Skip to main content

म्हैस माजावर येते

लेखक धन्या यांनी मंगळवार, 15/10/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
माज आलाय म्हशीला सालीला. लहानपणी गाय, म्हैस किंवा अगदी एखादया लहान मुलीचा किंवा स्त्रीचा काही कारणास्तव प्रचंड राग आला की ही शिवी आम्ही मुलं देत असू. गाय किंवा म्हशीला दयायची असेल तर समोरासमोर. स्त्री किंवा लहान मुलगी असेल तर ती व्यक्ती नजरेआड झाल्यावर. त्या वयात शब्दांच्या अर्थाशी काही देणं घेणं नसायचं. अर्थात जेव्हा प्रौढ व्यक्तीसुद्धा जेव्हा एखादयाला आई किंवा बहिणीवरुन शिव्या देते तेव्हा त्या व्यक्तीला तरी कुठे त्या शिवीच्या अर्थाशी घेणे देणे असते. शिवी देण्याचा उद्देश मुळी समोरच्या व्यक्तीला "प्रोवोक" करणे हा असतो. परंतू म्हशीला खरोखरीच माज येणे हा मात्र वैतागवाणा प्रकार होता. दिडेकशे उंबरठयाचं गाव आमचं. गावाचा मुख्य व्यवसाय शेती. शेतीला जोड म्हणून शेकडा नव्वद घरांमध्ये गुरं पाळली जायची. गुरं म्हणजे प्रामुख्याने म्हशीच. म्हशीच्या दुधाचा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून केला जायचा. तीन चार म्हशींच्या जोडीला गोठयात एक बैल जोडी आणि एखाद दुसरी गायही असायची. म्हशींच्या दोन जाती असायच्या. एक गावठी आणी दुसरी गुजरी. म्हणजे तशा म्हशींच्या बर्‍याच जाती असतात, जाफराबादी, मेहसाणा ईत्यादी. परंतू या सार्‍या बाहेरच्या जाती गुजरी मानल्या जायच्या. गावठी म्हशीला दुध कमी असायचे. म्हणून गावठी म्हशींच्या जोडीला गुजरी म्हशीही पाळल्या जायच्या. गायींच्याही अशाच दोन जाती. एक गावठी आणि दुसरी जर्सी. जर्सी गायी खुपच महाग असल्याने आख्ख्या गावात जेमतेम दोन तीन जर्सी गायी असायच्या. गावठी गायीही तशा कमीच असायच्या. गावठी गाय एका वेळेला जेमतेम अर्धा लिटर दुध देते. म्हशीचं दुध पचायला जड असा एक समज असल्यामुळे लहान मुलांना गायीचं दुध दिलं जायचं. तसेच शेतीला बैलही हवे असायचे. म्हणून गायींना फारसं दुध नसतानाही गायी पाळल्या जायच्या. म्हशी बहुधा जोडीने पाळल्या जायच्या. म्हणजे दोन, चार अशा. या जोडयांमधील एक म्हैस दुभती असायची जिला तानी म्हैस म्हटले जायचे. दुसरी म्हैस दुध न देणारी किंवा दुध देणं नुकतंच बंद केलेलं असायची जिला पाडशी म्हैस म्हटलं जायचं. दुध देणं बंद करुन एखाद दुसरा महिना निघून गेला की ही पाडशी म्हैस माजावर यायची. तिला रेडा लावला की गाभण राहायची. म्हशींची अशी जोडी पाळायचे कारण असायचे. म्हैस व्याली की जवळपास दहा महिने दुध देते. या दुध देणार्‍या तान्या म्हशीने पाडशी होऊन दुध देणं बंद करेपर्यंत दुसरी दुध न देणारी पाडशी म्हैस गाभण राहून व्यायल्यानंतर दुध देउ लागायची. या तानी पाडशीच्या चक्रामुळे दर वेळी नविन म्हैस घ्यायची गरज नसायची. त्यामुळे पंधरा वीस हजार वाचायचे. अर्थात या चक्रात कधी कधी खंडही पडायचा. कधी म्हैस चरायला गेली असताना हरवायची, कधी तिवा य गुरांच्या जिवघेण्या रोगाने मरायची तर कधी कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेने मरायची. अशा वेळी नवी म्हैस घेण्याशिवाय पर्याय नसायचा. आम्हा लहान मुलांना गुरं चरायला न्यावी लागायची. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी दोन तीन तास वेळ असायचा. सकाळी सातला गुरं चरायला नेली की दहा वाजेपर्यंत चरायची. दहाला त्यांना पाण्यावर नेऊन सव्वा-दहा साडे दहा पर्यंत शाळेत जाण्यासाठी घरी. गुरांकडे गेल्यावर गुरे डोंगरावर किंवा माळरानावर लावून देऊन आम्ही खुप धमाल करायचो. विटी दांडू खेळायचो. बाजूच्या काळ नदीत मनसोक्त डुंबायचो. आंबा करवंदांच्या हंगामात तर मज्जाच असायची. हे असं चालू असताना दहाएक महिने झाल्यानंतर तानी म्हैस दुध देणं बंद करायची. अजून एखादा महिना झाला की माजावर यायची. पाडशी झालेली म्हैस थोडयाच दिवसात माजावर येणार हे आम्हालाही कळायचं. अशा म्हशीचं जननांग सुजू लागायचे. शेपटीच्या खाली जननांगाच्या बाजूला चिकट द्रव जमा होऊ लागायचा. आणि अचानक एक दिवस म्हैस सतत ओरडू लागायची. दर दोन तीन मिनिटांनी हंबरडा फोडायची. जर म्हैस चरायला नेली असेल तर बेफाम उधळायची, वाट सापडेल तिकडे पळायची. ही सारी म्हैस माजावर आल्याची लक्षणं असायची. ही माजावर आलेललीम्हैस गोठयातच बांधलेली असेल तर ठीक. जर ती चरायला नेली असताना माजावर आली तर मात्र आम्हा मुलांना मोठी डोकेदुखी असायची. बेफाम उधळलेल्या म्हशीला आवरुन घरी आणणं खुप अवघड काम असायचं. हे सारं होत असताना म्हशीचा हंबरडा अखंड चालूच असायचा. जशी काय ती रेडयाला सादच घालत असायची. म्हैस पाळणे हा व्यवसाय असल्यामुळे माजावर आलेल्या म्हशीला चांगला रेडा लावणे आवश्यक असायचे. आजुबाजूच्या दोन चार गावांपैकी एखादया गावामध्ये खास म्हशीला लावण्यासाठी एखादा मस्तवाल रेडा पाळलेला असायचा. रेडयाचा मालक रेडयाला म्हशीवर सोडण्याचे पन्नास रुपये घ्यायचा. माजावर आलेल्या म्हशीला मग बैलगाडीला बांधून रेडा असलेल्या गावी नेले जायचे. सोबत आम्हा गुराख्यांची वरात असायचीच. म्हशीचं रेडयाला साद घालणंही अखंड चालू असायचं. ही वरात जात असताना आजूबाजुने जाणारेही विचारायचे, "माज आलाय काय?". त्या रेडयाच्या गावात पोहोचेपर्यंत दोघे तीघे जण तरी असं विचारायचे. बैलगाडी रेडयाच्या मालकाच्या गोठयाजवळ थांबायची. म्हशीला जवळच्याच एखाद्या मोठया झाडाच्या बुंध्याला घट्ट बांधले जायचे. रेडयाच्या मालकाला बोलावले जायचे. म्हशीच्या अखंड साद घालण्याने गोठयात बांधलेला रेडाही एव्हाना अस्वस्थ होउन थयथय नाचू लागलेला असायचा. रेडयाचा मालक कसाबसा त्या रेडयाचं दावं सोडायचा. दावं सुटताच रेडा थेट म्हशीकडे धाव घ्यायचा. रेडा व्यवस्थित लागण्यावर पुढचा वर्षभराचा दुधाचा व्यवसाय अवलंबून असल्याने म्हैसवाले आणि रेडयाचा मालक कुठलाच धोका पत्करायला तयार नसायचे. एव्हाना त्या गावातील रिकामटेकडयांचीही गर्दी जमलेली असायची. म्हशीच्या शेपटीमुळे रेडयाचं काम अडू नये म्हणून गर्दीतील कुणीतरी हौशी म्हशीची शेपटी वर उचलत उचलत असे. कहर म्हणजे रेडयाचा मालक रेडयाचं जननांग हातात पकडून त्याला दिशा दाखवत असे. रेडयाचं काम एकदा झालं की रेडा शांत व्हायचा. पण म्हशीकडची मंडळी एव्हढयावर समाधानी नसायची. शेवटी वर्षभराच्या दुधाच्या व्यवसायाचा प्रश्न असायचा. न जाणो रेडयाच्या एका दमाने काम झालं नाही तर. म्हणून रेडयाला पुन्हा पुन्हा म्हशीजवळ नेलं जायचं. त्या बिचार्‍याची पुढे काही करायची ईच्छा नसायची म्हणून मग आजुबाजूचे बघे "हुर्र हुर्र" असा विचित्र आवाज काढायचे. कसं कोण जाणे पण त्या आवाजाने रेडयाला पुन्हा चेव यायचा. आणि पुन्हा सारं व्हायचं. हे असं तीन वेळा झालं की "झक्कास झालं" असं म्हणून रेडयाच्या मालकाला पैसे दिले जायचे. म्हशीचा हंबरडा बंद झालेला असायचा. रेडाही म्हशीपासून दुर गेलेला असायचा. म्हशीला पुन्हा एकदा बैलगाडीला बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला लागायचो. ********************************************************************************* यथावकाश माझं शिक्षण पुर्ण झालं. शिक्षणाने जगण्याचा कॉन्टेक्स्ट पुर्णपणे बदलून गेला. बालपणीच्या सार्‍या आठवणी कुणा परक्याच्या बालपणीच्या आठवणींचं पुस्तक मिटून ठेवावं अशा मनाच्या कप्प्यात बंद झाल्या. परवा बाईकवरुन सिंहगड प्रदक्षिणा करताना पाबे घाटात वल्लीने गाय आणि बैलाचं बागडणं दाखवलं आणि मी त्याला वर्षातून किमान दोन वेळा होणार्‍या म्हशीला रेडा लावण्याच्या सोहळ्याचे वर्णन केले. योगायोगाची गोष्ट अशी की पाबे घाट उतरुन राजगड आणि तोरणा मागे टाकल्यावर एका गावी हे रेडा लावणे पाहायला मिळालं. इथेही फार वेगळं नव्हतं. वल्ली यावर लिहि अस म्हणाला. अशा वेगळ्या विषयावर लिहिणं थोडं अवघड होतं. पण विचार केला, जे आपण वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी पाहिलं ते मिपाचे वाचकही समजून घेतील. लेखात कुठे खटकण्याजोगं जाणवलं तर ती माझ्या लेखनाची मर्यादा समजून सांभाळून घ्यावं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 97577
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

तिला कोकणात गौरीचे हात असे हि नाव आहे या वनस्पतीचा कंद कापून त्याचा रस हाताला चोळून गाई म्हशी च्या गर्भ बाहेर येण्याच्या जागेला चोळतात यामुळे कला येण्यास मदत होते म्हणून हि "कळलावी" आजकाल या वनस्पतीच्या बियांना फार मागणी आहे पोटात गेल्यास विषारी आहे

वा!

नवीन माहिती मिळाली. शहरात आयुष्य गेल्यामुळे या गोष्टी माहीत नव्हत्या.

नवीन माहिती मिळाली तुमच्यामुळे. लिहिलयही छान

मस्त जमला आहे लेख. प्रतिक्रिया देखील उद्बोधक. अश्लील वाटु शकणारा विषय नीट हाताळला आहेस याबद्दल अभिनंदन.

माझ्या माहितीतील एक प्रतिष्ठित, सभ्यं, सदगृहस्थ .. घरातील आजीपासून नातवापर्यंत सार्‍यांना सांगायचे, "खाऊन माजा रे.. टाकुन माजू नका" . :(

In reply to by धन्या

माज या मराठी शब्दाचा एकच अर्थ आहे.
ह्यावरुन आठवले " माजघर " ह्या शब्दाची व्युत्पत्ती ही ह्याच माज शब्दावरुन झाली असावी काय ? =))

लेख आणि प्रतिक्रिया - दोन्ही भन्नाट!

चांगला लेखं :) बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. बैल दाखवणे / रेडा दाखवणे (खरतर बैल दावायचा हाय / रेडा दावायचा हाय ही उच्चारी वाक्ये) हा प्रकार एका उन्हाळ्याच्या सुट्टीत अगदीच अनपेक्षीतपणे सकाळी सकाळी पहायला मिळाला. (सातवीत असेन बहुतेक) मग त्या सर्व प्रकाराची माहिती मावसभावाने दिली. तोपर्यंत मलाही माहिती नव्हते.. गुरं चारायला नेणे हा सुट्टीतील अत्याधिक आनंदाच काम होतं.

एक म्हटले तर भाबडी शंका. शेतीसाठी बैलाचे वृषण फोडणे हे तितके गरजेचे आहे का? विशेषतः प्रजननाचा हंगाम फिक्स असताना? म्हशीच्या मारलेल्या रेडकाच्या कातड्याचा वास देऊन पान्हा फुटवणे हाही प्रकार तसाच. अशा काही गोष्टी न केल्या तरी चालणार नाही का? की करणे अपरिहार्य असते?

In reply to by बॅटमॅन

तुमच्या प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने माहिती नाहीत. जेव्हा त्या वातावरणात होतो, ज्या वयात होतो त्या वयात असले प्रश्न कधी पडलेच नाहीत. आता कुणाला तरी विचारावे लागेल. अचुक उत्तरे नाही मिळाली तरी तसं करण्यामागे त्यांची काय धारणा किंवा समजूत होती हे कळेल. या निमित्ताने दया पवारांच्या एका कवितेतील ओळी आठवल्या: कशाला झाली पुस्तकांशी ओळख बरा ओहोळाचा गोटा गावची गुरे वळली असती असल्या इंगळ्या डसल्या नसत्या

In reply to by धन्या

धन्यवाद. उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे. बाकी दया पवारांच्या ओळींच्या मूळच्या नव्हे परंतु प्रस्तुत संदर्भातील अर्थाने सहमत.

In reply to by बॅटमॅन

वृषण फोडणे अमानूष आहे यात काही संशय नाही. ही पद्धत ज्यांना माजात आल्यावर सांभाळणे कठीण जाते अश्या सर्व पाळीव प्राण्यांत वापरली जाते असेच दिसते. नॉर्वेत स्लेजला जुंपलेल्या रेनडियरसंबंधातही हेच करतात असे समजले... नाहीतर काम (work या अर्थाने) सोडून नर एकमेकाशी झुंज घेण्यातच सगळा वेळ घालवतात म्हणे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेच म्हणायला आलो होतो... आणि असेहि म्हणतात, की त्यामुळे जनावर कष्टाळू होते. आणि न थकता काम करण्याचा स्टॅमिना वाढतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कुत्र्या-मांजरांची सुद्धा Neutering ऑपरेशन करतात. मग बैल, घोडा अशा मोठ्या प्राण्यांवर नाही का करत?

In reply to by बॅटमॅन

अशा काही गोष्टी न केल्या तरी चालणार नाही का? की करणे अपरिहार्य असते?
वाटल्यास त्याला महाराजाच्या मठातील मांजरीचा सिध्दांत लावू शकतोस. ;) कदाचित अनुभवाचे बोल पण असतील. (एक छोटे उदाहरण आहे नात्यातच. एक लहान मुलगी आईने जवळ घेऊन झोपल्याशिवाय झोपायचीच नाही. नंतर नंतर फक्त आईची चादर असली कीच झोपायची. आता त्या चादरीचे बोंदरे झाले आहे. एक सुताचा छोटा गठ्ठा याशिवाय त्याला काही रुप नाही. ती मुलगी सध्या एमबीबीएस करतेय :) अजूनसुध्दा तिच्या ब्यागेत कायम असते. ) त्या पान्हा फुटवायच्या नकली रेडकाला पण कायतरी सॉलीड शब्द आहे. आठवला की सांगतो.

वृषण फोडणे अमानूष आहे यात काही संशय नाही
स्वतःचा जनानखाना सांभाळण्यासाठी मुघल राज्यकर्त्यांनी याचप्रकारे खोजे तयार केले असे पुर्वी कुठेसे वाचलेले आहे. ८/९ वर्षाच्या मुलाचे खच्चीकरण करुन त्याला ट्रेनिंग देऊन १७-१८ वर्षापासुन जनानखाना सांभाळायला ठेवायचे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चीनी सम्राटांच्या पदरी काही दशहजारांची हिजड्यांची ( नैसर्गिक नव्हे तर खास बनवलेले) फौज असायची. मुख्य म्हणजे ते "निर्धोक" म्हणून त्यांनाच फक्त राजवाड्यात (फॉर्बिडन सिटी) खास नोकरीस ठेवले जाई... इतर पुरुषांना अगदी सरदारांनासुद्धा बाहेरच्या एकदोन खोल्या ओलांडून पुढे जाण्यास मज्जाव होता. बरेच हिजडे इतके सरदार (जनरल) पदाला पोहोचले होते आणि त्यांची स्वतःची फौजही होती ! राजदरबारी त्यांचे इअतके वजन असे की एका हिजडे विरूद्ध इतर सरदार अश्या तंट्यात चीनचे भविष्य पार बदलून गेले असा निर्णय लागला होता.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हिजडे विरूद्ध इतर सरदार अश्या तंट्यात चीनचे भविष्य पार बदलून गेले असा निर्णय लागला होता >> काय बोलता राव! आज चीन जे काही महासत्ता बनणार आहे ते हिजड्यांमुळे की काय?

In reply to by परिंदा

मी म्हणतोय ती सत्यकथा १५व्या शतकातल्या चिनी सम्राटाच्या काळातली आहे. तिच्यामुळे बदललेल्या परिस्थितीमुळे सर्व जगाच्या इतिहासावर फार दूरगामी परिणाम झाले... कसे? ते एका धाग्यात सांगायचा मानस आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मलिक काफूर सुध्दा अल्लाउद्दीन खिलजीचा आवडता हिजडा होता असे वाचल्याचे आठवते. चुभुदेघे. बाकी लेख झक्कास जमलाय.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

एस एल भैरप्पांच्या एका कादंबरीच्या मराठी अनुवादात हे वर्णन आहे.

@ इस्पीकचा एक्का: सहमत आहे अन रोचकही. @अभ्या: ते चादरीचे उदाहरण अन मारलेल्या रेडकाचे उदाहरण यात लै फरक आहे बे. तुझा मुद्दा समजला पण सहमती नाही कारण प्रकार वेगळा आहे. प्रलोभनात क्रूरता आहे. शेवटी इतना सेंटी नै होनेका वैग्रे सगळे ठीके. नॉनव्हेज मीही दाबत असतो, कोंबडी कापताना पाहिलेय, बकरे कापताना एकदा पाहिलेय. ते एक असोच.... पण इथे काहीचा अज्ञानातील सुखाचा भाग आहे असेही म्हणता येईल. @सौंदाळा: माहिती बरोबर आहे. असे कैक खोजे मुसलमान राजवटीत होते अन त्यांचा वट जनानखानाच का, राजकारणातही लै जबरी होता. तीच गोष्ट चीनची.

संवेदनशील विषयावर तितक्याच संवेदनशीलतेने लिहिलेला लेख. प्रतिसादांमधूनही बरीच नवी माहिती मिळाली. माणसाला 'आपण' जगाच्या केंद्रस्थानी आहोत असं वाटतं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे हे अशा वेळी पुन्हा लक्षात येतं. अर्थात वासराचं पोट भरुन जितकं दूध उरेल तितकंच वापरणारे शेतकरीही एके काळी बघितले होते - आज त्यांना वेड्यात काढलं जात असण्याची शक्यता जास्त! भवतालच्या सगळ्या गोष्टींचं बाजारीकरण करायची गरज नसते. खरं तर संवेदना कायम ठेवूनही उपभोग घेता येतो - पण आपण हे विसरून गेलो आहोत की काय अशी शंका येते.

In reply to by आतिवास

सहमत शोषण आणि दोहन भारतीय /आशियायी संस्कृती मध्ये नैसर्गिक साधनांचे दोहन करून उपजीविका करण्याला जास्त महत्व दिले जात असे पाश्चिमात्य संस्कृतीत नैसर्गिक साधनांचे शोषण करून उपजीविका केली जाते . या विषयावर अधिक माहिती साठी श्री दिलीप कुलकर्णी यांचे "निसर्गायण" हे पुस्तक वाचावे . याचा अनुवाद विवेकानंद केंद्र प्रकाशन ने "Ahead To Nature " केला आहे .

या लेखावरुन समजलेले सत्य माणुस हा खुळ्या .....चा प्राणी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो काहीही करु शकतो. माजावर आलेल्या रेड्याचे वृषण ठेचत वगैरे काही नाहीत ते फक्त ताकदीने खेचतात, जेणेकरुन त्यांचा रक्तपुरवठा बंद पडेल .याला आमच्या भागात गोट्या खचवणे असे म्हणतात. एक शंका -एखाद्याचे खच्चीकरण करणे हा शब्दप्रयोग रेड्याच्या बाबतीतून वापरात आला असावा काय?

In reply to by ग्रेटथिन्कर

मस्तच तुम्ही नथु गुग्गुळाचा विचार केलेला दिसतोय. काही तरी डोक्यात शिरायला लागतय तर... पण आता जरा घेतलेत तर बरे...

In reply to by ग्रेटथिन्कर

साहेब, ठेचताना याची डोळा पाहीले आहे हो. सारखे त्या बैलाचे ओरड्णे कानात घुमत होते. विसरू म्ह्णता विसरता येत नव्हते....

बाय द वे... माझे जरा इंग्रजी कच्चे आहे आणि वेळ पण नाही... हे ट्रोल म्हणजे काय हो? तुम्हाला कुणीतरी ट्रोल म्हणाले होते का? आणि ते ट्रोलिंग म्हणजे काय? बाकी आपले नेहमीप्रमाणे...तुम्हाला ते पाठ झाले असेलच......

लेख व प्रतिसाद वाचून बरीच माहिती मिळाली , शहरातील आमची ही तिसरी पिढी असल्याने ह्यातील काही सुद्धा माहिती नव्हते , महाराष्टातील प्रत्येक भागात ह्या प्रकाराला काय म्हणतात ह्याची सविस्तर माहिती मिळाली , अपवाद आमच्या खानदेशचा त्यावर सुद्धा कोणी लिहावे.

In reply to by परिंदा

कदाचित ते खेडयात लहानाचे मोठे झाले असतील त्यामुळे या सार्‍या गोष्टी त्यांनी पाहील्या (त्यांच्या शब्दांत अनुभवल्या) असतील. अर्थात हा फक्त अंदाज आहे. नेमकं काय ते त्यांनाच माहिती. ;)

बहुतेक सस्तन प्राण्यांमध्ये प्रजननाचा(माजावर येण्याचा) एक ठराविक हंगाम असतो. वर्षातून एक-दोनदाच ते प्रजननासाठी पात्र असतात. पण मनुष्यात असे नसते. या मागे काही उत्क्रांतीविषयीचे कारण आहे काय?

In reply to by परिंदा

कारण माणसाने " शिणुमा" चा शोध लावला आहे. रंगीत सिनेमातील एकच रंग ठेवून बाकी रंग वजा केले की उत्क्रान्त सिनेमा बघावयास मिळतो. माणूस या बाबतीत " वेगळा" आहे .

In reply to by प्रचेतस

त्यापेक्षा थोडे दिवस 'माझे ग्रामीण जीवन' चा अभ्यास तुम्हीच करा की साहेब.... हा वल्ल्या ना, धूर्त आहे लेकाचा. ;) ह. घ्या. साहेब!

In reply to by प्यारे१

माझ्याकडे हा गावाकडचा एकच हटके अनुभव होता. त्यामुळे या विषयावर अजून काही लिहू शकेन असं वाटत नाही. जमलंच तर "आयटीच्या गोष्टीं"चा पुढचा भाग लिहिन म्हणतो. ;)

In reply to by प्यारे१

त्यापेक्षा थोडे दिवस 'माझे ग्रामीण जीवन' चा अभ्यास तुम्हीच करा की साहेब....
ग्रामीण जीवनाचा अनुभव असलेला धनाजीरावांसारखा मित्र आयता असता आम्हांस अभ्यास करायची गरज काये?
हा वल्ल्या ना, धूर्त आहे लेकाचा. ;)
:D

In reply to by प्रचेतस

ग्रामीण जीवनाचा अनुभव असलेला धनाजीरावांसारखा मित्र आयता असता आम्हांस अभ्यास करायची गरज काये?
दगडा-धोंडयात लहानाचा मोठा झाल्यामुळे आम्हाला प्रत्येक दगड सुंदर दिसतो. मात्र तुमच्या मैत्रीसाठी उगाचच आम्हाला अजिंठा-वेरुळ, भाजे सारखी लेणी, अडनिडया गावातील मुळची दगडाची परंतू आता उच्च अभिरुचीच्या गावकर्‍यांनी लाख दोन लाखाची वर्गणी गोळा करुन भडक तैलरंगात रंगवलेली मंदीरे तसेच भग्न गड किल्ले पाहत फीरावं लागतं.

In reply to by धन्या

मात्र तुमच्या मैत्रीसाठी उगाचच आम्हाला अजिंठा-वेरुळ, भाजे सारखी लेणी, अडनिडया गावातील मुळची दगडाची परंतू आता उच्च अभिरुचीच्या गावकर्‍यांनी लाख दोन लाखाची वर्गणी गोळा करुन भडक तैलरंगात रंगवलेली मंदीरे तसेच भग्न गड किल्ले पाहत फीरावं लागतं.
=)) =)) =))

In reply to by धन्या

बरं बरं. पण त्या निमित्ताने तुमचेही पाय ज़रा मोकळे होतात. ज़रा ठंडगार येशीतून बाहर पडून गावकुसाबाहेरची मोकळी हवा खाता येते. काही सज्जन मित्र अचानक कसे चिडतात ते बघता येते, त्यातच कदिमदी महिषी पण सामोरी येते. =))

भारी धागा ... माहितीपुर्ण लेख अन त्यावरची चर्चा एक नंबर :) (अवांतर : मिपा दिवाळी अंक २०२४ मधली संजोप राव यांंची " सुंद " ही कथा वाचताना " सुंद बडविणे" या शब्दाची रेंगाळलो ... अन भरकटत या धाग्याला येऊन पोहोचलो ! )

वृषण ठेचून बैलांना प्राणांतिक वेदना देणे अत्यंत क्रूर मनोवृत्तीचे अवलक्षण आहे. बैलाला नाकातून वेसण घालून उन्हात नांगर ओढायला लावणे, बैलगाडीला जुंपून प्रचंड वजन ओढायला लावणे, चाबकाने झोडपणे, वृषण ठेचून आत्यंतिक प्राणांतिक वेदना देऊन नैसर्गिक उर्मी नष्ट करणे, शर्यतीत पळण्यासाठी शारिरीक अत्याचार करणे आणि म्हातारा झाला की खाटकाला विकणे ही अत्यंत क्रूर मानसिक विकृती आहे. असे करणाऱ्यांचे तळपट होवो व ते कायमचे नरकात पडो.

In reply to by श्रीगुरुजी

माणसांनी माणासांना कमी वेतनात जास्त बौध्दिक, शारिरिक कष्ट करुन घेणे अत्यंत क्रूर मनोवृत्तीचे अवलक्षण आहे. मजुरांना डोक्यावर पाट्या वहायला लावून उन्हात तान्हात कष्टवणे, ऐन उन्हाळ्यात वितळत्या डांबरांच्या वाफांंमध्ये भाजत वाहनधारकांसाठी डांबरी सडका तयार करणे, सिमेंट कॉंक्रिट मशिन वर काम करायला लावुन किमी च्या किमी रस्ते तयार करणे, जीव धोक्यात घालुन उंच टॉवर वर पोलादी सांगाडे वेल्ड करणे , २०-२० तास सतत संगणकावर काम करत माना मोडुन, डॉळ्यांच्या खाचा करून विविध व्याधींनी जर्जर होई पर्यंत ताणणे, झोपेच्या नैसर्गिक उर्मी नष्ट करणे, वेतन न वाढवणे, काबाड कष्ट करुन सुद्धा स तत अपमानित करणे अशा आत्यंतिक प्राणांतिक वेदना देऊननैसर्गिक आनंद / सुख हिरावणे, कुटुंबाच्या गावपासुन दुर बदली करणे ही अत्यंत क्रूर मानसिक विकृती आहे. असे करणाऱ्यांचे तळपट होवो व ते कायमचे नरकात पडो.
शतकानुशतके जग हे शोषणावर चाललेय.. जो जेवढं जास्त शोषण करु शकतो तो जास्त धनाढ्य होत जातो.. जो जास्त शोषण करुन घेतो तो वेठ्बिगार होऊन राहतो .. त्याच्या पिढ्यांपिढ्या दारिद्र्यात खितपत पडतात .. समाजातली दरी वाढत जाते .. विषमता वाढत जाते .. एका जगात प्रकाश झगमगत राहतो..रोषणाईने उजळत राहतो .. दुसरीकडं अंधार, दैन्य पिच्छा सोडत नाही .... ........ आणी आपली इच्छा असो वा नसो याच साखळीचा आपण एक भाग असतो.. आपलं दुसर्‍या जगाबद्द्ल वाईट वाटणं हे तात्पुरतं, प्रासंगिक वैराग्य असतं ... कालांतरांन आपण बोथट होत जातो ! ..... हेच अंतीम सत्य ! ......

In reply to by चौथा कोनाडा

.....जो जेवढं जास्त शोषण करु शकतो तो जास्त धनाढ्य होत जातो.... अगदी अगदी...