Skip to main content

शांत अरनब गोस्वामी ,निश्चल वागळे आणि साधेसुधे भारतीय न्युज चॅनेल्स

लेखक मारवा यांनी सोमवार, 28/04/2014 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय टी.व्ही न्युज चॅनल्स च्या संख्येत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय/अनाकलनीय/असहनीय वाढ झालेली आहे. त्यात मी केवळ हिन्दी-मराठी-इंग्रजी न्युज वाहीन्यांवीषयी बोलतोय. बाकी सध्या बाजुला ठेउयात. तर या नव्या मीडीयाने अनेक नवनिवेदकांची सुनामी आलेली आहे. अनेक नव्या चेहरयांना संधी मिळालेली आहे व अति उत्साहाने सारेच कामाला लागले आहेत. व सध्याचा निवडणुकी चा सीझन तर वृत्त निवेदकांचा (विणीच्या हंगामा सारखा) हंगाम असतो. यात निवेदकांच्या प्रतिभेला जणु नवा जन्म लाभतो. यात प्रथम भारतीय न्युज चॅनल्स ची काही खास वैशिष्ट्ये आहेत ती बघुयात. भारतीय न्युज चॅनल्स मध्ये संगीताची म्युझिकल बॅक्ग्राउंड ची फ़ार फ़ार मजा असते. म्हणजे आखिर कहॉ गई आजम खान की वो भैस ? या विशेष अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात सतत एक करुण संगीत बॅकग्राउंड मध्ये वाजविण्यात येत असते. ज्याने कीतीही नाही नाही म्हटल तरी आजम भाई च्या असीम आणि म्हशी च्या आजमभाई शी विरह या ( वेदना- असीम + विरह) प्रेक्षक हमखास एकरुप होतो. आणि त्याचे हात आकाशाकडे अथवा जुळुन अथवा क्रॉस (आपापल्या धर्म प्रेरणे नुसार ) हालचाल प्रतिक्षिप्त होते. व तो प्रेक्षक नकळत प्रार्थना करु लागतो की या अल्ला भैस मिला दे या अल्ला भैस मिला दे. प्रिंट मिडीया ने जळफ़ळाटातुन अशी बातमी दिलेली आहे की चॅनल्स चे संगितकार हे ए.आर. रहेमान इ. बॉलिवुड मधील प्रख्यात संगितकारच आहेत. ते गुप्तपणे आपली सेवा या चॅनल्स ला देतात म्हणे त्या बदल्यात त्यांना स्टींग (दंश) मुक्त ठेवण्याची हमी दिली जाते म्हणे. मागे एकदा नदीम श्रवण मधल्या नदीम ने नकार देउन पाहीला परीणाम तुमच्या समोर आहे. असो चॅनल्स विषयी इतक खोलात जाउ लागलो तर माझे खरे नाव व इतर कोणत्या आयडीने मी इथे लिहीतो ते उघड होउ शकते. तर ही गौरवशाली संगित नाटका सारखीच संगित समाचार ही आपली जिव्हाळ्याची व युनिक परंपराच आहे. तुम्ही बीबीसी सीएनएन अलजझिरा सारखे कीरकोळ प्रादेशिक चॅनल्स बघितले तर तुम्हाला ते कीती संगीतहीन पातळीवरुन बातम्या देतात. हे लक्षात येईल. व इमोशन हा अतिशय महत्वाचा भारतीय गुणाचा त्यांना गंध ही नसतो हे चाणाक्ष प्रेक्षकांना चटकन कळेल. न्युज मध्ये भावनेला जे सार्थ महत्व भारतीय न्युज चॅनल्स देतात त्याला अखिल विश्वात तोड नाही. परत एकदा वरील किरकोळ प्रादेशिक चॅनल्स बघा कधी एक कीमान एक तरी मानवी भावनेच दर्शन तुम्हाला बीबीसी वा सीएनएन च्या निवेदिके च्या चेहरयावर बघितल्याचे आठवतेय तुम्हाला? रोबोटीक भावनाहीन असतात ते निवेदक. एकदम रटाळ. भारतीय निवेदकांचे संपुर्ण शरीर भावनेने ओथंबुन जाउन व्यक्त होत असते. उदा. निखील जी वागळेंना बघा भावातिरेकाने त्यांचे हात तोंड डोळे शरीराचा अर्धा वरील भाग सतत मुव्हमेंट करीत असतो. कधी कधी तर मला निखील ची काळजीच वाटते हो. न्युज मध्ये टायटल्स जे पडद्यावर लिहुन येत असतात ते तर सर्जनशील लेखकांच्या कविंच्या अभिजात साहीत्याशी स्पर्धा करीत असतात. संगिताची साथ अर्थातच असतेच तर कधी टायटल यमक जुळवत येते जसे अखिलेश भय्या पर मंडराया मुजफ़्फ़रनगर का साया कधी टायटल सस्पेन्स निर्माण करतात वो कौन है जिससे डरता है दाउद ? कधी टायटल लाडाने चुचकारतात दिल्लीवालो जश्न के लीये तैयार हो आ रहा है.... कधी धमकावतात १२ दिसंबर को क्या खत्म हो जायेगी कायनात? कधी आव्हान देतात क्या आप को मालुम है आप के बच्चो को रोज जहर खिलाया जा रहा है? कधी काय तर कधी काय असे अभुतपुर्व टायटल्स सातत्याने वापरले जातात. दुरदर्शन नावाचा एक गरीब नाकासमोर चालणारा मुलगा होता या चॅनल्स च्या नादी लागुन तो ही बिघडलाय. थोड निवेदकांविषयी बोलु या यात ही एक भाग समजुन घेण्यासारखा आहे इंग्रजी हे सर्वात श्रेष्ठ मध्यम हिंदी व कनिष्ट मराठी अशी वर्णव्यवस्था माध्यमात आहेच. त्यात ही कुमार केतकरांसारखा एखादाच अपवाद सर्व वर्णव्यवस्थेच्या भिंती मोडुन मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही ठीकाणी चर्चेत सहभागी होतो यांना इंग्रजी वाले ही चर्चा पंगतीत बसवितात. तर वागळे सारखा मजबुत मराठी गडी त्याच्या चॅनल च्या चावडीत नॅशनल इंग्रजी स्टार्स ना ओढुन आणुन मुलाखतीला बसविण्याचे कर्तुत्व दाखवितो. (पुर्वी वागळे हिंदी चॅनेलवरचे बसल्याचे स्मरते सध्या कार्यबाहुल्याने बहुधा बसत नाही) एक दंतकथा अशी ही आहे की हिंदी चर्चेत वागळे जे शब्द बोलायचे त्यांनी म्हणे एकदा त्यांचा अपमान झाला तेव्हापासुन यांनाच माझ्या चॅनेल चावडीवर बस्वाउंगा आणि प्रतिक्रीया लेउंगा अशी काहीतरी प्रतिज्ञा त्यांनी घेतली हे ( टाटांनी ताज हॉटेल बांधण्याची तसेच गांधीजींनी डब्या बाहेर फ़ेकल्या नंतर इ. ची आठवण ताजी होते.) तर इंग्रजी त काही महान न्युज निवेदक आहेत अरणब गोस्वामी हा त्यापैकी एक. यांचे मुर्ख टीकाकार त्यांच ऑक्सफ़र्ड च शिक्षण मुद्दाम झाकुन तो कीती सारखा किंचाळत असतो तो ज्येष्ट व श्रेष्ठ अशा पाहुण्यांना मध्येच तोडत त्यांचा पाणउतारा कसा करतो याची च फ़ार तक्रार करतात. अहो पण पाहुणे बाकी काय ग्रेट ग्रेट जमा करतो हा हे तर बघा या न्युज अवर च्या चावडी वर कोण कोण येत स्वपन दासगुप्ता. मेहता (लिस्ट भोत लंबी है) सारखे ग्रेट पत्रकार, एकाहुन एक तज्ञ इतकी मोठी मोठी नाव की आजपर्यंत ही वर्तमानपत्रात च वाचत होतो ती याची देही याची डोळा पाहायला मिळतात. दुसर इंग्रजी भाषेचा अफ़ाट श्रवणानंद जो मिळतो त्याला तोड नाही. मात्र अरणब कोंबड्या झुंजविण्याची परंपरा कमी कडव्या रीतीने पाळतो त्याहुन मला जे आणि ज्या शब्दात उत्तर पाहीजे ते वदवुन घेण्यातच त्याला फ़ार रस असतो. एखाद्या कोंबडा कोबडीने असे ओकावयास नकार दिल्यास मग तो चलाखीने त्याला दुसरयांशी झुंजवतो. वर म्हणालो तशी भावनिकतेच्या आवेगा च्या बाबतीत तर आमचा मराठी मावळा वागळे च त्याला थोड्याफ़ार प्रमाणात टक्कर देउ शकतो. हिंदी त थोडे ए बी व सी कॅटेगरी असे चॅनेल आहेत उदा. ए मध्ये झी एन डी टी ही ईंडीया एबीपी तर सी कॅटेगेरी मध्ये न्युज एक्स्प्रेस न्युज नेशन असे जरा कमजोर प्लेयर येतात. यांच्या सी दर्जाच्या न्युज चॅनेल मध्ये कोंबड्या अत्यंत अटीतटीने अहमहमिकेने झुंजविली जातात. यांचे निवेदक/ दिका एकदम झणझणीत असतात. यांच्या चर्चांमध्ये नॉइज लेव्हल एका उंची पर्यंत च असते त्या खाली ते स्तर घसरु देत नाहीत म्हण्जे उंची वाढवत नेणे हे महत्वाचे असते. पण इन बिचारो को ए ग्रेड के मुर्गे मुर्गीया नही मिलते उदा. स्टार प्लेयर ए दर्जाचे चॅनेल पसंत करतात म्हणजे नेता वा चर्चक जितका मोठा तितका तो ए क्लास चे चॅनेल निवडतो बडे मुर्गे फ़ाइट के लीए झी एबीपी पे बैठेंगे बाकी चिल्लर सी लेव्हल चॅनेल पे मिलेंगे. प्रेक्षक आपापल्या चॉइस प्रमाणे बोरडम च्या प्रभावात रीमोट ने चॅनल फ़िरवत राहतो. माझा एक मित्र एकाच विषयाची चर्चा पोटातील द्रव्याच्या प्रमाणावर ए बी सी कॅटेगरी त कुठे पाहायची ते ठरवितो. बाकी कोंबडी झुंज पाहणे हा भारतीयांचा अत्यंत आवडता उद्योग निवेदकांना याची पुर्ण जाणीव असते फ़ाडुन खाल्ला मजा आ गया, क्या सुनाया यार ,असा चढला तो त्याच्यावर अशा प्रेक्षक प्रतिक्रीया कॉमन असतात. अर्थात काही सन्माननीय अपवाद असतात्च माझ व्यक्तीगत मत अस आहे की एन डी टी व्ही इंडीया हा हिंदी चॅनेल आणि खास करुन रवीश नावाचा निवेदक आणि अभिज्ञान प्रकाश हे अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो. असो आता उरलेला काथ्या तुम्ही कुटावा ही विनंती!

वाचने 14766
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मला ndtv news सगळ्यात चांगला वाटतो.रविश की रिपोर्ट,बाबा का ढाबा,विनोद दुआ अलिकडे दिसत नाहीपण त्याचा जायका इंडिया का मस्त कार्यक्रम आहे. मराठित abp maza चांगलय. बाकी चॅनलच्या वाट्याला जात नाही.

..खास करुन रवीश नावाचा निवेदक आणि अभिज्ञान प्रकाश हे अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो.+१ रविश कि रिपोर्ट आणि एकूणच त्याच निवेदन खरोखर नाविन्यपूर्ण असत.मराठीमध्ये प्रसन्न जोशी (एबीपी माझा) संतुलित वाटतो.

..खास करुन रवीश नावाचा निवेदक अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो....अगदी अगदी ….

In reply to by पगला गजोधर

..खास करुन रवीश नावाचा निवेदक अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो....अगदी अगदी …. नुकतेच त्यांनी, वाराणसी म्हणजे फक्त नदीघाट परिसर नसुन (कि जो सध्या प्रोजेक्ट केला जातोय), वाराणसीचे खरे व्यापक रूप, दर्शकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला …।

मला निधी कुलपती फार पहिल्या पासुन आवडते... तिचे बोलणे,विषयाचे हाताळणे,मांडणी सर्वच झकास शिवाय अत्यंत हुशार आहे.अर्थात ती आता एनडीटीव्हीवर आहे आणि हा न्यूज चॅनल मला तितकासा आवडत नाही. एकेकाळी Prannoy Roy यांच्या वर्ल्ड धीस विक यांच्या कार्यक्रमाचा मी चाहता होतो... पण एनडीटीव्हीचा नाही. त्याच्या सुरवातीला जो तबला वाजवला गेला होता त्याचा अत्यंत चाहता होतो... ते संगीत आजही मला मोहनी घालते.अर्थात त्यातल्या बातम्या आल्याच. त्या नंतर आजतक चे सुरेंद्र प्रताप सिंग { एस पी सिंग} ह्यांचा देखील मी चाहता होतो... ये थी खबरे आज तक इंतजार किजीये कल तक ,तसेच सेंस्नेक्स लुडक गया इं त्यांची काही वाक्ये अजरामर झालेली आहेत. आता अरनब गोस्वामी... तो आवडतो,उतम बोलतो पण डिबेट मधला गोंधळ आणि आवाजांची पातळी ही फारच जास्त असते... त्यामुळे अनेकदा डिबेट कम राडा वाटतो.बट ही स्टिल ही रॉक्स...

In reply to by मदनबाण

तबला अफलातून वाजवला आहे. मी ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेली लोकगीते केवळ त्यातील टीपेच्या तबल्यासाठी ऐकत असे. :)

In reply to by प्रसाद भागवत

अच्छा ! हे मला माहित नव्हते... २ वॄत्त निवेदिकांचे नाव सांगायचे राहिले, ते म्हणजे सलमा सुल्तना आणि सरला महेश्वरी. सरला महेश्वरीच्या साड्यांची फार खासियत होती. :)

मस्त लिहिलंय! या कोंबड्या झुंजवण्याच्या कार्यक्रमांबद्दल बोलायचं तर माझ्या नवर्‍याला या असल्या "चर्चा" आणि "एन्काउंटर" हा कार्यक्रम दोन्ही सारखेच आवडतात! त्यामुळे दोन्ही सारखेच आहेत असा माझा समज झाला आहे! :D

In reply to by पैसा

ज्योती ताई काही विषय खास फक्त पुरुषां साठीच असतात त्यात् वरील दोन विषय येतात.त्यामुळे तुमचा समज होणे सहाजिकच आहे.

या मौलिक चर्चांशिवाय आपल्या हिंदीच्या ज्ञानात किती भर पडते! शाळेत अगदी पाचवीपासून हिंदी शिकून आणि हिंदी सिनेमांवर पोसूनही, हे चॅनेल्स येईपर्यंत मला, 'दमक्कल, बनाम, पारी, रुझान्,सियासी,तहत आणि असे अनेक शब्द माहित नव्हते.

झी बिझनेसचा अमीश देवगन (आउट्पुट एडिटर) हा कायम फुरफुरत असतो प्रश्नांची मशिनगन चालु असते त्याचा चेहरा व फुरफुरताना फुगलेल्या नाकपुड्या बघितल्या की बीएसई समोरील बैलाची आठवण येते. डिट्टो दिसतोही तसाच.

सर्वात फालतू आणि वेळेचा अपव्यय करणारा न्युज अँकर म्हणून अर्नब गोस्वामीचे नाव घेतले जाते. मग भले त्याचे ईंग्रजी कितीही उच्च असो किंवा तो कितीही हजरजवाबाबी असो. त्याची अपेक्षा असते कि त्याच्या कार्यक्रमांत केवळ त्यानेच बोलले पाहिजे आणि इतरांनी ऐकले पाहिजे. म्हणून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संबधित व्यक्तीने द्यायच्या आधीच तो त्याचे वाक्य तोडून स्वतःचे मत किंवा प्रश्न किंवा उत्तर किंवा असेच काही मध्ये घुसडतो. त्याच्या मते त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे केवळ तशीच दिली गेली पाहिजेत, जशी त्याच्याकडे त्याच्या माणसांनी पुरविलेली असते आणि केवळ तीच उत्तरे खरी आहेत असे तो मानतो आणि उत्तरे तशी नसतील तर "nation wants to know" ह्या टॅग लाईन खाली लगेच तो बाहू सरसावून बोलता होतो. त्याच्या कार्यक्रमांत आलेली मंडळी बहुतेक करून नेते मंडळी असतात. दुर्दैवाने आज जवळ जवळ प्रत्येक नेता किंवा व्यक्ती, थोड्या फार प्रमाणात, जाणते-अजाणतेपणी कोणत्या न कोणत्या मोहात फसलेली असतात, त्यामुळे ह्या कार्यक्रमात अर्नबच्या जाळ्यात आणि त्याच्या प्रश्नांत फसतात. समोरचा जर धीट किंवा योग्य बोलणारा नसेल तरच अर्नब त्यांना भारी पडतो नाहीतर अनेक वेळेला मातब्बर मंडळींनी अर्नबच्या कार्यक्रमांत त्याच्या फालतू आणि कंटाळवाण्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्याची बोलती बंद केलेली आहे. सतत स्वत:चे मुद्दे पुढे पुढे रेटायच्या नादापायी अर्नबच नव्हे तर इतरही अनेक न्युज अँकरनी ह्या पत्रकारितेची विश्वासार्हता धुळीला मिळवली आहे. समाजात जे काही दिसते ते पत्रकारितेने जनतेपर्यंत सपाट आरश्याप्रमाणे जसे आहे तसे दाखविले पाहिजे. पण आजची ही पत्रकारिता समाजातील अनेक लहान सहान घटना बहिर्वक्री भिंगाप्रमाणे मोठया करून दाखवितात नाहीतर अनेक महत्वाच्या घटना अंतर्वक्री भिंगाप्रमाणे लहान करून दाखवितात, ज्याचा समाजावर नकोसा असणारा परिणाम होतो.

न्युज चॅनेल जास्त पाहण्यात येत नाही, पण बातमी म्हटंले की रेडिअओ वरील सकाळी येणारा एक आवाज हमेशा आठवतो, " आकाश्वाणी पुणे, भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...ठळक बातम्या..."

हाच अरनब जेव्हा स्टुडिओत बसुन स्टुडिओबाहेरील व्यक्तिला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा साउंड डिलेमुळे समोरच्याचा प्रतिसाद मिळण्यापूर्वीच हा तोच प्रश्न पुन्हा विचारतो. पुढे हा प्रश्न-उत्तराचा गुंता वाढतच जातो, कोणाचेच बोलने नीट कळत नाही. साउंड डिलेसारख्या तांत्रिक बाबींचे ज्ञान अरनब व टाइम्स नाउला नसावे ह्याचे आश्चर्य वाटते.

मराठी बातमीपत्र आणी चर्चासत्र हिंदी वाहिन्यांवरील कार्यक्रमांपेक्षा कैकपटीने सरस असतात असे मत नोंदवतो.