नाही. ज्ञानेश्वरांच्या वेळेला कित्येक मराठी लोकांना गीता वाचून अर्थ लागत नसे - हा सगळा एकच लांबलचक प्रवाह आहे. ज्ञानेश्वरांची भाषा जिवंत आणि कालिदासाची मृत म्हणण्याने काहीही हशील नाही. ज्ञानेश्वर तरी बरे - शब्द अर्धे-अधिक समजतात. महानुभावांची भाषा मला तर अर्ध्याहून अधिक समजत नाही! तर ती जिवंत म्हणायची की मृत? - - - ते तुमचे श्रद्धा वगैरे बद्दल विचार काय आहेत? मागे तुम्ही म्हणालात की तुमची हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि वैद्यकाबद्दल "गुरूंनी/डॉक्टरांनी सांगितले म्हणून" श्रद्धा आहे. मी तुमचे म्हणणे वैयक्तिकरीत्या मानले होते - असे काही मानायला मी तयार असतो, याचा पुरावा घ्या. मी स्वतः संस्कृत व्यवहारासाठी वापरत नसलो, तरी जर मला कोणी सांगितले, की ते लोक गुरूने सांगितल्यामुळे गुरूने शिकवलेले संस्कृत वापरतात, तर मी तितपत तरी मान्य करावे, नाही का? - - - मी तुमच्या लेखाशी बरीच सहमती दाखवली हे पुन्हा लक्षात आणून देतो. संस्कृत भाषेचा व्यवहारातला अल्प उपयोग बघता शिक्षणखात्याने त्याच्यावर त्या प्रमाणात खर्च करावा असे माझे मत आहे. (म्हणजे मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, वगैरेंच्या पेक्षा पुष्कळ कमी.) त्याच प्रकारे "सश्रद्ध पण सबळ प्रमाण नसलेल्या डॉक्टरकी"वर आरोग्य मंत्रालयाने फारच कमी प्रमाणात खर्च करावा असे माझे मत आहे. पण व्यक्ती म्हणून तुम्ही "डॉक्टराला हातगुण असतो" यावर श्रद्धा ठेवा की "आपण संस्कृत बोलतो" यावर. माझे काही म्हणणे नाही. ती तुमच्या श्रद्धेबद्दल वस्तुस्थिती असे मानायला मी तयार आहे.
वस्तुस्थिती मान्य न करता, काहितरी शाब्दिक शब्दच्छल करून मूळ प्रश्नाला पळवाट काढण्याच्या तुमच्या कसबाचे मी पुन्हा एकदा कौतुक करीन..!
ठीक. मी मिसळपावावर मान्य करतो की कोणीही "आपण संस्कृत बोलतो" अशी श्रद्धा ठेवू नये. तुम्ही उलट मान्य करा की कोणीही "आपल्या डॉक्टराला हातगुण आहे" अशी श्रद्धा ठेवू नये. बघा - मिसळपावापुरती तरी मी खुद्द पळवाट बंद करून घेतली आहे. (मिसळपावाबाहेरच्या आयुष्यात मात्र "अमुक भाषा मृत आहे" असे मी म्हणणार नाही. फारतर "अमुक भाषेवर सरकारी पैसे खर्च करताना व्यवहारातील फायदे-तोटे बघा" एवढेच म्हणेन. वैयक्तिक पैसे कोणी कितीही खर्च करावेत - मला त्याचे काही नाही.)

In reply to by धनंजय

सर्रास म्हणजे किती? महाराष्ट्रात आदिवासींच्या ठाकर, गोंड, कोर्कू वगैरे भाषा आहेत. त्यांच्यात सर्रास नवनिर्मिती होते का? बहुधा वरील भाषांइतकी (म्हणजे मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, वगैरेंच्या इतकी) नाही. त्या भाषांना मृत म्हणून कोणाला तरी हिणवण्यापेक्षा अधिक काय साध्य होते आहे? अगदी म्हणा, अहिराणीसारख्या गोड बोलीत "सर्रास" नवनिर्मिती होते आहे काय? बहिणाबाईंच्या कवितांच्या नंतर किती पुस्तकांची नावे लिहिता येतील? ठाकर, गोंड, कोर्कू या भाषा जिवंत आहेत किंवा नाही हे मला माहीत नाही. तसेच अश्या इतरही अनेक भाषा असतील! माझा चर्चाप्रस्ताव संस्कृत भाषेशी निगडित आहे! तर तुम्ही प्रवाही संस्कृत भाषाच बोलत/लिहीत आहात. (रामायणातली प्रवाही बोली -> कालिदासाची प्रवाही बोली -> महाराष्ट्रातील प्रवाही बोली -> ज्ञानेश्वरांची प्रवाही बोली -> मराठेशाहीची प्रवाही बोली -> आधुनिक ठाण्याची प्रवाही बोली). पुन्हा एकदा शब्दच्छल! मी स्पष्ट शब्दात संस्कृत भाषेसंदर्भात प्रस्ताव मांडला आहे. आज आपण जी भाषा बोलतो तिला मराठी भाषा म्हणतात! मग उगाच "प्रवाही संस्कृत" हा शब्दच्छल करून तिला आजच्या मराठीपर्यंत चिकटवण्यात काय अर्थ आहे? संस्कृत भाषेबद्दल बोला ना काय ते! ज्ञानेश्वरांची भाषा जिवंत आणि कालिदासाची मृत म्हणण्याने काहीही हशील नाही. ज्ञानेश्वरांची भाषा ही तेव्हाही मराठी होती आणि आजही मराठी आहे. फक्त तिचे स्वरूप बदलले आहे. कालिदासाची भाषा ही तेव्हाही सस्कृत होती, आजही संस्कृत आहे. माझा चर्चाप्रस्ताव आजच्या संस्कृत भाषेबद्दल आहे. त्यात नवनिर्मिती, वृत्तपत्र, व्यवहार इत्यादी काहीही होतांना दिसत नाही त्याची कारणमिमांस मी विचारली आहे. मी स्वतः संस्कृत व्यवहारासाठी वापरत नसलो, तरी जर मला कोणी सांगितले, की ते लोक गुरूने सांगितल्यामुळे गुरूने शिकवलेले संस्कृत वापरतात, तर मी तितपत तरी मान्य करावे, नाही का? मान्य करायला काहीच हरकत नाही. मुद्दा असा आहे की आज मराठी, हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांमध्ये विपूल लेखन होते, चित्रपट, नाटकाची नवनिर्मिती होते तशी संस्कृतमध्ये होतांना दिसत नाही! त्याची कारणमिमांसा केलीत तर बरं होईल...! कृपया विषयाला धरून नेमकी उत्तरे दिलीत तर अधिक बरे! उगीच नसता शब्दच्छल किंवा फापटपसारा नको असे वाटते.. ठीक. मी मिसळपावावर मान्य करतो की कोणीही "आपण संस्कृत बोलतो" अशी श्रद्धा ठेवू नये. तुम्ही उलट मान्य करा की कोणीही "आपल्या डॉक्टराला हातगुण आहे" अशी श्रद्धा ठेवू नये. बघा - मिसळपावापुरती तरी मी खुद्द पळवाट बंद करून घेतली आहे. हे वाक्य असंबंद्ध वाटते..! येथे मिपाचा काहीच संबंध नाही... मूळ चर्चाप्रस्तावात आज संस्कृत कुठेही वापरली जाताना दिसत नाही, कथा, कादंबर्‍या, कवितांद्वारे ती आपल्यासमोर येत नाही, वर्तमानपत्रात कधीच कुठल्या संस्कृत चित्रपटांची जाहिरात पाहायला मिळत नाही, एखाद्या संस्कृत कवीने काही गाणी लिहिली आहेत आणि ती गायक ती गातो आहे असेही चित्र कुठे दिसत नाही, इत्यादी मुद्दे मांडले आहेत व त्याची कारणमिमांसा विचारली आहे. आपल्या प्रतिसादातून मला याचे अद्यापही समधानकारक उत्तर मिळालेले नाही. असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

संस्कृतात विपुल लेखन होत नाही याबाबत चर्चा करण्यालायक आहे. पण त्यासाठी वेगळा चर्चाप्रस्ताव असावा."संस्कृत भाषेत पूर्वी विपुल नवनिर्मिती होत असे, पण आता होत नाही. त्याची कारणमीमांसा काय?" अशा चर्चाप्रस्तावात ती उत्तरे देण्यात मजा वाटेल. "संस्कृत ही मृत भाषा समजावी काय?" असे नाव असलेल्या प्रस्तावास माझे उत्तर असे - १. हा कोणाचा व्यक्तिगत प्रश्न आहे काय - मग त्याचे उत्तर व्यक्तिगत आहे. मग कोणी "श्रद्धेने" काही म्हणेल, ते मी त्यांच्यासाठी व्यक्तिगत मान्य करतो. (तुम्हीही करता असे दिसते. तुमची-माझी सहमती!) २. हा सार्वजनिक प्रश्न आहे का? मग निकष आवश्यक आहेत. "भाषा मृत समजण्यासाठी" काय निकष आहेत? तुम्ही १-२-३ मुद्द्यांसाठी "मराठी, बंगाली, तेलुगू...वगैरे" भाषांचे उदाहरण देता, ते ठीकच आहे - कारण तुमचा निकष तुलनात्मक आहे. मग मी "गोंड, ठाकर, कोर्कू" भाषांची उदाहरणे देतो, तेही तुलनात्मकच. पुढील तुमचीच वाक्ये वाचावीत.
मुद्दा असा आहे की आज मराठी, हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांमध्ये विपूल लेखन होते, चित्रपट, नाटकाची नवनिर्मिती होते तशी संस्कृतमध्ये होतांना दिसत नाही! ... ठाकर, गोंड, कोर्कू या भाषा जिवंत आहेत किंवा नाही हे मला माहीत नाही. तसेच अश्या इतरही अनेक भाषा असतील! माझा चर्चाप्रस्ताव संस्कृत भाषेशी निगडित आहे!
आता असे वाचा : मराठी, हिंदी इंग्रजी भाषांमध्ये विपुल लेखन होत असेल. तसेच अशा इतरही अनेक भाषा असतील! तुमचा चर्चाप्रस्ताव संस्कृत भाषेशी निगडित आहे... आणि मुद्दा असा आहे की ठाकर, गोंड, कोर्कू या भाषांत काही थोडे लोक बोलताना दिसतात. तसेच संस्कृतमध्ये बोलताना दिसतात! आता एके ठिकाणी स्वतःच वेगळ्या भाषांची उदाहरणे देऊन, दुसर्‍या ठिकाणी वेगळ्या भाषांची उदाहरणे अमान्य करणे म्हणजे शब्दच्छल नव्हे काय? आलटूनपालटून उलटसुलट मुद्द्यांचा भडिमार केलात तर उत्तरात गोंधळलेला फापटपसाराच मिळेल. :-) (हे वाक्य रागाने लिहिलेले नाही. "फापटपसारा नको" वाक्याला उत्तर आहे.) ३. तुम्ही (किंवा मी) जाहिराती बघितल्या नाहीत तर काय करावे? तुम्ही (किंवा मी) नाहीतरी किती बारीकसारीक भाषांतल्या जाहिराती बघतो? तुम्हाला त्या भाषेत रस असला, तर शोधा, म्हणजे सापडेल. मला खुद्द प्रचलित संस्कृत भाषेबद्दल फारसे स्वारस्य नसल्यामुळे मी शोधायचे कष्ट घेत नाही.
आपल्या प्रतिसादातून मला याचे अद्यापही समधानकारक उत्तर मिळालेले नाही. असो,
मी अगदी पहिल्या वाक्यातच काही प्रमाणात सहमती दर्शवली आहे. तुमच्या १-२-३ व्याख्येपुरती मी सहमती दिलेली आहे. तेवढी पुरेशी असावी. पण तुमची "मृत"ची १-२-३ व्याख्याच सर्वमान्य नाही. आणि मग ती व्याख्या "केवळ कोणालातरी हिणवणारी" असे म्हटले आहे. यामुळे तुमच्या १-२-३ वैयक्तिक व्याख्येपुरती माझी सहमती बदलत नाही. कुठल्या बाबतीत तुम्हाला उत्तरातून समाधान हवे आहे, ते मला कळत नाही. (माझे नाव गूगलल्यास असे दिसेल की मी एका लहान संस्कृत पत्रिकेत अगदी लहान प्रमाणात उपसंपादकपणा [प्रुफे तपासणे] करतो. याचे कारण असे नव्हे, की मला संस्कृतातल्या नवनिर्मितीत फारसे स्वारस्य आहे. मला जुने संस्कृत ग्रंथ वाचण्यास कोणी मित्राने मदत केली होती - यात मला स्वारस्य आहे. त्याची फूल ना फुलाची पाकळी परतफेड म्हणून या पत्रिकेसाठी प्रुफे वाचतो. त्यामुळे तुम्हाला दिलेली आंशिक सहमती, आणि तुमच्या व्याखेला विरोध, दोन्ही प्रामाणिकच आहेत. शब्दच्छलासाठी शब्दच्छल नाही.)

माझ्या मते संस्कृत मृत भाषा नक्कीच नाही. बोलीभाषा म्हनुन तिचा वापर कधी झाला की नाही हा एक वेगळा विषय होइल. परंतु जो पर्यन्त एखाद्या भाषेत उपलब्ध असलेले साहीत्य अभ्यासले जाते , त्याचा अनुवाद केला जातो तो पर्यन्त ती भाषा जिवंत म्हटली पाहीजे. संस्कृत ही "देवांची भाषा" म्हनुन सामान्य जनतेपासुन ती नेहमीच दुर राहीली. बहुतेक त्याचाच परिणाम संस्कृत भाषेत खुप जास्त साहीत्य लिहीले गेले नाही. आजही संस्कृत भाषेत लिहीलेल्या गेलेल्या विविध ग्रंथाचा अभ्यास केला जातो. अगदी वैद्यकीय अभ्यासक्रमातही संस्कृत भाषेत लिहीलेल्या ग्रंथांचा अभ्यास होतो. त्यामुळे संस्कृत ही मृत भाषा आहे असे म्हनता येत नाही. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

आयला.. तात्या.. काय हो संस्कृत च्या एवढे पाठीमागे लागला आहात. ज्यांना जी भाषा वापरायची आहे ती खुशाल वापरु द्या की. तुम्हाला वाटत असेल भाषा मृत झाली आहे. पण ज्यांना वापरायची आहे त्यांना वापरु द्यात. उगाच कीस कशाला पाडायचा. आता कथा कादंबर्‍यामधे संस्कृत नाहीच आहे, हे सगळ्याना माहीत आहे. संस्कृत आता फक्ता देवांच्या स्त्रोत्रापुरती उरली आहे. पण आहे ना. तुम्हाला म्हणायची नसतील स्तोत्रे तर नका म्हणु. परंतु उगाच संस्कृत भाषेला मारुन टाकण्यात काय आनंद मिळतोय तुम्हाला ? - राजस.

तात्या हा मुद्दा सगळ्याना का पटवायला निघाले आहेत? काही मुद्दे स्पष्ट केले तर बरे होईल. पुण्या-मुंबईत भाषा बोलली गेली म्हणजे ती जिवंत भाषा होते का? तसे असेल तर पुण्या-मुंबईत ९०% पेक्षा जास्त लोकांना शास्त्रीय संगीत कळत नाही. म्हणून ते सुद्धा मृत म्हणावे का? हे म्हणजे म्हातारी उठत नाही, बोलत नाही म्हणुन तिचे श्राद्ध करण्यासारखे आहे. अजूनही काही प्रकाशन संस्था संस्कृत भाषेतील पुस्तके प्रकाशित करतात. याउप्पर जर मृत भाषा आणि अस्तंगत भाषा याबद्दल अधिक शास्त्रीय माहिती वाचायची इच्छा असेल तर इथे मिळेल.

In reply to by रामपुरी

तात्या हा मुद्दा सगळ्याना का पटवायला निघाले आहेत? काही मुद्दे स्पष्ट केले तर बरे होईल. अहो मालक, मी कुणाला काहीही पटवायला निघालेलो नाहीये! :) माझे काही मुद्दे होते ते मी माझ्या प्रस्तावात मांडले आहेत इतकंच! से असेल तर पुण्या-मुंबईत ९०% पेक्षा जास्त लोकांना शास्त्रीय संगीत कळत नाही. म्हणून ते सुद्धा मृत म्हणावे का? तूर्तास संस्कृत हा विषय आहे. संगीत नव्हे... सवाईगंधर्वसारख्या महोत्सवाला आजही ५-१० हजार लोकांची उपस्थिती असते. रागदारीक्षेत्रात उत्तमोत्तम गाणारे तयार होत आहेत, विविध बंदिशींची निर्मिती होत आहे, अगदी आजच्या जमान्यातील हम दिल दे चुके सनम सारख्या चित्रपटात आमचा अहीरभैरव अगदी जसाच्यातसा वापरला जातो आहे! प्रश्न आजच्या व्यवहारिक जगातील वापराचा आहे! असो, त्यातूनही ते संगीत मृत आहे असं जर कुणाला वाटत असेल तर माझं काहीच म्हणणं नाही! तात्या.

संस्कृत मृत भाषा आहे का नाही यावर माझं काही फारसं मत नाही, पण अनेक भाषा थोड्याफारतरी शिकाव्यात असं बर्‍याचदा वाटतं आणि त्यात संस्कृतही शिकावंसं वाटतं. खोटं बोलणार नाही, पण चारचौघात बोलताना, "मला मराठी, हिंदी, इंग्लिश या तीन भाषा चांगल्यापैकी येतातच, पण गुजराथी, बांग्ला, संस्कृत याही भाषा थोडथोड्या, 'नमस्कार-चमत्कारा'पुरत्या येतात", असं मला सांगता आलं तर माझे 'कूल पॉईंट्स' वाढतील आणि मला असले पॉईंट्स वाढवायला फार आवडतं. (तसं "मी ऍस्ट्रॉनॉमर आहे" हे सांगितलं की पण थोडे 'कूल पॉईंट्स' मिळतात.) आणि तुम्ही हा धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद. अनेक दिवसांची विस्मरणात गेलेली इच्छा पुन्हा वर आली आणि खरडवह्यांमधून टवाळी म्हणून का होईना पण थोडं-फार संस्कृतमधून संवादांना आणि संस्कृत शिकायला सुरूवात झाली. कर्तरी-कर्मणि प्रयोग, बहुव्रीही, क.बु.धा.वि., व.का.धा.वि., असे जुने मित्र-मैत्रिणीही आठवले.

तात्यांनी मनात काय हेतु धरुन हा धागा सुरु केला असेल हे समजणे अवघड आहे. मृत भाषा म्हणजे अशी भाषा की ज्यात काहीच संवाद कुठेच होत नाहीत अशी भाषा. यात गाणी, चित्रपट, मासिक, लेखन इत्यादी धरु नये कारण हे केवळ प्रचलित बोलीभाषेतच होते. त्या अर्थाने संस्कृत आज बोलीभाषा नाही. पण ती मृत पण नाही. पण कागदावर छपाई हा निकष लावायचा झाला, तर तात्या गीता प्रेस, गोरखपुर तसेच मोतीलाला बनारसीदास दरवर्षी केवळ ५० लाखावर विविध संस्कृत पुस्तके छापत असतात जसे वेद, उपनिषदे, सप्तशती, रामरक्षा वगैरे. म्हणजे पुस्तके छापलेच जात नाहीत हा निकष गैरलागु. वाचक घेतात, वाचतात. धनंजय म्हणतात त्याप्रमाणे स्वतःशी किंवा ईश्वराशी त्यांचा संवाद चालु असतो व तो संस्कृत मधे असतो. आजही भारतात वेदांचे शिक्षण देणारी गुरुकुले आहेत जिथे केवळ संस्कृत मधेच बोलले जाते. एक जण जरी बोलत असेल तर ती भाषा मृत गणली जात नाही. बोली भाषा म्हणून ती निद्रिस्त भाषा असे म्हणु शकतात. निद्रिस्त अशा साठी की अशी वेळ संस्कृतवर आजपावेतो अनेक वेळेला आली आहे व ती त्यातुन परत बोलीभाषा तसेच ज्ञानभाषा म्हणुन पुढे आली आहे. व मला पुर्ण खात्री आहे की भविष्यातही असे होईल. हे केवळ संस्कृतच्याच बाबतीत घडले आहे. मराठीतील अर्ध्याहुन अधिक शब्द संस्कृतोद्भव आहेत. तसेच भारतीय घटनेनुसार नवीन शब्द तयार करायचा झाल्यास तो संस्कृतमधुन केला जावा असे सुचित करण्यात आलेले आहे. यानुसार अनेक नवीन शब्द जसे संगणक वगैरे करण्यात आले आहेत. भारतातील द्रविडीयन भाषाकुल सोडल्यास इतर सर्व भाषा ह्या संस्कृत+प्राकृतोद्भव आहेत. परंतु आज द्रविड भाषेत अनेक संस्कृत शब्द ठाण मांडुन बसले आहेत. काही जसेच्या तसे किंवा स्वरुप बदलुन. संस्कृत = संस्करण केलेली ही विशेष भाषा भारतीयांनी प्रचलित विविध भाषांमधे गोंधळ होवु नये म्हणुन ज्ञान सुरक्षित ठेवण्यासाठी तयार केली. ज्याप्रमाणे आपण बोलत असलेली इंग्रजी, तामिळांची इंग्रजी व इंग्रजांची इंग्रजी भिन्न आहे पण कोर्टातील कायदेशीर इंग्रजी ह्या सर्वाहुन भिन्न आहे. तसेच वैदिक, प्राकृत, पैशाची, मागधी, पाली अशा प्रमुख व त्यांच्या हजारो उपभाषा यांपासुन एक संस्करण करुन भाषा तयार झाली/ केली गेली. ती आधुनिक संस्कृत. तिचे अनेक वैशिष्ठ्ये आहेत त्यातील एक म्हणजे शब्दांमधुन शब्द तयार होण्याचे सामर्थ्य जे अन्य कोणत्याही भाषेत नाही. मी तरी संस्कृतला मृत मानत नाही, मानणार नाही. कुणी मानत असेल तर मला फरक पडत नाही. कारण मी स्वतः अभ्यास करुनच माझे मत बनवले आहे. कारण संस्कृत भारताच्या रक्तातुन वाहत आहे. तुम्ही माना किंवा नका मानु. काही जणांनी ज्ञानाची मक्तेदारी असे समजुन संस्कृतला जखडले असे काही जण म्हणतात. तो केवळ मैकौलेप्रणित भ्रम आहे.

तात्या खरं सांगते, चर्चाप्रस्ताव वाचला तेव्हा तुमचे मुद्दे पटले. तुम्ही म्हण्ताय ते खरं आहे, थोडीफार मृतप्रायही झाली असेल संस्कृत. पण थोडीफार जिवंत नक्कीच असेल. वेदशाळा वगैरे मधुन नक्कीच संस्कृत असेल. (मला ठाऊक नाही). बाकी वेद आणि कालिदास जाऊदे लांब सद्ध्या. पण रामरक्षा ,गायत्री मंत्र आणि अथर्वशीर्ष तरी मला लगेच आठवतं संस्कृत म्हटल्यावर. किती तरी, लाखो माणसं असतील जे ही स्त्रोतं म्हण्तात. (असेही लोक आहेत ज्यांना संस्कृतचा गंधही नाहीए, ती लोकं पाठांतराने ही स्तोत्रं म्हण्तात.) मला स्वत:ला संस्कृत भाषा खूप आवडायची. शाळेत अगदी एन्जॉय केलं मी ही भाषा शिकणं. आता मागे पडली, कारण व्यवहारात उपयोग नाही. याचा अर्थ ती मृत आहे असा मी काढणार नाही कधीच. माझं भाषांवर प्रेम आहे. खूप इच्छा असूनही तेव्हढं प्राविण्य मिळवलं नाही याचं वाईट वाटतं. याचबरोबर एक उदा: मला काही वर्षांपूर्वी शास्त्रीय संगीताचा तिरस्कार वाटायचा.. हो तिरस्कार. कारण कोण काय गातयं, असं कशाला गात आहे हेच समजायचे नाही. हळू हळू कानावर पडत गेलं आणि गोडी लागली. मला शास्त्रीय संगीत आता कधी कधी आवडतं, हा बदल मी आता स्वीकारला आहे. विचारसरणीतला बदल होणं ही तितकी वाईट गोष्ट नाहीए! असो... आधी चर्चाप्रस्ताव पटला परंतू आत्ता तुम्ही उगीच वैयक्तीक घेऊन संस्कृतच्या मागे लागल्यासारखे वाटताय .. काही गोष्टींमधे फारच तीव्र मतं असतात तुमची! इतकं सुंदर चालणारं मिपा कधीही धाडकन बंद करीन म्हण्ता,अलिप्त राहता, आणि अशा विषयांवर अलिप्त राहणं जमत नाही.. हे खरं उलटं असतं तर छान झालं असतं! :) (विचारले नसतानाही मत देत आहे याची जाणीव आहे. आवडले नसल्यास दुर्लक्ष करू शकता..) (तुमचं संस्कृतच्या मागे हात धुऊन लागणेही आवडल्ं नाही, तसेच उपक्रमवरचे संस्कृतप्रेमींच संस्कृतचा अती उदो उदो करणं, विरूद्ध काही बोलताच तोल ढळणं वगैरेही आवडलं नाही.. सुवर्णमध्य सापडला तर फार बरे होईल..)

In reply to by भाग्यश्री

तुमचं संस्कृतच्या मागे हात धुऊन लागणेही आवडल्ं नाही, मला आवडतं, कधी कधी गरज असते. भाषिक चळवळी प्रवाही होण्यासाठी अशा वैचारिक मारामा-या गरजेच्या असतात. :) तेव्हा तात्याचे भाषेविषयक मुद्दे अगदी मनापासुन आणि अभ्यासपूर्ण उतरलेले असतात, त्यांचे एखाद्याविषयाच्या मागे हात धुऊन लागणे, केवळ याच गोष्टीमुळे आम्ही त्यांचे सर्वात जुने फॅन आहोत आणि त्याचा ते निर्भळ आनंद आमच्यासारख्या वाचकांना घेऊ देतात. संस्कृतप्रेमींच संस्कृतचा अती उदो उदो करणं, विरूद्ध काही बोलताच तोल ढळणं वगैरेही आवडलं नाही.. सहमत आहे !!!

तात्या खरं सांगते, चर्चाप्रस्ताव वाचला तेव्हा तुमचे मुद्दे पटले. तुम्ही म्हण्ताय ते खरं आहे, थोडीफार मृतप्रायही झाली असेल संस्कृत. भाग्यश्री, तू अगदी नेमका मुद्दा मांडला आहेस. मी फक्त माझ्या चर्चाप्रस्तावात संस्कृत भाषेच्या बाबतीत असे का झाले असावे इतकेच विचारले आहे! तसेच उपक्रमवरचे संस्कृतप्रेमींच संस्कृतचा अती उदो उदो करणं, विरूद्ध काही बोलताच तोल ढळणं वगैरेही आवडलं नाही.. सुवर्णमध्य सापडला तर फार बरे होईल..) यू गॉट इट! काल त्यांचीच जरा खोडी काढण्याकरता तिथे हा प्रस्ताव टाकला होता! :) मंडळींना जरा तावातावाने लिहिताना पाहून अंमळ मजा आली.. ;) असो... आपला, (संस्कृतप्रेमी) तात्या.