Skip to main content

बाजु बंद खुल खुल जाय .

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी शुक्रवार, 17/02/2012 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अने़क मित्राना शास्त्रीय संगीता मध्ये रूची नाही असे नाही , पण मुद्दाम म्हणून ऐकत नाहीत. ह्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे अनेक गायक -गायिका ख्याल गाताना शब्द / बोल व त्यामधील "भाव" ह्या कडे पूर्ण दुर्लक्ष करतात. त्या अर्थाने ही स्वरप्रधान गायकीच आहे. त्यामुळे स्वरांची तोंड ओळख सुद्धा नसलेल्या सामान्य श्रोत्याला ह्या संगीतामध्ये रूची निर्माण होत नाही. ह्या वर ऊपाय म्हणून ऊपशास्रीय संगीत ( नाट्य संगीत / ठुमरी / दादरा ) ऐकावे. थोड्या दिवसात मध्ये अपोआप गोडी निर्माण होईल. मिपा वर जर कोणी शा. संगीताशी सलगी नसणारे असतील , त्यांनी ही हा प्रयत्न करावा. मला आवडणार्‍या अनेक ठुमर्‍यां पैकी एकी चा दुवा देत आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अश्या दोन भारत रत्नांनी गायलेल्या ह्या ठुमरी चा दुवा आपल्या करता देत आहे.( कोण बरे ? कृ. दुवा पहा ) http://www.youtube.com/watch?v=x69wfkmmFws http://www.youtube.com/watch?v=6jB4VX6W7JI नुकत्याच झालेल्या प्रेम देना निमीत्ताने अत्यंत "रोमँटीक" ठुमरी आपल्या प्रीय जनांसोबत जरूर ऐका. "सावरिया ने जादु डाला , बाजु बंद खुल खुल जाय" *मि.पा वरचे माझे हे पहिले - वहिले लेखन आहे . चु.भु.द्यावी घ्यावी .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14256
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

मि.पा. वर स्वागत. पु . ले. शु.

दोन्ही सुंदरच आहेत! आणि मिपावर स्वागत. असेच पण गाण्याची जास्त माहिती देणारे जरा मोठे लेख लिहा!

मी ऐकली आहे .स्व.अमीरखानसाहेबांच्या आवाजात ऐकली आहे. नाट्य संगीत / ठुमरी / दादरा ऐकताना पण नक्की काय शब्द असावेत असा प्रश्न बर्‍याच वेळा पडतो. तुम्ही या छोट्याशा टिपणातून झकास सुरुवात केली आहे .या नंतर अधिक विस्ताराने लिहावे अशी विनंती. अवांतर : अशाच प्रकारे "बनाव बतीया हटो काहे को झूटी "ची पण ओळख करून द्यावी.

In reply to by रामदास

ही ठुमरी/गझल, आफ्ताबे मौसिकी ( संगीताचा सूर्य ) मरहूम फैयाज खान साहेब म्हणत असत. तीचा धागा खाली देत आहे. ही त्यांची बंदिश फार लोकप्रिय झाली होती. http://smashits.saavn.com/audio/player.cfm?vt1xD5gO1JUldCk2PCoOcCehnrtd… त्यानंतर तीच बंदिश कै. मन्ना डे यांनी मंझिल या सिनेमा साठी गायली होती. तीचा धागा देत आहे. http://www.youtube.com/watch?v=JqqaXWsXAN0

शास्त्रीय संगीत आमच्या डोक्यावरुन जातं. कानाला गोड लागलं तर थोडं थबकलो तर थबकलो नै तर पास. अशा वेळी आपण शास्त्रीय संगीताची ओळख करुन देत असाल तर विस्तारानं समजून घ्यायला आवडेल. आता आपण वर दोन दुवे ठुमर्‍यांचे दिले आहेत. पण, यांना ठुमर्‍याच का म्हणायचे ? ठुमर्‍यांच्या काही खाणाखुणा सांगितल्या तर बरं होईल. गुगलून पाहिलं तर एक दुवा सापडला ” एक प्रकार का छोटा सा गीत । दौ बोलों का गीत जो केवल एक स्थान और एक ही अंतरे में समाप्त हों” आता यातले दोन बोल कोणते जरा त्याच्या जागा बिगा सांगा बॉ..........! अहो, या बाजू बंद खूल खूल जाय चा आस्वाद घेता घेता बडे गुलाम अली खॉ चे ’बाजू बंद... ही ऐकले. लै अवघड आहे हे शास्त्रीय संगीत प्रकरण. -दिलीप बिरुटे (ढ)

ठुमरी आवडलीच झटक्यात. भीमसेन जोशींची ठुमरीच काय शिव्या सुद्धा ऐकण्यासारख्याच म्हणाव्या लागतील ;-) संगीतातलं काही कळत नसलं तरी काही जागा पुन्हा पुन्हा कितीदाही ऐकल्या तरी मन भरत नाही जसं सावनकी बुंदनिया मधलं साऽऽऽ वऽऽ न ऽऽऽ की { http://www.youtube.com/watch?v=efUxislA_Go } लतादीदींच्या वैष्णव जन तो मध्ये म्हणे नरसैंय्यो तेणू दरसन करता, कुळ एको तीर तार्‍या रे {http://www.youtube.com/watch?v=kIvCtJEispY} बाबा महाराजांच्या हरिपाठातलं गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडीत सेवा, अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार सरते, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी { http://smashits.com/music/marathi/play/songs/21034/Sampurn-Haripaath/15… }

लेख छान आहे. त्यातील दुवेही आवडले. पण "स्वरांची तोंड ओळख सुद्धा नसलेल्या सामान्य श्रोत्याला ह्या संगीतामध्ये रूची निर्माण होत नाही. ह्या वर ऊपाय म्हणून ऊपशास्रीय संगीत ( नाट्य संगीत / ठुमरी / दादरा ) ऐकावे".... इथे थोडी ठेच लागली. माझ्यासारख्या (बहुधा, नव्हे नक्कीच) सुमार कुवतीच्या माणसाला हिंदी चित्रपट संगीत आवडते, (१९४५ ते सुमारे १९९० ह्या काळातील). त्यात शब्द आहेत, मेलडी आहे, र्हिदम आहे, लयीशी खेळ आहे. भारतीय शास्त्रीय तसेच लोकसंगीताबरोबरच त्यात अनेकानेक परदेशी संगीताचे अद्भुत मिश्रण आहे; मुख्य म्हणजे भारतीय संगीतात अभावाने असलेले ऑर्केस्ट्रेशन आहे, अ‍ॅरेंजमेंट्स आहेत. विविध गीतकारांच्या बहारदार रचना आहेत, संगीतकारांच्या करामती आहेत, गायक - गायिकांचा अप्रतिम सहभाग आहे, म्युझिशियन्सनी दर्शवलेले कसब आहे. आणि हे सर्व देशाच्या अनेक प्रांतांतून आलेल्या (बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, गोवा), अनेक धर्मिय (हिंदू, मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन) असलेल्या माणसांनी तयार केले आहे. तेव्हा ह्यात मी आनंदी आहे, मलातरी निदान कसलही 'उपाय' शोधावा असे वाटत नाही. पण हे थोडे अवांतर झाले. अनेक शास्त्रीय गायक, गायिका सुगम संगीत गातांना शब्दांकडे फारसे लक्ष देत नाहीत, हे दुर्दैवी आहे. कारण अशा तर्‍हेने मग हे संगीत आम जनतेपर्यंत पोहोचणारच कसे? ठुमरी, होरी, कजरी आणि नाट्यसंगीतातील भाव पोहोचणे महत्वाचे आहे असे मानले तर मग इथे हे गायक गायिका कमी पडतात. अजून एक अवांतर करतो: अमुक रागामुळे अमुक प्रहराची व वातावरणाची निर्मिती होते, हे कितपत बरोबर मानायचे? ही आपल्या मनातील असोसिएशन्स असतात. ज्या व्यक्तिस अशी असोशिएशन्स अजिबात नाहीत, तिलाही हे असे आपल्यासारखेच जाणवत असेल का? उदा. एखाद्या चिनी माणसास यमन ऐकवल्यावर त्याला त्यातून बहुधा काहीही, आपल्याला जाणवते तसे-- संध्याकाळच्य वेळेचे वातावरण (मंदीरातील घंटानाद, मशिदीतून ऐकू येणारी अजान) --- भासण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. हे लिहीण्याचे कारण इतकेच की गाण्यात शब्द सर्वात महत्वाचे, मग त्यामागून इतर सर्व. (खुद्द लतानेही एकदा असेच म्हटल्याचे आठवते). सुगम संगीत गातांनाही शब्दांशी फटकून रहाणार्‍या, नव्हे तर त्यांना केवळ शब्दांच्या खुंट्या समजणार्‍या गायक- गायिकांनाही अपवाद आहेतच. उदा. वसंतराव देशपांडे. मला आठवते, सत्तरीच्या दशकाच्या सुरूवातीस त्यांनी 'मराठी नाट्यसंगीताची वाटचाल' असा प्रायोजित कार्यक्रम सादर केला होता. त्यात त्यांनी शब्द कसे स्पष्ट उच्चारावेत ह्यावर भर दिला होता. त्यातील एक उदाहरण होते 'कोरवा शिरावर' हे. कुठल्यातरी जुन्या मराठी नाट्यगीतातील आहे हे. वसंतरावांनी ह्या उदाहरणात, अनेकदा गायक हे 'को रवा शिरावर' असे गातात हे प्रात्यक्षिकासकट दाखवले होते. वसंतराव नेहमी गात असत ती सदाबहार रचना येथे देत आहे: http://www.youtube.com/watch?v=TjkWXWdCvSM

In reply to by प्रदीप

"स्वरांची तोंड ओळख सुद्धा नसलेल्या सामान्य श्रोत्याला ह्या संगीतामध्ये रूची निर्माण होत नाही." हे कशावरून? प्रयत्न केला तरच रूची निर्माण होते. "जपानी खाद्यपदार्थात भारतीय खाद्यपदार्थासारखी फोडणी नसते त्यामुळे ते बेचव असतात" हे डोक्यात ठेवून खाणाराला ते बेचवच लागतात. मग त्याची रूची निर्माण कशी होणार??? "ज्या व्यक्तिस अशी असोशिएशन्स अजिबात नाहीत, तिलाही हे असे आपल्यासारखेच जाणवत असेल का? " हो. यावर मतमतांतरे आहेत पण मी प्रयोग करुन बघितलेला आहे. "हे लिहीण्याचे कारण इतकेच की गाण्यात शब्द सर्वात महत्वाचे, मग त्यामागून इतर सर्व." हे का?? कशावरून??? फक्त सुगम संगीत आणि चित्रपटसंगीताबद्दल ( अवांतरः हल्लीच्या चित्रपटसंगीताला संगीत म्हणावत नाही) बोलत असाल तर ठीक. "खुद्द लतानेही एकदा असेच म्हटल्याचे आठवते" केंव्हा? कुठे? कशासंदर्भात म्हटले ते महत्वाचे. नाहीतर "लताने असे म्हटले आणि शास्त्रीय संगीतात शब्द दुय्यम असतात" या दोन विधानांवरून शास्त्रीय संगीत हे संगीत नव्हे असे अनुमान निघेल. वसंतराव देशपांडे "सुगमसंगीत गायक" नव्हते. ते मुख्यत्वे "शास्त्रीय गायक" होते. त्यांनी दिलेले उदाहरण हे "नाट्यगीताचं" होतं. आणि ते त्या संदर्भातच घेतल जावं.

In reply to by रामपुरी

"स्वरांची तोंड ओळख सुद्धा नसलेल्या सामान्य श्रोत्याला ह्या संगीतामध्ये रूची निर्माण होत नाही." हे कशावरून? प्रयत्न केला तरच रूची निर्माण होते.
हे मी म्हटलेले नाही. मूळ धागाप्रवर्तकाने ते म्हटले आहे. मी ते उद्धरीत केले आहे.
"हे लिहीण्याचे कारण इतकेच की गाण्यात शब्द सर्वात महत्वाचे, मग त्यामागून इतर सर्व." हे का?? कशावरून??? फक्त सुगम संगीत आणि चित्रपटसंगीताबद्दल ( अवांतरः हल्लीच्या चित्रपटसंगीताला संगीत म्हणावत नाही) बोलत असाल तर ठीक.
मला वाटते धागा सुग्म संगीतावर आहे (ज्याला जोशींनी 'उपशास्त्रीय संगीत' असे म्हटले आहे). तेव्हा मी हे त्याच (पक्षी: सुगम व चित्रपट संगीताच्या) संदर्भातच हे लिहीले आहे.
वसंतराव देशपांडे "सुगमसंगीत गायक" नव्हते. ते मुख्यत्वे "शास्त्रीय गायक" होते. त्यांनी दिलेले उदाहरण हे "नाट्यगीताचं" होतं. आणि ते त्या संदर्भातच घेतल जावं.
हे समजले नाही. वसंतराव शास्त्रीय व त्याचबरोबर सुगम संगीतही गात. पुन्हा: सांगतो-- येथे चर्चा सुगम संगीताची चालली असल्याने माझे विधान त्या संदर्भातच घ्यावे.
"खुद्द लतानेही एकदा असेच म्हटल्याचे आठवते" केंव्हा? कुठे? कशासंदर्भात म्हटले ते महत्वाचे.
वरील उत्तर येथेही लागू आहे. संदर्भ शोधून देता येईल, पण चित्रपट संगीताच्या पुरते हे विधान होते, इतके सांगितले तर ते पुरे व्हावे असे म्हणूया का? असोशिएशनविषयी वेगळा प्रतिसाद देत आहे.

In reply to by रामपुरी

..सावरे अय जैयो......!!! हे एक उत्तरेकदील रागदारीवर आधारीत असे लोक्सन्गीत आहे त्याला 'कजरी' असे म्हणतात. विनोद१८

In reply to by प्रदीप

>अमुक रागामुळे अमुक प्रहराची व वातावरणाची निर्मिती होते, हे कितपत बरोबर मानायचे? ही आपल्या मनातील >असोसिएशन्स असतात. मुद्दा काही अंशी मान्य जरी असला तरीही, राग आणि त्यांचा समय याबद्दल इतकेच सांगू इच्छितो की- अमुक एक राग अमुक एका वेळी गायला/वाजवला असता, त्याचा परिणाम जास्त प्रभावी होतो- ही गोष्ट पूर्वजांनी अनेक वर्षांच्या अनुभवावरून जाणलेली आहे. पण म्हणून अमुक एक राग अमुक एकाच वेळी गावा असे बंधन नाही. > उदा. एखाद्या चिनी माणसास यमन ऐकवल्यावर त्याला त्यातून बहुधा काहीही, आपल्याला जाणवते तसे-- संध्याकाळच्य >वेळेचे वातावरण (मंदीरातील घंटानाद, मशिदीतून ऐकू येणारी अजान) --- भासण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. बरोबर, पण त्या चिनी माणसाला, चीन देशात संध्याकाळी जसे वातावरण असते तसा भास होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुळात संगीत हा अनुभवाचा विषय जास्त आहे. -चैतन्य

In reply to by प्रदीप

वसंतराव देशपांडे. मला आठवते, सत्तरीच्या दशकाच्या सुरूवातीस त्यांनी 'मराठी नाट्यसंगीताची वाटचाल' असा प्रायोजित कार्यक्रम सादर केला होता. त्यात त्यांनी शब्द कसे स्पष्ट उच्चारावेत ह्यावर भर दिला होता.
वसंतरावांनी "मधुमीलनात या.." हे गाणं कसं म्हणावं आणि कसं म्हणू नये याचं प्रात्यक्षिक दिलेली ध्वनिफीत खूप प्रसिद्ध आहेच. "मधुमिलनात" आणि "मधुमीलनात" यांतला फरक, "सखी बोल जी हो कामना" ही ओळ "सखि, बोल, जि, हो, कामना" अशी कशी म्हटली जाते इ. प्रात्यक्षिक उत्तम दिली आहेत. त्यांचे "सावरे ऐजैय्यो.." या दादर्‍या(?)तले उच्चारही अंधुक अस्पष्ट भासणारे पण प्रत्यक्षात खूप स्पष्ट आहेत. चैतन्यशी चिन्याच्या बाबतीतल्या या शक्यतेबाबत सहमत आहे.

In reply to by प्रदीप

प्रदीप साहेब आपण म्हणता त्याच्याशी पूर्णपणे सहमत होता येत नाही. पं. वसंतराव देशपांडे यांनी 'मराठी नाट्यसंगीताची वाटचाल' असा प्रायोजित कार्यक्रम सादर केला होता.त कार्यक्रम मी पहिला होता आणि मी त्याचे रेकोर्डिंग टेपवर केले होते. को रवा शिरा सारखे त्यांनी शारदा नाटकातील मूर्तिमंत भीती उभी या गाण्यातील शब्द चुकीचे तोडण्याने होणारा अर्थ गौण दाखविला होता. यात "दाखवावयासी मला" ऐवजी एक गायक "दाखवावया सिमला" म्हणत असे ते त्यांनी गाउन दाखविले. पण त्यात शब्द चुकीचे जोडले किंवा तोडले कि काय होते ते दाखविले होते. शुक्रवारी मी पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे गायनाचा कार्यक्रमाला गेलो होते त्यांनी गायलेले "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा" हे कानडीतील भजन परत ऐकण्याचे भाग्य मला लाभले. कानडीतील एकही शब्दाचा अर्थ कळत नसताना मी त्या भजनाचा इतक्यांदा आस्वाद घेतला आहे. यात माझ्या मनाचे कोणतेही संदर्भ(ASSOCIATIONS) नाहीत. शंकराभरणम नावाचा तामिळ सिनेमा मी पाहिला. सिनेमा मधील ओ का ठो कळले नाहीं तरीही त्याचे संगीत मनाला भावले. बर्याच नाट्यसंगीताच्या पदांचे अर्थ मला माहित नाहीत पण त्यातील सुरंची अवीट गोडी आजही मला भुरळ घालते उदा. विमला धरनिकटी मोह हा पापी. हे पं सुरेश हळदणकर आणी पं. प्रभाकर कारेकर यांनी गायलेली पदे. फार कशाला आरती प्रभू यांची कित्येक गीते अशी आहेत कि ज्यांचे अर्थ मला कळत नाहीत. उदा. गेले द्यायचे ते राहून तुझे नक्षत्रांचे देणे. ( या गाण्याचा अर्थ कोणी सांगेल काय?) माझे मराठी फार उच्च आहे असा माझा दावा मुळीच नाही पण मातृभाषेत मी दहावी पर्यंत शिक्षण घेतलेले आहे त्यामुळे माझे मराठी इतके कच्चे हि नाही.

मस्त ... मस्त ... उस्ताद फैयाझ खान सहेबान्चि अन बदे गुलम अलिन्चि ऐकलि होति ...

कोण चांगले या वादात शिरायची इच्छा नाही पण ही ठुमरी बडे गुलाम अली खां साहेब यांच्या सारखी झाली नाही आणि यापुढे होणार नाही.

असेच अजून लिहा. (शा.सं प्रेमी) चैतन्य.

हे गाणे मी ऐकतो. लताबैंचे आहे, ते ऐकतो.. पण या गाण्याचा अर्थ काय आहे? बाजुबंद कशाला खुलायला हवा आहे? संपूर्ण बंदिश / गाणे देऊन अर्थ सांगावा ही विनंती.

शास्त्रीय संगीता बाबतचे सर्व प्रश्न नेहमी पडणार्या जवळ जवळ सर्व प्रश्नांची उत्तरे कुमार गंधर्व यांनी त्यांच्या दोन तासांच्या मुलाखतीत दिली आहेत. ऐका- https://www.youtube.com/watch?v=WrUSemNWBXY https://www.youtube.com/watch?v=pQkJC7vxL98 https://www.youtube.com/watch?v=Sn3v6EHb8Pw https://www.youtube.com/watch?v=oZvdzIx7GlQ

शास्त्रीय संगीतामधील काही कळत नाही. भीमसेनजी, शोभा गुर्टू, राशीद खान यांना ऐकणे आवडते. बाकी वरच्या लेखासोबत अन्य सदस्यांच्या प्रतिसादामधून चर्चा वाचतोय. जोशीसाहेबांनी या विषयावर सलग लिहावे म्हणजे माझ्यासारख्या लोकांनाही काही कळेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जग्गु'चा -डिफरंट स्ट्रोक्स- नावाचा अल्बम आहे.त्यातलं गाणं आहे हे. सगळा अल्बमच लाजवाब! :) त्यातलं माझं अवडतं मंजे- "करत रार..." --क्या बात! :) http://mio.to/album/51-Urdu_Ghazals/4627-Different_Strokes__Hindustani_…

In reply to by अत्रुप्त आत्मा

दुव्याबद्दल धन्स. छानच. मजा आली. सावरिया ने कैसा जादु डाला रे. खुल खुल जाये रे बाजु बंद. जादु की पुडिया, भर भर मारी क्या जाने, वैद बिचारा रे.... खुल खुल जा खुल जा.... अहाहा. आपल्याला असे दुवे मिळत गेले तर आपल्याला (म्हणजे मला० शास्त्रीय गाणे अधिक आवडतील असे वाटायला लागले. -दिलीप बिरुटे (कानसेन)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या बंदिशीचा अर्थ काय?

In reply to by उद्दाम

खरंच अर्थ हवाय का? तर हा आहे. त्या सावळ्याने अशी काही जादूची पूड अंगावर शिंपडलीय की वैद्यालाही खरा आजार कळत नाहीय. (प्रणयभावना उचंबळून आल्यामुळे) दंडावर बाजूबंद तटतटून उघडतोय. हे म्हणजे आपल्याकडच्या लावणीमध्ये दंडावर चोळी उसवावी तसे आहे.

म.फैयाझखानसाहेबांचे हे गाणे रेडिओवर ऐकले होते तेव्हा शास्त्रीयसंगीतातले काहीही कळत नसूनसुद्धा(आताही कळत नाही) रात्रीच्या त्या शांत वेळी अंगावर अक्षरशः रोमांच उठले होते. नंतरही ते ऐकले. पण तो अनुभव आला नाही. जुन्या आठवणी ताज्या केल्यात. धन्यवाद.