Skip to main content

कन्व्हेन्शनल पॉलिटिक्स म्हण्जे काय रे भाउ ?

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 28/01/2014 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या राजकारणात १९६९ हे वर्ष फार महत्वाचे आहे. सर्वसाधारण पणे अनेक नेत्यांच्या मताना मान असे राजकारण त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधी पक्षात चालत असे. आजही काही प्रमाणात असे राजकारण फक्त भाजप या पक्षात चालते असे म्हणण्यास हरकत नाही. पण बाकी राहुल गांधी, मुलायम सिंग, जयललिता, लालूप्रसाद, मायावती, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ई ई त्या त्या पक्षातील हुकुमशहाच आहेत. तशा प्रकारची कबुली त्यांचे प्रवक्ते देतच असतात. ( काही कारणाने आपण शरद पवार याना हुकुमशहा या यादीत नको टाकायला ! ) इंदिरा गांधी च्या उदयानंतर काँग्रेस पक्षात " वरून खाली" राजकारणाची सुरूवात झाल्याचे दिसते. " हाय कमांड" हा शब्द " रिमोट कंटोल" हा शब्द त्याची फळे आहेत. सध्याचा आप पक्ष हा केजरीवालानी भारतात चालविलेला अपारंपारिक राजकारणाचा प्रयोग असून हा प्रयोग भारतातील शिकलेले नागरिक करीत आहेत. काही न शिकलेल्या व पारंपारिक राजकारणाने फसविले गेलेल्या कमी शिक्षितांचा ही पाठिंबा या पक्षाला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या पक्षापेक्षाही मोठ्या प्रमाणावर या पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी होताना दिसते आहे. आप पक्ष या प्रयोगातील एक साधन आहे. कारण आपण पाच वर्षात फक्त एकदा मत द्या मग बसा कोपर्‍यात धूळ खात" हा घटनेने नागरिकाना दिलेला संदेश नागरिकाना मान्य नाही. त्यातून "माहितीचा कायदा" नावाची कल्पना घटनेचा परम आदर असणार्‍याना देखील चकित करणारी अशी आहे. पाच वर्षे मत दिल्यावर आम्ही स्वस्थ बसणार नाही .सरकारच्या कारभाराचे मुल्यमापन वेळोवेळी करणार ! कर प्रणाली, निवडणूक प्रक्रिया ई महत्वाच्या मुद्यांवर आंदोलने करून घटनेत बदल कारावयाला लावणार व लोकांचे खरेखुरे प्रतिनिधी तिथे पाठवणार हा संदेश प्रस्थापित राजकारणाला देण्याचा हा प्रयोग आहे.म्हणून दिल्ली विधानसभेत इमानदार व बेईमान अशा दोनच जाती आम्ही मानतो असे केजरीवाल यानी सांगितले आहे. हिंदू- मुस्ल्लीम सवर्ण- दलित या भेदांपेक्षाही मूलभूत भेद कोणता आहे व तो प्रगतीला कसा घातक आहे याचे विवेचन या केजरीवाल यांच्या एका वाक्याने होईल.ध्रुवीकरण हे वैचारिक धाटणी पेक्षा वर्तणुकीतील धाटणीने करा असा कोणीतरी केजरीवाल याना पुढे करून या देशाला बजावीत आहे. आपल्या देशात खरे तर डावी विचार सरणी, उजवी विचार सरणी व मध्यम मार्ग असे राजकारण झाले तर मी म्हणेन ठीक आहे.साधनसंपत्तीचा वापर व वितरण कसे व्हावे हे सांगणारे हे तीन मार्ग आहेत. त्याना काही तरी तार्किक पाया आहे. पण बर्‍याच बाबीत सारखीच आर्थिक व सामाजिक धोरणे असणारे भाजपा व कोंग्रेस हे एकमेकाना पर्यायी पक्ष कसे असू शकतात? हे न सुटणारे कोडे आहे.कॉग्रेस पक्षाने बाहेर धाडलेले ,त्यातून नाराज होऊन बाहेर पडलेलेच एकूण चार पंतप्रधान आपण निवडून दिलेले आहेत.म्हणजे त्या पक्षाच्या विचारानेच त्या वेळेही तिथे राज्य केलेले दिसते. भारताचा प्रधानमंत्री डाव्या पक्षाचा झाला तरच खर्‍या अर्थाने विरोधी पक्षाचे राज्य भारतावर आले असे म्हणता येईल. जगात डावी विचारसरणी मार खाताना दिसतेय मग अशा विचारसरणीचे सरकार भारतात येणेच दुरापास्त आहे.मग सामान्य माणसे खाजगीत बोलताना असे म्हणतात की " भाजपा व काँग्रेस " हे एकाच माळेचे मणी असून त्यानी सत्ता येन केन प्रकारेण जिंकण्याचा डाव करण्याचा फार्स लोकांपुढे चालविला आहे.जिंकेल त्याला ६५ टक्के हरेल त्याला ३५ टक्के अशी विभागणी मिळणार्‍या मलिद्याची नंतर करू. असा त्यांचा एक अलिखित अजेंडा आहे. कारण भाजपाकडून उभा रहाणारा साधा नगरसेवक देखील सत्ता नसताना कॉग्रेस इतकाच खर्च निवडणूक पूर्व करमणूक, सहली यावर करताना दिसतो. हा पैसा त्याला सत्ता नसताना मिळतो कोठून ? आतापर्यंत भाजपाने खर्‍या अर्थाने कोंग्रेसचा एकही खासदार वा आमदार वा मंत्री राजकारणातून " भ्रष्ट " आहे म्हणून हद्दपार केल्याचे उदाहरण असेल तर सांगा. उलट गडकरी प्रकरणात हेच लोक एकमेकाना अशी मद्त करीत असतात हेच बाहेर आले ना ? ६० च्या दशकाच्या शेवटापर्यंत खासदार, आमदार हे लोकांशी मिसळत असत . भेटत असत. त्याना फारसे आर्थिक अधिकार ही नव्हते. खासदार वा आमदार हा लोकांचा वैधानिक प्रतिनिधी असे. कायदेमंडळ असे खरोखरचे स्वरूप संसद व विधानसभेचे असे. एस टी च्या गाडीत पुढचे पाच सीट मधे एक दोन सीट्स यांच्या साठी राखून ठेवली जास्त. त्यानंतर त्याना निधी वाटपाचे अधिकार मिळाले. इतर अनेक ठिकानी लुडबुड करण्याचा अधिकार त्यानी स्वत:कडे घेतला व लोक नुसते पहातच राहिले. पाच वर्षातून एकदा चेहरा दाखवायचा. ठराविक एरियात पैसे, लुगडी, वाटायची व निवडून यायचे. या मधे ५१ टक्के मते न मिळाली तरी चालत असत. त्यामूळे डिव्हाईड अ‍ॅन्ड रूल ही ब्रिटीश पद्धति आपल्या राजकरणाने ही स्वीकारली. मग एका विशिष्ट जातीला प्रतिनिधीत्व नाही मिळाले तर पक्षशिस्त तर पाळायची पण त्याच जातीचा एखादा अपक्ष उमेदवार मते फोडण्यासाठी उभा करायचा असे खेळ चालू झाले. या सर्वाचे कारण असे की गुप्त मतदानाचा आपण केलेला बाउ. लोकानी पक्षाचे प्राथमिक सदस्य व्हायचे. आपल्या मगदुराप्रमाणे समस्या सोडविण्यात भाग घ्यायचा, पदे मिळवायची निवडणुका घेऊन, अशा रितीने पक्ष उभारायचा असे न होता. गणपती उत्सवातून, गरबा उत्सवातून, प्रसिद्ध व्हायचे हळू हळू कोणत्या तरी पक्षात बस्तान बसवायचे. पैशाच्या जोरावर व दादागिरीने पक्षास नमवायचे, व खर्‍या कार्यकर्त्याना बाजूस सारून जात धर्म व पैसा वर दादागिरी यांच्या संकराने वर वर जायचे हा खाक्या निर्माण झाला. यात पतसंस्था काबीज करणे, साखर कारखाने पटकाविणे, शिक्षणसंस्था, दूध उत्पादक संस्था बळकविणे यातून पदाधिकारी व त्यांचे पुढेमागे धावणारे हितसंबंधी यांचे टो़ळके निर्माण झाले.आमचे स्फुर्तिस्थान व त्याखाली शुभेच्छुक यांचे फोटोची लाईन असे फ्लेक्स निर्माण करून त्यातून शक्ती प्रदर्शन करण्याची युक्ती सर्वच पक्षात उदयास आली. याचा पुढचा टप्पा म्हण्जे या टो़ळक्याला भक्कम संरक्षण देण्याची सोय करण्याची तयारी सुरू झाली. त्यासाठी सोयीचे लोक राज्यपाल पदी नेमणे, सोयीचा राष्ट्रपती निवडणे ई पासून ते राजकीय सूड म्हणून कोणी कुणाचे करियर संपवू नये म्हणून लोकप्रतिनिधीना वेगळा न्याय देण्याचे विधेयक ही संसदेत आले. एका अंतुले यांच्या उदाहरणाचा दाखला देऊन केवढी चुकीची पायरी आपले संसद सदस्य ओलाडित होते हे आपण सार्‍यानी पाहिले. वास्तविक सर्व नोकरशहा व लोकप्रतिनिधी यांच्यावर खरोखरीच कुणी किटाळ आणत असेल तर त्याला फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचा पर्याय निर्माण करून एक तर सन्मानाने त्याला सार्वजनिक जीवनात परत संधी देणे वा अशा किडक्या आंब्याला गजाआड पाठविणे दोन्ही बाबी साध्य झाल्या असत्या. पण असे कोणतेही व्हिजन या तथाकथित जाणत्या राजांकडे नाही. सगळयात विशेष दु:खाची गोष्ट अशी की भारतातील बर्‍याचशा विचारवंताना हे काहीतरी सन्मान देऊन मिंधे करून घ्यायचे. जरा काही नवा विचार , आंदोलन आले की राज्यघटनेचा अवमान झाला असा डंका पिटण्याची काही विचारवतांकडून (?) व्यवस्था करायची.लोकानुनयी निर्णय व लोकांसाठी निर्णय यात गल्ल्लत करायची. अशी खेळी हे पारंपारिक राजकारण करत आहे. काही सामान्य लोकांचे हितसंबंध त्यामुळे राखले जात असतीलही पण बर्‍याच सामान्य जनाना आपली फसवणूक होत आहे याचीही जाणीव होत आहे. त्या जाणीवेची सुरूवात आण्ण्णा हजारे यांच्या आंदोलनाने झाली आहे. केजरीवाल यानी अगदी आताच दिलेल्या मुलाखतीत " ही लोकांची लढाई आहे" आम्ही त्याचा केवळ परिणाम आहोत .आम्ही जर चुकाच करू तर आमच्या मरणाने आम्ही मरू " असे म्हटले आहे. देश प्रथम मग पक्ष मग सदस्य या त्रयीला आप कितपत न्याय देते यावर सारे अवलंबून आहे.

वाचने 20325
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

कारण आपण पाच वर्षात फक्त एकदा मत द्या मग बसा कोपर्‍यात धूळ खात" हा घटनेने नागरिकाना दिलेला संदेश नागरिकाना मान्य नाही. त्यातून "माहितीचा कायदा" नावाची कल्पना घटनेचा परम आदर असणार्‍याना देखील चकित करणारी अशी आहे.
यात काहीतरी गफलत होत आहे का? पाच वर्षात फक्त एकदा मत द्या आणि मग कोपर्‍यात धूळ खात बसा असा संदेश राज्यघटनेत नक्की कुठे दिला आहे? राज्यघटनेत नागरीकांना मूलभूत हक्क दिले आहेत त्यात freedom of expression आहेच.त्यातून सरकारवर (किंवा लोकप्रतिनिधींच्या कामावर) आपले मत व्यक्त करणे हा पण एक मूलभूत हक्क आहे. तसेच शांततामय मार्गाने आंदोलन करायचाही सर्वांना हक्क आहे.आपले म्हणणे राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायचे असे अनेक मार्ग राज्यघटनेने दिले आहेत. आता राज्यकर्त्यांच्या मनात आपण जनतेचे ऐकले नाही तर पुढच्या निवडणुकीत कुत्रही विचारणार नाही अशी भिती घालून देण्यात (आणि तशी अंमलबजावणी करण्यात) आपण अपयशी ठरलो आहोत हे मात्र खरे.पण आपण बेअक्कल असू तर दोष राज्यघटनेला का देता? माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी अन्य एका संदर्भात म्हटलेले वक्तव्य इथे किती चपखलपणे लागू पडते बघा:"we have to consider whether it is the Constitution that has failed us or whether it is we who have failed the Constitution." त्यानंतरच नारायणन यांनी पहिले राष्ट्रपती आणि घटनासमितीचे अध्यक्ष डॉ.राजेन्द्रप्रसादांचे एक वाक्य उधृत केले: "If the people who are elected are capable men of character and integrity, they should be able to make the best of a defective constitution. If they are lacking in these, the Constitution cannot help the country". तेव्हा किड मुळात लागलेली आहे.तिथे औषधोपचार न करता पार्टिसिपेटिव्ह डेमॉक्रसीच्या नावावर केजरीवाल जे करत आहेत ते पोरखेळ चालूच ठेवणे म्हणजे जिथे पाहिजे तिथे औषधोपचार न करता कुठेतरी भलतीकडेच समस्येचे उत्तर शोधायचा प्रयत्न झाला. अशा प्रकारातून आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळेल असे वाटणे हाच मुळात भाबडेपणा आहे. असो.

In reply to by क्लिंटन

>>> माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी अन्य एका संदर्भात म्हटलेले वक्तव्य इथे किती चपखलपणे लागू पडते बघा:"we have to consider whether it is the Constitution that has failed us or whether it is we who have failed the Constitution." माझ्या मते राज्यघटना नागरिकांनी अपयशी केलेली आहे आणि त्याचवेळी राज्यघटनेने देखील नागरिकांना अपयशी केलेले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

राज्यघटनेने देखील नागरिकांना अपयशी केलेले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण जर आपल्याया काही त्रुटी आढळल्या असतील तर मी म्हणेन राज्यघटना आपल्यासाठी आहे, ती तर आपण सुजाण नागरिक सारे मिळून नक्कीच बदलू शकतो!

मान्य आहे तो राज्यघटनेचा दोष नाही की ज्यामुळे २१ टक्केवाला ही निवडून येतो मग तो दोष कुणाचा तरी असेलच ना ? की तो दोषच नाही ? याचे मार्गदर्शन व्हावे कुणाकडून तरी. कारण विनाशक का निर्णय होवो तो " खर्‍या" प्रतिनिधी कडून व्हावा ही अपेक्षा आहे. जर खरे गेले तर पार्टिसिपेटीव्ह राजकारणाची बला येतीच कशाला ?

In reply to by चौकटराजा

पार्टिसिपेटीव्ह राजकारण बला नाही तर खर्‍या लोकशाहीचा गाभा आहे. मात्र हे सर्व घटकांचे (स्टेकहोल्डर्स) पार्टीसिपेशन शासनाच्या पुढाकाराने राबवले जायला पाहिजे ते होत नाही. लोकशाहीत खरा विकास नागरिक, नेते, शासकिय अधिकारी आणि विषयतज्ञ (सबजेक्ट मॅटर एक्सपर्ट) यांचा योग्य समन्वय असलेल्या पार्टिसिपेटीव्ह राजकारणानेच होऊ शकतो... आणि हा समन्वय घडवून आणण्यासाठी योग्य ते वातावरण आणि कायदे करणे हे लोकाशाही नेत्यांचे आद्य कर्तव्य असते. सर्व जनतेला काय पाहिजे ते मी सांगणार अश्याप्रकारे नेत्याच्या अजेंड्याने "विकास" केला गेला की बहुदा जनतेचा विकास दुर्लक्षित राहतो आणि "नेत्याचा खाजगी विकास" साधला जातो... एकंदरीत लोकशाहीच्या नावाखाली नेताशाही / सरंजामशाही चालते.

In reply to by चौकटराजा

ज्यामुळे २१ टक्केवाला ही निवडून येतो मग तो दोष कुणाचा तरी असेलच ना ? की तो दोषच नाही ?
निवडणुक सुधारणा हे मी राजकारण फॉलो करायला लागल्यापासूनचे पिल्लू आहे.१९९० मध्ये आसाम गण परिषदेचे नेते दिनेश गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी एक समिती नेमली होती. अर्थातच पुढे काहीही झाले नाही. गेले काही दिवस इथे मिपावर असे वातावरण निर्माण झाले आहे की राजकारणी म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या ग्रहावरून आलेले प्राणी किंवा आकाशातून पडणारी माणसे आहेत. तशी परिस्थिती आहे का? त्यांना निवडून देणारे आपल्यासारखेच लोक असतात त्यामुळे एका अर्थाने हे लोकप्रतिनिधी हे समाजाचेच प्रतिबिंब असतात.जर आपल्या समाजात जातीपातींना इतके महत्व दिले जात असेल तर राजकारणी त्यांचे राजकारण करतात हे आश्चर्यकारक आहे का? अनेकदा असे म्हटले जाते की निवडून येणार्‍याला ५०% पेक्षा कमी मते मिळतात हा आपल्या पध्दतीतला दोष आहे.हे मान्य आहेच.पण मग त्यावर काय उपाय असू शकतील यावर माझे मत मी इथे मांडतो: १. लोकसभेत मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात जागा दिल्या जाव्यात हा उपाय अनेक लोक सुचवितात. हा उपाय म्हणजे मला रोगापेक्षा भयंकर वाटतो. १९८४ मध्ये राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाचा अभूतपूर्व विजय झाला होता.पण त्या पक्षाला मते किती होती?४९.८%. आजपर्यंत एकदाही लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला ५०% पेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत.भारतासारख्या विविधता असलेल्या देशात तसे होणेही कठिणच आहे.म्हणजे या उपायातून प्रत्येक लोकसभा ही भयंकर प्रॅक्चर्ड असेल आणि सरकार स्थापनेसाठी किती कटकटी होतील याची कल्पनाच केलेली बरी. माझ्या माहितीप्रमाणे इटलीमध्ये ही पध्दत आहे.१९४५ पासून इटलीमध्ये आतापर्यंत किती सरकारे आली आणि गेली हे बघता भारतात तसे होऊ नये असे नक्कीच वाटते. २. फ्रान्समध्ये अध्यक्षीय निवडणुकांमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होते.पहिल्या टप्प्यात एखाद्या उमेदवाराला ५०% पेक्षा जास्त मते मिळाली तर दुसरा टप्पा होत नाही.अन्यथा पहिल्या दोन उमेदवारांमध्ये दुसर्‍या टप्प्याची निवडणुक होते.या दुसर्‍या टप्प्याला इतर उमेदवारांना उभे राहता येत नाही.दोनच उमेदवार असल्यामुळे जिंकणार्‍या उमेदवाराला ५०% पेक्षा जास्त मते आपोआप मिळतात. मला वाटते की ही पध्दत त्यातल्यात्यात अधिक चांगली आहे.ही पध्दत वेळखाऊ आणि खार्चिक आहे. दुसरे म्हणजे दुसर्‍या टप्प्यात मतदान पहिल्या टप्प्यापेक्षा कमी झाले तर ती दुसर्‍या टप्प्याची निवडणुक तितकीशी प्रातिनिधिक नाही असा आक्षेप घेता येईलच. समजा दुसर्‍या टप्प्यासाठी कम्युनिस्ट आणि आम आदमी पक्ष हे दोन पक्ष राहिले तर माझ्यासारखे लोक दुसर्‍या टप्प्यापासून नक्कीच दूर राहतील. ३. हा उपाय विजयी उमेदवाराला ५०% पेक्षा कमी मते मिळण्याशी निगडीत नाही तर ५ वर्षांपैकी ४ वर्षे सत्ताधारी पक्ष मुजोरपणा करतो आणि शेवटच्या वर्षात वरवरचे काम केल्याचे मृगजळ उभे करतो या अडचणीविषयी आहे. यावर उपाय सुचवला जातो की लोकसभेचे एक पंचमांश सदस्य दर वर्षी निवृत्त करून तिथे निवडणुका घ्याव्यात (राज्यसभेप्रमाणे). म्हणजे दर वर्षी सुमारे ११० लोकसभा मतदारसंघांमध्ये आणि (महाराष्ट्रात) ५८ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका होतील.म्हणजे लोकसभाही कधीच बरखास्त न होणारे स्थायी सभागृह करावे.यातून दरवर्षी निवडणुका घ्याव्या लागतील. यावेळच्या निवडणुका एप्रिल-मे २०१४ मध्ये होत असल्या तरी निवडणुकविषयक वातावरण गेल्या ४-६ महिन्यांपासूनच तयार झाले आहे.म्हणजे या उपायात देशात सतत निवडणुकविषयक वातावरण असेल.तसेच कोणत्याही सरकारला सलग ५ वर्षे हक्काची मिळतीलच असे नाही.त्यामुळे अशा सरकारांच्या कारभारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्या पध्दतीत दोष आहेतच.पण त्यावरील उपायांमध्येही काहीनाकाही खोट आहेच.तेव्हा दोष कमीतकमी करण्यापेक्षा आपण फार काही करू शकत नाही.अनेकदा अशा दोषांवर बोलणारे लोक मात्र उपाय सुचविणे, आपण सुचविलेले उपाय कितपत अंमलात आणण्याजोगे आहेत, त्यात त्रुटी काय, या उपायांमुळे सध्याच्या व्यवस्थेतल्या त्रुटी त्यातून दूर होणार आहेत की फक्त दोषांचे स्वरूप बदलणार आहे इत्यादी गोष्टींवरही बोलताना थोडे कमीच दिसतात.

In reply to by क्लिंटन

राजकारणी म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या ग्रहावरून आलेले प्राणी किंवा आकाशातून पडणारी माणसे आहेत. तशी परिस्थिती आहे का? त्यांना निवडून देणारे आपल्यासारखेच लोक असतात त्यामुळे एका अर्थाने हे लोकप्रतिनिधी हे समाजाचेच प्रतिबिंब असतात.जर आपल्या समाजात जातीपातींना इतके महत्व दिले जात असेल तर राजकारणी त्यांचे राजकारण करतात हे आश्चर्यकारक आहे का?
पूर्ण सहमत या वाक्यांशी. एकदम चपखल.

In reply to by अनुप ढेरे

आपल्या फायद्याकरता राजकारणी लोक त्यांना सोयिस्कर वाटणार्‍या प्रेरणांना जास्त उचलून धरते. राजकारणी म्हणजे समाजाचे नेते. सुरवातीला ते समाजातले असले तरी नंतर त्यांना मिळणार्या उच्च स्थानामुळे, मानामुळे त्यांची समाजाची असणारी नाळ तुटते. मग सवंग, लोकप्रिय निर्णय घेतले जातात. जातीवर आधारित आरक्षणे, झोपडपट्ट्यांना मान्यता देणे, बेकायदा बांधकामांना आशिर्वाद देणे वगैरे. सर्व समाजातील लोकांचा कल बघितला तर खरोखर सगळे लोक असल्या गोष्टींना अनुकूल असतील का? आजिबात नाही. हिटलर हा त्या समाजानेच निवडलेला आणि डोक्यावर बसवलेला नेता होता ह्याचा अर्थ असा होतो का की तमाम जर्मन लोक ज्यूंना जाळून वा अन्य प्रकारे ठार मारण्याच्या विचारांचे होते? संविधान ही एक देवाने लिहून पाठवलेली निर्मिती आहे आणि लोकांनी त्याला लायक बनायचे आहे. जर त्याचा अपेक्षित परिणाम होत नसेल तर ती लोकांचीच चूक आहे. अशी काही ताठर भूमिका मांडली जात आहे असे वाटते. बहुधा संविधानावर टीका म्हणजे आंबेडकरांवर टीका आणि म्हणजे जातीय विचारसारणी असे काही उफराटे तर्कट काही नेते मांडतात त्याला अनेक बुद्धीजीवी लोक बळी पडत आहेत. संविधान लोकांकरता लिहिले आहे. लोक संविधानाकरता नाहीत. जर प्रस्तुत संविधान परिणामकारक नसेल तर त्यात बदल करण्यात मला तरी काही गैर वाटत नाही. लोकांची मनोवृत्ती, स्खलनशीलता हे विचारात घेऊनच नियम बनवले नसतील तर त्याने लोकांचा फायदा होणार नाही. लोक कधीतरी आदर्शवत बनतील आणि मग संविधान योग्य परिणाम दाखवेल असे मानणे भोळसटपणाचे आहे असे माझे मत.

In reply to by हुप्प्या

"लोक कधीतरी आदर्शवत बनतील आणि मग संविधान योग्य परिणाम दाखवेल असे मानणे भोळसटपणा आहे." एकदम चपखल...

In reply to by हुप्प्या

पुणे ते चिंचवड या मार्गाने कंपनीच्या बसने मी २२ वर्षे प्रवास केला. सुरूवातीस ज्यावेळी या महामार्गावर डिव्हायडर नव्हते त्यावेळी ओव्हरटेकचा रोज एक तरी बळी घेणारा अपघात येता जाता दिसत असे.आता दुभाजक आला .आता अशा अपघातांचे प्रमाण नगण्य आहे.अचाट वेगाने दुभाजक फोडून आनंद अभ्यंकरचा बळी घेणारा विरळाच. याचा अर्थ मुळातील स्खलनशील माणसाच्या प्रवृतीला बांध निर्माण केला की माणूस ताळ्यावर येतो. यासाठीच कुलुपे, पासवर्ड अशांचा उदय झाला आहे. पण सध्याचे संविधान खटल्यासाठी राज्यपालांची परवानगी , गुप्ततेच्व्या नावाखाली काही माहिती न देण्याची मुभा अशा वेगवेगळ्या मार्गाने राजकारणी वर्गातील गुंडाना अभय देण्याचा प्रयत्न करते आहे.अहवालासाठी करदात्यानी दिलेले पैसे खर्च करण्याची मुभा व तो गुप्त ठेवणे किंवा फेटाळणे दोन्हीची मुभा ही आणखी काही उदाहरणे आहेत. संविधानाने एक बाजूला वी द पीपल ओफ इंडिया म्हणायचे व काहीनाच अशी मुभा काय म्हणून द्यायची ? तेव्हा राजकारंण्यामधील अशा स्खलनशीलतेला बंदी घालणारे दुभाजक टाकले की त्याना इतर जनांपेक्षा आपली वेगळी " लेन" घेताच येणार नाही. लोकशाहीत राजाला फक्त एक लाक्षणिक महत्व असते .खरा राजा नागरिकच असतो. म्हणजे एकटा कुणीच राजा नसतो.

...आपण पाच वर्षात फक्त एकदा मत द्या मग बसा कोपर्‍यात धूळ खात" हा घटनेने नागरिकाना दिलेला संदेश... एवढं सोडून बाकी सगळ्याशी तत्वतः सहमत. वरचा संदेश घटनेने दिलेला नसून तो धूर्त राजकारण्यांनी पसरवेला आणि आळशी / नेभळट जनतेने स्विकारलेला समज आहे. केवळ मतदान करण्यासाठीच नव्हे तर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा लेखाजोखा मागण्याचा हक्क बजावण्यासाठीही नागरीक सतत जागरूक असल्याशिवाय उत्तम लोकशाहीचे परिणाम प्रत्यक्षात येत नाहीत. हे केवळ भारतातच नाही तर जगातल्या प्रत्येक लोकशाहीत आस्तित्वात असलेले सत्य आहे.

आजच्या परिस्थितीचे वर्णन करायचे झाले तर "जिसके हाथ मे लाठी, उसीकी भैस" असेच करता येईल व याला जबाबदार आपण स्वत: ज्याला राजकारणी/सत्ताधारी "माय बाप जनता" म्हणतात व स्वत:निवडून गेल्यावर हुकुमशाहीच करतात. १)जसे ३५%गुण मिळाल्याशिवाय पुढच्या इयत्तेत प्रवेश मिळत नाही त्याच प्रमाणे एक ठराविक निकष ठेवले पाहिजेत, पूर्ण करणारया उमेदवारालाच/पक्षालाच उभे राहू द्यावे, नाहीतर तिथेच पत्ता कट करावा. किती रुपयाचे काम केले या ऐवजी किती लोकांना याचा फायदा झाला हे महत्वाचे आहे. उदा:करोडो रुपये BRT साठी खर्च केलेत, काय फायदा झाला? अपघाताचे प्रमाण किती कमी झाले? प्रवासाचा वेळ किती वाचला? किती जास्त लोक बस कडे वळली? traffic किती कमी झाले? प्रदूषण किती कमी झाले? डीझेलचा खप किती कमी झाला? Foreign exchange किती वाचला असे हे निकष हवेत. २)जो उमेदवार उभा राहणार आहे त्याने स्वत: देशासाठी या आधी काय कर्तृत्व करून दाखवले आहे? याचा जरूर विचार व्हावा. तो स्वत:आपल्या देशात शिकला कि विदेशात याचाही विचार व्हावा. ३)ज्यांना सरकारच्या कायदे/परंपरा/कारभाराची माहिती आहे व प्रत्यक्ष Administrative काम केलेले आहे कि नाही याचाही विचार व्हावा. ४)जात-पात, धर्म, लिंग,कोणाचा युवराज हे निकष नसावेत. ५)निवडून आल्यावर कोणत्याही पक्षासाठी काम करता येणार नाही असे ठरवावे .उदा: राष्ट्रपती. पुढच्या वेळेला उभे राहयचे असल्यास, कमीत कमी १ वर्ष आधी पदावरून राजीनामा द्यावा व पक्षाचे/निवडणुकीचे काम करावे. ६)कोठल्याही पक्षाच्या जाहिरातीत त्यावेळेला पदावर असलेल्या लोकांचा फोटो/सहभाग नसावा. तसेच शासनाच्या जाहिरातीतही त्यावेळेला/त्याआधीही पदावर असलेल्या लोकांचा/कोणाचाही फोटो नसावा. निवडणुकीच्या काळात शासनाकडून कोणतीच जाहिरात नसावी. ७)जी जनता निवडणुकीत मतदान करेल त्यांनाच शासकीय लाभ द्यावा. उदा: subsidy, शिष्यवृत्ती वगैरे. ८)multiple source for spending (expenses) नसावित व एकच source असावा.(in the view of audit) ९)CAG अजून fast/accurate करावे. १०)Misuse of Power/पैशाची अफरातफर असेल तर ताबडतोब राजीनामा घेऊन १ महिन्यात निकाल द्यावा.

चांगला चर्चा विषय... राजकारण हे राजकारण असते. त्या त्या काळात जर एखाद्या पद्धतीने सतत तेच राजकारण होऊ लागले तर ते नंतरच्या काळात कन्वेन्शनल पॉलीटीक्स होऊ शकते. तो नंतरचा काळ हा कधी काही वर्षांचा असू शकतो तर कधी कधी काही महीन्यांचापण. केजरीवाल जे काही करत आहेत ती पद्धती आत्ताच कन्वेन्शनल पॉलीटी़क्स होऊ लागले आहे. पण ते जे काही करत आहेत, ते काही फार नवीन नाही... नव्याने सध्या आले आहे इतकेच. सध्याच्या काळात त्याची सुरवात समाजकारणात अण्णांमुळे झाली. केजरीवाल यांना त्यात जनतेच्या रागाची कल्पना आली आणि त्याचे त्यांनी राजकारण केले. त्यात माझ्या दृष्टीने काही चुकीचे केले नाही. त्यांची मते मान्य नसली तरी राजकारणात येण्याचा त्यांचा हक्क मान्यच आहे. शिवाय जर त्यामुळे किंचीत का होईना पण प्रस्थापित राजकारणी आणि (विशेष करून) तरूण पिढी विचार करू लागली तर ते स्वागगतार्हच आहे. पण जे नंतर चालू आहे ते मान्य होण्यासारखे नाही. तो पोरकटपणा आणि चालूगिरी असे दोन्ही एकाच वेळेस आहे असे माझे मत आहे. केजरीवाल यानी अगदी आताच दिलेल्या मुलाखतीत " ही लोकांची लढाई आहे" आम्ही त्याचा केवळ परिणाम आहोत .आम्ही जर चुकाच करू तर आमच्या मरणाने आम्ही मरू " असे म्हटले आहे. अगदी खरे आहे. गिरीष कुबेर यांच्या रविवारची लोकसत्तेत आलेल्या लेखात त्यांनी हे एका वाक्यात म्हणले आहे: "दिल्लीचा विजय हा काळाच्या ओघात सामान्य माणसाच्या मनात साचून राहिलेल्या वैतागाचा विजय आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं." पण याच लेखात पुढे म्हणल्याप्रमाणे, "या जनतेची पण गंमतच आहे. चौकात पोलीस नसला तर बिनदिक्कत लाल दिवा ओलांडणाऱ्यांची बनलेली ही जनता स्वत:ला कधीच दोष देत नाही. आणि इतरांना दोष देण्याची संधी मिळाली रे मिळाली, की मेणबत्ती घेऊन आपल्या लबाड नैतिकतेचा उजेड पाडते." हे देखील एक कटू सत्य आहे. थोडक्यात आपण (म्हणजे जनता) कुठेतरी स्वतः कळून अथवा सवयीने ढोंगी असतो, कायदे पाळत नसतो, इतरांनी ते पाळावेत असे मत असते, आणि जेंव्हा असा कोणी ढोंगी राजकारणी केवळ जनतेला आवडू शकेल अशा बाबतीत शो ऑफ करत वाचाळपणा करतो तेंव्हा तो आपल्याला अँग्री यंग मॅन सारखा आवडू लागतो... हेच व्हिपी सिंग यांच्या बाबतीत झाले होते आणि हेच केजरीवाल यांच्या बाबतीत होत आहे.

In reply to by विकास

उत्तम लेख आणि चर्चा चालली आहे. नुक्ताच राहुलब्बब्बा चा ह.ह.पु.वा. इंटरव्हू बघितला. गिरीश कुबेरांच्या लेखात अब्राहम लिंकन यांच्या कथेतील "लिंकन यांच्या गोष्टीत राजज्योतिषीपदी गाढवाला नियुक्त करणाऱ्या राजाइतकंच हास्यास्पद" यावरून "निव्वळ 'गांधी' आडनावामुळे राहुलास पंतप्रधानपदी नियुक्त करण्याइतकंच हास्यास्पद"

In reply to by विकास

"या जनतेची पण गंमतच आहे. चौकात पोलीस नसला तर बिनदिक्कत लाल दिवा ओलांडणाऱ्यांची बनलेली ही जनता स्वत:ला कधीच दोष देत नाही. आणि इतरांना दोष देण्याची संधी मिळाली रे मिळाली, की मेणबत्ती घेऊन आपल्या लबाड नैतिकतेचा उजेड पाडते." हे देखील एक कटू सत्य आहे. सहमत.याच गोष्टीची जाणीव हापिसात एच आर ए च्या टॅक्स बेनेफीट्साठी फोर्जड डोक्युमेंट अपलोड करताना पाहीली की होतो.

चांगले व प्रबोधक प्रतिसाद येत आहेत. याबाद्द्ल आभारी आहे. उपायांमधील खोट हे खरोखरच अवघड कोडे आहे. किमान पक्षी लोकप्रतिनिधी व प्रशासक यांच्या वरील खटल्यांसाठी जलद न्यायालये झाल्यास जनता व हे दोन उभय याना खरेच " अभय" मिळेल. बाकी जनतेच्या विषयी कुबेरानी एक लक्षांत घेणे गरजेचे आहे की हीच जनता १९६५ च्या दरम्यान सायकलवर डबलसीट बसायलाही घाबरत होती. तेंव्हा राज्यकर्ता कसा होता , पोलीसदादा कसा होता व आता कसा आहे याचा अंदाज येईल. आज देखील सिग्नल पाळणार्‍यांची संख्या तो तोडणार्यापेक्षा जास्तच आहे. ते गुणोत्तर पहा .

In reply to by चौकटराजा

आज देखील सिग्नल पाळणार्‍यांची संख्या तो तोडणार्यापेक्षा जास्तच आहे. ते गुणोत्तर पहा . कदाचित भारतात असेल पण पुण्यात नक्कीच नाही. पुण्यात सिग्नल तोडणार्‍यांची संखा पाळणार्‍यांपेक्षा जास्त आहे असे अनेकवेळा जाणवते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

काही वेळेस पुढचे पाळत नाहीत मग त्याजागी मागच्याना पाळायचा असला तरी सिग्नल पाळण्यासाठी काही अडून रहाता येत नाही ते ही त्या प्रवाहात आपले वहान पुढे नेतात पण समजा पोलीस नाहीत पण सिग्नल पाळणारेच जर पुढे असतील तर मागच्यातला एखादाच " ए चल रे भाउ नायतर मला जाउ दे असे पुढच्याला म्हणतो " बाकी सारेजण शांतपणे सिगग्नल चालू होण्याची वाट पहात असतात. असे शांतपणा दाखविणारे जास्तच असतात. एवढेच काय सिनेमाच्या तिकीटालाही रांगेत राहून तिकिटे घ्यायचीच लोकांची मुळात इछा असते. एखादा मधे घुसायला लागला तर त्याला हुसकून देणार्‍यांचे बळ जास्त असेल तर त्याला गप्पच बसावे लागते. आपल्या देशाचे दुर्दैव असे आहे की अशा बलाची अपेक्षा आपण सिनेमातील नायकाकडून करतो. आपला एखादा " नायक" दिसला की त्याला पाठिंबा देत नाही मग आपल्याला मोदी वा राहुलच बरे वाटायला लागतात.

In reply to by चौकटराजा

परदेशात व भारतात राहिल्याने एक गोष्ट ठाम अनुभवाने सांगतो. जेव्हा एखाद्या देशातील जनतेला तेथील कायद्याचे भय वाटत नाही उदा भारतात सिग्नल तोडला व आपण पकडले गेलो तर खर्चा पाणी देऊन आपण सुटू शकतो ह्यांची पक्की जाणीव असल्याने भारतात जनता निर्धास्तपणे अनेकदा सिग्नल बद्दल बेफिकीर असते. मात्र परदेशात सिग्नल वारंवार तोडल्यानी भरभक्कम दंड व वेळप्रसंगी लायसन जप्त होते व ते मिळवण्यासाठी अग्निदिव्यातून जावे लागते. बाकी चर्चा वाचत आहे.

कबीर म्हणतो
दुखमे सुमीरन करे सभी, सुखमे करे ना कोए. जो सुखमे सुमीरन करे तो दुख काहेको होए
आता हा आध्यात्मीक बाबतीतला सुवीचार असला तरी तो जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्ष करतो. राजकारणाला देखील. परिस्थिती अनुकुल असताना सुवीचारी जन संगठीत आणि शक्तीशाली होऊन राज्यव्यवस्थेवर दबाव आणत नाहित. राजकारणात शिरत नाहित. मग परिस्थिती हाताबाहेर गेली कि कुण्या रामदेवबाबा, केजरीवालला आपल्या मनातली खदखद व्यक्त करण्याचे साधन बनवुन त्याला उच्चासनावर बसवतो. त्याच्याकडुन रामराज्याची अपेक्षा करतो. आणि अगदी क्षुल्लक कारणाने त्याला परत जमीनीवर पाडतो. हा सगळा सव्यापसव्यय प्रस्थापीत राजकारण वि. क्रांती वगैरे बसनात गुंडाळला कि आपण परत विड्या ओढायला मोकळे. अर्थात, आता सद्यः परिस्थितीत राजकारणी सहजासहजी सुटणार नाहित. मोठ्या प्रमाणात असलेला आणि आधुनीक जगाचं भान असलेला तरुण वर्ग डिमांडींग मोड मधे आला आहे. राजकारणात काहि ना काहि भरीव व सकारात्मक परिवर्तन नक्की होणार. या तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळालं तरी पुरे. जनमताचा रेटा उर्वरीत कार्यभाग साधेलच. पण हे मार्गदर्शन करायला केजरीवाल पुरेसे परिपक्व आहेत काय हि शंका आहेच. किंबहुना मार्गदर्शक मंडळ सध्या बर्‍यापैकी रिक्त आहे. असो. भविष्यातल्या प्रस्थापीत राजकारणाचे काहि महत्वाच्या खांबांची पायाभरणी सध्या होते आहे एव्हढं नक्की.

In reply to by अर्धवटराव

तरुणांकडून राजकीय परिवर्तन म्हणजे सत्ताबदल म्हणत असाल तर तो जरूर घडेल पण व्यवस्थेत परिवर्तन अपेक्षित असेल तर ते या तरुणांकडून घडणे शक्य वाटत नाही. हे तरूण मला उत्साही, मोकाट आणि भणंग (लम्पेन) वाटतात, कोणताही आगापीछा नसलेले, झुंडीने 'लाइक' करणारे, बेदरकार आणि बेशिस्त वागणारे वगैरे. यांच्याशी बोलताना जाणवते की सरकार बदलणे हे आणि एवढेच त्यांचे काम आहे, बाकीचे नवीन सरकार बघून घेईल किंवा सरकारबदल ही जणू एक जादूची छडी आहे ज्यामुळे आपोआप सगळे सुरळीत होईल. व्यवस्था बदलण्यातला स्वतःचा सहभाग किंवा योगदान देण्यास त्यांची तयारी दिसत नाही. जिथे तरुणवर्ग असा भ्रांतचित्त आहे तिथे अपेक्षित बदल घडून येण्यास वेळ लागेल.

In reply to by राही

आणि तरुण वर्ग काहि परिपक्व जबाबदारी घ्यायची म्हणुन यात उतरणारच नाहि. त्याला संपंन्नतेचं आमिष दिसेल म्हणुन तो झक मारत परिवर्तनाला सज्ज होईल. चांगल्या भविष्याची आस आणि आशा माणसाला सकारात्मक काम करायला भाग पाडते. तेंव्हा आपल्याला सुखोपभोग व पुढच्या पुढीला बेटर संपन्नता देण्याकरता तरुणांची एनर्जी चॅनलाइज होईल. त्यातुन अतिप्रचंड बदल घडतील अशी अपेक्षा नाहि. पण आहे त्यापेक्षा बरच चांगल्याची अपेक्षा करायला हरकत नाहि. बाकी त्या उत्साही ते बेशिस्त वर्णनाशी पूर्ण समर्थन नाहि. जिथे रक्त सळसळतं तिथे असे प्रकार होणारच.

In reply to by अर्धवटराव

म्हणूनच कदाचित एखाद्या पॉईंटला देशासाठी अगदी मरण सुद्धा पत्करण्याची तयारी होते. देशासाठी मरण महान असतंच पण देशासाठी जगणं त्याहून महान असायला हवं. (मणिरत्नमचा 'युवा' त्याबाबत खूप काही सांगून जातो. तीन वेगवेगळ्या स्तरातले तीन युवक नि त्यांची आजच्या समाजकारणातली भूमिका (रोल ह्या अर्थानं))

पारंपारिक राजकारणावर उत्तम विवेचन!! धाग्यावरचे विविध प्रतिसादही वाचण्याजोगे.

हे एकदा समजलं की संविधान वगैरे फापटपसार्‍याची गरजच नाही.
या त्रयीला आप कितपत न्याय देते यावर सारे अवलंबून आहे.
केजरीवालांमुळे तर धर्माधिष्ठित आणि डावपेचाच्या राजकारणातून प्रश्नसोडवणूकीच्या `समाजकारणाचा' उदय होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
" ही लोकांची लढाई आहे" आम्ही त्याचा केवळ परिणाम आहोत .आम्ही जर चुकाच करू तर आमच्या मरणाने आम्ही मरू " असे म्हटले आहे.
क्या बात है! (बाय द वे त्या मुलाखतीची लिंक द्याल का?)

In reply to by संजय क्षीरसागर

मग देश म्हणुन काय उरतं? संवीधानाशिवाय देश म्हणजे निव्वळ लोकसमुह. एखाद्याच्या व्यक्तीगत गुणावगुणांवरुन संवीधानाची आवश्यकता जोखणं आत्मघातकी व्यवहार आहे.

In reply to by अर्धवटराव

हा वर आलेला मुद्दा महत्त्वाचायं. एकदा `आधी देश' ही धारणा पक्की झाली की संविधानावर उहापोहाची गरज नाही कारण त्या विचारातच देशाची एकसंधता दडली आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

हा देश नावाचा कन्सेप्ट संवीधानाशिवाय शक्य आहे का? आणि त्यामुळे संवीधान फापटपसारा कसा काय ठरतो?

In reply to by अर्धवटराव

तुम्ही केजरीवालांचे दिल्ली विधानसभेतले भाषण आणि राजदिप सरदेसाईंनी घेतलेली मुलाखत ऐकली असतीत तर असे प्रश्न पडले नसते :)

In reply to by क्लिंटन

भारतात राहुन, भारताने दिलेल्या सर्व सुरक्षा, सुवीधा उपभोगुन वरुन संवीधानालाच फापटपसारा म्हणायची अवदसा आठवतेच कशी... एखादा अडाणी, नक्सलाइट, जिहादी वगैरे अशी गरळ ओकला तर समजु शकतो एक वेळ... पण विचारवंतांनी असली मुक्ताफळे उधळावी ना... असो. निषेध वगैरे करायच्या भानगडीत काहि पडत नाहि. त्याचा काहि उपयोग नाहि.

In reply to by अर्धवटराव

घटनेला कमी लेखलेलं नाही. जर देश हा विचार प्रार्थमिक असेल तर घटनेचा उद्देश साध्य होतोच. मग घटनेत बदलाची आवश्यकता नाही. एक ते बॅडमिंटन आणि दुसरे हे हाफमॅड नामी जोडी आहे! काही वाचायचं नाही, समजण्याची क्षमता नाही पण नुसते भडकाऊ प्रतिसाद दिले की झालं दिवसाच सार्थक. थोडं जरी समजू शकत असेल तर माझ्या प्रतिसादाला हा संदर्भ आहे.
संविधान ही एक देवाने लिहून पाठवलेली निर्मिती आहे आणि लोकांनी त्याला लायक बनायचे आहे. जर त्याचा अपेक्षित परिणाम होत नसेल तर ती लोकांचीच चूक आहे. अशी काही ताठर भूमिका मांडली जात आहे असे वाटते. बहुधा संविधानावर टीका म्हणजे आंबेडकरांवर टीका आणि म्हणजे जातीय विचारसारणी असे काही उफराटे तर्कट काही नेते मांडतात त्याला अनेक बुद्धीजीवी लोक बळी पडत आहेत. संविधान लोकांकरता लिहिले आहे. लोक संविधानाकरता नाहीत. जर प्रस्तुत संविधान परिणामकारक नसेल तर त्यात बदल करण्यात मला तरी काही गैर वाटत नाही. लोकांची मनोवृत्ती, स्खलनशीलता हे विचारात घेऊनच नियम बनवले नसतील तर त्याने लोकांचा फायदा होणार नाही. लोक कधीतरी आदर्शवत बनतील आणि मग संविधान योग्य परिणाम दाखवेल असे मानणे भोळसटपणाचे आहे असे माझे मत.

In reply to by संजय क्षीरसागर

पण फार नाहि. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही कॉन्टेक्स्ट्ने देशाच्या संवीधानाला फापटपसारा हे विशेषण कसं लागु शकतं याचं दु:ख मात्र आहे. लोकांनी संवीधानाप्रती आणि संवीधानाने लोकांप्रती सजगता आणि सहजता दाखवावी लागते हा कॉमनसेन्स आहे. त्यात काहि रॉकेटसायन्स सिद्धांत नाहि. पण आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन घडवायला अशा सिद्धांतांना गोंजारताना देखील संवीधानाला शेलक्या विशेषणांनी हिणवणं हे क्षुद्रबुद्धीचं लक्षण आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

काही वाचायचं नाही, समजण्याची क्षमता नाही पण नुसते भडकाऊ प्रतिसाद दिले की झालं दिवसाच सार्थक.
या धृतराष्ट्राचं काय करावं बरं आता?

In reply to by बॅटमॅन

या धृतराष्ट्राचं काय करावं बरं आता?
दोन गोष्टी करता येतील. एक तर पूर्ण दुर्लक्ष करणे. नाहीतर अधिकाधिक विनोदी प्रतिसाद लिहायला उद्युक्त करून ते प्रतिसाद नंतर वाचून निखळ मनोरंजन करून घेणे किंवा अगदी उच्च कोटीचा विनोद असल्यास पोट धरधरून गडाबडा लोळत हसणे. मी दोन्ही गोष्टी मधूनमधून करत असतो :)

In reply to by ऋषिकेश

मला वाटते की बहुपक्षीय लोकशाहीमध्ये (आणि त्यातूनही भारतासारख्या देशात) सर्वात जास्त मते मिळणारा जिंकणार हा व्यवहार्य तोडगा आहे याविषयी दुमत नसावे.तरीही एक प्रश्न राहतोच की ३५% मतेवाला सत्तेत आला तर उरलेले ६५% मतदार त्याच्या विरोधात असतात याचा प्रतिवाद कसा करणार? समजा अ, ब आणि क हे तीन पक्ष असतील आणि एखाद्या मुद्द्यावर तीन पक्षांची तीन वेगळी मते आणि एकमेकांच्या मतांना विरोध आहे (१९९६ मध्ये भाजप, काँग्रेस आणि नंतर संयुक्त मोर्च्यात सामील झालेले पक्ष यांच्यात बर्‍याच अंशी अशी परिस्थिती होती). अशा वेळी अ ला ३४%, ब ला ३३% आणि क ला ३३% मते मिळाली तर केवळ एक टक्का मत जास्त आहे म्हणून अ चाच अजेंडा राबविला जाईल--जरी ६६% लोक त्या अजेंड्याच्या विरोधात असले तरी. आक्षेप या गोष्टीला आहे. तरीही इतर कोणता व्यवहार्य तोडगा अजून मिळाला नाही म्हणून सध्याची पध्दत मान्य करणे ठिक आहे.पण म्हणून आताच्या पध्दतीतले दोष कमी करणारा आणि इतर दोष न आणणारा तोडगा असूच शकणार नाही असे नाही त्यामुळे त्या दिशेने विचार होत असेल तर सध्याच्या पध्दतीत चुकीचे काय हा प्रश्न विचारून ती प्रक्रीयाच खंडीत करणे हा प्रकार मला तरी पटला नाही.

In reply to by क्लिंटन

तरीही एक प्रश्न राहतोच की ३५% मतेवाला सत्तेत आला तर उरलेले ६५% मतदार त्याच्या विरोधात असतात याचा प्रतिवाद कसा करणार?
बहुपक्षीय संसदीय लोकशाहीत मतदान हे एखाद्याला पाठिंबा देणारे असते. ६५% मते विरोधात नसतात तर ती दुसर्‍या उमेदवाराच्या बाजुने असतात. व ३४-३३-३३ या सिनायीयोतही प्रत्येक उमेदवाराला अनुक्रमे ६६-६७-६७% लोकांचा विरोध असतो. अर्थात सर्वात कमी विरोध/सर्वाधिक पाठिंबा या दोन्ही न्यायांनी एकच व्यक्ती जिंकते. एखाद्याला पाडायचेच असे जेव्हा जनता ठरवते तएव्हा तीने भल्या भल्यांना पाडून दाखवले आहेच!
सध्याच्या पध्दतीत चुकीचे काय हा प्रश्न विचारून ती प्रक्रीयाच खंडीत करणे हा प्रकार मला तरी पटला नाही.
ज्यांना सध्याची पद्धत चुकीची वाटते त्यांना यात काय चुकीचे वाटते इतके तरी किमान सांगता आलेच पाहिजे. त्याने प्रक्रीया खंडीत लशी होईल उलट हातभारच लागेल.

In reply to by ऋषिकेश

अर्थात सर्वात कमी विरोध/सर्वाधिक पाठिंबा या दोन्ही न्यायांनी एकच व्यक्ती जिंकते.
मग याच न्यायाने लोकसभेतही सरकारला बहुमत असावे हा आग्रह धरणे चुकीचे आहे.सर्वात मोठा पक्ष असले की झाले कारण इतरांपेक्षा सर्वाधिक पाठिंबा आणि सर्वात कमी विरोध हे दोन्ही मापदंड त्यात पूर्ण होतील.आपण तसे करत नाही. लोकसभेत सरकारला मात्र स्पष्ट बहुमत असावे (अर्ध्यापेक्षा जास्त) पण ज्या प्रक्रीयेतून खासदार निवडून जातात त्या निवडणुकांमध्ये मात्र साधे बहुमत (सर्वाधिक मते) पुरतात यात कुठेही विरोधाभास नाही का? घटनेच्या काही कलमांमध्ये घटनादुरूस्ती करायला तर ५०% नव्हे तर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा लागतो आणि अर्ध्यापेक्षा जास्त राज्य विधानसभांचेही समर्थन लागते.तेव्हा महत्वाचे निर्णय घेताना अशा प्रकारचे चेक्स अ‍ॅन्ड बॅलन्सेस राज्यघटनेत आहेत.पण ज्या प्रक्रीयेतून लोकसभा सदस्य निवडले जातात त्या प्रक्रीयेमध्ये ही त्रुटी मला तरी वाटते. अर्थातच सध्याच्या परिस्थितीत या गोष्टीला पर्याय नाही हे मला मान्य आहेच पण तरीही हा विरोधाभास आहे हा मुद्दा राहतोच. माझ्या मते सध्याच्या पध्दतीत ही त्रुटी (चूक असे म्हणणे कदाचित चुकीचे आहे) आहे असे मला वाटते आणि त्यावर कोणत्या तरी पध्दतीने उपाय शोधला जावा असे मला वाटते.अर्थातच मारून मुटकून बहुमताचा पाठिंबा उभा करता येणार नाही हे तितकेच खरे.पण सध्याच्या पध्दतीत ही त्रुटी आहे ती दूर व्हायला हवी असे मला तरी नक्कीच वाटते.

In reply to by क्लिंटन

आपण जर अध्यक्षीय राज्यपद्धती निवडलेली नाही तर आपल्या लोकशाहीच्या सर्व स्तरावरील निर्णय प्रक्रियेत काही सामायिक असे असले पाहिजे. माझ्या माहिती प्रमाणे सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाना ५० टक्क्याला पासिंग आहे. मग फक्त एखाद्याच फॅकल्टीला ४० वा ४५ ला पासिंग ठेवले तर ते आपल्याला कसे वाटेल. तसेच निवडून येणे व सरकार बनवणे याचे असले पाहिजे. म्हणूनच मी अशी पद्धती शोधून काढली आहे जीत पराभूताला देखील वैधानिक अधिकार आहे. कारण त्याला त्या त्या प्रमाणात जनाधार आहे. निवडून येणारा खासदार फक्त तिथे एखाद्या विधेयकावर चर्चा करू शकेल वा विधेयक मांडण्याचा अधिकार त्यालाच मिळेल पण मतदान करताना त्याच्या बरोबरच पराभूत उमेदवारालाही त्याला मिळालेल्या जनाधाराच्या प्रमाणात मतदानाचा अधिकार असेल. ( वेटेड पावर ). म्हंणजे कायदे बनविताना त्या त्या कायद्याला जनाधाराच्या प्रमाणात बैठक मिळेल. यात तोटा असा की यामुळे राखीव जागा, जातीय व धर्मावर अधारलेली अल्पसंख्य बहुसंख्य ही रचनाच कोलमडून पडेल. व ती पडण्यात भारतातील किमान ३० टक्के लोकांचा टोकाचा विरोध असेल.

In reply to by क्लिंटन

प्रथम उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व
मग याच न्यायाने लोकसभेतही सरकारला बहुमत असावे हा आग्रह धरणे चुकीचे आहे.
अल्पमतातीलही सरकार बनते - बनले आहे हे एक. (बाहेरून पाठिंबा असतो पण तो बाहेरूनच) दुसरे असे की सरकारवर अ/विश्वासदर्शक ठरावात किंवा कोणताही कायदा बनताना खासदारांपुढे होय किंवा नाही हे दोन पर्याय असतात. प्रत्यक्ष निवडणूकीत अनेक उमेदवार उभे असतात. जेव्हा दोनच उमेदवार उभे असतील तेव्हा ५०% बहुमत आपोआप मिळेलच.
घटनेच्या काही कलमांमध्ये घटनादुरूस्ती करायला तर ५०% नव्हे तर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा लागतो आणि अर्ध्यापेक्षा जास्त राज्य विधानसभांचेही समर्थन लागते
हे प्रशासकीय निर्णयांच्या वेळी नसुन ते निर्णय ज्या पायाभुत चौकटीवर आधारलेले असतात - अर्थात घटनादुरूस्तीवगैरे - त्यात बदल करताना लागतात. अर्थात ही विशेष केस झाली.
माझ्या मते सध्याच्या पध्दतीत ही त्रुटी (चूक असे म्हणणे कदाचित चुकीचे आहे) आहे असे मला वाटते आणि त्यावर कोणत्या तरी पध्दतीने उपाय शोधला जावा असे मला वाटते.
माझ्याही मते सध्याच्या पद्धतीत काही तृटी आहेत. पण त्या ह्या नाहीत. "फर्स्ट पास्ट द पोस्ट" ही पद्धत जाणीवपूर्वक स्वीकारलेली आहे. त्याच्या अंगभूत मर्यादा आहेत हे मान्य पण त्या तृटी नव्हेत. त्या मर्यादा चैकटीच्या आहेत. त्यात बदल करायचा तर चौकटच बदलावी लागेल. त्या मर्यादा झाल्या आणि त्या इतर कोणत्याही पद्धतीत असतीलच. जाताजाता: सध्याच्या या पद्धतीची अजून एक अंगभूत मर्यादा अशी की यात अल्पसंख्य परंतु स्थानिक प्रबळ गटांना स्थान मिळणे कठीण होते. याच साठी राज्यसभेतील निवड 'फर्स्ट पास्ट न पोस्ट' पद्धतीने न घेता 'प्रपोर्शनल रीप्रेझेंटेशन' या तत्त्वाने घेतले जाते. तिथे तुम्ही म्हणताय ती मर्यादा बर्‍यापैकी हँडल होते. अर्थात तिथे जनतेचे थेट प्रतिनिधित्त्व होत नाही ही अंगभूत मर्यादा आहेच. (अर्थात हे तुम्हाला सांगायला नकोच, फक्त अंगभूत मर्यादा आणि तृटी यातील फरक स्पष्ट करायला ही पुरवणी जोडली)

In reply to by ऋषिकेश

अर्थातच हे पटण्यासारखे आहे. एकूणच काय की सध्याच्या पध्दतीतील दोष दूर करणारी अधिक चांगली पध्दत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला याच पध्दतीवर कायम राहणे भाग आहे.
अल्पमतातीलही सरकार बनते - बनले आहे हे एक
हो बरोबर. नरसिंह रावांचे सरकार अल्पमतातले होते. असे अल्पमतातले सरकार लोकसभेत पराभव होत नाही (विश्वासदर्शक ठराव फेटाळला जाणे, अविश्वास ठराव मंजूर होते,राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव फेटाळला जाणे किंवा अर्थविधेयकावर पराभव होणे) तोपर्यंत सत्तेत राहू शकते.तरीही ही पण एक तडजोडच आहे असे वाटते. शेवटी लोकशाही ही बहुमतावर आधारलेली असते.पण बहुमत नसेल तर "सर्वात मोठा पक्ष" ही पण एक तडजोडच झाली. अर्थात यातही काही चुकीचे नाही.

In reply to by ऋषिकेश

चर्चिलचे (अथवा त्याच्या नावावर खपवले जाणारे) प्रसिद्ध वाक्य माहीत असेलचः “Democracy is the worst form of government, except for all the others.” त्या वाक्यामुळे नाही, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की कुठलिही राज्यव्यवस्था अथवा अगदी समाजव्यवस्था ही परीपूर्ण नाही, कालातीत नाही. सध्याच्या व्यवस्थेत अनेक वर्षांच्या अनुभवावरून/निरीक्षणांवरून काय बदलता येऊ शकते अथवा काय गरज आहे, हे सातत्याने पहाणे महत्वाचे आहे.

माझ्या मते निवडणूकीचे हे हे नियम आहेत. त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका. ओव्हरमधे ६च बॉल का? सीमा रेषा इतक्या दूरच का? मध्ये फिल्डर इथेच का उभा केलाय वगैरे नुसती रडरड झाली. चांगल्या खेळाडूकडे नुसती जिंकायची इच्छा व कपॅसिटी असून चालत नाही तर प्रत्यक्षात मैदानावर उत्तम खेळून प्रतिस्पर्ध्यावर मात करावी लागते. पंचाच्या चुकीच्या निर्णयापासून ते हिट विकेट पर्यंत सारे पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम असते.

In reply to by ऋषिकेश

खेळ व निवडणुका यांची तुलनाच होउन शकत नाही. नेहमीच्या संघर्षमय जीवनात वेगळाच विरंगुळा म्हणून खेळरूपी कृत्रिम संघर्ष निर्माण केलेला असतो. निवडणूक ही निर्णयप्रक्रियेची नांदी असते. या निर्णय प्रक्रियेत होत्याचे नव्हते होऊ शकते.लाखो रुपयांचा चुराडा नको त्या कारणांसाठी होउ शकतो. लढाईत निष्कारण हानीस सामोरे जावे लागते.यासाठी सकारात्मक वा नकारात्मक निर्णयाला जास्तीत जास्त लोकांचा होकार आहे की नाही हे पहाण्यासाठी सोयिस्कर आकडा ५१ टक्के हा आहे.आपली लोकशाही बहुपक्षीय आहे याला संवैधानिक अर्थ आहे काय? माझ्या माहितीप्रमाणे " पक्ष" ही सोय आहे तिला कायदेशीर अर्थ काहीही नाही. " पक्ष" या शब्दाची काहीही ठोस व्याख्या आपल्या संविधानात नाही. आपण मत देतो ते पक्षास नव्हे तर व्यक्तीस. कायदेमंडळात पक्ष मतदान करीत नाही तो फक्त पक्षशिस्त म्हणून त्या बद्द्ल निर्देश करू शकतो.पक्षाने काढले तरी खासदार बडतर्फ होत नाही. यातच पक्ष या शब्दाची कायदेशीर लायकी काय आहे हे कळून येते.

In reply to by चौकटराजा

लढाईत निष्कारण हानीस सामोरे जावे लागते
म्हणजे? निवडणुकांचे जे नियम आहेत ते प्रत्येक पक्षास समान आहेत. त्यात हरलेले निष्कारण हानीस सामोरे कसे गेले? नी ५१% मते मिळावून आलेल्या पक्षाने चुकीचे निर्णय घेणे आणि २१% मते मिळवून आलेल्या पक्षाने चुकीचे निर्णय घेणे यात देशावर होणार्‍या परिणामांत फरक काय? बहुपक्षीय म्हणायचे नसेल तर बहूउमेदवार असणार्‍या म्हणा. मुद्दा पक्षांच्या योग्यतेचा / महत्त्वाचा नाहिच्चे (जरी माझ्यामते पक्षांना भारतीय लोकसाहित अनन्यसाधारण महत्त्व आहे)

In reply to by ऋषिकेश

येथील लढाई याचा अर्थ खरोखरीचे युद्ध हे अमेरिकन जनतेवर विएतनाम च्या रूपाने लादले गेले. जर्मनीवर हिटलरने लादले ते ! २१ टक्यानी घेतलेला निर्णय ७९ टक्के लोकाना भोगावा लागतो ५१ टक्क्यानी घेतलेला निर्णय ४९ टक्क्याना भोगावा लागतो.यात आपल्याला काहीच परिणामी फरक जाणवत नाही ?

In reply to by चौकटराजा

भारतात सरकार बनवायला मतांच्या टक्केवारीचे बंधन नाहिये. कायदे करायला/निर्णय घ्यायला नव्हे! कोणताही कायदा करताना संसदेत ५०%हून अधिक बहुमत असावे लागते. कॅबिनेटला निर्णय घ्यायला मंत्रीमंडळाच्या ५०%हून अधिक व्यक्तींचा पाठिंबा लागतो. तुम्ही वर दिले आहे ते प्रशासकीय निर्णय आहेत. निवडणूकांचे नव्हे. बहूउमेदवारीय लोकशाहीत ५०% मते मिळवण्याचा अट्टाहास का? याचे उत्तर दिले नाहिच्चे!

In reply to by चौकटराजा

माझ्या माहितीप्रमाणे " पक्ष" ही सोय आहे तिला कायदेशीर अर्थ काहीही नाही. " पक्ष" या शब्दाची काहीही ठोस व्याख्या आपल्या संविधानात नाही
असे अण्णा हजारे म्हणतात!! भारतीय संसदेने पक्षांतर-विरोधी कायदा पूर्वीच मंजूर केलेला आहे. त्याअर्थी "पक्ष" म्हणून काही आहे त्याला संसदेची मंजूरी आहे, हेच सिद्ध होते. शिवाय, घटनेने स्थापीत झालेला निवडणूक आयोग जेव्हा "राष्ट्रव्यापी पक्षाची" व्याख्या करतो आणि त्याला (त्याच्या सर्व उमेदवारांना) देशभर एकच निवडणूक चिन्ह बहाल करतो तेव्हा त्या आयोगालाही "पक्ष" म्हणून काही आहे याची जाणीव आहे, हेच सिद्ध होते.
पक्षाने काढले तरी खासदार बडतर्फ होत नाही. यातच पक्ष या शब्दाची कायदेशीर लायकी काय आहे हे कळून येते
हे पक्षांतर-विरोधी कायद्यानंतर झाले. पूर्वी असे नव्हते. यातच "पक्ष" ही संकल्पना संसदेला मंजूर आहे, हेच सिद्ध होते. जगात पक्षविरहीत लोकशाही असलेला देश कुठला आहे काय? असो.

In reply to by सुनील

पक्ष जगात आहेत हे कबूल त्याप्रमाणे " पक्ष" या टर्मची व्याख्या करणारे एकही कलमा त्या त्या देशांच्या संविधानात नाहीच असे म्हणण्याला पुरावा नाही. प्रशन असा आहे की असा पुरावा भारतीय संविधानात आहे की नाही ? बाकी सी बी आय ची स्थापनाच मुळी बेकायदेशीर आहे. असा काहीसा निर्णय अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.त्यात काही तथ्य आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. म्हणजे ही बाब वेळोवेळच्या ५४३ खासदारांच्या कशी लक्षात आली नाही. असेच पक्षांतर बंदी कायदा करताना पक्ष याची काही व्याख्या आहे की नाही याचीच काळजी घेतली गेली नाही असे असू शकेल की नाही ? बाकी आपल्या माहितीत एक दुरूस्ती -- १९५२ चा निवडणुकांपासून आज तागायत आपण पक्षाला निवडून देत नाही व्यक्तीलाच देतो.हे त्रिवार सत्य आहे. सबब पक्षांतर बंदी कायदा येण्यापूर्वी ही खासदाराचे खासदारपण पक्ष कादून टाकू शकत नव्हता आजही नाही. पक्ष फक्त पस्तावा झाल्याचा ठराव करू शकतो. ते सुद्धा संसदे मधे नव्हे तर त्यांच्या " खाजगी" सभेत.

In reply to by चौकटराजा

बाकी सी बी आय ची स्थापनाच मुळी बेकायदेशीर आहे. असा काहीसा निर्णय अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
हा निर्णय गुवाहाटी उच्चन्यायालयाने दिला होता. त्याला, माझ्या माहितीप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाने विरोध दर्शविला आहे. गुवाहाटी उच्चन्यायालय ज्या तत्परतेने एकाच खटल्यात दोन्ही बाजूनी स्टे ऑर्डर देते, ती बघता 'न्यायालयाच्या अवमाना'चा बडगा असूनही मी तरी गु.उ.न्या.ला सिरीयसली घेऊ शकत नाही.. बाकी चर्चा वाचत आहे.. चालू द्या..

In reply to by ऋषिकेश

माझ्या मते निवडणूकीचे हे हे नियम आहेत. त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका. !!! निवडणूकीचे नियम म्हणजे काही "अढळ" लेखन नव्हे. ते बहुमताच्या संमतिने बनवलेले त्याकाळात उपयोगी असे मानदंड असतात, जे भविष्यात बहुमताने बनवलेले नवे नियम आस्तित्वात येईपर्यंत लागू असतात. वस्तुस्थिती आणि कालमानाप्रमाणे न बदलले जाणारे नियम चांगल्या / खर्‍या / प्रगतिशील लोकशाहीचे लक्षण असणार नाहीत. म्हणून आपल्याला अन्याय वाटणार्‍या नियमांबद्दल लोकशाही पद्धतीत बसणार्‍या कृतींनी विरोध दाखवायला अथवा ते बदलण्यास केलेल्या प्रयत्नांना बंदी लोकशाहीत बसत नाही. मात्र याबरोबरच हे ही खरे की जोपर्यंत नवीन नियम लोकशाही तत्वांप्रमाणे मान्य होवून अंमलात येत नाहीत तोपर्यंत सर्वांनी अगोदर मान्य झालेले नियम मानूनच व्यवहार करणे योग्य असते.

In reply to by ऋषिकेश

माझ्या मते निवडणूकीचे हे हे नियम आहेत. त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका. आत्ता निवडणुका लढवताना संपुआ ला सत्तेत असल्याने त्यांना योग्य वाटतील असे नियम बदलता येऊ ही शकतात पण त्यांनी कुठल्याही कारणाने तसे बदलले नाहीत, आणि म्हणून ते तसेच राहीले तर येणार्‍या निवडणुकात त्याच नियमांनी निवडणुका लढवाव्या लागतील. त्यात जी काही हार-जीत होईल ती ज्या नियमांच्या अंतर्गत निवडणुका घेतल्या गेल्या त्याच नियमात होईल असे म्हणणे योग्य आहे. पण उद्या बहुमत आणि पाठींबा असेल आणि संपुआच्या ऐवजी रालोआ अथवा तिसरी आघाडी सत्तेवर असली आणि त्यांनी त्या पाठींब्याच्या जोरावर बदल केले तर ते नवे नियम हे पुढील निवडणुकीस लागू ठरू शकतील... असा बदल लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. नियम, कायदे आणि घटना यातील प्रत्येक वाक्य आणि अगदी विरामचिन्हांच्या जागांसहीत काळ्या दगडावरची रेघ आहे असे समजण्याचे कारण नाही. अगदी निवडणुकांच्या बाबतीत साधे उदाहरण देयचे झाले तर निवडणूक आयुक्तांबद्दल देता येईल. शेषन यांनी त्यांना असलेल्या हक्कांचे अर्थ लावत निवडणूक आयोगाला दिशा दिली. मग कायद्यात अथवा घटनेत बदल करत एका ऐवजी तीन आयुक्त आणण्यात आले. यात बरोबर-चूक संबंध नाही पण तत्कालीन (राजीव) सरकारला असलेल्या हक्कात त्यांनी ते बदल केले. उद्या नियमाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे नकोत असे म्हणू शकाल... असे अजूनही सांगता/लिहीता येईल कदाचीत.

In reply to by विकास

इस्पिक एक्का व विकास या दोघांच्याही मताशी सहमती आहेच. त्याची मते माझ्याच मताची पुरवणी/विस्तार आहेत.

In reply to by ऋषिकेश

त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका. बाकी सगळे ठीक. पण तुमच्या अगोदरच्या प्रतिसादातले (येथे ठळक केलेले) अट्टाहासपूर्ण वचन लोकशाहीत अजिबात बसत नाही. त्याला माझ्या प्रतिसादात विरोध आहे. वर तो विरोध पुरा स्पष्ट झाला नसावा असे वाटल्याने आता येथे परत लिहीत आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नै कळ्ळे. अजूनही आपल्यातील विरोध स्पष्ट नाही. तुम्हाला आवश्यक ते बदल घडवून आणायसाठी निवडणूकीला उभे राहुन जिंकणे आवश्यक आहे. अगदी निवडणूक पद्धतीतही बदल घडवायसाठी "सध्याचे नियम" वापरूनच निवडणूकीला उभे रहावे लागेल. सद्याच्या नियमांनी निवडणूकीला उभे न राहता नुसते "नियम बदला नियम बदला" करून काय होणार? मात्र जनतेने तुमची मते नाकारल्याने हरल्यावर या नियमांमुळेच हरलो असे ओरडायचे असेल तर त्यापेक्षा उभेच राहु नका कारण नियम आधीच घोषित केलेले आहेत आणि सर्वांना सारखेच आहेत.

In reply to by ऋषिकेश

To END the race, you have to WIN the race. To win the race, you have TO BE IN the race.

In reply to by ऋषिकेश

१. असलेले नियम योग्य नाहीत हे मत मांडण्याचा व त्यांचा कायदेशीर रितीने विरोध करण्याचा जेवढा हक्क प्रत्येक नागरीकाला आहे तेवढाच न पटणार्‍या नियमाने बद्ध निवडणूकीलाही उभे राहण्याचा हक्क त्याला आहे. म्हणूनच, एकाला वगळून मगच दुसरे करा (एक्सल्कुजिव) असे म्हणणे योग्य नाही. २. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधिंना नियम करण्याचा आणि बदलायचा अधिकार असतो. पर्यायाने, शासनात निवडून आल्यावर नियमात बदल करणे हे शासनावर बाहेरून दबाव आणून नियम बदलून घेण्यापेक्षा जास्त सोपे असते. ३. लोकशाहीने दिलेल्या पर्यायांपैकी एक किंवा अनेक पर्याय वापरण्याचा अधिकार नागरिकाला नाही असे म्हणणे लोकशाहीविरोधी आहे. मला वाटते आता मुद्दा पुरेसा स्पष्ट झाला आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि एक... जर नियम योग्य नाहीत हे मत असेल तर, "निवडणूकीला उभे रहा" अथवा "राहू नका" अथवा "ते मत निवडणूक हरल्यावर परत प्रतिपादन करा" यात काहीच विरोधाभास नाही... कारण सर्व पर्यायांत मत न बदलता तेच आहे. जीवनात अनेकदा आपल्याला पसंत नसलेल्या परिस्थितीत जगावे लागते. याचा अर्थ ती परिस्थिती योग्य आहे असे म्हणायलाच पाहिजे असे नाही आणि त्या परिस्थितीशी कायदेशीर पद्धतीने तडजोड करत जगताना तिचा मुकाबला करणे योग्य नाही असेही नाही. थोडक्यात, "यायचं तर या, नाहीतर गेलात उडत" ही "खळ्ळ-खट्याक" पद्धत आकर्षक वाटली तरी ती सर्वसमावेशक नाही आणि लोकशाहीवर्धक तर नाहीच नाही :) असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काय बोलताय?
लोकशाहीने दिलेल्या पर्यायांपैकी एक किंवा अनेक पर्याय वापरण्याचा अधिकार नागरिकाला नाही असे म्हणणे लोकशाहीविरोधी आहे.
मी कुठे अधिकार नाही म्हटले आहे? मात्र निवडणुकीला उभे राहताना मी जिंकुन आल्यावर माझा पक्ष निवडणूक पद्धतीत हे हे बदल करणार आहे हे घोषित करा व जनतेला ते योग्य वाटले तर ती तुम्हाला नक्की जिंकुन देईल. ते घोषित करूनही जर हरलात तर जनतेला ते मत सध्या मान्य नाही हे मान्य करा व ५ वर्षांनी जनतेला पुन्हा पटवून द्यायचा प्रयत्न करा. मात्र तोपर्यंत आहे तीच निवडणूक पद्धत वापरणे अनिवार्य आहे. एखाद्याची सद्य पद्धतीने निवडणूक लढवायचीच तयारी नसेल तर तो निवडणूक कशी लढवणार? आपण तेच ते बोलत अहोत. माझा या विषयावर हा शेवटचा प्रतिसाद

In reply to by ऋषिकेश

मात्र निवडणुकीला उभे राहताना मी जिंकुन आल्यावर माझा पक्ष निवडणूक पद्धतीत हे हे बदल करणार आहे हे घोषित करा व जनतेला ते योग्य वाटले तर ती तुम्हाला नक्की जिंकुन देईल. ते घोषित करूनही जर हरलात तर जनतेला ते मत सध्या मान्य नाही हे मान्य करा व ५ वर्षांनी जनतेला पुन्हा पटवून द्यायचा प्रयत्न करा.
याला अगदी +१. एक समांतर मुद्दा भाजपच्या अजेंड्यातील तीन महत्वाचे मुद्दे--राममंदिर, ३७० कलम आणि समान नागरी कायदा या गोष्टींसाठी आपल्या सध्याच्या पध्दतीमध्ये घटनादुरूस्ती करावी लागेल (निदान ३७० आणि समान नागरी कायदा या दोन गोष्टींसाठी) आणि त्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागेल. भाजपकडे अर्थातच दोन तृतीयांश बहुमत नव्हते.तेव्हा लोकांचा त्या क्षणी या मुद्द्यांना पाठिंबा नव्हता हे उघड होते.अजेंड्यातील तीन मुद्दे सोडून इतर ९७ मुद्द्यांवर सहमती होत असेल तर सरकार स्थापन करून ते ९७ मुद्दे पुढे न्यायचा प्रयत्न भाजपने केल्यानंतरही आता सत्ता मिळाली म्हणून रामाला भाजपवाले विसरले अशी टिका होत होतीच. आणि एन.डी.ए च्या अजेंड्यावर हे तीन मुद्दे नसतील पण भाजपच्या अजेंड्यावर असतील तरीही "हिडन अजेंडा" अशी टिकाही होत होतीच. तेव्हा अशा प्रकारची टिकाही समर्थनीय नाही हे मान्य आहे का? (माझे स्वतःचे राममंदिर आंदोलनाविषयीचे मत भाजपच्या मताप्रमाणे नक्कीच नाही तरीही हे एक जनरल ऑब्झर्व्हेशन लिहिले आहे).

In reply to by क्लिंटन

निवडणूक लढवताना भारतीय संविधान, निवडणूक नियम वगैरे मान्य असणे महत्वाचे असते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयास वास्तवात कम्युनिझम आणायचा होता. आता देखील कुठल्यान्कुठल्या रुपात त्यांना कम्युनिझम बरोबर येणारी अंतस्थ एकाधिकारशाही आणि नक्षलवादासारखा हिंसाचार मान्य असतो. पण किमान कागदोपत्री ते लोकशाही मान्य आहे असे म्हणतात. किंबहूना जेंव्हा केंव्हा (वर्ष आठवत नाही पण) केरळात प्रथम कम्युनिस्ट निवडून आले तेंव्हा जगात प्रथमच कम्युनिस्ट हे लोकशाहीपद्धतीने निवडून आल्याचे म्हणले गेले. तेच चित्र अनेक वर्ष होते कारण भारत हा लोकशाही देश असूनही शीतयुद्धात आणि नंतरही कम्युनिस्टांवर बंदी नव्हती. तसेच दुसरे उदाहरण शिवसेनेचे. मला वाटते शेषन यांच्या काळापासून निवडणुकीचे नियम कडकपणे पाळणे चालू झाले. तो पर्यंत शिवसेनेने पक्षिय (आणि कदाचीत इतरही) लोकशाही कागदोपत्री मान्य केली नव्हती. ती बाळासाहेबांना करावी लागली. अर्थात कदाचीत भाजपा आणि कम्युनिस्ट सोडल्यास (त्यांच्यात देखील अंशतःच, पण आहे) काँग्रेससकट इतर सर्वच पक्षांमधे पक्षिय लोकशाही म्हणजे एक मोठ्ठा विनोद आहे.

In reply to by क्लिंटन

अजेंड्यातील तीन मुद्दे सोडून इतर ९७ मुद्द्यांवर सहमती होत असेल तर सरकार स्थापन करून ते ९७ मुद्दे पुढे न्यायचा प्रयत्न भाजपने केल्यानंतरही आता सत्ता मिळाली म्हणून रामाला भाजपवाले विसरले अशी टिका होत होतीच.
माझ्या आठवणी प्रमाणे भाजपाने हे मुद्दे कधीही वगळलेले नाहीत. नेहमी भाजपाच्या घोषणापत्रात ते असतात. एन्डीएच्या घोषणापत्रात ते वगळले जातात. ते ठीकच आहे. (फक्त २००४ च्या भाजपा घोषणापत्राचे आटह्वत नाहिये.)

In reply to by ऋषिकेश

>>>मी कुठे अधिकार नाही म्हटले आहे? त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका. हे तुम्ही केवळ मुद्दा ठासून सांगण्याकरता भावनेच्या भरात लिहिले असावे असे समजून पूर्णविराम :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दोन हक्क लोकशाही देते. एक म्हणजे अण्णांसारखे आंदोलन करून हवे ते बिल पास करण्याचा प्रयत्न करणे, ज्यात पक्षिय लोकशीहीची गरज नसते. अथवा सरळ निवडणुकीच्या राजकारणात उतरून प्रस्थापित नियमांनी निवडणुका जिंकून मग हवे तसे नियम बदलणे... दोन्ही मधे स्वागतार्ह चेक्स आणि बॅलन्सेस आहेत (पक्षि: कोणीही उठून काही करू शकेल इतके सोपे नाही) असे मला वाटते.

मूळ लेख अन प्रतिक्रिया / चर्चा फारच उद्बोधक धन्यवाद

ऋषिकेश यांच्या सर्व प्रतिसादांशी सहमत. प्रतिसाद आवडले. सुनील यांचाही प्रतिसाद आवडला.