Skip to main content

आहे मी ब्राह्मण!! मग??

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/11/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं. "ब्राह्मण!!" "वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या. नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये. गप्पा मारताना सणवार, लग्न, किंवा घरातल्या इतर कोणत्यातरी समारंभाच्या विषयावरून "आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत ना, आमच्यात असं असतं" असं कोणीतरी म्हटलं, की त्यावरून जातीचा विषय निघतो, आणि मग ग्रूपमधल्या निदान एकालातरी सगळ्यांची जात विचारायची खाज सुटते. तसं त्याने एक-दोघांना विचारल्यानंतर बाकीच्यांच्या चेह-यावर त्यांची पाळी आली की लगेच आपली जात सांगण्याची तयारीही दिसून येते. तशी ती माझ्यावर आली, आणि मी ब्राह्मण म्हटलं, की "तू ब्राह्मण आहेस???" अशी कोरसमध्ये प्रतिक्रिया ब-याचदा येते. मग त्यापाठोपाठ 'वाटत नाही तुझ्याकडे बघून', 'तुझ्या बोलण्याच्या स्टाईलवरून कळतं', 'वाटलंच होतं मला' अशा प्रतिक्रिया येतात. त्यांचं मला विशेष असं काही वाटत नाही. गंमत वाटते, ती 'सही रे!!!' या प्रतिक्रियेची. मी ब्राह्मण आहे, यात 'सही' काय आहे? मला कळत नाही. एकदा आमचा एक ग्रूप क्लासच्या दिशेने चालला होता. त्यात एक 'सुबक ठेंगणी' मुलगीही होती. मी अर्थात तिला कंपनी देत होतो. आणि आमचा बोलण्याचा विषय आमच्याच ग्रुपमध्ये आमच्या पुढे चालणा-या एका मुलाचा होता. ती मुलगी म्हणाली, 'तो मला अजिबात आवडत नाही. डोक्यात जातो.' 'का गं, काय झालं?' 'तो ब्राह्मण आहे आणि सगळे ब्राह्मण बायले असतात.' मी थबकलो. आणि त्या मुलीकडे बघून हसलो. तशी तीही चमकली. 'तू ब्राह्मण आहेस?' 'हो!!' 'सॉरी सॉरी सॉरी... तू बायल्या नाहीयेस. पण बरेच ब्राह्मण बायले असतात.' मी वाद घातला नाही. तिने सुद्धा माझ्या आडनावाचं एका भंडारी आडनावाशी साधर्म्य असल्याने मी ब्राह्मण कसा असा प्रश्न विचारला आणि मग तो विषय तिथेच थांबला. त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही. गप्पा मारताना मध्येच मला, 'तू ब्राह्मण आहेस का?' असं निदान पंधरा-वीस लोकांनी तरी आत्तापर्यंत विचारलं असेल. 'नाही काय आहे, तू जे नॉर्मल मराठी बोलतोस ना ते सुद्धा खूपच हाय लेवलचं आहे ना म्हणून विचारलं!' काय संबंध???? माझे कितीतरी मित्र असे आहेत, ज्यांचं मराठी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे. त्यातला एक आग्री आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक महार आहे(आणि यांनासुद्धा लोक 'तू ब्राह्मण आहेस का?' असं विचारतात). इतकच नाही, तर कितीतरी ओळखीची मंडळी अशी आहेत ज्यांचं मराठी भंगार आहे आणि ते ब्राह्मण आहेत. पुण्याच्या गोडबोले नावाच्या एका मित्राची टोपी हरवली होती. ती सापडली का, असं विचारलं तेव्हा तो 'हो भेटली!' असं म्हणाला होता. माझं स्वतःचं मराठीसुद्धा तितकसं चांगलं आहे असं मला वाटत नाही. चिरणे आणि कापणे, यात माझा नेहमी गोंधळ उडतो. भाजी चिरतात, फळं कापतात हे माहितीये, पण तरीही ब-याचदा मी उलटं बोलतो. आमच्या घरी नॉन-व्हेज खाण्यावर बंदी नाही. पण घरी आम्ही सहसा नॉन-व्हेज खात नाही, कारण कुणाला करताच येत नाही. त्यामुळे आम्हांला आमच्या शेजा-यांनी, वहिनीच्या माहेरच्यांनी, कधी हौसेने चिकन-मटन आणून दिलं, की आम्ही त्यावर मस्त ताव मारतो. वडिलांचे एक मित्र तर ब-याचदा आम्हांला त्यांच्या घरी मासे खायला बोलावतात. तरी माझे आई-वडील 'शक्यतो आपण जास्त नॉन-व्हेज खाऊ नये' असं म्हणतात. त्यामागे कारण हे, की लहानपणापासून शाकाहाराची सवय असलेल्या शरीराला एकदम नॉन-व्हेजचा पुरवठा झाला, तर त्याचे परिणाम खाल्ल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी दिसून येतात. हॉटेलात मित्रमंडळींबरोबर नॉन-व्हेज खात असताना मात्र बरेच अब्राह्मण मित्रच माझ्या नॉन-व्हेज खाण्यावर आक्षेप घेताना दिसतात. मी तर श्रावणात सुद्धा नॉन-व्हेज खातो. 'तू ब्राह्मण ना, मग नॉन-व्हेज कसा काय खातोस?' अशी मला विचारणा होते. 'काही फरक पडत नाही. हल्ली सगळेच ब्राह्मण खातात.' असं मी म्हटलं, की माझ्या वाक्याला पुष्टी जोडणारी उदाहरणं सुद्धा मिळतात, आणि, 'नाही हा, आमच्याइकडे एक ब्राह्मण आहेत, जे नॉनव्हेज असलेल्या टेबलावर बसत सुद्धा नाहीत' 'आमचा एक ब्राह्मण मित्र नॉन-व्हेज तर खातो, पण घरी जाऊन स्वत:वर गोमुत्र शिंपडून घेतो.' असे किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. 'तुझ्या घरी माहितीये का तू इथे नॉन-व्हेज खातोस ते? तुला घरचे काही बोलत नाहीत?' असं लोक विचारायला लागले, की माझं एक लांबलचक उत्तर रेडी असतं. "पूर्वी शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती. शिक्षण घेण्याची, किंवा देण्याची सगळ्याच जातीच्या लोकांना अनुमती नव्हती. आता बघा, शिक्षण देण्या-घेण्याचा अधिकार हा सगळ्या जातीच्या लोकांना समान आहे. तसंच पूर्वी ब्राह्मणेतर नॉन-व्हेज खायचे. आता सगळ्यांबरोबर ब्राह्मणही नॉन-व्हेज खाऊ लागले तर काय बिघडलं?" शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार?? विशिष्ट भाषा-जाती-धर्म-प्रांताच्या लोकांतील काही गुणांत-अवगुणांत साधर्म्य आढळतं हे मान्य!! पण ते एखाद्या जातीच्या सर्वच व्यक्तींत, सर्वच बाबतीत आढळून यावं असं तर नाही ना. आज समाजात अशी ब्राह्मण मंडळी आहेत, जी स्वतःला ते ब्राह्मण असल्यामुळे जास्त श्रेष्ठ समजतात. आणि त्यांचं हे मत उघडपणे मांडतात सुद्धा. बरीच अशी मंडळीही आहेत, जी ब्राह्मण असूनही ब्राह्मणांनाच शिव्या घालतात. पण काही अशी मंडळीसुद्धा आहेत, ज्यांना आपण ब्राह्मण असल्याचा गर्वही नाही, लाजही नाही. ब्राह्मणतेरात काही अशी मंडळी आहेत, जी ब्राह्मणांचा ते ब्राह्मण आहेत म्हणून द्वेष करतात. तर काही अशी मंडळी आहेत, ज्यांच्या मनात एखादा माणूस ब्राह्मण आहे हे कळल्यावर त्याच्याविषयी कौतुक आणि आदर वाटायला लागतो. जातीवरून माणूस चांगला की वाईट, हुशार की मठ्ठ, हे ठरवणं चुकीचं आहे. जातीचा दुराभिमान बाळगणारे, जातीवरुन लोकांना संघटित करणारे, जातीविषयी लाज बाळगणारे, जातीच्या अशा मानल्या गेलेल्या जुन्या रुढी परंपरा जपणारे, आणि जातीची यत्किंचितही पर्वा नसणारे असे लोक हे सगळ्या जातींत असतात. तेव्हा ठरावीक लोकांच्या स्वभावावरुन अख्ख्या जातीचं चारित्र्य ठरवणं हा मूर्खपणा आहे. हे फक्त ब्राह्मणांच्या बाबतीत होतं असं नाही. त्यामुळेच इथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा मुद्दाही मांडायचा नाही. सगळ्याच जातींच्या बाबतीत होतं. मी ब्राह्मण जातीचा आहे त्यामुळे मी ब्राह्मणांबद्दल माझ्या अनुभवातून सांगितलं. दुस-या जातीचा असतो, तर फक्त नाव आणि उदाहरणांचं स्वरूप बदललं असतं, मुद्दा तोच राहिला असता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 44786
प्रतिक्रिया 170

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

...नवी व्यवस्था वरदान आहे.
समाजाच्या हिताची परिणामकारकता मोजताना " अधिकांचे अधिक सुख " हा मापदंड वापरावा लागतो. "काही लोकांचे अधिक बरे" असा विचार केल्यास " आहे रे आणि नाही रे " मधील दरी वाढते ! निसर्गतः काही जीव दुर्बळ असतात, बळी तो कान पिळी हा जंगलाचा नियम आहे , समाजाची धारणा धर्माने होते आणि त्याची भूमिका " सर्वेपि सुखिनं संतु " अशी असायला हवी ! नवी व्यवस्था बळी तो कान पिळी आहे तर जुनी व्यवस्था " अधिकांचे अधिक सुख " पाहणारी आहे.

मी अशी बरीच माणसे बघितली आहेत की ज्यांना स्वतःला मांसाहार भयंकर पसंत असतो तीच लोक मांसाहार न करणार्यांची चेष्टा करत असतात त्यात ब्राम्हणहि आले. ते कायम विचारात असतात कि तुम्ही मांसाहार करता का ? ह्यावर माझ्या ओळखीत घडलेला किस्सा पुढील प्रमाणे :श्री गोखले ह्यांना सतत एकजण विचारत असे कि तुम्ही मांसाहार करता का ? त्यावर त्यांनी सांगितले कि मी तुला सुद्धा खाऊ शकतो.

माझा एका मित्राची आई मराठा.वडिल को.ब्रा. ह्याच सगळं शालेय आणि कॉलेजच शिक्षण परदेशात झालेलं. आणि आता सगळे भारतात आलेत. त्याच्या भावाचं arranged marriage झालं.मुलगी देशस्थ.भावाचं लग्न झाल्यावर ह्याची रोज ऑफिस मध्ये यॆऊन बडबड आणि चेष्टा केल्यासारखं,' देशस्थी घोळ आलाय आमच्या घरात. माझ्या भावाला पण काय सुचल. .!' अरे पण तुझ्या भावाला काही प्रॉब्लेम नव्हता ना देशस्थ मुलीशी लग्न करण्यात मग तुला काय त्रास होतोय? तू कर को.ब्राच मुलीशी लग्न. तुझ्या स्वतःच्या आई-वडिलांचा आंतरजातीय विवाह अस्ताना, तू इतकी वर्ष परदेशात असताना तुझे विचार असे कसे रे? तर म्हणे आमच्या जातीतल्या मुली काय संपल्यात का..! आता हिला शिकवत बसा को.ब्रां.ची शिस्त आणि पध्धत.माझ्या आईच आणि तिचं पटणारच नाही बघ. आता त्याने को.ब्रा. सदाशिव पेठी मुलीशीच लग्न केलय. आणि वर म्हणतोय, बघ आता माझ्या बायकोच आणि आईच कसं गुळपिठ जमेल. आपापल्या पोट्जातीतच कसला एव्हडा दुस्वास?

हायला का कळत नाही पण कुणी संस्कृत फेकून मारायला लागला की आम्ही गप्प होतो

माझ्याबरोबर असेच होते …. जेव्हा मी लोकांना सांगतो कि महाराष्ट्रीयन नाही …पण माझे मराठी ऐकून कोणाला तसा संशय येत नाही. मी कोणाला सांगत हि नाही , म्हणतात ना झाकली मुठ सव्वा लाखाची

चुलीत घाल तूझी जात ! आस म्हणून आझा मित्र मला पार चुली पासी नेतो ! तेची आई आमच्या दोघांकडे पाहून मंद मंद हासत एकाच प्याल्यात चाहा वतून देते ! हा हरामखोर तो चहा दोन ठिकाणी करून मला प्यायला देतो ! मी नको म्हणतो तरी ! ती माउली म्हणते घेरे बाळा ........ मग काय ............

मी जन्माने मराठा पण पौरोहित्य शिकलोय आणि नात्यातल्या लोकांकडे करतो सुद्धा. पण बर्याच वेळा माझ्या शास्त्रोक्त पुजेपेक्षा माझी जात आडवी येते. त्या मुळे मी नक्की कोण हा सुद्धा प्रश्नच उभा रहातो.

In reply to by प्रशु

मित्रा तुला काम करायच असेल तर , फक्त "मी हिंदू पुरोहित आहे" असे सांगत जा . आणि यावरंही कुणि काही बोललं ,तर "मी ,सावरकरांनी सांगितलेली -जात मानतो" असेही ठणकावायला विसरू नको! ------------ या विषयाधारित पुढिल गोष्टी आपण मेसेज मधे बोलू. :)

In reply to by ग्रेटथिन्कर

मी तर तो इतिहास वाचलेल्या ,खासकरून ब्राम्हणब्राम्हणेतरांपैकि काहींना "कोणत्याही जातितला पुरोहित" ही कल्पना उचलून धरलेलं पाहीलय! :) आणि मी स्वत: ३ ब्राम्हणेतर मुलांना वेदोक्त षोडशोपचार पूजा शिकवली आहे,ते सावरकर 'पचल्या' मुळेच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

सावरकर खरोखरच पचलेत का? मग ती गाय नावाची उपयुक्त पशू कधी पचवताय?

In reply to by उद्दाम

@मग ती गाय नावाची उपयुक्त पशू कधी पचवताय? >>> आपण म्हणाल तेंव्हा! कुठं यायचं बोला! :)

In reply to by उद्दाम

जर जातपात मानत नसाल तर स्वतः किंवा स्वतःचे झाले असल्यास आपल्या मुलांचे तथाकथित 'नीचांतर्जातीय' लग्न करण्याची धमक आहे काय? नै म्हणजे सावरकर पचण्याची टेस्ट बीफ खाणे हीच असेल, तर मग मुद्दाम नीचांतर्जातीय लग्न करणे हीच जातिभेद न मानण्याची टेस्ट असली पाहिजे, नै का.

In reply to by बॅटमॅन

विशेषतः आयव्हरी टॉवरमध्ये बसून नुस्ते विचार प्रसवणार्‍या नकर्त्यांनी आचरण केले पाहिजे, नैतर एक विचारमैथुन यापलीकडे त्याला अर्थ नाही. अन जेव्हा कर्त्यांशी नकर्ते भांडतात ते पाहणे मनोरंजक अन तितकेच केविलवाणे असते. अत्रुप्त आत्मा यांनी सुधारणावादी म्हणता येईल असे काहीतरी केलेय तरी किमान, तुम्ही काय केले म्हणून तुम्हाला असे पचकायचा अधिकार प्राप्त झाला? तेही सांगाच एकदा. की नुसते हम बोलेसो कायदा? ते ग्रेटथिंकर नरके अन सोनवणीसारख्यांना इतिहासकार वगैरे म्हणतात अन तुम्ही सुधारक बिहेवियरची टेस्ट बीफ खाण्याशी जोडताय. नक्की प्रॉब्लेम काय आहे तुम्हा लोकांचा? तथाकथित उच्चजातीय मुलीने डिच वगैरे तर केले नाही ना =))

In reply to by बॅटमॅन

शांत कॅटवुमनभर्तारा शांत! ;) संपादकांना नम्र विनंती, काही धागे सातत्याने अकारण वर राहून काही चांगले धागे खाली जात आहेत. किमान लिखाणपातळी सुद्धा न ठेवता सुरु असलेल्या ट्रोलिंगचा कंटाळा आला आहे. लोकानुनय करण्याच्या नादात संस्थळाची पातळी खालावली जाण्याची भीती वाढली आहे. वेगळं लिखाण करुन आपल्या भूमिका मांडण्याची संधी प्रत्येक आयडीला असताना अकारणच नको ते जातीविषयक वाद उकरुन काढण्याची संधी काही आयडी शोधत फिरताना दिसत आहेत. लक्ष घालावे. बाकी तुम्ही म्हणत असाल तर आमच्या चपला आमच्याकडे आहेतच. :)

In reply to by सूड

जाऊ द्या मित्र हो.............. आमचे एक ज्येष्ठ व्यावसाईक असल्या तात्विक-निर्बुद्धांना म्हणायचे ना,,,तसं म्हणतो मी --- तितकाच तो!

In reply to by मृत्युन्जय

मुद्दाम उद्दाम पणा करणार्‍यांवर केलेली टीप्पणी आहे ती... बरं का रे... महा-मृत्युंजया! :D

मला वाटतं आता या धाग्यावर वेगळीच चर्चा चालू आहे, सारखे लक्ष ठेवून कंटाळा आलाय. वाचनमात्र करते आत्तातरी. नंतर बघता येईल. काय हो वडापाव महाराज, ठीक आहे ना?