आज जानेकि जिद ना करो
आज जाने की ज़िद न करो
यूं ही पहलू में बैठे रहो
हाय मर जायेंगे हम तो लुट जायेंगे
ऐसी बातें किया न करो
तुम ही सोचो ज़रा क्यूँ न रोके तुम्हें
जान जाती है जब उठके जाते हो तुम
तुम को अपनी क़सम जान-ऐ-जान
बात इतनी मेरी मान लो
वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर
चन्द घड़ियाँ यही हैं जो आज़ाद हैं
इन को खो कर मेरी जान-ऐ-जान
उम्र भर न तरसते रहो
कितना मासूम-ओ-रंगीन है ये समा
हुस्न और इश्क की आज मैराज है
कल की किस को खबर जान-ऐ-जान
रोक लो आज की रात को
जिद ..हट्ट, दुराग्रह. पहलू .. कूस. जान-ए-जान ..प्राणप्रिया. मासूम ..निष्पाप. समा ..दृष्य, देखावा हुस्न ... सौंदर्य, मैराज ... शिडी, कळस
फ़ैयाज हश्मी यांच्या ह्या सुरेख गज़लेचा आज परिचय करून घेऊ. गझल म्हटले खरे, पण जरा चाचरतच. सहसा गज़लमधील शेराच्या अंतीम भागात एकादी चमत्कारिक, झटका देणारी शब्दरचना असावी अशी अपेक्षा असते. तसेच प्रत्येक शेर स्वयंपूर्ण असावा ही ही. नाही तर गीत-नग्मा व गज़ल यांत फरक काय करणार ?. असो. यावर जाणकार मार्गदर्शन करतील अशी आशा बाळगू.
इथे एक प्रेयसी आपल्या प्रियकराची काकुळतेने विनवणी करत आहे. ती काही उर्दु गझलेतील निष्ठुर, प्रियकराच्या प्रेमाला ठोकरून, त्याच्या यातनांत आनंद मानणारी "साकी" दिसत नाही. ती तर चंचल कृष्णाची विनवणी करणार्या वृंदावनातील गोपीची आवृत्तीच वाटली. प्रथम जेंव्हा ही गझल ऐकली तेव्हा पहिल्या दोन ओळी ऐकयावर " ओ राजाजी, ना जाओ, हमार कहा मानो" या दादर्याचीच आठवण झाली. तीच वारंवार करावी लागणारी प्रार्थना. पण पुढील ओळीत लगेच फ़रक जाणवतो . ठुंबरीत प्रियकराने "सौतनके घर " जाऊ नये म्हणून अजीजी केलेली असते इथे मात्र निराळेच प्रकरण दिसते. अस्तु. ही अवांतर भटकंती सोडून गझलकडेच वळावे.
काय म्हणते आहे ही ? " राजा रे, हा जाण्याचा हट्ट सोडून दे. बरा कुशीत आरामात बसला आहेस, ठीक आहे की. उगाच "आपण मरू, लुटले जाऊ", हा आक्रस्थळेपणा कशाला ? नको ना असे बोलू. जरा विचार कर, कां मी दरवेळी असा थांबविण्याचा प्रयत्न करते ? अरे, तू उठून जातोस आणि माझी जीव जाण्याची पाळी येते. शपथ, जरा ऐक ना माझे !"
पुढचे कडवे अतिशय सुरेख आहे. आपल्या लक्षात सहज येत नाही असे एक सत्य ती सांगत आहे. "आपले जीवन काळाच्या कैदेत आहे, कैदेत कसले, जबड्यातच आहे. तो केंव्हाही त्याला गिळंकृत करेल मान्य. पण तरीही काही थोड्या घटका, थोड्याच असतील त्या, पण त्या मोकळ्या आहेत, स्वतंत्र आहेत, काळाच्या करालपणाला विसरुन त्यांचा मन:पूर्वक आस्वाद घे. त्यातील आनंद लूट. जर त्याही हातातून निसटल्या तर ..... त्या पुन्हा परत येणार आहेत कां ? प्राणप्रिया, जन्मभर पस्तावण्या पलिकडे काय उरणार आहे ?"
स्त्रीसुलभ सहजतेने ती त्याचे लक्ष क्षणभंगुर जगातील सौंदर्य़ाकडे वेधत आहे. " आजुबाजुला बघ, सगळीकडे निर्व्याजता, विविधरंगी आनंददायक सृष्टीच आहे. यौवन आणि प्रेम हातात हात घालून फ़ुगडी खेळत आहेत उद्याच कुणाला माहीत ?. प्रियकरा, आजची रात्र संपणारच नाही याचा प्रयत्न कर."
गझल तशी साधी, सरळ आहे. कल्पनेच्या भरार्या, शब्दचमत्कृत्या वगैरे काही नाही. मराठीत लिहतांना थोडा रुक्षपणाही आला आहे. पण शब्दांपलिकडे कवीला जे सांगावयाचे आहे त्याचा खराखुरा आनंद घ्यावयाचा असेल तर स्वरांचा आधार घ्यावयाला पाहिजे. फरिदा खानूम हिच्या आवाजात ही गझल ऐकाच. एकदा ऐकल्यावर परत दुसर्यांदा ऐकाल व म्हणाल " शरद, Thanks."
शरद
ता.क. ही गझल अनेकांनी म्हटली आहे. शोभा गुर्टू, आशा भोसले व इतर अनेक. मला शोभा गुर्टू यांची लिंक सापडली नाही.कोणी मदत करेल काय ? आज माझी निवड फरिदा.
http://www.last.fm/music/Farida+Khanum/_/Aaj+Jane+Ki+Zid+Na+Karo
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान परिचय. आवडतं हे गाणं खूप
+१
वाह! क्या बात है! बहोत खूब!!!
मला अशा भोसलें पेक्षा फरिदाचं
अनेक धन्यवाद! आत्ताच ऐकले.
छान परिचय.
फरिदा खानूम हिच्या आवाजात ही
हि गझल ऐकवा
लाजवाब
काय शरदराव - अडकवलंत हे गाणं
" शरद, Thanks."