मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करवा चौथ

क्रेझी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काल संध्याकाळी एका वातानुकुलित मॉल मधे शिरतांना कानांवर एक संवाद धडकला दारामधेच,सर्वांगाला तपासून आत सोडण्याच्या यंत्रामधून मी जात असतांना तिथे उभ्या असलेल्या दोन सिक्युरिटी गार्ड्स स्त्रिया बोलत होत्या - पहिली स्त्री - कल करवा चौथ का उपास किया का गं? मैने तो नहीं किया, बहुत कडक होता हय! दुसरी स्त्री - कुत्सितपणे हसत, करवा चोथ! मेरेकु इसी जनम में पती नहीं चाहिए तो आगेके सात जन्मोंके लिए कौन उसे मांगेगा! मी ते ऐकून पुढे सरकले पण डोक्यामधे तो संवाद घोळत राहिला. मॉलमधे ब-याच स्त्रिया हातावर मेंहदी काढलेल्या दिसल्या तेंव्हा वाटलं हे करवा चौथ नेमकं काय असेल बरं? माझ्या मैत्रिणीला विचारलं पण तिने, तिला माहित असलेलं एकचं वाक्य सांगितलं,'पती की लंबी उमर के लिए करते हैं, शायद'. अर्थात तिला हे उत्तर तिच्या आई आणि सासूने सांगितलं होतं. तसं तर मी हरतालिका आणि वटसावित्री पौर्णिमा हे दोन उपवास ऐकले/बघितले आहेत जे लग्न झालेल्या स्त्रिया त्यांच्या पतीसाठी करतात. पण हे सगळे उपवास नेमके कोणी सुरू केले असतील? माझ्या आजीला विचारलं तर ती म्हटली,'अगं आमच्या काळी ब-याचदा पुरूषमंडळी कधी व्यवसायानिमित्त दूरदेशी जायची तर कोणी सैन्यात भरती व्हायचे किंवा एखाद्या आजाराने पिडीत असायचे. त्यामुळे, लग्न झालेल्या स्त्रियांना पतीचा सहवास एकूणच कमी मिळायचा. तसंच, तिचं कुंकू बळकट रहावं, धडधाकट परत यावं म्हणून हे सगळे उपास-तापास लावले होते बघ! पण हल्लीच्या काळी ह्या प्रथेला तोच अर्थ राहिला आहे असं म्हणता नाही येणार. कारण तंत्रज्ञानामुळे नवरा-बायको जरी एका शहरामधे नसले तरी सतत संपर्कात राहू शकतात, ख्याली-खुशाली जाणून घेऊ शकतात. तेंव्हा हा उपवास करायलाच हवा असं काही गरजेचं नाही. हां पण, हल्ली हे सुध्दा वाढलंय की पोरी वर्षातून हा एक दिवसाचा उपवास करतात आणि बाकी वर्षभर किंवा आयुष्यभर नव-याचा जीव खातात! मी म्हणते कशाला करायचा तो दिखाऊपणा, त्यापेक्षा उपवास न-करता दोन गोड शब्द बोला त्याच्याशी म्हणजे तो सुखी होईल'. आजीने तर अगदी सहजरीतीने जुन्या-नव्याची सांगड घालत ह्या उपवासाचं रूप मला समजावून सांगितलं. पण मला अजून एक प्रश्न पडला,'आजी जशा स्त्रिया त्यांच्या पतीसाठी असा उपवास करतात तसा पुरूष करतात का गं?' ह्यावर आजी अगदी मनमोकळेपणाने हसली आणि माझ्या डोक्यात टपल मारत म्ह्टली,'वेडी गं वेडी, पुरूषमंडळी कधीच कोणताच उपवास करत नाहीत निदान स्वतःच्या बायकोसाठी. माझ्या उभ्या आयुष्यात मी असा एकही पुरूष आपल्या कुटुंबात किंवा आसपास बघितला किंवा ऐकला नाही! पण असं आहे बघ की, त्यांच्या मनामधे आपल्याविषयी प्रेम, काळजी नाही असं नाही. पण, त्यांना स्त्रियांसारखं ते व्रत-वैकल्य करून सिध्द करता येत नाही. पण मला काय वाटतं माहित आहे का, खरं तर हे सगळे व्रत-वैकल्यं ना बायकांनीच स्वत:चं मन रमवून घेण्यासाठी सुरू केले असावेत कारण पूर्वीच्या काळी टीव्ही वगैरे नव्हते ना' आणि आजी खुदकन हसली :) हम्म तर हे होतं आजीचं मत पण मंडळी तुम्हांला जर 'करवा चौथ' किंवा 'हरतालिका' ह्या व्रतांची खरी-खुरी काही कथा माहित असेल तर जरूर सांगा :)

वाचने 9952 वाचनखूण प्रतिक्रिया 41

प्रसाद गोडबोले 24/10/2013 - 18:09
पण मला काय वाटतं माहित आहे का, खरं तर हे सगळे व्रत-वैकल्यं ना बायकांनीच स्वत:चं मन रमवून घेण्यासाठी सुरू केले असावेत कारण पूर्वीच्या काळी टीव्ही वगैरे नव्हते ना'
हे भन्नाट एक्स्प्लेनेशन आहे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

क्रेझी 25/10/2013 - 10:05
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद गिरीजा :) माझी आजी एकदम भन्नाट आहे, ती जरी अगदी जुन्या काळामधे जन्मली-मोठी झाली आहे तरी विचार मात्र अगदी आजच्या पिढीसारखे मॉडर्न आहेत *mosking*

रेवती 24/10/2013 - 18:38
दहाएक वर्षांपूर्वी हरितालिकेच्या आधी आईचा फोन आला होता. उपासाची आठवण करून दिली. मी विसरले. नंतर दोनेक महिन्यात करवाचौथ आली. एक दोघी पंजाबीणी ते करणार होत्या. मग शिनेमात तसे दाखवतात म्हणून सौधिंडीयन आणि नॉर्थींडीयन अशा सगळ्यांनी हे व्रत करायचं ठरवलं. अर्थात मलाही आग्रह झाला. एकदा करून बघायचे म्हणून हो म्हटले पण पाणी पिऊन व्रत करायचे ठरले (फक्त माझ्यापुरते, बाकी सगळ्यांनी कडक धोरण अवलंबले होते). सुर्योदयाच्या आधी सात वस्तू खायच्या म्हणून चार वाजता उठून प्रत्येकीने एकेक पदार्थ केला. मग सणावारी घालायचे कपडे करून सगळ्याजणी एका 'कपूर' आडनावाच्या मुलीकडे जमलो. साडेपाचवाजता खाणेपिणे झाले. मग घरी येऊन तासभर पडी मारली. दिवसभर पाणी पिणे चालू होते. कपूर बाईंची पहिली करवाचौथ होती म्हणून नातेवाईकांकडून अभिनंदनाचे फोन येत होते. मग तिच्या नवर्‍यानेही कडक उपास केला. संध्याकाळी सगळ्यांनी पुन्हा स्वयंपाक केला. त्यात म्हणे विभाजन झालेले धान्य (स्प्लिट) काही खायचं नाही. मग एक उसळ, पराठे, भात आणि साबूत, बिनाधुली दाल, रायता असे प्रकार झाले. चंद्र काही केल्या उगवेना. कपूरबाईंना भूक निघेना. शादी का जोडा पेहनून बसल्या होत्या. लग्नावेळी हौसेनं जड आणि मेहेंगा लेहेंगा शिवून घेतला होता, आता तो सावरायला अवघड जात होता. नंतर मैत्रिणीला फोन केला तर त्यांच्या राज्यात चांद दिसला होता. आता आपणही इकडे उपास सोडूया असे अरोडा बाईंचे म्हणणे पडले. आम्हाला काय, उपास सोडा म्हटले की जेवायला बसणार! अजून थोडा वेळ थांबलो. त्यांनी त्यांच्या पद्धतीची गाणी सुरु केली. पुजेचे तबक एकीच्या हातातून दुसरीच्य हातात असे बराचवेळ फिरवले. सगळ्यांनी डोक्यावर ओढण्या घेतल्या होत्या. मला काही असली सवय नाही. नंतर एकदाचे चंद्रदर्शन झाले. मग चाळणीत मेणपणती लावणे, चंद्राकडे बघणे, नवर्‍याकडे बघणे, नवर्‍याने पाणी पाजणे टाईप प्रकार झाले आणि तरातरा जाऊन सगळ्यांनी आधी जेवणे केली. मग आईला फोन करून गंमत सांगितली तर ती म्हणाली "आपले उपास करायला नकोत आणि ही फ्याशन बरी जमतीये तुला?" तेंव्हापासून जवळजवळ सगळ्या हरितालिका आणि करवाचौथ यांचे दिवस विसरायला झालेत.

In reply to by रेवती

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद रेवती :) तुमचा अनुभव मजेशीर आहे. ऐश्वर्या राय-बच्चन ने ह्यावर्षी म्हणे 'स्काईप'वर नव-याला बघून उपवास सोडला - अमिताभने ट्वीट केलं होतं!

In reply to by रेवती

सुनील 25/10/2013 - 12:37
त्यात म्हणे विभाजन झालेले धान्य (स्प्लिट) काही खायचं नाही
... ...
बिनाधुली दाल, रायता असे प्रकार झाले
स्प्लिट कडधान्यालाच डाळ म्हणतात ना? मग बिनाधुली असली म्हणून काय झालं? काही नाही, वेळ जात नाही म्हणून खुसपट काढलय. बाकी त्या व्रतवैकल्याशी काही देणेघेणे नाही बॉ! ;)

In reply to by सुनील

रेवती 25/10/2013 - 17:56
बिनाधुली म्हणजे सालासकट हो. मला आधी वाटलं होतं की धान्य न धुता एकदम पाण्यात घालून शिजवायचं. पण तसं नाहीये. पूर्वी दळण , कांडण घरी होत असे त्या काळात उपवास केलेल्या बायकांना अजून कामं नकोत म्हणून सालासकट डाळी, धान्य वापरा आणि स्वयंपाक करा, मग करवाचौथचा तो नियम बनून गेला असेल. मला तरी हा सण म्हणजे भक्तीभावापेक्षा फ्याशनच वाटतो. शिनेमाचा परिणाम दुसरं काय! तसंही पंजाब्यांमध्ये फार भक्तीभावानं कोणी काही करताना बघितलं नाहीये अजूनतरी. ;)

In reply to by रेवती

हम्म... कुठला पुरुष (स्वतःच्या) बायकोसाठी उपासबिपास करत नसतो असे नाही. आमचाच एक नुकताच टिळा लागलेला सहकारी मित्रतर (अजून न झालेल्या) बायकोसाठी (पण) अगदी कडक निर्जळी उपवास करण्यात यशस्वी झाला. अगदी सिगारेटसुद्धा फुंकायला गेला नाही. त्याला मग दिवसभर चॉकोलेट, ऑम्लेट, सीसीडी, मॅकडी वगैरेंची आठवण करून देत थोडाफार छळण्यात आम्हीही अजिबात कुचराई केली नाही. बाकी रंगाकाकांचा अनुभव वाचायला आवडेल. ;)

In reply to by एस

रंगाकाकांना लक्षात तरी असेल का आता! ;) काका कधीच मला उपास करू देत नाहीत. किंवा सा. खिचडी, भगर, दाण्याची आमटी, काकडी कोशिंबीर, चटणी, बटाट्याचा कीस, रताळ्याचा गोड काचर्‍या, साबूदाण्याच्या पापड्या, राजगिरा लाडू असे असेल तर आम्ही आनंदाने उपास करतो, मग तो जोडीदारासाठी नव्हे तर स्वत:साठी असतो असे मत आहे. ;)
आधी उपासतापास करायचे आणि नंतर घरी येऊन नवर्‍याचा उद्धार करायचा!! त्यापेक्षा तोंडदाखलं तरी कशाला कराय्चे असे उपास. हे वाचून क्रांतितैंची ही कविता आठवली.

बॅटमॅन 24/10/2013 - 18:50
हा एकूण प्रकार कसा स्त्रीद्वेष्टा आहे आणि हे करणार्‍या आणि करवणारे कसे मूर्खागमनी आहेत हे सिद्ध करणारे प्रतिसाद अजून कसे आले नाहीत?
पुराणात असे आहे की १-१ तांदुळ मोजाव अन लक्ष तांदुळ देवावर घालावेत. कित्येक स्त्रिया वर्षानु-वर्षे कापसाच्या वाती करण्यात व्यर्थ घालवतात अन १ दिवस सगळ्या देवळात जाउन जाळून टाकतात.(म्हणे पुण्य लाभते). बायकांचा वेळ जाता नाही तो जावा म्हणुन अशी व्रत वैकल्ये सांगीतली आहेत. हिन्दु लोक सांगीतल्या शब्दाचे आहेत. त्यांस हेतु समजणे ठाऊक नाही. लोकांनी या मुर्ख चाली सोडुन द्याव्या.. :) ------------------------- हे १८४९ सालच्या पत्रातील विचार आहेत. थोडे अवांतर असु शकते. पण इथे त्यातले काही विचार पस्ते करावेसे वाटले.

राजो 24/10/2013 - 19:09
उत्तम... अवांतर : लहानपणी ही एखादी शिवी आहे असे वाटत असे :P

मदनबाण 25/10/2013 - 11:02
पाखरं फार डायट कॉन्शिअस असत्यात्,तेव्हा स्वतःला मेंटेन करायला आणि हवी तेव्हढी स्टाईल मारायला तसेच इतरां समोर मिरवुन घ्यायची संधी पाखरे सोडणार काय ! उपास करायचा ना ? मग नट्टा-पट्टा कशाला ? अहो नवरात्रीच्या दिवसांची गंमत पहा ना... कुठल्या दिवशी कुठला रंग आहे हे पाखरं आधीच हुडकुन ठेवत्यात, नाहीतर मैत्रीणी किंवा इतर स्त्री नातेवाईकांना फोनाफोनी करुन उद्याचा रंग कुठला आहे याची चौकशी करुन ठेवणार {पाखरांना चौकश्या फार} मग काय भरपुर वेळ घेउन त्या त्या रंगाची साडी,ड्रेस घालुन १० वेळा स्वतःला आरशात पाहुन सर्व कसं नीट आहे ना याची खात्री पटली रे पटली की या निघाल्या लगेच मिरवायला ! ;) हापिसात मला रोज कळत होत आजचा रंग कोणता ते ! ;) बरं या सर्व साजसज्जेचे फोटो काढणार आणि सर्वत्र चढवुन ह्या ह्या ही ही करायला मोकळ्या ! ;) च्यामारी मी म्हणतो ही नवरोबाच्या नावावर चालणारी उपासाची फॅशन पुण्य मिळवण्याच्या नावावर पाखरांनी केलेली मौज-मजाच आहे. नवरोबा फक्त उपास धरण्यापुरता शो-पीस म्हणुन हवा ! नाही तर दिवसभर त्यांना विचारते तरी कोण ? यांच्या मिरवा-मिरवण्यात त्या मशगुल ! ;)

In reply to by मदनबाण

बॅटमॅन 25/10/2013 - 12:11
च्यामारी मी म्हणतो ही नवरोबाच्या नावावर चालणारी उपासाची फॅशन पुण्य मिळवण्याच्या नावावर पाखरांनी केलेली मौज-मजाच आहे. नवरोबा फक्त उपास धरण्यापुरता शो-पीस म्हणुन हवा ! नाही तर दिवसभर त्यांना विचारते तरी कोण ? यांच्या मिरवा-मिरवण्यात त्या मशगुल !
रा.रा. मबासाहेब, हे असं काही सांगितलं की तुम्ही स्त्रीद्वेष्टे ठरता हो. अलीकडे अल्पसंख्य व फेमिनाझी यांना न दुखावण्याची फ्याशन आलीये ;)

In reply to by मदनबाण

मितान 25/10/2013 - 20:57
नशिब ! पाखरांना स्वतःचे मनोरंजन करून घ्यायची ही कल्पना तरी सुचते. बिचार्‍या डाएट अनकॉन्शस बैलांना ते ही नाही !!! ;)

In reply to by मितान

डायट अन्कॉन्शसपणावरूनच पहायचे झाले तर मग पाखराची उपमा सोडून महिषकुळाची उपमा दिल्या गेली पाहिजे ;) =))

पैसा 25/10/2013 - 14:07
मी कधीही उपास, व्रते वैकल्ये वगैरे केली नाहीत. जुन्या कहाण्या मात्र गंमत म्हणून मिळतील तेवढ्या वाचते. लोकांच्या मंगळागौरीत दंगा करायला मिळतो म्हणून जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा जात होते. एरवी भांडताना नवरा आणि मी दोघेही एकमेकाना "मर तिकडे" वगैरे म्हणतो. अजूनपर्यंत काय कोणाचेच शाप लागले नाहीत. मी इथे टाईप करतेय त्याअर्थी जिवंत आहे! ;) तेव्हा शापांसारखाच या उपासांचा काही उपयोग होत असेल असं वाटत नाही. गेल्या वर्षी आमच्या एका नॉर्थिंडियन कलीगच लग्न नवीन झालं होतं. तो व्याकूळ होऊन करवां चौथचं सामान कुठे मिळेल म्हणून विचारत होता, म्हटलं बाबा रे तुला गोव्यात कोण आणि कुठून आणून देणार ते? आधी काय सामान लागतं ते सांग. तर म्हणे एका खास प्रकारच्या मातीमधे गूळ घालून त्याचे लोटे करतात. तेच वापरायचे असतात. त्यांना करवाँ असं म्हणतात. मग कपाळाला हात लावला. हे आता कुठून आणायचं? त्याला एका राजस्थानी पुरोहिताकडे पाठवून दिला. तर त्यानी सांगितलं की आम्हाला पण असे सामान इथे गोव्यात मिळत नाही. तेव्हा तू एक पितळेचा लोटा घेऊन ये कसा! त्याचं तेवढ्याने समाधान झालं असावं. पूर्वीच्या काळात बाकी माहित नाही पण कडक उपास आणि त्याला धार्मिक वलय दिल्यामुळे त्या बायका घरातल्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यात नक्कीच यशस्वी होत असाव्यात. इतर वेळी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष व्हायचे हे सरळच आहे! आपल्या भारतीय लोकांना त्याग या कल्पनेचं भयंकर आकर्षण आहे. त्यामुले आपण कोणासाठी काहीतरी करतो आहोत, त्यासाठी खाण्यापिण्याचा त्याग करतो आहोत ही भावनासुद्धा उपास करणारीला प्रचंड आकर्षक वाटत असावी. बाकी मंगलोरी ऐश्वर्याने करवां चौथ करावी याचे काही आश्चर्य वाटले नाही. ती मंगळाची असल्याने तिचे एक लग्न रुईच्या झाडाशी लावले आणि मग अभिषेक बच्चनशी अशाही बातम्या आल्या होत्या. बच्चन, लालू वगैरे समाजवादी म्हणवणारी मंडळी इत़की हिंदू धर्माच्या परंपरा पाळणारी बघून गहिवरून आले आहे.

In reply to by पैसा

मदनबाण 25/10/2013 - 14:16
ती मंगळाची असल्याने तिचे एक लग्न रुईच्या झाडाशी लावले आणि मग अभिषेक बच्चनशी अशाही बातम्या आल्या होत्या. पिंपळ्याच्या झाडाशी गं ! बाकी बच्चन कंपनी ट्विट करण्यात कोणती धन्यता मानतात ते कळत नाही !

In reply to by पैसा

उद्दाम 25/10/2013 - 14:52
समाजवादी मंडळीनी हिंदू परंपरा पाळू नयेत का?

In reply to by उद्दाम

पैसा 25/10/2013 - 14:56
कारण सार्वजनिक आयुष्यात ते "हिंदू" हा शब्द शिवीसारखा वापरतात. ते असो. या धाग्यावर करवा चौथबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल तर लिहा. जास्ती अवांतर नको. खरडवही किंवा व्यनिची सोय त्यासाठी आहे.
पूर्वीच्या काळात बाकी माहित नाही पण कडक उपास आणि त्याला धार्मिक वलय दिल्यामुळे त्या बायका घरातल्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यात नक्कीच यशस्वी होत असाव्यात. इतर वेळी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष व्हायचे हे सरळच आहे! आपल्या भारतीय लोकांना त्याग या कल्पनेचं भयंकर आकर्षण आहे. त्यामुले आपण कोणासाठी काहीतरी करतो आहोत, त्यासाठी खाण्यापिण्याचा त्याग करतो आहोत ही भावनासुद्धा उपास करणारीला प्रचंड आकर्षक वाटत असावी.
आणि स्त्रियांना तर त्याग बिग करायची पुष्कळ हौस . लोकही मग एखादीने असा पतिव्रता म्हणून त्याग केला कि तिचा उदो उदो करणार आणि इतर स्त्रियांना तिची उदाहरणे देत राहणार

अग्निकोल्हा 25/10/2013 - 21:16
याची ओळख चित्रपटातुन झाली. सगळ्या विवाहितेनी आवर्जुन करावा असा प्रकार

विद्युत् बालक 25/10/2013 - 21:24
आज काल तरुण पोरीच काय अनेक काक्या (काकुंचे अनेकवचन ) पण मेंटेन राहण्या साठी डाएट च्या नावाखाली शरीर झिजवत असतात किमान अशांनी तरी असले गैरलागू प्रश्न विचारू नयेत

आशु जोग 25/10/2013 - 21:50
हे सगळं रमझानसारखं वाटतय

३_१४ विक्षिप्त अदिती 27/10/2013 - 02:37
भारतीय स्त्रीवादी लिखाणात या सगळ्या व्रतवैकल्यांचा संदर्भ आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीशी लावलेला आहे. त्या काळात जिचा नवरा जिवंत आहे तिलाच मर्यादित प्रमाणात आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्थान मिळत असे. (आणि अजूनही अनेक ठिकाणी सामाजिक स्थान इतर व्यक्तीच्या जिवंत असण्यावरून मिळतं.) विधवा स्त्रियांची सती, केशवपन, इथपासून होणारी हिंस्त्र फरपट, शिळं पाकं खाणं, आलवण (किंवा तसलीच निस्तेज जुनेरी) नेसणं अशा प्रकारचीही फरफट नवरा नसल्यामुळे होत असे. याचा जो मानसशास्त्रीय अंगाने अभ्यास झालेला आहे त्यात असं समजलं जातं की व्रतवैकल्य करून एकतर आपण फार पतिनिष्ठ आहोत आणि त्याची फार काळजी करतो हे दाखवता येत असे. दुसरं असं की या रिकाम्या क्रियांमुळेही नवऱ्यामागे ज्या नातेवाईकांवर या स्त्रिया अवलंबून रहाणार असतील त्यांचं यांच्याबद्दल मत चांगलं होत असे. उदा. घरातल्या मोठ्या, सत्ताधारी(!) बाईने किंवा दीर, सासरे वगैरे पुरुषांनाही ही बाई फार चांगली, सज्जन आहे याची खात्री पटावी. एकेकाळी या विधवेनेच स्वःच्या नवऱ्याला आणि/किंवा कोणाच्या मुलाला मारला असंही समजत असत. (पण नात्यातल्या, ओळखीतल्या पुरुषाच्या मरणाबद्दलच; बाईच्या मरणाचं कोणाला दुःख होणार?) म्हैस यांच्या प्रतिसादाचा अर्धा भाग ("लोकही मग एखादीने असा पतिव्रता म्हणून त्याग केला कि तिचा उदो उदो करणार आणि इतर स्त्रियांना तिची उदाहरणे देत राहणार") पटला तरी यात स्त्रियांना त्याग करण्याची हौस आहे असं अजिबात दिसत नाही. मानसशास्त्र, उत्क्रांती वगैरेंच्या अभ्यासातून स्त्रिया, बाय डीफॉल्ट त्यागमूर्ती असतात असं काही दिसत नाही. स्त्रियांमधेही वैर, मत्सर वगैरे भावना असतात. त्या निराळ्या पद्धतीने बाहेर येतात एवढंच. --- अशा प्रकारच्या मानवी वर्तन आणि तथाकथित थोर संस्कृतीची लक्तरं नागेश कुकूनूरच्या 'डोर'मधे आणि दीपा मेहेताच्या 'वॉटर'मधे फार सुंदररित्या लटकवलेली आहेत. जमल्यास हे चित्रपट जरूर पहा. अस्सल भारतीय म्हणावेत आणि हृद्य चित्रण असणारे हे चित्रपट आहेत. त्या विधवांचं आयुष्य पाहिल्यावर बायका वाट्टेल ते करून, हर तऱ्हेने नवऱ्याला जगवण्याचा प्रयत्न का करत, आता आपल्याला ज्या शुद्ध अंधश्रद्धा वाटाव्यात अशा गोष्टींना बळी का पडत याचं उत्तर काही प्रमाणात मिळू शकेल. दोन्ही चित्रपट फार आशावादी आहेत हे विशेष. --- आताच्या काळात बायका हे प्रकार का करतात, हा थोडा रोचक प्रश्न आहे. याला पिअर प्रेशर म्हणू शकता. अनेक मुलगे, सिग्रेट ओढणं वाईट, हानीकारक आहे हे माहित असूनही सिग्रेट ओढायला सुरूवात करतात कारण पिअर प्रेशर. तसंच. जेव्हा बरेच लोक या व्रतवैकल्यांची टिंगल करतील, असं करणं हीन लेखतील, माणसांना कमीपणा देणारं ठरवतील तेव्हा आपसूक हे प्रकार कमी होतील. अर्थात हे काही जादूची छडी फिरवल्यासारखं होणार नाही. पिढ्यान् पिढ्या बाळगलेल्या अंधश्रद्धा लगेच सुटत नाहीत. त्यासाठी अनेकांना काम करावं लागतं, लोकांना विचार करायला उद्युक्त करावं लागतं. दाभोलकरांसारख्या लोकांचा जीव जातो तेव्हा कुठे एक वटहुकून निघतो. समाजाच्या धारणा बदलण्यासाठी बरीच वाट पहावी लागेल. --- यसवायजी, लोकहितवादींचं पत्र दिल्याबद्दल आभार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एस 29/10/2013 - 00:23
याच सामाजिक दुर्बळतेची दुसरी बाजूही कदाचित मानसशास्त्राच्याच अंगाने पाहिल्यास तितकीच खरी वाटते. ती म्हणजे सत्ता किंवा वर्चस्व गाजवता येण्याची दुर्बळातल्या दुर्बळातही असणारी सुप्त इच्छा. मार्ग फक्त वेगळे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 27/10/2013 - 07:20
>>> मंडळी तुम्हांला जर 'करवा चौथ' किंवा 'हरतालिका' ह्या व्रतांची खरी-खुरी काही कथा माहित असेल तर जरूर सांगा मंडळी, मला करवा चौथाची ओळख झाली ती चित्रपट आणि दुरदर्शनवरील विविध मालिकांमधून. त्यामुळे करवा चौथाची भानगड मला अजूनही नीट कळलेली नाही. पण, आपल्याकडे परंपरेने पती आणि पत्नी आणि त्यांचे एकमेकांशी नाते कसे घट्ट आणि हार्टली असलं पाहिजे वगैरे कल्पनेतून या सणांना आकार आले असावेत असे वाटते. अर्थात आधुनिक काळात पती-पत्नी विचारांनी आणि आर्थिक दृष्टीनेही अधिक स्वतंत्र झाल्यामुळे समर्पणाच्या भावना वगैरे फारश्या उरत नाहीत, नसाव्यात. एकमेकांवर फार विश्वास टाकायचं काम नसल्यामुळे आणि आता केवळ पती पत्नी ही नाती केवळ औपचारिकपणाची उरलेली असल्यामुळे मला वाटतं करवा चौथ वगैरे बंद केली पाहिजेत. महिलांनी उपवास करावेत का तर मी म्हणेन करावेत. आरोग्यासाठी चांगले आहे, आता हल्ली पूर्वी सारखे महिलांना शेतावर जावे लागत नाही, कष्टाची कामं राहीली नाहीत. ऑफीसमधे बसून कामांनी कंटाळा येतो. मॉल संस्कृती आणि सतत सटर-फटर खाण्याच्या नाद लागल्यामुळे जवळ जवळ स्त्रीया या डबल हाडाच्या व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे धाप लागणे, थकून जाणे, उत्साह नसणे, आयुष्याच्या कंटाळा येणे, अशा तक्रारी हल्ली येतांना दिसतात. तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने या सणवारात रुढी, वगैरेत काही बदल करावेत, असे सुचवतो. हरितालिका व्रताची कथा : पुराणात अशी कथा सापडते की, पूर्वकाळी पर्वतराजाची कन्या पार्वती ही ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिला विष्णूला देण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनातून शंकारास वरण्याचे असल्यामुळे तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, 'तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्यावरच ती थांबली नाही. तिने आपल्या सखीशी मसलत करुन घरातून पळून जाण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे ती एका अरण्यात जाऊन तेथे शिवाचा लाभ व्हावा एतदर्थ शिवलिंगाची पूजा करु लागली. पुढे शिव प्रसन्न झाला व त्याने तिला वरिले. तिने जे व्रत आचरिले त्याच प्रकारच्या व्रताचरणाने इच्छित वर प्राप्त होईल या हेतून हरितालिका या नावाने सखीसह गौरीची पूजा केली जाते. ( पृ.क्र. २३४. आर्यांच्या सणांचा इतिहास) इति साठाउत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. बाकी, सवडीनं स्त्रीवादावर लिहितोच. :) -दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर 29/10/2013 - 00:53
महिलांनी उपवास करावेत का तर मी म्हणेन करावेत. आरोग्यासाठी चांगले आहे, आता हल्ली पूर्वी सारखे महिलांना शेतावर जावे लागत नाही, कष्टाची कामं राहीली नाहीत. ऑफीसमधे बसून कामांनी कंटाळा येतो. मॉल संस्कृती आणि सतत सटर-फटर खाण्याच्या नाद लागल्यामुळे जवळ जवळ स्त्रीया या डबल हाडाच्या व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे धाप लागणे, थकून जाणे, उत्साह नसणे, आयुष्याच्या कंटाळा येणे, अशा तक्रारी हल्ली येतांना दिसतात. तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने या सणवारात रुढी, वगैरेत काही बदल करावेत, असे सुचवतो.
फक्त स्त्रीयांनीच उपास करावेत? वर उल्लेखिलेले सर्वकांही पुरुषांनाही तितकेच लागू नाही का?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 30/10/2013 - 13:17
>>>> वर उल्लेखिलेले सर्वकांही पुरुषांनाही तितकेच लागू नाही का? एकदम मान्य. पण, विषय करवा चौथ आणि महिलांचा होता म्हणून तसे म्हणालो. पुरुषांमधे करवा चौथ असो किंवा नसो. पुरुषांनीही उपवास करावेत. बैठे काम, सुटलेल्या ढेर्‍या, वगैरेंसाठी उपवास फायद्याचा असेल तर पुरुषांनीही उपवास करावेत. -दिलीप बिरुटे