महाभारतातील “चलाख” महापुरुष - भाग १
लेखनप्रकार (Writing Type)
महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे. याला हुशारी, बुद्धीमत्ता असं नाव देता आलं असतं. मात्र मुद्दामच “चलाखी” हा शब्द वापरलेला आहे. समोरच्या माणसाचा कमकुवतपणा हेरुन आपला हेतु साध्य करण्याची किमया या माणसांमध्ये होती. हा मान साधारणपणे कृष्णाला देण्याची लोकपरंपरा आहे. मात्र कृष्णाशिवाय देखिल अनेकांनी हा प्रकार महाभारतात करुन दाखवलेला आहे. कृष्णाच्या “भगवंत” होण्याने बाकीच्यांची “चलाखी” काहीशी झाकोळुन गेली आहे. शिवाय कृष्णाने इतर कुणाहीपेक्षा अशा तर्हेची कामगिरी अनेकानेक वेळा यशस्वीपणे पार पाडलेली आहे. याचा शकुनीच्या कपटाशी संबंध नाही. कणिकाच्या कुटील नीतीशीही संबंध नाही. समोरच्याला आपल्याला हवं तसं वागण्याला उद्युक्त करणं ही करामत या घटनांमध्ये घडते.
अतिशय प्रसिद्ध घटनेचा उल्लेख करायचा झाला तर कृष्णाच्या शिष्टाई बद्दल बोलता येईल. द्रौपटीने कॄष्णाला शिष्टाईला जाण्याआधी तिच्या मोकळ्या केसांची आठवण करुन दिली होती. कॄष्ण ही घटना विसरला असण्याची शक्यताच नव्हती. दुर्योधनाचा हट्टी स्वभाव पूर्णपणे माहीत असलेल्या कॄष्णाने चलाखपणे फक्त पाच गावांची मागणी केली. कृष्णाला जरा जरी शंका असती कि दुर्योधन पाच गावांची मागणी मान्य करेल तर त्याने हा प्रस्ताव ठेवलाच नसता. त्यामुळे झाले हे की बिचार्या पांडवांनी हक्काचे अर्धे राज्य सोडुन फक्त पाच गावांवर समाधान मानले तरी दुर्योधनाचा लोभ आणि युद्धपिसाटपणा इतका कि सुईच्या अग्रावर मावेल इतकी देखिल जमीन तो द्यायला तयार झाला नाही असा संदेश जनसामान्यांत गेला. पुढे जे काही “महाभारत” झाले त्याला बहुतांशी कौरव जबाबदार धरले गेले याचं कारण कृष्णाने अत्यंत मुत्सद्दीपणे जगासमोर दुर्योधनाला हट्टाग्रही सिद्ध केलं. अर्थात दुर्योधनाला राज्याचा वाटा द्यायचा नव्हताच. पण त्याच्या स्वभावाची ही बाब कृष्णाने शिष्टाईच्या निमित्ताने चव्हाट्यावर आणली. अशा घटना महाभारतात अनेक असल्या तरी येथे फक्त तीनच घटना विचारार्थ घेतल्या आहेत. या तीन घटना त्या काळच्या विचारसरणीवर तर प्रकाश टाकतातच शिवाय या घटना घडल्यामुळे महाभारताला वेगळं वळण देखिल लागतं.
पहिली घटना भीष्माने केलेल्या अम्बाहरणाची. अम्बाहरणाच्या वेळची हकीकत लक्षात घेतली तर त्या काळचे राजे कसे वागत याचा अंदाज येऊ शकतो. केशीराजाने आपल्या तीन मुलींचं स्वयंवर लावलं होतं. त्यात भीष्म स्वतः ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेऊन देखिल भाग घेण्यासाठी आला. स्वयंवर कुणाचंही असो. मुलीची इच्छा काहीही असो. त्याच्या अटी वाट्टेल त्या असोत. बाहुबल असेल, धमक असेल, पराक्रम असेल तर मुलगी पळवुन न्यावी असा त्याकाळचा खाक्या दिसतो. पुढच्या काळात कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं आणि आपला जिवलग मित्र अर्जुन याला देखिल बहिण सुभद्रेला पळवुन नेण्याचा सल्ला दिला. बायका स्वयंवरात ऐनवेळी कुणाला माळ घालतील याचा नेम नाही त्यामुळे पळवुन नेणेच इष्ट असा भगवंताचा चतुर, व्यावहारिक सल्ला होता. याचा अर्थ स्वयंवरातुन मुली पळवुन नेणे ही त्याकाळी दुर्मिळ घटना नव्हती. पळवणार्याने पराक्रम करुन हरण केले असेल, त्याचे घराणे कुलवंत असेल तर कदाचित ती इष्टापत्तीच मानली जात असेल. भीष्म स्वयंवरात आला तो सावत्र भावांसाठी मुलगी मिळवायला. कुणाच्या वतीने स्वयंवरात भाग घेता येत नाही हे भीष्माला ठाऊक असणारच. आणि असाच दंडक असण्याची शक्यता आहे. अन्यथा इतर देशीच्या रा़जांनी त्याची चेष्टा आरंभली नसती. ही चेष्टा भीष्माच्या वयाचीही आहे. राजांनी चेष्टा आरंभल्याबरोबर जणुकाही याच संधीची वाट पाहात असल्याप्रमाणे भीष्माने तिन्ही कन्यांना बळजबरीने रथात घालुन इतर राजांना युद्धाचे आव्हान दिले. भीष्म हा महाभारतात नुसताच महापराक्रमी नाही तर महाज्ञानी म्हणुनही प्रसिद्ध आहे. शांतीपर्वात युधिष्ठीरासारख्या ज्ञानी पुरुषाला आपल्या शंका निरसन करण्यासाठी भीष्माचा आश्रय घ्यावा लागला. अशा ज्ञानवान, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कुरुला स्वयंवराचे नियम माहित नसतील ही केवळ अशक्य गोष्ट आहे. भीष्माने तेथे हजर राहुन काही गोष्टी घडु दिल्या आणि आपला कार्यभाग साधला असे वाटते.
भीष्माचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला कधीही स्वतःच्या पराक्रमाबद्दल शंका नव्हती. कुरुंदकरांनी याचं विश्लेषण करताना हनुमानाचं उदाहरण दिलं आहे. हनुमानाला त्याच्या पराक्रमाची आठवण करुन द्यावी लागली आणि मग ते उड्डाण घडले. इथे प्रकार तसा नाही. भीष्माला स्वतःच्या पराक्रमाची इतक्या यथायोग्य प्रकारे जाणीव होती की त्याने परशुरामासारख्या स्वतःच्या गुरुलाही सोडले नाही. समजा राजांनी भीष्माची थट्टा आरंभलीच नसती तर पुढचा प्रकार करणे भीष्माला काहीसे जड गेले असते असे माझे मत आहे. यात चलाखि अशी कि मुळात भीष्माला क्षत्रियांच्या उद्दामपणाबद्दल खात्री असणारच. त्यांच्या दर्पोक्ती करण्याच्या स्वभावाशीही तो परिचित असेलच. आपण आल्याचे पाहुन सारे क्षत्रिय आपली थट्टा करणार याचा त्याने आधिच कयास बांधला असावा. तेव्हा आधी त्यांना कुरापत काढु द्यावी आणि नंतर उग्र रुप धारण करुन, आव्हान देऊन, कन्यांना पळवुन न्यावे असा प्रकार करावा असा विचार भीष्माने केला असेल असे मानायला जागा आहे. (क्रमशः)
प्रतिक्रिया
छान!
@बॅटमॅन
म्हशीला करायचा उपदेश स्वतःच
Pagination