Skip to main content

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती : एक विचार

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 16/12/2013 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या आरतीचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी दोन आरत्यांचा ( गणपतीच्या नि देवीच्या ) नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांच्या अंशावताराची जयंती. खरंतर देव जन्म घेतात का असा प्रश्न येतो पण भाविकांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू. दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात. भिक्षा मागताना आम्हाला नग्न होऊन भोजन दे अशी अट घालतात. ती आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर तिघांना लहान बाळ करुन आपलं स्तन्य (दूध) वाढते. अनसूयेवर तिघे प्रसन्न, त्यांच्या बायका गप्प. वर माग म्हटल्यावर तुम्हा ति घांनीही माझं दूध प्यायलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिघेही आता माझे पुत्र आहात इथेच वास करुन असा म्हटल्यावर त्रिमुखी दत्त बनून अवतार धारण होतो. कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो. पूर्ण आरती : त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥ पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥ दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥ (पाठ आहे पण हाताशी पटकन khapre.org वर मिळाली. कॉपी करुन घेतली) आरती शब्दाचा एक अर्थ 'उपास्याबद्दल रती असेपर्यंत म्हणजे प्रेम असेपर्यंत करावयाची ती' असा आपण पाहिलेला आहेच. पुन्हा सांगावं असा हा विषय आहे. अध्यात्माबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. कारण ऐकलेलं पटकन 'आत' पोचत नाही . कारण इतर गोष्टींनी मन 'व्यापलेलं' असतं. असो. ही संतश्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी रचलेली आरती आहे. २१ वेळा अंगावर थुंकणार्‍या यवनास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे, पितर भोजनावेळी ब्राह्मणभोजनाऐवजी दीनदलित जोडप्यांना जेवू घालणारे समाज सुधारक, यात्रा करुन परतताना गाढवाच्या मुखी गंगाजल ओतून भूतदया करणारे असे एकनाथ महाराज! स्वत:च्या उदाहरणातून शांतपणे समाजसेवा करता येते हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलेलं आहे. पंगतीला पत्नीच्या पाठीवर एका उद्धटाने उडी मारली तेव्हा 'अगं सांभाळ, त्यांना पाडशील' म्हणून मिश्किलपणं त्याची जागा दाखवून देणारे, भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नि अध्यात्माचे अवघड सिद्धांत सहज समजावून सांगणारे एकनाथ महाराज. कार्यालयीन कामकाजात एक पै चा हिशेब सापडेना म्हणून रात्रभर जागून तो शोधणारे व्यवहार दक्ष नि खाजगी कामासाठी सरकारी दिवा विझवून, स्वखर्चाच्या तेलाचा दिवा जाळणारे एकनाथ महाराज. विस्मृतीत गेलेल्या ज्ञानेश्वरीला शुद्ध प्रत करुन पुन्हा प्रचार करणारे एकनाथ महाराज जणू ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याभोवतीची ही कर्मठपणाने फासणारी मुळीच जणू सोडवतात. अशा सर्वार्थाने श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी रचलेली ही भगवान दत्तात्रेयांची आरती आहे. मागे एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणं भगवदतत्त्व सगळीकडं सारखंच. एकाच व्यक्तीला काका, मामा, बाबा, भाऊ, दादा, सर, साहेब, बंड्या म्हटल्याप्रमाणं कार्यानुसार नि कारणानुसार त्याचं नाम बदलतं. विश्व निर्मितीच्या कार्य शक्ती नि तेव्हाच्या अधिष्ठानाला ब्रह्मदेव, विश्वाचा पसारा सुरु राहण्याच्या कार्यशक्ती च्या अधिष्ठान देवतेला विष्णू नि तोचा संहार करण्याच्या शक्तीच्या अधिष्ठानाला महेश असं नाव आहे. हीच त्रैमूर्ती. ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण. हालचालीशिवाय कार्य शक्य नाही. कुठलीही गोष्ट सुरु करण्यासाठी आवश्यक हालचाल अथवा जी क्रिया लागते तिला रजोगुण म्हणतात. नि सांभाळण्यासाठी आवश्यक असतं ते स्थैर्य. टिकणं. ह्या टिकण्याच्या मागं असणारा भाव असतो तो सत्त्वगुणाचा म्हणून ओळखला जातो. नि संपवण्यासाठी आवश्यक असतो तो तमोगुण म्हणजे संहार करण्याची क्रिया. हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! पण ह्या तीन क्रिया म्हणजे भगवान दत्त नव्हेत किंवा हे तीन गुण म्हणजे दत्त नव्हेत. तर त्रिगुणात्मक म्हणजे तिन्ही गुणांचा आत्मा म्हणून म्हणजे ज्याला आपण मूळ स्त्रोत म्हणू शकू असे हे दत्त भगवान आहेत. मुळात ते काहीच करत नाहीत. ज्याप्रमाणं वीजेच्या बलावर हीटर नि रेफ्रिजरेटर दोन्ही चालून अनुक्रमे गरम नि थंड करण्याची कामं होतात पण वीज गरम किंवा गार नव्हे त्याप्रमाणं दत्त त्रिगुणात्मक आहेत खरे पण त्रिगुण म्हणजे दत्त नव्हेत तर त्रिगुण ज्याच्या अधिष्ठानावर काम करतात ती गोष्ट (इथं थोडं आणखी विश्लेषण म्हणजे असं एक जागी दाखवता येईल नि दुसरीकडं येणार नाही असं ते नसतंच मुळी. सबाह्य अभ्यंतरी पुढं येईलच) दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिला? कसा दिला? आपण वर पुराणातली कथा पाहिली. दत्तांच्या आईचं नाव अनसूया नि वडलांचं नाव अत्रि. कथा फार काही 'सांगणार्‍या' असतात. बहुतेकदा रुपक कथाच असतात त्या. आओअण नीट पाहिलं तर ह्या कथा पुष्कळ काही देऊ शकतात. अ त्रि म्हणजे जे तीन च्या पलिकडे आहेत असे ते. तीन गोष्टींची भली मोठी यादी आहे. तीन गुण -सत्त्व, रज, तम , तीन काल - भूत, वर्तमान, भविष्य, तीन अवस्था - जागृती, स्वप्न, सुषुप्ति, तीन देह- स्थूल, सूक्ष्म, कारण देह अशा सगळ्याच्या पलिकडं गेलेल्या व्यक्तीमध्ये दत्ताची अभिव्यक्ती शक्य आहे. (अथर्वशीर्षामध्ये त्वं गुण, देह, काल, अवस्था त्रयातीतः असं जे गणनायकाचं वर्णन आहे ते हेच्च्च्च! एकाच व्यक्ती चा हाक मारताना पुतण्याकडून काका नि दुसर्‍या बाजूनं भाच्याकडून मामा म्हणून उल्लेख येतो तसंच) हेच अनसूया ह्या आईबद्दल. अन-असूय= असूया नसलेला/ली हे मनाचं स्वरुप असलेल्या व्यक्तीमध्ये दत्त भगवान येतात. मुळात हे दत्त वगैरे का आणायचे जीवनात? माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षामध्ये स्पर्धा, मत्सर, हेवेदावे असतात पण ज्या व्यक्तीला असूया नाही त्याला ह्या कशाचा त्रास होत नाही. आपल्याला वाटेल मग प्रगती कशी होणार? स्पर्धेशिवाय प्रगती कशी शक्य आहे ? उदाहरण घेऊ. शाळेत असताना एकाला ७५ % मिळाले तरी इतर ७०% च्या आसपास असल्यानं पहिला नंबर मिळायचा. एकदा असंच एकानं सांगितलं तुला ७५% मिळतात म्हणजे २५ % येत नाही का? डोळे उघडले. परिक्षा कितीची आहे? १०० % ची आहे ना? मग आपण १०० % साठी काम केलं पाहिजे. दुसरा ७० % वर असो अथवा ९५ % वर! स्पर्धा कुणाची? कुणाशी? ह्या विचारामध्ये आपण इतरांशी तर नाहीच तर स्वतःशीसुद्धा स्पर्धा नाही करत. मला १०० % यावं एवढा भाव निर्माण होतो. भूतकाळाची नि भविष्याची चिंता मुख्यत्वे भीतीपोटी असते. भीतीचा उगम पुन्हा आपण असू का नसू ह्यामध्ये असतो. एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं. थोडं अवघड वाटतं पण आधीच्या लेखात म्ह्टल्याप्रमाणं जर 'जे माझं आहे ते मी नाही' हे पक्कं झालं की माझा मोबाईल, घड्याळ म्हणजे मी नाही हे जसं मान्य तसं माझा हात, माझा पाय, माझं शरीर, माझं नाव, माझी शैक्षणिक पदवी, माझी संपत्ती, माझे नातेवाईक, माझं मन, बुद्धी चित्त म्हणजे मी नाही हे लक्षात येतं, पटतं. हळू हळू हे आत्मसात व्हायला लागतं. ह्यातून भीती जाते, चिंता जातात, काळजी जाते. अनसूयेच्या पोटी येणारे दत्त ह्यासाठी आपल्यामध्ये आणावेत. असूया गेली नि भूत भविष्याच्या चिंता गेल्या की बरंचसं मन मोकळं होतं. मन मोकळं झालं की आनंद असतो, आनंद असला की समाधान असतं. आपण पहिल्या ओळीतला पहिला चरण बघतोय अजून. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा 'जाणा' वर म्हटलेलं सगळं हे जाणण्याचीच तर प्रक्रिया आहे. नेमकं काय आहे हे एकदा समजलं की पुढचं सगळं एकदम स्वच्छ होऊन जातं. माहिती असणं वेगळं, समजणं वेगळं, समजून घेणं वेगळं नि जाणणं वेगळं. हे जाणल्यावर पुन्हा वेगळं काही जाणण्याची गरज तर राहत नाहीच पण वखवख देखील थांबते. हे एकदा समजलं म्हणजे जणू 'मास्टर की' सापडली! त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा.: असा हा (तिन्ही गुणांचे स्वामी एकत्र आलेला) अवतार तिन्ही लोकांचा राणा म्हणजे राजाच जणू. (बाकी आनुषंगिक म्हणून तमोगुणाचे स्वामी म्हणून शंकर तमोगुणी नाहीत तर ते त्याचे स्वामी आहेत. बर्‍याच जणांचा तसा समज पुराणकथांचा पाठिंबा असल्यानं जाणवतो खरा मात्र हे खरं नाही. आमच्या घाटपांडे काकांनी पोलिसात असताना अनेक जणांची पाठ फोडली असेल पण म्हणून ते रागीट ठरत नाहीत तसंच काहीसं! असो. महाशिवरात्रीला शंकराची आरती बघू अशी महादेवाला प्रार्थना!) नेति नेति शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन समाधी न ये ध्याना| जोवर नेमका भाव समजत नाही तोवर गूढ आकलन होत नाही त्यामुळंच हे वेद शास्त्र नेति नेति (हे नाही, ते नाही असं) म्हणत राहतात नि कुठल्या अनुमानाप्रत येऊ शकत नाहीत. वर म्हटल्याप्रमाणं जे माझं ते मी नाही चा विचार अगदी ह्याच प्रकारे करता येऊन नेति नेति नि शंकराचार्यांच्या आत्मषटकाला जाऊन पोचतो. 'न जाणता कोटीवरी| साधने केली परोपरी| तरी मोक्षास अधिकारी| होणार नाही||' असं म्हणतानाचा समर्थ रामदासांचा भाव, 'तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेचि खळ' म्हणणारे तुकाराम महाराज, 'वस्तुर्सिद्धीर्विचारेण न कश्चित कर्मकोटिभि' ह्या सगळ्याचा नि सुरवरमुनिजन योगी 'समाधी न ये ध्याना' चा एकंदर अर्थ हाच की योग्य मार्गानं सारासार विचार नि विवेक करुनच नेमकं काय हे समजून घेऊनच मोक्षपद प्राप्ती करुन घेतली जाऊ शकते (मुळात ते नित्यप्राप्त च आहे, चुकीच्या धारणांमुळं बंधन वाटतं (आरशावर घाण असली तर प्रतिबिंब दिसत नाही पण ते असतं तसं. आरसा स्वच्छ करावा लागतो)) जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता भव चिंता: भव म्हणजे संसार. दुसरा अर्थ माझ्यापुरतं असलेलं जग. आपल्या आजूबाजूचंच. सगळ्याचा विचार काही ठराविक लोकांसाठी सोडून देऊ. (असतात तसे. असो द्यावेत) श्रीगुरु कॄपेने दिल्या गेलेल्या ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे असं नाथ महाराज म्हणतात तेव्हा ते आपल्यासाठी जास्त असतं. संत स्वतःसाठी बोलताना सुद्धा सगळ्यांचं हीतच पाहतात. सबाह्य अभ्यंतरी म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं तत्त्व ते तूच आहेस. विश्वनिर्मिती ते विश्वाचा लय ज्याच्या सत्तेवर (बेसवर) चालतो ते चैतन्यरुप म्हणजे दत्त. ही गोष्ट अभाग्याला मात्र कळू शकत नाही. पराहि परतली तेथ कैचा हा हेत, जन्ममरणाचा पुरलासे अंत| आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलण्याची मूळ सुरुवात होते ती म्हणजे परावाणी. परा, पश्यन्ती, मध्यमा नि वैखरी अशा चार वाणी आहेत. वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते. मात्र परावाणी मध्ये मूळ सुरुवात होते असं मानतात. ते तसंच का मानायचं? गणित सोडवायला एक 'क्ष' लागतो म्हणून. बस्स्स. समीकरण सोडवून 'क्ष' चं विसर्जन च अपेक्षित आहे. तर ही जी परावाणी आहे ती सुद्धा परतते असं दत्तात्रेयांचं स्वरुप आहे. थोडासा विचार करुया. आपण कधी कधी शांत बसतो. अगदी शांत. काहीच विचार नाही. तेव्हा काय होतं? आतलं सगळं शांत असतं. मन हे करु का ते करु असं काम नसतं करत, बुद्धीला घ्यायला कुठला निर्णय नसतो, चित्त काही साठवून ठेवायला नसल्यानं गप्प असतं, तसंच विचाराचा उगम असलेली परावाणी सुद्धा आपल्या मूल स्थानावर असते. चक्र सुरुच नाही ना कसलं! त्यामुळं शांतीचा अनुभव येतो. ह्यालाच परावाणीचं मूलस्थानी परतणं म्हणायचं. जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं. हे कधीकधी एका जन्मात शक्य होत नाही म्हणून 'जन्ममरणाचा अंत पुरतो'. जन्मो जन्म सुद्धा घालवावे लागतात. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला : अशा सातत्याच्या विचारातून कधीतरी जाणून घेतलेल्या अनुभवातून दत्त हा अनुभव येतो त्याला शाश्वततेकडे नेणार्‍या सतभावानं प्रणिपात म्हणजे अहं सोडून नमस्कार केला.(भाव म्हणजे जो स्थिर असतो तो तर भाव-ना म्हणजे अस्थिर भाव, अभाव म्हणजे नाहीच्च! ) अशा रितीने तत्त्व समजल्यानं आशीर्वाद लाभला नि जन्ममरणाचा फेरा म्हणजे हे जे 'मी नि माझं' चं खरं स्वरुप समजलं त्यामुळं त्या बंधनातून माझी मुक्तता झाली. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मीतूपणाची जाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान|| तत्त्व समजलेलं आहे, त्यामाग ची प्रेरणा जाणलेली आहे, जनार्दनस्वामी जे श्रीगुरु आहेत त्यांची कॄपा झालेली आहे अशा दुग्धशर्करायोगानं प्रारब्ध योगानं नि स्वप्रयत्नानं नाथ महाराजांना त्रिगुणातीत, अनसूय बुद्धीनं मिळालेल्या दत्ताचं ध्यान लागलंय, हे ध्यान लागल्यानं मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, अहंचं काम थांबून मनाची उत-मन म्हणजे जणू मन शिल्लकच नाही अशी अव स्था झालेली आहे. एकच तत्त्व सगळीकडं असल्याचा अनुभव, अनुभूती आल्यानं वेगळेपणा शिल्ल क नाही, मी आणि तू असं काही नाहीच सगळीकडं एकच एक असल्याचा भाव जागृत झालेला आहे. असाच आनंदाचा ठेवा सगळ्यांना प्राप्त व्हावा हीच विनवणी श्री दत्तात्रेय, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी नि श्रीगुरुंच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45608
प्रतिक्रिया 246

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

त्या लेखातली आरती काढून टाकली तर उपासना कुठे उरते? मग तुमचा भक्त निर्गुणाशी एकरुप कसा होणार? गुरुचरित्र निकालात काढलं तर तो कोणत्या ग्रंथाचं वाचन करणार? आणि कोणत्या ईश्वराच्या काय आज्ञा पाळणार? उगीच काहीही भंकस लावली आहे. आणि उगीच "ब्रह्म म्हणजेच तुम्ही म्हणता तो "स्व" ही मखलाशी कशाला हवी? माझ्या विचारांची तुमच्या विचारांशी संगती नाही. माझ्या दृष्टीनं दत्त वगैरे कुणीही नाही आणि त्यामुळे सगुणोपासना निव्वळ निराधार भंकस आहे. आता तुम्ही ज्याचं इतकं गुणगान केलंय तो दत्त कुठे आहे ते सांगा. आणि जमत नसेल तर असले बालिश प्रतिसाद बंद करा.
बाकी मोदींची नि प्यारे ची तुलना अस्थानी, अत्यंत विसंगत नि चुकीची आहे. मोठा माणूस आहे तो!
राम जितका काल्पनिक आहे तितकाच दत्त अशी ती संगती आहे. स्केल कंपेरेबल नाही पण मेथड सेम आहे. इथे संकेतस्थळावरचे सदस्य माना डोलवतायंत तिथे मतदार भाळतील इतकाच काय तो फरक.

In reply to by प्यारे१

मी कोण तो प्रश्न कुठे आहे? तुम्ही स्वतःला भक्त समजतायं हा गैरसमज आहे. कारण देव ही कल्पनाच भक्त निर्माण करते. तुमचा देव काढून टाकला तर भक्त उरत नाही. एक भ्रम दुसर्‍या भ्रमाला जन्म देतो. देव या भ्रामक कल्पनेची `आपण भक्त आहोत' ही आपसूक होणारी परिणिती आहे. आणि भक्तांच्या व्यक्तिगत कल्पनांनी सबंध एकसंध मानवता विभाजित झाली आहे. मुस्लिम, हिंदू, क्रिस्टशिअन, ज्यू, ..... आणि कायकाय. त्यात पुन्हा वाढीव मूर्खपणा म्हणजे प्रत्येक धर्मात उपधर्म आणि त्यांच्यात पुन्हा तेढ! मग अशा धार्मांधतेतून एखादा हिटलर ज्यूंना निर्वंश करण्यासाठी संपूर्ण जगाला महायुद्धाच्या खाईत लोटतो आणि त्याचे तितकेच मूर्ख समर्थक बलिदानाला तयार होऊन लक्षावधी निरपधारांचं आयुष्य बरबाद करतात. हिटलरसाठी लढणार्‍यांना देखिल तो आपलं हितंच करतोय असं वाटत असतं! त्यांना हिटलरच्या निर्बुद्धतेविषयी जरा सुद्धा शंका वाटत नाही. आणि इतका घनघोर कलह होऊन देखिल मानवता शहाणी होत नाही. तेच वैर पुन्हापुन्हा उफाळून येतं आणि कारण काय? तर देवाधिष्ठित धर्म! अर्थात प्रत्येक जण हिटलर होऊ शकत नाही. तो त्या काल्पनिक तारणहार देवाची वाट पाहातो. आणि त्याच्या अजाणतेपणाला अंत नसतो कारण असा देव कुठेही नसतो आणि कधीही येणार नसतो. पण सगळे धर्मगुरु, धर्मग्रंथ आणि कर्मकांडं त्याला दिलासा देत राहातात की देव आहे, भाव दृढ कर. असा दृढ भाव फक्त चुकीची धारणा सघन करत नेतो. अत्यंत अपवादात्मक स्थितीत एखाद्याला मात्र देव नक्की भेटतो! त्या वेळी तो पुरता भ्रमिष्ट झालेला असतो, त्याचा भ्रम साकार होऊन त्यानं देवाचं रुप घेतलेलं असतं! इतरांना या गोष्टीचा प्रचंड काँप्लेक्स येतो त्यांना वाटतं आपण कमनशिबी या जन्मात देवाची भेट घडायची नव्हती. आणि ते मूर्ख त्यांच्या पुढच्या पिढीला सांगत राहातात, देव आहे, तुम्ही भाव दृढ करा. आम्हाला भेटला नाही पण एक दिवस तुम्हाला तो नक्की भेटेल!

In reply to by प्यारे१

*i-m_so_happy*

In reply to by प्यारे१

नाहि. किंबहुना या संपूर्ण द्विशतकी ३ पानी चर्चेत भक्तीमार्ग कुठेच आला नाहि. भक्तीमार्ग म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेलं मुळचं कडु, पण अत्यावष्यक वगैरे औषध नाहि. भक्तीमार्ग म्हणजे देवासोबत केलेली, सत्य वा काल्पनीक, अशी डील नाहि. भक्तीमार्ग म्हणजे कुठल्याश्या काल्पनीक कथेने लोकांचे मनःस्वास्थ्य जपणं नाहि कि लोकसंग्रहाखातर केलेली ट्रीक नाहि. भक्तीमार्ग म्हणजे आकाशात बसलेल्या एखाद्या सर्वाधिकारी राजाला कल्पून केलेली भाटगिरी नाहि किंवा कविकल्पनेने रचलेलं साहित्य कालांतराने सत्य समजल्या गेल्याची चुक नाहि. भक्तीमार्ग म्हणजे जन"सामान्यांच्या" पातळीवर, कुठेतरी खाली उतरुन (डीग्रेडेड लेव्हल) केलेला स्युडो तत्वबोध नाहि. या चर्चेच्या अनुषंगाने सांगायचं झाल्यास, इथे वापरल्या गेलेल्या शब्दात सांगायचं तर, भक्ती म्हणजे मनात सच्चीदानंदाचे प्रारूप उतरणे. मन जे नेहमी कालजन्य, कालबाधित घडामोडींच्या प्रतिमा दाखवतं त्याला सच्चिदानंदाशी फेस टु फेस करणे व मनात सच्चिदानंदाची प्रेमरूपी प्रतिमा उमटणे म्हणजे भक्ती. कुठलाही आत्मसाक्षात्कार, आत्मभान, सिद्धत्व, ज्ञान यांचं शेवटचं डेस्टीनेशन म्हणजे भक्ती. दत्त म्हणजे कुठली काल्पनीक व्यक्ती नाहि. सच्चिदानंदाला त्याच्या स्वरुपाचं जे भान आहे ते गुरुतत्व म्हणजे दत्त. हे तत्व जड सृष्टीमधे वावरणार्‍या शरीराची खोळ पांघरलेल्या आत्म्याचं बोट धरुन किती विवीध प्रकारे त्याचा उद्धार करतं हा फार खोल विषय आहे, खोल असण्यापेक्षा तो फार पवित्र विषय आहे. मनुष्य नामक प्राण्यामधे सत्य जाणण्याची जी उपजत इच्छा आहे त्या इच्छेला सत्याने दिलेला प्रतिसाद म्हणजे दत्तावतार. तान्ह्या बाळाने टाहो फोडावा व मातेच्या स्तनातुन दुध पाझरावं इतकं पावित्र्य आहे या विषयाला. हे दुध पिऊन तृप्त झालेल्या लोकांकडुन चार थेंब मिळवता आले तर बघावं, अन्यथा त्याची टिंगल टवाळी तरी कर नये. गुरु तत्वाची टिंगल होऊ शकत नाहि, नुकसान झालं तर आपलच होईल... मनाने मनावर केलेला बलात्कार असेल तो. असो. कुणि कितीही सांगितलं तरी हा बलात्कार थांबणार नाहि... माणसाची हौस आणि काय.

In reply to by अर्धवटराव

माऊली! थोडं टेक्निकल करेक्शन. आरती हा भक्तीमार्गाचाच एक भाग आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, वंदन, पादसेवन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन ह्या भक्तींपैकी अर्चनाभक्तीचाच एक भाग आरती आहे. भक्तीच्या सोपानाच्या वेगवेगळ्या पायर्या म्हणा ना! भक्तांमध्ये देखील आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू नि भक्त असे प्रकार आहेत. सगुणाची गोडी लागावी ती आपलं काम व्यवस्थित करताना निर्गुणाचा लाभ होतो. अलगद! संतांनी निर्गुणाचा अनुभव घेऊन सगुणाचीच कास धरली ती जाणीवपूर्वक, हेतूतः . सामान्यांच्या उद्धारासाठी. भक्तीमार्ग हा सगुणाकडून निर्गुणाकडं नेणारा मार्ग आहे. आपण वर म्हणताय तो आत्मनिवेदनाचा 'सेल्फ रियलायझेशन'चा भाग आहे. 'पहावे आपणासि आपण!' (इथं सगुण नि निर्गुण ही भाषा मुळातच शिल्लक रहात नाही) बाकी प्रतिसादाशी हजारदा सहमत! गुरुतत्त्वाबद्दल टिंगल करुन नुकसान आपलंच होणार आहे. होतंय काय की मार्गाबद्दल गोंधळ होताहेत. ध्येयाबद्दल नसावा अशी अपेक्षा आहे. ;) पब्लिक प्लॅटफॉर्मवर असं व्हायला होणारच. टीपकागदासारखं चांगलं ते टिपावं. बाकी सोडून द्यावं.

In reply to by प्यारे१

>> माऊली! -- हाण्ण तेच्यायला =)) आरती भक्तीची परिणिती देखील आहे. ज्याला नवविधा भक्ती म्हणतात त्या प्रोसेस नसुन एकाच भावाचं वेगवेगळं प्रकटीकरण आहे. आर्त जिज्ञासू वगैरे हे प्रकार नाहित तर विहीर खोदताना पाणि किती जवळ येतेय याचे काऊंट आहेत. भक्ती"मार्ग" सगुणाकडुन निर्गुणाकडे नेणारा मार्ग म्हणता येईल पण भक्ती हि निर्गुणाचं सगुणत्व आहे. असो. तसंही बेखुदीके लिए इश्क होना जरुरी है, होश मे रेहकर मय के बारेमे कितीही बडबड करा... अगर हाय कंबख्त तुने (लिटरली तुम्ही नाहि हां) पि ही नहि तर नुसता बारानेका ग्लास तोडुन काय फायदा. मार्गाबद्दल गोंधळ होतोय हे तर उघड आहे. माझं म्हणणं एकच आहे कि भक्ती वगैरे बाबींना मानसक्रिडा कल्पुन कितीही चिरफाड केली तरी हाती काहि लागणार नाहि. प्रकाशाकडे पाठ करुन सावली मिटवायचा प्रयत्न करणं मुद्दलातच चुकीचं आहे... त्याकरता प्रकाशाभिमुख होण्याशिवाय पर्याय नाहि. त्याच मागावर मग त्या प्रकाशाचा सोर्स, जो सूर्य, तो देखील गवसेल. तसच त्या भक्तीचा सोर्स, ते दत्तप्रभु देखील गवसतील.

In reply to by राही

जे आपण शोधतोय ते आपण स्वयेच आहोत!
जो विचार करतो, स्वतःचा शोध घेतो तो सर्वसुखी असतो
अत्यंत योग्य अर्थ आहे. या दिशेनं शोधलंत तर तुम्हालाही आपण व्यक्ति नसून उपस्थिती आहोत (The constant presence) हा उलगडा होईल कारण ती वस्तुस्थिती आहे.
आत्मशोध हाच अंतिम शोध आहे आणि आत्मज्ञान हेच अंतिम ज्ञान आहे.
आय अ‍ॅग्री. तुमच्या प्रतिसादांनी माझ्या श्रमाचं सार्थक केलं! धन्यवाद!

ओके :)

म्हशे, तुला माहिती नाही म्हणून खंडोबाची प्रचीती कुणाला येत नाही असे धडधडीत खोटे विधान कसे करू धजावलीस
अहो मग मला काय माहित नाही ते सांगा न ? खंडोबाची कशी मिळवायची, भक्ती कशी करायची ते तरी सांगा न . खंडोबाचा असा एखादा मंत्र , स्तोत्र, गुरुचारीत्रासारखा असा एखादा ग्रंथ किवा अजून कहिहि…. आणि हजारो दत्तभक्त सांगता येतील तसे खंडोबाच्या एका तरी भक्ताचं नाव सांगा कि जो generally सगळ्यांना माहित अहे.

In reply to by म्हैस

मी आधी काहीतरी वेगळा प्रतिसाद लिहीणार होते.. पण तुमचे बाकीचे प्रतिसाद वाचुन मला तरी असं वाटतय की "ओके तुमचचं खरं..!" हा प्रतिसाद ठिक राहील.. धन्यवाद.. श्री गुरुदेव दत्त तुम्हाला एक नवा द्रुष्टीकोन देवोत..

In reply to by म्हैस

मार्तंडविजय - गंगाधर कवी (इ.स. १८२४) मल्लारिमाहात्म्य - श्रीधरस्वामी कृष्णाची आळ - नामा पाठक The worship of Khandoba and Yelamma - John Murdoch

लेख वाचलेला नसूनही प्रतिसाद वाचायला मजा येतेय. जालावर एक चित्र शोधत होतो इथे डकवण्यासाठी. सापडत नाही. सापडलं की डकवेन.

203

दत्त नामाचा लागो छंद, दत्त गोविंद दत्त मुकुंद, दत्तरुपाला आळवितांना, मोहाचे तुटले बंध. नाम एक हे अखिल जगातून ज्ञान रवीचे किरण तयातून...दत्त प्रकाशा झेलीत असता जगणे परमानंद.'' अजित कडकडेंचा अभंग ऐकणे आलं. बाकी, गविशेठ यांचा प्रतिसाद आवडला. +१०० -दिलीप बिरुटे

या लेखावरचे प्रतिसाद वाचून खात्री पटली आहे की "देव आहे की नाही" हे भांडण शाश्वत आहे. जगाच्या अंतापर्यंत दोन्ही बाजू "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमें हैं, देखना हैं कितना जोर बाजू ए कातिल में हैं" असं म्हणत एकमेकांना नावे ठेवत भांडत राहणार.

In reply to by धन्या

"देव आहे कि नाहि" हे भांडण शाश्वत नाहि तर भांडण करायची वृत्ती शाश्वत आहे. सेल्फ इण्ट्रेस्ट्चा परिघ वाढवण्याप्रति मानवी मनाचा आळस या वृत्तीच्या मुळाशी आहे. हे थोडंफार न्युटनच्या लॉ ऑफ इनर्शीया सारखं आहे.

In reply to by अर्धवटराव

"देव आहे कि नाहि" हे भांडण शाश्वत नाहि तर भांडण करायची वृत्ती शाश्वत आहे.
तसंही असेल कदाचित. देव आणि धर्म या संदर्भातील माझ्या मतांची चाचपणी करताना मी "आजवर मानव जातीचं सर्वात जास्त नुकसान धर्माने केले आहे. बाकी कुठल्या कारणास्तव झाला नसेल एव्हढा रक्तपात माणसाने धर्माच्या नावाखाली केला आहे." या निष्कर्षाला आलो होतो. परंतू विचार अधिक ताणल्यावर लक्षात आलं की धर्म हे एक लेबल आहे. मुळात हिंसा माणसात खोलवर दडलेली आहे, "माझा" धर्म श्रेष्ट आहे हा अहंकार आहे. धर्माचं केवळ निमित्त असतं.

In reply to by धन्या

एकमेकांचं डोकं फोडायला माणसाला मजा/गरज वाटते... मग तो कधि दगड उचलेल तर कधि विट, कधि काठि उगारेल तर कधि फक्त ये ढाई किलो का हाथ...

In reply to by धन्या

मुळात हिंसा माणसात खोलवर दडलेली आहे, "माझा" धर्म श्रेष्ट आहे हा अहंकार आहे. धर्माचं केवळ निमित्त असतं.
या वाक्यासाठी धन्याचं मनःपूर्वक अभिनंदन! ही हिंसा दोन प्रकारे काम करते. ज्याला साथ लाभते तो युद्धानं संहार घडवून आणतो आणि ज्याला मिळत नाही तो स्वतःप्रति हिंसक होतो! अत्यंत क्लेशकारक कर्मकांडं, परिक्रमा, घनघोर तपश्चर्या उपासतापास आणि कायकाय. महावीराला एका साधकानं विचारलं: `तुमच्या पंचतत्त्वांच पालन करतांना आमच्या मनात अंतर्विरोध निर्माण होतो. तुम्ही एकच सर्वसमावेशक तत्त्व सांगाल काय?' महावीरानं सांगितलं `अहिंसा परमोधर्मः!' (फक्त अहिंसा या एकमात्र तत्वानं तुम्हाला सत्य गवसेल.) त्यावर साधक म्हणाला ` हिंसा घडण्यासाठी दोघांची आवश्यकता असते आणि सर्व ज्ञानी अस्तित्व एक आहे म्हणतात. अहिंसा हे तत्त्व द्वैताला मान्यता नाही काय? ' यावर महावीराचं उत्तर सुरेख आहे, तो म्हणाला `अस्तित्व एक आहे याबद्दल वाद नाही आणि अहिंसा हे परमतत्त्व आहे. अहिंसेचा अर्थ दुसर्‍याला नव्हे, तर स्वतःला छळू नका. जो स्वतःप्रती अहिंसक आहे तो दुसर्‍याप्रती हिंसक होऊ शकत नाही.' वास्तविकात स्वतः महावीर अत्यंत कठोर साधनेनं सत्याप्रत पोहोचला होता असा इतिहास आहे त्यामुळे त्याचं हे तत्त्व अत्यंत मुलगामी आहे.

In reply to by पिलीयन रायडर

छे छे! अत्ताशी २४५ झालेत... ३०० मिनिमम झाले पाहिजेत. म्हणजे मला त्रिगुणात्मक त्रैमूर्ती त्रय शतकी धागा फुलल्या हो फुलल्या हो प्रतिसादी बागा.. और-देव और-देव॥ अशी आरती रचता येइल. =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

शांतीब्रम्ह संत एकनाथ यांच्यानंतर नंबर प्यारेंचाच याची बुवांना खात्री पटलेली दिसतेय. ;)