
'श्रीमंत', 'मादी', 'एक शून्य बाजीराव', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'पुरुष', 'बॅरिस्टर', 'महासागर', 'हमीदाबाईची कोठी', 'वाडा चिरेबंदी', 'हयवदन', 'सावित्री' अशी अनेक लक्षणीय नाटके-एकांकिका तसेच 'पेस्तनजी', 'रावसाहेब', 'स्मृतिचित्रे' अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या रेखीव-बांधीव दिग्दर्शनाने फुलल्या-फुलवल्या. केवळ अर्थकारणाच्या - म्हणजेच 'गल्ल्याच्या गणिता'च्या - दृष्टीने पाहिल्यास यातील बरीचशी चांगलीच तरली-तरारली-फोफावली असली तरी क्वचित काही बुडाली-फसली देखील. मात्र यातील प्रत्येक कृतीवर आपला असा एक वैशिष्ठ्यपूर्ण कलात्म ठसा उमटवून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व बाईंनी निश्चितच प्रस्थापित केले. बाईंनी स्वतःची अशी एक स्वतंत्र पठडी वा घराणं निर्माण केलं याविषयी दुमत असू नये. मराठी नाट्यक्षेत्रातील आजचे अनेक आघाडीचे व प्रथितयश कलाकार त्या काळात बाईंच्या हाताखाली हळूहळू जडत-घडत गेले. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रिमा लागू, भक्ती बर्वे, प्रदीप वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, नीना कुलकर्णी अशा अनेक अभिनयनिपुण कलाकारांची एक अख्खी नवीकोरी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शकीय हातातून तयार झाली.
नाटकाची संहिता व तिचा आशय-आकृतीबंध-शैली-मांडणी-संघर्ष-गुंता-अवकाश-पट या सार्यांचा साकल्याने पूर्ण अभ्यास केल्याशिवाय नाटकाच्या तालमींचा विचार सुध्दा करु नये असे त्यांचे स्पष्ट मत असे. भूमिकेचा संपूर्ण पोत-गाभा-बेअरिंग मनामध्ये आतून सापडल्याशिवाय व त्या भूमिकेचे विविध सारे कंगोरे-धागे-पदर-स्तर-छटा पूर्णपणे समजावून-चाचपून घेऊन पूर्वतयारी झाल्याखेरीज नाटकातील अगदी दुय्यम भूमिका करणार्या कलाकाराने सुध्दा रंगमंचावर - पहिल्यावहिल्या तालमीसाठी देखील - पाऊल टाकता कामा नये हा त्यांचा नियमवजा खाक्या वा शिरस्ता नाट्यप्रयोग एकसंध-बंदिस्त होण्यास व विस्कळीत-खंडित न होण्यास मदत करतो. कलाकाराने केवळ सवंग लोकप्रियतेसाठी वा हमखास टाळ्या मिळवण्यासाठी जिवाचा आटापिटा करण्यापेक्षा अथवा रोजचा रतीब घातल्यासारखा अभिनयाच्या निव्वळ 'जिलब्या' पाडण्यापेक्षा प्रत्येक भूमिका स्वतःशी ताडून-तपासून पाहून व त्या भूमिकेमागील लेखकाच्या-दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाशी-विचारांशी एकनिष्ठ राहून काम करण्यावर भर द्यावा याकडे त्यांचा कल दिसून येतो. नटाने आपली बलस्थाने आणि मर्यादा दोन्ही नेमकी ओळखली तर भूमिका समजून-भिनवून घेण्याच्या प्रक्रियेस त्याची मदतच होते असा साधासरळ पण महत्वाचा विचार त्यांनी मांडला. त्यांच्या अनेक नाटकांतील कलाकारांना बेगडी-भडक-आत्मकेंद्री - किंवा, बाईंच्या शब्दात, 'टरफली' - अभिनयापासून दूर ठेवून त्यांच्याकडून सहजसुंदर-उठावदार अभिनय करवून घेण्यास व नैसर्गिकरीत्या भूमिका सादर होण्यास ही त्यांची शिस्त व मेहनतच कारणीभूत झाल्याचे सातत्याने दिसते.
बर्याचदा बाईंमधील कसलेली अभिनेत्री त्यांच्यातील दिग्दर्शिकेवर चक्क मात करताना दिसत असे. 'संध्याछाया'मधील परदेशस्थ पुत्राच्या विरहाने झुरणारी प्रेमळ कुटुंबवत्सल नानी असो वा 'बॅरिस्टर'मधील केशवपन केलेली-आलवण नेसलेली-भावनेच्या कोंडमार्याने घुसमटणारी मावशी असो किंवा 'हमीदाबाईची कोठी'मधील कोठी-संस्कृतीतील गायकी परंपरेचा र्हास असहाय्यपणे पहाणारी हमीदाबाई असो अथवा 'वाडा चिरेबंदी'मधील पतिनिधनानंतर कोसळणारी नाती व वाड्याचं ढासळणारं गतवैभव पचवणारी विधवा आई असो - बाईंनी मात्र समोर हाती आलेल्या भूमिकेला केवळ न्याय आणि संपूर्ण न्यायच दिला. गोळीबंद संवादफेक, हवा तो परिणाम नेमका साधण्यासाठी संवादांतील लयीवर आणि प्रसंगी शब्दविरामांवर देखील दिलेला भर, चेहर्यावर पसरलेले अस्सल हावभाव आणि अचूक देहबोली यातून व्यक्तिरेखा नेमकी पकडून प्रत्ययकारकपणे जिवंत उभी करण्याकडे त्यांचा कटाक्ष दिसून येतो.
'लाईफलाईन' ही त्यांनी ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस दिग्दर्शित केलेली व हॉस्पिटलच्या जीवनावर बेतलेली अप्रतिम दूरदर्शन-मालिका कोण विसरेल? उत्तम दिग्दर्शनाचा एक आदर्श नमुना ठरलेली ही मालिका आजही मनात घर करुन आहे, हे त्यातील तन्वी आझमी, संजय मोने, केके रैना, सुकन्या कुलकर्णी, चंदू पारखी अशा उत्तमोत्तम अभिनेत्यांच्या समर्थ अभिनयाच्या जुगलबंदीमुळे हे निश्चित. निव्वळ उदाहरणादाखल सांगायचं झालं तर, चंदू पारखी या प्रचंड ताकदीच्या-दमाच्या व तरीही प्रसिध्दीच्या झोताबाहेर राहून काम करणार्या अभिनेत्याने साकारलेली गुजराती-मिश्रित हिंदी बोलणार्या हरकाम्या वॉर्डबॉयची या मालिकेतील लक्षवेधी भूमिका आजही कित्येकांच्या चांगली लक्षात असेल. 'पेस्तनजी'मधील मनाचा-नात्यांचा-सत्याचा तळ शोधणारा नसिरुद्दीन 'पिरोजशा' शहा व त्याचा जिवलग मित्र अनुपम 'पेस्तनजी' खेर, 'पुरुष'मधला खलवृत्तीचा-सत्तांध नाना 'गुलाबराव' पाटेकर व परिस्थितीमुळे गांधीवादाकडून हिंसेकडे सरकलेली रिमा 'अंबिका' लागू, 'बॅरिस्टर'मधील उच्चशिक्षित-भारदस्त विक्रम 'रावसाहेब' गोखले व दाराआड अडकलेली सुहास 'राधाक्का' जोशी अशा एकाहून एक सरस व दिग्गज कलाकारांच्या संचांकडून त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन व त्यांच्याकडून अविस्मरणीय काम करवून घेऊन एकेक अभिजात कलाकृती रसिकांसमोर त्या काळात नित्यनेमाने सादर करणे हे एक त्या विजयाबाईच जाणोत. आजही या सर्व रथी-महारथी कलाकारांच्या बोलण्यातून बाईंबद्दलचा आदर-जिव्हाळा-ओलावा डोकावताना दिसतो.
केंद्र शासनाने १९८७मध्ये बाईंना 'पद्मश्री' प्रदान करुन त्यांच्या रंगकार्याचा यथोचित गौरव केला. याचबरोबर त्यांना 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार', 'कालिदास सन्मान', 'तन्वीर सन्मान', 'विष्णुदास भावे सुर्वणपदक', महाराष्ट्र शासनाचा 'नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार', 'नाट्यदर्पण पुरस्कार', चतुरंग प्रतिष्ठानाचा 'जीवनगौरव पुरस्कार', 'रावसाहेब'मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिक, एसएनडीटी विद्यापीठाची डॉक्टरेट, इचलकरंजी मराठी नाट्यसंमेलनाध्यक्षपद असे अनेक सन्मान-किताब-मानमरातब मिळाले पण बाई काही बदलल्या नाहीत. एकंदरीतच रंगभूमीकडे एका निकोप व अभ्यासू वृत्तीने पहाण्याचा त्यांचा निरोगी दृष्टिकोन आजही त्यांच्या मुलाखतींमध्ये वा लेखनामध्ये कायम असलेला-ठसलेला दिसतो.
दामू केंकरे, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सुलभा-अरविंद देशपांडे अशा मराठी रंगकर्मींबरोबरच इब्राहिम अल्काझी, अदी मर्झबान, अलेक पदमसी, गिरीश कर्नाड, बादल सरकार अशा अमराठी नाटकमंडळींमध्ये देखील त्यांचा राबता असे. हळूहळू हिंदी-इंग्रजी रंगभूमीवर देखील - थोड्याफार प्रमाणात का होईना - अभिनय आणि/अथवा दिग्दर्शन करुन बाईंनी आपला कार्यपरीघ विस्तारला. याचबरोबरीने 'पाश्चात्य रंगमंचावरील जे भावले ते मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे' या भावनेने बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या 'कॉकेशियन चॉक सर्कल'चे रुपांतर 'अजब न्याय वर्तुळाचा', आयनेस्को यांच्या 'चेअर्स' या एकांकिकेचे अनुवादित रुप 'खुर्च्या' या व अशा इतर काही विदेशी नाट्यकृती त्यांनी मराठी रंगमंचावर आणल्या. याच धर्तीवर 'मराठी नाटकांतील काही उत्तम कृती सुध्दा पाश्चात्य प्रेक्षकांसमोर सादर झाल्या पाहिजेत' असा विचार करुन जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेव्हिट्झ व ब्रिटिश दिग्दर्शक पीटर ब्रुक यांच्या मदतीने 'अजब न्याय वर्तुळाचा', 'मुद्राराक्षस', 'शाकुंतल', 'हयवदन', 'नागमंडल' या नाटकांचे प्रयोग - मूळ व/वा रुपांतरित वेषात - परदेशी मंचांवर सादर केले. भाषिक-सांस्कृतिक-भौगोलिक मर्यादा ओलांडून त्यांनी मराठी नाटक सीमेपार नेले. मुंबापुरीतील शिवाजी मंदिर ते साहित्य संघ ते भुलाभाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ते भारतीय विद्या भवन ते एनसीपीए असा रंगभूमीच्या विविध पातळ्यांवर थेट व चौफेर संचार लीलया करणार्या बाईंनी उर्वरित भारतातील - आणि परदेशातील - नाट्यप्रेमींचे सुध्दा लक्ष वेधून घेतले यात अजिबात नवल नाही.
कारकीर्दीच्या उत्तरार्धात बाईंनी 'एनसीपीए'च्या संचालकपदाची धुरा तब्बल सतरा वर्षे सांभाळली. नाटकांच्या प्रयोगांच्या कारणाने त्यांचे होत असलेले झंझावाती आंतरराष्ट्रीय दौरे - विशेषतः युरोपमधील अथक भ्रमंती - पहाता, मराठी साहित्य-कलाजगतातील कोणालाही न सोडता आपल्या निखळ-निर्विष विनोदाने कोपरखळ्या मारणार्या ठणठणपाळाने त्यांचे 'विजयोस्की मेहतोविच' असे नामकरण केले यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. अशा या प्रतिभासंपन्न व प्रसन्न-दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या विजयोस्कीबाईंनी वयाची आरोग्यपूर्ण अशी किमान शंभरी गाठो, सध्याच्या निवृत्तीतून - थोड्याच काळासाठी का होईना - बाहेर पडून त्यांच्या हातून अजून काही दर्जेदार नाट्यकृतींची सृजनशील निर्मिती घडो आणि मराठी रंगभूमीला त्यांच्या वरदहस्ताचा उदंड आशीर्वाद सतत व चिरंतन लाभो हीच रंगशारदेच्या आणि नटराजाच्या चरणी प्रार्थना!
————————————————————————दिवाळी अंक वर्ष
वाचने
9314
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिपोटींकडून अपेक्षित असाच अभ्यासपूर्ण लेख
+१ आवडलं.
In reply to दिपोटींकडून अपेक्षित असाच अभ्यासपूर्ण लेख by बहुगुणी
बाईंची छान ओळख! आवडली
सहमत.
छान ओळख!
मस्त ओळख...
ज-ब-री !
धन्यवाद!
हुश्श!
In reply to धन्यवाद! by दिपोटी
पुस्तक ओळख आवडली.
पुस्तकपरिचयातून .......
"वाडा चिरेबंदी" हे मला अतिशय
लेख आणि माहिती आवडली
लेखन आवडले.